गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 27, 2023

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २१)

.                             -दोन आठवणी-

      यवतमाळला नगर पालिका संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या.त्या म्हणजे तत्कालीन नगर पालिकेचे अध्यक्ष संगीत प्रेमी आदरणीय स्व. बाबासाहेब घारफळकर आणि माहुरचे राजे स्व. मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख.दोघेही संगीतावर अपार प्रेम करणारे.बाबासाहेब बाल गंधर्वांची पदे अप्रतिम गायचे. ते आले की जवळ जवळ तीन तासांची मैफल ठरलेली असायची.या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे बालगंधर्वांची गायकी ऐकायला मिळायची.दुसरे राजे मधुकरराव...ते आले की, आल्या आल्या दहा रुपयाची नोट काढून चपराशाला पेढे आणण्याकरिता पिटाळायचे.(त्या काळी, म्हणजे १९७० च्या दशकातील दहा रुपये...त्या दहा रुपयांची आजची किंमत किती असेल विचार करा.) कासलीकर गुरुजींच्या मैफली सोबतच गोड पेढ्यांनी सगळ्यांचे तोड गोड व्हायचे.त्यांनी त्या काळातील बहुतेक गायक/वादक ऐकले होते.पंडित उस्ताद अमीर खान, जसराज त्यांचे आवडते गायक होते.ते रसिक तर होतेच पण उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट शिकारी होते.सह्याद्री बुक्स तर्फे त्याचे शिकारीवरील 'शिकारनामा' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.यात त्यांनी केलेल्या १४ शिकारीचे वर्णन आहे.या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आमहू उभयता  उपस्थित होतो..माझे संगीत शिक्षण,ऑर्केस्ट्रा,नेहरू युवक केंद्रातील काम,मेंडोलीन वादन,गायन प्रवास ते बघत आले होते.आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर गांधर्व संगीत विद्यालय स्थापन केले.त्याच्या वार्षिकोत्सवाला राजे आवर्जून उपस्थित राहायचे.मी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जसराजजींच्या बंदिशी गायचो.  पंडितजी त्यांचेही आवडते गायक असल्यामुळे माहूरला त्यांच्या वाडयात माझ्या अनेक मैफली आयोजित करून माहुरकरांना ऐकवायचे.माहुरच्या रेणुकादेवीसमोर ललिता पंचमीला आम्ही हजेरी लावायचो.त्या काळी सभामंडपात ही हजेरी असायची.गाणारे व ऐकणारे गाभाऱ्यात मावतील इतके असायचे.हळू हळू गर्दी वाढायला लागली, तसे माझे मित्र असलेलले प्रमुख भोपी स्व. रेणूकदासजींनी या हजेरीला संगीत संमेलनाचे रूप देण्याचे ठरवून मंदिराच्या बाहेर प्रांगणात हजेरी लावण्याची ध्वनिवर्धकासह सोय करून आयोजनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.जोपर्यंत माझ्यावर जबाबदारी होती त्या कालखंडात छोटा गंधर्वां सारखी दिगग्ज मंडळी या संगीत संमेलनात गाऊन गेली.

     माझ्या सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या स्व.बाबुरावजी यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात एक लेख लिहिला होता.तो खाली देत आहे. नक्की वाचा...आपणासही आवडेल.


                          #प्रेम_पिया_हम_पाये 


‘हरचंद सुरीली नग़मोंसे

जज़बात जगाये जाते है,

उस वक़्त की तलखी याद करो,

जब साज़ मिलाये जाते है।’


     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.

       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?

       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?


दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।

आखिर इस दर्द की दवा क्या है ॥


      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.

       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.

       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.


-राजे मधुकरराव देशमुख (माहूर)


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

-----------------------------------------------------------------------


     १९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुरला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, "छान गायलास, पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम."

     एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपून ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत. 

सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा  ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे. 

     संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.  

सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे. 

  ३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं. 

सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम. 

मेहदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो. 

कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?

     शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे. 

आज सरांचा वाढदिवस आहे. 

जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 

     कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा

हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।

बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।

       - डॉ सुशील देशपांडे

          कारंजा लाड

          १३/११/२०२२

Saturday, December 23, 2023

राग-रंग (लेखांक ३६) जौनपुरी

कोण्या एका रागाचे नाव कोण्या एका गावाशी/जागेशी जोडलेले असण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे राग 'जौनपुरी होय.उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये गावाच्या नावाने घराणे आहेत.पण राग मात्र एकच 'जौनपुरी'! १३९४ ते १४७९ मध्ये जौनपूर हे एक स्वतंत्र राज्य होते.यावर 'शर्की' वंशाची हुकूमत होती.(१५ व्या शताब्दीमध्ये वाराणाशी आणि जौनपूर हे उत्तर भारतीय संगीताचे मुख्य क्षेत्र होते.)

     ख्वाजा-ए-जहां मलिक सरवर या राज्याचे पहिले शासक होते.(जे कधी नसिरुद्दीन शाहचे वजीर होते.) या राज्याचे शेवटचे शासक होते सुलतान हुसेनशाह शर्की (१४५८-१४८५) काही इतिहास तज्ज्ञ हा काळ १४५८ ते १५०५ असा सांगतात. सुलतान हुसेनशाह शर्की हे फार मोठे संगीत प्रेमी व जाणकार होते.त्यांना गंधर्व उपाधीने नावाजले होते.ते ख्याल गायकीला प्रोत्साहन देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.त्यांनी 'मल्हार शाम','गौड शाम' आणि 'भूपाल शाम' या सारखे दुर्लभ राग बनविल्याचेही सांगितले जाते.आपल्या संगीत प्रेमापोटी त्यांनी आणखी एक राग तयार केला, ज्याला नाव दिले राग 'हुसैनी'.हाच हुसैनी पुढे जौनपुरी नावाने प्रसिद्ध झाला.जो आज उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक लोकप्रिय राग असून बहुतेक सर्व गायक वादक हा राग आवर्जून सादर करताना दिसतात.या कालखंडात दिल्ली आणि जौनपूर सत्तासंघर्ष चरम सीमेवर होता.शेवटी बहलोल लोदीने जौनपुरवर ताबा मिळवून दिल्लीमध्ये सामिल करून घेतल्यामुळे हुसेन शर्की आपले राज्य गमावून बसले.पण त्यांच्या या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांची आठवण संगीत प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.

     जौनपुरी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला आहे. याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. या रागात 'गांधार' ‘धैवत’आणि ‘निषाद’ हे स्वर कोमल आहेत.आरोहात गांधार वर्ज असून अवरोहात सातही स्वर लागतात.त्यामुळे याची जाती षाडव संपूर्ण आहे.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर.हा राग उत्तरांग प्रधान आहे. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केल्या जातो.याला गंभीर प्रकृतीचा का राग मानतात. आसावरी आणि जौनपुरी एकदम जवळचे राग आहेत.त्यामुळे गाताना फार सावधगिरी बाळगावी लागते.आसावरीमध्ये आरोहात निषाद वर्ज आहे तर जौनपुरीमध्ये आरोहात निषाद घेतल्या जातो.या रागात पूर्वांगात 'सारंग' व उत्तरांगात 'आसावरी' दिसून येतो. सध्या अप्रचलीत असलेला 'गांधारी' राग जौनपुरीशी बराच मिळता-जुळता आहे.

आरोह– सा रे म प नी सां

अवरोह– सां नी प, म ग, रे सा

पकड़– म प, नी प, म प S रे म प

      भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक खास अशी बाब आहे की,दोन रागांचे स्वर एकसारखे असूनही स्वरलगावाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे राग वेगवेगळे होतात.प्रत्येक रागात वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावल्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे रूप आपल्या समोर येते.राग जौनपुरी, राग दरबारी कानडा आणि राग अडाणा या रागांचे स्वर सारखेच आहेत.परंतू ज्या पद्धतीने गायिल्या जाते त्याने प्रत्येक राग पूर्णपणे वेगळा होतो.

    केसरबाई केरकर,उस्ताद बडे गुलाम अली खान, रोशनआरा बेगम, गिरीजा देवी, मास्टर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. डी. व्ही.पलुस्कर, उस्ताद नजाकत अली सलामत अली, पंडित भीमसेन जोशी,पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद फतेह अली खान, मालिनी राजूरकर, पंडित राजन साजन मिश्र, किशोरी आमोणकर,वीणा सहस्रबुद्धे,अश्विनी भिडे,आरती अंकलीकर,उस्ताद नुसरत फतेह अली खान, परवीन सुलताना, पंडित अजय चक्रवर्ती,पं. ज्ञान प्रकाश घोष, पं. व्यंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवूंडी, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर,अपूर्वा गोखले,मंजुषा पाटील,मौमिता मित्रा,कौशिकी चक्रवर्ती,पं. हरीश तिवारी,रवींद्र परचुरे,गौरी पठारे,मंजिरी असनारे,उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), पं.पुर्बायन चटर्जी (सतार),उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पं. निखिल बॅनर्जी (सतार), कला रामनाथन (व्हायोलिन), रुपा पानेसर (सतार), कल्याणी रॉय (सतार) अली अहमद हुसैन (शहनाई) जुगलबंदी.अभ्यासकांसाठी या दिग्गजांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

● जौनपुरीवर आधारित हिंदी,उर्दू चित्रपट गीते...

'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' तलत महमूद. चित्रपट-मदहोश, संगीत-मदन मोहन (१९५१). 

‘जाएं तो जाएं कहां’ लता,तलत.चित्रपट-टॅक्सी ड्रायव्हर, संगीत-एस.डी. बर्मन (१९५४). (आधारित)

'रहीए अब ऐसी जगह' सुरैय्या. चित्रपट-मिर्झा गालिब,संगीत-गुलाम मोहम्मद (१९५४). 

