गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 20, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १९) 'मान आणि धन'



     आम्हा कलावंतांच्या आयुष्यात मान आणि धनाचा संबंध, हातातोंडाच्या संबंधाइतका महत्त्वाचा असतो. त्यामुळे मानाचा आणि धनाचा व्यस्त प्रमाणातील अनुभव आमच्या पाचवीलाच पूजला असतो. कधी मान, कधी धन, तर कधी मानासह धन, तर कधी धनासह मान असे प्रकार घडत असल्यामुळे मान आणि धनापैकी किंवा दोन्हीही मिळाले तर 'पदरी पडले पवित्र झाले' असे समजून समाधान मानून घेतो.
     सरस्वती आणि लक्ष्मीचे वाकडे असून, ह्या दोघी एकत्र नांदत नाही, असे म्हणतात.पण सध्याच्या प्रतिथयश कलावंतांकड़े बघून हे पटत नाही. ज्या कलावंतांकडे लक्ष्मी व सरस्वती पाणी भरतात त्या कलावंतांना मानावेच लागते. खरे म्हणजे छोट्या-मोठ्या कलावंतांच्या बाबतीतच वरील उक्ती लागू पडते. कारण त्यांची सरस्वतीची आराधना सुरू असते. एकदा सरस्वती पावली की मग तिला बगल देऊन लक्ष्मीची आराधना सुरू करावी म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. पण सच्चा कलावंत ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे त्याला आयुष्यभर मानाचे आणि धनाचे गणित जुळवत बसावे लागते.
     खरा कलावंत तसा मानाचाच भुकेला असतो असे म्हणतात. प्रसिध्दी मिळणारा असेल तर पैशाचीही फिकीर न करणारा कलावंत नेहमीच आपण बघतो. त्यांच्या या प्रसिध्दीसाठी हपापलेपणाचा गैरफायदा घेऊन, नुसत्या मानाचा वर्षाव करून अनेक जण त्यांना बापरून घेतात व कलाकार मात्र अमक्या अमक्याच्या घरी बैठक झाली. अमक्या अमक्या गावात मैफल गाजवली या विश्वातच खूष असतो.
     जवळ-जवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी, मुंबईचा गझल गायनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ठाण्याच्या माझ्या जिवलग मित्राकडे भेटायला गेलो. नाव आम्बेगावकर ! गेल्या गेल्या सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मित्राने मुक्कामाबद्दल विचारले. मी थांबणारच होतो. तसे त्याला सांगितल्यावर तो मासळी आणायला बाजारात निघून गेला. मी फ्रेश होऊन वहिनींशी गप्पा मारत बसलो तेवढ्यात मित्र आला व कार्यक्रम करणार का? असे विचारले. मला आढेवेढे घेण्याचे काहीच कारण नव्हते. होकार देऊन टाकला. रात्री तिथल्याच सी. के. पी. हॉलमध्ये मैफल जमवली. रंगली! रसिकांनाही भावली! कार्यक्रमानंतरचे चहापान व भरपूर मानसन्मान सोबत घेऊन आम्ही घरी आलो. आल्या आल्या मित्राने एक पाकीट माझ्या हातात ठेवले. पाकीट म्हणजे पैसे हे मला माहीत असल्यामुळे मी ते घेण्यास नकार दिला. कारण मित्राकडून अशा मैफिलीचे पैसे घेणे मला अजून जमले नाही. त्यावर मित्र म्हणाला, 'बाबा रे, हे पैसे मी देत नसून इथल्या रसिक मंडळींनी दिलेले मानधन आहे. कारण इकडे फुकटात कार्यक्रम बघण्याची किंवा ऐकण्याची प्रथा नाही. फूल ना फुलाची पाकळी, ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण देतोच. तेच हे पैसे आहेत!' मला आश्चर्य वाटले, कारण तिकीट असलेल्या कार्यक्रमात फुकट कसे घुसता येईल हे पाहणारे 'र-सिक' आमच्या पाहण्यात होते, त्यामुळे हा प्रकार म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. 
     दुसरा किस्सा पुलगावचा आहे. अगोदरच्या दिवशी राळेगावला (जि. यवतमाळ) कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जेवण व आराम करून पुलगावकडे (जि. वर्धा)  निघालो. पण यवतमाळला येईपर्यंत आमचे तबलजी तालमणी प्रल्हाद माहुलकर यांना सडकून ताप भरला. औषधपाणी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. म्हणून कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी दूरध्वनी करावयाच्या बेतास आलो. पण तबलजीने 'थोडे बरे वाटत आहे, कार्यक्रम करूनच टाकू' असे म्हटल्यामुळे तडक गाडीत बसून पुलगावला गाठले. पोहोचल्याबरोबर आयोजक मंडळींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. 