गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, February 28, 2023

राग-रंग...१, राग भूप


          जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील #संगीत, #काव्य,#चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे  क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.
          कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे #सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक #अनुभूती ३) त्यात स्वतः #हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. #शब्द, #छंद, #अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे #स्वर, #ताल, #लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच.    
          एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की, हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर केलेल्या वक्तव्यात आहे.
          आजचा आपला विषय आहे. राग #भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा  रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पूर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वगैरे वगैरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली”तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...
          भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. मी सुद्धा पाठयपुस्तकातील कवितांच्या झुला या कॅसेटमध्ये 'धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान' याच रागात स्वरबद्ध केली आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.'दिल हूम हूम करे' हे लताबाईंनी गायिलेले रुदालीमधील अप्रतिम गाणे भूप रागातच आहे.असो! 
      १९८५ मध्ये कवी उ.रा.गिरी यांची तेव्हाच्या पाठ्यपुस्तकातील खालील कविता मी स्वरबद्ध करून #झुला नामक कॅसेटमध्ये समाविष्ठ केली होती.बाल गायिका होती गीता पंत.आणि याचे ध्वनिमुद्रण आर्णीतीलच शिक्षकांचा वाद्यवृंद घेऊन घरीच आहुजा कंपनीच्या डेकवर केले होते.ऐका... आवडल्यास प्रतिक्रिया अवश्य द्या.

आली लाजत आज सकाळ
मेंदीभरल्या चरणी बांधुन
सोनफुलांचे चाळ...


 

 

Saturday, February 11, 2023

दै. देशोन्नती,रविवार पुरवणी.दि.१२/०२/२०२३


          -उर्दू_गझल_गायकीचा_भारतीय_बादशहा-

         हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.
त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.
तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.
त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
४.
अत्यंत महत्वाचे म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच माझे मित्र सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात करण्याचे श्रेय बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.पण इथे अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच....

            फरीदा खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजीत सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजीत-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजीत सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजीत सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.
        मी जगजीत सिंग यांच्या गझलगायकीचा चाहता आहे.त्यांचे बहुतेक अल्बम मी विकत घेऊन ऐकले आहेत.त्यातील 'कम अलाइव्ह' व 'अनफर्गेटेबल' हे दोन अलबम म्हणजे मला मलई (क्रीम) वाटतात.यातील बहुतेक गझला मी अजूनही गुणगुणतो.याचा अर्थ असा नाही की,इतर अल्बम चांगले नव्हते.प्रत्येक अलबममध्ये  काही ना काही वेगळा प्रयोग त्यांनी केलेला असायचा. मग तो ऑर्केस्ट्रेशनचा असो की कोरसचा असो की ध्वनिमुद्रणाचा असो. कायम प्रयोगशीलता हा जगजीत सिंग यांचा फार मोठा गुण होता.त्यांच्या यशाचे हे सुद्धा एक कारण आहे.
     जगजीतजी उत्कृष्ट गायक होते तितकेच मोठे संगीतकार पण होते.त्यांनी स्वरबद्ध करून गायिलेल्या काही गझलांचा उल्लेख करून त्यातील सुरवटीची खासियत मांडण्याचा मोह मला आद्य मराठी गझल गायक व संगीतकार म्हणून आवरता आला नाही.

१.
'कम अलाईव्ह' मधील
'कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आज़माया सवेरे सवेरे...
       या गझलची बंदिश  ललित रागात आहे.आणि तो त्यांनी शुद्ध स्वरूपात वापरला.परंतू सुरवातीचा आलाप घेताना मुर्च्छनाद्वारे भुपालीचा भास निर्माण करून माध्यमावर येण्याची त्यांची प्रक्रिया भल्या भल्यांना बुचकळ्यात पाडणारी होती.तसेच या गझल करीता केलेली तालाची रचना सुद्धा तशीच अनवट होती.१० मात्राच्या झपतालात काही रचना सुगम संगीतात वा चित्रपटात दिसतात.पण जगजीतजींनी या गझल करीता फक्त पाच मात्रांचा उपयोग करून रंगत आणली.माझ्या पाहण्यातील हा पहिला व शेवटचा प्रयोग आहे.याच अल्बम मधील 'मेरी तनहाईयों मुझको लगा लो सीने से'....ही पण रचना हटके आहे.भैरवीमध्ये अशी बंदिश जगजीतजीच करू जाणे!
२.
'अ माईलस्टोन' मधील 'मिलकर जुदा हुए तो' ही गझल तोडी रागात बांधलेली आहे.यातील मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंद्र सप्तकातील शुद्ध निषादावर स्थिरावते.आणि येथून खरी गम्मत सुरू होते ती अशी की,निषादावर मूर्च्छना करून दुसऱ्या ओळीत भूप रागाची छाया दाखवत पुन्हा कोमल धैवतापासून  पहिली ओळ सुरू होते.अशी गम्मत प्रबुद्ध संगीतकरच करू शकतो.

