सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : मराठी विभाग आयोजित "मराठी गझलेचा जागतिक संचार" ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील मराठी गझल गायकीच्या सत्रातील अध्यक्षपदावरून व्यक्त केलेले मनोगत...दि.१२ व १३ जानेवारी २०१७.

रसिकहो...
मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल गझलसारखी गाण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही...असे मी म्हणत नाही.तर सुरेश भट,सु्प्रसिद्ध संगीतकार यशवंत देवांसारखी दिग्गज मंडळी म्हणतात...माझ्यापासून सुरू झालेली परंपरा आज अधिक लोकाभिमूख होऊन या परंपरेचे पाईक आज येथे जमले आहेत,याचा मला खूप आनंद होत आहे.
    सुरवातीला मराठी गझल गायन हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठी मध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच गायकी पण उर्दू गझल गायकांकडूनच घ्यावी लागली.आणि गायचे म्हणजे नुसते या गायकांचे अंधानुकरण करूनही भागणार नव्हते.तर प्रत्येकाची गझल गाण्याची पद्धत,बंदिशीची बांधणी,शब्दानुरूप वेग-वेगळ्या स्वरगुच्छांची पखरण,शब्द फेक,शेर सादर करण्याची पद्धत तसेच श्रोत्यांना आपलेसे करण्याची हातोटी,सादरीकरणातील जोरकसपणा व हळुवारपणातील बारकावे,या सगळ्यांना साजेसे व्यक्तिमत्व आणि योग्य साथीदारांची योग्य संगत म्हणले गायकीची रंगत होय.
या बाबतीत पंडित रामकृष्णबुवा वझे म्हणतात...

“गझल गायकीला आपलं असं स्वत:चं एक आगळं वेगळं अती मोहक स्थान आहे.शब्दोच्चार स्पष्ट असले आणि ते विविध अंगांनी नटविण्याची कुवत गायकात असेल तर गझल गायनातून ख्याल गायना इतकी रसोत्पत्ती होऊ शकते आणि ती सुलभ रीत्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकते.”

यवतमाळचे कवी मित्र शंकर बडे यांनी लिहीलेली

"आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही,
आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही..


