गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 30, 2020

सुरेश भट आणि मी...


          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७/७८ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. पंधरा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदि्शी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा सुरु झाला. 
या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 
           भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का? या वेळेपर्यंत 8 वाजले होते. 9 वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे 10 वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला.
आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.
 विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर
‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.
‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.
‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.
‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.
‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.
अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.
 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हे शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा. यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू?’’ तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. 1982 पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदा्र्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.
             आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना 1981-82 च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी 6 वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.
 सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील 65 च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.
           आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छाअच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
 
-सुधाकर कदम
सी-१-सी/१३,गिरीधर नगर,
वारजे-माळवाडी,पुणे-५८. 
मोबा.९८२२४००५०९





 

Tuesday, December 22, 2020

गझलयात्रा...अमोल सिरसाट


'चकव्यातुन फिरतो मौनी'

         अवलिया हा शब्द सुफी संतांमुळे भारतात आला. सुफी संतांसारखे पायघोळ झगे घालतेले, सतत अल्लाहचे नाव घेत जगणारे लोक म्हणजे अवलिया असा समज प्रचलित आहे. परंतु मराठीत या शब्दाला स्वच्छंदी, छांदीष्ट किंवा आपल्याच धुंदीत जगणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. भारतात गझलही सुफी पंथातील अवलिया संतांनीच आणली. मराठीत गझल रुजविणा-या अवलिया सुरेश भटांबरोबर सर्वप्रथम मराठी गझल गायकी रुजविणासाठी धडपडणारा एक चकव्यातून फिरणारा मौनी म्हणजे सुधाकर कदम! शास्त्रीय संगीतातील बहुतेक वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या सुधाकर कदमांनी सुरुवातीच्या काळात सुरेश भटांबरोबर प्रसंगी पदराला खार लावून मराठी गझलेच्या प्रसार प्रचारासाठी प्रयत्न केला आहे.
 
       फारसी–उर्दू-हिंदी गझल गायकीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. उर्दू गझल गायकीचे चाहते जगभरात पसरले आहेत. मराठी गझल गायकीला तशी परंपरा नाही. मराठीत गझलगायनाचे जे प्रयत्न झाले. त्यात सुगम संगीत आणि भावगीतासारख्या चाली देऊन गझल सादर केल्या जात. १९७५ मधे सुधाकर कदम यांनी ‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही’ ही यवतमाळच्या शंकर बडे यांची गझल १९७५ मधे सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध करून नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटन प्रसंगी सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते. इथूनच सुरेश भट आणि सुधाकर कदम या द्वयींचे सूर जुळले आणि मराठी गझल गायकीच्या परंपरेचा जन्म झाला. भटांनी सुधाकर कदमांना आपल्या अनेक रचना स्वरबद्ध करण्यासाठी दिल्या. हळुहळु त्यांनी स्वरबद्ध केलेल्या मराठीतील काही गझलांचा तीन तासांचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला भटांनी ‘अशी गावी मराठी गझल’ असे शीर्षक दिले आणि महाराष्ट्रभरात या कार्यक्रमाचे प्रयोग सुरु झाले. १५ जुलै १९८२ ला पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना साप्ताहिक ‘लोकप्रभा’ मधे छापून आलेला मजकूर अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी 'सा' लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्फूर्तपणे स्वागत केले. आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका... गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दांच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझलगायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.’ गायकीच्या अंगानेसुद्धा मराठी गझल हा वेगळा प्रकार आहे. गझलेची बंदिश (सोप्या भाषेत चाल) प्रत्येक शब्दाला जिवंत करून अर्थाचे वेगवेगळे आयाम प्राप्त्त करून देत असते. गझलगायक प्रत्येक शब्दाला हळुवारपणे गोंजारत गझलकाराच्या मनातील भावनांचा प्रवाह रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोहोचविण्याचे काम करीत असतो. अशाप्रकारे गझल स्वरबद्ध करून मराठीत सर्वप्रथम गझलगायनाचे श्रेय सुधाकर कदम यांचेकडेच जाते.
            यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या छोट्याशा गावी १३ नोव्हेंबर १९४९ रोजी जन्मलेल्या सुधाकर कदम यांचे वडील पांडुरंग कदम हे वारकरी संप्रदायातील विदर्भातील सुप्रसिद्ध गायक आणि हार्मोनियम वादक होते. सुधाकर कदमांना संगीताचे प्राथमिक धडे त्यांच्याकडूनच मिळाले. यवतमाळला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असतानाच ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रामधे संगीत संयोजन, ऍकॉर्डियन वादन व गायन असा व्याप सांभाळता सांभाळता त्यांना चाली बसविण्याचा छंद जडला. सतत दहा वर्षे दहा बारा तास रियाज करून त्यांनी विविध तंतूवाद्ये आणि तालवाद्ये हाताळण्यात प्राविण्य मिळविले. याचा फायदा आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाला व ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायक-वादकांना त्याकाळात सन्मानाचे स्थान होते. त्यानंतर सुधाकर कदम हे आर्णी येथेच संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.
              सुरेश भट कदमांकडे आर्णीला मुक्कामी असायचे. आर्णीला मुक्कामी असताना त्यांनी अनेक गझला लिहिल्या. त्यापैकी एक गझल म्हणजे –

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

            ही गझल भटांनी लिहिली आणि लगेच सुधाकर कदमांना चाल लावण्यासाठी दिली. ते लगेच हार्मोनिअम घेऊन बसले आणि अख्खी रात्र जागून एक वैशिष्ट्यपूर्ण चाल दिली. भट त्यांची रात्रभराची तगमग पहात होते. त्यांनी सकाळी मनभरून दाद दिली. सृजनासाठी धडपडणा-या प्रत्येकाला ही तगमग स्वस्थपणे जगूच देत नाही. रात्रीअपरात्री भोवताली निरव शांतता असते मात्र कलावंताच्या मनात मात्र प्रचंड वादळ उठलेले असते. तो सगळे प्रहर जागून काढतो तेव्हांच उत्तम कलाकृती निर्माण होतात. सुधाकर कदमांनी भटांसह अनेक गझलकांरांच्या रचनास्वरबद्ध केल्या आहेत. त्याच्या मराठीसह उत्तमोत्तम हिंदी-उर्दू बंदिशींचा खजिना पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सुधाकर कदमांच्या कन्या भैरवी आणि रेणू यासुद्धा त्यांच्या गझलगायकीचा वारसा समर्थपणे चालवित आहेत. त्यांचे चिरंजीव निषाद कदम हे उत्तम तबलावादक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटूंबच गझलमय झाले आहे असे म्हणावे लागेल.
             सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. सुरेश भट तर त्यांना ‘ महाराष्ट्राचे मेहदी हसन’ असे संबोधत असत. पुण्यातल्या त्यांच्या मैफिलींचे निवेदन खुद्द सुरेश भटांनी केले होते. मराठी गझल जनमानसात रुजविण्याचे या मंडळींचे कार्य पाहिले की खरोखरच नतमस्तक व्हावेसे वाटते. आणि म्हणूनच पुणे विद्यापिठाने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत त्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृतिदिनी ‘सुरेश भट स्मृतिपुरस्कार २००९ ‘ व ‘गझलगंधर्व’ हा किताब देऊन सन्मानित केले आहे. पुण्याच्या अक्षर मानव प्रकाशनाने ‘चकव्यातून फिरतो मौनी’ हा गौरवग्रंथ श्रीकृष्ण राऊत यांच्या संपादनात प्रकाशित केला आहे. गायनासाठी स्व.छोटा गंधर्व आणि आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मार्गदर्शन लाभलेले सुधाकर कदम हे एक उत्तम शिक्षक, संगीतकार, गायक, वादक तर आहेतच पण विनोदी लेखक, आणि कवी सुद्धा आहेत. 

सुधाकर कदम सी-१-सी/१३, गिरीधरनगर, वारजे माळवाडी ', पुणे - ४११०५८ भ्रमणध्वनी- ८८८८८५८८५०
..............................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

यापूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या 👉
http://gazalyatra2020.blogspot.com


 

Saturday, December 19, 2020

पंडित सुधाकर कदम...सीमा गादेवर

.            १९८१ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश_भट व गझल गायक सुधाकर_कदम हे  मराठी_गझल गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत !

      त्यांच्या " तुझ्यासाठीच मी... ' या अल्बमचे प्रकाशन      झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंत होते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे.            
                                         
 "तुझ्यासाठीच_मी... " या मराठी गझलच्या  अल्बममध्ये 'गझलगंधर्व'  श्री. सुधाकरजी कदम या गायक व "पंडित" ही ऊपाधी  कमीच पडावी अशा या  संगीतकाराने- कवी श्री.दिलीप पांढरपट्टे  व  गायिका  वैशाली माडेसह  एक  न्  एक गझलेला, गाण्याला....  प्रत्येक ओळीचा  व शब्दातला  भाव  जाणून आपल्या  स्वर-साजाने  नवा आलेख  व आशय  दिला आहे.शब्दांना  वेगवगळ्या  सुरावटीतून  गुंफतांना एक  मायाजालच  आपल्याला हळूहळू  आनंदात सामील करीत आपल्या  कानातून थेट हृदयावर साम्राज्य गाजवते  !  
      
            सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही    लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर  खिळवून ठेवणारी रचना----
"किती   सावरावे....  कसे   सावरावे"
      ...किती   बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी  साथ देतात व रूंजी  घालून  गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे  ऐकणाऱ्याचा  खरेच झोक   जातो!    
" तुझा भास झाला पुन्हा आडवेळी,  
पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....."    
               या ओळी  तसेच कोरसचे  सूरही वेगळेच रंग     भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील  
 "ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला,
अरे  ईश्वराला असे ओळखावे..."
                ह्या ओळी तर  प्रणयातला  रस  व शॄंगार केवळ एका ओळीच्या  चालीतून व आवाजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे  तिघंही --- गीतकार,संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व  तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या  विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात.                                                                                   यातीलच     
"आसवांना टाळणे आता नको,
दु:ख  हे सांभाळणे आता नको..."       
या गझलेत  शब्द....सूर...लय व  तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते.  
"बोललो  त्याला किती झाली युगे,
हा अबोला टाळणे आता नको..."      
असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे  यांचे नर्म मधाळ     गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे कळतही  नाही ! 
कसबी संगीतकार  सुधाकरजी यांची नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना...
"घाव  ओला जरासा होता" 
रूपक तालाला 'वेस्टर्न टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच 
"वेदनेचा दिलासा होता" 
या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा...
प्रत्येक गझलेतील  पुढल्या ऊत्तराच्या  ओळींची गंमत लाजवाबच!     
          सुधाकरजींची गझलेला व गीतांना  नव्या नव्या,     अव्वल चाली देउन  अवघी  मैफिल  वेड्यागत आपलीशी      करून  घेण्याची आदत फार फार जुनी  नाही तर  ; केवळ    पंचेचाळीस  वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील  एके       काळचे अत्यंत नम्र,  लोकप्रिय  गायक 
!...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच  तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून  देत आहेत............
याच अल्बमधील
"असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा,   
असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा"      
 या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व  सारंगीचे सूर अचूक    स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत गुलाम अलीच्या गझलां इतकेच  एका मोहक नादमयी अंमला खाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ  होत पुढे पुढे जातो !... एक  हूरहूर   लागून   रहाते.........                                      
 "कळे ना मला  हे  कसा नेमका तू ,       
कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा  तू..."    
          या गझलेला अशी काही सुरावट दिली... की   प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना  मला मदन मोहन या  प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.)          
अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल...                      
 "नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले,
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ  मनाचे  भरले...."     
        हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर.........  अगदी सहजतेने मनाचा ठाव  घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात.....

" अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने,
जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले   !"
            कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये   तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे  वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान न सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना  बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर  मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय  संगीत कलेला एक  नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे.

             "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते"
ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहेअसे मला वाटते.यातील तरल भाव,हळवअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते...
"जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या,
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...."
          यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वारांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.
"मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी,
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..."
            यातील सुरावटीमुळे 'मनाच्या'शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो.
               याच अलबम मधील
"आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा"
हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात.
             सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "#काटयांची_मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम...
         सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच!
(सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "शब्द स्वरांची मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ......     
मराठीतून इतक्या देखण्या सुरावटीच्या गझला  इतके दिवस का नाही  दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते....
"हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे,
गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे"
             आणि या  गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन
याची  हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत......
        ..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा !
 -सीमा     गादे    (गादेवार )    
मुम्बई.
---------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...)
-----------------------------------------------------------

●पहिले छायाचित्र-सीमा गादेवार, सुरेश भट आणि गाताना अस्मादिक...घरगुती मैफल.
●खाली - दैनिक लोकमत,नागपूरचे कात्रण.(रात्री झालेल्या पांढरकवड्याच्या कृषी भवनातील सुरेश भट व माझ्या संयुक्त कार्यक्रमाचे.)


 

Sunday, December 13, 2020

मराठी गझल गायक सुधाकर कदम...सुरेश गांजरे


 (दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.विशेष पुरवणी ४/१२/१९८०)

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी'मधून...)


 

Friday, December 11, 2020

जाणकार संगीतकार...अनुराधा मराठे


          माझी व सुधाकर कदम यांनी ओळख २००५ मध्ये झाली.ते 'अर्चना' या मराठी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये काम करीत होते.या अल्बममध्ये गाण्यासाठी त्यांनी मला बोलाविले.हीच आमची पहिली भेट होय.या वेळी ते उत्तम संगीतकार आहेत,उत्तम गझलगायक आहेत याची अजिबात कल्पना नव्हती.ते नागपूरचे आहेत एवढेच मला माहीत होते. नंतर हळू हळू त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली.विदर्भासोबतच महाराष्ट्रभर त्यांनी सुरेश भटांसोबत मराठी गझलकारांच्या गझलांना स्वरबद्ध करून गायिल्याचे येथील (पुण्यातील) गझलकारांकडून कळले.तसेच आर्णी या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना गझल गायकीसोबतच अनेक उपक्रम राबविल्याचेही कळले.
त्यात माझ्या दृष्टीने महत्वाचे कार्य म्हणजे गांधर्व विद्यालयाची स्थापना व परीक्षा केंद्र होय.
          'अर्चना' ह्या अल्बमचे काम सुरू करायचे ठरल्यावर चाली सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले.दुसऱ्यावर बघताक्षणीच प्रभाव पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.बोलण्याच्या आवाजावरून हा माणूस गात असावा असा अंदाज येणारे अत्यंत मृदू बोलणे.समोरच्या व्यक्तीला सहज आपले करून घेणारे वागणे,यामुळे प्रथमदर्शनीच सुधाकर कदम या व्यक्तीचा अंदाज मला आला.ह्या वेळी त्यांच्या दोन्ही 'गायिका' कन्या त्यांच्या सोबत होत्या.मनात म्हटलं ,'सगळं घरच गाणारं दिसतंय.' असो
          'अर्चना' या अल्बममध्ये माझी पाच गाणी आहेत. अतिशय अप्रतिम व आकर्षक चाली आहेतच.पण त्याचबरोबर श्रवणीय आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या आहेत.मला वाटते गझल गायकीमुळे शब्द,काव्यातील अर्थ याचा अचूक अंदाज सुधारजींना आहे.त्यामुळेच या अल्बममधील आशा पांडे यांच्या गीतांना समर्पक अशा चाली त्यांनी लावल्याचे दिसून येते.सुंदर शब्द व सुंदर स्वररचना यांचा सुंदर मेळ म्हणजे ,अर्चना'! या अल्बममध्ये एकूण दहा भक्तिरचना आहेत. खालील शब्दांवरून त्या किती प्रासादिक आहेत याची आपणास कल्पना येईल.
१.श्रीहरी रे श्रीहरी,नाद केवळ एक घुमतो,श्रीहरी रे श्रीहरी...
२.शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी...
३.ये मंत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार...
४.तुझीच सुमने तुझे निरंजन,चरणी तुझिया तुझे समर्पण...
५.वेद झाले वेदनांचे,शब्द झाले रे ऋचा...
६.श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे...
७.दयासागरा...
८.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे...
९.अर्चना...
१०.या देहाचे देऊळ झाले...
           यातील पहिलेच गाणे शुद्ध गांधारावरुन उठणारे भूपाच्या अंगाने जाणारे आहे.भूपामध्ये मधून मधून केलेल्या शुद्ध निषादाच्या वापरामुळे ही बंदिश अतिशय गोड व वेगळी झाली आहे.शौनकचे (अभिषेकी) व माझे 'शक्ती दे तू आज मजला' असे आवाहन करणारे शब्द व त्यानुसार भिन्नषड्ज रागात केलेली रचना,त्यातही मध्यमाला षड्ज करून मूर्च्छना पद्धतीने केलेली पुढील स्वररचना,त्याला लावलेल्या चाचर तालामुळे अतिशय स्फूर्तिदायक झाली आहे.एक आवेश व आवेग या भक्तिगीतामध्ये शब्द-स्वरांद्वारे प्रत्ययास येतो.'अर्चना' हे माझे या अल्बममधील सर्वात आवडते गाणे आहे.
'तूच माझे गीत कोमल,भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना,तू अंतरी विश्वास रे...
सुंदर शब्द व अत्यंत आर्तता असणारी स्वररचना.आणि 'विश्वास रे' वरची अवरोही जागा फारच सुंदर.सुरांचे घरंगळणे. दोरा सुटल्यावर मोती जसे घरंगळतात तसे तसे इथे स्वर घरंगळले आहेत.सुधाकरजी उत्तम संगीतकार असण्याची साक्ष द्यायला हा एकच अल्बम पुरेसा आहे.
           मी त्यांचे पुढील सर्व आयुष्य पूर्ण आयुरारोग्य व सुरांच्या संगतीत जावे अशी प्रार्थना करते.

१३/११/२०१८

प्रा.डॉ.श्रीकृष्ण संपादित व 'अक्षरमानव'प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून....
--------------------------------------------------------------------


 

बाबा-रेणू कदम चव्हाण

.
      मी लेखिका वगैरे नाही.पण काही आठवणी अजूनही कालपरवा घडल्याप्रमाणे डोळ्यापुढे तरळत आहेत,जसजशा आठवतील,तशा सांगायच्या आहेत.
      लाल-तांबूस डोळ्यांचा कोणी एक व्यक्ती माझ्या घरात रोज रात्री यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा.तो कोण असेल बरे,मला हा प्रश्न नेहमी पडे. नंतर हळूहळू लक्षात आले की,ते माझे वडील आहेत.
      पूर्वी बाबा फार तापट,रागीट होते.रात्री कार्यक्रम करून उशिरा घरी येणे आणि सकाळी उठून शाळेत रुजू होणे, शाळेतील संगीत कक्षात दिवसभर रियाज,रात्री कार्यक्रम अशी त्यांची दिनचर्या असे.त्यामुळे लहानपणी बाबा आम्हाला कमीच मिळाले.आम्ही आर्णीला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत रहायचो.नंतर स्वतःचे घर झाले तेव्हा बाबांचा सहवास अधिक प्रमाणात लाभू लागला.तेव्हा बाबा खरेच काय आहे,हे हळूहळू कळायला लागले.
      बाबा हे एक उत्तम संगीतकार तर आहेतच पण त्याचबरोबर एक चांगले शिक्षकसुद्धा आहेत. एखादे गीत व गझल शिकवताना एखाद्या कळीच्या पाकळ्या उमलून त्याचे फुल कसे बनते तसे बाबांचे शिकवणे. जोपर्यंत गळ्यातून निघत नाही तोपर्यंत अजिबात न चिडता सांगत रहायचे.बाबांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या बंदिशी आणि चाली या ऐकायला सोप्या पण गायला अतिशय कठीण.एक किस्सा असाच आठवतो.माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे.आम्ही 'तसव्वुर' हा सागर साहेबांच्या उर्दू गझलांचा कार्यक्रम करीत होतो.त्यात 'कहता हूँ मूहब्बत है खुदा सोच समझकर' या भैरवीतील गझलेची रिहर्सल करीत होतो.हार्मोनियमवर भाविक राठोड हा एक उमदा गायक बसला होता. आणि 'कल उम्र का हर लम्हा कहीं सांप न बन जाए' हा शेर चालू होता.तो सारखा सांप च्या जागी अडकायचा. बाबांनी त्याला अस्सल वऱ्हाडीत विचारले,'काहून र बाप्पू का व्हा लागलं? तसा तो म्हणाला ,काही नाही बाबा,साप त सापडला पण शेपूट नाही गवसा लागलं तव्हाचं'.
      बाबांचे व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करणारे होते.त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते यांची घरी नेहमी वर्दळ असायची. आर्णीला आमचे घर कधीच रिकामे राहायचे नाही.कोणी ना कोणी सतत घरी असायचे.
     आज त्यांच्या गौरव ग्रंथासाठी लाख लाख शुभेच्छा.आई आणि बाबा,तुम्हा दोघांना उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखासमाधानाचे जावो ही मनापासून इच्छा व्यक्त करून थांबते.धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित,
'अक्षरमानव' प्रकाशित सन्मानग्रंथ (१३/११/२०१८)
'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...