'पिया ते कहां गयो नेहरा लगा' लता.चित्रपट-तुफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 

'दिल छेड़ कोई ऐसा नगमा' लता,आशा,हेमंत कुमार. चित्रपट-इंस्‍पेक्‍टर, संगीत-हेमंत कुमार(१९५६). 

'टुटे हुये ख्वाबो ने' रफी.चित्रपट-मधुमती, संगीत-सलील चौधरी (१९५८). 

'चितनंदन आगे नाचूंगी' लता.चित्रपट-दो कलियां, संगीत- (१९६८). 

'आज सोचा तो आंसू भर आये' लता. चित्रपट-हंसते जख्म, संगीत-मदन मोहन (१९७०). 

'दिल में हो तुम आंखो में तुम' एस जानकी,बप्पी लहरी. चित्रपट-सत्यमेव जयते, संगीत-बप्पी लहरी (१९८७)

'पल पल है भारी' मधुश्री,चित्रपट-स्वदेस, संगीत-ए.आर. रहमान (२००५). 

या रागाची रेंज इतकी भारी आहे की,संगीतकार एस.डी. बर्मन,मदन मोहन,हेमंत कुमार पासून तर बप्पी लहरी, ए.आर.रहमान यांनी जौनपुरीच्या जमिनीवर आपल्या गाण्याची धून बनविली आहे.

● नॉन फिल्मी...

'श्रीराम भजो सुख में दुख में'गायक-के.सी.डे. (१९३०). 

'प्रेम भावे जीव जगी या' उस्ताद अब्दुल करीम खान.अल्बम-हिराबाई बडोदेकर मराठी गीते.

'राम प्रभू आधार जगत के' पंडित भीमसेन जोशी.संत तुलसीदास. 

● मराठी...

'देवा तुझा मी सोनार' गायक-रामदास कामत. अभंग-संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव. 

'तुझे रूप चित्ती राहो' गायक/संगीतकार-सुधीर फडके. 

चित्रपट-संत गोरा कुंभार. 

'अवघे गरजे पंढरपूर' गायक-प्रकाश घांग्रेकर/शौनक अभिषेकी.नाटक-संगीत संत गोरा कुंभार,संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी. (१९७४).

----------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी,दि.
२४/१२/२०२३


 

Friday, December 22, 2023

आठवणीतील-शब्द -स्वर (लेखांक २०)

             

           'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
            तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी...'

     मराठी गझल गायकीच्या अगदी सुरवातीच्या, म्हणजे सुरेश भट आणि मी महाराष्ट्रभर फिरत असतानाच्या काळातील कार्यक्रमात गायिलेली '#जगलो_असाच_कसा_तरी' ही गझल  जुन्या जीर्ण  कॅसेटमध्ये सापडली.पण कॅसेट इतकी खराब झाली होती की, त्यातील फक्त शेवट कसातरी उतरवता आला. सुरेश भटांनी आग्रहाने ही गझल माझ्याकडून स्वरबद्ध करून घेऊन कार्यक्रमात गायला लावली होती. ही गझल कधी ते त्यांच्या पद्धतीने सादर करायचे, कधी मला गायला सांगायचे. त्या काळात दोन वा तीन माईकवर कार्यक्रम करावा लागायचा. ते पण दर्जेदार असतीलच असे नव्हते.त्या त्या साउंड सिस्टिमवाल्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांगले/वांगले असायचे. आमच्यासमोर ''मॉनिटर' पण नसायचे.
कार्यक्रमाची सगळी मदार साउंड सिस्टिमवाल्यावर असायची. रसिकांकडून दाद आली तर कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे असे समजायचे. कार्यकम चांगला वा वाईट करणे त्याच्या मर्जीवर असायचे.  
बिघडवायला तर भोंग्याने मारलेल्या दोन/चार शिट्ट्या सुद्धा पुरायच्या. सिस्टिमवल्याकडे जास्ती करून 'आहुजा' कंपनीचा एम्प्लिफायर,टेप रेकॉर्डर असायचे.हे सुद्धा साउंड सिस्टिमवाल्याने आहुजच्या डेकवर केलेले रेकॉर्डिंग आहे. प्रत एकदमच खराब आहे.तरी पण अनवट रागात कंपोझिशन
असल्यामुळे आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घ्यावी.ही विनंती.

सारंगी - मरहूम उस्ताद लतीफ अहमद खान
तबला - तालमणी प्रल्हाद माहुलकर

●headphone or earphone please...


 

Wednesday, December 20, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १९) 'मान आणि धन'



     आम्हा कलावंतांच्या आयुष्यात मान आणि धनाचा संबंध, हातातोंडाच्या संबंधाइतका महत्त्वाचा असतो. त्यामुळे मानाचा आणि धनाचा व्यस्त प्रमाणातील अनुभव आमच्या पाचवीलाच पूजला असतो. कधी मान, कधी धन, तर कधी मानासह धन, तर कधी धनासह मान असे प्रकार घडत असल्यामुळे मान आणि धनापैकी किंवा दोन्हीही मिळाले तर 'पदरी पडले पवित्र झाले' असे समजून समाधान मानून घेतो.
     सरस्वती आणि लक्ष्मीचे वाकडे असून, ह्या दोघी एकत्र नांदत नाही, असे म्हणतात.पण सध्याच्या प्रतिथयश कलावंतांकड़े बघून हे पटत नाही. ज्या कलावंतांकडे लक्ष्मी व सरस्वती पाणी भरतात त्या कलावंतांना मानावेच लागते. खरे म्हणजे छोट्या-मोठ्या कलावंतांच्या बाबतीतच वरील उक्ती लागू पडते. कारण त्यांची सरस्वतीची आराधना सुरू असते. एकदा सरस्वती पावली की मग तिला बगल देऊन लक्ष्मीची आराधना सुरू करावी म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. पण सच्चा कलावंत ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे त्याला आयुष्यभर मानाचे आणि धनाचे गणित जुळवत बसावे लागते.
     खरा कलावंत तसा मानाचाच भुकेला असतो असे म्हणतात. प्रसिध्दी मिळणारा असेल तर पैशाचीही फिकीर न करणारा कलावंत नेहमीच आपण बघतो. त्यांच्या या प्रसिध्दीसाठी हपापलेपणाचा गैरफायदा घेऊन, नुसत्या मानाचा वर्षाव करून अनेक जण त्यांना बापरून घेतात व कलाकार मात्र अमक्या अमक्याच्या घरी बैठक झाली. अमक्या अमक्या गावात मैफल गाजवली या विश्वातच खूष असतो.
     जवळ-जवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी, मुंबईचा गझल गायनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ठाण्याच्या माझ्या जिवलग मित्राकडे भेटायला गेलो. नाव आम्बेगावकर ! गेल्या गेल्या सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मित्राने मुक्कामाबद्दल विचारले. मी थांबणारच होतो. तसे त्याला सांगितल्यावर तो मासळी आणायला बाजारात निघून गेला. मी फ्रेश होऊन वहिनींशी गप्पा मारत बसलो तेवढ्यात मित्र आला व कार्यक्रम करणार का? असे विचारले. मला आढेवेढे घेण्याचे काहीच कारण नव्हते. होकार देऊन टाकला. रात्री तिथल्याच सी. के. पी. हॉलमध्ये मैफल जमवली. रंगली! रसिकांनाही भावली! कार्यक्रमानंतरचे चहापान व भरपूर मानसन्मान सोबत घेऊन आम्ही घरी आलो. आल्या आल्या मित्राने एक पाकीट माझ्या हातात ठेवले. पाकीट म्हणजे पैसे हे मला माहीत असल्यामुळे मी ते घेण्यास नकार दिला. कारण मित्राकडून अशा मैफिलीचे पैसे घेणे मला अजून जमले नाही. त्यावर मित्र म्हणाला, 'बाबा रे, हे पैसे मी देत नसून इथल्या रसिक मंडळींनी दिलेले मानधन आहे. कारण इकडे फुकटात कार्यक्रम बघण्याची किंवा ऐकण्याची प्रथा नाही. फूल ना फुलाची पाकळी, ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण देतोच. तेच हे पैसे आहेत!' मला आश्चर्य वाटले, कारण तिकीट असलेल्या कार्यक्रमात फुकट कसे घुसता येईल हे पाहणारे 'र-सिक' आमच्या पाहण्यात होते, त्यामुळे हा प्रकार म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. 
     दुसरा किस्सा पुलगावचा आहे. अगोदरच्या दिवशी राळेगावला (जि. यवतमाळ) कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जेवण व आराम करून पुलगावकडे (जि. वर्धा)  निघालो. पण यवतमाळला येईपर्यंत आमचे तबलजी तालमणी प्रल्हाद माहुलकर यांना सडकून ताप भरला. औषधपाणी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. म्हणून कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी दूरध्वनी करावयाच्या बेतास आलो. पण तबलजीने 'थोडे बरे वाटत आहे, कार्यक्रम करूनच टाकू' असे म्हटल्यामुळे तडक गाडीत बसून पुलगावला गाठले. पोहोचल्याबरोबर आयोजक मंडळींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. 'उशिरा आल्यामुळे कलेक्शन झाले नाही,' 'ही यायची वेळ आहे का? वगैरे वगैरे... मी त्यांना तबलजीच्या प्रकृतीविषयी सांगितले, पण ती मंडळी काहीच ऐकून न घेता हमरी-तुमरीवर यायला लागली. यावरून त्यांची नियत बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. जास्ती वाद न घालता सरळ स्टेजवर गेलो व कार्यक्रम सुरू केला.अर्धे मानधन अनामत म्हणून घेतले होते,बाकी मिळण्याची आशा सोडली.व रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून कार्यक्रम पूर्ण करून निघून आलो.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करतानाचे हे अनुभव आहेत.सुरेश भट आणि मी त्या काळी महाराष्ट्रभर भटकंती करताना काय काय सोसले ते आम्हा दोघांनाच माहिती. आम्ही दोघे मिळून कार्यक्रम करीत होतो,तेव्हा मरठी गझल गायनाचे कार्यक्रम करणारा एकही कलाकार नव्हता. हे खरे सत्य आज नवरसिकांच्या पचनी पडत नाही ही दुःखाची बाब आहे.असो!
     तिसरा अनुभव आहे (हा किस्सा 'फिक्कर कराची नाय' या शिर्षकांतर्गत आपण वाचला आहे.तरी पण तीन ठिकाणची मानसिकता कळावी म्हणून येथे पुनश्च देत आहे.) यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या लहानशा गावाचा. मान आणि धन दोन्हीचा वर्षाव करणारे हे गाव कायम लक्षात राहण्याचे कारण मानधन हे नसून, तिथली पध्दत व कार्यक्रमाची मजा हे होय. त्यावेळी मी भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजन ऑर्केस्ट्रामध्ये अॅकार्डीयन वाजवायचो. गणेशोत्सवात मोहद्याचा कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे पोहोचल्याबरोबर नवरदेवाकडील पाहुणे असल्याप्रमाणे हातपाय धुवायला तांब्याच्या घंगाळात गरम पाणी, सुवासिक साबण, नवा कोरा टर्किशचा टॉवेल हा जामानिमा पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानंतरचा चहा, फराळ, पान-सुपारी आटोपेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. म्हणून कार्यक्रम स्थळी जावे म्हणून आयोजकांना 'वाद्य वगैरे स्टेजवर न्यायचे का?' विचारले तर ते म्हणाले, 'फिक्चर करू नका! जेवणबिवण आटपू, मग कार्यक्रमाचा पाहू!' आयुष्यात पहिल्यांदा इतकी बिनफिकरी माणसे भेटल्याने काय बोलावे कळेना. मग विचार केला आयोजकांनाच काळजी नाही तर आपण तरी कशाला लोड घ्यावा ! आणि लोडाला टेकून मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात जेवणाचे निमंत्रण आले. तोंडात विडा ठेवून घड्याळ बघतो तो अकरा वाजलेले. आता मात्र माझे पाच गेले व दहा राहिले. कार्यक्रमाचे कसे होईल, लोक येतील की नाही... आलेल्या लोकांनी धिंगाणा तर घातला नसेल ना? या काळजीने कोणालाही काही न विचारता सरळ स्टेजवर जाऊन बसलो. तेव्हा एका आयोजकाने खुलासा केला, 'राजे हो! आमच्या गावात दोन मंडळ हायंत. कार्यक्रमाचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही पॅक केलं आहे. एक दिवस त्यांचा कार्यक्रम आगुदर असते अन् एक दिवस आमचा ! आज त्यायच्या कार्यक्रमाची बारी हाय! थे तिकडं कीर्तन आयकू येते ना! थे संपलं का आपला कार्यक्रम सुरू कराचा. तिथल्ले लोक इकडे येते! म्हून तुमाले सांगो का फिक्कर कराची न्हाई म्हून!'या प्रकारामुळे हसावे की रडावे कळेना, पण त्यांच्या 'पॅक'ची गंमत मनाला भावून गेली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने जुने वैर काढून एकमेकांची डोकी फोडणारी मंडळी एकीकडे व मोहदावासियांनी केलेले 'पॅक' यातून आपण काय शिकावे, काय घ्यावे हे ठरवायला हरकत नाही. त्यांच्या पॅकमुळे आमचा कार्यक्रम रात्री बारा वाजता सुरू झाला. सकाळपर्यंत चालला. पण एक नवी परंपरा जोपासणाऱ्या गावकऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे व नवी दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला रात्रभराच्या जागरणाचेसुध्दा काहीच बाटले नाही. कार्यक्रमाच्या अगोदरचा मान व नंतरचे धन याहीपेक्षा महत्त्वाचे एकोपा व सामंजस्य याचे विचारधन घेऊन वापस आलो.

