सौंदर्याची अनंत रूपे आहेत.त्याच्या अभिव्यक्तीची साधने पण अनेक आहेत.या सौंदर्यापासून मिळणारा आनंदही अपरंपार आहे. त्यामुळे सौंदर्य आणि त्याच्या अनुभूतीने होणाऱ्या आनंदाच्या रुपांवर विचार करणारे शास्त्र पण त्यातील रुपांकडे बघता चिंतन करायला प्रवृत्त करून करत.ज्या प्रमाणे आपली वडीलधारी मंडळी आपल्याला बोट पकडून चालायला शिकवतात व आपण चालायला शिकतो.आणि आपल्या पायावर चालता येऊ लागल्यावर निश्चित होऊन आपले बोट सोडून देते. त्याच प्रकारे ज्याला 'शास्त्र' म्हणतात ते आपल्याला आपल्या पूर्वजांनी जे दिलेलं आहे ते आपल्या चिंतनशक्तीला परिपक्व बनवते आणि स्वतंत्र विचार करण्याला प्रेरित करते.ज्यात हे गुण नाहीत ते अपरिपक्व विचाराचे कितीही घनदाट अरण्य असले तरी ते शास्त्र होऊ शकत नाही. 'शास्ता'चा अर्थ 'गुरू', शिष्या'चा अर्थ 'शिक्षापात्र', आणि 'शास्त्रा'चा अर्थ 'शिक्षण देण्याचे साधन'! जर वास्तविक रुपात एखादा ग्रंथ 'शास्त्र' असेल,तर तो शिक्षण देण्याचे साधन पण असू शकतो.जर काल तो शिष्य असेल तर तोच आज गुरूही असतो.म्हणून खरे शास्त्र गुरुचे पण गुरू असते.फक्त ते 'सच्चे' असायला हवे.
मनुष्याच्या आयुष्यातीळ संसारिक चिंतांमधून मुक्त करण्यासाठी वा थकलेल्या देहाला अलौकिक सुख प्राप्त करुन देण्यासाठी संगीताची निर्मिती झाली आहे.ज्या संगीतामध्ये तसे अलौकिक सुख देऊन काही काळापुरते का होईना चिंतामुक्त करण्याची शक्ती असेल त्यालाच संगीत म्हणता येईल.अन्यथा तो फक्त गोंगाट आहे.मग ती कोणतीही शैली वा प्रकार असो.
कोणत्याही सप्तकातील आरोह-अवरोह म्हणजे राग नव्हे.अलंकार किंवा पलटे पण राग नव्हे.विशिष्ठ क्रमवारीने केल्या जाणारा प्रयोग,ज्यात विशिष्ठ स्वरांवर करण्यात येत असलेला ठहराव,हळू हळू होत जाणारी रागाची स्थापना, ज्याच्या आधारावर रागाची 'बढत' केल्या जाते ते या स्थापनेचे चार 'स्थान' किंवा 'मुकाम' म्हणजे राग होय. ही बढतच श्रोत्यांना 'तो' आनंद देऊ शकते,ज्यातून त्याचे दुःख-चिंता दूर होते.असे करण्याची शक्ती म्हणजेच संगीत होय.अशी शक्ती प्रत्येक रागात आहे.फक्त त्या त्या रागांचा योग्य प्रकारे उपयोग करता यायला हवा.आता पुरीया धनाश्री रागाचेच बघा! कोमल रिषभ,धैवत असूनही किती विविध प्रकारची गाणी संगीतकारांनी तयार केली आहे.विरह,दुःख,शृंगार,प्रेम सगळं काही त्याच स्वरातून...
राग पुरिया धनाश्री पूर्वी थाटातून निर्माण झालेला एक सायंकालीन संधीप्रकाश राग आहे. (पुर्वी थाटातून निर्माण झालेले काही प्रमुख राग :-‘जैतश्री’, ‘परज’, ‘श्री’, ‘गौरी’, ‘वसंत’ वगैरे.) हा राग करुण रस प्रधान व गंभीर मानल्या जातो.याला जवळचा राग पूर्वी आहे. यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो. पुरीया धनाश्रीमध्ये पंचम स्वर अतिशय महत्वपूर्ण आहे. संपूर्ण राग पंचमाभोवती विणल्यासारखा वाटतो.उत्तरांगातील आरोहात याचा प्रयोग थोडा कमी होतो.हा या रागाचा वादी स्वर आहे.
