गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, November 19, 2020

आणि इंदूर जिंकले! -सुनील शिनखेडे


           १६ डिसेंबर, इंदोऱ. सायंकाळची वेऴ. अगदी कडाक्याची थंडी़. वातावरणात कमालीचा गारठा असूनही जाल सभागृहात रसिकांची गर्दी हळूहळू जमू लागली़. साडेसातच्या सुमारास हॉल अगदी गच्च भरलेला़. वास्तविक अशी अपेक्षा कुणाला नव्हतीच मुळी़. कारण इंदोरच्या रसिकांसाठी कार्यक्रम काहीसा वेगळाच होता़. मराठी गीत-गझल गायनाचा़. कलावंतही इंदोरसाठी नवीनच़. सुधाकर कदम़ इंदोरमध्ये आपला कार्यक्रम व्हावा अशी कदमांची बरेच दिवसांची इच्छा होती़. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्यक्रम झाले होते़. मूळचे ते यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी ह्या गावचे. त्यामुळे विदर्भात ते विशेष परिचित़. परंतु इंदोर सारख्या हिंदी भाषी परिसरात मराठी रसिकांसाठी मैफल व्हावी ही त्यांची इच्छा. तसे योग जुळून आलेत़. मूळचे आर्णीचेच परंतु इंदोरला स्थायिक झालेले वानखडे बंधुद्वयांची समॅक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पुढे आली़. ह्या कंपनीचे अभियंते श्री अविनाश वानखडे ह्यांनी आयोजनाचा संपूर्ण भार सांभाळला़. प्रमोद कोठारी, अनिल वानखडे, दीपक शिंदे, अभिलाष खांडेकर व अन्य चाहते मंडळी मदतीला धावली़.
 संपूर्ण सभागृहच मोगर्‍याच्या सुवासाने धुंद झालं होतं. इंदोरचे प्रसिध्द रंगकर्मी बाबा डिकेंच्या प्रमुख उपस्थितीत मैफल सुरु झाली़. आणि कवी कलीमखान ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.
 वेळ सायंकाळची़. सायंकाळच्या प्राथनेची़. कलीमखानांनी सुरेश भटांचे शब्द दिलेत -
 ‘माझीया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे़’ सुधाकर कदमांचे सूर साथीला आलेत़. संपूर्ण हॉल स्तब्ध, शांत़ कदमांचा स्पष्ट व मोकळा आवाज़ साथील तबल्यावर नागपूरचेच रमेश उइके आणि सारंगीवर इंदोरचे आकाशवाणीचे प्रसिध्द सांरगीवादक मोइनुद्दीन खॉ साहेब़ शब्दसुरांची गाठ पडली़. कदमांची मध्यप्रदेशातील पहिलीच मराठी गीत-गझलांची मैफल रंगू लागली़.
 तसा गझलांचा चाहता वर्ग मोठा परंतु मराठी गझलांचा मोजकाच़. इंदोरसाठी तर मराठी गझल गायन हा प्रकारच नवीन होता़. त्यामुळे येथील मराठी रसिक कदमांना कितपत स्वीकारतील ह्याबद्दल आयोजक साशंक होते़. परंतु मैफलीच्या पूर्वार्धातच रसिकांनी अगदी मनापासून दाद दिली़. ह्या कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेल्या ह्या शहरात मराठी रसिकांचा भरणा काहीसा कमीच. परंतु ह्या नव्या कलाकारांच्या इथल्या पहिल्याच मैफलीत काही वेगळेच दृश्य दिसले़. सुरुवातीपासूनच उपस्थितांची जबर दाद मिळवून कदमांनी रसिकांचे हृदय काबीज केले़.
