गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 6, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १७)

     
      ●पाऊस असा घनघोर नदील पूर●

     पुण्याला स्थायिक झाल्यावर २००३ मध्ये समीर चव्हाणशी ओळख झाली.(पुढे तो माझा जावई झाला.) त्याने पुण्यातील प्रसिद्ध उर्दू शायर हनीफ़ साग़र यांच्या गझलांचा दिवान वाचायला दिला.गझला इतक्या उत्कृष्ट व मनभावन होत्या की वाचता वाचता सुरावटी येत गेल्या.१०/१२ गझला स्वरबद्ध झाल्यावर समीरने हनीफ़ साग़रांचे शागिर्द हमीदभाई यांना ऐकण्यास निमंत्रित केले.त्यांना हा उपक्रम खूप आवडला.कारण अशा प्रकारे त्यांच्या गझला कोणी स्वरबद्ध केल्या नव्हत्या. लगेच त्यांनी पुण्यातील गझल प्रेमींना ह्या उपक्रमाची माहिती दिली.त्याची परिणीती साग़र साहेबांच्या बरसी निमित्त एक मोठा कार्यक्रम करण्याचे ठरण्यात झाली. आणि बालगंधर्वमध्ये याचे आयोजन करण्यात आले.बालगंधर्व बुक झाल्यावर आमची रोज प्रॅक्टिस असायची.मुलगा निषाद,मुली भैरवी आणि रेणू तिघेही पुण्यात शिकत होते. म्हणजे त्यांची विद्यार्थी दशाच होती.आणि हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच मोठा आणि तो ही उर्दू गझलांचा कार्यक्रम होता.या अगोदर 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत मी स्वरबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीत-गझलांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते.पण ह्या कार्यक्रमाचे महत्व त्यांच्या दृष्टीने मोठे होते.असेच एक दिवस प्रॅक्टिस संपल्यावर माझ्या पुतणीने  'मोठे बाबा, तुम्हाला चाली कशा सुचतात'? असा प्रश्न केला.खरे तर मी सतत वाचत राहतो आणि वाचता वाचता सुरावटी येतात.पण तिला हे सगळे सांगण्यापेक्षा हाताशीच असलेला मित्रवर्य स्व.अनिल कांबळेचा कविता संग्रह उघडला व त्यातील समोर आलेली कविता गंमत म्हणून ताबडतोब म्हणून दाखवली.तिचे समाधान झाले.पण आलेल्या सुरावटीने मात्र माझी झोप उडविली.गमती गमतीत थोडा अरेबियन टच असलेली सुरावट आली होती.त्यावर बरेच संस्कार करून अनिलनेच त्याच्या 'युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन' संस्थेतर्फे एस.एम.जोशी सभागृहात (२८ मे २००३) आयोजित केलेल्या 'सरगम तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात सादर केली.या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन प्रसिद्ध कवी मित्रवर्य नारायण कुलळकर्णी कवठेकर यांनी केले होते.प्रास्ताविक कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व मनोगत तथा पाहुण्यांचे स्वागत अनिलने  केले.तसेच श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे,डॉ.विकास कशाळकर वगैरे दिग्गज मंडळी होती. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ज्या कॅसेटवर केले ती खराब निघाल्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नाही.आणि कॅसेटवरून कॉम्प्युटरमध्ये उतरवणे हा द्राविडी प्राणायाम करताना आणखीच क्वालिटी बिघडत जाणे असा प्रकार झाला.पण एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग असल्यामुळे तो आपल्या समोर ठेवावासा वाटला. आवडणे,नावडणे आपल्या हातात आहे.....


 





संगीत आणि साहित्य :