डावीकडे - तबला वादक प्रल्हाद माहुलकर.


 

Thursday, December 14, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १८) नोकरी आणि लग्न.


     सुलभाचे आणि माझे  प्रेम प्रकरण यवतमाळात चर्चेचा विषय व्हायला लागला होता.मी कुणबी (पाटील) व सुलभा ब्राह्मण.त्यातही तिवसा (यवतमाळ) येथील प्रसिद्ध जमीनदार स्व.मुकुंदराव सुभेदाराची भाची. ( नुकतेच निधन झालेले शेतीतज्ज्ञ आनंदराव सुभेदार यांची सख्खी मामेबहीण.) त्यामुळे दोन्हीकडून प्रचंड विरोध झाला.पण आम्ही दोघे आमच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे  सुरवातीला असलेला विरोध दोन्ही घरातून चर्चेने सोडवला गेला व लग्न करायचे ठरले.लग्नाची तारीख काढण्यासाठी माझे सासरे स्व.दत्तात्रय चांदेकर हे यवतमाळात प्रसिद्ध असलेल्या एका 'शास्त्री'कडे गेले.शास्त्रीने तारीख तर काढलीच नाही, पण 'तुमच्या मुलीची काही भानगड असल्यामुळे लग्नाची घाई करता काय?' असा उलट प्रश्न करून डिवचले.सासरेबुवा जितके प्रेमळ तितकेच रागीटही होते.त्यांनी शास्त्रीबुवाला 'तसे काही नाही,पण शंकाच असेल तर एक वर्ष लग्न करणार नाही.आणि आता लग्न तिथीवर न लावता नोंदणी पद्धतीने करीन.पण तुमच्याकडे येणार नाही'.असे सणकावून  तेथून निघून आले.अशा प्रकारे आमचे लग्न एक वर्ष पुढे ढकलल्या गेले.(याच शास्त्रीबुवांनी पुढे आपल्या शिष्येशीच काहीतरी गडबड केल्याची चर्चा अख्ख्या यवतमाळात होती.त्याची परिणती मूल होण्यात झाल्याचेही बोलले जात होते.असो!)

     गावात,नातेवाईकांमध्ये चर्चा व्हायला लागल्या म्हणून कुठे तरी काम करून चार पैसे कमावणे आवश्यक होते.त्याशिवाय लग्न करणे शक्य नव्हते.कल्याणला शंकर बडेचे जावई रहायचे.त्यांना आम्ही दाजी म्हणत असू.शंकरला नट व्हायचे होते व मला संगीतकार. त्यासाठी अधून मधून मुंबई वारी करत असू.असेच एका उन्हाळ्यात दाजीकडे जाऊन मुंबईत  दूरदर्शन,एच एम व्ही,संगीतकार,नाटककार यांचे उंबरठे झिजवत असताना दाजीकडे माझ्या वडिलांचे पत्र आले.त्यात आर्णीतील महंत दत्तराम भारती विद्यालकडून संगीत शिक्षकाच्या जागेसाठीच्या मुलाखतीचे पत्र आल्याचा उल्लेख होता.तसेच त्वरित निघून ये अशी आज्ञा पण! मला कळेचना की हा चमत्कार कसा झाला.कारण मी कुठल्याही प्रकारचा अर्ज केलेला नव्हता.कल्याणला असल्यामुळे जाहिरात केव्हा आली तेच माहीत नव्हते तर अर्ज कसा करणार?पण बापजींची आज्ञा म्हटल्यावर वापस जाणे भाग होते.यवतमाळला पोहोचल्यावर अर्जाचा उपदव्याप कवी मित्र सुभाष परोपटेने केल्याचे कळले.त्यावरून सुभाषची बरीच धुलाई केली.कारण मला शिक्षक व्हायचे नव्हते.मग आलीया भोगासी म्हणत मुलाखतीला जायची तयारी करणे सुरू केले.तुम्ही म्हणाल तयारी म्हणजे काय उत्तरे द्यायची वगैरे वगैरेची तयारी...पण नाही! माझी तयारी वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्ट.(त्या काळी कपड्याच्या पन्ह्याइतक्या बॉटमचा पायजामा असायचा).हा अवतार कशासाठी?तर मुलाखतीमध्ये निवड होऊ नये म्हणून.म्हणता म्हणता मुलाखतीचा दिवस उजाडला.या मुलाखतीच्या वेळी शंकरने मित्रवर्य डॉक्टर सुधाकर पुरी यांना सोबत घेऊन जायला सांगितले.का ते मात्र सांगितले नाही.डॉक्टर व मी आर्णीला पोहोचलो.मी शाळेत व डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष चित्घनानंदजी भारती यांचेकडे गेले.शाळेतील बाबूने बरोबर अकरा वाजता भारतीजींच्या भव्य वाड्यातील बैठकीबाहेर असलेल्या बेंचवर सगळ्या मुलाखतकारांना नेऊन बसवले.माझा पुकारा झाला...वीतभर बॉटमचा पायजामा व भगवे शर्टअशा अवतारात आत गेलो.थोडीफार प्रश्नोत्तरे व प्रमाणपत्रे पाहून 'दुपारी पुन्हा या' असे सांगून सोडले.या दरम्यान डॉक्टर पुरी कुठे होते ते कळलेच नाही.त्यावेळी आर्णी गाव इतके लहान होते की खानावळ सुद्धा नव्हती.त्यावेळी गांधी गेटजवळ 'शाम' हे एकमेव हॉटेल होते. हॉटेलमध्ये जे मिळेल ते खाऊन दुपारी बैठकीत हजर झालो.तिथे संस्थाध्यक्ष भारतीजी,