 कवी कलिमखान ह्यांनी कधी कवठेकरांच्या, कधी बोरकरांच्या, तर कधी स्वतःच्या मार्मिक ओळी व कविता पेश करुन मैफलीला अनुकूल असे वातावरण जिवंत ठेवले़ त्यांच्या ‘कुंकू’ ह्या कवितेतला तर अशी काही दाद मिळाली की रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ती कविता पुन्हा म्हणावी लागली़
 ‘दीनरात ज्याचे गान मी गातो
 तो भारतभाग्यविधाता
 रस्त्यावर चिवडा खातो.’
 ह्या त्यांच्याच ओळी सद्यःपरिस्थितीचे भान जागवणार्‍या़ आणि श्रोत्यांना विचारात टाकणार्‍या़. अशा वैचारिक तर कधी श्रृंगारिक शब्दांची, कवितांची पेरणी करत कलीमखानांनी मैफलींचे सारथ्य केले. आणि श्रोत्यांना बांधून ठेवले़. सोबत कदमांनीही कधी श्रृंगार, कधी याचना, तर कधी यातना असे विविध भाव ओतले़.
 भटांच्या‘झिंगतो मी कळेना कशाला, जीवनाचा रिकामाच प्याला़’
 ह्या गझलेतील झिंगतो हा शब्द म्हणण्याचा कदमांचा आगळा ढब रसिकांची दाद घेऊन गेला़
 ‘ऐन वेळी अशी का करतेस तू़’
 ह्या गोड, लाडिक व काहीशा धीट गझला सादर करुन कदमांनी रसिकांची तब्येत खूष केली़.
 मध्यंतरामध्ये आयोजकांतर्फे सर्व रसिक श्रोत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम होता़. तसा हा सुद्धा आयोजनातील आगळावेगळा गोड अनुभव. इंदोरच्या श्रोत्यांसाठी नवाच होता! मैफलीला खास रंग चढला तो मध्यंतरानंतरच़ रात्रीला कमालीची थंडी असूनही सर्वच रसिक पुन्हा स्थानापन्न झाले़. उत्तरार्धाच्या सुरुवातीस कदमांनी श्रीकृष्ण राऊतांचे
 ‘दुःख माझे देव झाले, शब्द झाली प्रार्थना आरती जी गात आहे, तिच माझी वेदना’.
 नंतरही एकसे एक गझला सादर करून कदमांनी भरपूर टाळ्या घेतल्या़-
 कलीमखान यांच्या
 ‘मोगरा वेणीत पोरी माळण्याचे दिवस आले
 आपुले अपुल्यावरी भाळण्याचे दिवस आले!’
 ह्या गीताने एवढ्या गारव्यातही रसिकांना गोड गुलाबी दिलासा दिला़. संपूर्ण मैफलीत कधी तबल्याचे साथी रमेश उईकेंनी, तर कधा मोइनुद्दीन खॉं साहेबांच्या सारंगीच्या मधुर सुरांनी रसिकांना दाद देण्यास भाग पाडले़. कवठेकरांच्या‘मस्तीत गीत गारे देतील साथ सारे़’ ह्या गीताला तर रसिकांनी उत्स्फुर्तपणे टाळ्यांचा ठेका दिला़.सतत चार तासपर्यंत सर्वच रसिक ह्या शब्दसुरांच्या आगळ्या वेगळ्या मैफलीचा आनंद मनसोक्त लुटत होते़ भारदस्त गझला, त्यांना स्वरसुरांचा साज, कलीमखान यांचे खुसखुसीत संचालन, उत्कृष्ट आयोजन व इतर प्रत्येकच बाबतीत वेगळेपणा सिद्ध करणार्‍या ह्या मैफलीची सांगता भैरवीने झाली़.
 अत्युत्कृष्ट आयोजन व बहारदार मैफलीच्या इंदोरच्या पहिल्याच उपक्रमासाठी अभिनंदनपर संदेश अद्यापही येत आहेत़ दुसरी मैफल कधी? ही विचारणा करणार्‍या पत्रांचा ढीग लागतो आहे़. मध्यप्रदेशातील महू, उज्जैन, देवास, रतलाम येथूनही कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मंडळांची निमंत्रणे आली आहेत़. केवळ एकाच मैफलीने कदमांनी इंदोरच्या रसिकांची हृदयं काबीज केलीत़.

तरुण भारत,नागपूर
१४ जानेवारी १९९०

(डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून साभार...)

 





संगीत आणि साहित्य :