गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, November 29, 2023

आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १६) 'मिस्सळ'



    'गिल्ली मिस्सळ' म्हटले की प्रत्येक खवैयाच्या तोंडाला पाणी सुटतेच. कारण ही 'डिश' सर्वसाधारण वैदर्भीय खवय्यांची 'मर्मबंधातली ठेव' आहे. महाराष्ट्रभर मिळणाऱ्या या खाऱ्या डिशचे आबालवृध्दांना आकर्षण आहे. याचे कारण मिसळीची चटकदार चव. शेव, गाठी, पापडी, चिवडा (शिळ्या बटाटेवड्याचे व समोस्याचे तुकडे.) व वरून झणझणीत रस्सा आणि थोडे दही... नुसत्या वर्णनानेच तोंडाला पाणी सुटले ना? तर मंडळी, प्रत्येक गावच्या मिसळीची 'किक' थोड्याफार फरकाने सारखीच असते. तरी पण काही काही गावच्या खास खास चवीमुळे त्या त्या गावच्या मिसळी आयुष्यभर लक्षात राहतात. मिसळीमध्येही दोन प्रकार आहेत. एक सुकी मिसळ व दुसरी गिल्ली मिसळ. आपल्याकडे गिल्ली मिसळ लोकप्रिय आहे. कधी कधी रस्सा नाही म्हणून, नाइलाजाने 'फरसाण' या गोंडस नावाने सुकी मिसळही स्वाहा केली जाते. पण खरी मजा मात्र 'गिल्या' मिसळीतच आहे.
     अमरावतीच्या राजकमल चौकातील खड्डा हॉटेलमधील दही मारलेली मिसळ मला लहानपणापासून जीव लावून आहे.  अमरावतीला गेल्यावर ही मिसळ मारल्याशिवाय अमरावती वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नव्हते. आज ते खड्डा हॉटेल आहे की नाही माहीत नाही.जर असेल आणि 'तीच' चव कायम असेल तर त्या मालकाचा व भट्टी मास्तरांचा, समस्त मिसळप्रेमींनी सत्कार करायला काहीच हरकत नाही. 
       झणझणीत मिसळीसाठी एके काळी यवतमाळात जुन्या एस. टी. स्टँडवरील एक सिंधी हॉटेल प्रसिध्द होते. बसस्थानकाची नवी इमारत व्हायची होती. तेथे फक्त टिनाचे एक मोठे शेड होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. या हॉटेलमध्ये रात्रभर ग्राहकांची वर्दळ असायची. यवतमाळातील बहुतांश कलाकार रात्री येथे येत असत. आम्हीही ऑर्केस्ट्राची प्रक्टिस आटोपली की, रात्री एक ते तीनपर्यंत या हॉटेलात दत्तक गेलेले असायचो. इथली मिसळ काही औरच होती. (मालक तिच्यात आपला 'दिल' टाकत होता, असे तेव्हा म्हणायचे.) या खास चवीमुळे रात्री-बेरात्रीसुध्दा 'रसिकांची' खूप वर्दळ राहायची. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मिसळ खाऊ घालणारे ते यवतमाळातील एकमेव हॉटेल होते. आम्ही त्यावेळी शिकत असल्यामुळे पैशाची सदाच कडकी असायची. पण अऑर्केस्ट्राचे कलाकार म्हणून आमच्यावर मालकाची सतत मेहेरनजर असायची. उधारी थकलेली असूनही वेळप्रसंगी तोच आम्हाला आर्थिक मदत करायचा. इथली मिसळ अमरावतीच्या मानाने झणझणीत असायची व पहिल्या घासातच आपला 'ठसका' दाखवायची.
      पुण्या-मुंबईकडेसुध्दा मिसळ प्रकार आहे. पण तिला विदर्भाच्या मिसळीची सर येत नाही. तिकडे पाव-मिसळ किंवा पाव-भाजी प्रकार खूप चालतो. कारण सर्वसाधारणांचे ते 'खास' अन्न आहे. पण श्रीमंतांची चोचलेगिरी करणारी जीभ या खास अन्नाकडेही वळली व सर्वसाधारणांच्या तोंडचा घास पळवून अस्मानाला भाव भिडवून बसली. (भाववाढीचे महकार्य केल्याबद्दल सगळ्या विक्रेत्यांनी या उच्चभ्रू मंडळींचे आभार मानायला हवे. नाही तर कोण विचारत होते या पाव भाजी व मिसळ पावाला!) पण तेही असो. विषय मिसळचा आहे.
     मिसळ हा एक फक्त खाद्यपदार्थ आहे असा आजपर्यंत सार्वत्रिक समज होता. पण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबद्दलकडे पाहिल्यावर राजकारणातही मिसळ असते.आणि तीही 'गील्ली' व 'सणसणीत' असते याचा अनुभव सर्व महाराष्ट्र वासीयांना आला. खायच्या मिसळीतील बहुतांश पदार्थ बेसनाशी नाळ जोडून असलेले दिसतात. पण या मिसळीत मात्र कोणाची, कोणाशी, कोणत्याच प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. एखाद्या विक्षिप्त माणसाने जर भजी, पेढा, शेव, लाडू, पापडी, जिलेबी, गाठी, गुलाबजाम अशा भिन्न चवीच्या विरुध्द गुणधर्माच्या पदार्थांची मिसळ केली तर तिची चव कशी लागेल याचा अंदाज वाचकांनी घ्यावा व या मिसळीकडे बघावे ! त्यात भरीस भर म्हणून शिळेपाके, नासके पदार्थ टाकले तर? असो!
      अशी ही मिसळ तयार तर झाली आहे, पण जनतेला ती कितपत आवडली याचा अंदाज अजूनपर्यंत घेता आलेला नाही. तरी पण तिच्या चेहऱ्यावरून थोडाफार अदमास यायला लागला आहे. खरे तर, ही मिसळ म्हणजे एक चमत्कृती आहे आणि चमत्कार म्हटले की काहीही होऊ शकते. (असे चमत्कार फक्त भारतवर्षातच होऊ शकतात. इतर देशांची काय मजाल आहे!) आणि हे चमत्कार प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही. ही मिसळ अजूनही अनेक चमत्कार दाखविणार आहे. तरी बा अदब ! बा मुलाहिजा । होशियाऽऽऽर!



