गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, April 16, 2024

आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज... डॉ.श्रीकृष्ण राऊत.


         १९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेशभटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.
         १९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
           1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.

            2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.
           3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदाआर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.

ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.
           अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले. 
            सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
          यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.
           राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी¬ मुळातूनच वाचावेत असे आहेत.
          १९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.
त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
          ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.
         कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

        इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व' 
(www.gazalgazal.blogspot.com) हा  कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम अख्तर -मेहदी हसन - 
गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात हाथरसच्या  
'संगीत ' मासिकातील  'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि  'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात  उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची   नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना  त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच  कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला  उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर  कदमांच्या योगदानाचा हा  अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.
        वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि 
मित्र म्हणून अभिमानही.

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला
------------------------------------------------------------------
.                   
                        प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची ही पोस्ट वाचल्यानंतर सुधाकर कदम यांच्याविषयी, त्यांच्या आठवणीविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाहीये. मला वाटतं, मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हिच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही.

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची पहिली नज़्म होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 
- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकांर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं. 
- [ ] आज कवी प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची सुधाकर कदम यांच्यावरील ही सुरेख पोस्ट वाचल्यावर आपसूकच ३८ वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं....

- Ashish Jadhao
-------------------------------------०------------------------
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-पोस्टेजसह ३००रु.
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850 गुगल पे.
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.


 

Friday, April 5, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक ३०)

       १९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे, म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेध भट आणि मी,

आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यावर माझे पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून राज्य स्तरावरील प्रशिक्षण वर्गात संगीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.
      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला #गझलकट्टा  आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंदीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाल गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अल्बम करण्याची कल्पना आली.आणि मग '#खूप_मजा_करू' हा बालगीतांचा अल्बम आकाराला येऊन फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.
      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायचची.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची आशा पांडेंशी ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.
     मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अल्बम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला .वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे. हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

●'अर्चना' मधील गीतांची युट्युब लिंक खाली देत आहे.आनंद घ्यावा....
https://youtu.be/DKkZmnDd-WU?si=aY-YTRfHogl_zodw

-----------------------------------------------------------------------
#अर्चना तयार होतानापासून लोकार्पणापर्यंतची काही क्षणचित्रे...

पुण्यातील वारजे येथील माझ्या घरी शौनक अभिधेकींची प्रॅक्टीस.....



प्रकाशन सोहळा - डावीकडून गायिका अनुराधा मराठे,कवी/संगीतकार सुधीर मोघे,कवी गंगाधर महांबरे,अस्मादिक,गायक शौनक अभिषेकी.

'अर्चना' मधील भक्तीगीतांचे सादरीकरण...



रसिकांनी तुडुंब भरलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे.


 

Wednesday, March 27, 2024

आठवणीगील शब्द स्वर (लेखांक २९)

.                          #प्र_मुख_पा_हुणा

     माझ्या आयुष्यातील ३१ वर्षे आर्णी या गावी संगीत शिक्षक म्हणून गेली.या ३१ वर्षांत परिसरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाचे परिक्षा केंद्र', नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय' कला मंडळ, संगीत प्रेमींसाठी 'सरगम', आमची शाळा माहुरच्या दत्त शिखराचे महंत दत्ताराम भारती यांच्यामुळे सुरू झाली म्हणून 'दत्त जयंती उत्सव समिती', 'तालुका पत्रकार संघ' 'शिवजयंती उत्सव समिती' 'शिवसेना शाखा' इत्यादींची स्थापना.समाजकारण,

पत्रकारिता,वर्तमानपत्रासाठी स्फुट लेखन,मराठी गझल गायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम, हिंदी/मराठी कवी संमेलने,गझल गायन स्पर्धा,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,विविध सांगीतिक कार्यक्रम  अशी अनेक आयोजने वगैरे वगैरे उपद्व्याप केलेत.

     कलाकारांच्या आयुष्यात कोणत्या वेळी कोणता अनुभव वाट्याला येईल हे सांगता येत नाही.वरील सर्व प्रकारांमुळे नावारूपास आल्यावर  घडलेला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.एकदा एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावणे झाले. संगीतकारांनाही चांगले दिवस येत असल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! कार्यक्रमाच्या दिवशी मी छानसे कपडे घालून, अत्तर वगैरे फवारून समारंभस्थळी पोहचलो! तर अध्यक्षच बेपत्ता। एका तासाने अध्यक्ष आल्यावर उद‌घाटन सोहळा आटोपला. भाषणबाजी झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आयोजकांनी मला थांबवून भावगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून माझी पदावनती करून टाकली. थोडा राग आला पण म्हटले 'चलता है।' थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली. पण हार्मोनियम वादक नदारद ! फक्त तबल्यावर गाणे कसे म्हणावे हा प्रश्न स्पर्धकाला पडला. तेवढ्यात आयोजक पुन्हा माझ्याकडे आले व हार्मोनियम वाजवायची विनंती करायला लागले. पण मला 'पेटकर' बनविण्याचा त्यांचा धूर्त बेत हाणून पाडून मी तेथून निघून आलो. तेव्हापासून प्रमुख अतिथी पदाचा जो धसका मी घेतला. तो आजतागायत ! (काही दिवसांनी कळले की, 'पेटकर कम परीक्षक म्हणून हाताशी ठेवण्याकरिताच मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले होते म्हणून!)

