गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, March 27, 2022

काळोखाच्या तपोवनातून... प्रकाश क्षीरसागर,पणजी, गोवा.



'आपुली मस्ती अपुले जगणे 
सोबत अपुले जीवनगाणे 
काय हवे यापरते दुसरे 
मस्त कलंदर होऊन रमणे'

     असे म्हणणारे एक कलंदर कवी सुधाकर कदम यांचा काळोखाच्या तपोवनातून हा कवितासंग्रह. इंद्रधनुषी रंगांप्रमाणे विविध वृत्त, ओवी, अभंग या छंदातून व्यक्त होणारी त्यांची कविता आल्हाददायी आहे. समाजातील वैगुण्यावर फटके मारणारी ही कविता बोचरी टीका करणारी नाही. मात्र गुदगुल्या करीत शालजोडीतून समाजाला समज देणारी त्यांची कविता आहे. 
मुळात त्यांच्या नसानसात संगीत भिनले आहे. घरी वारकरी परंपरा असलेले सुधाकर गुरुजी हे #आद्य_मराठी_गझल_गायक आणि गझलसम्राट सुरेश भट यांचे अंतरंग स्नेही असले तरी अष्टपैलू कलाकार  अशीही त्यांची ओळख आहे. मिश्किल स्वभाव, विनोदाची जाण आणि संयमित व्यक्तित्व हेही त्यांचे वैशिष्ट्य आहे. 
     ‘काळोखाच्या तपोवनातून’  या कवितासंग्रहातील ८३ कवितांतून सुधाकर कदम हे रसिकासमोर येतात.या संग्रहात अभंग छंदातील अनेक कविता मनाला भावतात. पहिलीच कविता ‘दरवळ’ वाचताना शृंगाराचा गंध जाणवत असला तरी या अभंगातील शेवटचे कडवे

अंत नसलेला । आदिम हा खेळ।
घडवितो मेळ । दो जीवांचा ।। 

     हे आदिम आणि अंतिम सत्य सांगतो. सृजन आणि नवनिर्मिती यासाठी दोन जिवांचा मेळ व्हावाच लागतो. संत तुकाराम महाराज देखील म्हणतात. नवसे कन्या पुत्र होती । तरी का करावा लागे पती ।। स्त्रीबीज आणि पुरुष बीज यांच्या संयोगातून सृष्टीतील प्रजनन होत असते, हे सत्य ते सहज सांगून जातात. 
‘वादळाची झिंग’ ही षडाक्षरी छंदातील कविता अशीच शृंगारिक आहे. या कवितेत ते म्हणतात,

 हुंकाराचे स्वर ।
अधरांची लिपी।
स्पर्शाच्या भाषेत ।
चाले लपाछपी । 

सांडता चांदणे ।
पूर्ण चंद्रासवे ।
उमलते फूल ।
मिठीत देखणे ।। 

सूचक शब्दांतून शृंगार व्यक्त करणारी ही कविता. वाचकांना मदनगंध देते. 

     पंढरीच्या विठ्ठलावर त्यांची श्रद्धा असली तरी ती आंधळी नाही. ती पिढ्यान् पिढ्या चालत आलेली भक्ती आहे. ‘जीवनाची एकतारी’ या अभंगात ते म्हणतात, 

जीवनाची एकतारी।
 पंढरीच्या महाद्वारी ।। 

    या अभंगात त्यांनी एक सत्य सांगितले आहे. भक्ती केली तरी दुःख काही टळणार नाही परंतु त्याची तीव्रता जाणवणार नाही हा संतांनी घेतलेला अनुभव सुधाकर गुरुजी घेतात. 

वेदनांच्या पालख्यांना ।
वाहिले मी बिनपगारी ।।

    परमेश्वर सर्वाधिकारी हे मान्य केले तरी शेवटी एक महत्त्वाचा सवाल ते ईश्वराला करतात, 

कोणती ही रीत न्यारी ।
माणूस माणसा मारी ।।

    हा सवाल ते ईश्वराबरोबरच सर्व समाजालाही करतात. त्यातून त्यांच्या चिंतनशीलतेचे दर्शन होते. 
आनंंदकंद वृत्तातील ‘गाळ अंतरीचा’ ही रचना मोहकच आहे. धूपापरी जळूनी गंधीत होत गेलो ।। असे म्हणत

 'मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची,
काट्यांस मात्र येथे कसलाच ना निवारा...'

     हे सत्य ते खुबीन सांगतात. गंधित आणि मोहक फुलांना सर्वच लोक चाहतात. मात्र काट्यांना कोण जवळ करतो? ही जगरीत स्पष्टपणे सांगतात. फुलांच्या रूपकातून त्यांनी येथे सुरूप - कुरूप, गरीब - श्रीमंत यांच्यातील दरी अचूकपणे टिपली आहे. 
‘नको ते घडत आहे’ मध्ये त्यांनी 

पानगळ येण्या अगोदर
सर्व इच्छा झडत आहे

     असे सांगत भव्य बुरुजही कसा पडत आहे, ही खंत व्यक्त केली आहे.

 'चोरल्याने घास...चिमणी
पाखरे ही रडत आहे...'