ही १९७५ मध्ये स्वरबद्ध केलेली माझी पहिली गझल होय.
( मी स्वरबद्ध केलेली पहिली कविता.."चल आपण दोघे लहान होऊ या,बालपणीचा काळ सुखाचा फिरुनी पाहू या’ ही होय...वर्ष १९६५...ऑर्केस्ट्राचा काळ.कवी कोण ते आता आठवत नाही.आणि गायकाने कवीचे नाव लक्षात ठेवावे वा श्रोत्यांना ते सांगावे हे कळण्याचे ते वयही (१६ वर्षे) नव्हते.)
     त्या नंतर सुरेश भट व मी...असे आमचे "अशी गावी मराठी गझल" हा अभुतपूर्व कार्यक्रम महाराष्ट्रभर सुरू झाला.मराठी गझल व गझल गायकी महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी १९८२ पर्यंत अक्षरश: वणवणलो...माझ्या या सुरेश भटांसोबतच्या गायकीच्या प्रवासाचे दोन साक्षीदार येथे उपस्थित आहेत.ते म्हणजे शाहीर सुरेशकुमार वैराळकर आणि गझलकार प्रदीप निफाडकर.
      गझल गायनाच्या कार्यक्रमात गझलांची निवड अतिशय महत्वाची असते.गझलचा मतला जर श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारा असला तर पुढील शेर श्रोते मनापासून अगदी कान लावून ऐकतात.तसेच गझलची बंदिश करतानाही अनेक अवधाने ठेवावी लागतात.गझलचे शब्द व भाव स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचतील अशी बंदिश व गायकीची पद्धत असायला हवी.तसेच एखाद्या शेरातील विशिष्ट शब्द खुलवायचा असेल तर त्याला स्वरांची वेगळी ’ट्रिटमेंट’ द्यावी लागते.नुसत्या बंदिशीने हे काम भागत नाही.खरे तर बंदिश तयार करणे हा शब्दप्रयोगच माझ्या दृष्टीने चुकीचाआहे.गझल वाचता वाचता तिच्या भावार्थामुळे एखादी सुराव्ट आतून उचंबळून येते,ती खरी बंदिश रचना होय.ती आपली नसते तर आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली व पाडलेल्या चाली यातील तफावत जाणकार श्रोते काही प्रमाणात ओळखू शकतात.शेरांची सजावट मात्र अविर्भाव-तिरोभाव,मुर्छना आदी पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे करता येते.पण त्यासाठी संगीताचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते.बंदिश बांधतानाही याचा उपयोग निश्चितच होतो.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळतेच...यासाठी गझल गायक हा चांगला संगीतकार (कंपोजर) असणे जसे आवश्यक आहे.तसेच त्याला काव्याची पण चांगली जाण असायला हवी.सोबतच वेगवेगळे प्रयोग करत रहायला हवे.असे प्रयोग करत असताना माझ्याकडून एक ऐतिहासिक बंदिश तयार झाली...ती ११ मात्रांच्या सवारी तालात...ही मराठी व हिंदी सुगम संगीताच्या इतिहासातील पहिली रचना होय... शब्द आहेत " दु:ख विसरून गायचे होते,आज मजला हसायचे होते...गझलकार डॉ.अनंत ढवळे.(ही गझल ’यू ट्यूब’वर आपण ऐकू शकता https://www.youtube.com/watch?v=mxnHwbeSNGk.)
        एक अंधश्रद्धा अशी आहे की अमक्याप्रमाणे गझल गायिली तरच ती खरी गझल गायकी…हा भ्रम नवीन गझल गायकांनी काढून टाकावा.प्रत्येकजण आपापल्या वकुबाप्रमाणे गात असतो,पाकिस्तानच्या लोकप्रिय गायक गायिकांपासून तर बेग़म अख्तर ते जगजितसिंग पर्यंतचे थोर गझल गायक गायिकांचे गायन ऐकून हे आपल्य़ा लक्षात येईलच.गझल दोन प्रकारांनी गायिल्या जाते…एक कव्वाली ढंगाने… दुसरा रागदारी अंगाने…(म्हणजे ठुमरी-दादर्‍याच्या अंगाने) कव्वाली ढंगात गाताना शब्दांना इकडून तिकडे फिरवत,मधेच वेगवेगळ्या गझलकारांचे शेर टाकत गायिल्या जाते.तर रागदारी अंगाने गाताना एकच गझल व त्यातील एखादा शेर वेगवेगळ्या सुरावटींनी सजवत सजवत गायिल्या जाते.
        आपले राग म्हणजे खरोखरच एक चमत्कार आहे…एकाच रागात शब्दानुरूप सुरावटी दिल्या तर वेगवेगळ्या भावाभिव्यक्ती करता येते. भले त्या रागाचा गानसमय कोणताही असो. “पुछो ना कैसे मै ने रैन बिताई” हे मन्ना डॆंच्या आवाजातील चित्रपटगीत अहिर भैरव रागात स्वरबद्ध केले आहे.हे गीत केव्हाही ऐका कानाला गोडच वाटते.गानसमयाप्रमाणे विचार केला तर हे फक्त सकाळीच गोड वाटायला हवे…पण तसे होत नाही.याचाच अर्थ असा की गानसमयापेक्षा शब्दांना योग्य तो स्वरसाज चढणे आवश्यक असते.मग तो राग कोणताही असो.याच रागात शंकर जयकिशन या महान संगीतकार जोडीने “बाजे पायल छम छम होके बेकरार” हे वेगळ्या बाजाचे गाणे कंपोज केले आहे.(भलेही ते रॉन उडविन या पाश्च्यात्य संगीतकाराच्या मूळ रचनेवर बेतलेले असू दे) पण ही दोन गाणी केव्हाही ऐकली तरी चांगलीच वाटतात.पिढ्या न पिढ्या अमुक राग अमुक वेळीच गायिल्या जावा हे बिंबवल्यामुळे राग-गानसमयाच्या संदर्भात मेंदूत सगळा केमिकल लोचा झाला असावा,असे मला वाटते….सांगायचे तात्पर्य असे की गझलेमध्ये सुद्धा शदांना न्याय देणारी स्वर-रचना असणे आवश्यक असते.एक आणखी उदाहरण… “घनशाम सुंदरा श्रीधरा अरूणोदय झाला”ही भूपाळी भूपाली रागात स्वरबद्ध केलेली आहे.पण भूपाली रागाचा गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.अशी ही गंमत आहे….
     गझल गायन हा प्रकार शब्द आणि स्वरांना न्याय देणारा गानप्रकार आहे.यात श्रोते काव्य व संगीताचा समतोलपणे आस्वाद घेऊ शकतात.अशा प्रकारे शाब्द-स्वरांचा मेळ साधून गायिल्या जाणारा व रसिकांच्या हृदयात थेट प्रवेश करणारा दुसरा कोणताच प्रकार नाही.हे माझे ठाम मत अतिशय विचारपूर्वक व अधिकारवाणीने मांडत आहे.
     अत्यंत महत्वाचे... गझल लेखनाची जशी परंपरा आहे तशी गझल गायनाची पण आहेच.आणि या परंपरेमध्ये अगोदरच्या कलावंताच्या योगदानाचा अभ्यास करून आपापल्या कुवतीप्रमाणे व वकुबाप्रमाणे नंतर येणारे कलावंत आपला सहयोग देत असतात.हे प्रत्येक कलावंताने कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.मग तो गझलकार असो वा गायक....
        मराठी गझल वा गझल गायकी जर जगभर पसरावी असे वाटत असेल तर प्रथम महाराष्ट्राला तिचा परिचय योग्य प्रकारे करून देणे आवश्यक वाटते.त्यासाठी मुशायर्‍याप्रमाणे वेगवेगळ्या गायकांच्या गझल गायनाचे कार्यक्रम,मराठी गझल गायन स्पर्धा गावोगावी होणे आवश्यक आहे.मी आर्णीला असताना सलग २० वर्षे हा उपक्रम राबविला,त्यातून विदर्भातील विजय गटलेवार (मुंबई),प्रा.हर्षवर्धन मानकर (अकोला),अनिल रेणकुंटलवार (यवतमाळ) सारखी मंडळी पुढे आली.पुण्यातही मासिक “गझलकट्टा” काही वर्षे आयोजित करून नवोदित गायक,गायिकांना रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मराठी गझल गायनाच्या कार्यशाळा होणे आवश्यक आहे.त्यासाठी या वयातही मी हे काम नि:शुल्क करायला तयार आहे.कारण सुरेश भट आणि मी...आमचे हे ’मिशन’ होते.यात पैसे कमवणे हा उद्देश कधीच नव्हता...ना आहे.गायन हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये विशेष प्रयत्नांची गरज असते.आणि तिथेच खरं म्ह्णजे काही होत नाही.त्यासाठी गायक तयार करायला हवे.त्यांना प्रशिक्षण मिळायला हवे,वेग-वेगळ्या पद्धतीने गझल कशी गायिल्या जाऊ शकते हे त्यांना सांगायला हवे.नेमके हेच होत नाही.गेल्या २५/३० वर्षांपासून गझल लिखाणाचा विचार करून चळवळी राबविल्या गेल्या.त्यामुळे गझलकार भरपूर व गाणारे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत,असे काहीसे झाले आहे...हे बदलायचे असेल तर सध्या गझल लिहिणार्यांेइतकीच गाणारी मंडळी पण रसिकांपुढे येणे अत्यंत आवश्यक आहे.तरच गझल व गझल गायकी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत जाईल. सुरेश भट आणि मी पदराला खार लावून,एस टी ने फिरत हे काम केले.माझ्या परीने आजही मी हे काम करीत आहे... माझ्या मार्गदर्शनाखाली दिनेश अर्जुना (मुंबई), भैरवी देव (दिल्ली),रेणू चव्हाण (कानपूर), रसिका जानोरकर (ठाणे),मयूर महाजन (पुणे), आदित्य फडके (मुंबई) ही मंडळी मराठी गझल गात आहे.आता या नव्या पिढीवर मराठी गझल गायन पुढे नेण्याची जबाबदारी आहे.त्यांनी आमचा हा वसा पुढे चालवला तर जागतिक गोष्टीला हात घालता येईल.परदेशात एक दोन गायकांचे कार्यक्रम थोड्या-फार लोकांसमोर,किंवा घरगुती मैफिली झाल्या म्हणजे मराठी गझल जगात पोहचली असे होत नाही.
शेवटी चार ओळी थोडे शब्द बदलून......