सदस्यगण,संगीत रसिक दानशूर बापुसाहेब बुटले,

मुख्याध्यापक शंकरराव बुटले काही ज्येष्ठ शिक्षक बसले होते.(अर्थात ही नावे मला नंतर कळली.)आणि मग मला गायला सांगितले.अर्धा-पाऊण तासाची मैफल केल्यावर मला शाळेत जाण्यास सांगितले.मुख्याध्यापक अगोदरच पोहोचले होते.एकूण निवड होण्याची लक्षणे दिसायला लागली होती.निवड होऊ नये म्हणून काय करावे हा विचार सुरू असताना मुख्याध्यापकांनी 'तुमचे लग्न झाले काय' असा प्रश्न केला.मी हीच वेळ साधून अगदी टपोरी पोरासारखे 'नौकरी नहीं तो छोकरी कौन देंगा' असे उत्तर दिले. त्यांनी तिरप्या नजरेने माझ्याकडे पाहिले व बाबूकडून नियुक्तीपत्र घेवून जाण्यास सांगितले.माझी सगळी मेहनत पाण्यात गेली होती.हिरमुसला होऊन शाळेच्या बाहेर आलो तर डॉक्टर पुरी माझी वाट बघत असल्याचे दिसले. यवतमाळला वापस जाण्यासाठी बस स्थानकावर आलो तर कळले की सायंकाळी चार नंतर यवतमाळसाठी कुठलीच बस नाही.कसे बसे एका ट्रकवाल्याला पैसे देऊन यवतमाळ गाठले.ठरलेल्या दिवशी कामावर रुजू झालो.पण माझी निवड का झाली हे कळेचना.बऱ्याच कालावधीनंतर शंकरने खुलासा केला की, मुलाखत प्रसंगीची माझी मैफल छान रंगली होती व मला बरीच वाद्ये वाजविता येतात हे त्यांना आवडले होते, (१९७१ मध्ये आमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आर्णीला होऊन गेला होता.त्यावेळी माझे अकॉर्डियन वादन आर्णीकरांनी अनुभवले होते.ती कीर्ती पण संस्थाचालकांपर्यंत अगोदरच पोहोचली होती.) आणि या सोबतच महत्वाचे म्हणजे डॉ.पुरी हे भारतींचे जवळचे नातेवाईक आहेत हे ही शंकर कडून कळले.व सगळे कोडे उलगडत गेले अशा प्रकारे शिक्षक न होण्याची प्रतिज्ञा करूनही मी जून १९७२ मध्ये संगीत मास्तर म्हणून श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात रुजू झालो.

    शास्त्रीबुवाला बोलल्याप्रमाणे सासरेबुवांनी नोकरी लागल्यावर एक वर्षानंतर २१ नोव्हेंबर १९७३ ला नोंदणी पद्धतीने आमचे लग्न लावून दिले. हे लग्न जास्ती टिकणार नाही,दोन तीन वर्षातच घटस्फोट होईल असे भाकित करणाऱ्या यवतमाळातील होरातज्ज्ञ व भविष्यकर्त्यांना, आज पन्नास वर्षे होऊनही आमचे प्रेम तसेच 'तरुण' असून, लग्नही टिकून आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटत आहे. माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये सुलभाचा सिंहाचा वाटा आहे.माझा उत्कर्ष व्हावा म्हणून तिने खूप सोसले.आज मी जो काही आहे त्यात ७५ टक्के वाटा तिचा आहे.हे कबूल करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही.माझ्या दृष्टीने ती आदर्श सून,आदर्श पत्नी,आदर्श आई व आदर्श आजी आहे.(आदर्श मैत्रीण पण आहे असे तिच्या मैत्रिणी सांगतात.विशेषतः संगीता सिडाना,अमृतसर... पूर्वाश्रमीची रिता वर्मा, यवतमाळ.)



Saturday, December 9, 2023

राग-रंग (लेखांक ३५) राग खमाज



नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृद ये न च |
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ||