३.
गझलच्या शब्दानुरूप रागाची निवड करून 'मेलोडीअस' सुरावट तयार करून गाणे हे पण जगजीतजींचे वैशिष्ठय होते.हे 'गरज बरस प्यासी धरतीपर' ह्या 'इन साईट' मधल्या गझलेवरून दिसून येते.

४.
'उम्र जलवो में बसर हो' ही गझल live कार्यक्रमात गाताना 'शेख करता तो है मस्जिद मे खुदा को सजदे' ही ओळ गाताना 'अजान'ची अरबी सुरावट 'मनमोही' होऊन जाते.
      खरे म्हणजे जगजीतजींच्या 'कंपोझिशन'वर एक मोठा लेख होऊ शकतो. म्हणून विस्तारभयास्तव इथेच थांबतो.
      जगजीतजींच्या आयुष्यातील अनेक घटना सर्वसामान्य रसिकांना माहीत नाहीत.त्यांचे बालपण,वैवाहिक जीवन,चित्राजींचा न गाण्याचा निर्णय,उत्तरार्धातील भक्तिमार्ग या सगळ्याची मांडणी करताना सगळे प्रसंग वैभवकुमार शिंदे यांनी त्यांच्या 'गझलजीत' या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत.ते वाचताना आपल्याला गलबलून न आले तर नवलच!जगजीतजींच्या उत्तरार्धातील live कार्यक्रमातील गझलगायनातून ही व्यथा स्पष्टपणे दिसून येते.तसेच नंतरच्या भक्तीगीतातूनही व्यथा व समर्पण ठायी ठायी जाणवते.'हे राम' व 'जय राधा माधव' पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात केव्हा पाणी आले ते कळलेच नाही.
     'दर्द से मेरा दामन भर दे' असे म्हणणाऱ्या या थोर गायकाला शेवटी शेवटी अनेक 'दर्द'ला सामोरे जावे लागले हे अतिशय दुःखद आहे.

गझलगंधर्व
सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर,
वारजे माळवाडी,
पुणे. ५८
8888858850

 

Tuesday, February 7, 2023

जगजितसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त...


           -#उर्दू_गझल_गायकीचा_भारतीय_बादशहा-

         हिंदुस्थानी संगीतातील सगळ्यात लोकप्रिय सुगम संगीत प्रकार म्हणून गझलची गणना करायला हवी.हा एकमेव असा प्रकार आहे की,यात काव्य व संगीत याचा समसमान आनंद घेता येतो.तसे ठुमरी,दादरा, चैती, कजरी वगैरे प्रकारात होत नाही.भारतात शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये शब्दांना तसे फारसे  महत्व दिल्या जात नाही.स्वरांना आधार देण्यापुरतेच त्याचे महत्व असते.अर्थात शास्त्रीय संगीताचे गायक हे मान्य करणार नाही,पण हे कटू सत्य आहे.मी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतानाच्या चिजा आठवल्या की अजूनही हसायला येतं. उदा:- "तेंडेरे कारण मेंडेरे यार"....किंवा कॉलेजमध्ये शिकविलेल्या देस रागातील तरण्याचा अंतरा "नादिर दानी तूंदिर दानी दानी त दारे दानी"...ही ओळ गाताना अनेक विद्यार्थी (कारण तो सामूहिक वर्ग असायचा) "नादिर दानी तुंदिर दानी च्या ऐवजी "उंदिर दानी" असे गायचे...अशा अनेक चिजा आम्ही शिकलो.पण अर्थ कळला नाही.... कळले ते फक्त रागांचे स्वर-रूप.

            साहित्यातील एक उत्तम प्रकार म्हणून गझलचा छान उपयोग झाला.पण संगीत प्रकार म्हणून जसा व्हावा तसा विचार शास्त्रीय संगीतामध्ये झाला नाही.ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीताची उत्पत्ती झाली त्या लोकगीतांनाच शास्त्रकारांनी दूर ठेवून दुय्यम स्थान दिले,ते गझलला कसे काय मोठे स्थान देतील?आपल्या देशात संगीताचे फार मोठे भांडार प्रादेशिक संगीतामध्ये उपलब्ध होते/आहे.यातूनच विविध गान प्रकार तयार झालेत.पण शास्त्रीय संगीताचे पक्के शास्त्र बनवताना  या सर्व प्रकारांना सुगम मानून शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर ठेवल्या गेले.त्यामुळे संगीताची एक प्रकारे हानीच झाली.

