गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, December 11, 2020

जाणकार संगीतकार...अनुराधा मराठे


          माझी व सुधाकर कदम यांनी ओळख २००५ मध्ये झाली.ते 'अर्चना' या मराठी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये काम करीत होते.या अल्बममध्ये गाण्यासाठी त्यांनी मला बोलाविले.हीच आमची पहिली भेट होय.या वेळी ते उत्तम संगीतकार आहेत,उत्तम गझलगायक आहेत याची अजिबात कल्पना नव्हती.ते नागपूरचे आहेत एवढेच मला माहीत होते. नंतर हळू हळू त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली.विदर्भासोबतच महाराष्ट्रभर त्यांनी सुरेश भटांसोबत मराठी गझलकारांच्या गझलांना स्वरबद्ध करून गायिल्याचे येथील (पुण्यातील) गझलकारांकडून कळले.तसेच आर्णी या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना गझल गायकीसोबतच अनेक उपक्रम राबविल्याचेही कळले.
त्यात माझ्या दृष्टीने महत्वाचे कार्य म्हणजे गांधर्व विद्यालयाची स्थापना व परीक्षा केंद्र होय.
          'अर्चना' ह्या अल्बमचे काम सुरू करायचे ठरल्यावर चाली सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले.दुसऱ्यावर बघताक्षणीच प्रभाव पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.बोलण्याच्या आवाजावरून हा माणूस गात असावा असा अंदाज येणारे अत्यंत मृदू बोलणे.समोरच्या व्यक्तीला सहज आपले करून घेणारे वागणे,यामुळे प्रथमदर्शनीच सुधाकर कदम या व्यक्तीचा अंदाज मला आला.ह्या वेळी त्यांच्या दोन्ही 'गायिका' कन्या त्यांच्या सोबत होत्या.मनात म्हटलं ,'सगळं घरच गाणारं दिसतंय.' असो
          'अर्चना' या अल्बममध्ये माझी पाच गाणी आहेत. अतिशय अप्रतिम व आकर्षक चाली आहेतच.पण त्याचबरोबर श्रवणीय आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या आहेत.मला वाटते गझल गायकीमुळे शब्द,काव्यातील अर्थ याचा अचूक अंदाज सुधारजींना आहे.त्यामुळेच या अल्बममधील आशा पांडे यांच्या गीतांना समर्पक अशा चाली त्यांनी लावल्याचे दिसून येते.सुंदर शब्द व सुंदर स्वररचना यांचा सुंदर मेळ म्हणजे ,अर्चना'! या अल्बममध्ये एकूण दहा भक्तिरचना आहेत. खालील शब्दांवरून त्या किती प्रासादिक आहेत याची आपणास कल्पना येईल.
१.श्रीहरी रे श्रीहरी,नाद केवळ एक घुमतो,श्रीहरी रे श्रीहरी...
२.शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी...
३.ये मंत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार...
४.तुझीच सुमने तुझे निरंजन,चरणी तुझिया तुझे समर्पण...
५.वेद झाले वेदनांचे,शब्द झाले रे ऋचा...
६.श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे...
७.दयासागरा...
८.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे...
९.अर्चना...
१०.या देहाचे देऊळ झाले...
           यातील पहिलेच गाणे शुद्ध गांधारावरुन उठणारे भूपाच्या अंगाने जाणारे आहे.भूपामध्ये मधून मधून केलेल्या शुद्ध निषादाच्या वापरामुळे ही बंदिश अतिशय गोड व वेगळी झाली आहे.शौनकचे (अभिषेकी) व माझे 'शक्ती दे तू आज मजला' असे आवाहन करणारे शब्द व त्यानुसार भिन्नषड्ज रागात केलेली रचना,त्यातही मध्यमाला षड्ज करून मूर्च्छना पद्धतीने केलेली पुढील स्वररचना,त्याला लावलेल्या चाचर तालामुळे अतिशय स्फूर्तिदायक झाली आहे.एक आवेश व आवेग या भक्तिगीतामध्ये शब्द-स्वरांद्वारे प्रत्ययास येतो.'अर्चना' हे माझे या अल्बममधील सर्वात आवडते गाणे आहे.
'तूच माझे गीत कोमल,भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना,तू अंतरी विश्वास रे...
सुंदर शब्द व अत्यंत आर्तता असणारी स्वररचना.आणि 'विश्वास रे' वरची अवरोही जागा फारच सुंदर.सुरांचे घरंगळणे. दोरा सुटल्यावर मोती जसे घरंगळतात तसे तसे इथे स्वर घरंगळले आहेत.सुधाकरजी उत्तम संगीतकार असण्याची साक्ष द्यायला हा एकच अल्बम पुरेसा आहे.
           मी त्यांचे पुढील सर्व आयुष्य पूर्ण आयुरारोग्य व सुरांच्या संगतीत जावे अशी प्रार्थना करते.