     संगीत कोण्या समाजविशेषाचे प्रतिनिधित्व करणारी कला नाही.ही तर सर्व मानवीय भावांना मूर्त रूप प्रदान करणारी कला आहे.सुख असो वा दुःख संगीत हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अनादी काळापासून मानवासोबत राहिले आहे.भारतीय संगीताच्या क्रियात्मक पक्षांतर्गत शास्त्रीय संगीत,  उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकसंगीत आणि चित्रपट संगीत असे पाच प्रकार येतात. हे पाचही प्रकार आतून एकमेकांशी संबंधित असून एक दुसऱ्याच्या प्रगतीने प्रभावित होणारे आहे.यातील प्रत्येकाची सांगीतिक व साहित्यिक विशेषता आहे. यांच्या परस्पर संबंधाचे पैलू समजून घेऊन त्यातील अंतर समजून घेणे हे प्रत्येक संगीतप्रेमींसाठी आवश्यक आहे. हेच संगीताच्या क्रमिक विकासाचे विभिन्न पडाव आहेत.कोणतीही कला जिवंत ठेवण्यासाठी तिचे नाते मुळाशी घट्ट असायला पाहिजे. आणि सर्व कलांचे मूळ आहे 'लोक-कला'! आजच्या सर्व परिष्कृत कला, लोककलांवर आधारित आहे. याच लोककलांमधील लोकसंगीत म्हणजे खमाज थाट व त्यातून निर्माण झालेले राग आहेत.
     खमाज राग हा खमाज थाटाचा आश्रय राग आहे.थाट खमाज आणि त्यावर आधारीत असलेले राग म्हणजे मधाळ स्वरांचे पोळेच जणू ! थाट खमाजवर आधारीत कुठलाही राग ऐका, त्याचे सूर आपल्या हृदयात एक अनोखा, हवाहवासा वाटणारा गोडवा जागवतील हे अगदी नक्की! ह्या थाटातील, राग खमाज, जैजवंती, गारा, कलावती, खंबावती, देस, गोरख कल्याण, दुर्गा (खमाज अंग), तिलक कामोद, रागेश्री, झिंझोटी, मांझ खमाज, तिलंग, सोरठ व त्यावर आधारलेली गीते ऐकल्यावर ह्या अवर्णनीय गोडव्याचा आपणास प्रत्यय आला नाही तरच नवल ! या रागाचा विस्तार मध्य आणि तर सप्तकात केल्या जातो.जेव्हा या रागात विविध रागांचे मिश्रण करून गायिल्या जातो तेव्हा त्याला 'मिश्र खमाज' असे संबोधले जाते.मराठी संगीत रंगभूमीवर नाट्यपदांतून येणारा राग खमाज, अनुरागानं रंगलेला आहे. तर चित्रपटसंगीतातला खमाज पैंजणपावलांनी येणारा, मुग्ध प्रणयानं भारलेला आहे.चंचल म्हणत असले तरी हळवा पण आहे.खमाज रागात बहुतकरून ठुमरी, टप्पा,दादरा, चैती गायिल्या जातात.वादक मात्र या रागात रजाखानी व मसीतखानी म्हणजेच विलंबित व द्रुत गत वाजवितात.खरे तर गायक सुद्धा या रागात ख्याल रंगवू शकतील असे मला वाटते.
     "रात्रीच्या वेळी गायिल्या जाणाऱ्या रागातील शृंगाराने ओत प्रोत भरलेला व चंचल प्रकृतीचा राग खमाज" म्हणजे काय ते मला समजले नाही.नंतर असेही विधान आहे..."या रागात गंभीरता कमी आहे म्हणून यात ख्याल गायिले जात नाही." काय खरे काय खोटे हे अशी विधाने करणारेच सांगू शकतील.
● हिंदी चित्रपट गीते...
'सजना सांझ भई आन मिलो'  सितारा देवी. चित्रपट-रोटी, संगीत-अनिल विश्वास (१९४२). 
'हम अपना उन्हे बना ना सके' के.एल.सैगल. चित्रपट-भंवरा, संगीत-खेमचंद प्रकाश (१९४४). 
'वो न आयेगी पलटकर' मुबारक बेगम. चित्रपट-देवदास, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 
'चुनरिया कटती जाए' लता,रफी. चित्रपट-मदर इंडिया. संगीत-नौशाद (१९५७). 
'सखी रे सून बोले पपिहा उस पार' लता,आशा. चित्रपट-मिस मेरी, संगीत-हेमंत कुमार (१९५७). 
'नजर लागी राजा तोरे बंगले पर' आशा. चित्रपट-काला पानी, संगीत-एस.डी. बर्मन (१९५८). 
'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' रफी,आशा. चित्रपट-काला पानी, संगीत-एस.डी. बर्मन (१९५८). 
'पिया तोसे नैना लागे रे' लता. चित्रपट-गाईड, संगीत-एस.डी. बर्मन (१९५९). 
'आ दिल से दिल मिला ले' आशा भोसले.चित्रपट-नवरंग,
संगीत-सी.रामचंद्र (१९५९). 
'ढल चुकी शाम-ए-गम' रफी. चित्रपट-कोहिनूर, संगीत-नौशाद (१९६०). 
'ओ सजना बरखा बहार आयी' लता. चित्रपट-परख, संगीत-सलील चौधरी (१९६०). 
'दिवाना मस्ताना हुवा दिल' रफी,आशा. चित्रपट-बंबई का बाबू, संगीत-एस.डी. बर्मन (१९६०). 
'खोया खोया चांद खुला आसमाँ' रफी. चित्रपट-काला बाजार, संगीत-एस.डी. बर्मन (१९६०). 
'ढल चुकी शाम-ए-गम मुस्कुरा ले सनम' रफी. चित्रपट-कोहिनूर, संगीत-नौशाद (१९६०). 
'ना तो कारवां की तलाश है' आशा भोसले,मन्ना डे,सुधा मल्होत्रा. चित्रपट-बरसात की एक रात, संगीत-रोशन (१९६०). 
'नैन लड गई जैहैं तो मनवा मा कसक' रफी. चित्रपट-गंगा जमुना, संगीत-नौशाद (१९६१). 
'तोरा मन बडा पापी सांवरिया रे' आशा भोसले.चित्रपट-गंगा जमुना, संगीत-नौशाद (१९६१). 
'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' रफी. चित्रपट-हम दोनो, संगीत-जयदेव (१९६१). 
'तेरे बिना सजना लागे ना जिया हमार' लता,रफी. चित्रपट-आरती, संगीत-रोशन (१९६२). 
'अब क्या मिसल दूं मैं तेरे शबाब की' रफी.चित्रपट-आरती, संगीत-रोशन (१९६३). 
'पिया तोसे नैना लागे रे' लता. चित्रपट-गाईड, संगीत-एस.डी. बर्मन (१९६५). 
'ऐसे तो ना देखो के हमको नशा हो जाये' रफी.चित्रपट-तीन देवीयां, संगीत-एस.डी.बर्मन (१९६५). 
'ये कहां आ गये हम'  चित्रपट-सिलसिला, संगीत-शिव हरी (१९६५). 
'खत लिख दे सावरीयां के नाम बाबू' आशा भोसले. चित्रपट-आये दिन बहार के, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६६).
'इक हसीं शाम को दिल मेरा खो गया' रफी. चित्रपट-दुल्हन एक रात की, संगीत-मदन मोहन (१९६६). 
'रहते थे कभी उनके दिल में' लता. चित्रपट-ममता, संगीत-रोशन (१९६६). 
'धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार' लता. चित्रपट-अनुपमा, संगीत-हेमंत कुमार (१९६६). 
'जाओ रे जोगी तुम जाओ रे' लता. चित्रपट-आम्रपाली, संगीत-शंकर जयकिशन (१९६६). 
'शाम ढले जमुना किनारे' लता,मन्ना डे. चित्रपट-पुष्पांजली, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७०). 
'आयो कहाँ से घनश्याम' मन्ना डे,अर्चना.चित्रपट-बुढ्ढा मिल गया, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'अनके खयाल आये तो आते चले गये' रफी. चित्रपट-लाल पत्थर, संगीत-शंकर जयकिशन (१९७१). 
'जिया ना लागे मोरा' लता.चित्रपट-बुढ्ढा मिल गया, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'बडा नटखट है रे कृष्ण कन्हैया' लता. चित्रपट-अमर प्रेम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'मेरा मन तेरा प्यासा' रफी. चित्रपट-गँबलर, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). याचे ध्रुवपद खमाज मध्ये आहे.अंतर मात्र खमाज थाटातीलच दुसऱ्या रागात आहे.
'कुछ तो लोग कहेंगे,लोगों का काम है कहना' किशोर कुमार. चित्रपट-अमर प्रेम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७१). 
'तेरे मेरे मिलन की ये रैना' लता,किशोर कुमार. चित्रपट-अभिमान, संगीत-एस.डी. बर्मन (१९७३). 
'कसमें हम जानकी खाये चले गये' अन्वर हुसेन. चित्रपट-मेरे गरीब नवाज.संगीत-कमाल राजस्थानी (१९७३). 
'चोरी चोरी चुपके चुपके' लता. चित्रपट-आपकी कसम, संगीत-आर.डी. बर्मन (१९७४). 
'चांद अकेला जाये सखी री' येसुदास. चित्रपट-आलाप, संगीत-जयदेव (१९७७). 
'मेरे तो गिरीधर गोपाल' वाणी जयराम,दिनकर कामण्णा. चित्रपट-मीरा, संगीत-पं. रवी शंकर (१९७९). 
'रघुवर तुमको मेरी लाज' पं. भीमसेन जोशी. चित्रपट-अनकही, (१९८४). 
'चंदा देखे चंदा' लता,किशोर कुमार. चित्रपट-झुटी, संगीत-बप्पी लहरी (१९८६). 
'छोटीसी आशा' मिनमिनी. चित्रपट-रोजा, संगीत-ए.आर.रहमान (१९९२). 
'प्यार हुवा चुपके से' कविता कृष्णमूर्ती. चित्रपट-१९४२ लव्ह स्टोरी, संगीत-आर.डी. बर्मन (१९९४). 
'तू ही रे तेरे बिना मैं' हरिहरन. चित्रपट-बॉंबे, संगीत-ए.आर.रहमान (१९९४). 
'दो दिल मिल रहे है चुपके चुपके' कुमार शानु. चित्रपट-परदेस, संगीत-नदीम श्रवण (१९९७). 
'आन मिलो सजना' (ठुमरी) अजय चक्रवर्ती,परवीन सुलताना.  चित्रपट-गदर, संगीत-उत्तम सिंग (२००१). 
'मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू' शफाकत अमानत अली, शंकर महादेवन, करलीसा. चित्रपट-मितवा, संगीत-शंकर एहसान लॉय (२००६)
'मैं रंग शरबातों का तू मीठे घाट का पानी' अतिफ असलम, चिन्मयी श्रीपाद. चित्रपट-फटा पोस्टर निकला हिरो,संगीत-प्रीतम (२०१३). 
'जगावे सारी रैना' रेखा भारद्वाज. चित्रपट-डेढ इश्कीया,  संगीत-विशाल भारद्वाज (२०१४). 
'सजणा' विश्वजीत महापात्रा,दिप्तीरेखा.ओडिसी चित्रपट-काबूला बारबूला संगीत-प्रेम आनंद.
● नॉन फिल्मी...
'वैष्णव जन तो तेणे कहिये जो पीर पराई जाणे है'
(भारत रत्न एम० एस०  सुब्बालक्ष्मी पासून तर लता मंगेशकर पर्यंत, आणि अनूप जलोटा अनुराधा पासून तर अनुराधा पौडवाल पर्यंत प्रत्येकाने हे भजन गायिले आहे, दूसरीकडे मोठ्यात मोठ्ठया शास्त्रीय वादकांनी सुद्धा हे भजन आपापल्या वाद्यांवर वाजविले. हीच तर खमाज रागाची खासियत आहे.) 
'मोरा सैयां मोसे बोले ना' शफाकत अमानत अली खान.
'मुहब्बत करने वाले कम न होंगे
तेरी महाफिल में लेकिन हम न होंगे'...मेहदी हसन.
या गझलवर लिहावं तितकं कमीच आहे.
● मराठी
'या नवनवल नायनोत्सवा' छोटा गंधर्व.नाटक-संगीत मानापमान, संगीत-गोविंदराव टेंबे.
'ही बहू चपल वारांगना' नाटक-संगीत संशय कल्लोळ.
'धीर धरी धीर धरी जागृत गिरीधरी' पं. वसंतराव देशपांडे 
'मधुमधुरा तव गिरा' नाटक-विद्याहरण.संगीत-भास्करबुवा बखले.
'माझ्या प्रीतीच्या फुला' उषा मंगेशकर.
'या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे' अरुण दाते. संगीत-यशवंत देव.
'गुंतता हृदय हे’ नाटक-संगीत मत्स्यगंधा, ‘छेडियल्या तारा' नाटक-संगीत हे बंध रेशमाचे.
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.१०/१२/२०२३


 

Wednesday, December 6, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १७)

     
      ●पाऊस असा घनघोर नदील पूर●

     पुण्याला स्थायिक झाल्यावर २००३ मध्ये समीर चव्हाणशी ओळख झाली.(पुढे तो माझा जावई झाला.) त्याने पुण्यातील प्रसिद्ध उर्दू शायर हनीफ़ साग़र यांच्या गझलांचा दिवान वाचायला दिला.गझला इतक्या उत्कृष्ट व मनभावन होत्या की वाचता वाचता सुरावटी येत गेल्या.१०/१२ गझला स्वरबद्ध झाल्यावर समीरने हनीफ़ साग़रांचे शागिर्द हमीदभाई यांना ऐकण्यास निमंत्रित केले.त्यांना हा उपक्रम खूप आवडला.कारण अशा प्रकारे त्यांच्या गझला कोणी स्वरबद्ध केल्या नव्हत्या. लगेच त्यांनी पुण्यातील गझल प्रेमींना ह्या उपक्रमाची माहिती दिली.त्याची परिणीती साग़र साहेबांच्या बरसी निमित्त एक मोठा कार्यक्रम करण्याचे ठरण्यात झाली. आणि बालगंधर्वमध्ये याचे आयोजन करण्यात आले.बालगंधर्व बुक झाल्यावर आमची रोज प्रॅक्टिस असायची.मुलगा निषाद,मुली भैरवी आणि रेणू तिघेही पुण्यात शिकत होते. म्हणजे त्यांची विद्यार्थी दशाच होती.आणि हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच मोठा आणि तो ही उर्दू गझलांचा कार्यक्रम होता.या अगोदर 'सरगम तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत मी स्वरबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीत-गझलांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते.पण ह्या कार्यक्रमाचे महत्व त्यांच्या दृष्टीने मोठे होते.असेच एक दिवस प्रॅक्टिस संपल्यावर माझ्या पुतणीने  'मोठे बाबा, तुम्हाला चाली कशा सुचतात'? असा प्रश्न केला.खरे तर मी सतत वाचत राहतो आणि वाचता वाचता सुरावटी येतात.पण तिला हे सगळे सांगण्यापेक्षा हाताशीच असलेला मित्रवर्य स्व.अनिल कांबळेचा कविता संग्रह उघडला व त्यातील समोर आलेली कविता गंमत म्हणून ताबडतोब म्हणून दाखवली.तिचे समाधान झाले.पण आलेल्या सुरावटीने मात्र माझी झोप उडविली.गमती गमतीत थोडा अरेबियन टच असलेली सुरावट आली होती.त्यावर बरेच संस्कार करून अनिलनेच त्याच्या 'युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन' संस्थेतर्फे एस.एम.जोशी सभागृहात (२८ मे २००३) आयोजित केलेल्या 'सरगम तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात सादर केली.या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन प्रसिद्ध कवी मित्रवर्य नारायण कुलळकर्णी कवठेकर यांनी केले होते.प्रास्ताविक कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व मनोगत तथा पाहुण्यांचे स्वागत अनिलने  केले.तसेच श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे,डॉ.विकास कशाळकर वगैरे दिग्गज मंडळी होती. कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण ज्या कॅसेटवर केले ती खराब निघाल्यामुळे व्यवस्थित ऐकू येत नाही.आणि कॅसेटवरून कॉम्प्युटरमध्ये उतरवणे हा द्राविडी प्राणायाम करताना आणखीच क्वालिटी बिघडत जाणे असा प्रकार झाला.पण एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग असल्यामुळे तो आपल्या समोर ठेवावासा वाटला. आवडणे,नावडणे आपल्या हातात आहे.....


