गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, November 29, 2020

मराठी गझल गायकीचा उद्गम...डॉ. अनंत ढवळे

.               

         मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या पाचेक दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते सुधाकर कदम यांचे. स्व. सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल प्रदान केली तर कदमांनी मराठी संगीताला गझल गायकी. गझल संगीतबद्ध करणे आणि गझल गाणे या दोन्ही गोष्टी गीत गायन, अभंग किंवा चित्रपटसंगीताहून भिन्न व स्वतंत्र आहेत. सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीला एक स्वतंत्र व पृथगात्म स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मी संगीताचा अभ्यासक नसलो तरी माझ्या वाचनात आलेल्या माहितीनुसार गझल गायकीचे स्वतंत्र कार्यक्रम घेणारे पहिले कलाकार म्हणून कदमांचाच उल्लेख करावा लागेल.
      आयुष्यभर एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी चालत राहणा-या कुठल्याही मनस्वी व्यक्तीसारखे भासणारे कदम, गझल गायकी हेच आपल्या जीवनाचे सार्थक मानत आले आहेत. ही निष्ठा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सातत्याने जाणवत राहते. गझलचा विषय निघताच, आठवणींमध्ये रमणारे कदम, आपली कला, अनुभव, प्रयोग आणि आपल्या लोकांबद्दल भरभरून बोलू लागतात. हा आपलेपणा, हे माणसांबद्दलचे निर्व्याज प्रेम हे त्यांच्यातील मोठ्या कलावंताचे स्थायी लक्षण आहे. गझल ही मनुष्याच्या आयुष्याचा, त्याच्या सुखदु:खाचा तळ शोधणारी आत्मधून आहे. मनामध्ये प्रेम, आस्था आणि सांवेदनिक जिवंतपणा असल्याशिवाय गझल लिहिणे अथवा गाणे शक्य नाही. हा जिवंतपणा कदमांना इतर कलावंतापासून कितीतरी वेगळे आणि श्रेष्ठ ठरवितो. कलेसाठी कलोपासकाच्या छातीत इमानी हृदय असणे आवश्यक आहे. बेईमान आणि धूर्त लोकांसाठी हे क्षेत्र, हा प्रदेश निषिद्ध आहे. गझल, स्वत: आणि स्वत:ची गायकी याबद्दलची निर्मळ निष्ठा हीच कदमांच्या एकंदरीत जीवनप्रवासाची सोनेरी किनार बनून राहिलेली आहे.
 सुधाकर कदम यांनी पाकिस्तानी आणि भारतीय उर्दू गझल गायकांच्या अनेकविध शैलींचा अभ्यास करून, मराठी गझल गायकीची स्वतंत्र अशी विकसित शैली निर्माण केली. ध्वनिमुद्रिका हा या श्रवणभक्तीचा स्त्रोत होता. ज्याप्रमाणे लिहिणा-यासाठी पूर्वसूरी आणि समकालीन प्रतिभावंतांचे लेखन वाचणे हा एक प्रकारचा तंत्राभ्यास असतो, तसाच महान गायकांच्या रचना सतत ऐकून त्यातल्या बारीकसारीक अंगभूत वैशिष्ट्यांसह, गायकीचे तंत्र आत्मसात करणे हा गायकांसाठी एक प्रकारचा रियाजच असतो. प्रत्येक गायकाची गायनशैली, चाली बांधण्याची विशिष्ट ढब, शब्दांचे भावानुसार प्रकटीकरण आणि शेर सादर करण्याची पद्धत वेगवेगळी असते. या सर्वांचे सार समजून उमजून आपल्या सर्जनाच्या साच्यात ओतण्याचे काम, ही एक प्रदीर्घ आणि निरंतर प्रक्रिया आहे. वडील पांडुरंग कदमांकडून मिळालेला वारकरी संप्रदायाचा वारसा, पंडित जितेंद्र अभिषेकी व छोटा गंधर्व यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अनेक वर्षांची प्रचंड साधना या सर्वांचे प्रतिबिंब कदमांच्या गायकीत उमटत राहते. विदर्भाच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कदमांनी संतूर, सरोद,  एकॉर्डिएन विविध वाद्यांमध्ये प्राविण्य मिळवून स्वतंत्र वादनाचे (सोलो) देखील कार्यक्रम केले आहेत. कदमांच्या सांगीतिक साधनेचा हा विस्तार थक्क करून सोडणारा आहे. संगीताच्या विविध पातळ्यांवर अनेक प्रयोग करणा-या प्रतिभावंतांची गझल गायकी समृद्ध असणे साहजिकच होते. गझलचा गझलचा स्वभाव, तिचा लयाधारित घाट आणि अर्थानुसार व्यापकता कायम लक्षात ठेवून कवीच्या भावनिक प्रतलाशी समकक्षता साधून गझल संगीतबद्ध करण्याची कठीण कला कदमांनी कमालीची साधली आहे. पत्रकारितेत काढलेली अनेक वर्षे विविध मासिकांतून केलेले स्फुट लेखन, ‘सरगम‘ आणि ‘फळे मधुर खावया‘ या दोन पुस्तकांची निर्मिती लक्षात घेता कदमांची साहित्यातील डूब लक्षात येते. शिवाय सुरेश भटांच्या प्रदीर्घ सहवासाचाही गझलची अंगभूत वैशिष्ट्ये समजून घेण्यात लाभ झाला असावा असे वाटते. आर्केस्ट्रात काम करीत असताना तासन्तास रियाज करणा-या कदमांनी पुढे आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा देऊन आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलावंताचा दर्जा मिळविला. मला वाटते या सर्व घडामोडींमधून कदमांच्या गझल गायकीचे रंगरूप आकार घेत गेले असावे. १९७५ साली नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उदघाटनाचे वेळी कदमांच्या गायनाचा कार्यक्रमझाला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. सुरेश भट होते. त्यांनी आपल्या काही गझला कदमांना संगीतबद्ध करण्यासाठी दिल्या. पुढे १९८० पासून या दोघांनी एकत्र कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. या कार्यमातूनच पुढे, ‘अशी गावी मराठी गझल‘ हा संपूर्णपणे गझल गायनास समर्पित असा कार्यक्रम सुरू झाला.तेव्हापासून कदमांनी गझल गायनाचे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मिळून सुमारे हजारएक कार्यक्रम केले आहेत. सुरेश भटांशिवाय श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, ललीत सोनोने, अनिल पाटील, शिवाजी जवरे, अनंत ढवळे तसेच चित्तरंजन भट, समीर चव्हाण, प्रमोद खराडे, दिलीप पांढरपट्टे, ए. के. शेख, संगीता जोशी, म. भा. चव्हाण, दीपक करंदीकर, रमण रणदिवे अशा अनेक गझलनवाजांच्या गझला संगीतबद्ध केल्या आहेत. अलीकडे पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेले कदम स्वत: गायन फारसे करीत नाहीत परंतु गझल संगीतबद्ध करण्याचा उपक्रम मात्र अव्याहत सुरू आहे. सौ. रेणु चव्हाण व कु. भैरवी कदम या दोन्ही कन्यांच्या स्वरमाधुर्यातून त्यांनी परिश्रमपूर्वक घडविलेली गझल ऐकताना त्यांच्या चेह-यावरील समाधान लपत नाही. अलीकडे कदमांच्या प्रोत्साहनातून सुरू झालेला ‘गझलकट्टा’ या मासिक कार्यक्रमाला पुण्यात ब-यापैकी बाळसे धरू लागले आहे.