            खरे तर गझल गायकाला चार अवधाने सांभाळावी लागतात.अभ्यास करावा लागतो.
१.
त्याला शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान असणे आवश्यक असते.
२.
तो उत्कृष्ट गायक असायला हवा.
३.
त्याला साहित्याची पण चांगली जाण असायला हवी.(म्हणजे अभ्यास आलाच.)
४.
अत्यंत महत्वाचे म्हणजे तो उत्कृष्ट संगीतकारही असायला हवा.

असे असूनही गझल गायन प्रकाराला 'सुगम' म्हणणे हास्यास्पद आहे.

पं. रामकृष्णबुवा वझे सारखे थोर शास्त्रीय गायक गझल गायकीबद्दल काय म्हणतात ते बघा...

      "गझल गायकीला आपलं असं स्वतःचं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असते आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असली तर गझल गायनातून ख्याल गायनाइतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रित्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते".

        तसेच माझे मित्र सुप्रसिद्ध तबला वादक तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर म्हणतात,"गझल गायनामध्ये काव्याच्या बरोबरीने सांगीतिक रचनाही तितकीच दर्जेदार असली तर ती रचना अतिशय सहजतेने श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचते.भिडते..."असो....

          उर्दू गझल गायकीचा शोध घेताना आपल्याला ध्वनीमुद्रणाचा शोध लागल्यानंतर निघालेल्या  ध्वनीमुद्रिकांचा अभ्यास करावा लागेल.या इतिहासाचा धांडोळा घेताना भारतीय शास्त्रीय संगीतात  उर्दू गझल गायकीचा विकास ठुमरी सोबत झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या  गायक/गायिकांचे गझल गायन हे गायन न वाटता पठण वाटत होते असा उल्लेख अशोक दा रानडे यांच्या एका लेखात वाचल्याचे आठवते...यातुन गायकी अंगाने पुढे जाणाऱ्यांमध्ये गोहरजान,शमशाद, सुंदराबाई आणि त्यावेळच्या इतर गायिका दिसतात.पण खऱ्या अर्थाने गझल गायनाची सर्व यांत्रिक पद्धतीतून मुक्तता होऊन गझल गझलसारखी गाण्याची सुरवात करण्याचे श्रेय बेगम अख्तर व बरकतअली खान साहेब यांना जाते.
      उर्दू गझल गायकी तीन प्रकारांनी आपल्या समोर येते...

१. ठुमरी प्रमाणे - बेगम अख्तर

२. गीतांप्रमाणे - सैगल,मल्लिका पुखराज

३. टप्पा अंगाने - बरकत अली खान

       गझल गायकी लोकप्रिय करण्यात या गायक/गायिकांच्या ध्वनिमुद्रीकांसोबतच चित्रपटांचाही मोठा वाटा आहे.

          गझल गायकी ही शब्द व संगीत श्रोत्यांपर्यंत पोहचविण्याची अतिशय सुंदर प्रक्रिया आहे.विसाव्या शतकात भावपूर्ण सादरीकरणासोबतच दरबारी,यमन,मल्हार वगैरे  भारदस्त म्हणविल्या जाणाऱ्या रागांमध्ये बंदिशी बनवायला लागले.तसेच काव्य निवडही उत्तम व्हायला लागली.आपापल्या कुवतीप्रमाणे अविर्भाव-तिरोभाव, मूर्च्छना पद्धतीचा वापर करायला लागले.सगळ्याच गझल गायक/गायिकांचा उल्लेख या लेखात करणे अशक्य आहे.कारण प्रत्येक गायक/गायिकेचा आपला एक ढंग आहे.त्यावर लिहायचे तर प्रत्येकावर एक लेख होऊ शकतो.पण इथे अत्यंत लोकप्रिय अशा काही गझल गायकांच्या गायकीची मला दिसलेली वैशिष्ठ्ये थोडक्यात उद्धृत करण्याचा प्रयत्न करतो.

         सर्वप्रथम भारत पाकिस्तानातील जुन्या-नव्या उर्दू गझल गायक/गायिकांची नावे माहिती करून घेऊ.

●मल्लिका पुखराज,उ.अमानत अली खान,अहमद रश्दी,नूरजहां,एम.बी.जॉन,मेहदी हसन,फरीदा खानम,अहमद परवेज,इकबाल बानो,मुन्नी बेगम,हमीद अली खान,हुसैन बख्श,परवेज मेहदी,गुलाम अली,नुसरत फतेह अली, मेहनाज बेगम,नैय्यरा नूर,आबिदा परवीन, असद अमानत अली खान,शफाकत अमानत अली खान,आसिफ मेहदी,सज्जाद अली....पाकिस्तान.