पंडित भातखंडे कृत क्रमिक पुस्तक मालिकेच्या चौथ्या भागातील (हिंदी प्रथमावृत्ती) पृष्ठ क्रमांक ३४३ वर पुरिया धनाश्री रागाचा वादी स्वर पंचम व संवादी स्वर रिषभ मानला आहे.नियमाप्रमाणे वादी संवादी स्वरांमध्ये षड्ज पंचम वा षड्ज मध्यम भाव असणे आवश्यक असते.पण पंचम रिषभात असा भाव दिसत नाही.त्यामुळे रिषभाला संवादी स्वर मानणे योग्य वाटत नाही.तसेच पुरीया धनाश्रीतील कोमल रिषभावर कधीच न्यास केल्या जात नाही.त्यामुळे पुरिया धनाश्रीत कोमल रिषभाऐवजी षड्जाला संवादी स्वर मानणे योग्य वाटते.
पुरिया धनाश्री या नावामुळे हा राग पुरिया व धनाश्री या दोन रागांच्या मिश्रणातून तयार झाला हे स्पष्ट होते. पण प्रचलित धनाश्री काफी थाटातून उत्पन्न झाला आहे.यात गांधार निषाद स्वर कोमल आहेत.त्यामुळे अनेक गायक/वादक पुरिया धनाश्रीला स्वतंत्र राग मानतात.पण तसे नाही,यात पूर्वी थाटजन्य धनाश्री व पुरिया रागांचे मिश्रण आहे.
(अकबराच्या समकालीन काही ऐतिहासिक तथ्य व दंतकथांवर आधारित चित्रपट बैजू बावरा १९५२ मध्ये प्रदर्शित झाला.ऐतिहासिक कथानक आणि शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी,यामुळे चित्रपटाला अमाप यश मिळाले.भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांमुळे आजही रसिकप्रिय मंडळी ही गाणी ऐकताना दिसतात.चित्रपटाच्या सुरवातीलाच पुरीया धनश्रीच्या स्वरांनी सजलेले,उस्ताद अमीर खान यांनी गायिलेले गीत सुरू होते.याचे चित्रीकरण अकबराच्या दरबारातील संगीततज्ञ तानसेन याला आपल्या महालात रियाज करताना दाखविले आहे.या रचनेत तानसेनाचे नाव आलेले आहे.)
● पुरीया धनाश्रीवर आधारित चित्रपट गीते...
'तोरी जय जय करतारा' उस्ताद अमीर खान.चित्रपट-बैजू बावरा.संगीत निर्देशक-नौशाद (१९५२).
ल'रुक जा बनवासी राम' चित्रपट-संपूर्ण रामायण (१९६१).
'प्रेम लगाना' आशा भोसले. चित्रपट-सूरत और सीरत. संगीत-रोशन (१९६२).
'हम कश्मकशे गम से गुजर क्यूँ नहीं जाते' लता.चित्रपट-फ्री लव्ह.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७४).
'मेरी सांसों को जो महका रही है' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-बदलते रिश्ते.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७८).
'तुमने क्या किया है हमारे लिए' आशा भोसले. चित्रपट-प्रेम गीत. संगीत-जगजीत सिंग (१९८१).
'सांझ ढले गगन तले' सुरेश वाडकर. चित्रपट-उत्सव,
संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९८४).
'कितने दिनों के बाद है आई सजना रात मिलन की' संगीत-आनंद मिलिंद (१९९१).
'आ के तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी' लता,
बालसुब्रह्मण्यम.चित्रपट -वंश.संगीत-आनंद मिलिंद (१९९२).
'हाय रामा ये क्या हुवा' हरिहरन,स्वर्णलता.
चित्रपट-रंगीला.संगीत-ए.आर.रहमान (१९९५).
'लबों से चूम लो,आंखों से थाम लो मुझ को' गायिका-श्रीराधा बनर्जी. चित्रपट-आस्था: इन द प्रिज़न ऑफ स्प्रिंग.संगीत-सारंग देव (१९९७).
'रुत आ गई रे रुत छा गई रे' सुखविंदर सिंग.चित्रपट-१९४७ अर्थ, संगीत-ए.आर.रहमान (१९९९). '
● गैर फिल्मी...
'कोयलिया उड जा यहां नहीं कोया' मुकेश. (कोयलिया तेरे बोल)गैर फिल्म. (१९६९).
होट सागर है आँख पैमाना' गुलाम अली.
'पहली बरसात लौट आऊंगा' गुलाम अली.
● मराठी
'जिवलगा राहिले रे दूर घर माझे' आशा. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
माझे मन तुझे झाले,तुझे मन माझे झाले' प्रियांका बर्वे. गीत/संगीत-सुधीर मोघे,टीव्ही मालिका 'स्वामी'.
'या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' लता.संगीत-श्रीनिवास खळे.अल्बम 'जिव्हाळा'.
'सांग प्रिये सांग प्रिये' गायक-रामदास कामत
'श्रीरामाचे चरण धरावे' सुमन कल्याणपूर
'ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा' सुधीर फडके.गीत रामायण.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१९/११/२०२३