 

Sunday, December 6, 2020

मराठी ग़ज़लें भी उर्दू की तरह मधुर होती है...प्रभाकर पुरंदरे.


            साहित्य, कला तथा संगीत किसी जाति, भाषा या देश तक सीमित नही रहते बल्कि उनका प्रभाव मानवी रुचि के अनुरुप व्यापक होता है़ आजकल संगीत के क्षेत्र में ग़ज़ल गाने और सुनने का काफी प्रचलन है । प्रायः ग़ज़ल को लोग उर्दू संस्कृति की देन समझते है । गुलाम अली, मेहदी हसन, जगजीत-चित्रासिंह आदि की हिंदी-उर्दू ग़ज़ले तो वर्षों पहले ही संगीत शौकीनों के दिलों मे घर कर चुकी है । हिंदी-उर्दू के अलावा पंजाबी और गुजराती मे भी ग़ज़लें बरसों से गाई जा रही है । मराठी गायन क्षेत्र मे भी ग़ज़ल तेजी से अपना प्रभाव जमा रही है । मराठी मे ग़ज़ल सबसे पहले माधव पटवर्धन द्वारा लिखी गई थी, परंतु विद्वानों ने उसे ग़ज़ल न मानकर भावगीत की संज्ञा दी । सुप्रसिध्द ग़ज़ल गायक एवं लेखक सुरेश भट ने मराठी ग़ज़लों को लोकप्रिय बनाने में विशेष भूमिका निभाई । उनके बाद अनिल कांबले, श्रीकृष्ण राऊत, उ़. रा़. गिरी, प्रदीप निफाडकर आदि ग़ज़ल लेखकों के नाम आते है । फिलहाल मंगेश पाडगावकर श्रेष्ठ ग़ज़ल रचयिता माने जाते है ।
 पिछले दिनो शहर के जाल सभागृह मे इन श्रेष्ठ रचनाकारों की ग़ज़लें सुनने का अवसर मिला । गायक थे - सुधाकर कदम । सोलह दिसंबर की शाम लगभग चार घंटे तक चले मराठी ग़ज़ल महफिल कार्यक्रम में कदम ने कई ग़ज़लों को अपने मधुर स्वरों में गाकर उपस्थित संगीत रसिकों को आनंदित किया । ‘कुठलेच फूल आता मजला पसंत नाही़’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो़’, ‘झिंगतो मी कळेना कशाला़’ ‘लोपला चंद्रमा, लाजली पौर्णिमा़,तथा ‘नको स्पर्श चोरू नको अंग चोरू.’ आदि गजलों को श्रोताओ ने खूब पसंद किया ।
 गायक सुधाकर कदम के पिता महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय के संगीत से संबद्ध रहे है । सो पिता से शास्त्रीय संगीत की उन्हें प्रेरणा मिलना स्वाभाविक है । ग़ज़ल गायकी के क्षेत्र मे आने के पूर्व सुधाकरजी भाग्योदय आर्केस्ट्रा नामक संगीत मंडली को चलाते थे । 'भरारी' नामक उनके ग़ज़लों की कैसेट काफी लोकप्रिय हुई है । हाथरस से प्रकाशित होने वाले संगीत मासिक संगीत के वे स्तंभकार है । इस पत्रिका के ‘नग़्म ए-़ग़ज़ल’ कॉलम के अंतर्गत वे ग़ज़लों की स्वरलिपि लिखते है । ग़ुलाम अली एवं मेहदी हसन जैसे वरिष्ठ गजल गायकों से गजलों से संस्कार आत्मसात करने वाले सुधाकर कदम ने बच्चों के लिए भी कई मधुर कविताओ को भी स्वयं संगीतबद्ध किया है । वे अपनी गाई ग़ज़लों को भी स्वयं ही संगीतबध्द करते है । बच्चों के लिए उन्होने झूला सीरिज के अंतर्गत तीन भागों में कविताओं को संगीतबद्ध कर कैसेट का रूप दिया है ।
 सुधाकरजी से बातचीत के दौरान बताया कि, उन्होंने वर्‍हाडी कवि शंकर बडे की ग़ज़ल को गाया था। ग़ज़ल का पहला कार्यक्रम पुणे के गडकरी हाल में हुआ था । यह कार्यक्रम काफी स्मरणीय था, क्योंकि इसकी अध्यक्षता गजल रचयिता सुरेश भट ने ही की थी । कदम बताते है कि इस कार्यक्रम में संगीत प्रेमियों की उपस्थिति से हाल खचाखच भर गया था । लोगों ने इस कार्यक्रम को खूब पसंद किया ।
 मराठी ग़ज़लों मे कई बार उर्दू भाषा के क्लिष्ट शब्दों का भी प्रयोग किया जाता है, इससे श्रोताओ को समझने में कठिनाई तो महसूस होती होगी? इस सवाल के जवाब मे कदम बताते है कि भाषा संबंधी कठिनाइया तो सभी प्रकार की ग़ज़लों में है । लेकिन जहां तक शुध्द मराठी ग़ज़लों का सवाल है कुछ मराठी ग़ज़ल रचनाकारों ने अत्यंत सरल एवं प्रभावी शब्दों का प्रयोग किया है । सुरेश भट, श्रीकृष्ण राऊत तथा ज्ञानेश वाकुडकर आदि इसके श्रेष्ठ उदाहरण है -
 
 ‘लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा,
 चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला.’ (श्रीकृष्ण राऊत)
 
 ‘नको स्पर्श चोरु, नको अंग चोरू
 सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू.’(ज्ञानेश वाकुडकर)
 
 तथा
 
 ‘कुठलेच फुल आता मजला पसंत नाही
 कळते मला रे हा माझा वसंत नाही.’ (सुरेश भट)

आदि प्रसिद्ध ग़ज़लों में सरल और प्रभावी मराठी शब्दों का प्रयोग हुआ है ।
 महाराष्ट्र और उसके बाहर लगभग ढाई सौ से ज्यादा ग़ज़ल कार्यक्रम सफलतापूर्वक आयोजित करने वाले सुधाकर कदम का मानना है कि मराठी ग़ज़लों का भविष्य काफी उज्ज्वल है । लोग शहरों में नहीं, बल्कि गांवो में भी इसे पसंद कर रहे है । उन्होने इस बात पर खेद व्यक्त किया कि जितनी ग़ज़ले आजकल मराठी मे लिखी जा रही है उतने गायक तैयार नहीं हो पा रहे है । उन्होने मराठी ग़ज़ल गायन के बारे में बेहिचक बताया कि इसमें उर्दू ग़ज़लों की तरह नजाकत होती है ।
 कदम, मराठी के अलावा हिंदी ग़ज़लें भी गाते है । इंदौर के अपने २५० वे कार्यक्रम में उन्होंने कुछ हिंदी ग़ज़लें गाई थी । उन्होंने यह स्वीकार किया कि मराठी श्रोता उर्दू श्रोताओं की तरह दाद नहीं देते । ऐसा विशेष रुप से महाराष्ट्र से बाहर के कार्यक्रमों के जरिए प्रयत्न कर रहे है । महाराष्ट्र मे पुणे, कोल्हापुर, नांदेड, सांगली, अमरावती, औरंगाबाद, जलगांव आदि जगह उनके कार्यक्रम को संगीतप्रेमियों का खूब समर्थन मिला है । सुधाकर कदम की ग़ज़ल गायकी कई विशिष्टताओं से परिपूर्ण है । उन्होंने ग़ज़लों को शास्त्रीय पध्दति में ढालने का प्रयास किया है । यही कारण है कि उनके द्वारा गाई ग़ज़लें सामायिक नहीं वरन सदाबहार बन गई है । जिस तरह उर्दू ग़ज़लों में गायन के पूर्व गायक कुछ एक शेर पेश करते है । ठीक उसी तरह सुधाकर जी भी मराठी ग़ज़ल शुरु करने के पूर्व रुबाई का सफल प्रयोग करते है । महाराष्ट्र के यवतमाल जिले के पच्चीस-तीस हजार आबादी वाले आर्णी नामक कस्बे में रहने वाले सुधाकर कदम एक अच्छे सरोद वादक भी है ।
 सोनम मार्केटिंग एंड कम्यूनिकेशन द्वारा आयोजित तथा डी़ एड़ एच़ सेचरॉन द्वारा प्रायोजित इस अनोखी गजल निशा के दूसरे आकर्षण थे कलीम खान ।संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ट अंदाज में कर कलीम खान ने उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया । वे एक अच्छे कवि एवं गजल रचयिता भी है । कलीम खान ने ‘कुंकू’ शीर्षक वाली अपनी अत्यंत संवेदनशील कविता सुनाकर श्रोताओं को हतप्रभ कर दिया । तबले की संगत रमेश उइके (नागपुर) ने की जबकि सारंगी वादन मोइनुद्दीन (इंदौर) ने किया ।

दैनिक चौथा संसार,इंदौर,दि.२७/११/१९८९





 

Sunday, November 29, 2020

मराठी गझल गायकीचा उद्गम...डॉ. अनंत ढवळे

.               

         मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या पाचेक दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते सुधाकर कदम यांचे. स्व. सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल प्रदान केली तर कदमांनी मराठी संगीताला गझल गायकी. गझल संगीतबद्ध करणे आणि गझल गाणे या दोन्ही गोष्टी गीत गायन, अभंग किंवा चित्रपटसंगीताहून भिन्न व स्वतंत्र आहेत. सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीला एक स्वतंत्र व पृथगात्म स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मी संगीताचा अभ्यासक नसलो तरी माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार गझल गायकीचे स्वतंत्र कार्यक्रम घेणारे पहिले कलाकार म्हणून कदमांचाच उल्लेख करावा लागेल.
      आयुष्यभर एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी चालत राहणा-या कुठल्याही मनस्वी व्यक्तीसारखे भासणारे कदम, गझल गायकी हेच आपल्या जीवनाचे सार्थक मानत आले आहेत. ही निष्ठा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सातत्याने जाणवत राहते. गझलचा विषय निघताच, आठवणींमध्ये रमणारे कदम, आपली कला, अनुभव, प्रयोग आणि आपल्या लोकांबद्दल भरभरून बोलू लागतात. हा आपलेपणा, हे माणसांबद्दलचे निर्व्याज प्रेम हे त्यांच्यातील मोठ्या कलावंताचे स्थायी लक्षण आहे. गझल ही मनुष्याच्या आयुष्याचा, त्याच्या सुखदु:खाचा तळ शोधणारी आत्मधून आहे. मनामध्ये प्रेम, आस्था आणि सांवेदनिक जिवंतपणा असल्याशिवाय गझल लिहिणे अथवा गाणे शक्य नाही. हा जिवंतपणा कदमांना इतर कलावंतापासून कितीतरी वेगळे आणि श्रेष्ठ ठरवितो. कलेसाठी कलोपासकाच्या छातीत इमानी हृदय असणे आवश्यक आहे. बेईमान आणि धूर्त लोकांसाठी हे क्षेत्र, हा प्रदेश निषिद्ध आहे. गझल, स्वत: आणि स्वत:ची गायकी याबद्दलची निर्मळ निष्ठा हीच कदमांच्या एकंदरीत जीवनप्रवासाची सोनेरी किनार बनून राहिलेली आहे.
 सुधाकर कदम यांनी पाकिस्तानी आणि भारतीय उर्दू गझल गायकांच्या अनेकविध शैलींचा अभ्यास करून, मराठी गझल गायकीची स्वतंत्र अशी विकसित शैली निर्माण केली. ध्वनिमुद्रिका हा या श्रवणभक्तीचा स्त्रोत होता. ज्याप्रमाणे लिहिणा-यासाठी पूर्वसूरी आणि समकालीन प्रतिभावंतांचे लेखन वाचणे हा एक प्रकारचा तंत्राभ्यास असतो, तसाच महान गायकांच्या रचना सतत ऐकून त्यातल्या बारीकसारीक अंगभूत वैशिष्ट्यांसह, गायकीचे तंत्र आत्मसात करणे हा गायकांसाठी एक प्रकारचा रियाजच असतो. प्रत्येक गायकाची गायनशैली, चाली बांधण्याची विशिष्ट ढब, शब्दांचे भावानुसार प्रकटीकरण आणि शेर सादर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या सर्वांचे सार समजून उमजून आपल्या सर्जनाच्या साच्यात ओतण्याचे काम, ही एक प्रदीर्घ आणि निरंतर प्रक्रिया आहे. वडील पांडुरंग कदमांकडून मिळालेला वारकरी संप्रदायाचा वारसा, पंडित जितेंद्र अभिषेकी व छोटा गंधर्व यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अनेक वर्षांची प्रचंड साधना या सर्वांचे प्रतिबिंब कदमांच्या गायकीत उमटत राहते. विदर्भाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कदमांनी संतूर, सरोद,  एकॉर्डिएन विविध वाद्यांमध्ये प्राविण्य मिळवून स्वतंत्र वादनाचे (सोलो) देखील कार्यक्रम केले आहेत. कदमांच्या सांगीतिक साधनेचा हा विस्तार थक्क करून सोडणारा आहे. संगीताच्या विविध पातळ्यांवर अनेक प्रयोग करणा-या प्रतिभावंतांची गझल गायकी समृद्ध असणे साहजिकच होते. गझलचा गझलचा स्वभाव, तिचा लयाधारित घाट आणि अर्थानुसार व्यापकता कायम लक्षात ठेवून कवीच्या भावनिक प्रतलाशी समकक्षता साधून गझल संगीतबद्ध करण्याची कठीण कला कदमांनी कमालीची साधली आहे. पत्रकारितेत काढलेली अनेक वर्षे विविध मासिकांतून केलेले स्फुट लेखन, ‘सरगम‘ आणि ‘फळे मधुर खावया‘ या दोन पुस्तकांची निर्मिती लक्षात घेता कदमांची साहित्यातील डूब लक्षात येते. शिवाय सुरेश भटांच्या प्रदीर्घ सहवासाचाही गझलची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेण्यात लाभ झाला असावा असे वाटते. आर्केस्ट्रात काम करीत असताना तासन्तास रियाज करणा-या कदमांनी पुढे आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा देऊन आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलावंताचा दर्जा मिळविला. मला वाटते या सर्व घडामोडींमधून कदमांच्या गझल गायकीचे रंगरूप आकार घेत गेले असावे. १९७५ साली नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उदघाटनाचे वेळी कदमांच्या गायनाचा कार्यक्रमझाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. सुरेश भट होते. त्यांनी आपल्या काही गझला कदमांना संगीतबद्ध करण्यासाठी दिल्या. पुढे १९८० पासून या दोघांनी एकत्र कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. या कार्यमातूनच पुढे, ‘अशी गावी मराठी गझल‘ हा संपूर्णपणे गझल गायनास समर्पित असा कार्यक्रम सुरू झाला.तेव्हापासून कदमांनी गझल गायनाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे हजारएक कार्यक्रम केले आहेत. सुरेश भटांशिवाय श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललीत सोनोने, अनिल पाटील, शिवाजी जवरे, अनंत ढवळे तसेच चित्तरंजन भट, समीर चव्हाण, प्रमोद खराडे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, संगीता जोशी, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, रमण रणदिवे अशा अनेक गझलनवाजांच्या गझला संगीतबद्ध केल्या आहेत. अलीकडे पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेले कदम स्वत: गायन फारसे करीत नाहीत परंतु गझल संगीतबद्ध करण्याचा उपक्रम मात्र अव्याहत सुरू आहे. सौ. रेणु चव्हाण व कु. भैरवी कदम या दोन्ही कन्यांच्या स्वरमाधुर्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक घडविलेली गझल ऐकताना त्यांच्या चेह-यावरील समाधान लपत नाही. अलीकडे कदमांच्या प्रोत्साहनातून सुरू झालेला ‘गझलकट्टा’ या मासिक कार्यक्रमाला पुण्यात ब-यापैकी बाळसे धरू लागले आहे.
 भारतीय समाज आपल्या आतिथ्यशीलता आणि गुणीजनगौरवाच्या गुणांसाठी ओळखला जातो. पण या बाबतीत मराठी समाजात मात्र विपरीत चित्र दिसते. हिंदी चित्रपटातील गल्लाभरू, सुमार दर्जाचे अभिनेते आणि टाळ्यामिळवू, तिस-या दर्जाच्या गझल सादर करणा-या पाकिस्तानी गझल गायकांना डोक्यावर घेणारा मराठी समाज, आपल्या मातीतील कलावंतांच्या बाबतीत मात्र प्रचंड उदासीन आहे. सुधाकर कदमांसारख्या अस्सल प्रतिभावंतांची झालेली उपेक्षा दु:खदायी तर आहेच, परंतु उद्वेगजनकसुद्धा आहे. आजकाल मराठी गझल विश्वात झालेली उथळ कवी आणि अजाण गझलगायक पोराटोरांची भरती पाहून, मराठी गझल नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न पडतो. मराठी गझलांच्या लहानशा वर्तुळात गेल्या सात-आठ वर्षात सुरू असलेली ही सांठमारी पाहून कदम अनेकदा व्यथित होतात. गावोगाव गझलांचे कार्यक्रम झोडत फिरण-या मंडळींचे अर्थकारण आणि लोकप्रयितेचा हव्यास पाहून गेली काही वर्षे कदम या सर्वांपासून दूर राहणेच श्रेयस्कर, असा विचार करून काहीसे विलगच राहत आले आहेत.
         सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीची मुहूर्तमेढ रोवली. या गायकीला स्वत:चे असे एक परिमाण देऊन तिची जोपासना केली. कदमांचा हा वारसा आज त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा (निषाद कदम) नेटाने चालवत आहेत. आर्णीतील आपल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली काही वर्षे कदम पुण्यात स्थायिक झाले आहेत. वारज्यातील कदमांची सदनिका म्हणजे पुणे शहराचे ‘गझल केंद्र’च बनले आहे. कदमांच्या घरी रंगलेल्या गझल वाचन व गायनाच्या अनेक मैफली माझ्या अनेक कवीमित्रांच्या आठवणीतील अनमोल ठेवाच आहेत. आपले संपूर्ण आयुष्य गझल गायकीला समर्पित करणारे सुधाकर कदम, या उतारवयातही पूर्वीसारखेच कार्यरत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नव्या दमाच्या आणि नव्या वळणाच्या मराठी गझलांचा कार्यक्रम बसवून तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचविण्याचा कदमांचा मनसुबा आहे. 
 या प्रस्तावित उपक्रमासाठी मराठीतल्या बहुतेक गझल लिहिणा-या कवींच्या आणि महाराष्ट्रभर विखुरलेल्या गझल रसिकांच्या शुभेच्छा आहेत. अशा एखाद्या कार्यक्रमाने मराठी गझल गायकीला चैतन्य मिळणे खरे तर कालसंगतच ठरेल. प्रयोगशीलता ही कुठल्याही प्रतिभावंताच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधाकर कदमांचीही सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, त्यांच्या संगीतास अद्याप ताजेतवानं ठेऊन आहे. आजवर प्रकाशित झालेल्या ‘भरारी’, ‘भजन सुधा’, ‘अक्षर गाणी’, ‘झुला’, ‘अशी गावी कविता’, ‘समुहगान’, ‘अर्चना’, ‘खूप मजा करू‘ या ध्वनीफितींच्या माध्यमातून हे निरनिराळे प्रयोग जनपटलावर वेळोवेळी उमटत राहिले आहेत. कदमांच्या या प्रदीर्घ वाटचालीबद्दल लिहिण्या-बोलण्यासारखे आणखी बरेच काही आहे, पण मनाच्या प्रचंड पसा-यात पसरलेल्या हजारो गोष्टींचा उल्लेख दरवेळी सविस्तर करणे कठीण असते. तूर्तास मीर तकी़ मीरने आपल्या कलेला समर्पित केलेला हा शेर कदमांना समर्पित करून हा लेख संपवित आहे.
 