'उशिरा आल्यामुळे कलेक्शन झाले नाही,' 'ही यायची वेळ आहे का? वगैरे वगैरे... मी त्यांना तबलजीच्या प्रकृतीविषयी सांगितले, पण ती मंडळी काहीच ऐकून न घेता हमरी-तुमरीवर यायला लागली. यावरून त्यांची नियत बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. जास्ती वाद न घालता सरळ स्टेजवर गेलो व कार्यक्रम सुरू केला.अर्धे मानधन अनामत म्हणून घेतले होते,बाकी मिळण्याची आशा सोडली.व रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून कार्यक्रम पूर्ण करून निघून आलो.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करतानाचे हे अनुभव आहेत.सुरेश भट आणि मी त्या काळी महाराष्ट्रभर भटकंती करताना काय काय सोसले ते आम्हा दोघांनाच माहिती. आम्ही दोघे मिळून कार्यक्रम करीत होतो,तेव्हा मरठी गझल गायनाचे कार्यक्रम करणारा एकही कलाकार नव्हता. हे खरे सत्य आज नवरसिकांच्या पचनी पडत नाही ही दुःखाची बाब आहे.असो!
     तिसरा अनुभव आहे (हा किस्सा 'फिक्कर कराची नाय' या शिर्षकांतर्गत आपण वाचला आहे.तरी पण तीन ठिकाणची मानसिकता कळावी म्हणून येथे पुनश्च देत आहे.) यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या लहानशा गावाचा. मान आणि धन दोन्हीचा वर्षाव करणारे हे गाव कायम लक्षात राहण्याचे कारण मानधन हे नसून, तिथली पध्दत व कार्यक्रमाची मजा हे होय. त्यावेळी मी भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजन ऑर्केस्ट्रामध्ये अॅकार्डीयन वाजवायचो. गणेशोत्सवात मोहद्याचा कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे पोहोचल्याबरोबर नवरदेवाकडील पाहुणे असल्याप्रमाणे हातपाय धुवायला तांब्याच्या घंगाळात गरम पाणी, सुवासिक साबण, नवा कोरा टर्किशचा टॉवेल हा जामानिमा पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानंतरचा चहा, फराळ, पान-सुपारी आटोपेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. म्हणून कार्यक्रम स्थळी जावे म्हणून आयोजकांना 'वाद्य वगैरे स्टेजवर न्यायचे का?' विचारले तर ते म्हणाले, 'फिक्चर करू नका! जेवणबिवण आटपू, मग कार्यक्रमाचा पाहू!' आयुष्यात पहिल्यांदा इतकी बिनफिकरी माणसे भेटल्याने काय बोलावे कळेना. मग विचार केला आयोजकांनाच काळजी नाही तर आपण तरी कशाला लोड घ्यावा ! आणि लोडाला टेकून मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात जेवणाचे निमंत्रण आले. तोंडात विडा ठेवून घड्याळ बघतो तो अकरा वाजलेले. आता मात्र माझे पाच गेले व दहा राहिले. कार्यक्रमाचे कसे होईल, लोक येतील की नाही... आलेल्या लोकांनी धिंगाणा तर घातला नसेल ना? या काळजीने कोणालाही काही न विचारता सरळ स्टेजवर जाऊन बसलो. तेव्हा एका आयोजकाने खुलासा केला, 'राजे हो! आमच्या गावात दोन मंडळ हायंत. कार्यक्रमाचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही पॅक केलं आहे. एक दिवस त्यांचा कार्यक्रम आगुदर असते अन् एक दिवस आमचा ! आज त्यायच्या कार्यक्रमाची बारी हाय! थे तिकडं कीर्तन आयकू येते ना! थे संपलं का आपला कार्यक्रम सुरू कराचा. तिथल्ले लोक इकडे येते! म्हून तुमाले सांगो का फिक्कर कराची न्हाई म्हून!'या प्रकारामुळे हसावे की रडावे कळेना, पण त्यांच्या 'पॅक'ची गंमत मनाला भावून गेली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने जुने वैर काढून एकमेकांची डोकी फोडणारी मंडळी एकीकडे व मोहदावासियांनी केलेले 'पॅक' यातून आपण काय शिकावे, काय घ्यावे हे ठरवायला हरकत नाही. त्यांच्या पॅकमुळे आमचा कार्यक्रम रात्री बारा वाजता सुरू झाला. सकाळपर्यंत चालला. पण एक नवी परंपरा जोपासणाऱ्या गावकऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे व नवी दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला रात्रभराच्या जागरणाचेसुध्दा काहीच बाटले नाही. कार्यक्रमाच्या अगोदरचा मान व नंतरचे धन याहीपेक्षा महत्त्वाचे एकोपा व सामंजस्य याचे विचारधन घेऊन वापस आलो.

डावीकडे - तबला वादक प्रल्हाद माहुलकर.


 





संगीत आणि साहित्य :