●बेगम अख्तर,तलत महमूद,सैगल,मधुरानी,पंकज उधास, अनुप जलोटा, चंदन दास,जगजित/चित्रा सिंग,भुपेंद्र/मिताली सिंग,राजेंद्र/नीना मेहता, पिनाज मसानी,तलत अजीज,हरिहरन,रुपकुमार राठोड,अहमद,महंमद हुसेन,जसविंदर सिंग...भारत.

(अनवधानाने काही नावे सुटली असल्यास क्षमस्व!)

उर्दू गझल गायकीतील सर्वच गायक/गायिकांचे त्यांच्या त्यांच्या परीने मोलाचे योगदान आहे.सगळ्यांवर लिहिणे या एका लेखात शक्य होणार नाही.त्यातल्या त्यात मला भावलेल्या काही जणांच्या गायकीवर थोडे फार भाष्य करण्याचा प्रयत्न करतो.

           माझ्या मते उर्दू गझल गायकीत रागदारीचा उत्कृष्ट उपयोग बेगम अख्तर यांनी केला आहे.त्यांची गझल गायकी ठुमरी,दादरा अंगाने जात होती.पण जव्हारदार मधाळ, मधूनच पत्ती लागणाऱ्या आवाजाने तेव्हाच्या रसिकांना वेड लावले होते.आजही त्यांनी गायिलेल्या गझला लोकप्रिय असून गायिल्या जातात.

             मेहदी हसन यांची गायकी म्हणजे शब्दांना न्याय देत कसे गावे याची पाठशाळाच.... 
            फरीदा
खानम...शांत,संयत पण ठसठशीत गायकी असलेली गायिका.त्यांच्या "दिल जलाने की बात करते हो","ना रवा ... ","गुलों की बात करो","वो मुझ से हुए" वगैरे गझला ऐकल्यानंतर गायकीची प्रचिती येते.

               गुलाम अली म्हणजे अनवट बंदीशीचा बादशहा.गुलाम अली इतका सरगमचा वापर दुसऱ्या कुणीही केला नाही.शब्दानुरूप वेगवेगळ्या सुरावटींचा वापर आणि कार्यक्रमाचे वेळीची  देहबोली रसिकांकडून दाद घेणारी..."कहाँ आके रुकने थे रास्ते" या गझलमधील "जहां मोड था" येथील 'मोड',"दिल में इक लहर सी उठी हैं अभी" मधील 'हमींग' व 'लहर' या शदावरील वेगवेगळ्या सुरावटी त्यांच्या गझल गायकीचे वेगळेपण सिद्ध करते.त्यांच्या "चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है" या गझलने जगभरातील रसिकांना वेड लावलेले सगळ्यांनीच पाहिले.

              जगजीत सिंग म्हणजे उर्दू गझल गायकीला पडलेले सुरेल स्वप्न आहे.मेहदी हसन प्रमाणेच खर्जयुक्त जव्हारदार  मधाळ आवाज,वाद्यवृंदाचा योग्य वापर,गझलांची निवड यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांनी जगजीत-चित्रा जोडीला डोक्यावर घेतले.जगजीत सिंग हे उत्कृष्ट 'कंपोजर' असल्यामुळे इतर गायक/गायिकांच्या जोडयांपेक्षा ही जोडी जास्ती लोकप्रिय ठरली.गायक जर उत्कृष्ट संगीतकार असेल तर गाणे नक्कीच उठावदार होते,हे अनेक संगीतकार गायकांच्या गायनावरून लक्षात येते.ह्या साऱ्या वैशिष्ठयांमुळे आपल्या देशात जगजीत सिंग इतकी लोकप्रियता  बेगम अख्तर नंतर कुणालाच मिळाली नाही.
        मी जगजीत सिंग यांच्या गझलगायकीचा चाहता आहे.त्यांचे बहुतेक अल्बम मी विकत घेऊन ऐकले आहेत.त्यातील 'कम अलाइव्ह' व 'अनफर्गेटेबल' हे दोन अलबम म्हणजे मला मलई (क्रीम) वाटतात.यातील बहुतेक गझला मी अजूनही गुणगुणतो.याचा अर्थ असा नाही की,इतर अल्बम चांगले नव्हते.प्रत्येक अलबममध्ये  काही ना काही वेगळा प्रयोग त्यांनी केलेला असायचा. मग तो ऑर्केस्ट्रेशनचा असो की कोरसचा असो की ध्वनिमुद्रणाचा असो. कायम प्रयोगशीलता हा जगजीत सिंग यांचा फार मोठा गुण होता.त्यांच्या यशाचे हे सुद्धा एक कारण आहे.
     जगजीतजी उत्कृष्ट गायक होते तितकेच मोठे संगीतकार पण होते.त्यांनी स्वरबद्ध करून गायिलेल्या काही गझलांचा उल्लेख करून त्यातील सुरवटीची खासियत मांडण्याचा मोह मला आद्य मराठी गझल गायक व संगीतकार म्हणून आवरता आला नाही.