किया था रेख्तां पर्दासुखन का
यही आखिर को ठहरा फन हमारा.

**************************************

‘शब्द्सृष्टी’ (७ नोव्हेंबर २००९) भारतीय ग़ज़ल विशेषांकातून साभार गझलगंधर्व विशेषांकात व त्यातून 'मौनी' मध्ये...


 

Thursday, November 19, 2020

आणि इंदूर जिंकले! -सुनील शिनखेडे


           १६ डिसेंबर, इंदोऱ. सायंकाळची वेऴ. अगदी कडाक्याची थंडी़. वातावरणात कमालीचा गारठा असूनही जाल सभागृहात रसिकांची गर्दी हळूहळू जमू लागली़. साडेसातच्या सुमारास हॉल अगदी गच्च भरलेला़. वास्तविक अशी अपेक्षा कुणाला नव्हतीच मुळी़. कारण इंदोरच्या रसिकांसाठी कार्यक्रम काहीसा वेगळाच होता़. मराठी गीत-गझल गायनाचा़. कलावंतही इंदोरसाठी नवीनच़. सुधाकर कदम़ इंदोरमध्ये आपला कार्यक्रम व्हावा अशी कदमांची बरेच दिवसांची इच्छा होती़. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम झाले होते़. मूळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ह्या गावचे. त्यामुळे विदर्भात ते विशेष परिचित़. परंतु इंदोर सारख्या हिंदी भाषी परिसरात मराठी रसिकांसाठी मैफल व्हावी ही त्यांची इच्छा. तसे योग जुळून आलेत़. मूळचे आर्णीचेच परंतु इंदोरला स्थायिक झालेले वानखडे बंधुद्वयांची समॅक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढे आली़. ह्या कंपनीचे अभियंते श्री अविनाश वानखडे ह्यांनी आयोजनाचा संपूर्ण भार सांभाळला़. प्रमोद कोठारी, अनिल वानखडे, दीपक शिंदे, अभिलाष खांडेकर व अन्य चाहते मंडळी मदतीला धावली़.
 संपूर्ण सभागृहच मोगर्‍याच्या सुवासाने धुंद झालं होतं. इंदोरचे प्रसिध्द रंगकर्मी बाबा डिकेंच्या प्रमुख उपस्थितीत मैफल सुरु झाली़. आणि कवी कलीमखान ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.
 वेळ सायंकाळची़. सायंकाळच्या प्राथनेची़. कलीमखानांनी सुरेश भटांचे शब्द दिलेत -
 ‘माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे़’ सुधाकर कदमांचे सूर साथीला आलेत़. संपूर्ण हॉल स्तब्ध, शांत़ कदमांचा स्पष्ट व मोकळा आवाज़ साथील तबल्यावर नागपूरचेच रमेश उइके आणि सारंगीवर इंदोरचे आकाशवाणीचे प्रसिध्द सांरगीवादक मोइनुद्दीन खॉ साहेब़ शब्दसुरांची गाठ पडली़. कदमांची मध्यप्रदेशातील पहिलीच मराठी गीत-गझलांची मैफल रंगू लागली़.
 तसा गझलांचा चाहता वर्ग मोठा परंतु मराठी गझलांचा मोजकाच़. इंदोरसाठी तर मराठी गझल गायन हा प्रकारच नवीन होता़. त्यामुळे येथील मराठी रसिक कदमांना कितपत स्वीकारतील ह्याबद्दल आयोजक साशंक होते़. परंतु मैफलीच्या पूर्वार्धातच रसिकांनी अगदी मनापासून दाद दिली़. ह्या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या ह्या शहरात मराठी रसिकांचा भरणा काहीसा कमीच. परंतु ह्या नव्या कलाकारांच्या इथल्या पहिल्याच मैफलीत काही वेगळेच दृश्य दिसले़. सुरुवातीपासूनच उपस्थितांची जबर दाद मिळवून कदमांनी रसिकांचे हृदय काबीज केले़.
 कवी कलिमखान ह्यांनी कधी कवठेकरांच्या, कधी बोरकरांच्या, तर कधी स्वतःच्या मार्मिक ओळी व कविता पेश करुन मैफलीला अनुकूल असे वातावरण जिवंत ठेवले़ त्यांच्या ‘कुंकू’ ह्या कवितेतला तर अशी काही दाद मिळाली की रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ती कविता पुन्हा म्हणावी लागली़
 ‘दीनरात ज्याचे गान मी गातो
 तो भारतभाग्यविधाता
 रस्त्यावर चिवडा खातो.’
 ह्या त्यांच्याच ओळी सद्यःपरिस्थितीचे भान जागवणार्‍या़ आणि श्रोत्यांना विचारात टाकणार्‍या़. अशा वैचारिक तर कधी श्रृंगारिक शब्दांची, कवितांची पेरणी करत कलीमखानांनी मैफलींचे सारथ्य केले. आणि श्रोत्यांना बांधून ठेवले़. सोबत कदमांनीही कधी श्रृंगार, कधी याचना, तर कधी यातना असे विविध भाव ओतले़.
 भटांच्या‘झिंगतो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला़’
 ह्या गझलेतील झिंगतो हा शब्द म्हणण्याचा कदमांचा आगळा ढब रसिकांची दाद घेऊन गेला़
 ‘ऐन वेळी अशी का करतेस तू़’
 ह्या गोड, लाडिक व काहीशा धीट गझला सादर करुन कदमांनी रसिकांची तब्येत खूष केली़.
 मध्यंतरामध्ये आयोजकांतर्फे सर्व रसिक श्रोत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम होता़. तसा हा सुद्धा आयोजनातील आगळावेगळा गोड अनुभव. इंदोरच्या श्रोत्यांसाठी नवाच होता! मैफलीला खास रंग चढला तो मध्यंतरानंतरच़ रात्रीला कमालीची थंडी असूनही सर्वच रसिक पुन्हा स्थानापन्न झाले़. उत्तरार्धाच्या सुरुवातीस कदमांनी श्रीकृष्ण राऊतांचे
 ‘दुःख माझे देव झाले, शब्द झाली प्रार्थना आरती जी गात आहे, तिच माझी वेदना’.
 नंतरही एकसे एक गझला सादर करून कदमांनी भरपूर टाळ्या घेतल्या़-
 कलीमखान यांच्या
 ‘मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
 आपुले अपुल्यावरी भाळण्याचे दिवस आले!’
 ह्या गीताने एवढ्या गारव्यातही रसिकांना गोड गुलाबी दिलासा दिला़. संपूर्ण मैफलीत कधी तबल्याचे साथी रमेश उईकेंनी, तर कधा मोइनुद्दीन खॉं साहेबांच्या सारंगीच्या मधुर सुरांनी रसिकांना दाद देण्यास भाग पाडले़. कवठेकरांच्या‘मस्तीत गीत गारे देतील साथ सारे़’ ह्या गीताला तर रसिकांनी उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा ठेका दिला़.सतत चार तासपर्यंत सर्वच रसिक ह्या शब्दसुरांच्या आगळ्या वेगळ्या मैफलीचा आनंद मनसोक्त लुटत होते़ भारदस्त गझला, त्यांना स्वरसुरांचा साज, कलीमखान यांचे खुसखुसीत संचालन, उत्कृष्ट आयोजन व इतर प्रत्येकच बाबतीत वेगळेपणा सिद्ध करणार्‍या ह्या मैफलीची सांगता भैरवीने झाली़.
 अत्युत्कृष्ट आयोजन व बहारदार मैफलीच्या इंदोरच्या पहिल्याच उपक्रमासाठी अभिनंदनपर संदेश अद्यापही येत आहेत़ दुसरी मैफल कधी? ही विचारणा करणार्‍या पत्रांचा ढीग लागतो आहे़. मध्यप्रदेशातील महू, उज्जैन, देवास, रतलाम येथूनही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळांची निमंत्रणे आली आहेत़. केवळ एकाच मैफलीने कदमांनी इंदोरच्या रसिकांची हृदयं काबीज केलीत़.

तरुण भारत,नागपूर
१४ जानेवारी १९९०

(डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून साभार...)

 

Wednesday, October 28, 2020

चकव्यातून फिरतो मौनी...सन्मामग्रंथ.

प्रत्येक रसिक चाहत्यापर्यंत "चकव्यातून फिरतो मौनी" हा डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ पोहोचलाच असेल असे नाही.काही रसिकांनी मागणी केली पण आवृत्ती संपत आल्यामुळे ते पण शक्य नव्हते.म्हणून हे पेज तयार केले आहे.यात सन्मानग्रंथातील सर्व लेख एक एक करून रसिकांना वाचावयास मिळतील.तरी या पेजला अवश्य भेट देऊन लेखांचा आस्वाद घेत जावा,ही विनंती.

लिंक...
https://www.facebook.com/चकव्यातून-फिरतो-मौनी-101099181746471/



 

Monday, October 26, 2020

उर्दू गझलगायन ऐकताना...

https://gazalakar20.blogspot.com/2020/09/blog-post_28.html?m=1

          हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.

 १.त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.

२.तो उत्कृष्ट गायक असायला हवा.

