राग गोरख कल्याण सम सम्वाद द्वितीय रात्रि ओडव षाडव मान ।
थाट खमाज मानत गुनि जन , गोरख राग बखान ।।
गोरख कल्याण हा उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील खमाज थाटोत्पन्न राग आहे. हे नाव उत्तर प्रदेशातील गोरखपुर मधील एका परिसरातील लोक-गीतामधून उत्पन्न झाल्याने पडल्याचे मानल्या जाते. नाव जरी गोरख कल्याण असले तरी यात कल्याण दिसत नसल्यामुळे काही संगीतकार, गायक, संगीततज्ज्ञ
याला फक्त गोरख म्हणणे पसंत करतात.हा एक अतीशय गोड राग आहे. उत्तर भारतीय संगीताच्या नियमानुसार रागातील आरोहावरोहात पाच स्वर आवशयक असतात.पण गोरख कल्याण हा एकमेव असा राग आहे की, ज्यातील आरोहात कोमल निषाद वक्र स्वरूपात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सा रे म ध हे फक्त चारच स्वर लागतात.ही एक मजेशीर बाब आहे.असो!
या रागात मध्यम स्वर एकदम मजबूत आहे. वादी स्वर षड्ज असून या स्वरासोबत मध्यम स्वर हा एक विश्राम स्वर पण आहे, जो याला 'नारायणी' रागापासून वेगळा करतो. (कर्नाटक संगीतामधून आलेला नारायणी राग खमाजचाच एक प्रकार आहे. गांधार वर्ज करून खमाज गायिला की तो नारायणी होतो.दक्षिणेतील 'हरिकांभोजी' थाट खमाज थाटाप्रमाणे आहे.)/नारायणी रागाचा वादी आणि न्यास स्वर पंचम आहे. गोरख कल्याणमधील मन्द्र सप्तकातील कोमल निषाद हा विश्राम स्वर आणि रागाचे प्रमुख लक्षण दाखविणारा स्वर आहे.आरोहातील वर्जित निषाद या रागाला बागेश्री पासून वेगळा करतो किंवा ठेवतो.तसेच पंचम वर्ज असल्यासारखाच असल्यामुळे दुर्गा रागाला पण दूर ठेवतो. आरोहात कोमल निशादाचा अल्प प्रयोग सर्वत्र केल्या जातो. आणि त्यामुळे या रागाचे सौंदर्य अधिक वाढते.तसेच यात पंचम या स्वराचाही अल्प प्रयोग करून रंजकता वाढविण्याचा प्रयत्न केल्या जातो. अर्थात काही संगीतकार याच्याशी सहमत नाही.या रागाचा विस्तार तीनही सप्तकांमध्ये केल्या जातो.हा विस्तार अतिशय मनमोहक असतो.
याचा वादी स्वर षड्ज व संवादी स्वर मध्यम आहे. काही विद्वान याचा वादी स्वर मध्यम व संवादी स्वर षड्ज मानतात. पण गानसमय मात्र रात्रीचा दुसरा प्रहर मानतात.म्हणून मग वादी संवादीच्या दृष्टीने उत्तरांग प्रधान आणि गानसमयाच्या दृष्टीने पूर्वांग प्रधान व्हायला हवा.वास्तविकता ही आहे की,गोरख कल्याण पूर्वांग प्रधान राग आहे.त्यामुळे अधिकांश विद्वानांनी षड्ज,मध्यम स्वराला वादी,संवादी स्वर म्हणून मान्यता दिली आहे. रागातील वादी संवादी स्वरांचे स्थान बुद्धिबळातील राजा व वजीरा प्रमाणे असतात,हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.गोरख कल्याण रागात तर यांचे विशेषच महत्व आहे.व ते सतत जाणवत असते.बाकी सगळे स्वर या दोन स्वरांभोवती अक्षरशः गोंडा घोळताना दिसतात.
आरोह- सा रे म, ध S (कोमल)नी ध सां
अवरोह- सां ध ध (कोमल)नी ध म, रे म रे सा (कोमल) ऩी S ध़ सा
पकड- (कोमल) नी ध म, रे म रेसा (कोमल) ऩी S ध़ S सा, रे म
(एके काळी मुक्त असलेली संगीत कला काही काळानंतर मंदिर, राज-दरबार, सरदार-जागीरदार भवन आणि कोठे वगैरे मधून मुक्त होऊन आकाशवणीमध्ये बंद होते की काय,अशी परिस्थिती असताना पुन्हा संगीत प्रसारक,लेखक, संशोधक,
गायक,वादक यांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.शाळा,महाविद्यालयातून संगीताचे सूर घुमायला लागले.
