गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, August 18, 2026

World Photography Day


 

आबालवृद्धगीत...पोलिसदादा.

(हे गीत सर्वच पोलीसांना लागू नाही,याची कृपया नोंद घ्यावी.)


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

चौकाच्या कोपर्‍यात,बकरा शोधुनी,हलाल करतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

तक्रार घेण्या,टेबलाखालुनी,लाचही घेतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

सराव म्हणुनी,लाठीमार करतो,टाळकी फोडतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

गुत्यावर जातो,लायसन बघतो,फुकटची पितो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

गुंडांना आवतन,सभ्यांना पायतन,दाखवीत फिरतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

गोळ्या मी झाडतो,गरीबांना झोडून,अंग झटकतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

चोरांशी दोस्ती,करून मस्ती,गस्तही घालतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

’माडी’वर जातो,’शौक’ही करतो,हप्ता मी घेतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

कोर्टात जातो,’सॅलूट मारतो,खोटेही बोलतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

ठाण्यात अबला,येताच जमल्यास,अब्रुही लुटतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

हॉटेलात जातो,रुबाब कसतो,फुकटचे खातो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

चोरीचा माल,सापडला तर,वाटून खातो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

हेलमेट न घालता,’टिब्बलसिट’ जातो,नियमही मोडतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

चोरीची तक्रार,घेऊन येता कोणी,दमदाटी करतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

नगद नारायन,दिसताच पटकन,सक्रीय होतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

पदपथा वरती,दिसता पथारी,दुर्लक्ष करतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

मोठ्यांचे रक्षण,छोट्यांचे भक्षण,आणि राजकारण जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

राजकारण्यांच्या,पुढे मागे फिरूनी,शेपुट हलवतो जरा जरा !


पोलीस दादा पोलीस दादा काय करता,अहो काय करता ?

’सद्निग्रहार्थ’,’खलरक्षणार्थ’,ब्रीदाला जागतो जरा जरा !


● गायकांसाठी सूचना...

(हे गीत "इंजिन दादा इंजिन दादा काय करता" या चालीवर म्हटल्यास अपरिमितानंद मिळून पोलीसानंदी टाळी लागते.)

सुधाकर कदम

Monday, August 17, 2026

आठवण... शायर बशर नवाज़ साहेबांची

 

                         आज त्यांचा जन्मदिवस आहे..

                                    🌹🙏🌹

दोन वर्षांपूर्वी सावनी सावरकरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली त्यांची ही अप्रतिम गझल... #कैसे_कैसे_लोग


कैसे कैसे लोग खुशी से बिकने पर तैयार हुए

एक हम ही दीवाने निकले हम ही यहाँ पर ख़ार हुए


प्यार का बंधन ख़ून के रिश्ते टूट ख्वाबों की तरह

जागती आँखे देख रही थी क्या-क्या कारोबार हुए


आप वो स्याने रस्ते के हर पत्थर को बुत मान लिया

हम वो पागल, राहू में अपनी आप ही खुद दीवार हुए


आनेवाली सुबह गिनेगी रात के अंधे तूफाँ में

कितने साहिल ही पर डूबे कितने भँवर के पार हुए

               

 #BasharNawaz

Sunday, August 16, 2026

'खुसखुशीत' कं-दर्प

      सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. 

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार
समजल्या जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.
      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.
     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.
     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 
कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.
       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.
     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

दै.विदर्भ मतदार, अमरावती.१५ ऑगस्ट २०२६


विनम्र अभिवादन!...


    आज १७ ऑगस्ट, पंडित जसराज यांचा स्मृतिदिन  !   

           पंडितजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

                               🌹🙏🌹

     स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. 

     पंडित जसराज हे ७० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे. 

     पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.  माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजसराज” असं नाव दिलं, असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही. शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. 

     भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर, कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत.झाले.त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. आपल्या कुटुंबासह अमेरिकेत मुक्कामी असताना १७ ऑगस्ट २०२० रोजी यांचे अमेरिकेत निधन झाले.

Monday, August 10, 2026

हिरवे हिरवे गर्द चिमुकले दाट धुक्याने हळु पांघरले...

हिरवे हिरवे गर्द चिमुकले,दाट धुक्याने हळु पांघरले

बेट नव्हे हते नंदनवन जणु निळ्या जांभळ्या जळात वसले


त्या बेटाचा समुद्र गहिरा,लाटांमधुनी खेळे वारा

हलती होड्या डुलती नौका सोडुनी थोडा दूर किनारा


तिथली झाडे अन् फुलवेली,रंग सृष्टीचे मोहक ल्याली

क्षणात हसती क्षणी कुजबुजती जाणुन पक्षांची मधुबोली


मेघ चुंबितो त्याचे शिखर,सुंदर तिथला अवघा डोंगर

पायथ्याशी त्या घरे चिमुकली,पलीकडे ते पवित्र मंदिर


गायिका-नेहा दाऊदखाने (नेहा सिन्हा)

गीत-मीरा सिरसमकर

संगीत-सुधाकर कदम

ध्वनिमुद्रण - एल्कॉम स्टुडिओ,पुणे


       हे एक निसर्ग गीत असून याची बंदिश #वृंदावनी_सारंग या रागात आहे.याचे आरोहावरोह असे...सा रे म प नि सां,सां नि प म रे सा.असे आहेत.अवरोहात नि हा स्वर कोमल आहे.दुपारी गायिला जाणारा हा एक गोड राग आहे. आणि याचाच भाऊ  मधमाद सारंग या रागात अनेक चित्रपट गीते,भावगीते,भक्तिगीते आणि गझल आहेत.

          ’जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँ’ हे ’नागिन’ (१९५४) या चित्रपटातील  हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे ’आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले ’झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर ’कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे ’किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही  वृंदावनी सारंग याच रागात आहे.

      'कोंपले फिर फूट आयी शाखपर कहना उसे' ही मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मूर्च्छना पद्धतीच्या बंदीशीचे साक्षात उदाहरण आहे.'महाफिल में बार बार किसी पर नजर गयी' ही गुलाम अलींनी गायिलेली गझल सुद्धा सारंग रागावरच आधारित आहे.

          मी सुद्धा कमी वाद्यमेळात  थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला...आवडल्या नावडल्याचे कळवावे!

●headphone please

Friday, August 7, 2026

तू कवितेतून हरवता...