“मैं ग़ज़ल हूं...मुझे रागों से सजाया जाए
नर्म आवाज़ के जादू से जगाया जाए
सुरेश भट ने संवारा है मराठी ग़ज़ल को
मुझको नादानो के हाथों से बचाया जाए...”
धन्यवाद !

शेवटचे...
      माझे मित्र प्रदीप निफाडकर यांच्या ’गझलसम्राट सुरेश भट आणि...’ या पुस्तकातील काही अंश ८ तारखेच्या लोकसत्ता लोकरंग पुरवणीत मी वाचला.त्यात माझा उल्लेख केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे...त्यात कुठलेच फूल आता मजला पसंत नाही...या गझलला लावलेल्या चालीनंतर भट जे म्हणाले, ती भट आणि मी...आमची दोघांमधील चर्चा होती.प्रदीप तेथे नव्हता. माझ्या एका लेखात मी तो उल्लेख केला होता.त्यावरून निफाडकरांनी या पुस्तकात तो संदर्भ घेतला असावा.पण याच गझलच्या भुपेश्वरी रागाच्या बंदिशीनंतर मला “महाराष्ट्राचे मेहदी हसन” ही उपाधी लिखित स्वरूपात भटांनी दिली.याचा उल्लेख त्याने पुस्तकात केला की नाही मला माहित नाही... तसेच मी स्वरबद्ध केलेली व त्यांना अतिशय आवडलेली गझल “हा ठोकरून गेला तो ठोकरून गेला” मला प्रत्येक कार्यक्रमात ते गायला लावायचे... तसेच त्यांच्या अनेक गझला व माझ्या स्वररचना एकत्र बसून कधी दिवसा तर कधी रात्र रात्र जागून व्हायच्या..हा उल्लेखही या पुस्तकात असायला हवा... तसा असल्यास निफाडकरांना धन्यवाद ! नसल्यास जाहीर निषेध.....

-सुधाकर कदम