 

Saturday, December 2, 2023

राग-रंग (लेखांक ३४) राग मालगुंजी

जनचित्ताचे रंजन कणाऱ्या स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात राग असे म्हणतात.संगीताच्या इतिहासाच्या सुरूवातीपासूनच 'राग’ हा कल्पनेसारखा गुंतागुंतीचा आणि संस्कारित आविष्कार होता. खरे तर भारतीय संगीताच्या उत्कांतीचा तो एक संकलित परिणाम आहे असे म्हणायला हरकत नाही.अनेकदा असे म्हटले गेले आहे, की भारतीय रंगभूमी-परंपरेचा आद्य तत्त्व ग्रंथ मानल्या गेलेल्या भरताच्या नाटयशास्त्रात राग हा शब्द येतो. कारण त्या काळच्या रंगभूमीत नृत्य, नाटय व संगीत एकत्र आविष्कृत होत होते.असे असले तरी, आजच्या प्रमाणे एक सांगीतिक शक्ती म्हणून राग प्रचारात येण्याची घटना खूप नंतरची आहे.'राग' या कल्पनेस दीर्घ इतिहास असून त्याच्या विकासास अनेक परिमाणे आहेत. तेव्हा तेराव्या शतकात त्याची असंदिग्ध व्याख्या करण्यात आली व त्याच्या शक्यता धुंडाळण्यात येऊ लागल्या, असे मानण्यास हरकत नाही.नंतर घराणे उदयास यायला लागले.घराणे ही संकल्पना एकोणिसाव्या शतकातच प्रसृत झाली, कारण राजाश्रय गेल्यामुळे कलाकारांना शहरी केंद्रांकडे वळावे लागले. आपली खास ओळख कायम ठेवण्यासाठी आपापल्या मूळ गावांची खूण कायम राखणे त्यांना आवश्यक वाटले.त्यावरून घराण्यांची नावे आली.

     राग संगीतामध्ये  धृपद-धमार,लंगडा धृपद, ख्याल, ख्यालनामा, त्रिवट,  रास, चतुरंग,  तराणा, अष्टपदी,  सरगमगीत, टप्पा  हे संगीत प्रकार येतात.

सुगम कंठ संगीतामध्ये  ठुमरी, दादरा, कजरी,  चैती,  सावन, कव्वाली, गझल, भजन, हे प्रकार येतात.

     हिंदुस्थानी संगीतात पद्धतीमध्ये अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत वा तयार केले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते.एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते.

जोड रागांची भैरव बहार, हिंडोल बहार, बागेश्री बहार,भूप कल्याण ,केदार नट,सुहा कानडा,सुहा बिलावल,

जैत कल्याण,तिलक कामोद,यमन कल्याण,जलधर केदार,

गौड मल्हार,जयंत मल्हार,गौड सारंग,कामोद नट,हमीर नट,जोग कौंस,मधु कौंस,मेघ मल्हार,कौशी कानडा, बसंत बहार,अहिर भैरव,नट भैरव,नट बिहाग,बसंती केदार,  ललिता गौरी, राग अडाणा बहार, भैरव भटियार,सावनी नट वगैरे वगैरे मिश्र रंगांची अशी अनेक उदाहरणे देता येतील. मिश्र प्रकारातील असाच एक गोड राग आहे 'मालगुंजी'.हा राग गोड असला तरी जटिल आहे. यात खरे तर तीन राग दिसून येतात ते म्हणजे रागेश्री,बागेश्री आणि थोडा जैजवंती. ठोकळमानाने आरोहात रागेश्री,अवरोहात बागेश्री  दिसतात असे म्हणता येईल. बागेश्री विरह दाखवितो तर रागेश्री पुनर्मीलन दाखवितो असे म्हणतात.तसेच खमाज थाटातीलच असल्यामुळे काही ठिकाणी खमाज रागाचा पण अंश दिसतो.(काही लोक याला काफी थाटोतपन्न मानतात.) याचा वादी स्वर मध्यम असून संवादी स्वर षड्ज आहे.गान समय रात्रीचा तिसरा प्रहर आहे.

या रागाचा विस्तार तीनही सप्तकात केल्या जातो.

      अनेक गायक मालगुंजीला 'मालगुंजरी' या प्राचीन नावाने संबोधतात.याची प्राचीन विलंबित लयीची पारंपरिक बंदिश 'ये बन में चरावत गइयां, द्रुत लयीतील 'रैन काहे डरावन लागी री, 'मुरली की धुन सुनी सखी री आज' आणि 'तुम मतवारो रे पियरवा प्रसिद्ध आहे. चित्रपट संगीतामध्ये ज्या प्रमाणे भैरवी, खमाज, पीलू, बहार, पहाड़ी, झिंझोटी, मालकौंस आणि शिवरंजनी या रागांचा प्रयोग केल्या गेला त्या प्रमाणे मालगुंजी या रागाचा झाला नाही. मराठीत तर नाहीच नाही.

● चित्रपट गीते...

झनक झनक पायल बाजे मधील अतिशय सुरेल गीत मालगुंजी रागावर आधारित आहे. 'नैन सो नैन नहीं मिलाओ'  लता,हेमंत कुमार. चित्रपट-झनक झनक पायल बाजे, संगीत-वसंत देसाई (१९५५). 

मालगुंजी रागावर आधारित आणखी एक सुंदर रचना संगीतकार मदन मोहन यांनी अदालत चित्रपटा करीता तयार केली होती.'उनको ए शिकायत है कि हम कुछ नहीं कहते' लता. (१९५८). 

'घर आ जा घिर आये बदरा सांवरिया' लता.चित्रपट-छोटे नवाब, संगीत-आर.डी. बर्मन (१९६१) . हे -आर.डी.चे पहिले गाणे होते.असे म्हणतात की, त्या वेळी आर.डी.चे वडील एस. डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यात काही कारणामुळे दुरावा आला होता.त्यामुळे ते एकमेकांशी बोलत नव्हते.व आर.डी.चे हे चित्रपटातील पहिलेच गाणे असल्यामुळे ते लताजींकडून गाऊन घ्यायचे होते.लता मंगेशकर गायला तयार पण होत्या.त्या काळी ध्वनिमुद्रणापूर्वी भरपूर प्रॅक्टिस होत होती.त्यासाठी लता मंगेशकर आर.डी.च्या घरी आल्या होत्या.त्यांना एस.डी. ना भेटायची खूप इच्छा होती.म्हणून तसे आर.डी.ना विचारले.त्यांनी एस.डी. पण भेटायला उत्सुक असल्याचे सांगितले.आणि या गाण्याच्या निमित्ताने एस.डी. व लता मंगेशकर एकत्र येऊन पुन्हा काम करायला लागले. 

'बेदर्दी दगाबाज जा, तू नाहीं बलमा मोरा' लता. चित्रपट-ब्लफ मास्टर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९६३). 

'बलमा बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत- एस.मोहिंदर (१९६६). 

संगीतकार सलिल चौधरींची अनेक गाणी बंगालची सांस्कृतिक ओळख बनली आहे.त्यांच्या संगतामध्ये पाश्चात्य संगीतकार बाख, बीथोवेन, मोजार्ट आणि थोड़ासी चोपिन यांची छाप दिसते. लोक गीतांमध्ये काही प्रमाणात भारतीय शास्त्रीय संगीताचे मिश्रण पण दिसून येते. राग मालगुंजीवर आधारित एक अप्रतिम रचना आनंद या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली.

'ना जिया लागे ना तेरे बिना मेरा कहीं' लता.(१९७०). 