 भारतीय समाज आपल्या आतिथ्यशीलता आणि गुणीजनगौरवाच्या गुणांसाठी ओळखला जातो. पण या बाबतीत मराठी समाजात मात्र विपरीत चित्र दिसते. हिंदी चित्रपटातील गल्लाभरू, सुमार दर्जाचे अभिनेते आणि टाळ्यामिळवू, तिस-या दर्जाच्या गझल सादर करणा-या पाकिस्तानी गझल गायकांना डोक्यावर घेणारा मराठी समाज, आपल्या मातीतील कलावंतांच्या बाबतीत मात्र प्रचंड उदासीन आहे. सुधाकर कदमांसारख्या अस्सल प्रतिभावंतांची झालेली उपेक्षा दु:खदायी तर आहेच, परंतु उद्वेगजनकसुद्धा आहे. आजकाल मराठी गझल विश्वात झालेली उथळ कवी आणि अजाण गझलगायक पोराटोरांची भरती पाहून, मराठी गझल नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न पडतो. मराठी गझलांच्या लहानशा वर्तुळात गेल्या सात-आठ वर्षात सुरू असलेली ही सांठमारी पाहून कदम अनेकदा व्यथित होतात. गावोगाव गझलांचे कार्यक्रम झोडत फिरण-या मंडळींचे अर्थकारण आणि लोकप्रयितेचा हव्यास पाहून गेली काही वर्षे कदम या सर्वांपासून दूर राहणेच श्रेयस्कर, असा विचार करून काहीसे विलगच राहत आले आहेत.
         सुधाकर कदमांनी मराठी गझल गायकीची मुहूर्तमेढ रोवली. या गायकीला स्वत:चे असे एक परिमाण देऊन तिची जोपासना केली. कदमांचा हा वारसा आज त्यांच्या दोन्ही मुली आणि मुलगा (निषाद कदम) नेटाने चालवत आहेत. आर्णीतील आपल्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन गेली काही वर्षे कदम पुण्यात स्थायिक झाले आहेत. वारज्यातील कदमांची सदनिका म्हणजे पुणे शहराचे ‘गझल केंद्र’च बनले आहे. कदमांच्या घरी रंगलेल्या गझल वाचन व गायनाच्या अनेक मैफली माझ्या अनेक कवीमित्रांच्या आठवणीतील अनमोल ठेवाच आहेत. आपले संपूर्ण आयुष्य गझल गायकीला समर्पित करणारे सुधाकर कदम, या उतारवयातही पूर्वीसारखेच कार्यरत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नव्या दमाच्या आणि नव्या वळणाच्या मराठी गझलांचा कार्यक्रम बसवून तो पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचविण्याचा कदमांचा मनसुबा आहे. 
 या प्रस्तावित उपक्रमासाठी मराठीतल्या बहुतेक गझल लिहिणा-या कवींच्या आणि महाराष्ट्रभर विखुरलेल्या गझल रसिकांच्या शुभेच्छा आहेत. अशा एखाद्या कार्यक्रमाने मराठी गझल गायकीला चैतन्य मिळणे खरे तर कालसंगतच ठरेल. प्रयोगशीलता ही कुठल्याही प्रतिभावंताच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. सुधाकर कदमांचीही सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, त्यांच्या संगीतास अद्याप ताजेतवानं ठेऊन आहे. आजवर प्रकाशित झालेल्या ‘भरारी’, ‘भजन सुधा’, ‘अक्षर गाणी’, ‘झुला’, ‘अशी गावी कविता’, ‘समुहगान’, ‘अर्चना’, ‘खूप मजा करू‘ या ध्वनीफितींच्या माध्यमातून हे निरनिराळे प्रयोग जनपटलावर वेळोवेळी उमटत राहिले आहेत. कदमांच्या या प्रदीर्घ वाटचालीबद्दल लिहिण्या-बोलण्यासारखे आणखी बरेच काही आहे, पण मनाच्या प्रचंड पसा-यात पसरलेल्या हजारो गोष्टींचा उल्लेख दरवेळी सविस्तर करणे कठीण असते. तूर्तास मीर तकी़ मीरने आपल्या कलेला समर्पित केलेला हा शेर कदमांना समर्पित करून हा लेख संपवित आहे.
 