 

 

Saturday, November 25, 2023

राग-रंग (लेखांक ३३) गौडसारंग

गौडसारंग हा एक अत्यंत गोड असा राग आहे.पण याचे नाव मात्र अत्यंत चुकीचे आहे.कारण ज्याप्रमाणे  मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियाँ की सारंग, बड़हंस सारंग, सामंत सारंग, वृंदावनी सारंग, लंकादहन सारंग इत्यादी रागांमध्ये 'सारंग अंग' दिसते.तसे या रागात कुठेही सारंग अंग दिसत नाही.जसा 'गोरख कल्याण' मध्ये कल्याण, 'बैरागी भैरव' मध्ये भैरव दिसत नाही,अगदी  तसा! खरे तर पूर्वांगात गौड व उत्तरांगात कल्याण दिसत असल्यामुळे या रागाचे नाव 'गौड कल्याण' असायला हवे. या रागाच्या गानसमयावर सुद्धा विविध मते आहेत.नावात सारंग असल्यामुळे हा राग दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावे असे एक सर्वमान्य मत व कल्याण अंग असल्यामुळे रात्रीच्या प्रथम प्रहरी गायिल्या जायला हवा हे दुसरे मत. हा शास्त्रानुसार कल्याण थाटातील मानल्या गेल्यामुळे दुसरे मत अधिक योग्य वाटते.महत्वाचे म्हणजे सारंग रागात  जे दोन स्वर वर्ज आहेत तेच यात वादी संवादी आहेत. म्हणजे गांधार वादी व धैवत संवादी! प रे ही स्वरसंगती या रागाला स्पष्टपणे दाखविते.ग रे म ग, प रे सा इतक्या स्वरांवरून गौड सारंग राग आपले पूर्ण रुप दाखवितो.हा पूर्णतः वक्र स्वरूपाचा राग आहे.दोन्ही मध्यम लागणारे छायानट, केदार, कामोद वगैरे राग यात डोकावण्याची शक्यता असल्यामुळे हा राग गाताना अतिशय सावधपणे गावा लागतो.कदाचित यांच्यापासून बचाव करण्यासाठीच गौड सारंग रागाचे चलन वक्र ठेवले असावे.यात ख्याल,धृपद, तराणा या गानप्रकार गायिल्या जातात.प्राचीन ग्रंथकार कामोद,केदार,आणि हमीर प्रमाणे गौड सारंग रागाला बिलावल थाटजन्य राग मानतात.कारण तेव्हा या रागात तीव्र मध्यम लागत नव्हता. जेव्हा पासून दोन्ही मध्यमांचा प्रयोग व्हायला लागला, तेव्हापासून याला कल्याण थाटातील मानायला लागले.काही संगीत तज्ज्ञ याला 'दिवसाचा बिहाग' असे संबोधतात. एकूण स्वरूप बघता काही प्रमाणात ते योग्यही वाटते.दक्षिणेतील पंडित सुब्बाराव यांच्या 'रागनिधी' या ग्रंथानुसार गौड सारंग सारखा एकही राग दक्षिणेत नाही.परंतू शंकराभरणम् मधील काही राग याच्याशी मिळते-जुळते असल्याचे तामिळचे कृति मुद्दु कुमारय्यन यांचे म्हणणे आहे.

      ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या संगीताला जन सामान्यांपासून दूर ठेवण्यास वेदकाळापासूनच सुरवात झालेली दिसून येते.'सामवेद' याचे जिवंत उदाहरण आहे.सरस्वती नदीच्या काठावरील परिसरात वस्ती करून राहणाऱ्यांना काही ऋचा स्फुरल्या.त्या 'ऋग्वेद' म्हणून ओळखल्या जातात.नंतरच्या काळात 'अथर्ववेद' झाले. नंतर दोन्ही वेदांतील काही ऋचांच्या चालीवरून 'सामवेद' सिद्ध झाला.सामवेदातील ऋचा स्वतंत्र नाही.दोन्ही वेदातील ऋचा म्हणण्याचे तंत्र सामवेदात विकसित झाले.

(सामवेद म्हणजे केवळ गायिलेल्या गानांचा संग्रह नव्हे, तर ज्यावर गायनाची आलापी अभिप्रेत आहे, ज्यात उदात्तादी स्वर आहेत, अशा ऋक्-मंत्रांचा संग्रह होय.सामवेदाला फक्त पदपाठ आहे अन्य विकृतिपाठ नाहीत. अशा सामवेदाचे पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. पूर्वार्चिकालाच छंद-आर्चिक म्हटले जाते. ‘आरण्य’ या नावाने प्रसिद्घ असलेला भागसुद्घा यात अंतर्भूत आहे. पूर्वार्चिकामध्ये मुख्यतः अग्नी, इंद्र, सोम यांच्या स्तुतिपर मंत्रांचा समूह आहे. यावर आधारलेल्या गायनांच्या संग्रहाला ‘गामगेय’ किंवा ‘गेय-गान’ अशी संज्ञा आहे.) ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जन सामान्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.नंतरच्या काळात राजे-रजवाडे,बादशहा,नबाब यांच्या दरबारात शास्त्रीय संगीत बंदिस्त झाले.म्हणूनच बोलपटाची सुरवात होऊन त्यात गाणी यायला लागल्या बरोबर लोकप्रिय व्हायला लागली,ती आजतागायत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (चित्रपट गीतांना शास्त्रीय संगीतातील पंडित/उस्ताद 'हलके संगीत' म्हणून हिणवतात.पण मला तरी यात हलकेपणा दिसत नाही.लता,रफी,आशा,किशोर वगैरे गायकांच्या प्रमाणे गाण्यासाठी व रागावर आधारित धून बनविण्यासाठी शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, असामान्य प्रतिभा आणि क्षमता आवश्यक असते.) स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आकाशवाणीच्या माध्यमातून काही प्रमाणात शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचायला लागले.तरी त्याचा वेग चित्रपट संगीताच्या मानाने एकदमच कमी होता. माझी अनेक विधाने उस्ताद,पंडितांना पचणार नाहीत.पण हे कटू सत्य आहे.असो!