१.
'कम अलाईव्ह' मधील
'कोई पास आया सवेरे सवेरे
मुझे आज़माया सवेरे सवेरे...
       या गझलची बंदिश  ललित रागात आहे.आणि तो त्यांनी शुद्ध स्वरूपात वापरला.परंतू सुरवातीचा आलाप घेताना मुर्च्छनाद्वारे भुपालीचा भास निर्माण करून माध्यमावर येण्याची त्यांची प्रक्रिया भल्या भल्यांना बुचकळ्यात पाडणारी होती.तसेच या गझल करीता केलेली तालाची रचना सुद्धा तशीच अनवट होती.१० मात्राच्या झपतालात काही रचना सुगम संगीतात वा चित्रपटात दिसतात.पण जगजीतजींनी या गझल करीता फक्त पाच मात्रांचा उपयोग करून रंगत आणली.माझ्या पाहण्यातील हा पहिला व शेवटचा प्रयोग आहे.याच अल्बम मधील 'मेरी तनहाईयों मुझको लगा लो सीने से'....ही पण रचना हटके आहे.भैरवीमध्ये अशी बंदिश जगजीतजीच करू जाणे!
२.
'अ माईलस्टोन' मधील 'मिलकर जुदा हुए तो' ही गझल तोडी रागात बांधलेली आहे.यातील मतल्याची पहिली ओळ मध्य सप्तकातील कोमल धैवतावरून सुरू होऊन मंद्र सप्तकातील शुद्ध निषादावर स्थिरावते.आणि येथून खरी गम्मत सुरू होते ती अशी की,निषादावर मूर्च्छना करून दुसऱ्या ओळीत भूप रागाची छाया दाखवत पुन्हा कोमल धैवतापासून  पहिली ओळ सुरू होते.अशी गम्मत प्रबुद्ध संगीतकरच करू शकतो.

३.
गझलच्या शब्दानुरूप रागाची निवड करून 'मेलोडीअस' सुरावट तयार करून गाणे हे पण जगजीतजींचे वैशिष्ठय होते.हे 'गरज बरस प्यासी धरतीपर' ह्या 'इन साईट' मधल्या गझलेवरून दिसून येते.

४.
'उम्र जलवो में बसर हो' ही गझल live कार्यक्रमात गाताना 'शेख करता तो है मस्जिद मे खुदा को सजदे' ही ओळ गाताना 'अजान'ची अरबी सुरावट 'मनमोही' होऊन जाते.
      खरे म्हणजे जगजीतजींच्या 'कंपोझिशन'वर एक मोठा लेख होऊ शकतो. म्हणून विस्तारभयास्तव इथेच थांबतो.
      जगजीतजींच्या आयुष्यातील अनेक घटना सर्वसामान्य रसिकांना माहीत नाहीत.त्यांचे बालपण,वैवाहिक जीवन,चित्राजींचा न गाण्याचा निर्णय,उत्तरार्धातील भक्तिमार्ग या सगळ्याची मांडणी करताना सगळे प्रसंग वैभवकुमाल शिंदे यांनी त्यांच्या 'गझलजीत' या पुस्तकातून आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत.ते वाचताना आपल्याला गलबलून न आले तर नवलच!जगजीतजींच्या उत्तरार्धातील live कार्यक्रमातील गझलगायनातून ही व्यथा स्पष्टपणे दिसून येते.तसेच नंतरच्या भक्तीगीतातूनही व्यथा व समर्पण ठायी ठायी जाणवते.'हे राम' व 'जय राधा माधव' पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या डोळ्यात केव्हा पाणी आले ते कळलेच नाही.
     'दर्द से मेरा दामन भर दे' असे म्हणणाऱ्या या थोर गायकाला शेवटी शेवटी अनेक 'दर्द'ला सामोरे जावे लागले हे अतिशय दुःखद आहे.

गझलगंधर्व
सुधाकर कदम
सी१सी/१३,गिरीधर नगर,
वारजे माळवाडी,
पुणे. ५८
8888858850


 

 





संगीत आणि साहित्य :