गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 19, 2021

गझल सुधाकर कदमची...श्रीकृष्ण राऊत.


सुधाकर कदम, ये किस चीजका नाम है?
 हे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे़ पुन्हा सांगण्याची काही गरज नाही, वाट आहे फक्त आता एकच की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कॅसेट रेकॉर्डरवर हा आवाज दर्दी गझल प्रेमींना कधी मोहिनी घालायला सुरवात करतो आणि तो नुसताच मोहिनी घालणार नाही तर त्यापुढे जाऊन थेट हृदयात त्याचे स्वतःचे घर ही करेल, आणि तुम्ही-आम्ही नुसतेच बघत राहू-ऐकत राहू़ इतकं स्वर, सौंदर्य व काळजात सरळ उतरवण्याची देखणी अदा सुधाकरच्या गळ्यात आहे़ मागेपुढे एखाद्या मैफिलीत सर्वांच्या समक्ष एखाद्या दर्दी गझल ने त्यांच्या गळ्याचे चुंबन घेतले नाही तर नवल नाही़.
 कवीला काय म्हणायचे आहे? काय सांगायचे आहे? काय सुचवायचे आहे? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो़ तरी आशयाचा एखादा पैलू, अर्थाचा एखादा पदर रसिकाला गझल वाचून पूर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ‘समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्याशिवाय राहत नाही़ तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुखवटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो़. आणि मला वाटते गझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे़ नुसत्याच गायकीचं कसब दाखवायचं असेल तर इतर गायन प्रकार काय थोडे आहेत?
 ही जाण सुधाकर कदमांना आहे़ याचा मनापासून आनंद झाला़. ती जसजशी विकसित झाली; तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
शब्दातील आशयाचा सुगंध कधी दरवळू लागला,स्वरांच्या सौंदर्यलहरींनी कधी काळजात भरू लागला ह्याचे भान श्रोत्यांनाही राहू नये व गझल गायकालाही. इतका गझल गायकाने महफिलचा अंशनअंश गझलमय करून टाकला पाहिजे. म्हणजेच शब्दांतील आशयाचा सुगंध व स्वरातील सौंदर्य हळुवार आंजारत- गोंजारत एकाच वेळी शब्दातील कवी व स्वरातला गायक एकमेकांशी खेळीमेळीने वागत असल्यासारखे पेश केले पाहिजे. सुधाकर कदमांना हे साधलं आहे हे विशेष ! ते शब्दातल्या कवीला कुठे दुखावत नाहीत तर स्वरातल्या गायकाला कुठे मुरड घालत नाहीत; हे त्यांना जितके अधिक आत्मसात होईल तितकी त्यांच्यावर जान देणार्‍यांची संख्या वाढत-वाढत जाऊन चांदण्यांसारखी मोजता येणार नाही़.
 गझल पेश करण्यापूर्वी गझलच्या एकंदर रुपाची झलक एखाद्या शेरमध्ये दाखविण्याची त्यांची शैली गुलाम अलीची आठवण करून देणारी असली तरी काही आठवण फार सुखद असतात, त्या तर्‍हेची ही आठवण आहे़. त्यामुळे होणार्‍या वातावरण निर्मितीने श्रोत्यांना विश्वासात घेतल्या जाते; नंतर स्वतःच्या आयुष्यातील एखादा अनुभव ज्या तन्मयतेने आपण हळुवार सांगतो तितक्या आत्मियतेनं कवीच्या शब्दातला अनुभव फुलविल्या जातो - खुलविल्या जातो - श्रोत्यांपर्यंत पोचविल्या जातो व त्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होतो़.तो एक प्रकारचा सूचक असा गोड इशारा असतो़. वाट कोणत्या स्वर्गाकडे जाते हे दिग्दर्शीत करणारा फलक असतो़. आणि मला वाटते ही शैली गझल गायनाचा एक शृंगार आहे़.
 मी सुखद आठवण म्हणतो ते या अर्थाने. रसिकांना ही सुखद आठवण चालेल कारण त्यानंतरची स्वर्गनिर्मिती ही आपल्या साधनेच्या ऐपतीप्रमाणे करणे हे प्रत्येक गझल-गायकाचे स्वतःचे योगदान असते आणि ते योगदान सुधाकर कदम आपल्या स्वरांच्या आरोह-अवरोहातून, रागांच्या माध्यमातून आणि हार्मोनियमवरील आपल्या बोटातून ‘दिल खोलके’ देतात तेव्हा ऐकणारा तृप्त होतो़.आणि गुणगुणत राहतो-

‘झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला.’

लोकमत साहित्य जत्रा
१० जुलै १९८३

https://youtu.be/RlJBMllyJFg

#लेख #गझल #गझल_गायक ##singer #music


 





संगीत आणि साहित्य :