 


शिल्पा देशपांडे ची एक "युगल गझल"...रसिका जानोरकर व मयूर महाजनच्या आवाजात.

                (●Headphone please)

तू कवितेतून हरवता एकाकी होते अक्षर 

सुरवंट समाधी घेतो कोषात अडकते उत्तर 


केव्हाच्या साजणवेळा क्षितिजावर तिष्ठत बसल्या 

तू रुसल्यावर माझ्याशी हे घडते नाट्य निरंतर 


पारोशा तुजविण वेळा क्षण कळण्याआधी विरती 

डोळ्यांशी लढण्यासाठी अश्रूही होती तत्पर 


तू घरटे सोडुन जाता भिंतींना हसती  दारे 

खिडकीच्या काचेवरती बस एकांताची  टक्कर 


गायक - मयूर महाजन, रसिका जानोरकर 

गझलकार - शिल्पा देशपांडे 

संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम  


Live- Sanskruti Arts Festval,  Thane 2015



Wednesday, August 5, 2026

आनंदगाणे


 

माझी शब्द-स्वरसंपदा (भाग १)



 .                      #जगत_मी_आलो_असा 

                             (लेखांक ४०)

.                      #माझी_शब्द_स्वरसंपदा 


       आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख), ’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा' व 'काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) 

अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’ काट्यांची मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’ तुझ्यासाठीच मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), काट्यास फूल आले','रे मना!' ह्या कॅसेट्स सीडीज सोबतच खाली दिलेली शेकडो गीते-गझला spotify, gana.com, youtube युट्युब,स्पॉटिफाय व इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत असून. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,

अनुराधा मराठे, वैशाली माडे, वैशाली सामंत,पद्मा सुरेश वाडकर,नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन,अनन्या सुरेश वाडकर, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा 

बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,

जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,

रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे,धुमाळ पिता-पुत्र,राज यावलीकर,

रामदास चवरे व दस्तुरखुद्द माझा समावेश आहे.

       तसेच उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज,हनीफ सागर,कलीम खान,दिलीप पांढरपट्टे,समीर चव्हाण,सहदेव रामटेके या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत.


.                 ■ युट्यूबवरर उपलब्ध असलेल्या रचना


■ मराठी गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०.जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके

५३.जळलो धुपापरी मी-             "      

५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे-     "

५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे-        "

५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली-             "

५७.माझी गझल गुलाबो-              "

५८.असे पत्र आता तुला मी लिहावे-            "

५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके

६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम

६१.आसवांनी मी मला-सुरेश भट

६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा

६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा

६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे

६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी

६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम

६९. हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे-   "

७०. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-   "

७१. विसरून वेदनांना मज गायचेच आहे-  "

७२. ये न ये असे कधी चांदणे पुन्हा पुन्हा-ज्योती बालिगा

७३. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा-राज यावलीकर

७४. काही न बोलण्याची राखून रीत आले-ज्योती बालिगा

७५. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७६. काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

७७. बावरे होउन कुणाला शोधती डोळे-बबन धुमाळ

७८. जसा हात हातात धरला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ 

७९. स्मरायचे तुला किती-विजयालक्ष्मी वानखेडे

८०. इथेही तिथेही तुझा भास होतो-       "

८१.भीमाच्या गजाली-                         "    

८२. किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत रहावे-समीर चव्हाण

८३.अवखळ मन हे ऐकत नाही- सुधाकर कदम

८४. दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

८५.या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

८६. हा असा चंद्र अशी रात-                 "

८७.संपली अजुनी कुठे ही रात सजणा- अनिल कांबळे

८८.एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

८९. मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती बालिग

९०.उदंड ओसंडुनी कधी वावरता आले- शिवाजी जवरे

९१.रात गेली निघून पाऱ्याची- सुरेश भट

क्रमशः

●मराठी गीते व उर्दू गझल पुढील अंकी...

---------------------------------------------------------------------

दैनिक विदर्भ मतदार,अमरावयी.रविवार दि.१ ऑगष्ट २०२६

भारतीय नागरिक


 

सुधाकरी तोडी

 


      युट्युब आणि इतर सर्व ऑडिओ चॅनल्सवर प्रसिद्ध झालेल्या  #काट्यास_फूल_आले  या गझलकार रविप्रकाश चापके यांच्या अलबम मधील 'माझी गझल गुलाबो' ही गझल मी नव्याने संशोधित केलेल्या सुरावटीत कंपोज केली असून या सुरावटीचे नामकरण बिलासखानी तोडीच्या धर्तीवर '#सुधाकरी_तोडी' असे केले आहे.अशी सुरावट भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये अजूनपर्यंत तरी कुठेच उल्लेखलेली नाही.उत्तर प्रदेशातील 'हाथरस' येथून प्रकाशित झालेल्या #राग_कोष या ग्रंथात  ५०० रागांची माहिती दिली आहे.पण या सुरावटीचा कुठलाही राग त्यात नाही.एवढेच नव्हे तर पंडित भातखंडे यांच्याही सर्व ग्रंथात असली सुरावट मला आढळली नाही. सुरावट अशी आहे...षड्ज, कोमल रिषभ, कोमल गांधार, पंचम, कोमल निषाद... मध्यम व धैवत वर्ज.

      तर,अशा या सुरावटीतील ही गझल संपूर्ण गायकी अंगाने गायक मयूर महाजन यांनी गायिली आहे.तरी आनंद घ्यावा, ही विनंती. (चांगले तुमचे,वांगले आमचे.)


सारंगी - उस्ताद लियाकतअली खान

#ustad_liyakat_ali_khan

तबला - पांडुरंग पवार #pandurang_pawar

बासरी - संदीप कुलकर्णी #sandip_kulkarni

संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milind_gune

ध्वनीमुद्रण - 'डॉट वेव्ह' स्टुडिओ,पुणे.

मास्टरिंग - मुकुंद फडकुले,एल्कॉम स्टुडिओ,पुणे.

#mukund_phadkule

●आपल्या आवडी-निवडीनुसार प्रतिक्रिया अपेक्षित...धन्यवाद!

●Headphone please



Thursday, July 30, 2026

रे मना !

