गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 27, 2023

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २१)

.                             -दोन आठवणी-

      यवतमाळला नगर पालिका संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या.त्या म्हणजे तत्कालीन नगर पालिकेचे अध्यक्ष संगीत प्रेमी आदरणीय स्व. बाबासाहेब घारफळकर आणि माहुरचे राजे स्व. मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख.दोघेही संगीतावर अपार प्रेम करणारे.बाबासाहेब बाल गंधर्वांची पदे अप्रतिम गायचे. ते आले की जवळ जवळ तीन तासांची मैफल ठरलेली असायची.या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे बालगंधर्वांची गायकी ऐकायला मिळायची.दुसरे राजे मधुकरराव...ते आले की, आल्या आल्या दहा रुपयाची नोट काढून चपराशाला पेढे आणण्याकरिता पिटाळायचे.(त्या काळी, म्हणजे १९७० च्या दशकातील दहा रुपये...त्या दहा रुपयांची आजची किंमत किती असेल विचार करा.) कासलीकर गुरुजींच्या मैफली सोबतच गोड पेढ्यांनी सगळ्यांचे तोड गोड व्हायचे.त्यांनी त्या काळातील बहुतेक गायक/वादक ऐकले होते.पंडित उस्ताद अमीर खान, जसराज त्यांचे आवडते गायक होते.ते रसिक तर होतेच पण उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट शिकारी होते.सह्याद्री बुक्स तर्फे त्याचे शिकारीवरील 'शिकारनामा' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.यात त्यांनी केलेल्या १४ शिकारीचे वर्णन आहे.या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आमहू उभयता  उपस्थित होतो..माझे संगीत शिक्षण,ऑर्केस्ट्रा,नेहरू युवक केंद्रातील काम,मेंडोलीन वादन,गायन प्रवास ते बघत आले होते.आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर गांधर्व संगीत विद्यालय स्थापन केले.त्याच्या वार्षिकोत्सवाला राजे आवर्जून उपस्थित राहायचे.मी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जसराजजींच्या बंदिशी गायचो.  पंडितजी त्यांचेही आवडते गायक असल्यामुळे माहूरला त्यांच्या वाडयात माझ्या अनेक मैफली आयोजित करून माहुरकरांना ऐकवायचे.माहुरच्या रेणुकादेवीसमोर ललिता पंचमीला आम्ही हजेरी लावायचो.त्या काळी सभामंडपात ही हजेरी असायची.गाणारे व ऐकणारे गाभाऱ्यात मावतील इतके असायचे.हळू हळू गर्दी वाढायला लागली, तसे माझे मित्र असलेलले प्रमुख भोपी स्व. रेणूकदासजींनी या हजेरीला संगीत संमेलनाचे रूप देण्याचे ठरवून मंदिराच्या बाहेर प्रांगणात हजेरी लावण्याची ध्वनिवर्धकासह सोय करून आयोजनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.जोपर्यंत माझ्यावर जबाबदारी होती त्या कालखंडात छोटा गंधर्वां सारखी दिगग्ज मंडळी या संगीत संमेलनात गाऊन गेली.

     माझ्या सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या स्व.बाबुरावजी यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात एक लेख लिहिला होता.तो खाली देत आहे. नक्की वाचा...आपणासही आवडेल.


                          #प्रेम_पिया_हम_पाये 


‘हरचंद सुरीली नग़मोंसे

जज़बात जगाये जाते है,

उस वक़्त की तलखी याद करो,

जब साज़ मिलाये जाते है।’


     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.

       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?

       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?


दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।

आखिर इस दर्द की दवा क्या है ॥


      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.

       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.

       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.


-राजे मधुकरराव देशमुख (माहूर)


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

-----------------------------------------------------------------------


     १९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुरला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, "छान गायलास, पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम."

     एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपून ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत. 

सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा  ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे. 

     संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.  

सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे. 

  ३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं. 

सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम. 

मेहदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो. 

कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?

     शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे. 

आज सरांचा वाढदिवस आहे. 

जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 

     कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा

हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।

बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।

       - डॉ सुशील देशपांडे

          कारंजा लाड

          १३/११/२०२२





संगीत आणि साहित्य :