गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 29, 2013

माझी वाटचाल...

फेसबुक वरील नव्याने झालेल्या अनेक तरूण मित्रांनी मला माझ्या मराठी गझल गायकीच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रश्न विचारलेत.त्यांचेसाठी...

"Outstanding Young Person"(१९८३),
"समाजगौरव"(१९९५),
"संगीत भूषण"(१९९६), 
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),
"कलादूत"(२००२),
"कलावंत"(२००३), 
"शान-ए-गज़ल"(२००५),
"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६)
"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),
"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९)




वगैरे सन्मान मिळाले.अनेक म्युझिक अल्बमचे संगीत दिग्दर्शन केले.पुस्तके लिहिली.

                                                                           -अल्बम-

1. ‘भरारी’...मराठी गझल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम. १९८३.


2. ‘झुला’ (तीन भाग) मराठी पाठ्यपुस्तकातील कविता. १९८७


3. ‘अर्चना’ (भक्तिगीते) २००६ टी सिरीज कं.


4. ‘खूप मजा करू’ (बालगीते) २००७ फाऊंटन म्य़ुझिक कं.


5. ‘काट्यांची मखमल’ (मराठी गझल) २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं.






-पुस्तके-

१. ‘सरगम’ शालोपयोगी गीतांची स्वरलिपी.(प्रस्तावना - संगीतकार यशवंत देव.)


२. ‘फडे मधुर खावया...’ निवडक (विषयांतर) लेख.



                                             "अशी गावी मराठी गझल
           या माझ्या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

*(पाटण)- येथील नाट्यांजली संस्थेतर्फे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम पार पडला.त्यांना  शेखर सरोदे यांनी तबल्यावची उत्तम साथ दिली.............दै.लोकमत,नागपुर.२६.९.१९८०


* मराठी ग़ज़लों के गायक श्री सुधाकर कदम ने सगीत के कई आयामों को पार किया है.अब उन्होंने मराठी़ ग़ज़लों को आकाशवाणी तथा अन्य मंचो के जरिये जनमानस तक पहुंचाना प्ररंभ किया है.  ...........................................................................................दै.नवभारत,नागपुर.१९८०

*(यवतमाळ) -  स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. .......................................................................................दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१

* कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात................................................दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२

१. सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला.....................................
तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.

२. सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर   सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ   स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे....सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.
     
३. सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला.................................................... दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.

४. ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला.......................................................................
दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.

५. मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......................................................................................................................... दै.सकाळ,पुणे.

६. गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................................................................................अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२

७. सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............................................................................... ..दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२

८. Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches........The Hitwad,Nagpur.23/4/1984

9. सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली..............................दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४

१०.कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा.........................................................................................................दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


११.मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है..........................................दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


या वेळी काही मान्यवरांचे आशिर्वादपर बोल येथे टाकल्याशिवाय राहावत नाही...

स्वरराज छोटा गंधर्व - "मराठी गझल गायकीच्या नवीन वाटचालीस माझा आशिर्वाद आहे."(१९७५)

पं.जितेंद्र अभिषेकी - "सातत्य आणि परिश्रम आपणास यश मिळवून देईल."(१९७७)

सुरेश भट - "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन".(१९८१) आणि "गझलनवाज".(१९८२)



गजानन वाटवे - "मला आवडलेला गझलिया..."(१९८३)

डा.यु.म.पठाण - "मराठी गझलेस योग्य स्वरसाज चढविला".(१९८३)

मा.सुधाकरराव नाईक - "शब्द-स्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार".(१९८५)


काही गायक,पत्रकार,समीक्षक,अभ्यासक,संशोधक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया...........

* करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे * (पार्श्वगायिका,कोल्हापुर.)
१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता
.व्यक्तिशः मला गझलेबद्दल प्रेम असल्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले होते.कदमांनी सर्व गझला स्वतः स्वरबद्ध केल्या होत्या.चाली अत्यंत आकर्षक,अर्थाला अनुरुप अशा होत्या.एकूण कार्यक्रम निटनेटका,चांगला झाला व कदमांबद्दल कौतुक वाटले.एकच व्यक्ती हार्मोनियम वाजविते,गाते,बोलते व संगीतही देऊ शकते,हे वेगळेपण होतेच.


* Maharashtra Jaycees *Tha pioneer in tha introduction of MARATHI GAZAL GAYAKI.
(2003)



* मधुरिका गडकरी *(ज्येष्ठ संगीत समीक्षिका,नागपुर.)
विदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम महाराष्ट्राला परिचित आहेत
.मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.
(’सूरसुधा’दिवाळी अंक,१९९६)

* वामन तेलंग *(संपादक-तरुण भारत,नागपुर)
आर्णीसारख्या आडगावात राहूनही सुधाकर कदमांनी आपल्या गायकीचा रंग
-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला.आपले वेगळेपण ठसविण्यासाठी अनवट अशी वाट निवडली.’मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला.हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे.हिंदी-हिंदुस्थानी,मराठी या केवळ भाषा नाहीत.भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते.संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यांमुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो.गझलच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे.कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे.अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाळ.सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले.ही वाट वहीवाट नव्हती.हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती.सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला
(कार्तिकएकादशी/१९९८)