'जीवन से भारी तेरी आंखे मजबूर करे जीने के लीए' किशोर कुमार. चित्रपट-सफर, संगीत-कल्याणजी आनंदजी (१९७०). 
----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि.३/१२/२०२३

 

Wednesday, November 29, 2023

आठवणीतील_शब्द_स्वर (लेखांक १६) 'मिस्सळ'



    'गिल्ली मिस्सळ' म्हटले की प्रत्येक खवैयाच्या तोंडाला पाणी सुटतेच. कारण ही 'डिश' सर्वसाधारण वैदर्भीय खवय्यांची 'मर्मबंधातली ठेव' आहे. महाराष्ट्रभर मिळणाऱ्या या खाऱ्या डिशचे आबालवृध्दांना आकर्षण आहे. याचे कारण मिसळीची चटकदार चव. शेव, गाठी, पापडी, चिवडा (शिळ्या बटाटेवड्याचे व समोस्याचे तुकडे.) व वरून झणझणीत रस्सा आणि थोडे दही... नुसत्या वर्णनानेच तोंडाला पाणी सुटले ना? तर मंडळी, प्रत्येक गावच्या मिसळीची 'किक' थोड्याफार फरकाने सारखीच असते. तरी पण काही काही गावच्या खास खास चवीमुळे त्या त्या गावच्या मिसळी आयुष्यभर लक्षात राहतात. मिसळीमध्येही दोन प्रकार आहेत. एक सुकी मिसळ व दुसरी गिल्ली मिसळ. आपल्याकडे गिल्ली मिसळ लोकप्रिय आहे. कधी कधी रस्सा नाही म्हणून, नाइलाजाने 'फरसाण' या गोंडस नावाने सुकी मिसळही स्वाहा केली जाते. पण खरी मजा मात्र 'गिल्या' मिसळीतच आहे.
     अमरावतीच्या राजकमल चौकातील खड्डा हॉटेलमधील दही मारलेली मिसळ मला लहानपणापासून जीव लावून आहे.  अमरावतीला गेल्यावर ही मिसळ मारल्याशिवाय अमरावती वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नव्हते. आज ते खड्डा हॉटेल आहे की नाही माहीत नाही.जर असेल आणि 'तीच' चव कायम असेल तर त्या मालकाचा व भट्टी मास्तरांचा, समस्त मिसळप्रेमींनी सत्कार करायला काहीच हरकत नाही. 
       झणझणीत मिसळीसाठी एके काळी यवतमाळात जुन्या एस. टी. स्टँडवरील एक सिंधी हॉटेल प्रसिध्द होते. बसस्थानकाची नवी इमारत व्हायची होती. तेथे फक्त टिनाचे एक मोठे शेड होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. या हॉटेलमध्ये रात्रभर ग्राहकांची वर्दळ असायची. यवतमाळातील बहुतांश कलाकार रात्री येथे येत असत. आम्हीही ऑर्केस्ट्राची प्रक्टिस आटोपली की, रात्री एक ते तीनपर्यंत या हॉटेलात दत्तक गेलेले असायचो. इथली मिसळ काही औरच होती. (मालक तिच्यात आपला 'दिल' टाकत होता, असे तेव्हा म्हणायचे.) या खास चवीमुळे रात्री-बेरात्रीसुध्दा 'रसिकांची' खूप वर्दळ राहायची. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मिसळ खाऊ घालणारे ते यवतमाळातील एकमेव हॉटेल होते. आम्ही त्यावेळी शिकत असल्यामुळे पैशाची सदाच कडकी असायची. पण अऑर्केस्ट्राचे कलाकार म्हणून आमच्यावर मालकाची सतत मेहेरनजर असायची. उधारी थकलेली असूनही वेळप्रसंगी तोच आम्हाला आर्थिक मदत करायचा. इथली मिसळ अमरावतीच्या मानाने झणझणीत असायची व पहिल्या घासातच आपला 'ठसका' दाखवायची.
      पुण्या-मुंबईकडेसुध्दा मिसळ प्रकार आहे. पण तिला विदर्भाच्या मिसळीची सर येत नाही. तिकडे पाव-मिसळ किंवा पाव-भाजी प्रकार खूप चालतो. कारण सर्वसाधारणांचे ते 'खास' अन्न आहे. पण श्रीमंतांची चोचलेगिरी करणारी जीभ या खास अन्नाकडेही वळली व सर्वसाधारणांच्या तोंडचा घास पळवून अस्मानाला भाव भिडवून बसली. (भाववाढीचे महकार्य केल्याबद्दल सगळ्या विक्रेत्यांनी या उच्चभ्रू मंडळींचे आभार मानायला हवे. नाही तर कोण विचारत होते या पाव भाजी व मिसळ पावाला!) पण तेही असो. विषय मिसळचा आहे.
     मिसळ हा एक फक्त खाद्यपदार्थ आहे असा आजपर्यंत सार्वत्रिक समज होता. पण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबद्दलकडे पाहिल्यावर राजकारणातही मिसळ असते.आणि तीही 'गील्ली' व 'सणसणीत' असते याचा अनुभव सर्व महाराष्ट्र वासीयांना आला. खायच्या मिसळीतील बहुतांश पदार्थ बेसनाशी नाळ जोडून असलेले दिसतात. पण या मिसळीत मात्र कोणाची, कोणाशी, कोणत्याच प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. एखाद्या विक्षिप्त माणसाने जर भजी, पेढा, शेव, लाडू, पापडी, जिलेबी, गाठी, गुलाबजाम अशा भिन्न चवीच्या विरुध्द गुणधर्माच्या पदार्थांची मिसळ केली तर तिची चव कशी लागेल याचा अंदाज वाचकांनी घ्यावा व या मिसळीकडे बघावे ! त्यात भरीस भर म्हणून शिळेपाके, नासके पदार्थ टाकले तर? असो!
      अशी ही मिसळ तयार तर झाली आहे, पण जनतेला ती कितपत आवडली याचा अंदाज अजूनपर्यंत घेता आलेला नाही. तरी पण तिच्या चेहऱ्यावरून थोडाफार अदमास यायला लागला आहे. खरे तर, ही मिसळ म्हणजे एक चमत्कृती आहे आणि चमत्कार म्हटले की काहीही होऊ शकते. (असे चमत्कार फक्त भारतवर्षातच होऊ शकतात. इतर देशांची काय मजाल आहे!) आणि हे चमत्कार प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही. ही मिसळ अजूनही अनेक चमत्कार दाखविणार आहे. तरी बा अदब ! बा मुलाहिजा । होशियाऽऽऽर!



 

 

Saturday, November 25, 2023

राग-रंग (लेखांक ३३) गौडसारंग

गौडसारंग हा एक अत्यंत गोड असा राग आहे.पण याचे नाव मात्र अत्यंत चुकीचे आहे.कारण ज्याप्रमाणे  मधमाद सारंग, शुद्ध सारंग, मियाँ की सारंग, बड़हंस सारंग, सामंत सारंग, वृंदावनी सारंग, लंकादहन सारंग इत्यादी रागांमध्ये 'सारंग अंग' दिसते.तसे या रागात कुठेही सारंग अंग दिसत नाही.जसा 'गोरख कल्याण' मध्ये कल्याण, 'बैरागी भैरव' मध्ये भैरव दिसत नाही,अगदी  तसा! खरे तर पूर्वांगात गौड व उत्तरांगात कल्याण दिसत असल्यामुळे या रागाचे नाव 'गौड कल्याण' असायला हवे. या रागाच्या गानसमयावर सुद्धा विविध मते आहेत.नावात सारंग असल्यामुळे हा राग दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावे असे एक सर्वमान्य मत व कल्याण अंग असल्यामुळे रात्रीच्या प्रथम प्रहरी गायिल्या जायला हवा हे दुसरे मत. हा शास्त्रानुसार कल्याण थाटातील मानल्या गेल्यामुळे दुसरे मत अधिक योग्य वाटते.महत्वाचे म्हणजे सारंग रागात  जे दोन स्वर वर्ज आहेत तेच यात वादी संवादी आहेत. म्हणजे गांधार वादी व धैवत संवादी! प रे ही स्वरसंगती या रागाला स्पष्टपणे दाखविते.ग रे म ग, प रे सा इतक्या स्वरांवरून गौड सारंग राग आपले पूर्ण रुप दाखवितो.हा पूर्णतः वक्र स्वरूपाचा राग आहे.दोन्ही मध्यम लागणारे छायानट, केदार, कामोद वगैरे राग यात डोकावण्याची शक्यता असल्यामुळे हा राग गाताना अतिशय सावधपणे गावा लागतो.कदाचित यांच्यापासून बचाव करण्यासाठीच गौड सारंग रागाचे चलन वक्र ठेवले असावे.यात ख्याल,धृपद, तराणा या गानप्रकार गायिल्या जातात.प्राचीन ग्रंथकार कामोद,केदार,आणि हमीर प्रमाणे गौड सारंग रागाला बिलावल थाटजन्य राग मानतात.कारण तेव्हा या रागात तीव्र मध्यम लागत नव्हता. जेव्हा पासून दोन्ही मध्यमांचा प्रयोग व्हायला लागला, तेव्हापासून याला कल्याण थाटातील मानायला लागले.काही संगीत तज्ज्ञ याला 'दिवसाचा बिहाग' असे संबोधतात. एकूण स्वरूप बघता काही प्रमाणात ते योग्यही वाटते.दक्षिणेतील पंडित सुब्बाराव यांच्या 'रागनिधी' या ग्रंथानुसार गौड सारंग सारखा एकही राग दक्षिणेत नाही.परंतू शंकराभरणम् मधील काही राग याच्याशी मिळते-जुळते असल्याचे तामिळचे कृति मुद्दु कुमारय्यन यांचे म्हणणे आहे.

      ज्या लोकसंगीतामधून शास्त्रीय संगीत निर्माण झाले त्या संगीताला जन सामान्यांपासून दूर ठेवण्यास वेदकाळापासूनच सुरवात झालेली दिसून येते.'सामवेद' याचे जिवंत उदाहरण आहे.सरस्वती नदीच्या काठावरील परिसरात वस्ती करून राहणाऱ्यांना काही ऋचा स्फुरल्या.त्या 'ऋग्वेद' म्हणून ओळखल्या जातात.नंतरच्या काळात 'अथर्ववेद' झाले. नंतर दोन्ही वेदांतील काही ऋचांच्या चालीवरून 'सामवेद' सिद्ध झाला.सामवेदातील ऋचा स्वतंत्र नाही.दोन्ही वेदातील ऋचा म्हणण्याचे तंत्र सामवेदात विकसित झाले.