३.त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)

अत्यंत महत्वाचे 

४.म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.

       (माझ्या गुरुचे गुरू छोटा गंधर्व नेहमी यवतमाळला यायचे.ते आले की मी त्यांच्या सेवेत असायचो. तसेच विदर्भात जिथे कुठे त्यांचा कार्यक्रम असेल तेथे ते मला हार्मोनियमच्या साथीला घेवून जायचे.असाच एकदा ब्रह्मपुरीला त्यांचा कार्यक्रम होता.मी सोबत होतोच...कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरे लावून स्वर लावणे सुरू असताना अचानक ते म्हणाले

"तू मराठी गझल गायनाचा नव्याने प्रयत्न करतो असे मला कळले."

मी होय म्हणालो.त्या दिवशी त्यांचा काय मूड लागला कोण जाणे.रियाजात बरकतअली खान साहेबांच्या काही गझला त्यांनी मला गाऊन दाखविल्या. त्यातील बारकावे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर मूर्च्छना पद्धतीचा या गायकीत कसा उपयोग करता येतो ते सप्रयोग समजावून सांगितले.तसेच बरकतअलीची गझल गायकी टप्पा अंगाची होती हे ही सांगितले.त्यांच्या या प्रसादाचा उपयोग मला गझल संगीबद्ध करताना आपोआप  होत गेला.)

      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.या लेखात अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.


●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... यावर लेखाच्या शेवटी अजून लिहिले आहे.

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजित सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजित-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजित सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजित सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही

  ●उर्दू गझल गायकीचा बादशहा मेहदी हसन●

मेहदी हसन खां साहेबांचा जन्म १८ जुलै १९२७ ला भारतात लुना या राजस्थातील एका गावात झाला.वडील उस्ताद अझीम खान व काका उस्ताद इस्माईल खान परंपरागत धृपद गायक होते.त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच वंशपरंपरेने आले होते.वयाच्या आठव्या वर्षी मोठ्या बंधुसोबत त्यांनी धृपद व ख्याल गायन सादर केले.त्यांचा पिटीव्ही वरील पहिला कार्यक्रम १९५२ मध्ये झाला."नजर मिलते ही दिल की बात का चर्चा ना हो जाए" हे त्यांचे चित्रपटातील पहिले गाणे होते.चित्रपट होता 'शिकार',कवी यजदानी जालंधरी, संगीतकार असगर अली व एम हुसेन.

तसेच चित्रपटातील पहिली गझल होती "गुलों में रंग भरे बादे नौबहार चले" शायर फ़ैज अहमद फ़ैज,संगीत राशीद यांचे.

लता मंगेशकरांसोबत त्यांची दोन गाणी आहेत.एक मदन मोहन यांच्या संगीत दिगदर्शनाखाली गायिलेले 'नैनो में बदरा छाए' मधील एक अंतरा आणि मेहदी हसन यांनी संगीत दिलेल्या 'सरहदें' या अल्बम मधील 'तेरा मिलना बहुत अच्छा लगता है'

दोन्ही गाण्यांची लिंक...

१.

https://youtu.be/ad6Scios6zc

नैनो में बदरा...

२.

https://youtu.be/Do9Q7TwHoCA

तेरा मिलना बहुत अच्छा...


           जगभर उर्दू गझल गायन लोकप्रिय करणारा हा कलावंत आयुष्याच्या शेवटापर्यंत गात राहिला.जवळ जवळ साठ वर्षे आवाज सांभाळून त्याच दमाने गात राहणे तोंडाचा खेळ नाही.

खान साहेबांचा शिष्यवर्ग पण छोटा नाही.त्यात प्रामुख्याने परवेज मेहदी,तलत अजीज,राजकुमार रिजवी,गुलाम अब्बास,सलामत अली,अफजल,मुन्नी सुभानी, रेहान अहमद खान,सविता आहुजा,शमशाद हुसेन चांद, शहनवाज बेगम (बांगला देश),यास्मिन मुश्तरी (बांगला देश) आणि हरिहरन ही नावे येतात.

           त्यांचे गझल गायन म्हणजे शब्द-सुरांची अप्रतिम उधळण असायची."दिल की बात लबों पर लाकर, अब तक हम दुख सहते थे" हबीब जालीब यांची ही गझल काफी थाटावर आधारित आहे.पण त्यातीलच "बीत गया सावन का महिना मौसम ने नजरे बदली" हा शेर गाताना मध्यमाला षड्ज करून पहाडी रागाच्या स्वरांनी 'सावन'चा इतका मस्त फिल दिला की,कितीही ऐकले तरी समाधान होत नाही.....क्या बात हैं!


मुजफ्फर वारसीची "क्या भला मुझको परखने का नतीजा निकला" या गझलची बंदिश मालकौंस रागात आहे.पण पुढे शेरात दोन्ही गांधार,दोन्ही निषादाचा प्रयोग करुन  केलेला अविर्भाव-तिरोभाव अतिशय मनभावन आहे.मालकौंस राग कुठे सोहनी राग कुठे,पण हे स्वरांचे धनुष्य पेलून प्रत्यंचा चढवलीच...

         अहमद फराज यांची '"अब के हम बिछडे" ही गझल व बंदिशही तशीच...या सुरावटीचा मोह हृदयनाथ मंगेशकरांसोबतच मलाही पडला.व "मालवून टाक दीप चेतवून अंग अंग,राजसा किती दिसात लाभला निवांत संग" ही सुंदर रचना हृदयानाथांनी व "कुठलेच फूल आता मजला पसंत नाही,कळते मला अरे हा माझा वसंत नाही" ही गझल मी स्वरबद्ध केली.

रईस खां साहेबांनी भैरवी रागात स्वरबद्ध केलेलं चित्रपटातील गीत "मैं खयाल हूँ किसी और का,मुझे सोचता कोई और है" जेव्हा कार्यक्रमात गातात तेव्हा त्यातील "सुबहो न मिल सकी" या ओळींवर ललित रागाच्या स्वरांची पखरण करतात तेव्हा जाणकारांच्या अंगावर रोमांच उठतो.ती आर्तता काळजात सरळ घुसते.

      "कभी मेरी मूहाब्बत कम न होगी,लुटाने से दौलत कम न होगी" या पाकिस्तानी चित्रपटातील गीतावर बेतलेली खमाज रागातील "मुहब्बत करने वाले कम न होंगे,तेरी महफिल में लेकिन हम न होंगे" ही ठाय लयीतील गझल अफलातूनच आहे.यातील "जमाने भर के गम" या शेरात मिया मल्हारची झलक दाखवणारी सुरावट,"अगर तू इत्तेफाकन मिल भी जाए" या शेरात केलेली विविध रागांच्या स्वरांची उधळण अतिशय रंजक आहे.

      मेहदी हसन यांनी जितक्या विविध रागात गझल गायिल्या तितक्या इतर कुणी गायिल्याचे दिसत नाही.(थोडा अपवाद गुलाम अली).

●गुलों में रंग भरे... झिंझोटी.

●शोला था जल बुझा हूँ...

●एक बस तू ही नहीं...मियाँ मल्हार

●कोंपले फिर फूट आए...सारंग

●कुब कू फैल गई बात... दरबारी

●जब उस जुल्फ की बात चली...बसंत मुखारी

●बात करनी मुझे मुश्किल...पहाडी

●बहुत बुरा है मगर...ललित

●रंजिश ही सही... यमन

●अबके हम बिछडे....भुपेश्वरी

अजूनही बरीच उदाहरणे देता येतील पण विस्तार भयास्तव थांबतो...

पुढे खान साहेबांच्या गायकी विषयी त्यांच्याच तोंडूनच ऐका...


मुलाखतीची लिंक

https://youtu.be/KBscPu-iXt4


गझलकार...सीमोल्लंघन विशेषांकामधून साभार...

Saturday, October 17, 2020

प्रेम पिया हम पाये...राजे मधुकरराव देशमुख (माहूर)

.        

 ‘हरचंद सुरीली नग़मोंसे
 जज़बात जगाये जाते है,
 उस वक़्त की तलखी याद करो,
 जब साज़ मिलाये जाते है।’
 
     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.
       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?
       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?

दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।
आखिर इस दर्द की दवा क्या है ॥

      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.
       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.
       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

'मौनी' मधून....


 

Thursday, October 15, 2020

मनोगत-आशिष जाधव

                       
( ...मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हीच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही. )

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस  आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, 'बात निकलेगी तो दूर तलक जायेगी'... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची  होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 

- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकॉर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं.  

गत ४० वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं एवढंच....

-आशिष जाधव


 

Wednesday, October 14, 2020

गर्भश्रीमंत राग 'यमन'


.      यमन रागाच्या नावावर बरेच मतभेद आहेत.काही लोक याला फारसी भाषेतील ’इमन’ चेच यमन मध्ये झालेले रुपांतर मानतात.तसेच हा राग अमीर खुस्रो नावाच्या अल्लाऊद्दीन खिलजीच्या काळातील विद्वान संगीतकाराने प्रचलित केला अशीही मान्यता आहे.एवढे मात्र निश्चित की खुस्रोच्या काळात नव-नवीन राग प्रचारात आलेत.यात फारसी,इराणी सुरावटी भारतीय रागात मिसळल्या गेल्या होत्या.गोपाल नायक हा संगीताचा प्रकांड विद्वान खुस्रोचा समकालीन आहे.दक्षिणेतील पंडीत यमन हा राग ’यमुना कल्याण’चाच एक प्रकार मानतात.या नावाचा उल्लेख दक्षिणेकडील ग्रंथांमध्ये आहे.परंतू यमुना कल्याण आणि यमन यात नावाव्यतिरिक्त काहीच साम्य नाही.उत्तर भारतीय संगीत शास्त्र (भातखंडे कृत) या ग्रंथात हा राग कल्याण थाटातून उत्पन्न झाल्याचे लिहीले आहे.पण त्यातही तथ्य वाटत नाही,हे भातखंडेंचा आदर ठेऊन नमूद करतो..(माझे हे विधान अनेकांना आवडणार नाही.)कारण प्राचिन ग्रंथांमध्ये ’यमन’ नावाच्या रागाचा कुठेच उल्लेख केलेला आढळत नाही.तसेच कोण्या एका शब्दावरून राग आला असेल असेही वाटत नाही.कारण राग निर्मिती ही एक प्रक्रीया आहे.ती एकदम होणारी नाही...