१३/११/२०१८

प्रा.डॉ.श्रीकृष्ण संपादित व 'अक्षरमानव'प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून....
--------------------------------------------------------------------


 

बाबा-रेणू कदम चव्हाण

.
      मी लेखिका वगैरे नाही.पण काही आठवणी अजूनही कालपरवा घडल्याप्रमाणे डोळ्यापुढे तरळत आहेत,जसजशा आठवतील,तशा सांगायच्या आहेत.
      लाल-तांबूस डोळ्यांचा कोणी एक व्यक्ती माझ्या घरात रोज रात्री यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा.तो कोण असेल बरे,मला हा प्रश्न नेहमी पडे. नंतर हळूहळू लक्षात आले की,ते माझे वडील आहेत.
      पूर्वी बाबा फार तापट,रागीट होते.रात्री कार्यक्रम करून उशिरा घरी येणे आणि सकाळी उठून शाळेत रुजू होणे, शाळेतील संगीत कक्षात दिवसभर रियाज,रात्री कार्यक्रम अशी त्यांची दिनचर्या असे.त्यामुळे लहानपणी बाबा आम्हाला कमीच मिळाले.आम्ही आर्णीला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत रहायचो.नंतर स्वतःचे घर झाले तेव्हा बाबांचा सहवास अधिक प्रमाणात लाभू लागला.तेव्हा बाबा खरेच काय आहे,हे हळूहळू कळायला लागले.
      बाबा हे एक उत्तम संगीतकार तर आहेतच पण त्याचबरोबर एक चांगले शिक्षकसुद्धा आहेत. एखादे गीत व गझल शिकवताना एखाद्या कळीच्या पाकळ्या उमलून त्याचे फुल कसे बनते तसे बाबांचे शिकवणे. जोपर्यंत गळ्यातून निघत नाही तोपर्यंत अजिबात न चिडता सांगत रहायचे.बाबांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या बंदिशी आणि चाली या ऐकायला सोप्या पण गायला अतिशय कठीण.एक किस्सा असाच आठवतो.माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे.आम्ही 'तसव्वुर' हा सागर साहेबांच्या उर्दू गझलांचा कार्यक्रम करीत होतो.त्यात 'कहता हूँ मूहब्बत है खुदा सोच समझकर' या भैरवीतील गझलेची रिहर्सल करीत होतो.हार्मोनियमवर भाविक राठोड हा एक उमदा गायक बसला होता. आणि 'कल उम्र का हर लम्हा कहीं सांप न बन जाए' हा शेर चालू होता.तो सारखा सांप च्या जागी अडकायचा. बाबांनी त्याला अस्सल वऱ्हाडीत विचारले,'काहून र बाप्पू का व्हा लागलं? तसा तो म्हणाला ,काही नाही बाबा,साप त सापडला पण शेपूट नाही गवसा लागलं तव्हाचं'.
      बाबांचे व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करणारे होते.त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते यांची घरी नेहमी वर्दळ असायची. आर्णीला आमचे घर कधीच रिकामे राहायचे नाही.कोणी ना कोणी सतत घरी असायचे.
     आज त्यांच्या गौरव ग्रंथासाठी लाख लाख शुभेच्छा.आई आणि बाबा,तुम्हा दोघांना उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखासमाधानाचे जावो ही मनापासून इच्छा व्यक्त करून थांबते.धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित,
'अक्षरमानव' प्रकाशित सन्मानग्रंथ (१३/११/२०१८)
'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...


 





संगीत आणि साहित्य :