 

रे मना! तुज काय झाले सांग ना

का असा छळतो जिवाला सांग ना


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवाळतो तू सांग ना


सूर लावुन गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना

             ●●●

     मुंबईच्या डॉ.राम पंडितांसारख्या अनेक विद्वान व  रसिक मित्रांनी माझ्या कविता स्वतः स्वरबद्ध करण्याविषयी आग्रह केल्यामुळे अनेक वर्षांनंतर #रे_मना! हा अल्बम तयार झाला.यातील गीत-गझलांना विविध वाद्यांच्या सहाय्याने साजेसे संगीत नियोजन मिलिंद गुणे यांनी केले.यातच मिलिंदच्या आग्रहावरून ग्रूप व्हायोलिन्सचा प्रथमच प्रयोग केला.हा अल्बम युट्युब, स्पॉटिफाय सारख्या जगातील सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असून, त्याला हजारो रसिकांनी आपली पसंती दिली आहे. .त्यातीलच मयुर महाजनने गायिलेले 'रे मना!' हे अतिशय सुंदर असे शीर्षक गीत सादर करीत आहे.या रचनेचा बेस तसा 'बिलासखानी तोडी' हा राग आहे.पण सुगम संगीतामध्ये गीताला अधिक आकर्षक करण्या करीता वेगवेगळ्या सुरावटींचा प्रयोग करून त्याचा गोडवा वाढविल्या जातो.तसेच काहीसे यात केल्या गेले आहे.मुळात ही बंदिश अनेक वर्षांच्या चिंतनानंतर आलेली असल्यामुळे 'दिल को सुकून देनेवाली है' असे मला वाटते..यातील अभिषेक बोरकर यांचे सरोद तर अफलातूनच आहे.आपण ऐका व आनंद घ्या! आवडल्यास प्रतिक्रिया द्या!



Wednesday, July 29, 2026

इतना मुझे चाहा करो ना...उर्दू ग़ज़ल

जनसंमोहिनी  राग पर आधारित यह उर्दू ग़ज़ल आपको ज़रूर पसंद आएगी। इस बंदिशी की विशेषता है छंदों में उच्च स्वरों का प्रयोग। इसे सुनिए...


इतना मुझे चाहा करो ना, इस के मैं क़ाबिल नही

मुझ सा कोई संगदिल न हो, तुम सा कोई बिसमिल नही


अपनी जगह तुम हो सही, अपनी जगह मैं ठीक हूँ

शिकावे-गिले जायज़ मगर,शिकवो से कुछ हासिल नही


चलना ही है ज़िंदादिली चलते रहो चलते रहो

मंज़िल सबब रुकने का ले,बेशक वो ज़िंदादिल नही


मौजे तमन्ना थाम ले कब तक कहाँ तक ऐ 'समीर'

दिल का समंदर है अजीब,इस का कोई साहिल नही

                              ●●●

कलावती और जनसंमोहिनी रागों के बारे में संक्षिप्त जानकारी।

कलावती और जनसंमोहिनी राग इतने मिलते-जुलते हैं कि आम आदमी के लिए इनमें अंतर करना मुश्किल है! दोनों राग बहुत मधुर हैं। ये दोनों राग दक्षिण भारतीय संगीत प्रणाली (कर्नाटक संगीत) से हैं। अपनी मधुरता के कारण ही ये उत्तर भारतीय संगीत प्रणाली में भी लोकप्रिय हुए। इनका थाट खमाज है और निषाद को छोड़कर बाकी सभी स्वर शुद्ध हैं। कलावती राग में ऋषभ नहीं होता। कलावती राग में ऋषभ का प्रयोग करने पर जनसंमोहिनी राग बनता है। इसमें ऋषभ का प्रयोग कल्याण अंग के साथ किया जाता है। जनसंमोहिनी राग का मूल नाम 'शिव कल्याण' भी कहा जाता है।

'कोई सागर दिल को बहलाता नहीं' - यह गाना फिल्म 'दिल दिया दर्द लिया' से है, जिसने मेरे ऑर्केस्ट्रा में रहने के दौरान अपार लोकप्रियता हासिल की। ​​मैं इसे अपने घर के संगीत कार्यक्रमों में गाया करता था। अगर मेरे सामने युवा लड़कियां होतीं, तो मैं इसे बड़े जोश से गाता था। तभी मुझे बुनियादी जानकारी मिली कि यह गाना कलावती राग में है। मुझे बहुत बाद में पता चला कि इस में जनसंमोहिनी राग भी है। इसके बाद, फिल्म 'मुंबईचा जवाई' से रामदास कामत द्वारा गाया गया गाना 'प्रथम तुज पाहता, जीव वेडावला' हम (उस समय के) युवाओं को दीवाना बना दिया था। कई वर्षों तक, मैं इन दोनों गानों को  घर के संगीत कार्यक्रमों में गाता रहा। लेकिन कलावती का असली अर्थ प्रभा अत्रे की 'तन मन धन तो पे वारू' इस बंदिश से। एकताल राग की यह रचना बारहवें छंद से शुरू होती है। सम के ऊपर का 'न' श्रोता को मंत्रमुग्ध कर देता है।उपरोक्त रचना श्रोता को मंत्रमुग्ध कर देती है। उनकी गायन शैली और गीतों से निकलने वाली मधुरता बेहद आकर्षक है। आज भी यह गीत युवा लगता है। इसके अलावा, डॉ. वसंतराव देशपांडे द्वारा गायी गई झपतालकी बंदिश 'ये हो कहे' भी मेरी पसंदीदा थी, क्योंकि यह बहुत ही सुरीली थी।

Monday, July 27, 2026

वेदनेचा सूर...

 


पंडित जसराजजींनी गायिलेल्या राग 'बागेश्री कानडा'

 रागावर आधारित गझल...

वेदनेचा सूर देउन काळजाला

लाविले आयुष्य मी माझे पणाला


गात जातो गोडवे जो तो स्वतःचे

झेलले ज्याने कधी ना वादळाला


न्याय,नीती,रीत आता वेगळी रे

नेमका अंदाज ना ये आपणाला


का दुरावा आपल्या दोघात आला

काय द्यावी करणे या कारणाला


माझिया ओठास जेव्हा स्पर्श केला

पौर्णिमेचे चांदणे आले उशाला


गायक - मयूर महाजन

शब्द आणि संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम

संगीत संयोजन - मिलिंद गुणे

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.



गझलेचं गाणं होताना....

