गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, October 18, 2023

आठवणीतील शब्द-स्वर (लेखांक ९)


                                  
    बालपण हवेसे-नकोसे

मित्रहो,
लग्नाची खरी मजा ग्रामीण भागातील लग्न कार्यातच येते.लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बैलगाड्या,त्यात चिल्ल्या-पाल्यांसह बसलेली वऱ्हाडी मंडळी,रस्त्यावरील प्रत्येक गावात शिरताना वाजणारी 'वाजंत्री',लग्नाच्या गावी पोहोचल्यावर होणारी तिथली व्यवस्था, जानवशावरील मुक्काम, पाहुण्यांचा गलबला, फाऱ्या लावून वर डहाळ्या टाकून केलेला 'एअर-कंडिशन' मंडप,  वधुपक्षाची धावपळ, लग्नानंतरच्या पंगती,लाडू खाण्याच्या शर्यती,पियक्कडांची रस्सेदार भाजीची खास तर्री वाली शेवटची 'सुवासिक' पंगत, ही सगळी मजा आता इतिहासजमा झाली आहे.बुफे युगात 'ते आले, लग्न लावले, जेवले व गेले' असे झाले आहे.
     माझ्या काकांचं लग्न मला आठवतं.वय किती ते मात्र आठवत नाही.बहुतेक पाच/सहा वर्ष असावे.त्यावेळी लग्न ठरलं रे ठरलं की पाहुण्यांची वर्दळ सुरू व्हायची ती लग्नानंतरचा सत्यनारायण आणि दुसऱ्या दिवशीची मटणाची खास पंगत आटोपल्याशिवाय संपायची नाही.डेळ-माथन,हळद असे एकामागे एक कार्यक्रम असायचे. या प्रसंगी नातेवाईकांसोबतच गावातील स्त्री पुरुष मंडळी पण असायची.काकांच्या लग्नात पण हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर नवरदेवाची वरात निघाली.लग्न वर्धा जिल्ह्यातील देवळी या गावी होते.दमनीत नवरदेव,पाठीमागे काही छकडे,बैलबंड्या,खाचरं यात वऱ्हाडी. आणि समोर डफडेवालले पैदल. गावातून निघताना डफडेवाल्यांचा गोंगाट संपला की पुढील गाव येईपर्यंत शांतता असायची.पुढच्या गावाची शिव लागली की गाव संपेपर्यंत डफडेवाले जीव तोडून वाजवायचे. असे करत करत एकदाचे लगीनगाव आले.नवरदेव व वऱ्हाडी यांच्या विश्रांतीसाठी केलेल्या एखाद्या इमारतीतील व्यवस्थेला जानोसा म्हणत.(ही व्यवस्था बहुतेक एखाद्या शाळेत केलेली असायची.)तेथे सगळ्यांची फराळ-पाण्याची व्यवस्था होती.लग्न मंडपातून नवरीकडच्या लोकांकडून निरोप आला की सर्वप्रथम मानवाईक मंडळी जायची.तिथे मंडपाबाहेर त्याचे पाय धुवून नारळ,शेला देऊन गळ्यात हार घालून स्वागत केल्या जायचे.तेथेही पानाचे तबकात सिगारेटची पाकीटं, विडीची बिंडलं फिरत असायची. नेहमी विडी पिणारे यावेळी सिगारेटचे झुरक्यावर झुरके मारतांना दिसायचे.नंतर नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी नवरीचा भाऊ किंवा सख्खा भाऊ नसेल तर चुलत वगैरे भाऊ यायचा.आणि यावेळी नवरदेवाचे रुसण्याचे सोंग सुरू व्हायचे. मग रुसवा काढण्यासाठी नवरीकडचे मानवाईक येऊन रुसवा काढायचे.आणि नवरदेव एकदाचा लग्नमंडपात दाखल होऊन लग्न लागायचे.नंतर जेवणाच्या पंगती उठायच्या.शेवटची पंगत हमखास पेताड पाहुण्यांची असायची. त्यांच्यासाठी वांग्याच्या भाजीवरील तरी खास राखून ठेवलेली असायची. यानंतर निरोप समारंभ सुरू व्हायचा.याला हारा-डेरा म्हणायचे.नवरदेव नवरीने सगळ्यांच्या पाया पडणे,निघताना नवरीने घरच्यांच्या गळ्यात पडून रडणे होऊन नवरदेव नवरीसह परत निघायचा.(चौथी इयत्ता उत्तीर्ण होईपर्यंत म्हणजे १९६० पर्यंत मी एस.टी.पहिली नव्हती.जवळपासच्या गावी जायचं म्हटलं बैलगाडी एकमेव साधन असे. तसेच त्या काळात आजच्यासारखे एस.टी. चे जाळेही विणलेले नव्हते नातेवाईकांची गावे पण जवळपास असायची.जवळच्या नातेवाईकांकडे पैदल आणि दूरच्या नातेवाईकांकडे बैलगाडीने जायची पद्धत होती.)
     थोडे वय वाढल्यानंतर एखादी लग्नपत्रिका घरी येऊन पडली की, लग्नाला जायची तयारी सुरू व्हायची.कपड्यांचा वगैरे तेव्हा प्रश्न नसायचा.एक जोड रोज रोज वापरण्यासाठी व एक जोड खास कार्यासाठी असायचा. दिवाळीला शिवलेला ड्रेस पुढच्या दिवाळीपर्यंत नवाच ठेवायचा.तोपर्यंत मागच्या दिवाळीचा ड्रेस वापरायचा.त्यामुळे आमची खास तयारी म्हणजे चिंचा जमा करण्याची! लग्नघरी पोहोचलो की टिवल्या-बावल्या करत वेळ घालवणे,धिंगाणा घालणे,मारामाऱ्या करणे यात वेळ घालवायचो. पण नेमके लग्न लागायच्या वेळी मंगलाष्टकं सुरू झाली की,सजग होऊन बँडवल्यांसमोर ४/५ जण रांगेत बसायचो आणि 'वाजंत्री बहु गलबला' झाले की, सगळ्यांनी बँडवाल्यांना दिसतील, अशा प्रकारे चिंच खाणे, चोखणे सुरू करायचो.आमच्या या चिंचा प्रकारामुळे वाजंत्र्यांची  खऱ्या अर्थाने फेंssss फेंssss उडायची.या प्रकारामुळे शिव्या मिळून कधी कधी आमचाही बँड वाजायचा.पण यात मजा यायची.हळू हळू वय वाढत गेल्यावर बऱ्याच इतर गोष्टींचे ज्ञान वाढून जुन्या गमती जमती मधील मजा कमी होत गेली. पुढे स्वतःच भाग्योदय मंडळात अकॉर्डियन वाजवून 'सोफिस्टिकेटेड' बँडवाला बनलो.


 





संगीत आणि साहित्य :