(सामवेद म्हणजे केवळ गायिलेल्या गानांचा संग्रह नव्हे, तर ज्यावर गायनाची आलापी अभिप्रेत आहे, ज्यात उदात्तादी स्वर आहेत, अशा ऋक्-मंत्रांचा संग्रह होय.सामवेदाला फक्त पदपाठ आहे अन्य विकृतिपाठ नाहीत. अशा सामवेदाचे पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. पूर्वार्चिकालाच छंद-आर्चिक म्हटले जाते. ‘आरण्य’ या नावाने प्रसिद्घ असलेला भागसुद्घा यात अंतर्भूत आहे. पूर्वार्चिकामध्ये मुख्यतः अग्नी, इंद्र, सोम यांच्या स्तुतिपर मंत्रांचा समूह आहे. यावर आधारलेल्या गायनांच्या संग्रहाला ‘गामगेय’ किंवा ‘गेय-गान’ अशी संज्ञा आहे.) ते संस्कृत भाषेत असल्यामुळे जन सामान्यांना त्याचा लाभ घेता येत नव्हता.नंतरच्या काळात राजे-रजवाडे,बादशहा,नबाब यांच्या दरबारात शास्त्रीय संगीत बंदिस्त झाले.म्हणूनच बोलपटाची सुरवात होऊन त्यात गाणी यायला लागल्या बरोबर लोकप्रिय व्हायला लागली,ती आजतागायत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. (चित्रपट गीतांना शास्त्रीय संगीतातील पंडित/उस्ताद 'हलके संगीत' म्हणून हिणवतात.पण मला तरी यात हलकेपणा दिसत नाही.लता,रफी,आशा,किशोर वगैरे गायकांच्या प्रमाणे गाण्यासाठी व रागावर आधारित धून बनविण्यासाठी शास्त्रीय संगीताचा प्रचंड अभ्यास, असामान्य प्रतिभा आणि क्षमता आवश्यक असते.) स्वातंत्र्य मिळाल्या नंतर आकाशवाणीच्या माध्यमातून काही प्रमाणात शास्त्रीय संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचायला लागले.तरी त्याचा वेग चित्रपट संगीताच्या मानाने एकदमच कमी होता. माझी अनेक विधाने उस्ताद,पंडितांना पचणार नाहीत.पण हे कटू सत्य आहे.असो!

     पंडित डी. व्ही.पलुस्कर, पंडित सी.आर.व्यास, कृष्णराव शंकर पंडित, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व,उस्ताद निसार हुसेन खान, उस्ताद अमानत अली खान, उस्ताद सरफराज हुसेन खान, उस्ताद गुलाम हुसेन खान, आफताब-ए-मौसिकी फैय्याज खान, उस्ताद युनूस हुसेन खान, यशवंतबुवा जोशी, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, पंडित रामाश्रय झा, पंडिता किशोरी आमोणकर, पद्मा तळवलकर, उल्हास कशाळकर, यांनी गायिलेला व पंडित रविशंकर (सतार),उस्ताद अली अकबर खान (सरोद), यांनी सादर केलेला गौड सारंग अभ्यासनीय आहे.

     या रागाच्या वक्र प्रवृत्तीमुळे शास्त्रीय संगीत सोडले तर नाट्यगीत,चित्रपट गीत,भावगीत,भक्तीगीत वा गझल या प्रकाराशी फारशी सलगी केलेली दिसत नाही.जी काही थोडी-फार जवळीक साधली ती खालील हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या,त्याही जुन्या संगीतकारांच्या रचना खाली देत आहे.

● चित्रपट गीते...

'देखो जादु भरे मोरे नैन' गीता दत्त. चित्रपट-आसमान, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५२). 

'रितु ऐ रितु जाए' लता,मन्ना डे. चित्रपट-हमदर्द, संगीत-अनिल विश्वास (१९५३). 

'झुला झुलो रे झुलना झुलाऊं' लता. चित्रपट-एकादशी, संगीत-अविनाश व्यास (१९५५). 

'लहरों में झूलूं' आशा भोसले. चित्रपट-समाज, संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 

'वो दखें तो उनकी इनायत' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-फंटूश, संगीत-एस.डी. बर्मन  (१९५६). 

'ना दिर दीम' लता. चित्रपट-परदेसी, संगीत/अनिल विश्वास (१९५७). 

'अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम' लता. चित्रपट-हम दोनो, संगीत- जयदेव (१९६१). 

'कुछ और जमाना' मीना कपूर. चित्रपट-छोटी छोटी बातें, संगीत-अनिल विश्वास (१९६५). 

● गैर-फिल्मी...

'भूली बिसरी चंद उम्मीदें चंद फसाने याद आए' -मेहदी हसन. 

'दैरो हरम में बसने वालों' -जगजीत सिंग.अल्बम-फेस टू फेस.

'सावन रुत आए देखो बलम' सुलतान खान,चित्रा. अल्बम-पिया बसंती (२०००). 
-----------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी, २६/११/२०२३


 

Wednesday, November 22, 2023

आठवणीतील शब्द स्वर...(लेखांक १५) ●मदरटांग●



    मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली. मराठीत असलेले परकीय शब्द, बांगलादेश किंवा पाकी घुसखोरांप्रमाणे वेगळेपण जपून मुळावर घाव घालणारे नसून, मराठीची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करणारे आहे. त्यामुळे ते मराठीशी इतके एकरूप झाले आहेत की, आज आपण त्यांची हकालपट्टी करतो म्हटले तरी ते शक्य नाही.
     प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.
     मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हासल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !
     कच्च्या इंग्रजीमुळे काय काय घोटाळे होतात ते आपण नेहमीच बघतो. एकदा बाहेरगावचा कायक्रम आटपून शाळेत पोहचलो, तर सगळीकडे सामसूम दिसले. शांततेसोबतच परिसरही स्वच्छ चकचकीत ! मुलांचा आवाज नाही. शिक्षकही वर्गावर! पण सगळे शांतपणे. या वातावरणामुळे काही तरी गंभीर घडल्याची जाणीव होऊन मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. म्हणून हळूच समोरच्या चपराशाला विचारले, तर तो उत्तरला, 'आज इन्फेक्शन झाले ना म्हणून असे आहे !' प्रथम कळले नाही, पण थोड्याच वेळात 'टूप' पेटली, नुकतेच इन्स्पेक्शन झाल्याचे कळले व हसता हसता पुरेवाट झाली.
     आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्‌गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'
     घरातूनच असे प्रसंग घडतात असे नाही. कार्यालयांमधूनसुध्दा हे घडतच असतान एकदा आर्णीच्या विद्युत मंडळाच्या कार्यालयात इंजिनियर मित्र श्री. राम पांडेसोबत गप्या मारत बसलो होतो. काही वेळाने एक वायरमन तेथे आला व पांडेना म्हणाला, 'साहेब, झंपर जळाले!' आम्ही त्याचेकडे आश्चयनि बघायला लागलो. पण पांडेसाहेब चेहऱ्यावरची रेषही न हालवता म्हणाले, 'बदलून टाक.' अंगावरील झंपर जळूनही पांडेचा हा तटस्थपणा पाहून आम्हाला राग यायला लागला व तावातावातच आम्ही म्हणालो. 'काय हे पांडेसाहेब झंपर जळाले म्हणजे झंपरवाली बाई पण जळाली असेल ना? मग झंपर बदलून टाक अले म्हणून बोळवण करण्यापेक्षा त्या बाईला दवाखान्यात न्यायला का सांगत नाही!' यावर पांडेसाहेब व वायरमन दोघेही खो-खो करून हसायला लागले व म्हणाले 'तुम्ही समजता तो हा झंपर नाही. हा 'जंपर' आहे. तारांचा जोड असतो त्या खांबाला कट पॉईट म्हणतात. या कट पाँईटवरून इकडून तिकडे विद्युत-वहन होण्याकरिता जो तार बापरतात, त्याला जंपर म्हणतात.' वायरमन या जंपरचा अपभ्रंश सरळ सरळ झंपर असा करून 'झंपर जळाले,' 'झंपर ओपन झाले' 'झंपर तुटले,' असे सांगत असतात.
     मराठीमध्ये इंग्रजी शब्द वापरल्यामुळे होणारे घोटाळे ठीक आहेत, पण आपली मायबोलीच जेव्हा पन्नास कोसावर 'चाल' बदलते, तेव्हा तर आणखीनच गंमत येते. बुलढाणा जिल्ह्यात 'ळ'चा उच्चार 'ड' असा केल्या जातो. त्यामुळे डाळीला दाड, केळीला केडी, फळाला फड, गुळाला गुड, तळ्याला तडे म्हटल्या जाते. तेथील डॉक्टर लोक या लोकांना 'अर्धी गोडी सकाडी व अधीं गोडी संध्याकाडी उकडलेल्या पाण्यासोबत घ्या' असे गंमतीने सांगतात. हाच 'ळ' अमरावती जिल्ह्यात 'य' बनतो. तेव्हा गुळाचा गुय, केळाचे केय होते. तिकडे झाडीपट्टीत तर आणखीनच वेगळे काम आहे तेथे 'ळ'चा 'र' होतो व 'ज' 'च' चा उच्चार ज्य, च्य होतो. 'बाजारात जाशील तर तुरीची डाळ व चांगला गूळ आणशील' हे वाक्य 'बज्यारात ज्याशीन त तुरीची डार अन् च्यांगला गूर आनज्यो' असे रूप घेते.
     सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!
     तर मंडरी, धीस इज मराठी म्हणजे मदरटांग आणि धीस इज आम्ही! जितके राईटचे तेवढे थोडेच! म्हणून आता आपली 'लीव्ह' घेतो.


 





संगीत आणि साहित्य :