           एखादी साहित्यकृती एखाद्या रचनाकाराने निर्मिलेली जरी असली तरी ती रचना त्याची रहात नाही. त्या रचनेवर  रसिक श्रोते, प्रेक्षकांचा हक्क व्हायला लागतो. त्या साहित्यकृतीत रसिक श्रोते, प्रेक्षक इतके समरसून जातात, की त्यांना स्वतःचंही भान रहात नाही. ते त्या रचनेमध्ये गुंतून जातात, ती रचना त्यांच्या आयुष्याचा भाग बनते. 

            आता गझलेचंच बघा ना! कित्येक रसिकांना काही गझला जणूकाही आपल्यासाठीच बनल्यात अस वाटत. प्रत्येक श्रोत्याला ह्या गझला आपल्याशा वाटतात.

निदा फाजलींची "होशवालो को खबर क्या बेखुदी क्या चीज है" जावेद अख्तरांची "तुमको देखा तो ये ख्याल आया"सुरेश भटांची "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे""भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले"इलाही जमादारांची "अंदाज आरशाचा वाटे खरा असावा" अशी बरीच उदाहरणे देता येतील. 

            अगदी तशीच दिलीप पांढरपट्टेनी शब्दबद्ध केलेली, सुधाकर कदम यांनी संगीत स्वरबद्ध केलेली आणि सुरेश वाडकर, वैशाली भैसने माडे यांनी गायिलेली  अप्रतिम गझल 

"#तू_हासलीस_की_सगळ्या_काट्यांची_मखमल_होते". 

     ही गझल रसिक श्रोत्यांची झाली, या गझलेने कित्येकांच्या हृदयावर अधिराज्य केलं. मला ह्या गझलेचं वेड लागलं ते माझा मित्र विद्यासागर कोळीमुळे.  अभ्यासाच्या मधल्या break मध्ये आमच्या शेती, छंद, गाणं, आरोग्य, मित्रमैत्रिणीबाबत चर्चा व्हायच्या. त्यावेळी तो, सुधाकर कदम काका, भैरवी कदम, रेणू चव्हाण यांच्या आठवणी नेहमी सांगायचा. ही गझल त्यानेच मला ऐकवली. आणि मी सहजच गझलकार पाहिले तर ते होते दिलीप पांढरपट्टे. पांढरपट्टे साहेब आमच्या जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. परंतु त्यावेळी गझलेची जाण नसल्यामुळे त्याना फारस ऐकता आल नाही पण ज्यावेळी ही गझल ऐकली आणि या गझलेच्या प्रेमात पडलो. नव्हे, ह्या गझलेच वैशिष्ट्यच अस की ती प्रत्येकाला नक्कीच प्रेमात पडायला भाग पाडते. तुम्ही नक्की ऐका....

दिलीप पांढरपट्टे सरांची गझल "तू हासलीस की सगळ्या #काट्यांची_मखमल होते"

-राजेश देवरुखकर

---------------------------------------------------------------------

● मराठी गझलच्या इतिहासातील पहिली #युगल_गझल  

#सुरेश_वाडकर  आणि #वैशाली_माडे  यांच्या आवाजात...


तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते

तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते


एकाच तुझ्या स्पर्शाने मन फुलते चंचल होते

ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते


तू येत रहा रे दुःखा आता न दुष्मनी माझी

तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ होते


येताच तुझा सांगावा येतात फुले अन गाणी

येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ होते


मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करते

प्रत्येक वेदना माझाही अलबेली मैफल होते


समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा

जी झुळुक वाटली छोटी ते मोठे वादळ होते


-गझलगंधर्व सुधाकर कदम

Saturday, July 25, 2026

जीवनाची एकतारी,पंढरीच्या महाद्वारी...


 

मन होतसे चकोर...



 काकडारतीच्या वेळी मन होतसे चकोर

व्याकुळले गात्र गात्र होई थेंबास आतूर


करो लागता गजर टाळ वाजतो मृदंग 

पान्हारते चंद्रभागा चोरुनिया अंग अंग


असे सावळे मंथर न्याहाळता इंद्रधनू

मातीतून फुटाळतो शकुनाचा अणू-रेणू


घरघरुनी उठता जात्यामधून विठ्ठल

कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परिमल


शाश्वतच्या ललाटाला सटवाईच गोंदते

उतरणीवरतीच अंगा अंगाला शेंदते


शब्द आणि संगीत- गझलगंधर्व सुधाकर कदम

गायक-मयूर महाजन



Monday, July 20, 2026

सरणावर कळले होते...



 .  आज पुनः #सुरेश_भट  आठवले...😢


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते


ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते


गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते


घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


■ जुन्या कॅसेटवरून उतरवलेले.

Live 1980 ●headphone Please

Sunday, July 19, 2026

या नवा सूर्य आणू चला यार हो...

 

.                       साठवणीतील आठवण

१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

Friday, July 17, 2026

पोवाडा...महाराष्ट्र मायभू आमुची...शाहीर अण्णा भाऊ साठे●

 


क्रांतिकारी शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...🌹🙏🌹



Wednesday, July 15, 2026

'लाजणे बरे नाही' सुरेश भट,सुधाकर कदम.

 




      ●अशी गावी मराठी गझल●

सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२


"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा  गुलाबाने  झाकणे  बरे नाही"


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे 

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा 

आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची आज राख रांगोळी 

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही


आज मोकळे  बोलू, आज मोकळे होवू ! 

