गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, January 10, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २३) ●आर्णीतील उपद्व्याप●


      आर्णीला नोकरी तर मिळाली.पण घर मिळणे कठीण होऊन बसले होते.संगीतवाले म्हणजे बँड, तमाशेवाले असा काहीतर समज आर्णीकरांचा होता.आणि तो संयुक्तिक असावा.कारण त्यावेळी वीस हजार लोकवस्तीच्या या गावात बाराही महिने तमाशाचा फड ठिय्या देऊन असायचा.कशी-बशी एक खोली मिळाली.पण मालक इतका कटकट्या होता की, छोटे अडॅप्टर लावून ट्रान्झिस्टर रेडिओ लावला तर इलेक्ट्रीक बिल वाढते म्हणून ओरडायचा. मी यवतमाळात जरी मस्ताडलेला प्राणी होतो तरी आर्णीत मात्र मास्तर असल्यामुळे गोगलगाय झालो होतो.पहिली दोन वर्ष मला कठीण गेली. पण नंतर लक्षात आले की येथे शेर नाही तर सव्वाशेर झाल्याशिवाय काही आपला निभाव लागणार नाही.म्हणून मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.प्रथम संगीत विद्यालय सुरू केले.नंतर संगीत विद्यालयातर्फे छोटे-मोठे सांगीतिक कार्यक्रम सुरू   केले.संस्थाध्यक्ष चितघनानंदजी भारती नाटकाचे शौकीन होते.त्यांना मला घेऊन संत दामाजी हे नाटक बसवायचे होते.या नाटकात ते बिदरच्या बादशहाचे पात्र करून मला दामाजीपंत बनवणार होते. परिसरात भारतीजींचा रुबाब एखाद्या बादशहापेक्षा कमी नव्हता.पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नाटक काही रंगमंचावर आले नाही.
        छोट्या-मोठ्या सांगीतिक कार्यक्रमामुळे आर्णी व परिसरातील संगीत प्रेमी हळू हळू माझ्याशी जुळायला लागले.तसेही रोजच्या शालेय प्रार्थना,१५ ऑगष्ट,२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील सहभागामुळे माझ्याबद्दल गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला लागला होता.शाळेत मी अत्यंत कडक होतो.पण शाळेच्या बाहेर 'मऊ मेणहूनी...'! गावातील काही संगीत प्रेमींच्या सहकार्याने साहित्य,संगीताच्या जोपासनेसाठी 'स्वर-गंगा' ही संस्था स्थापन करून शाळेच्या विज्ञान विभागाच्या हॉल मध्ये कार्यक्रम घेणे सुरू केले.या उपक्रमा करीता शाळेतील संगीत प्रेमी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक स्व.शंकरराव बुटले गुरुजींचे मोलाचे सहकार्य मिळत होते.वरील सगळ्यांच्या सहकार्यामुळे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख स्व.पंडित बाळासाहेब कासलीकर,नागपूर आकाशवाणीचे तार शहनाई वादक स्व.बाबासाहेब देशपांडे, कविवर्य स्व.सुरेश भट,दैनिक तरुण भारतचे संपादक स्व.वामन तेलंग,विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार स्व.आप्पामार्जिने, कवी स्व.शंकर बडे, प्रा.श्रीकृष्ण राऊत,मिराताई ठाकरे,नारायण कुळकर्णी कवठेकर,हास्य सम्राट फेम मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी यांचे कार्यक्रम आयोजित करता आले तसेच सिंधुताई सपकाळ, विसुभाऊ बापट यांचे, शाळेसह आर्णीच्या विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून आर्थिक मदत मिळवून दिली आहे.या वेळी प्रत्येकाचा मुक्काम माझेकडेच असायचा.सिंधुताई सपकाळ तर अनेकदा आर्णीला येऊन गेल्या.(त्या वेळी त्या सेलिब्रेटी नव्हत्या.) आणि जितके दिवस कार्यक्रम असेल तितके दिवस त्यांचा मुक्काम माझ्याकडे असायच्या. सुलभा सगळ्यांची आवभगत अगदी जिव्हाळ्याने करायची.
        पण गावातील लोकप्रियता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन असो की, १५ ऑगस्ट,२६ जानेवारी असो माझा वावर आणि सहभाग लक्षणीय असायचा. त्यामुळे मुख्याध्यापक,
संस्थाध्यक्ष यांची माझ्याशी विशेष जवळीक असायची.या सगळ्यामुळे काही शिक्षकांच्या पोटात दुखायला लागले.व त्यांच्या 'काड्या' सुरू झाल्या.त्यावेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुरूच असायचे.मी आर्णीला आणि ऑर्केस्ट्रा ग्रुप यवतमाळला.ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती त्या काळात शाळा करून बाहेरगावचे कार्यक्रम करणे किती जिकरीचे असेल हे वाचक जाणू शकतील.मग कधी कधी सलग कार्यक्रम असले की,शाळा संपल्याबरोबर यवतमाळ गाठणे.तेथून भाड्याच्या बसने कार्यक्रमाचे गाव गाठणे,कार्यक्रम करून वापस यवतमाळ व सकाळची पहिली बस पकडून आर्णी...सरळ शाळेत.जागरणामुळे डोळे लाल असायचे.नेमके हेच पकडून पर्यवेक्षकाने 'कदम सर माझ्याकडे लाल डोळे करून बघतात',अशी तक्रार मुख्याध्यापकांकडे करणे,शाळेपेक्षा कार्यक्रमाकडे त्यांचे लक्ष असते, तासिकांवर उशिरा जातात,शिक्षक कक्षात झोपतात वगैरे वगैरे बालिश तक्रारी सुरू झाल्या.परंतू मुख्याध्यापक (स्व.शंकरराव बुटले) व संस्थाचालक (स्व.राजकमलजी भारती) माझी ससेहोलपट बघत असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार गेल्यावर दुर्लक्ष करायचे.
       १९७२ ते २००३ या ३१ वर्षांच्या कालखंडात मी आर्णीत बरेच उपदव्याप केलेत.गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना, इयत्ता १ ते १० वीच्या पाठयापुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून 'झुला' नामक कॅसेटची तीन भागात निर्मिती, शाळेत 'दत्त जयंती उत्सव समिती', गावात 'शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव साजरा करणे',विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा,मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, आकाशवाणी सांस्कृतिक संध्या, नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय कला मंडळ','शिवसेनेची स्थापना', 'पत्रकार संघाची स्थापना', 'मराठा सेवा संघ',' वृक्षारोपण कर्यक्रम',वऱ्हाडी कवी संमेलन, हास्य-व्यंग (हिंदी) कवी संमेलन वगैरे वगैरे...या सगळ्या उपदव्यापात आर्थिक गणित मात्र 'व्यस्त' असायचे.त्यामुळे बायको 'त्रस्त' असायची. पण या व्यस्त-त्रस्ततेची झळ तिने मला कधीच लागू दिली नाही.
---------------------------------------------------------------------
गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिकोत्सव प्रसंगी आयोजित हास्य-व्यंग कवी संमेलनातील कवींचे स्वागत करताना मी... डावीकडे खाली बसलेले, सुप्रसिद्ध मंच संचालक व कवी किरण जोशी आणि एकदम उजवीकडे, प्रसिद्ध हास्य-व्यंग कवी एहसान कुरेशी. #Kiranjoshi #ehsanquraishi #sudhakarkadam


 





संगीत आणि साहित्य :