* डाँ.अनंत ढवळे *(गझलकार,पुणे.)
मराठी गझल गायकीच्या उण्यापु-या ४/५ दशकांच्या इतिहासात जे नाव सर्वाधिक ठळकपणे पुढे येते ते म्हणजे सुधाकर कदम होय.सुरेश भटांनी मराठी साहित्याला गझल दिली आणि कदमांनी मराठी संगीताला गझल गझल गायकी.
(गझल गंधर्व विशेषांक,2010)            

* रसिकाग्रणी राजे मधुकरराव देशमुख * (माहुरगड.जि.नांदेड)

’हरचंद सुरीली नग़्मोंसे,
जज़बात जगाए जाते है,
उस वक़्त की तल्ख़ी याद करो,
जब साज़ मिलाए जाते है’....

एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती
,किमया,करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे.माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले त्याचे गमक वरील शरामध्ये आहे.या साडेतीन दशकात मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकले.त्यांची गझल गायकी ऐकली.सुधाकर जेव्हा गझल गायकीकडे वळले त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टिकाही झाली.गझलचा आशय,अर्थ.भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे यात गझल गायकाचे कौशल्य आहे.आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा अधिक अवधान बाळगले आहे.पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून विलंबित ख्याल गायक,ज्याला अक्षर मंत्राचा साक्षात्कार झाला आहे,तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल.या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे.स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले
.त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कासलीकरांकडे असायचा.यावेळी त्यांच्या घराला सम्मेलनाचे रूप यायचे.या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे असत.छोटा गंधर्व सुधाकरशी विशेष सलगीने,आपुलकीने वागत असतांना मी पाहिले आहे.अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात गाजली.त्यांच्या मैफिलींचे इतिवृत्त वर्तमानपत्रांतून समिक्षणात्मक रुपाने मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा.

* डाँ.राजेश उमाळे *(सुप्रसिद्ध मराठी गझल गायक,संगीतकार,संशोधक.अमरावती.)
१९७१ ते १९८० या काळात विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम सुरू केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले
.मैफिलीचा दर्जा प्राप्त करणा-या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरू झाले.गझलचा परिचय झाला.मराठी गझलची सुरवात सुरेश भटांपासून मानली तर गझल गायनाची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल.म्हणजे मराठी गझल गायकीचे वय फार फार तर ३० ते ३५ वर्षे मानावे लागेल.

* प्रा.काशिनाथ लाहोरे *(दै.लोकमत प्रतिनिधी.यवतमाळ)
गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गायक म्हणून ज्यांचा गौरव केला .ज्यांना स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात
’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली.ज्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनी २००९ साली’गझल गंधर्व’या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा ’तो’ कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम होय.

* अनंत दीक्षित * दै.लोकमत,पुणे.
पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला.यावेळी जेष्ठ गझल गायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे.अशी गावी मराठी गझल या स्वरुपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत.गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते.सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला.
(संपादकीय १७ मार्च २००९)

* प्रा.डाँ.श्रीकृष्ण राऊत *(कवी,गझलकार,संशोधक.)
कवीला काय म्हणायचे आहे
? काय सांगायचे आहे ? काय सुचवायचे आहे ? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो तरी आशयाचा एखादा पैलू,अर्थाचा पदर रसिकाला गझल वाचून पुर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ’समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्या शिवाय राहत नाही तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुरावटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो.आणि मला वाटतेगझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे.ही जाण सुधाकर कदमांना आहे याचा मनापसून आनंद झाला.ती जसजशी विकसित झली,तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
(लोकमत, ’साहित्यजत्रा’ १०.७.१९८३)

* मनोज पाटील माहुरे *(काठोडा,यवतमाळ.)
मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमँनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे,मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे.सुरेश भट सुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे.

* अनिल कांबळे *(गझलकार,पुणे.)
सुरेश भट म्हणजे मराठी गझल हे समीकरण जसे रुढ झाले आहे तसे १९९० च्या दशकात मराठी गझल गायकी म्हणजे सुधाकर कदम हे समीकरण रुढ होते
,नव्हे ख-या अर्थाने सुरवातच सुधाकर कदमांनी केली.१९८२ मध्ये पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला ’अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम मराठी गझल गायकीबद्दल मार्गदर्शक ठरावा असा होता.स्वतः सुरेश भटांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सुधाकर कदमांनी सादर केलेल्या...

’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही,चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’
’झिंगतो मी कळे ना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला’

या सारख्या अनेक गझलांच्या बंदिशी आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे
.या कार्यक्रमानंतर कदमांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम केले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी एकलव्यासारखी साधना करून अतिशय कष्टाने मराठी गझल गायक म्हणून मान्यता मिळविली.त्या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा सलग तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही गायक नसल्याचे सुरेश भट सांगत.

* अजीम नवाज राही *
कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी
(जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ’अशी गावी मराठी गझल’हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले.