     पंडित डी. व्ही.पलुस्कर, पंडित सी.आर.व्यास, कृष्णराव शंकर पंडित, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व,उस्ताद निसार हुसेन खान, उस्ताद अमानत अली खान, उस्ताद सरफराज हुसेन खान, उस्ताद गुलाम हुसेन खान, आफताब-ए-मौसिकी फैय्याज खान, उस्ताद युनूस हुसेन खान, यशवंतबुवा जोशी, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित रामाश्रय झा, पंडिता किशोरी आमोणकर, पद्मा तळवलकर, उल्हास कशाळकर, यांनी गायिलेला व पंडित रविशंकर (सतार),उस्ताद अली अकबर खान (सरोद), यांनी सादर केलेला गौड सारंग अभ्यासनीय आहे.

     या रागाच्या वक्र प्रवृत्तीमुळे शास्त्रीय संगीत सोडले तर नाट्यगीत,चित्रपट गीत,भावगीत,भक्तीगीत वा गझल या प्रकाराशी फारशी सलगी केलेली दिसत नाही.जी काही थोडी-फार जवळीक साधली ती खालील हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या,त्याही जुन्या संगीतकारांच्या रचना खाली देत आहे.

● चित्रपट गीते...

'देखो जादु भरे मोरे नैन' गीता दत्त. चित्रपट-आसमान, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५२). 

'रितु ऐ रितु जाए' लता,मन्ना डे. चित्रपट-हमदर्द, संगीत-अनिल विश्वास (१९५३). 

'झुला झुलो रे झुलना झुलाऊं' लता. चित्रपट-एकादशी, संगीत-अविनाश व्यास (१९५५). 

'लहरों में झूलूं' आशा भोसले. चित्रपट-समाज, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 

'वो दखें तो उनकी इनायत' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-फंटूश, संगीत-एस.डी. बर्मन  (१९५६). 

'ना दिर दीम' लता. चित्रपट-परदेसी, संगीत/अनिल विश्वास (१९५७). 

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' लता. चित्रपट-हम दोनो, संगीत- जयदेव (१९६१). 

'कुछ और जमाना' मीना कपूर. चित्रपट-छोटी छोटी बातें, संगीत-अनिल विश्वास (१९६५). 

● गैर-फिल्मी...

'भूली बिसरी चंद उम्मीदें चंद फसाने याद आए' -मेहदी हसन. 

'दैरो हरम में बसने वालों' -जगजीत सिंग.अल्बम-फेस टू फेस.

'सावन रुत आए देखो बलम' सुलतान खान,चित्रा. अल्बम-पिया बसंती (२०००). 
-----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी, २६/११/२०२३


 

Wednesday, November 22, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १५) ●मदरटांग●



    मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली. मराठीत असलेले परकीय शब्द, बांगलादेश किंवा पाकी घुसखोरांप्रमाणे वेगळेपण जपून मुळावर घाव घालणारे नसून, मराठीची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे ते मराठीशी इतके एकरूप झाले आहेत की, आज आपण त्यांची हकालपट्टी करतो म्हटले तरी ते शक्य नाही.
     प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.
     मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हासल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !
     कच्च्या इंग्रजीमुळे काय काय घोटाळे होतात ते आपण नेहमीच बघतो. एकदा बाहेरगावचा कायक्रम आटपून शाळेत पोहचलो, तर सगळीकडे सामसूम दिसले. शांततेसोबतच परिसरही स्वच्छ चकचकीत ! मुलांचा आवाज नाही. शिक्षकही वर्गावर! पण सगळे शांतपणे. या वातावरणामुळे काही तरी गंभीर घडल्याची जाणीव होऊन मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. म्हणून हळूच समोरच्या चपराशाला विचारले, तर तो उत्तरला, 'आज इन्फेक्शन झाले ना म्हणून असे आहे !' प्रथम कळले नाही, पण थोड्याच वेळात 'टूप' पेटली, नुकतेच इन्स्पेक्शन झाल्याचे कळले व हसता हसता पुरेवाट झाली.
     आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्‌गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'
     घरातूनच असे प्रसंग घडतात असे नाही. कार्यालयांमधूनसुध्दा हे घडतच असतान एकदा आर्णीच्या विद्युत मंडळाच्या कार्यालयात इंजिनियर मित्र श्री. राम पांडेसोबत गप्या मारत बसलो होतो. काही वेळाने एक वायरमन तेथे आला व पांडेना म्हणाला, 'साहेब, झंपर जळाले!' आम्ही त्याचेकडे आश्चयनि बघायला लागलो. पण पांडेसाहेब चेहऱ्यावरची रेषही न हालवता म्हणाले, 'बदलून टाक.' अंगावरील झंपर जळूनही पांडेचा हा तटस्थपणा पाहून आम्हाला राग यायला लागला व तावातावातच आम्ही म्हणालो. 'काय हे पांडेसाहेब झंपर जळाले म्हणजे झंपरवाली बाई पण जळाली असेल ना? मग झंपर बदलून टाक अले म्हणून बोळवण करण्यापेक्षा त्या बाईला दवाखान्यात न्यायला का सांगत नाही!' यावर पांडेसाहेब व वायरमन दोघेही खो-खो करून हसायला लागले व म्हणाले 'तुम्ही समजता तो हा झंपर नाही. हा 'जंपर' आहे. तारांचा जोड असतो त्या खांबाला कट पॉईट म्हणतात. या कट पाँईटवरून इकडून तिकडे विद्युत-वहन होण्याकरिता जो तार बापरतात, त्याला जंपर म्हणतात.' वायरमन या जंपरचा अपभ्रंश सरळ सरळ झंपर असा करून 'झंपर जळाले,' 'झंपर ओपन झाले' 'झंपर तुटले,' असे सांगत असतात.
     मराठीमध्ये इंग्रजी शब्द वापरल्यामुळे होणारे घोटाळे ठीक आहेत, पण आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.
     सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!
     तर मंडरी, धीस इज मराठी म्हणजे मदरटांग आणि धीस इज आम्ही! जितके राईटचे तेवढे थोडेच! म्हणून आता आपली 'लीव्ह' घेतो.