     या ओळी तीव्र वेदना प्रकट करतात. 
‘चक्रव्यूह,’ ‘शून्य,’ ‘गूढ’  आदी कविता जीवनाचे सार सांगणाऱ्या आहेत. ‘ती’ या प्रेमकवितेत त्यांनी मंदस्मित करणारी सखी कधी अबोला धरायची तर कधी लटके रागावून परती सलगी करून प्रेम व्यक्त करायची असे प्रेमाचे मर्म प्रकट केले आहे. ‘पापाचा घाट’ घर आहे पण दार नाही, बाहेर सुखी दिसणारे अंतरात किती दुःखी असतात.

'घाम गाळुनी विहिर खोदली 
पाण्याची पण धारच नाही...'

     या ओळींतून दुष्काळाची तीव्रता नजरेस ते आणतात. ‘जिथे तिथे हाटच पापाचा । पुण्याचा बाजारच नाही।’ हे जगात सर्वत्र दिसणारे चित्र उभे करून हे जग किती बेगडी आणि दांभिक आहे, हे नजरेस आणून देतात. 
‘सावळा आनंद’ मधील भक्ती किती निखळ आहे, हे ते दाखवतात. हा भक्तीचा आनंद प्रकट करायचा नसतो तर अंतरातच जाणून घ्यायचा असतो तेथे शब्दांचे अवडंबर काय कामाचे, असा प्रश्न ते करतात. तो आनंद मुक्यानेच घ्यावा, या शब्दांतून नामस्मरण वा भक्तीचे प्रदर्शन न करतात परा वाणीने तो आनंद लुटावा, असे म्हणतात. 
‘घरपण,’ ‘आनंदगाणे’ या कविता चिंतनशील आहेत. तर ‘बघ ना…’ आणि ‘सुलभा’ या प्रेम कवितांतून वेगळ्या प्रतिमांतून प्रेम व्यक्त केले आहे. सुलभा या रचनेत शेवटी ते म्हणतात 

'माझ्यासाठी जिवास जाळुन उजेडली जी
ती ‘सुलभा’ मज मनापासुनी खूप भावली' 

     या ओळींतून त्यांनी आपल्या कुटुंबवत्सलतेची भावना प्रकट केली आहे. ‘आपण अपुल्यासाठी ’ या कवितेतून उरलो तर इतरांसाठी असं सांगून आपल्यासाठीही वेळ काढला पाहिजे हा संदेश दिला आहे. या कवितेतील

‘कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी ’ 

     या ओळींतून नेते फक्त चिथावून देतात., मरतात ते आंदोलनकर्ते हे सत्य कटू असले तरी सांगितले आहे. हल्लीच्या शेतकरी आंदोलनात आंदोलक मेले, शेतकरी लाठ्या खात बसले नेते मात्र वातानुकुलित खोल्यांत सामीष भोजन करत बसले. लोकांनी त्यांच्यापाठीमागे जाऊ नये, असेच सूचित होते. तुकोबांनी असल्या भोंदू आणि नाठाळांच्या माथी काठी मारण्यास सांगितले आहे, याची आठवण ते करून देतात.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       ‘अज्ञाताची हाक,’ ‘दिगंतर,’ ‘तर्पण,’ ‘हट्टी मन’ आदी कविता अंतर्मुख करतात. ‘जीवनगाणे’मधून ते सूरमयी जीवन नवे तराणे गात जगण्याचे जीवनगाणे करतात. ‘अनवट सूर’ ही कविताही अशीच सूरमयी आणि संगीतमय आहे. ‘कोण जाणे काय होते’मधून छान गझल वाचायला मिळते 

'राज्य, राजे, राजवाडे संपले अन्
हे नवे आले भिकारी शोषणाला'

     असा टोमणा ते सध्याच्या व्यवस्थेला मारतात. 
‘विश्व,’ ‘सुगंधी कहर,’ ‘बोल कविते,’ ‘विसावा,’ ‘धुमारे’ आदि अल्पाक्षरी कवितांतून त्यांनी जगण्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 
‘सुखे फिरतात या दारी,’ ‘खारट घास,’ ‘रे मना’ आदी कवितांतून त्यांचे चिंतन व मनन दिसून येते. ‘सांजरात’ हा अभंग सुंदर चित्र उभे करते. 
‘मस्त कलंदर’ ही कविता त्यांच्या जगण्याचे प्रतीक आहे, असे मला वाटते. 
‘खेकडे’ या कवितेत जगातील भवतालच्या माणसांची प्रवृत्ती अधोरेखित होते. 
या संग्रहातील सर्वच कविता विचारप्रवण करणाऱ्या आहेत. अभंग छंदातून अल्पाक्षरी कवितेतून मोठा बोध देता येतो या संत तुकारामाच्या बाण्याचा प्रत्यय ते आणून देतात. 
राम पंडित यांची प्रस्तावना संग्रहाची, सुधाकर कदम यांच्या कवितेची ओळख अत्यत प्रभावीपणे करून देते. 