किया था रेख्तां पर्दासुखन का
यही आखिर को ठहरा फन हमारा.

**************************************

‘शब्द्सृष्टी’ (७ नोव्हेंबर २००९) भारतीय ग़ज़ल विशेषांकातून साभार गझलगंधर्व विशेषांकात व त्यातून 'मौनी' मध्ये...


 

Thursday, November 19, 2020

आणि इंदूर जिंकले! -सुनील शिनखेडे


           १६ डिसेंबर, इंदोऱ. सायंकाळची वेऴ. अगदी कडाक्याची थंडी़. वातावरणात कमालीचा गारठा असूनही जाल सभागृहात रसिकांची गर्दी हळूहळू जमू लागली़. साडेसातच्या सुमारास हॉल अगदी गच्च भरलेला़. वास्तविक अशी अपेक्षा कुणाला नव्हतीच मुळी़. कारण इंदोरच्या रसिकांसाठी कार्यक्रम काहीसा वेगळाच होता़. मराठी गीत-गझल गायनाचा़. कलावंतही इंदोरसाठी नवीनच़. सुधाकर कदम़ इंदोरमध्ये आपला कार्यक्रम व्हावा अशी कदमांची बरेच दिवसांची इच्छा होती़. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम झाले होते़. मूळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ह्या गावचे. त्यामुळे विदर्भात ते विशेष परिचित़. परंतु इंदोर सारख्या हिंदी भाषी परिसरात मराठी रसिकांसाठी मैफल व्हावी ही त्यांची इच्छा. तसे योग जुळून आलेत़. मूळचे आर्णीचेच परंतु इंदोरला स्थायिक झालेले वानखडे बंधुद्वयांची समॅक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढे आली़. ह्या कंपनीचे अभियंते श्री अविनाश वानखडे ह्यांनी आयोजनाचा संपूर्ण भार सांभाळला़. प्रमोद कोठारी, अनिल वानखडे, दीपक शिंदे, अभिलाष खांडेकर व अन्य चाहते मंडळी मदतीला धावली़.
 संपूर्ण सभागृहच मोगर्‍याच्या सुवासाने धुंद झालं होतं. इंदोरचे प्रसिध्द रंगकर्मी बाबा डिकेंच्या प्रमुख उपस्थितीत मैफल सुरु झाली़. आणि कवी कलीमखान ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.
 वेळ सायंकाळची़. सायंकाळच्या प्राथनेची़. कलीमखानांनी सुरेश भटांचे शब्द दिलेत -
 ‘माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे़’ सुधाकर कदमांचे सूर साथीला आलेत़. संपूर्ण हॉल स्तब्ध, शांत़ कदमांचा स्पष्ट व मोकळा आवाज़ साथील तबल्यावर नागपूरचेच रमेश उइके आणि सारंगीवर इंदोरचे आकाशवाणीचे प्रसिध्द सांरगीवादक मोइनुद्दीन खॉ साहेब़ शब्दसुरांची गाठ पडली़. कदमांची मध्यप्रदेशातील पहिलीच मराठी गीत-गझलांची मैफल रंगू लागली़.
 तसा गझलांचा चाहता वर्ग मोठा परंतु मराठी गझलांचा मोजकाच़. इंदोरसाठी तर मराठी गझल गायन हा प्रकारच नवीन होता़. त्यामुळे येथील मराठी रसिक कदमांना कितपत स्वीकारतील ह्याबद्दल आयोजक साशंक होते़. परंतु मैफलीच्या पूर्वार्धातच रसिकांनी अगदी मनापासून दाद दिली़. ह्या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या ह्या शहरात मराठी रसिकांचा भरणा काहीसा कमीच. परंतु ह्या नव्या कलाकारांच्या इथल्या पहिल्याच मैफलीत काही वेगळेच दृश्य दिसले़. सुरुवातीपासूनच उपस्थितांची जबर दाद मिळवून कदमांनी रसिकांचे हृदय काबीज केले़.