काही लोक याला यमन कल्याण असेही म्हणतात.पण त्यालाही तसा फारसा अर्थ नाही.यमन रागात विवादी स्वराप्रमाणे कधीतरी कोमल मध्यम लावला की तो यमन कल्याण होतो.याला सुद्धा ग्रंथात आधार नाही.अशा प्रकारे एखादा स्वर बदलून किंवा जास्तीचा लावून किंवा विवादी म्हणून एखाद्या स्वराचा प्रयोग करून तो प्रचलित करणे अशी अनेक उदाहरणे आपणास दिसून येतील. ते काहीही असले तरी यमन हा राग अत्यंत लोकप्रिय आहे यात वाद नाही.मी तर त्याला ’गर्भश्रीमंत’ राग म्हणतो.यावर लिहायचे म्ह्टले तर सूर्य,समुद्र,अवकाश,धुमकेतू यावर लिहिण्यासारखे आहे.इतका मोठा आवाका असलेला दुसरा राग माझ्या तरी पाहण्यात आला नाही.तसेच माझ्या मते ’कल्याण’ ऐवजी ’यमन’ हाच थाट असायला हवा होता.यालाच शुद्ध थाट म्हणून मान्यता मिळायला हवी होती.कारण यात सातही स्वर शुद्ध म्हणजे तीव्र आहेत.शुद्ध थाट म्हणविल्या जाणार्‍या बिलावल थाटातील कोमल मध्यम व कोमल निषादाचा वापर विद्यार्थ्यांना विचारात पाडतो.(शास्त्र म्हणून तेच शिकविल्या जात असल्यामुळे यावर कोणी बोलत नाही ,ही गोष्ट वेगळी.तसेच बोलून फायदा काय ? परीक्षेत हेच लिहावे लागणार नाहीतर गूण कमी होतील !)पण यमनच्या बाबतीत असा संभ्रम रहात नाही.

शास्त्रीय माहितीः- गेल्या २०० ते २५० वर्षांपासून चालत आलेल्या उत्तर भारतीय संगीत शास्त्रानुसार यमन राग कल्याण थाटातून उत्पन्न झाला आहे.वादी स्वर गांधार असून संवादी स्वर निषाद आहे.जाती संपुर्ण असून गानसमय रात्रीचा पहिला प्रहर आहे. गानसमयावर या अगोदरही मी थोडक्यात लिहीले आहे या वेळी मात्र सविस्तर लिहीत आहे.खरे म्हणजे रागाचा गानसमय ठरविण्याची अशी कोणतीच साधने प्राचिन ग्रंथंमध्ये नमूद नाहीत.तरी पण रागाचा गानसमय ठरविल्या गेला आहे.कशाकरीता ? माहित नाही.जिथे प्राचिन ग्रंथातील रागांची नावे व आजच्या रागांच्या नावात साम्य नाही,स्वरात साम्य नाही तिथे गानसमय कसा आणि कोण ठरवणार ? काही तरी शास्त्रीय नियम लावायचे म्हणून लावणे या पलिकडे याला अर्थ नाही.माणसाने केव्हा गुणगुणावे,काय गुणगुणावे हे काय ठरवून होणार काय ? सध्याचा थाट पद्धतीचा विचार केला तर मधुवंतीसारखे राग तर थाट पद्धतीमध्ये बसतच नाही.मग दहा पेक्षा अकरा थाट करून त्या ११व्या थाटाला मधुवंती नाव दिले तर काय बिघडेल ? पण नाही, दहा थाटातच ठोक-पिट करून सर्व राग बसविणे...हे अनैसर्गिक वाटत नाही का ? हिंडोल,गौडसारंग,तोडी,मुलतानी या रागांमध्ये तीव्र मध्यम असून त्यांना दिवसा गायिल्या जाणारे राग म्हणून मान्यता दिल्या गेली आहे.खरे तर नियमानुसार तीव्र मध्यम असलेले राग रात्रीच गायिल्या जायला हवे. एक असाही नियम आहे की,’ग’ ’नि’ कोमल असलेल्या रागात तीव्र मध्यम लागत नाही.मग कोमल ग नि सोबत तीव्र म असलेल्या सुरावटीचा राग मधुकंस कसा ? खरे तर राग गाण्याच्या नियमाला फार पुर्वीपासूनच फाटा दिला आहे हे ’दर्पण’ या ग्रंथातील

 

"यथोत्काल एवैते गेया पूर्व्विधानतः /

राजाज्ञया सदागेया नतु कालं विचारयेत् //

 

आणि ’तरंगिणी मधील

 

"दशदंडात्परं रात्रौ सर्वेषां गानमीरीतम् /

रंगभुमौ नृपाज्ञायां कालदोषो न विद्यते //

 

तसेच श्री बॅनर्जी यांच्या ’गीतसुत्रसार’ (Grammer of vocal music) ग्रंथामध्ये पान ५८ वर म्हणतात...

"हमारे यहाँ राग-रागिनियों को दिन तथा रात्री के नियमित समयों पर गाने की जो प्रथा चली आ रही है,वह केवल काल्पनिक है"

या वरूनही गानसमय प्रथेतील पोकळपण स्पष्टपणे दिसून येतो.खरे म्हणजे स्वर समुदायात अशी काही विशेषता नाही की,ज्यामुळे त्यांना काही खास वेळी न गायिल्याने योग्य तो परिणाम साधल्या जात नाही.संगीताचा उद्देश स्वरांद्वारे भाव व्यक्त करून श्रोत्यांचे मन प्रसन्न करणे एवढाच आहे.म्हणजेच या करीता कोणत्याही विशिष्ठ अशा खास वेळेची गरज नाही.जे भाव सकाळी व्यक्त होऊ शकतात किंवा करू शकतात ते सायंकाळी किंवा रात्री का करू शकत नाही ? नक्कीच करू शकते,शकायलाच पाहीजे.’पारिजात’ या ग्रंथात भूपाली राग सकाळी गायिल्या जातो असा उल्लेख आहे.परंतू सध्या तो रात्रीकालिन मानल्या जातो.(घनःशाम सुंदरा...ही भूपाली रागातील भूपाळी सकाळी गोड वाटत नाही का ? सकाळच्या अहिर भै्रव रागातील ’पु्छो ना कैसे मैने रैन बिताई..’हे चित्रपटातील गाणे रात्री मन मोहतेच ना ?) दक्षिण भारतात यमन राग सकाळी व भैरवी रात्री गायिल्या जाते.तर काहींच्या मते ललित,रामकली,तोडी वगैरे राग सायंकाळी गायिल्याने गानसिद्धी उत्तम प्रकारे होते.म्हणजेच गानसमय हा प्रकार म्हणजे लोकांवर लादलेले थोतांड आहे हे सिद्ध होते.स्वर,स्वर आहे;राग,राग आहे,केव्हाही त्याचा परिणाम सारखाच अपेक्षित आहे.

ते काहीही असले तरी यमन राग हा सर्वांचा आवडता आहे हे मात्र खरे. याचे वैशिष्ठ्य म्हणजे कल्पक गायक,वादक,संगीतकारांवर हा लवकर प्रसन्न होऊन वरही देऊन टाकतो.पण जर का यात भरकटला तर ’पचका’ होणे ठरलेले आहे.यमन गाता आला की सर्व राग गाता येतात असे जाणकार सांगतात.हा राग गायिला नाही असा गायक,वादक सापडणे अशक्यच ! इतका हा मधूर आहे.भारताच्या सर्व भाषा-बोलींमधील जेवढी गाणी या रागात बनली असतील तेवढी गाणी दुसर्‍या रागात तयार झालेली नसावी.सुगम संगीतकारांसाठी तर हा राग वरदानच ठरला आहे.कोणतेही भाव समर्थपणे व्यक्त करण्याची क्षमता यमन मध्ये आहे.हे एक संगीतकार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो.


(येथे मी तयार केलेल्या यमन रागाच्या विविध मूडच्या रचनांवर कोल्हापूरचे संगीत समीक्षक ऍडव्होकेट राम जोशी यांच्या लेखातील काही भाग देण्याचा मोह मला आवरत नाही.ते म्हणातात... "यमन हा रागच असा की कोणाही संगीतकारानं त्याच्या प्रेमात पडावं. कदम तरी त्याला कसे अपवाद असणार? त्यांनी यमन रागात उदंड रचना केल्या असल्या तरी त्या छापातले गणपती नाहीत, ती प्रत्येक मुर्ती स्वतंत्र आहे़. प्रत्येक चालीला स्वतःचा वेगळा चेहरा आहे, रंग आहे, रुप आहे, व्यक्तिमत्व आहे़. कार्यक्रमाची सुरुवात ते स्वरचित काव्याने करतात़.

 

‘सरगम तुझ्याचसाठी गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याच साठी’

 

दादर्‍यातल्या ह्या बंदिशीची यमन मधील ही रचना. अगदी साधी. सुगमसंगीतामध्ये अर्थातच शास्त्रीय संगीतातील व्याकरणाला; नियमांना स्थान नाही, इथं अपेक्षित असतं ते श्रवण सौंदर्य, गोडवा, मोहकता. साहजिकच इथं शुध्द यमन शोधण्याची धडपड करू नये कारण तो यमन कल्याणाशी क्षणांत दोस्ती करतो़ आणि दोन्ही माध्यमांच्या अशा हळुवार लगावांची प्रचिती आली की उत्स्फूर्तपणे दाद देण्याशिवाय श्रोत्याला इलाजच रहात नाही़ ही अनुभूती मी त्यांच्या प्रत्येक यमनांत घेतली व घेतो़.