-प्रकाश रामचंद्र क्षीरसागर. 
(९०११०८२२९८)
दै. हेरॉल्ड,पणजी,गोवा. २०.३.२०२२

काळोखाच्या तपोवनातून 
कवी - सुधाकर कदम 
प्रस्तावना - डॉ. राम पंडित 
पृष्ठे ९५, मूल्य १५० रुपये (+ पोस्टेज ५०रुपये.)
प्रकाशक - स्वयं प्रकाशन, सासवड - पुणे.
मुखपृष्ठ - डॉ.अविनाश वानखडे,पुसद.
google pay 8888858850


 

Thursday, February 24, 2022

शब्द-स्वरसंपदा...


.               सुधाकर कदमांची "#शब्द_स्वरसंपदा" 
           -शाहीर सुरेशकुमार वैराळकर, -निषाद कदम

        आजमितीस सुधाकरच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख),
’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा'
व 'काळोखाच्या तपोवनातून' (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं.), ’काट्यांची मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं.), ’तुझ्यासाठीच मी...’( युनिव्हर्सल म्युझिक कं.) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.

        सुधाकरनेच स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्द गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत बापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊत,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोशी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,
गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत, प्रमोद खराडॆ,जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे, विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,रविप्रकाश चापके,मीनाक्षी गोरंटीवार व दस्तुरखुद्द सुधाकर कदम.

        आणि उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रज़ा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रज़ा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध करण्याचे खूप मोठे काम त्याने केले आहे...

-शाहीर सुरेशकुमार वैराळकर
-----------------------------------------------
.                 #युट्यूब्वर_उपलब्धअसलेल्या_रचना

#मराठी_गझल
१.कुठलेच फूल आता -सुरेश भट
२.दिवस है जाती कसे -      "
३.झिंगतो मी कळेना-         "
४.जगत मी आलो असा की- "
५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"
६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "
७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "
८.ही न मंजूर वाटचाल-        "
९.आले रडू तरीही कोणी रडू नए-"
१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत
११.दुःख माझे देव झाले-   "
१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे
१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "
१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "
१५.गाऊ नये कुणीही-                     "
१६.घाव ओला जरासा होता-            "
१७.हसू उमटले दुःख भोगता-           "
१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "
१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "
२०.तराणे-                                     "
२१.येता येता गेला पाऊस-                "
२२.किती सावरावे-                          "
२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार
२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी
२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे
२६.मी करू सारखा विचार किती-        "
२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने
२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर
२९.पियानो-उ.रा.गिरी
३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख
३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर
३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट
३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे
३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण
३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे
३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे
३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण
३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे
३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत
४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु
४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे
४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार
४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत
४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट
४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके
४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट
४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट
४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर
४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण
५०. जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे
५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

#मराठी_गीते

१.गीत गंगेच्या तटावर-सुरेश भट
२.पहाटे पहाटे-                "
३.मी असा आहे कलंदर-    "
४.गे मायभू-                     "
५.तसे किती काटे रुतले-     "
६.भरात आला श्रावण महीना-ग.दि.माडगुळकर
७.झोपडीच्या झापाम्होरं-                 "
८.महाराष्ट्रगीत-कुसुमाग्रज
९.पोवाडा-शाहीर अण्णा भाऊ साठे
१०.सरस्वतीची भूपाळी-गोविंद
११.सकाळ-उ.रा.गिरी
१२.मराठी हजल-शिवजी जवरे
१३.मन-बहिणाबाई
१४.मानवांनो आत या रे-विंदा करंदीकर
१५.घोडा (बालगीत) शांता शेळके
१६.जवळ येता तुझ्या-अनिल कांबळे
१७.झिंगले चांदणे-श्रीकृष्ण राउत
१८.मराठी माहिया-घनश्याम धेण्डे
१९.सांगू कशी राया तुले (वऱ्हाडी गीत) शंकर बडे
२०.श्याम घन घनश्याम-आशा पांडे
२१.ये मंत्राची घुमवित वीणा-   "
२२.शक्ती दे तू आज मजला-   "
२३.दयासागरा-                      "
२४.तुझीच सुमने-                   "
२५.करुणा अपार आहे-           "
२६.वेद झाले वेदनांचे-              "
२७.तूच माझे गीत कोमल-         "
२८.सरगम तुझ्याचसाठी-सुधाकर कदम
२९.पावसात जाऊ-मीरा सिरसमकर
३०बारीकराव-                    "
३१.रिमझिम पाऊस-            "
३२.हिरवे हिरवे गर्द चिमुकले- "
३३.बागेतल्या फुलांशी मैत्री-   "
३४.रानातले पक्षी-                 "
३५.थेंब-                              "
३६.इवलसं बी-                     "
३७.खूप मजा करू-                "
३८.उठ उठ सह्याद्रे-विंदा करंदीकर
३९.आभाळ वाजलं
४०.पीक खुशीत डोलतय सारं
४१.राम कृष्ण हरी-विश्वनाथ स्वामी
४२.चतुर्वेद जैसा तानपुरा बोले-गंगाधर महांबरे
४३.घर अपुले बांधू आपण-गजेश तोंडरे