Saturday, March 16, 2024

तू दिलेले दुःख....

राग_रंग (लेखांक ४३) राग धानी.

पूजाकोटिगुणं स्तोत्रं स्तोत्राकोटिगुणो जप:| जपात्कोटिगुणं गानं गानात् परतरं न हि || अर्थात, पुजेपेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ स्तोत्र,स्तोत्रापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ जप, आणि जपापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ 'गान'.गाना पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. धानी राग हा काफी थाटातून उत्पन्न झालेला अतिशय गोड राग आहे.भारतीय संगीतांर्गत येणाऱ्या रागांचे वर्गीकरण करण्यासाठी थाट अथवा मेल व्यवस्था करण्यात आली आहे.भारतीय संगीतांमध्ये सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र अशा प्रकारे एकूण बारा स्वरांचा प्रयोग केल्या जातो एका रागाच्या रचनेसाठी या बारा स्वरातील कमीत कमी पाच स्वरांचे असणे आवश्यक असते.संगीतांमध्ये थाट रागांच्या वर्गीकरणाची पद्धत आहे.सप्तकातील बारा स्वरामधील कर्मानुसार मुख्य सात स्वरांच्या समुदायाला थाट असे म्हणतात. यातूनच रागोत्पत्ती होते.थाटालाच मेल असेही म्हणतात. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये ७२ मेल प्रचलित आहे.उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र १०थाटांचाच प्रयोग केल्या जातो. याची सुरवात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी करून प्रचलित केले.(दहा ऐवजी आणखी एक-दोन थाट वाढविले असते तर प्रचलित दहा थाटात न बसणारे राग पण थाट पद्धतीत चपखल बसले असते.) सध्या राग वर्गीकरणाची हीच पद्धत प्रचलित आहे. कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोड़ी आणि भैरवी... भातखंडेंजी द्वारा प्रचलित असलेले हेच ते दहा थाट होय.सर्व प्रचलित,अप्रचलीत रागांना या दहा थाटात सामील करून घेतले आहे. भारतीय संगीतांमध्ये त्या स्वरसमूहाला थाट म्हणतात ज्यात रागांचे वर्गीकरण केल्या जाऊ शकते,किंवा करतात.१५व्या शताब्दीच्या उत्तरार्धात 'राग तरंगिणी’ या ग्रंथाचे लेखक लोचन कवी यांनी राग वर्गीकरणाची पारंपरिक 'ग्राम आणि मूर्छना' पद्धतीमध्ये परिवर्तन करून मेल अथवा थाट पद्धतीची स्थापना केली.लोचन कविंच्या म्हणण्यानुसार त्या काळी सोळा हजार राग प्रचलित होते. यातील मुख्य असे राग ३६ होते.सतराव्या शताब्दीमध्ये थाटांर्गत रागांचे वर्गीकरण प्रचलित झाले होते. थाट पद्धतीचा उल्लेख सतराव्या शताब्दीतील ‘संगीत पारिजात’ आणि ‘राग विबोध’ नामक ग्रंथांमध्ये सुद्धा केल्या गेला आहे. लोचन द्वारा प्रतिपादित थाट पद्धतीचा प्रयोग जवळ-जवळ तीनशे वर्षांपर्यंत होत होता. एकोणविसाव्या शताब्दीच्या शेवटी व विसाव्या शताब्दीच्या सुरवतीच्या दशकात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी भारतीय संगीताच्या विखुरलेल्या सुत्रांना एकत्र करून अनेक सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. भातखंडेंद्वारे निर्धारित दहा थातातील सातवा थाट काफी आहे. त्यातूनच उत्पन्न झालेला धानी राग एक चंचल प्रकृतिचा राग आहे.('चंचल प्रकृतीचा' म्हणजे काय ते कळले नाही.) यात ख्यालआणि विलंबित रचना गायिल्या जात नाही,असे म्हणतात. चंचल प्रवृत्तीमुळे मध्य व द्रुत लयीयील शृंगारिक व भक्तीरसपूर्ण रचना यात गायिल्या जातात. नेहमीप्रमाणे गोड लोकधून असलेल्या या रागाला शूद्र राग म्हटल्या जातो. (रागांचे मूळ असलेल्या लोकधूनांना शूद्र श्रेणीत ठेऊन कमी का लेखल्या जातात ते मला आजतागायत कळले नाही.)असो! या रागात कोमल गंधार एक अत्यंत प्रभावशाली असून न्यास स्वर आहे.हा स्वर या रागाचा केंद्रबिंदू आहे.तसेच कोमल निषाद सुद्धा न्यासाचा स्वर आहे.