 

Saturday, November 18, 2023

राग-रंग (लेखांक ३२) राग पुरीया धनाश्री



    सौंदर्याची अनंत रूपे आहेत.त्याच्या अभिव्यक्तीची साधने पण अनेक आहेत.या सौंदर्यापासून मिळणारा आनंदही अपरंपार आहे. त्यामुळे सौंदर्य आणि त्याच्या अनुभूतीने होणाऱ्या आनंदाच्या रुपांवर विचार करणारे शास्त्र पण त्यातील रुपांकडे बघता चिंतन करायला प्रवृत्त करून करत.ज्या प्रमाणे आपली वडीलधारी मंडळी आपल्याला बोट पकडून चालायला शिकवतात व आपण चालायला शिकतो.आणि आपल्या पायावर चालता येऊ लागल्यावर निश्चित होऊन आपले बोट सोडून देते. त्याच प्रकारे ज्याला 'शास्त्र' म्हणतात ते आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते आपल्या चिंतनशक्तीला परिपक्व बनवते आणि स्वतंत्र विचार करण्याला प्रेरित करते.ज्यात हे गुण नाहीत ते अपरिपक्व विचाराचे कितीही घनदाट अरण्य असले तरी ते शास्त्र होऊ शकत नाही. 'शास्ता'चा अर्थ 'गुरू', शिष्या'चा अर्थ 'शिक्षापात्र', आणि 'शास्त्रा'चा अर्थ 'शिक्षण देण्याचे साधन'! जर वास्तविक रुपात एखादा ग्रंथ 'शास्त्र' असेल,तर तो शिक्षण देण्याचे साधन पण असू शकतो.जर काल तो शिष्य असेल तर तोच आज गुरूही असतो.म्हणून खरे शास्त्र गुरुचे पण गुरू असते.फक्त ते 'सच्चे' असायला हवे.

     मनुष्याच्या आयुष्यातीळ संसारिक चिंतांमधून मुक्त करण्यासाठी वा थकलेल्या देहाला अलौकिक सुख प्राप्त करुन देण्यासाठी संगीताची निर्मिती झाली आहे.ज्या संगीतामध्ये तसे अलौकिक सुख देऊन काही काळापुरते का होईना चिंतामुक्त करण्याची शक्ती असेल त्यालाच संगीत म्हणता येईल.अन्यथा तो फक्त गोंगाट आहे.मग ती कोणतीही शैली वा प्रकार असो.

     कोणत्याही सप्तकातील आरोह-अवरोह म्हणजे राग नव्हे.अलंकार किंवा पलटे पण राग नव्हे.विशिष्ठ क्रमवारीने केल्या जाणारा प्रयोग,ज्यात विशिष्ठ स्वरांवर करण्यात येत असलेला ठहराव,हळू हळू होत जाणारी रागाची स्थापना, ज्याच्या आधारावर रागाची 'बढत' केल्या जाते ते या स्थापनेचे चार 'स्थान' किंवा 'मुकाम' म्हणजे राग होय. ही बढतच श्रोत्यांना 'तो' आनंद देऊ शकते,ज्यातून त्याचे दुःख-चिंता दूर होते.असे करण्याची शक्ती म्हणजेच संगीत होय.अशी शक्ती प्रत्येक रागात आहे.फक्त त्या त्या रागांचा योग्य प्रकारे उपयोग करता यायला हवा.आता पुरीया धनाश्री रागाचेच बघा! कोमल रिषभ,धैवत असूनही किती विविध प्रकारची गाणी संगीतकारांनी तयार केली आहे.विरह,दुःख,शृंगार,प्रेम सगळं काही त्याच स्वरातून...

     राग पुरिया धनाश्री पूर्वी थाटातून निर्माण झालेला एक सायंकालीन संधीप्रकाश राग आहे. (पुर्वी थाटातून निर्माण झालेले काही प्रमुख राग :-‘जैतश्री’, ‘परज’, ‘श्री’, ‘गौरी’, ‘वसंत’ वगैरे.) हा राग करुण रस प्रधान व गंभीर मानल्या जातो.याला जवळचा राग पूर्वी आहे. यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो. पुरीया धनाश्रीमध्ये पंचम स्वर अतिशय महत्वपूर्ण आहे. संपूर्ण राग पंचमाभोवती विणल्यासारखा वाटतो.उत्तरांगातील आरोहात याचा प्रयोग थोडा कमी होतो.हा या रागाचा वादी स्वर आहे.

     पंडित भातखंडे कृत क्रमिक पुस्तक मालिकेच्या चौथ्या भागातील (हिंदी प्रथमावृत्ती) पृष्ठ क्रमांक ३४३ वर पुरिया धनाश्री रागाचा वादी स्वर पंचम  व संवादी स्वर रिषभ मानला आहे.नियमाप्रमाणे वादी संवादी स्वरांमध्ये षड्ज पंचम वा षड्ज मध्यम भाव असणे आवश्यक असते.पण पंचम रिषभात असा भाव दिसत नाही.त्यामुळे रिषभाला संवादी स्वर मानणे योग्य वाटत नाही.तसेच पुरीया धनाश्रीतील कोमल रिषभावर कधीच न्यास केल्या जात नाही.त्यामुळे पुरिया धनाश्रीत कोमल रिषभाऐवजी षड्जाला संवादी स्वर मानणे योग्य वाटते.