#उर्दू_ग़ज़ल

१.आग जो दिल में लगी है-हनीफ़ साग़र
२.दिल लगाया है तो नफरत-     "
३.न इस तऱ्हा भी खयालों मे-बशर नवाज़
४.यकायक चांदनी चमकी-दिलीप पांढरपट्टे
५.गयी लज्जत पिलाने की-         "
६.तू मेरी दुष्मन नहीं-कलीम खान
७.तुम्हारे हुस्न में जो सादगी है-हनीफ़ साग़र 
८.मैं झुकाऊं सर कहीं भी-           "
९.सब में रहकर भी जुदा लगता है तू-   "
१०.बारहा हम जो मुस्कुराए है-प्रथम गिरीधारी
११.कल जो अपने थे अब पराए है-बेताब अलीपुरी
----------------------------------------------------

#हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रसिद्ध होणाऱ्या संगीतास वाहिलेल्या भारतातील एकमेव #संगीत या मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' आणि 'प्रसार गीत' या स्तंभांतर्गत प्रकाशित गझल गीतांची यादी...

#उर्दू_ग़ज़ल

१.
छोटी सी बात की मुझे...अशोक अंजुम...जुलाई १९८६
२.
पत्थरों के शहर में....         "                 नवम्बर १९८६
३.
इतने करीब मेरे...        मोहन वर्मा 'साहिल'  मार्च  १९९०
४.
किसीका क्या भरोसा है...बेदील हाथरसी.   अप्रैल १९९० 
५.
कोई बात बने...             श.न.तरन्नुम ...       मई  १९९०
६.
मत पुछिए...                  शेरजंग गर्ग...    जुलाई १९९०
७.
दूर से आए थे साक़ी.नजीर 'अकबराबादी' अक्तूबर१९९०
८.
वक़्त से पूछ लो...डॉ.राही मासुम रज़ा...     मार्च  १९९१
९.
उनकी गलियों से....अशोक अंजुम...         अप्रैल १९९१
१०.
 ग़म को सीने से लगाकर...'राग' कानपुरी...  जून  १९९१
११.
आज सदीयों की घनी...कलीम खान...        जून १९९२
१२.
जलाए जब तुम्हे शबनम...   "                 सितंबर १९९२
१३.
आदमी गुज़रता है...किरन भारती...        अक्तूबर १९९२
१४.
हमने पाया है तुम्हे...श्रद्धा पराते...                मई १९९३
१५.
हसीन चांद नहीं...'मयंक'अकबराबादी...    नवंबर १९९३
१६.
करीब मौत खडी है...सैफुद्दीन सैफ़ ...      अक्तूबर १९९३
१७.
ज़ख्म-ए-दिल...प्रताप सोमवंशी...                मई १९९४
१८.
बद्दुआ भी...नित्यानंद 'तुषार'...               सितंबर १९९५
१९.
चाक दामां है...अल्लाम 'खिजर'...          अक्तूबर १९९५
२०.
चाह थी इस दिल से...यश खन्ना 'नीर'...    दिसंबर १९९५
२१.
तेरे आगे कली की नाज़ुकी...कमलप्रसाद...  मार्च १९९६
२२.
आग़ाज़ तो होता है...मीनाकुमारी...          अगस्त १९९६
२३.
वो शख़्स जाते जाते...डॉ.पूर्णिमा 'पूनम'..सितंबर १९९७

#गीत

१.
अमर रहे स्वातंत्र्य... नर्मदाप्रसाद खरे...     अगस्त १९८६
२.
जय जय भारती... वल्लभेश दिवाकर...    अगस्त १९९०
३.
 गदराई उमरिया...शंकर दीक्षित...             अप्रैल १९९१
४.
तुम साज़ प्रिये...वेदमणिसिंह ठाकूर...           मई १९९१
५.
दरशन देना नंददुलारे... कृपालू महाराज...    जून १९९१
६.
रखता उंची शान तिरंगा....हरीश निगम...  अगस्त १९९१
७.
उम्र पल पल ... श्रद्धा पराते...                अक्तूबर १९९१
८.
जय स्वरदायिनी...कृष्णराव भट्ट 'सरस'...      मार्च १९९२
९.
परमेश आनंद धाम हो...पथिक...             अप्रैल १९९२
१०.
ये बरखा की रुत... शामकृष्ण वर्मा...        जुलाई १९९२
११.
सह्यो न जाय...श्रद्धा पराते...                 अक्तूबर १९९२
१२.
ओस की बुंदे...डॉ.राही मासुम रज़ा...        नवंबर १९९२
१३.
अर्चना तुम,वंदना तुम....रवि शुक्ल...       दिसंबर १९९२
१४.
देह हुई सरगम सी...राजनारायण चौधरू.. दिसंबर १९९२
१५.
चांद सूरज एक है...माया भट्टाचार्य...            मई १९९३
१६.
सतरूप प्रभो अपना... पथिक...                  जून १९९३   
१७.
राष्ट्र आराधन... डॉ.विश्वनाथ शुक्ल...      सितंबर १९९३
१८.
तू दयालू दीन मैं... तुलसीदास...             सितंबर १९९३
१९.
गाईए गणपती जग वंदन...तुलसीदास...  अक्तूबर १९९३
२०.
ज्योति तुम,मैं वर्तिका हूँ... डॉ.रंजना...      नवंबर २९९३
२१.
गीत मैं ने रचे...शंकर सुलतानपुरी...            मार्च १९९४
२२.
ऐसा भी देखा है...प्रभा ठाकूर...                अप्रैल १९९५
२३.
जब यौवन मुसकाता है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मई १९९४
२४.
राम नाम जपना... डॉ.प्यारेलाल श्रीमाल...    जून १९९४
२५.
तुमने लिखी न पाती...श्रद्धा पराते...         अगस्त १९९४
२६.
आंख से ओझल तुम हो...विनू महेंद्र...     अक्तूबर १९९४
२७.
उड रे पखेरू  ...शाह हुसेन...                  दिसंबर १९९४
२८.
वह गीत फिर सुना दो.डॉ.विश्वनाथ शुक्ल.अक्तूबर १९९५
२९.
तनहाई मेरे साथ तो है...चंद्रशेखर सेनगुप्ता...मार्च १९९६
३०.
रात का पथ... मधुर शास्त्री...                       मई १९९६
३१.
पपिहा की बोली...सियाराम शर्मा 'विकल'..जुलाई १९९६
३२.
पी ले रे अवधू हो मतवाला...चरणदास...सितंबर १९९६