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा, चंद्र वेग‌ळा होता 

हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली 

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


गझल - सुरेश भट

गायक - सुधाकर कदम


● old live... headphon please

वारकरी


 

जगत मी आलो असा (लेखांक ३७)



   ●अरुणावतीच्या तीरावर (भाग १)●

     आर्णीच्या नोकरीबद्दल मागील एका लेखात आलेच आहे. संगीत शिक्षक म्हणून नाईलाजाने का होईना एकदाचा रुजू झालो. वर्ष होते 1972. त्यावेळी संस्थाध्यक्ष होते चिद्घनानंद भारती. ही संस्था माहूरचे महंत श्री दत्तराम भारती यांच्या योगदानातून उभी राहिली होती. त्यामुळे श्री महंत दत्तराम भारती नावानेच ही शाळा ओळखली जात होती/आहे. जसा चिद्घनानंद भारतींचा आर्णी, माहूर परिसरात दरारा होता तसा यवतमाळ जिल्हाभर या शाळेचा दरारा होता. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कडक शिस्त, नावाजलेले हुशार असे शिक्षक, अतिशय मृदू पण शिस्तीचे कडक असे मुख्याध्यापक हे या शाळेचे वैशिष्ठय होते. शंकरराव बुटले हे त्यांचे नाव. पांढरे शुभ्र धोतर, पांढराच शर्ट व पांढरी टोपी ही त्यांची वेशभूषा. उत्तम शिक्षण, खेळ, कला, संगीत, नाटक व विविध शालेय उपक्रम यामुळे त्यांच्या कार्यकाळात शाळा खूप नावारूपाला आली होती. मी रुजू झालो तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. संगीत क्षेत्रात जरी मी नाव कमावले होते तरी पण एक शिक्षक म्हणून मी शून्य होतो. पण बुटले गुरुजींनी माझ्यातील गुण-दोषासह मला स्वीकारले व मार्गदर्शन केले. सुरूवातीला प्रत्येक तासिकेला वर्गावर जाऊन संगीताची तासिका घ्यावी लागायची. पण माझ्यातील तडफ व संगीताविषयीची आत्मीयता पाहून त्यांनी मला वेगळा संगीत कक्ष दिला. त्यावेळी माझ्याकडे हार्मोनियमसुद्धा नव्हती. शाळेची हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्यामुळे माझे कार्यक्रम सुरू होते. वेतन इतके कमी की, कसेबसे घर चालायचे. त्यामुळे हार्मोनियम घेण्याचा प्रश्नच नव्हता. यवतमाळला असेपर्यंत ऑर्केस्ट्राची हार्मोनियम वापरायचो. यवतमाळलाही माझ्याकडे स्वतःची हार्मोनियम नव्हती. असे असतानाही मी हार्मोनियमचा हात कसा तयार केला असेल याचा विचार करावा. असो!

     बुटले गुरुजींनी संगीत कक्ष दिल्यानंतर मी त्या कक्षात सायंकाळी संगीताचे वेगळे वर्ग घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे पाहून बुटले गुरुजींनी मला 'गायनाव्यतिरिक्त काही वाद्य शिकविता येईल काय' असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी शाळेच्या फंडातून हवी ती वाद्ये आणायची परवानगी दिली. त्यांनी परवानगी देताच मी मुंबईला जाऊन सतार व संतूर ही दोन वाद्ये आणली. आणि स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. यवतमाळचा नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक विभागात तबला वादन करून सहकार्य करणारा मित्र शेखर सरोदे, उस्ताद शेख दाऊद खान यांच्याकडे तबल्याच्या उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला होता. तेथे माझी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केली होती. त्या निमित्त हैदराबादला गेलो असता तेथून एक स्वरमंडळ घेऊन आलो. त्याचेही पैसे मला शाळेकडून मिळाले. माझी मेहनत हळूहळू रंग भरत होती. शाळेतील 26 जानेवारी म्हणजे तीन दिवसांचा नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवच असायचा. या तिन्हीमध्ये माझा सहभाग अनिवार्य असल्यामुळे आर्णी व परिसरातील रसिकांची ओळख व्हायला लागली. म्हणून मी गावातील रसिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मित्र मिळून 'स्वर-गंगा' नावाची (बिन पगारी, फुल अधिकारी) संस्था स्थापन केली.या संस्थेचे उद्घाटन अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचे शिष्य पं. मनोहरराव कासलीकर यांच्या गायनाने केले. या कार्यक्रमाला आर्णी व परिसरातील रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम बुटले गुरुजींच्या परवानगीने शाळेच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता. एकीकडे यवतमाळचा ऑर्केस्ट्रा, दुसरीकडे माझे सोलो कार्यक्रम या व्यतिरिक्त शाळा व संगीत वर्ग अशी खूप ओढाताण होत होती. पण जिद्द आणि मेहनत करण्याची मानसिक तयारी हे सर्व माझ्याकडून करून घेत होती. वरील सगळ्या बाबींमुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींप्रमाणेच माझ्यातील नसलेल्या चुका दाखवून मुख्याध्यापक व संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडे चुगल्या करणारी मंडळी पण तयार होऊ लागली. पण हे प्रमाण कमी होते. तसेच मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष माझी ससेहोलपट बघत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत कुठलेच प्रकरण आले नाही. माझी कार्यशैली, स्वच्छ चारित्र्य, स्वाभिमानी स्वभाव, शाळेतील शिक्षक म्हणून ठेवलेली आब याबद्दल संस्थाध्यक्ष माझ्या बाबतीत अत्यंत उदार धोरण ठेवून होते.

000000

क्रमशः

---------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती. रविवार दि.१३ जुलै २०२६

प्रमाण व बोली भाषा...



   महाराष्ट्रात विविध बोली भाषा बोलल्या जातत.या विविध बोलीभाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रमाण भाषेच्या अत्याभिमानी (दुराभिमानी) लोकांनी बोली भाषेचे आभार मानायला हवे.'पानी' या शब्दावरून हिणवणाऱ्या विद्वानांना विदर्भ हा मध्यप्रदेशात होता.त्यामुळे तेथील बोलीभाषेत पाण्याला हिंदी प्रमाणे पानी उच्चारल्या गेले.अजूनही बरेच ग्रामीण लोक असाच उच्चार करतात.ही त्यांची चूक नाही.विदर्भातीलच झाडीपट्टीच्या भागात अजूनही'ज' चा उच्चार 'ज्य' असाच करतात.अकोल्याकडे 'ळ' चा उच्चार 'ड' सदृश्य होतो.बहिणाबाईंचे काव्य प्रमाण भाषेत नाही म्हणून ते टाकावू ठरते काय?महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांच्या भक्तीगीतांमधून बोलीभाषेतील अनेक शब्द वापरले आहेत.लीळाचरित्र,ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आले आहेत.मग लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीकडे पण तुच्छतेने बघाल काय?महाराष्ट्रातील बोली भाषेची अशी शेकडो उदाहरणे देता येईल.असो!

"अति शहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण उगाच पडली नसावी.

