Wednesday, November 29, 2023
आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १६) 'मिस्सळ'
Monday, November 27, 2023
Saturday, November 25, 2023
राग-रंग (लेखांक ३३) गौडसारंग
Wednesday, November 22, 2023
आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १५) ●मदरटांग●
Saturday, November 18, 2023
राग-रंग (लेखांक ३२) राग पुरीया धनाश्री
Wednesday, November 15, 2023
आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १४)
. ◆काही सांगीतिक आठवणी◆
● शिवरंजनी' हे नाव जेव्हा पहिल्यांदा माझ्या कानावर पडले,तेव्हा शिवाचे रंजन करणारी रागिणी ती शिवरंजनी असा अर्थ मी काढला.अर्थात त्यावेळी मी फक्त १६ वर्षांचा होतो.वयाच्या अकराव्या वर्षांपासून सोळाव्या वर्षापर्यंत शालेय शिक्षणासोबतच तबला,हार्मोनियम व गायनाचेही प्रशिक्षण सुरू होते.या सहा वर्षात प्रचंड मेहनत घेतल्यामुळे माझा हार्मोनियमचा हात छान तयार झाला होता.१९६५ मध्ये यवतमाळला 'भाग्योदय कला मंडळाची' स्थापना झाली.या मंडळाचा मी सदस्य होतो.या मंडळानेच ऑर्केस्ट्रा काढायचे ठरवले तेव्हा डोक्यात घोळत असलेल्या शिवरंजनी नावाने पुनः उचल खाल्ली. व ऑर्केस्ट्राचे नाव 'शिवरंजन' असे ठेवल्या गेले.त्या वयात शिवरंजनीच्या स्वरांनी इतकी मोहिनी घातली होती की, कार्यक्रमाची सुरुवात आम्ही 'धसां रेंगं रें सां ध प गरे सारे ग s ग रे ग प ध सां'(यात गांधार कोमल आहे) ही शिवरंजनीची त्रितालातील गत वाजवून करायचो.इतका तो राग डोक्यात बसलेला...तो आजतागायत!
● 'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.
● त्याकाळी (ऑर्केस्ट्राचा कालखंड) यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,
अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.
● हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील 'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे. यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या दोन वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम, मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.
● राग बिहाग
(सर्वप्रथम जेव्हा बिहाग नाव ऐकले तेव्हा जोरात हसू आले.छोट्याशा खेड्यातून आलेलो मी...खेड्यातला कुचिनपणा अंगात भिनलेला.त्यामुळे मनातल्या मनात बिहाग शब्दाची फोड (संधी विग्रह) वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे हसू आवरले नव्हते.या हसण्यामुळे मार बसला नाही.पण भरपूर शिव्या खाव्या लागल्या,त्या गुपचूप खाऊन घेतल्या.चिजांच्या बाबतीतही त्यातील न कळणारे शब्द ऐकून वेगवेगळे अर्थ काढल्यामुळे अनेकदा इतर विद्यार्थ्यांसमोर (विशेषतः विद्यार्थिनींसमोर) अनेकदा अपमानित व्हावे लागायचे.शब्दच तसे असायचे...देस मधील 'रब गुना गाय रे तू मना' यातील 'रब'चा अर्थ न लागल्यामुळे व पुढील 'गाय' चा अर्थ 'दूध देणारी गाय असा अर्थ काढून,पुढील 'काहे भटकत फिरे निसदिन' यातील फक्त गाय व भटकणे हे कळल्यामुळे जो अर्थ काढायचा तो काढून मोकळा व्हायचो.शिकविणारे गुरुजी अर्थ सांगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिकविण्याचे काम करायचे.बिहाग मधीलच 'जब ते बिछुरे लालन' ह्या चिजेचा अर्थ १० ते १५ वयोमान असलेले विद्यार्थी सांगू शकतील काय? तिलक कामोद मधील 'चंचल चित चोर चतुर अटक मोसे गुईया' या द्रुपदाचा अर्थ काढताना हसू येणार नाही तर काय?भैरव मधील 'धन धन मुरत कृष्ण मुरारी' मधील धन म्हणजे संपत्ती हा अर्थ काढून 'कृष्ण खूप श्रीमंत असल्यामुळे धन मुरवत होता'असे काही बाही डोक्यात यायचे.खरे म्हणजे शिकविणाऱ्यांनी चिजेच्या अर्थासह शिकवायला हवे.पण तसे फारसे घडत नसावे.निव्वळ पोपटपंची असायची. अर्थात त्यातून राग स्वरूप कळायचे हे मात्र तितकेच खरे.चिजा मात्रा डोक्यावरून जायच्या. 'बालमुवा माईरी' बहार,'मोर मोर मुसकात जात' मालकौंस, 'छों छननन छों छननन बिछुवा बाजे' (माझ्या डोक्यातील प्रश्न 'बिच्छू वाजणार कसा?') जौनपुरी. 'लाल मोरीचू s s नरभी s जे s गी' कामोद मधील धमार.एक चीज तर महाराष्ट्रातील आणि त्यातही माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थासाठी अजूनच अनाकलनीय... 'तेंडेरे कारन मेंडेरे यार' मला फक्त 'मेंढरं' माहीत.त्या वयात न कळणाऱ्या चिजांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून गुरुजनांनी शिष्यांना अर्थ कळतील अशाच चीजा शिकवाव्या. किंवा शिकवत असलेल्या चिजांचा अर्थ तरी सांगावा. असे जरी मी म्हणत असलो तरी शास्त्रीय संगीत हाच इतर सर्व शैलींचा पाया आहे,हे ही तितकेच खरे आहे. मी आर्णी (जि. यवतमाळ) येथे ३१ वर्षे संगीत विद्यालय चालविले,अणि विद्यार्थ्यांना कळतील अशा चिजा शिकविणे किंवा न कळणाऱ्या चिजांचा अर्थ सांगणे हे बंधन पाळले.शास्त्रीय संगीतातील प्राचीन अस्पष्ट आणि निरर्थक साहित्यात बदल सध्या अपेक्षित आहे.आज आपल्या देशात चित्रपट संगीत अत्यंत लोकप्रिय आहे.कारण ते रस आणि भाव या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे.त्यावर कितीही ताशेरे ओढले तरी संगीताच्या प्रसाराचे श्रेय मधल्या काळातील चित्रपट सांगिताला द्यावेच लागते.असो!
●संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.
या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!
Wednesday, November 8, 2023
आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १३)
आर्णीला नोकरी लागायच्या अगोदर व लागल्यावर, सुरेश भटांची प्रत्यक्ष भेट होण्याअगोदर यवतमाळातील गायिका प्रमोदिनी मॅथ्यूंना सोबत घेऊन भावगीत,भक्तीगीतांबरोबरच मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम करायचो.सोबतच नाटकांना संगीत देणे,शाळा-शाळातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गाणी बसवून देणे,अकॉर्डियन वादक म्हणून नाईट प्रमाणे इतरही ऑर्केस्ट्रासोबत काम करणे. असे अनेक सांगीतिक उपदव्याप केलेत पण कुणाच्याही लग्नात कितीही बिदागी देऊ केली तरी मी गायिलो नाही.हां, ऑर्केस्ट्रातील गायक गाणार असले तर त्यांना स्वागतगीत स्वरबद्ध करून द्यायचो,मंगलाष्टकांची तयारी करून द्यायचो. पण मी स्वतः या भानगडीत आयुष्यभर पडलो नाही. असो! आमच्या गीत-गझल मैफलीच्या तबला साथीला शेखर सरोदे असायचा. (शेखर सरोदे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथील सरोदे या प्रसिद्ध घरातील व सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदेचा काका.) शारदोत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, आणि रसिकांनी तिकीट लावून आयोजित केलेले कार्यक्रम विदर्भभर चालत.कधी कधी सूत्र संचालनासाठी कवी शंकर बडे तर कधी सुरेश गांजरे सोबत असायचे.खाजगी घरगुती मैफल असली तर सूत्र संचालन मीच करायचो.त्या काळी रेडिओ सिंगर असणे ही फार मोठी बाब समजल्या जायचे.जाहिरातीच्या पत्रकांवर ( pamphlets) तसे नमूद करायचे.(सोबत वणीच्या साहित्यांकुर शाखेने आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील सभागृहातील पत्रक आणि इतर काही पत्रके ( pamphlets) जोडली आहे.ती अवश्य बघून आनंद घ्यावा.मी पण अधून-मधून घेत असतो,म्हणून म्हटले!)
Monday, November 6, 2023
गझलगंधर्व सुधाकर कदम .
गझलगंधर्व सुधाकर कदम
गझलनवाज सुधाकर कदम
महाराष्ट्राचे मेहदी हसन सुधाकर कदम
अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले मराठीचे आद्य #गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक.
. महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.
सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना #गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या एका समारंभात त्यांना गझलगंधर्व ही पदवी बहाल करण्यात आली पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या संगीत कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून पंडित ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.
सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.
सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो
सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.
सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.
वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.'अशी गावी मराठी गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.
कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.
सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर फड हमखास मिळते.
वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.
गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचरी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.
गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,मदन काजळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना, आदित्य फडके,मयूर महाजन,राहुलदेव कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे ,संकेत नागपूरकर इ.कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.
सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.
इथे एक किस्सा नमूद करतो...
नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले,
सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन
ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन
रहीम उतरले,
देन हार कोई और है भेजत सो दिन रैन
लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन
नामवंतांनी 'देन हार कोई और है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् 'याते निचें नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.
सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.
खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.
गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.
--डॉ.राम पंडित,मुंबई
४,अटलांटा,
प्लॉट क्र.२९, सेक्टर ४०,
नेरुळ (पश्चिम) नवी मुंबई
400 706
मोबा.98197 23576