-निषाद कदम
_____________________________________________
#चकव्यातून_फिरतो_मौनी

● हाथरसच्या संगीत मासिकातील 'नग़्म-ए-ग़ज़ल' सदरातील उर्दू गझलची स्वरलिपी...

 

Saturday, February 12, 2022

मराठी गझलगायकीला पडलेलं स्वप्न...प्रा.जैमिनी कडू

        सन १९६५-६६! अकरावीपुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी मला अमरावतीच्या नमुना विभागातील श्री. गंगारामजी भगत (दादा) यांच्याकडे ठेवले होते. अमरावती शहरातील भगत परिवार म्हणजे चालते बोलते लॉजिंग-बोर्डिंग होते. तत्कालीन प्रख्यात बलवंत ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ते एक भागीदार. त्या काळचे अमरावती शहर म्हणजे कापूस, ज्वारी व न्याचे प्रख्यात माहेरघर. त्यामुळे मध्यप्रदेशचा बहुतांश व्यापार अमरावतीमधून चालत असे. अमरावती ते बुऱ्हाणपूर, इटारसी, मुलताई, खंडवा, भोपाळ अशा बलवंत बसेस चालत. त्यामुळे भगत कुटुंबाचा सामाजिक परिवारही मोठाच होता. रोजच चार-पाच पाहुणे दादांकडे मुक्कामाला असत. स्वयंपाकघर सतत चालू असे. दादांचे धाकटे चिरंजीव नारायणराव, कमलाताई त्याच्या सुविद्य पत्नी दोघेही स्वभावाने अक्षरशः सज्जनपणाचा कळस. येणाऱ्या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत होई अन् येणारा जेवूनच जायचा, अशा या भगत परिवारात मला शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले.

     या भगत कुटुंबातील आमच्या कमलाकाकूंचा नातेवाईक असलेला सुधाकर कदम नावाचा समवयीन मुलगा अधूनमधून मुक्कामाला यायचा. अत्यंत रेखीव, सुहास्यवदनी, गव्हाळा रंग, मध्यम उंची, डौलदार कुरळे केस, उठावदार व्यक्तिमत्त्व. सुधाकरची पहिले भेट झाली ती याच वर्षी. आम्ही दोघेही कलाप्रेमी असल्याने बहुधा आमची भेट मैत्रीत बदलली. सुधाकरच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला सदाबहार गायकीची नैसर्गिक देणगी लाभलं होती तर माझ्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर वक्तृत्वाची नैसर्गिक देणगी लाभली होती. यवतमाळातील शिवरंजन ऑर्केस्ट्राचा सर्वेसर्वा म्हणजे सुधाकर अन् अमरावतीमधील बोडे बंधूंच्या आराधना ऑर्केस्ट्रामध्ये मी मंचसंचालक. सुधाकरचे वडील पांडुरंगजी कदम हे कृषी (कुणबी) संस्कृती, सभ्यता व व्यवस्थेतील एक बऱ्यापैकी प्रस्थापित शेतकरी. वारकरी संप्रदायाचे नैसर्गिक लाभलेल्या सुरेल आवाजात भजन गाणारे. माझे वडील भाऊसाहेब कडू हेही याच संस्कृतीतील एक नामवंत शिक्षक. ही सारी पार्श्वभूमी कदाचित आमच्या गाढ मैत्रीचे सूत्र असावे. अजून एक म्हणजे चळवळ्या स्वभाव. यवतमाळच्या कलाक्षेत्रातला चळवळ्या सुधाकर तर अमरावतीच्या साहित्यनाट्य क्षेत्रातला चळवळ्या मी. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत येऊन काही करण्याची दोघांचीही इच्छा. कधीच पूर्ण न झालेली. शिक्षणपूर्ती नंतर उदरनिर्वाहासाठी सुधाकर आर्णीला श्री. दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत झाला.मी ही पदवीनंतर नोकरीच्या शोधात नागपूरला आलो.त्यामुळे काही काळ भेटीगाठी थांबल्या.           