'प्रार्थना' वंदना विटणकर


     वंदना विटणकर यांची ही कविता महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच (पुणे) विभागा करीत स्वरबद्ध करून पुण्यातील अनेक प्रशिक्षण वर्गातून महाराष्ट्रातील संगीत शिक्षकांना शिकविली होती.आर्णीच्या माझ्या संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केली होती तो व्हीडिओ मिळाला...सादर आहे.


हे प्रभो जगदीश्वरा स्वीकार आमुची प्रार्थना

सन्मती देई सदा फुलवी मनी सद्भावना...


प्रेममय रूपे तुझी विश्वात साऱ्या व्यापली

जीवनाची धारणा चरणी तुझ्या सामावली

थोर हा महिमा तुझा गण्यास देई प्रेरणा..


झळकसी गगनातुनी हसतोस तू सुमनातुनी

होऊनी जलधार तू देतोस रे संजीवनी

सर्वदा आनंददाता तूच देवा पावना...


लोपवी अज्ञान हे सृजनत्व देई ईश्वरा

हो कृपेची साउली सकलास तू करुणाकरा

उजळुनी अंधार ने तेजाकडे जनजीवना...

डावीकडून...तबला - निषाद कदम,,गायक - सच्चिदानंद डाखोरे,रेणू कदम,भाग्यश्री जाधव.साईड रिदम - किशोर कोरडे.हार्मोनियम - अस्मादिक.


●headphone please


'काळोखाच्या तपोवनातून' काव्यसंग्रह समीक्षा.


 .                       '#काळोखाच्या_तपोवनातून' 

    सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता.


        मराठीचे आद्य गझलगायक  असलेले आणि #गझलगंधर्व  या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' ह्या संग्रहा द्वारे झालेलीच आहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम #गीतकार, #गझलकार, #अभंग रचनाकार, सशक्त #विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,


 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात

 राबतो शेतात। सालोसाल...

 जीवापलीकडे। मेहनत करी

 तरीही भाकरी। मिळेचि ना...

  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी

 लिही कादंबरी। मुंबईत...


      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,


 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल

 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल


      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,


 किती संकटे येऊ दे

 दूर ठेऊया दुःखाला

 तू  असता संगे माझ्या

 घरपण येई घरट्याला


       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,


अवघं लाघव हिरवं तुडुंब

द्यावी वाटे येथे मनालाही डूब

भरल्या  शेताच दर्शन घडता

सृष्टीपुढे झुके आपसुक माथा


      बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,


 वेदनेला येई। उदयास्ती रंग

 रोजची दुपार। पेटवीते अंग

 देहा फुटे झरा। पाणी शोधताना

 कोस कोस धाव। वेगाने घेताना

 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके

 जनावरांचेही। हंबरणे मुके


      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,


डोईवर एक। दुजी कटीवर

घेउनी घागर। सुंदरी ही...


      अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.


 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण

 बासरीची तान। नसे तेथे...

 (भुलवा)


 किंवा


 ना मी कृष्णा ना तू राधा

 का व्हावी गे सावळ बाधा ?


      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,


 ना महाभारत, न रामायण तरीही

 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला


      असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,


सासुरवासिनी 

चाहूल घेऊन 

सडासंमार्जन 

करो लागे...


      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.


 किती प्रबोधन केले तरीही

 जात नसे त्या असती जाती


       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.


 विश्वात्मकतेला

 चौकटीत कोणी

 बांधतो अज्ञानी

 न्यूनगंडे...


       अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,


 आकळेल अर्थ

 घालता आवर्त

 एका एका आर्त

 शब्दाचा तो...

 शब्दाचा तो भाव

 समजून घेता

 संपेल आर्तता

 मनातील...


      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!


 -किरण शिवहर डोंगरदिवे

 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर

 ता मेहकर जि बुलढाणा 443301

मोबा 7588565576


 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)

 सुधाकर कदम  मो.8888858850

 स्वयं प्रकाशन पुणे

 पृष्ठ 96, किंमत 150

---------------------------

Tuesday, June 30, 2026

पियानो...उ.रा.गिरी


 या एकलेपणाचा छेडीत मी पियानो

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो

तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
का जागता तुम्हीही माझ्यासवे कळ्यांनो

शब्दात आसवांची बांधू कशी समाधी
व्हा हद्दपार आता डोळ्यातल्या तळ्यांनो

व्याकूल यामिनीला कुठली पहाट माझ्या
आता उषा उद्याची विसरून जा दिशांनो
                      ◆●◆


नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दै. तरुण भारतचे माजी संपादक  वामन तेलंग यांना जाऊन तिथीप्रमाणे पाच वर्ष झालीत.

                त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

                               🌹🙏🌹

-----------------------------------------------------------------------

  ●सोबत नागपुरातील माझ्या कार्यक्रमावरील त्यांचा लेख. 

         #तरुण_भारत/#मध्यमा/बुधवार/दि. २७ जून/८४

    दि. १५ जून. वेळ सायंकाळची. नागपुरात पावसाची एखाद-दुसरी सर येऊन गेलेली. बाताबरण काहीसे निवळलेले, पण उष्मा कमालीचा, तरीही धनवटे रंग मंदिर रसिक श्रोत्यांनी भरलेले. गच्च वगैरे नाही. तशी अपेक्षा कुणाचीही नव्हती. कार्यक्रम थोडा वेगळा होता. मराठी गीत गझल गायनाचा. कलावंतही नवा होता. सुधाकर कदम, धनवटे रंग मंदिरात आपला कार्यक्रम व्हावा चांगल्या उपस्थितीत व्हावा अशी सुधाकरची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तसे विदर्भात आणि मराठवाडचात त्याचे कार्यक्रम झाले होते. पुणे, कोल्हापूर, मुंबई इकडेही त्याने दाद घेतली होती. यवतमाळ जिल्हयात तर तो ख्यातच होता. राहणारा त्याच जिल्ह्यातला आर्णीचा. त्यामु‌ळे त्या परिसरात तो प्रसिद्ध होता आणि स्वाभाविकच धनवटे रंग मंदिर गाजवावे अशी त्याची इच्छा होती. योग जुळून आला. ड्रॅमॅटिक टॅलेन्ट्स' ही संस्था पुढे आली. श्रद्धा पराते, अरुणा पवार, आणि अन्य चाहते मदतीला धावले, रंग मंदिर श्रोत्यांनी बऱ्यापैकी भरले, प्रारंभिक उपचार आटोपले आणि नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.