मोठं-मोठी संमेलने व्हायला लागली.पण गेल्या काही वर्षात शाळांतमधील संगीत विषय बंद करण्याकडे सरकार व संस्थाचालकांचा कल दिसायला लागल्यामुळे शाळेत किलबिलणारे संगीताचे स्वर हळू हळू लोप पावत चालले आहेत. पुढे चालून महाविद्यालयातील संगीत विभाग बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जे संगीत मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते,ज्या संगीतामुळे सर्व जग एकत्र येऊ शकते त्या संगीत विषयाला सर्वत्र दुय्यम,तिय्यम स्थान दिल्या जायचे.आणि आता तर स्थानच न ठेवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.असो..'कालाय तस्मै महा'!)
उस्ताद सलामत अली नजाकत अली खान,गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी,कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, उस्ताद उमीद अली खान, पंडित राजन साजन मिश्र,मालिनी राजूरकर, श्रुती सडोलीकर, विणा सहस्रबुद्धे, पंडित जगदीश प्रसाद, उस्ताद राशिद खान,परवीन सुलताना, देवकी पंडित,अरमान राशिद खान,संजीव अभ्यंकर,सम्राट पंडित (जगदीश प्रसाद पंडितचा मुलगा), पं. कैवल्यकुमार गुरव, जयतीर्थ मेउंडी, रमाकांत गायकवाड, मौमिता मित्रा, डॉ.प्रवीण गावकर, झीशान खान, रागेश्री वैरागकर, आस्था-प्रदीप चोप्रा (धृपद),ऋषी-वरुण मिश्रा, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, राजेश-रिषभ प्रसन्ना, गुलाम हसन खान, देवर्शी भट्टाचार्य, राजेंद्र कंदलगावकर, अर्चना कान्हेरे, गिरीश गोसावी, डॉ. कल्याणी देशमुख,शुजात अली खान, सुमित्रा गुहा, परितोष पोहनकर, मनाली बोस, अमित कुमार रथ, पं. तुषार दत्त, पं. देवशीष डे, मेघना घेरकर, विनय रामदासन, रोंकिनी गुप्ता.
पंडित बुधादित्य मुखर्जी (सतार), डॉ.एन. राजम (व्हायोलिन) उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया (बासरी)-सुनील देव (सतार) जुगलबंदी, राहुल शर्मा (संतूर), पुर्बायन चटर्जी (सतार), सौमिक दत्त (सरोद), संदीप चटर्जी (संतूर), विनय भिडे (गायन)-अनिर्बन दासगुप्ता (सरोद) जुगलबंदी, पं. सुब्रतो डे (सतार), साकेत साहू (व्हायोलिन), फारुख लतीफ (सारंगी), पंडित विश्वमोहन भट (मोहनवीणा)-रोनू मुजुमदार (बासरी) जुगलबंदी, लोकेश आनंद (शहनाई), पं. रबीन घोष (व्हायोलिन), विष्णू देव (बासरी), एस.आकाश (बासरी), नारायण हिरेकोलची (व्हायोलिन), देबस्मिता भट्टाचार्य (सरोद), कमला शंकर (हवाइयन गिटार) या कलाकारांचे गायन/वादन युट्युबवर उपलब्द्ध आहे.
● या रागावर आधारित हिंदी,मराठी चित्रपट गीते ,गझला,आणि भक्तीगीते...
'दिल की कश्ती भवर में आयी है' लता. चित्रपट-पालकी, संगीत-नौशाद (१९६७).
'बा होशो हवास में दिवाना' रफी.चित्रपट-नाईट इन लंडन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६७).
'फिर भोर भई जागा मधूबन' देवकी पंडित. चित्रपट-साज, संगीत-उस्ताद झाकिर हुसैन (२०१०).
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' लता. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
'किसी रंजीश को हवा दो के मै जिंदा हूँ अभी' चित्रा सिंग.
'दोस्त बन बन के मिले मुझ को मिटाने वाले' जगजीत सिंग.
कबीर भजन- अभिजीत शेनॉय.अल्बम-निनाद (२०१४).
'सलोनी सांवरी सुरत' गायिका-सुस्मिता दत्त, भजन.
'मन लोभले मन मोहने' पंडित जितेंद्र अभिषेकी. संगीत-राम फाटक.
'कंठातच रुतल्या ताना' आशा भोसले. गीत-गंगाधर महांबरे, संगीत-श्रीनिवास खळे (१९९९).
'स्वप्नात साजणा येशील का' आशा भोसले. चित्रपट-गोंधळात गोंधळ, संगीत-विश्वनाथ मोरे.
'मोगरा फुलला' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
----------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.१४ जानेवारी २०२४