     याच काळात माझी सुरेश भटांची भेट झाली.अमरावतीपासून ओळख असल्यामुळे त्यांनी विचारपूस केली आणि मी बेरोजगार आहे हे कळल्याबरोबर त्यांनी त्यांच्या 'बहुमत' नामक साप्ताहिकात संपादकत्वाचे काम दिले.त्यावेळी ते खामल्यात राहत असत.

     सुधाकर आर्णीला श्री.महंत दत्तराम भारती विद्यालयात स्थिरावला.मी अमरावती सोडून नागपूरला आलो, रोजगाराच्या शोधार्थ अन् पत्रकार म्हणून स्थिरावलो. संगीत शिक्षक होऊन सुधाकर शिक्षक म्हणून मर्यादित राहिला नाही.आर्णीत गांधर्व संगीत विद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे दालन खुले करून दिले.त्यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्रही मिळवले व आर्णी सोडेपर्यंत ३१ वर्षे ते चालविले.शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवसेना शाखेची मुहूर्तमेढही रोवली.त्याच्या प्रयत्नाने विदर्भातील पहिला-वहिला आमदार श्रीकांत मुनगिनवारच्या रूपाने त्याने शिवसेनेला दिला.पत्रकारीतही केली.अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले.कलावंत मेळावे,मराठी गझल गायन स्पर्धा,संगीत विद्यालयाचा वार्षिकोत्सव असे विविध उपक्रम राबवून युवा विश्वाच्या व्यक्तिमत्व विकासाची चळवळ राबवित राहिला.पण गझलगायकी मात्र सोडली नाही. सुधाकरने शिवसेनेचा आमदार व्हायचे ठरविले असते तर दिग्रस विधानसभा मतदार संघातून (विदर्भातून पहिलाच) शिवसेनेचा आमदार म्हणून हमखास विजयी झाला असता.पण राजकारणापेक्षा नैसर्गिक लाभलेले  अन् चिरस्थायी असलेले गीत-संगीताचे क्षेत्र त्याने सोडले नाही.राजकारण कायमचे मागे पडले.इकडे मी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हायचे ठरवले असते तर एका वजनदार काँग्रेसी नेत्याच्या शब्दावर इंदिरा काँग्रेसचा आमदार झालो असतो.परंतु भांडवलदाराच्या पैशावर त्याचा चमचा होण्याचे नाकारले.पत्रकार व पुढे शिक्षक म्हणूनच कार्यरत राहिलो.सुधाकर व माझ्या व्यक्तिमत्वातली ही साम्यस्थळे आजवरच्या मैत्रीतील अतूट धागे आहेत.फरक इतकाच की, सुधाकर पुण्यात जाऊन संगीत क्षेत्रातील त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिला व मी नागपुरात राहिलो.

       सुधाकरला मी 'मराठी गझल गायकीला पडलेले स्वप्न' म्हणतो. सुधाकर अव्वल दर्जाचा संगीतप्रेमी. संगीतातील वादन कलेपासून अन्य सर्व घटकांचे त्याचे ज्ञान विलक्षण असेच होते. वयाच्या १० व्या वर्षापासून तबला वादनाचे धडे घेत, वडिलांकडून हार्मोनियम धडे घेतल्यामुळे १६ व्या वर्षी यवतमाळच्या शिवरंजन या ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायला लागला. तसेच तो नागपूर आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाला, सरोद-संतूरसारखी वाद्ये सुध्दा तो लिलया हाताळत असे. अशातच विदर्भ साहित्य संघाने नव्यानेच संगीत विभाग सुरू करायचे ठरवले. उद्घाटनानिमित्त गडकरी सभागृहात सुधाकरचा कार्यक्रम ठरविण्यात आला.यावेळी सुधाकरने एक तास सरोद वादन व एक तास गायन असा कार्यक्रम केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा म्हणजे सुरेश भट होते.(अमरावतीत असताना सुरेश भटांच्या हाताखाली वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मला दीर्घ काळ मिळाली. तसेच त्यांच्या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकाचा संपादक होतो.) सुधाकरने गायिलेली शंकर बडे यांची गझल व बंदिश त्यांना खूप आवडली. माझ्या माहितीप्रमाणे तो मराठी गझल गायनाचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग होता. या प्रयोगला दादांनी मनापासून दाद दिली.