     वेळ सायंकाळची, सायंकाळच्या प्रार्थनेची. कवठेकरांनी ओळ दिली...

'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे... 

आणि सुधाकर कदमांनी सूर लावला. आवाज मोकळा, जरा जाडा. उच्यार स्पष्ट, गीत-सुरेश भटांचे, साथीला तबल्यावर श्री. माहुलकर, शब्द आणि सूर यांचे नाते जुळले. कदमांची मराठी गीत-गझलांची ही मैफल मग रंगू लागली.

     'गझल' हा उर्दू-हिदीचा लास बाज. त्याचा चाहता वर्गही फार मोठा. तुलनेत मराठी बाण्याची गझल म्हणजे जेमतेमच. कविवर्य सुरेश भटांनी ती अलिकडच्या काळात रुजवली-फूलबली, आपला असा एक प्रवाहच भटांनी निर्माण केला. या प्रवाहात मग अनेक कवी सामील झाले. अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, अमरावतीचा सांगोळे ही त्यातली काही महत्त्वाची नावे

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना 

आरती जी गात आहे तीच माझी वेदना...

     -हघा ओळी श्रीकृष्ण राऊतच्या. (डॅडी देशमुखांच्या सिनेमासाठीही त्याने गीते लिहिली आहेत.) सुरेश भटांच्या गझलांबरो बरच कदमांनी हे ही गीत पेश केले आणि दाद घेतली.तसा मराठी माणूस दाद वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. कविता गझल वगैरे लिहिण्याच्या आणि अन्यही सांस्कृतिक भानगडी तो करतो पण हवी तशी दाद काही त्यांच्याकडून जात नाही. कदमांच्या कार्य क्रमात मात्र जरा वेगळेच दृश्य दिसले.

     नारायण कुळकर्णी कवठेकरांनीही कधी पाडगावकरांच्या, कधी बोरकरांच्या, कधी उर्दू कवींच्या तर कधी स्वतःच्याही मार्मिक ओळी नमूद करीत कार्यक्रमाला अनुकूल असे वातावरण सारखे जिवंत ठेवले.आणि रसिकांनी हा कार्यकम उचलून धरला.

'सायंकाळी म्हणाव्यात कविता रात्री 

गावी गझल सकाळी म्हणावे स्तोत्र

दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र

    -हया ओळी स्वतः कवठेकरांच्या. वास्तवाचे भान जागवणाऱ्या अन् त्याच बरोबर श्रोत्यांना एकदम विश्वासात घेणाऱ्या, आश्वासक शब्दांनी कवितांच्या ओळींची पेरणी करीत करीत कवठेकरांनी कार्यक्रमाचे सारथ्य केले आणि कदमांनी सुरेश भट, उ. रा. गिरी, अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, आर्णीचाच कलीम खान आदींच्या सरस रचना पेश करीत हा कार्यक्रम यशस्वी केला. कधी शृंगाराचे विभ्रम, कधी याचना, कधी यातना असे नानाविध भाव कदमांनी जागे केले.

'पहाटे पहाटे मला जाग आली 

तुझी रेशमाची मिठी मैल झाली'


असा नर्म शृंगार फुलवित असताना 

'जवळ येता तुझ्या दूर सरतस तू

ऐनवेळी अशी काय करतेस तू'

अशी काहीशी लाडिक अनु घोडी धीट रचनाही सादर करून कदमांनी श्रोत्यांची तब्येत खुश केली.

     प्रेम, विहर, विरहातील आर्तता, शृंगा राच्या कला हा नेहमीच कवींच्या आणि गीत-रचनाकारांच्या तब्येतीचा विषय राहिला आहे. 

'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची

तापलेल्या अधीर पाण्याची' 

ह्या ओळी लिहिणे तसे सोपे आहे. कवी त्यात रमतो आणि इतरेजनांना रमवतोही पण त्या सोबतच कलावंत कवीच्या भाळी दुःखाचा एक अभिलेखही लिहिलेला असतो. हा अभिलेख त्याचे बलस्थान असते.

     गीत-गझलांची निवड, सूर यांचा दिलेला त्याला साज व सादरीकरण प्रत्येकच बाबतीत एक अभिजात चोखंदळपणा सिद्ध करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता दुःखाच्या अमिट अभिलेखाने झली. रचना होती उ. रा. गिरी यांची. स्वर होते अर्थातच सुधाकर कदमांचे आणि दाद घेणारी याचना होती-


'पा एकलेपणाचा छेडीत मी पियानो 

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरानो

-वामन तेलंग

Monday, June 29, 2026

आली लाजत आज सकाळ...कवी-उ.रा.गिरी



     जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.

           कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच. 

एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की , हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर लेलेल्या वक्तव्यात आहे.

          आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पुर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली"तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...

           भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.

           अशा वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात विदर्भातील लाखपुरी या गावचे कवी #उ_रा_गिरी यांची पाठ्यपुस्तकात असलेली ही कविता १९८६ मध्ये स्वरबद्ध करून शालेय वाद्यवृंदासह गाऊन घेतली.(त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक उठाव या मोहिमे अंतर्गत इयत्ता १ ते १० च्या पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून #झुला या शिर्षकांतर्गत तीन कॅसेट तयार केल्या होत्या.याचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांचे हस्ते करण्यात आले होते.त्यातीलच ही कविता आहे.) ध्वनिमुद्रण आर्णीच्या आमच्या मुख्याध्यापकांच्या (#शंकरराव_बुटले) घरी केले.१९६५ ते १९७५ अशी दहा वर्षे ऑर्केस्ट्रात संगीत संयोजक म्हणून काढल्यामुळे वाद्यपरिचय व वाद्यमेळ जमवण्याचा अनुभव होता तो येथे कामी आला.माझा हा ग्रामीण प्रयत्न आपल्यासमोर ठेवत आहे...आवडणे न आवडणे तुमच्या हातात आहे....