लोकमत (अकोला) मधील ’दिंडी’ सदरातील प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांचा लेख...(२०१२)

गझलगंधर्व सुधाकर कदमांची काट्यांची मखमल : श्रीकृष्ण राऊत
22 जनवरी 2012
तारीख १६ जानेवारी २०१२.मुंबईचे पु.ल.देशपांडे सभागृह.एका मराठी गझल अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.सर्वजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.‘काट्यांची मखमल’असे काव्यात्म शीर्षक असलेला हा अल्बम म्हणजे मराठी गझलविश्वातला अनोखा आविष्कार.एक सुरमयी माईलस्टोन.गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाविण्यपूर्ण कल्पना मांडणार्‍या शब्दांनी ह्या गझला अभिव्यक्त झाल्या आहेत. आणि ह्या गझलांना त्या शब्दांना लाभलेल्या गझलगंधर्व सुधाकर यांच्या दीर्घकाळच्या चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना म्हणजे सोन्याला सुगंध.एरवी चकाकतं ते सर्व सोनं नसतं हा आपला नेहमीचा अनुभव.त्याची एक झलक-
"तू हासलीस की ,सगळ्या काट्यांची मखमल होते!
तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते!"
ही गझलांची हिरवळ कानातून मनात उतरत जाते ती सुरेश वाडकरांच्या मखमली स्वरातून.खूप दिवसांनी एव्हढ्या गोड चाली ऐकल्या आणि कान तृप्त झाले. संगीत ही साधना आहे असं जे म्हटल्या जातं ते काही खोटं नाही.नाही तर प्रख्यात गझलकार दुष्यंतकुमार म्हणतातचना-
कैसे मंज़र सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने सादर केलेल्या "काट्यांची मखमल" या मराठी गझलच्या अल्बमच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी असेच उद्गार काढले.ते म्हणतात-
"काट्यांची मखमल..." ही जलेबी,चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा अहे.
या अल्बममध्ये वेगवेगळ्या ’मूड्स"च्या ९ गझला आहेत.सुरेश वाडकर आणि वैशाली माडेंच्या स्वरातल्या
"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...","येता येता गेला पाऊस..." आणि "जीवनाचा खेळ रंगाया हवा..." या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते.वाडकरांच्या आवाजात "कळेना कसा हा जगावेगळा मी..." ही सुफियाना ढंगाची आणि "गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी..."ही खास गझलीयत दाखविणारी गझल आहे.दुसरीकडे वैशालीच्या आवाजातील "किती सावरावे,कसे सावरावे...",दूर गेल्या फुलांतल्या वाटा..." आणि ’हसू उमटले दुःख भोगता गंमत आहे..."या तीन ’मूड’च्या तीन गझला आहेत.याबद्दल बोलताना सारेगमपची ही महागायिका म्हणाली,"इतक्या सुरेल आणि आशयपुर्ण गझला मला सुरेशजींसोबत गायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजते आणि याचे सारे श्रेय गझलगंधर्वांना जाते".
         "धांगडधिंगा गाण्याकडे मी लक्ष देत नाही.मलासुरेल गाणी आवडतात.या अल्बममधील गाणी ऐकत राहावीत अशी आहेत.गझलांचे लिखाण ताकदवर आहेतच, त्याला पूरक स्वररचना असून सुरेशजींच्या आणि वैशालीच्या आवाजाची साथ लाभल्यामुळे हा अल्बम श्रवणीय झाला आहे.”असे मनोगत अशोक पत्की यांनी केले.
          ह्या गझला गाताना मिळालेलं समाधान सुरेश वाडकरांनी पुढील शब्दात मांडले-.." हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे की जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील कारण या गझलांच्या बांदिशींमध्ये संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला असून,वैशाली माडे,दिलीप पांढरपट्टे यांचेसोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला.याचे कारण असे की,फार मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल (मेलोडिअस) गाणे मला गायला मिळाले.मला खात्री आहे की हा अल्बम रसिकांना निश्चितच आवडेल".
         आपले मनोगत व्यक्त करताना सुधाकर कदम म्हणाले,"संगीत म्हणजे केवळ तंत्र नसून ती अंतर्मनातून स्फुरीत होणारी एक शक्ती असून ते इश्वर प्राप्तीचे साधन आहे.मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते,तसेच गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकाराहून वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात..." आता तुम्ही म्हणाल की हे गझलगंधर्व आहेत तरी कोण? तर तुमचं काही चुकलं नाही.हा मराठी गझलगायनाच्या इतिहासातील एक महत्वाची कारकीर्द गाजवणारा कलावंत होय. तो आहे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम.हा गझलगायक-संगीतकार `आपल्याच मस्तीत मी जाई पुढे मात्र बाजारू कवाडे लागती’ अशा खास वैदर्भीय वाणा-गुणाचा आहे.
          विदर्भपुत्र सुरेश भटांच्या रूपाने जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहंदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.
          सुधाकर कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझल ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.
          सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.
          सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत
शंकर नगर,जठारपेठ
अकोला (महाराष्ट्र)
22 जनवरी 2012

काही निवडक छायाचित्रे  (साठवणीतील आठवणी)













































































































































संगीत आणि साहित्य :