      त्याच्या गायकीला अनुवांशिकतेची साथ असली तरी आजच्या त्याच्या गायकीला त्याच्या परिश्रमाची,प्रयोगाची पार्शवभूमी आहे. मराठी शिक्षण क्षेत्रातील पहिला असा संगीत शिक्षक की, ज्याने पाठ्यक्रमातील कवितांना चाली लावून विदयार्थ्यांना शिकविले. मराठी गझल कशी गावी, हे त्याने प्रभावीरीत्या सिद्ध केले.गीत-संगीतातील सर्व बारकावे हेरून,गझलमधील भावार्थाला प्राशन करून शब्दरूप द्यायचे अन् शब्दशक्तीला बाधा पोहचू न देता आपल्या गायकीतून सादर करायचे तेव्हा रसिक श्रोत्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर यायचा, वाहव्वा! मी गझलश्रवणप्रेमी आहे.परंतू गझलेतील काव्य-शास्त्रीय संगीत-शास्त्रीय ज्ञानाचा यत्किंचितही गंध नसलेला गझलश्रवणप्रेमी आहे.गझल ऐकताना कर्णमाध्यमातून मेंदू व हृदय यांना भावणाऱ्या अलौकिक अशा भावना शब्दशक्तिमधील उच्चार अभिव्यक्तीत उणीव असेल तर बाधित होतात, याचा अनुभव घेतलेला. सुधाकर हा कौटुंबिक सदस्य असल्याने कौटुंबिक गझल मैफली झडत असत. त्यावेळी अलौकिक प्रत्यय अनुभवता येत असे. अशा अलौकिक गायकीच्या सुधाकरला मराठी गझलसाम्राट सुरेश भटांनी दिलेल्या पावतीचा मी जिवंत साक्षीदार आहे. 

     सुधाकरच्या आवाजातून त्यानेच स्वरबध्द केलेली भटांची 'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही, ही गझल जेव्हा घनदाट रानातील झुळझुळणाऱ्या झऱ्यासारखी बाहेर पडली तेव्हा भटांनी त्याला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' म्हटल्याचे याची देही याची डोळा मी पाहिले आहे. 

(कुठलेच फूल आता मजला पसंत नाहीची youtube link...

https://youtu.be/fnibDhN5x7o) 

     त्यानंतर 'सुरेश भटांची गझल व सुधाकरची गायकी' एक समीकरणच झालेले अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवले. सुरेश भटांची गझल अन् सुधाकरची अनुरूप स्वररचना,संगीतसाथ म्हणजे अलौकिक सांगीतिक अनुभव.

'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो'

 हा सुरेश भटांचा प्रत्ययकारी विद्रोह तेवढ्याच प्रत्ययकारी अदाकारीने सुधाकरच्या गझलगायकीतून कानावर यायचा. तेव्हा रसिक भावविभोर न झाला तरच नवल. विद्रोह हा पोवाड्यातून अधिक परिणामकारकरीत्या अभिव्यक्त होतो.तो विद्रोह सुधाकर आपल्या गझल गायकीतून उत्कटपणे सादर करू शकत होता,अशा गझल गायकीतून शृंगार अन् करूण रसातली गझल रसिक श्रोत्यांच्या पसंतीला न उतरली तरच.

            सुधाकरमध्ये एक कवी पण दडलेला आहे.

'सरगम तुझ्याचसाठी,गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

ही त्याची रचना '#सरगम_तुझ्याचसाठी' या त्याच्या बंदिशींवर आधारित कार्यक्रमामधून त्याच्या मुली भैरवी,रेणू सादर करायच्या.सुधाकर हा शास्त्रीय संगीतातील योगी.त्यामुळे त्याच्यातील कवी संगीतमय कविता प्रसवणारा. नैसर्गिक सौंदर्यभावाची देणगी लाभलेल्या मायेने आपल्या गोंडस मुलाला साजशृंगाराने सजवून त्याचे सौंदर्य अधिक खुलवावे,तसे सुधाकरचे त्याच्याच काव्याबाबत .हा रसाविष्कार त्याच्या गझलगायकीतही रसरसून भरलेला आहे.कवी,कुशल संघटक, संगीतकार,गायक,संगीतकार,शिक्षक आणि पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या सुधाकरलाही अखेर सांस्कृतिक विषमतेचा बळी व्हावे लागलेच.अक्षरशः पुण्यात राहूनसुद्धा कृषी संस्कृती,सभ्यता व व्यवस्थेतही कोहिनूर पैदा होतात,आहेत,झालेत.परंतू कोळसा खाणीतील कोळशाला जशी रत्नाची पारख नसते,तसेच या व्यवस्थेतील प्रज्ञावंतांचे होते.कृषी व्यवस्थेला नैसर्गिक उत्पादन करण्याची कला ठाऊक असते,मात्र त्या नैसर्गिक उत्पादनाचे कृत्रिम मार्केटिंग करण्याची कला अवगत नसते.परिणामी कृषकाचा गहू खाणाऱ्याला जितका माहीत होतं नाही,तितका 'टाटाचा बाटा' माहीत होतो.दूध उत्पादक कृषकाचे दूध त्याच्या व त्याच्या गायी-म्हशीच्या नावे ओळखल्या जात नाही.ते 'हल्दिराम' वा 'दिनशॉ' च्या नावाने ओळखले जाते.तसे काही सुधाकरचे झाले आहे.