आली लाजत आज सकाळ

मेंदी भरल्या चरणी बांधुन 

सोनफुलांचे चाळ


किरणांचे भुरभुरते कुंतल

निळसर शुभ्र धुक्याचा अंचल

शुभ कोवळ्या दवबिंदूंची 

गळ्यात मोहनमाळ


ती येता किणकिणला कण कण

रोमांचित थरथरला क्षण क्षण

लहरत गेली मधुर एक स्वर 

लकेर रानोमाळ


दरवळला वाऱ्यावर परिमल

दुनिया बनली अलका स्वप्निल

मुक्त हासले क्षणभर आणिक 

जीवन हे खडकाळ


गायिका - गीता पंत (यवतमाळ)

कवी - उ.रा.गिरी 

संगीत - सुधाकर कदम (आर्णी,यवतमाळ)

ढोलकी - खंदारे गुरुजी (पुसद,यवतमाळ)

कॅसिओ - दस्तुरखुद्द

सहकारी - घोडेराव गुरुजी,मरगडे गुरुजी,अविनाश गिरी,प्रकाश करपे.

Thursday, June 25, 2026

जशी स्वीकारली फकिरी-कविता



स्केच



ढग-कविता



कविता


 

भारतीय नागरिक

 


येता येता गेला पाऊस...


 येता येता गेला पाऊस

असा कसा हा वेडा पाऊस


अजून ओले पान मनाचे

जरी पुराणा झाला पाऊस


किती दिसांनी भेटलीस तू

किती दिसांनी पडला पाऊस


मेघ दाटले तुझे मनी अन्

डोळ्यांमधुनी झरला पाऊस


आठवणींच्या नभात उरला

फक्त तुझा अन् माझा पाऊस


गायक - सुरेश वाडकर,वैशाली माडे

शब्द - दिलीप पांढरपट्टे

संगीत - सुधाकर कदम

Saturday, June 13, 2026

●फडे मधुर खावया●

                                  (लेखांक ३३)

                            ●फडे मधुर खावया●

    मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली आहे. 

     प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.

     मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हसल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !

     आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्‌गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'

     सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!

दै. विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.१४/६/३०२६

Friday, June 12, 2026

अवखळ मन...

 


माझ्या रचनेवर सुरावट येणे फार कमी वेळा घडते.
आल्यावर तीचा राग शोधायला जावे तर कोड्यात पडतो.नुकतीच ध्वनिमुद्रित झालेली ही रचना कोणत्या रागात आहे हे आपण रसिकांनीच सांगावे...

अवखळ मन हे ऐकत नाही
होई भरकट पुन्हा पुन्हा ही

किती बंधने घाला त्यावर
तरी होतसे पुन्हा प्रवाही

धरती अंबर जेथे मिळते
त्या क्षितिजाला अंतच नाही

साधे सोपे असूनही पण
गूढ भासते सारे काही

गायक - मयूर महाजन
तबला - अपूर्व द्रविड
सतार - प्रसाद गोंदकर
गिटार - राधिका अंतुरकर
संगीत संयोजक - मिलिंद गुणे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.
मिक्सिंग,मास्टरिंग - अजय अत्रे

Thursday, June 11, 2026

राग-रंग...मल्हार




बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे
मज वेड असे पण आंनद मल्हाराचे
 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.
     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.
     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.
    
     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...
 ●हिंदी
          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)
'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,
गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'
(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.
●मराठी
'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.
'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.
      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...
       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.
       
(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी
लागतात.)
-------------------------------------------------------------------------
● दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.



आसवांचे जरी हसे झाले

       १९८० मध्ये सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले असताना रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा सुरु असताना एकदम काय झाले माहीत नाही.एक गझल मला लिहून घ्यायला सांगितली व जरा यमनच्या स्वरात गुणगुणून दाखवता काय? (ही विनंतीवजा आज्ञाच होती) असे विचारले. मतला होता... 


आसवांचे जरी हसे झाले

हे तुला पाहिजे तसे झाले


यमन हा दोघांच्याही आवडीचा राग...त्यांनी सहज म्हटले व मी पण सहज गंमत म्हणून हार्मोनियम घेऊन यमनची सुरावट छेडत बसलो. चाल बसवणे हा उद्देश नसताना आणि निव्वळ फावल्या वेळेतील गप्पा सुरू असताना यमन छेडता छेडता सहजच सुचलेली सुरावटीत त्यांना ऐकविली.लगेच "व्वा! क्या बात है कदम साहेब" अशी मजेशीर दाद देऊन ते पलंगावर पहुडले. आम्ही पण झोपण्याची तयारी करायला लागलो.पाच-दहा मिनिटातच 'ती जरा पुन्हा एकदा ऐकवता काय?' अशी विचारणा केली.मी पुनः हार्मोनियम काढली व सुरावट आठविण्याचा प्रयत्न करायला लागलो.कारण गंमत म्हणून सहज गुणगुणलो होतो.बऱ्याच प्रयत्नानंतर थोड्या फार फरकाने आठवली.आणि जशी आठवली तशी भटांना ऐकवली.त्यानंतर ते व आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


     आज हे आठविण्याचे कारण म्हणजे जीर्ण झालेली जुनी डायरी...मी सध्या मुलीकडे नांदेड सिटीला मुक्कामी आहे.१४ तारखेला सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी मैफल जमवावी म्हणून मयूर, प्राजक्ताला फोन केला.


     मयूरकडे सुरेश भटांच्या शिकविलेल्या माझ्या बंदीशींच्या  बऱ्याच गझला आहेत.अनेक कार्यक्रमातून त्याने सादर केल्या आहेत.पण प्राजक्ताकडे माझ्या बंदीशीची सुरेश भटांची एकही गझल नव्हती.म्हणून मग वारजे येथील माझ्या निवास स्थानावरून निषादला डायरी पाठवायला सांगितली.तर त्याने सगळ्या डायऱ्या पाठवून दिल्या.माझ्या शेवटच्या (म्हणजे मी कार्यक्रम करीत असतानाच्या वेळची) डायरीतील दोन गझला मोबाईलवर गाऊन तयार करण्यासाठी प्राजक्ताला पाठविल्या.नंतर १९७५ पासूनची जुनी डायरी चाळायला लागलो.त्यात ही गझल दिसली.व जुनी 'आठवण' ताजी झाली.बस्स!इतकेच... 


आसवांचे जरी हसे झाले,

हे तुला पाहिजे तसे झाले


चंद्र आला निघूनही गेला

ऐन वेळ असे कसे झाले


शोधुनी मी तुला कुठे शोधू

चेहऱ्यांचेच आरसे झाले


संपले हाय बोलणे माझे

जे तुझ्याशी कसे बसे झाले

दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.८/६/२०२६





संगीत आणि साहित्य :