 कवी कलिमखान ह्यांनी कधी कवठेकरांच्या, कधी बोरकरांच्या, तर कधी स्वतःच्या मार्मिक ओळी व कविता पेश करुन मैफलीला अनुकूल असे वातावरण जिवंत ठेवले़ त्यांच्या ‘कुंकू’ ह्या कवितेतला तर अशी काही दाद मिळाली की रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ती कविता पुन्हा म्हणावी लागली़
 ‘दीनरात ज्याचे गान मी गातो
 तो भारतभाग्यविधाता
 रस्त्यावर चिवडा खातो.’
 ह्या त्यांच्याच ओळी सद्यःपरिस्थितीचे भान जागवणार्‍या़ आणि श्रोत्यांना विचारात टाकणार्‍या़. अशा वैचारिक तर कधी श्रृंगारिक शब्दांची, कवितांची पेरणी करत कलीमखानांनी मैफलींचे सारथ्य केले. आणि श्रोत्यांना बांधून ठेवले़. सोबत कदमांनीही कधी श्रृंगार, कधी याचना, तर कधी यातना असे विविध भाव ओतले़.
 भटांच्या‘झिंगतो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला़’
 ह्या गझलेतील झिंगतो हा शब्द म्हणण्याचा कदमांचा आगळा ढब रसिकांची दाद घेऊन गेला़
 ‘ऐन वेळी अशी का करतेस तू़’
 ह्या गोड, लाडिक व काहीशा धीट गझला सादर करुन कदमांनी रसिकांची तब्येत खूष केली़.
 मध्यंतरामध्ये आयोजकांतर्फे सर्व रसिक श्रोत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम होता़. तसा हा सुद्धा आयोजनातील आगळावेगळा गोड अनुभव. इंदोरच्या श्रोत्यांसाठी नवाच होता! मैफलीला खास रंग चढला तो मध्यंतरानंतरच़ रात्रीला कमालीची थंडी असूनही सर्वच रसिक पुन्हा स्थानापन्न झाले़. उत्तरार्धाच्या सुरुवातीस कदमांनी श्रीकृष्ण राऊतांचे
 ‘दुःख माझे देव झाले, शब्द झाली प्रार्थना आरती जी गात आहे, तिच माझी वेदना’.
 नंतरही एकसे एक गझला सादर करून कदमांनी भरपूर टाळ्या घेतल्या़-
 कलीमखान यांच्या
 ‘मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
 आपुले अपुल्यावरी भाळण्याचे दिवस आले!’
 ह्या गीताने एवढ्या गारव्यातही रसिकांना गोड गुलाबी दिलासा दिला़. संपूर्ण मैफलीत कधी तबल्याचे साथी रमेश उईकेंनी, तर कधा मोइनुद्दीन खॉं साहेबांच्या सारंगीच्या मधुर सुरांनी रसिकांना दाद देण्यास भाग पाडले़. कवठेकरांच्या‘मस्तीत गीत गारे देतील साथ सारे़’ ह्या गीताला तर रसिकांनी उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा ठेका दिला़.सतत चार तासपर्यंत सर्वच रसिक ह्या शब्दसुरांच्या आगळ्या वेगळ्या मैफलीचा आनंद मनसोक्त लुटत होते़ भारदस्त गझला, त्यांना स्वरसुरांचा साज, कलीमखान यांचे खुसखुसीत संचालन, उत्कृष्ट आयोजन व इतर प्रत्येकच बाबतीत वेगळेपणा सिद्ध करणार्‍या ह्या मैफलीची सांगता भैरवीने झाली़.
 अत्युत्कृष्ट आयोजन व बहारदार मैफलीच्या इंदोरच्या पहिल्याच उपक्रमासाठी अभिनंदनपर संदेश अद्यापही येत आहेत़ दुसरी मैफल कधी? ही विचारणा करणार्‍या पत्रांचा ढीग लागतो आहे़. मध्यप्रदेशातील महू, उज्जैन, देवास, रतलाम येथूनही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळांची निमंत्रणे आली आहेत़. केवळ एकाच मैफलीने कदमांनी इंदोरच्या रसिकांची हृदयं काबीज केलीत़.

तरुण भारत,नागपूर
१४ जानेवारी १९९०

(डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून साभार...)

 





संगीत आणि साहित्य :