      पुरिया धनाश्री या नावामुळे हा राग पुरिया व धनाश्री या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला हे स्पष्ट होते. पण प्रचलित धनाश्री काफी थाटातून उत्पन्न झाला आहे.यात गांधार निषाद स्वर कोमल आहेत.त्यामुळे अनेक गायक/वादक पुरिया धनाश्रीला स्वतंत्र राग मानतात.पण तसे नाही,यात पूर्वी थाटजन्य धनाश्री व पुरिया रागांचे मिश्रण आहे.

    (अकबराच्या समकालीन काही ऐतिहासिक तथ्य व दंतकथांवर आधारित चित्रपट बैजू बावरा १९५२ मध्ये प्रदर्शित झाला.ऐतिहासिक कथानक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी,यामुळे चित्रपटाला अमाप यश मिळाले.भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमुळे आजही रसिकप्रिय मंडळी ही गाणी ऐकताना दिसतात.चित्रपटाच्या सुरवातीलाच पुरीया धनश्रीच्या स्वरांनी सजलेले,उस्ताद अमीर खान यांनी गायिलेले गीत सुरू होते.याचे चित्रीकरण अकबराच्या दरबारातील संगीततज्ञ तानसेन याला आपल्या महालात रियाज करताना दाखविले आहे.या रचनेत तानसेनाचे नाव आलेले आहे.)

● पुरीया धनाश्रीवर आधारित चित्रपट गीते...
'तोरी जय जय करतारा' उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.संगीत निर्देशक-नौशाद (१९५२). 
ल'रुक जा बनवासी राम' चित्रपट-संपूर्ण रामायण (१९६१). 
'प्रेम लगाना' आशा भोसले. चित्रपट-सूरत और सीरत. संगीत-रोशन (१९६२). 
'हम कश्मकशे गम से गुजर क्यूँ नहीं जाते' लता.चित्रपट-फ्री लव्ह.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७४). 
'मेरी सांसों को जो महका रही है' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-बदलते रिश्ते.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७८). 
'तुमने क्या किया है हमारे लिए' आशा भोसले. चित्रपट-प्रेम गीत. संगीत-जगजीत सिंग (१९८१). 
'सांझ ढले गगन तले' सुरेश वाडकर. चित्रपट-उत्सव, 
संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८४). 
'कितने दिनों के बाद है आई सजना रात मिलन की' संगीत-आनंद मिलिंद (१९९१). 
'आ के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी' लता,
बालसुब्रह्मण्यम.चित्रपट -वंश.संगीत-आनंद मिलिंद (१९९२). 
'हाय रामा ये क्या हुवा' हरिहरन,स्वर्णलता.
चित्रपट-रंगीला.संगीत-ए.आर.रहमान (१९९५). 
'लबों से चूम लो,आंखों से थाम लो मुझ को' गायिका-श्रीराधा बनर्जी. चित्रपट-आस्था: इन द प्रिज़न ऑफ स्प्रिंग.संगीत-सारंग देव (१९९७). 
'रुत आ गई रे रुत छा गई रे' सुखविंदर सिंग.चित्रपट-१९४७ अर्थ, संगीत-ए.आर.रहमान (१९९९). '
● गैर फिल्मी...
'कोयलिया उड जा यहां नहीं कोया' मुकेश. (कोयलिया तेरे बोल)गैर फिल्म. (१९६९). 
होट सागर है आँख पैमाना' गुलाम अली.
'पहली बरसात लौट आऊंगा' गुलाम अली.
● मराठी
'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' आशा. संगीत-हृदयनाथ मंगेशकर. 
माझे मन तुझे झाले,तुझे मन माझे झाले' प्रियांका बर्वे.   गीत/संगीत-सुधीर मोघे,टीव्ही मालिका 'स्वामी'.
'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' लता.संगीत-श्रीनिवास खळे.अल्बम 'जिव्हाळा'.
'सांग प्रिये सांग प्रिये' गायक-रामदास कामत
'श्रीरामाचे चरण धरावे' सुमन कल्याणपूर
'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा' सुधीर फडके.गीत रामायण.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१९/११/२०२३


 

Wednesday, November 15, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १४)


 .                  ◆काही सांगीतिक आठवणी◆

   ● शिवरंजनी' हे नाव जेव्हा पहिल्यांदा माझ्या कानावर पडले,तेव्हा शिवाचे रंजन करणारी रागिणी ती शिवरंजनी असा अर्थ मी काढला.अर्थात त्यावेळी मी फक्त १६ वर्षांचा होतो.वयाच्या अकराव्या वर्षांपासून सोळाव्या वर्षापर्यंत शालेय शिक्षणासोबतच तबला,हार्मोनियम व गायनाचेही प्रशिक्षण सुरू होते.या सहा वर्षात प्रचंड मेहनत घेतल्यामुळे माझा हार्मोनियमचा हात छान तयार झाला होता.१९६५ मध्ये यवतमाळला 'भाग्योदय कला मंडळाची' स्थापना झाली.या मंडळाचा मी सदस्य होतो.या मंडळानेच ऑर्केस्ट्रा काढायचे ठरवले तेव्हा डोक्यात घोळत असलेल्या शिवरंजनी नावाने पुनः उचल खाल्ली. व ऑर्केस्ट्राचे नाव 'शिवरंजन' असे ठेवल्या गेले.त्या वयात शिवरंजनीच्या स्वरांनी इतकी मोहिनी घातली होती की, कार्यक्रमाची सुरुवात आम्ही 'धसां रेंगं रें सां ध प गरे सारे ग s ग रे ग प ध सां'(यात गांधार कोमल आहे) ही शिवरंजनीची त्रितालातील गत वाजवून करायचो.इतका तो राग डोक्यात बसलेला...तो आजतागायत!