      सुधाकर आणि माझ्यातील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे आम्ही दोघांनीही आंतरजातीय विवाह केला आहे.माझी बायको कलार समूहातील,सुधाकरची बायको आमच्या प्रिय सुलभा वहिनी या ब्राह्मण समूहातील.माझी बायको 'कुणबी' होऊ शकली नाही,पण मूळच्या ब्राह्मण असलेल्या सुलभा वहिनी अगदी सुलभ रित्या 'कुणबी' झाल्या.जातीने नव्हे प्रवृत्तीने.ब्राह्मण तरुणीशी आंतरजातीय विवाह करणाऱ्या बहुजन तरुणांची अवस्था कशी होते,हे मी अनुभवून आहे. म्हणूनच मला सुलभा वहिनींचा खूप खूप अभिमान आहे की, त्यांनी सुधाकरचे जीवनसाथी होण्याचे ज्या दिवशी निश्चित केले त्याच दिवशी आपले ब्राह्मण्य सुलभरीत्या त्यागले अन्  कुणबित्व स्वीकारले. सुधाकर आज जे काही मिळवू शकला त्यात सुलभा वहिनींचा वाटा तितकाच आहे, जितका गझलगायकीत संगीताचा.सुधा-सुलभा या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या जीवनात ज्या दोन गझलांनी आणि एका अभंगाने जन्म घेतला, त्या भैरवी अन्  रेणू या पोरी व निषाद हा पोरगा.तिघेही स्वरसंगीत घेऊनच जन्मले अन् आपल्या पित्याच्या स्वरसंगीतमय जीवनातील अविभाज्य असे घटक होऊन राहिलेत.मराठी गझलगायकीला पडलेले 'सुधाकर कदम' नावाचे स्वप्न आज अत्यंत कृतकृत्य जीवन जगत आहे.मणक्यांच्या दुखण्यामुळे थोडा वेग कमी झाला असला तरी आवेग कमी झालेला दिसत नाही. हे त्याच्या एकामागून एक रसिकांच्या सेवेत येत असलेल्या अल्बम्सवरून दिसते आहे. अशीच दीर्घतम संगीतसेवा त्याच्याकडून घडण्यासाठी दीर्घायुरारोग्यासाठी निसर्गाजवळ प्रार्थना करतो.


५,आर.एम.एस.कॉलनी,

मानेवाडा रोड

नागपूर.

Sunday, December 26, 2021

काळोखाच्या तपोवनातून...


 .      'काळोखाच्या तपोवनातून' या माझ्या दुसऱ्या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून-शाहीर सुरेशकुमार वैराळकर,प्रकाशक शुभानन चिंचकर,अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पंडित विकास कशाळकर, अस्मादिक,ज्यांचे हस्ते प्रकाशन झाले ते ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.श्रीपालजी सबनीस,सन्माननीय उल्हासदादा पवार,पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर,प्रसिद्ध गायिका अनुराधाजी मराठे,प्रसिद्ध गीत-गझलकार वैभव जोशी.

२४ डिसेंबर २०२१,एस.एम.जोशी सभागृह,पुणे.

    

Wednesday, December 15, 2021

सुधाकरी तोडी...



     हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील दहा थाटात नसलेल्या सुरावटीत खालील गझल स्वरबद्ध झाली आहे.यात रिषभ,गांधार,निषाद कोमल असून मध्यम व धैवत स्वर वर्ज आहेत.गायला थोड्या कठीण असलेल्या या सुरावटीच्या बांधणीला मी "#सुधाकरी_तोडी" असे नाव दिले आहे.शास्त्रीय संगीतातील विद्वानांना हे कितपत मान्य होईल ते माहीत नाही.ते "बिलासखानी तोडी" स्वीकारतात पण #सुधाकरी_तोडी ?????? असो!

Monday, December 6, 2021

काळोखाच्या तपोवनातही प्रकाशाची वाट...



           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळन करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ काळोखाच्या तपोवनातून ” हा गझल संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.
 माणस माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाते सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...

 कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना
 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना

खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...

 मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा

गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..

मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे
फुलासारखी प्रसन्नताही अजून तशीच आहे..

माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात..

 भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.
 पण गाळ अंतरिचा तो राहिला बिचारा

माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात..

आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.
नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते.

जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात.

 हासुनी हसवायचा हा मंत्र घे
 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!

आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात 

हसूनी वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात

 दीन दुःखितांना / मदत जे करी
 तेणे मुक्ती चारी / साधलिया

माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..

 कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना
 मिटवाया तृष्णा / निरागस

जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.

 सरणावरती चढतो जेव्हा
 कोणी नसते त्याच्या पाठी

आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात

 ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी
 लिही कांदबरी / मुंबईत

माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..

 ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी
 तयासी पाखंडी / म्हणावे गा

व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.
 कविता संग्रहाचे नाव- काळोखाच्या तपोवनातून
 कवी- सुधाकर कदम
 प्रकाशक-स्वयं प्रकाशन,सासवड,पुणे
 पाने-९६
किंमत-१५०
-संदीप वाकचौरे
----------------------------

◆ काळोखाच्या तपोवनातून
◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम
◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित 
◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे 
◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

*प्रकाशन २४ डिसेंबर २०२१*
एस. एम. जोशी सभागृह, पुणे
सायं. ६.०० वा.

संग्रह मिळवण्यासाठी तपशील -
किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
google pay - 8888858850


 

 





संगीत आणि साहित्य :