 

‘मी असा ह्या बासरीचा सूर होतो,

नेहमी ओठांपुनी मी दूर होतो’

 

ह्या गझलची चालही अशीच आहे़. धृवपदातली -मतल्यातली दुसरी ओळ (ज्याला क्रॉस लाईन म्हणतात) त्याची ठेवण व स्वरसमुहाची रचना अत्यंत मोहक आहे़. त्यातील ‘सूर होतो़’ इथं तार सप्तकातला षडज्‌ सूर ह्या शब्दासाठी खुबीनं वापरला तर आहेच पण ती ओळ म्हणताना ‘सूर’ हा शब्द आणि त्याचा तारषड्जाचा हळूवार पण भरीव लगाव व रुपक तालांचा एक पूर्ण जादा आवर्तन पूर्ण होईपर्यंत जो दीर्घकाळ मुक्काम ठेवतो तो अतीसुंदर लागतो़. संगीत रचनाकाराकडं नुसता सांगीतिक अलंकाराचा साठा असून चालत नाही तर स्वरपोषाखाला साजेल असाच एखादाच चढविलेला अलंकार संगीत श्रवणसौंदर्य खुलवितो़. संगीतकार हाच खर्‍या अर्थानं स्वतःच्या रचना समर्थ पणे व अपेक्षित परिणामासह गाऊ शकतो. हा अनुभव मास्तर कृष्णरावांपासून सुधीर, श्रीधर फडके, वसंत पवार, राम कदम, यशवंत देव यांच्या पर्यंत येतो. सुधाकर कदम हे स्वतः गायकही असल्याने तेही ह्या बाबीला अपवाद नाहीत़. ‘सूऱ होतो’ इथं शब्दकला आणि स्वर माधुर्य असा सुरेख समन्वय झालाय़.

‘सांज घनाच्या मिटल्या ओळी’

हे एक अतिशय हळूवार भावना उलगडून दाखविणारं सरस काव्य़. कदम यांनी बंदीशही यमनमध्येच बांधलीय़. त्यातल्या क्रॉसलाईन अखेरीस़ ‘क्षितीजावरती़’ इथं त्यांनी नि व कोमल रिषभाचा अत्यंत कौशल्यपूर्ण वापर करून यमनचा करॅक्टरच बदललाय असे नव्हे तर त्या रिषभाच्या योजनेमुळे ‘क्षितीज’ ह्या शब्दाचा अर्थ प्रतीत करण्यासाठी कोमल रिषभाला पर्यायच नाही हे त्वरीत पटते, पुरियाचं होणारं दर्शन तसेच कडव्याची चाल हे सगळं सुरेख जुळून आलंय़. प्रसिध्द कवी अनिल कांबळे यांच्या

 

‘जवळ येता तुझ्या दूर सरतेस तू /

ऐनवेळी अशी काय करतेस’

 

तू ह्या गीताची तर्जही यमन मध्येच बांधली आहे़. यमन मधली अत्यंत चटपटीत अशी ही स्वररचना, खेमट्याच्या अंगानं लागणारा दादर्‍याचा ठेका, लय थोडीशी उडती चपळ, त्यामुळे विशिष्ट अर्थवाही अशा ह्या गीताला उत्तम न्याय मिळाला आहे़. सौंदर्य स्थळाचा निर्देश करायचा झाल्यास ‘ऐनवेळी अशी काय’ ह्या ओळीतली अधीरता दर्शविण्यासाठी अत्यंत चपखल अशी स्वरसमुहरचना म्हणावयास हरकत नाही. ‘सामग, सामगधप’ वगैरे अर्थात हा आनंद अनुभवायचा आहे़. ‘तुझ्या नभाला गडे किनारे’ ही सुध्दा यमनमधलीच श्रवणीय रचना आहे. यमन ह्या एकाच रागातल्या चारी रचना त्यांनी मला एकापाठोपाठ ऐकविल्या. पण खासियत अशी की त्यांत तोचतोचपणा नाही़. स्वररचनेची पठडी ठरीव स्वरुपाची नाही. त्यात आहे पूर्णतः वेगळेपण, हे श्रेष्ठ संगीत रचनाकाराचं वैशिष्ट मानलं जातं. सुगम संगीतात आकर्षक मुखड्याला-धृवपदाला खास महत्व आहे़.कदम यांच्या स्वररचनेचे मुखडे अत्यंत आकर्षक असतात़. त्याहीपेक्षा अधिक कौशल्य व महत्व असतं ते मुखड्यानंतरच्या क्रॉसला. कारण संगीत रचनेच्या आकर्षकतेचे ते प्रमुख स्थान आहे़. मुखड्याच्या चालीला अनुरूप अशी किंबहुना त्याचं सौंदर्य वर्धिष्णू करणारी आरोही पूर्ण करुन अवरोही व षड्जावर विराम पावणारी स्वररचना, हे काम फार अवघड असते़. तसे नसेल तर पूर्ण चालच फसते़ अनेक संगीत रचनामध्ये हे दोष दिसतात़. संगीतकाराला इथं आपली प्रज्ञा ओतावी लागते़. सुधाकर कदमांच्या रचना ह्या कसोटीला पुरेपूर उतरणार्‍या आहेत म्हणूनच त्या भावतात़. कडव्यांच्या चालीतही मूळ चालीशी सुसंगती दिसते़. कळत नकळत अन्य रागाला स्पर्शून जाणं म्हणजे हळूच मधाचं बोट चाखण्यासारखं गोड मधुर असतं.अर्थातच शेवटच कडवं हे सर्वार्थानं हायलाईट असतं. तशीच त्याची स्वररचनाही कदम समर्थपणे करतात़. एकाच यमनाची ही विविध रुपे, विविध रंग, त्याचा वेगवेगळा ढंग. आणि त्याची अनोखी अदाकारी हे मोहजाल किंवा मायाजाल म्हणा, असं आमच्या भोवती टाकलं की आम्ही स्वतः जाणकार रसिक असूनही फसलो़. मग लक्षात आलं की ही यमनी फसवणूक होती पण ही फसवणूक गोड होती़. निर्भेळ होती.")

 

      यमन हा अभंगापासून तॊ लावणीपर्यंत सर्व प्रकारात रंगतो म्हणा किंवा रंगवितो म्हणा !मराठीमध्ये जवळ-जवळ सर्वच संगीतकारांनी यात स्वररचना केली आहे.त्याची यादी करतो म्हटले तर तो एक मोठा लेखच होईल.तरी पण काहींचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही.’धुंदी कळ्यांना...’, ’का रे दुरावा...’, ’पराधीन आहे जगती...’, ’तोच चंद्रमा...’, ’पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा...’, ’कबीराचे शेले विणतो...’, ’सुखकर्ता दुखहर्ता...(आरती)’, ’जिथे सागरा धरणी मिळते...’, ’जीवनात ही घडी...’, ’शुक्र तारा...’, ’तिन्ही सांजा सखे मिळाल्या...’, सोबतच अनेक नाट्यगीतेही यात आहेत.त्यातील अभिषेकी बुवांनी मत्स्यगंधा नाटकाकरीता रचलेले स्वरशिल्प ’देवाघरचे ज्ञात कुणाला...’ हे मला अतिशय भावले.गायक आहेत रामदास कामत. हिंदी चित्रपटसृष्टीतही यमन ने धुमाकूळ घातला आहे.सैगलच्या ’मैं क्या जानू क्या जानू रे...’ पासून तर आता-आताच्या ’तुम दिल की धडकन हो....’पर्यंत...यातील उल्लेखनीय गाणी आहेत...’मन रे तू काहे न धीर धरे...’, ’जिया ले गयो...’, ’जा रे बदरा बैरी जा...’, ’वो हँसके मिले हमको...’, ’पान खाये सैयाँ...’, ’इस मोडपर आते है...’, ’चंदन सा बदन...’, ’आँसू भरी है ...’, ’जब दीप जले आना...’ अशी किती गाणी घ्यावीत...............? उर्दू ग़ज़ल मध्ये ’रंजिश ही सही....’ही ग़ज़ल म्हणजे मैलाचा दगड आहे.सोबतच ’वो मुझसे हुये...’, ’शाम-ए-फ़िराक...’ ह्या गझला आणि ’आज जाने की ज़िद ना करो...’ ही फ़रीदा खानम यांनी गायिलेली रचना म्हणजेही कळसच आहे.यात ’मरीज़े मुहब्बत...’, ’दिलवालों क्या देख रहे हो ह्या ग़ुलामलीच्या गझला आपला वेगळा रंग दाखवितात.’क्युँ मुझे मौत के पैग़ाम दिए जाते है...’ (शोभा गुर्टू), ’तुम आए हो तो शबे इंतज़ार गुजरी है...’ (इकबाल बानो), ’आपका इंतज़ार कौन करे...’(शुमोना राय) या गझलाही अतिशय श्रवणीय आहेत. उर्दू गझल गायनातील मेहदी हसन साहेबांनी गायिलेली अहमद फ़राज़ यांची ’रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ...’ या गझलने लोकप्रियतेचे सर्व मापदंड मोडीत काढले.(खरे म्हणजे हे ’मोहब्बत’ या १९७२ सालच्या पाकिस्तानी सिनेमातील गाणे (ग़ज़ल) असून,याचे संगीतकार निसार बज़्मी हे आहेत.पण खाँ साहेबांनी महफिलीत गाऊन या रचनेचे सोने केले.)या गझल सोबतच यमन रागाचीही लोकप्रियता (गझल गायनाचे संदर्भात) परमावधीला पोहचली.मूलतःच गोड असलेल्या या रागात फ़राज़ साहेबांचे शब्द, खाँ साहेबांचा जव्हारदार मधाळ आवाज आणि शब्दांना साजेशी विनवणी करणारी बंदिश असा उच्चतम कोटीचा संगम यात झालेला दिसून येतो....


अशीच विनवणी मी स्वरबद्ध केलेल्या #तुझ्यासाठीच_मी या अलबम मधील 'तुझ्यासाठीच मी...'या गझलमध्ये आपणास दिसून येईल.(अर्थात खरे परीक्षक आपण आहात) असा हा यमन...

ऐका तर मग...फक्त मध्य आणि मंद्र सप्तकातील ही बंदिश, वैशाली माडेच्या आवाजात..

               तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते

              तुझ्यासाठीच स्वप्नांचे दिवे मी लावले होते

                                              -दिलीप पांढरपट्टे

 





संगीत आणि साहित्य :