  ● 'कोई सागर दिल को बहलाता नहीं' मी ऑर्केस्ट्रामध्ये असतानाच्या काळातील अफाट लोकप्रियता मिळविलेले 'दिल दिया दर्द लिया' या चित्रपटातील हे गीत.घरगुती मैफलीमध्ये मी हमखास गायचो. समोर तरुण मुली असल्या तर एकदम आर्तपणे गायिल्या जायचे. हे गाणे कलावती रागात असल्याचे प्राथमिक ज्ञान तेव्हा मला मिळाले.यात जनसंमोहिनी राग पण आहे हे मला फार उशिरा कळले.या नंतर मुंबईचा जावई या चित्रपटातील 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' या रामदास कामतांनी गायिलेल्या गाण्याने आम्हा (त्या काळातील) तरुण मंडळींना वेड लावले होते.कित्येक वर्षे ही दोन गाणी घरगुती मैफलीत हमखास गायचोच.पण खऱ्या अर्थाने मला कलावती कळला तो प्रभा अत्रे यांच्या 'तन मन धन तो पे वारू'या चिजेने.

     ● त्याकाळी (ऑर्केस्ट्राचा कालखंड) यवतमाळच्या नेहरू युवक केंद्रातर्फे होणाऱ्या कार्यक्रमात माझा फार मोठा वाटा असायचा. असाच एक कार्यक्रम यवतमाळच्या नगर भवनात आयोजित करण्यात आला होता.गायन,वादनाच्या या कार्यक्रमात मी मेंडोलीनवर एक धून वाजविली.कार्यक्रमाला यवतमाळातील संगीत प्रेमींसह संगीत दर्दी पण होते.त्यात बडे गुलामली खान साहेबांचे शिष्य अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख पंडित मनोहरराव कासलीकरही होते.कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलवले व 'तू आज जी धून वाजविली ती कोणत्या रागात होती?' असा प्रश्न केला.त्यावेळी मी जरी तबला,हार्मोनियम,

अकॉर्डिअन वाजवीत होती तरी संगीत शिकत होतो.म्हणजे विद्यार्थी दशाच होती.मी केव्हा तरी रेडिओवर ऐकलेल्या गतीची पहिली ओळ डोक्यात होती,ती वाजवून पुढे त्या सुरावटीला अनुसरून स्वरांचे गुच्छ तयार करून पाच मिनिटात वादन संपविले असल्यामुळे राग वगैरे माहीत नव्हता. त्यामुळे 'मला माहित नाही' असे उत्तर देऊन खाली मान घालून गप्प बसलो.तेव्हा त्यांनी मला रागाचे नाव सांगितले 'झिंझोटी'! आणि डोक्यावर हात ठेवून ,'छान वाजवतोस.थोडा जास्ती आणि डोळस रियाज कर' असे सांगून निघून गेले.त्यांच्या या वाक्यावरून मी पुढे दोन वर्षे 'डोळस' रियाज करून नागपूर आकाशवणीचा मान्यताप्राप्त मेंडोलीन वादक झालो.तेव्हापासून झिंझोटी राग कायमचा डोक्यात बसला तो आजतागायत.

     ● हंसध्वनीशी माझी पहिली भेट नवरंग चित्रपटातील  'रंग दे दे' या गीताने झाली.त्यावेळी मी १० वर्षांचा होतो.या गाण्याने मला वेड लावले होते.रस्त्याने चालताना रेडिओवर लागले तर पूर्ण गाणे ऐकल्याशिवाय पुढे पाय निघत नव्हता.या गाण्यापायी मी घरच्यांच्या व शिक्षकांच्या अनेकदा शिव्या खाल्ल्या आहेत.त्यावेळी हा हंसध्वनी राग आहे हे माहीत पण नव्हते.संगीताचे शिक्षण विशारद पर्यंत येऊन पोहोचल्यानंतर जसे कान फुटले तसे नवनवीन रागांची झाडाझडती सुरू झाली.तेव्हा कळले की हा हंसध्वनी आहे...त्यानंतर वेड लावले ते पंडित जसराजजींच्या 'पवन पूत हनुमान' या हंसध्वनीच्या बंदीशीने.अचानक रेडिओवर ऐकली नि 'सुध-बुध खोना' काय असते ते अनुभवले. या चीजेसाठी मी पैसे जमवून ग्रामोफोन घेतला.एल.पी.रेकॉर्ड आणली आणि पारायण सुरू केले.माझ्या अनेक कार्यक्रमातून ही बंदिश मी गायिलो आहे. माहुरचे राजे मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख जसराजजींचे चाहते होते.तसेच माझ्यावरही खूप प्रेम करायचे.त्यांच्या वाड्यात झालेल्या बहुतेक मैफलीत ते मला ही चीज गायला लावायचे. यवतमाळच्या नेहरू युवक केंद्राच्या संगीत विभागासाठी १९७६ मध्ये एक वाद्यवृंद रचना केली होती.या वाद्यवृंदामध्ये सतार, सारंगी,बासरी,व्हायोलिन, हार्मोनियम आणि तबला ही वाद्ये होती. आणि आर्णी (जि. यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर अनेक सांगीतिक उपक्रम राबविले.त्यात 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना' आणि त्यातील विद्यार्थ्यांचा 'वाद्यवृंद', ह्या दोन्हीसाठी केलेल्या  दोन  वेगवेगळ्या धून (compositions) हंसध्वनी रागावर आधारित होत्या.यात/व्हायोलिन,बासरी, हार्मोनियम, मेंडोलीन,स्वरमंडळ, जलतरंग आणि तबला अशी वाद्ये होती.(सरोद मी स्वतः वाजवायचो.) यात इयत्ता पाच ते सातचे शालेय विद्यार्थी असल्यामुळे या उपक्रमाचे खूप कौतुक झाले होते.

