गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, October 28, 2023

राग_रंग (लेखांक ३०) बिलासखानी तोडी (

              
     दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.
      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', 
लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)
       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   
(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 
शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  
'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  
धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.
● मी सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नसलेल्या एका नव्या सुरावटीत मराठी गझल स्वरबद्ध केली.या रागाला 'सुधाकरी तोडी' असे नाव दिले आहे.थाट-भैरवी, वादी स्वर-रिषभ,संवादी स्वर-पंचम.गानसमय-दिवसाचा पहिला प्रहर.आरोह-सा कोमल रे कोमल ग प कोमल नि सां. अवरोह-सां कोमल नि प कोमल ग कोमल रे सा.आरोहावरोहात पाच स्वर असल्यामुळे शास्त्रानुसार याची जाती औडव-औडव ठरते.(याला मान्यता मिळेल की नाही मला माहित नाही.कारण मी शास्त्रीय संगीतातील पंडित, डॉक्टर,प्राध्यापक वा कुठल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग प्रमुख नाही.) शब्द आहेत 'माझी गझल गुलाबो भरते हसून प्याला, माझ्या नशेत अवघा जातो बुडून प्याला'. रसिकांना ऐकण्यासाठी युट्युब लिंक:-https://youtu.be/hRVkLxUFUng?si=Vk6p5c2ZdAw_PYPT
     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!
● युट्युबवर उपलब्ध गायक वादकांचा बिलासखानी...
उस्ताद अमीर खान, सरस्वतीबाई राणे, पंडित जसराज, कुमार गंधर्व, जयतीर्थ मेवूंडी,पं. अजय पोहनकर,पं. राजन,साजन मिश्र, पंडिता किशोरी आमोणकर, पं. प्रभाकर कारेकर, वीणा सहस्रबुद्धे, उस्ताद राशिद खान, उस्ताद शराफत हुसेन खान, पं. अजय चक्रवर्ती, आरती अंकलीकर, अश्विनी भिडे, पं. व्यंकटेश कुमार, कैवल्य कुमार गुरव, नागेश आडगावकर, यशस्वी सरपोतदार, संजीव चिमलगी, उस्ताद फतेह अली खान. मौमिता मित्रा, पिऊ मुखर्जी, वरदा गोडबोले, कौशिकी चक्रवर्ती, पं. संजीव अभ्यंकर, भाई कमलजीत सिंग, मिता पंडित, उस्ताद बिस्मिल्ला खान-शहनाई, उस्ताद अली अकबर खान-सरोद, पं. रवी शंकर, सतार-सारंगी उस्ताद विलायत खान आणि उस्ताद मुनीर खान. उस्ताद विलायत खान-सुरबहार, पं. शिवकुमार शर्मा-संतूर, पं. हरिप्रसाद चौरसिया-बासरी, पं.निखिल बॅनर्जी, पं.कुशल दास-सतार, कला रामनाथन-व्हायोलिन, अभिषेक लाहिरी-सरोद.
● मराठी 
'रामा रघुनंदना' आशा भोसले. संगीत-दत्ता डावजेकर. 
'जायचे इथून दूर काहूर मनी' गायिका-ज्योत्स्ना मोहिले. नाटक-हे बंध रेशमाचे. 
      बिलासखानी रागावर आधारित एक गीत मी नुकतेच स्वरबद्ध केले आहे.स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे 'रे मना!

रे मना, तुज काय झाले सांग ना!
का असा छळतो जीवाला सांग ना!

हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!

हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवळतो तू सांग ना!

सूर लावून गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना!

गीत/संगीत - सुधाकर कदम
गायक - मयूर महाजन
__________________________________________
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.रविवार दि.२९/१०/२०२३.


 





संगीत आणि साहित्य :