     ● राग बिहाग

(सर्वप्रथम जेव्हा बिहाग नाव ऐकले तेव्हा जोरात हसू आले.छोट्याशा खेड्यातून आलेलो मी...खेड्यातला कुचिनपणा अंगात भिनलेला.त्यामुळे मनातल्या मनात  बिहाग शब्दाची फोड (संधी विग्रह) वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे हसू आवरले नव्हते.या हसण्यामुळे मार बसला नाही.पण भरपूर शिव्या खाव्या लागल्या,त्या गुपचूप खाऊन घेतल्या.चिजांच्या बाबतीतही त्यातील न कळणारे शब्द ऐकून वेगवेगळे अर्थ काढल्यामुळे अनेकदा इतर विद्यार्थ्यांसमोर (विशेषतः विद्यार्थिनींसमोर) अनेकदा अपमानित व्हावे लागायचे.शब्दच तसे असायचे...देस मधील 'रब गुना गाय रे तू मना' यातील 'रब'चा अर्थ न लागल्यामुळे व पुढील 'गाय' चा अर्थ 'दूध देणारी गाय असा अर्थ काढून,पुढील 'काहे भटकत फिरे निसदिन' यातील फक्त गाय व भटकणे हे कळल्यामुळे जो अर्थ काढायचा तो काढून मोकळा व्हायचो.शिकविणारे गुरुजी अर्थ सांगण्याच्या भानगडीत न पडता फक्त शिकविण्याचे काम करायचे.बिहाग मधीलच 'जब ते बिछुरे लालन' ह्या चिजेचा अर्थ १० ते १५ वयोमान असलेले विद्यार्थी सांगू शकतील काय? तिलक कामोद मधील 'चंचल चित चोर चतुर अटक मोसे गुईया' या द्रुपदाचा अर्थ काढताना हसू येणार नाही तर काय?भैरव मधील 'धन धन मुरत कृष्ण मुरारी' मधील धन म्हणजे संपत्ती हा अर्थ काढून 'कृष्ण खूप श्रीमंत असल्यामुळे धन मुरवत होता'असे काही बाही डोक्यात यायचे.खरे म्हणजे शिकविणाऱ्यांनी चिजेच्या अर्थासह शिकवायला हवे.पण तसे फारसे घडत नसावे.निव्वळ पोपटपंची असायची. अर्थात त्यातून राग स्वरूप कळायचे हे मात्र तितकेच खरे.चिजा मात्रा डोक्यावरून जायच्या. 'बालमुवा माईरी' बहार,'मोर मोर मुसकात जात' मालकौंस, 'छों छननन छों छननन बिछुवा बाजे' (माझ्या डोक्यातील प्रश्न 'बिच्छू वाजणार कसा?') जौनपुरी. 'लाल मोरीचू s s नरभी s जे s गी' कामोद मधील धमार.एक चीज तर महाराष्ट्रातील आणि त्यातही माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थासाठी अजूनच अनाकलनीय... 'तेंडेरे कारन मेंडेरे यार' मला फक्त 'मेंढरं' माहीत.त्या वयात न कळणाऱ्या चिजांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून गुरुजनांनी शिष्यांना अर्थ कळतील अशाच चीजा शिकवाव्या. किंवा शिकवत असलेल्या चिजांचा अर्थ तरी सांगावा. असे जरी मी म्हणत असलो तरी शास्त्रीय संगीत हाच इतर सर्व शैलींचा पाया आहे,हे ही तितकेच खरे आहे. मी आर्णी (जि. यवतमाळ) येथे ३१ वर्षे संगीत विद्यालय चालविले,अणि विद्यार्थ्यांना कळतील अशा चिजा शिकविणे किंवा न कळणाऱ्या चिजांचा अर्थ सांगणे हे बंधन पाळले.शास्त्रीय संगीतातील प्राचीन अस्पष्ट आणि निरर्थक साहित्यात बदल सध्या अपेक्षित आहे.आज आपल्या देशात चित्रपट संगीत अत्यंत लोकप्रिय आहे.कारण ते रस आणि भाव या दृष्टीने अधिक परिणामकारक आहे.त्यावर कितीही ताशेरे ओढले तरी संगीताच्या प्रसाराचे श्रेय मधल्या काळातील चित्रपट सांगिताला द्यावेच लागते.असो!


     ●संगीताशी जोडलेलले स्वर,लय,भाव ह्या सर्व बाबी नैसर्गिक आहेत.निसर्गाशी जोडलेल्या आहेत.आपल्या हृदयाचे ठोके किती नियमित लयीत असतात ना! त्यात थोडा जरी फरक झाला तर काहीतरी बिघडल्याचे लक्षात येते.तसेच संगीताचे आहे.स्वर,ताल,लय बिघडली की गाणं बिघडतं.

     या बिघडण्यावरून कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला.संगीत कक्षात जवळ जवळ वीसेक मुला, मुलींना एकत्र शिकविल्या जायचे.आमच्या संगीताच्या प्राध्यापकांनी देस राग शिकवायला घेतला तेव्हाची ही गोष्ट आहे. देसचा छोटा ख्याल 'रब गुना गाय रे तू मना' चार-पाच तासिकांमध्ये संपला. त्यानंतर एक तराणा शिकवायला सुरवात केली.त्याचा अंतरा होता 'नादिर दानी तुंदीर दानी दानी तदारे दानी'. माझ्यासारखे बाल वयापासून संगीत शिकणारे काही, हा अंतरा व्यवस्थित म्हणायचे.कारण त्यांचा तो अगोदरच झालेला होता.पण दहावी नंतर कॉलेजमध्ये (त्यावेळी दहावी नंतर कॉलेजमध्ये प्रवेश मिळायचा.यातील प्रथम वर्षाला 'प्री युनिव्हर्सिटी' म्हणायचे) प्रथमच संगीत विषय घेणारे विद्यार्थी वरील तराणा म्हणताना 'तुंदिर'चे 'उंदीर' करून गायचे. ते असे :- नादिर दानी उंदीर दानी दानी तदारे दानी'. आणि मग वर्गात हलकीसी खसखस पिकायची.खसखस का पिकते हे शेवटपर्यंत प्राध्यापकांना कळले नाही.कारण हे सगळे 'उंदीर' शेवटच्या दोन रांगात बसायचे.असो!

Wednesday, November 8, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १३)

 आर्णीला नोकरी लागायच्या अगोदर व लागल्यावर, सुरेश भटांची प्रत्यक्ष भेट होण्याअगोदर यवतमाळातील गायिका प्रमोदिनी मॅथ्यूंना सोबत घेऊन भावगीत,भक्तीगीतांबरोबरच मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम करायचो.सोबतच नाटकांना संगीत देणे,शाळा-शाळातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गाणी बसवून देणे,अकॉर्डियन वादक म्हणून नाईट प्रमाणे इतरही ऑर्केस्ट्रासोबत काम करणे. असे अनेक सांगीतिक उपदव्याप केलेत पण कुणाच्याही लग्नात कितीही बिदागी देऊ केली तरी मी गायिलो नाही.हां, ऑर्केस्ट्रातील गायक गाणार असले तर त्यांना स्वागतगीत स्वरबद्ध करून द्यायचो,मंगलाष्टकांची तयारी करून द्यायचो. पण मी स्वतः या भानगडीत आयुष्यभर पडलो नाही. असो! आमच्या गीत-गझल मैफलीच्या तबला साथीला शेखर सरोदे असायचा. (शेखर सरोदे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा येथील सरोदे या प्रसिद्ध घरातील व सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदेचा काका.) शारदोत्सव, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, आणि रसिकांनी तिकीट लावून आयोजित केलेले कार्यक्रम विदर्भभर चालत.कधी कधी सूत्र संचालनासाठी कवी शंकर बडे तर कधी सुरेश गांजरे सोबत असायचे.खाजगी घरगुती मैफल असली तर सूत्र संचालन मीच करायचो.त्या काळी रेडिओ सिंगर असणे ही फार मोठी बाब समजल्या जायचे.जाहिरातीच्या पत्रकांवर ( pamphlets) तसे नमूद करायचे.(सोबत वणीच्या साहित्यांकुर शाखेने आयोजित केलेल्या  लोकमान्य टिळक महाविद्यालयातील सभागृहातील पत्रक आणि इतर काही पत्रके ( pamphlets) जोडली आहे.ती अवश्य बघून आनंद घ्यावा.मी पण अधून-मधून घेत असतो,म्हणून म्हटले!)









Monday, November 6, 2023

गझलगंधर्व सुधाकर कदम .


गझलगंधर्व सुधाकर कदम

गझलनवाज सुधाकर कदम

महाराष्ट्राचे मेहदी हसन सुधाकर कदम

अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले मराठीचे आद्य #गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक.

.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना #गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या एका समारंभात त्यांना गझलगंधर्व ही पदवी बहाल करण्यात आली पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या संगीत कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून पंडित ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.'अशी गावी मराठी गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर फड हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचरी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,मदन काजळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना, आदित्य फडके,मयूर महाजन,राहुलदेव कदम,गायत्री गायकवाड गुल्हाने,प्राजक्ता सावरकर शिंदे ,संकेत नागपूरकर इ.कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

           इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

          सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

          लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी 'देन हार कोई और है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् 'याते निचें नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.

--डॉ.राम पंडित,मुंबई 

४,अटलांटा, 

प्लॉट क्र.२९, सेक्टर ४०,

नेरुळ (पश्चिम) नवी मुंबई

400 706

मोबा.98197 23576

Friday, November 3, 2023

#आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १२)

.                       
                     -तबलापटू शेखर सरोदे आणि मी-

...तेव्हा मी एक तास सरोद वादन व एक तास मीच स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचा कार्यक्रम करायचो. तबल्याच्या साथीला यवतमाळचाच, हैदराबादचे उस्ताद दाऊदखान साहेबांचा गंडाबंद शागिर्द आणि सध्याचा पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे याचा काका शेखर सरोदे हा असायचा.ऑर्केस्ट्रा बंद झाल्यावर आर्णीला नोकरी करत असतानाचा १९७६ ते १९८३ असा हा जवळ-जवळ आठ वर्षांचा कालखंड  होता.विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील #अशी_गावी_मराठी_गझल ह्या सुरेश भटांनी शीर्षक दिलेल्या व स्वतः सूत्र संचालन केलेल्या अनेक कार्यक्रमात त्याच्या तबला संगतीने रंगत यायची.शेखर पुण्यात स्थायिक झाल्यावर उत्कृष्ट तबला वादक म्हणून ओळख व्हायला लागली असताना एका कार्यक्रमातून परत येताना कार अपघातात त्याचे निधन झाले.देखणा, रुबाबदार व्यक्तिमत्व असलेला व  मैत्रीला जपणारा अतिशय मनमिळावू,आमच्या कुटूंबातील एक भाग बनलेला जिवलग आम्हाला सोडून गेल्याने मित्र मंडळीला व यवतमाळकरांना फार मोठा धक्का बसला होता.त्याच्या अनेक आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत.आपल्या आयुष्यात अनेक मित्र मिळतात.पण असे जिवाला चटका लावून जाणारे दोन-चारच असतात....

●छायाचित्रांमध्ये शेखर आणि मी....









 





संगीत आणि साहित्य :