काही काळापूर्वी रिषभाला अवरोहात वर्ज न करता या रागाला औडव-षाडव जातीचा मानल्या जात होते.पण सद्य काळात रिषभ वर्ज्य करुन औडव-औडव जातिचा मानतात. तरी पण काही गुणिजन शुद्ध रिषभाचा प्रयोग करून धानी राग गाताना दिसतात.म्हणजेच हा राग आज दोन्ही प्रकारे गायिल्या जातो हेच सिद्ध होते.काफी थाटातील असल्यामुळे धानी गाताना खूप काळजी घ्यावी लागते.रिषभ,धैवत लागल्यास भीमपलासी व्हायला वेळ लागत नाही. अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळातर्फे दर वर्षी संगीत शिक्षक संमेलन घ्यायचे. अंदाजे १९७७/७८ वर्षी हे संमेलन अहमदाबाद येथे आयोजित केले होते.या संमेलनात एक बडा ख्याल गायिल्यानंतर पंडित गंगाधर तेलंग यांनी गायिलेल्या 'आंगनवा आये जोगी' या धानीतील बंदीशीने मी धानीच्या प्रेमातच पडलो.तो पर्यंत धानी हे नाव फक्त ऐकूनच होतो. ● चित्रपट गीते... 'चांद मध्यम है आसमा चुप है' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५). 'मेघा रे बोले घनन घनन' आशा,रफी. संगीत-उषा खन्ना.चित्रपट-दिल दे के देखो (१९५९). 'रात सुहानी झुमे जवानी' लता. चित्रपट-रानी रुपमती.संगीत-एस.एन. त्रिपाठी (१९५९). 'निगाहें न फेरो' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ब्लॅक प्रिन्स.संगीत-दुलाल सेन (१९५९) 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.संगीत-जयदेव (१९६१). 'कभी तनहाइयों में भी हमारी याद आयेगी' मुबारक बेगम.चित्रपट-हमारी याद आयेगी. संगीत-स्नेहल भाटकर (१९६१). 'ना ना ना रे ना ना हाथ ना लगाना, सुमन कल्याणपूर.चित्रपट-ताजमहाल. तिलक कामोद धानीचे मिश्रण (१९६३). 'रात भी है कुछ भिगी भिगी' लता.चित्रपट-मुझे जीने दो.संगीत-जयदेव (१९६३). तेरे हम ओ सनम तू जहां मैं वहां' रफी,सुमन कल्याणपूर.संगीत-सरदार मलिक.चित्रपट-बचपन. (१९६३).'ये खामोशियां ये तनहाईयां' आशा,रफी. चित्रपट-ये रास्ते है प्यार के. संगीत-रवी 'मुकद्दर आजमाना चाहता हूँ' रफी.चित्रपट-दूर की आवाज. संगीत-रवी (१९६४). 'मन मोरा नाचे तन मोरा नाचे' लता.चित्रपट-दो दिल.संगीत-हेमंत कुमार (१९६५). 'कुछ दिल ने कहां कुछ भी नहीं' लता.चित्रपट- अनुपमा. संगीत-हेमंत कुमार (१९६६) 'तडप ये दिन रात की' लता. चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन. (१९६६) 'भगवान ने अपने जैसा' लता. चित्रपट-छोटा भाई.(१९६६). 'खिलते हैं गुल यहां' किशोर-लता. संगीत-एस.डी. बर्मन.चित्रपट-शर्मिली (१९७१). 'बदन पे सितारे लपेटे हुए' रफी. चित्रपट-प्रिन्स.संगीत-शंकर जयकिशन (१९६९) 'तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है' रफी.चित्रपट-हंसते जख्म.संगीत-मदन मोहन (१९७३). 'पांव में डोरी' चित्रपट-चोर मचाये शोर. संगीत-रवींद्र जैन (१९७४). 'दिल में तुझे बिठाकर, कर लुंगी मैं बंद आंखे' चित्रपट-फकिरा.संगीत-रवींद्र जैन (१९७६). 'गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया वारा आके यहां रे' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'आज से पहले आज से ज्यादा' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.संगीत-रवींद्र जैन (१९७७). 'आयी ना कुछ खबर मेरे यार की' (धानी आणि मधुकौंस रागाचे मिश्रण) किशोर,आशा,संगीत-बप्पी लहरी. चित्रपट-शराबी.(१९८४) ● नॉन फिल्मी... 'तुम कोलाहल कलह में' आशा.संगीत-जयदेव.(अनफरगेटेबल ट्रीट १९७१). 'साडे नाल वे'(छोटा ख्याल) गायिका-दृष्टी आणि स्निग्धा जहागीरदार.संगीत संयोजन-ओंकारनाथ हवालदार.(ताज फेस्टिव्हल). 'मुसफिर चलते चलते थक गया है' गझल.-गुलाम अली. ● मराठी... 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' संत गोरा कुंभारांचा हा अभंग अनेकांनी गायीला आहे.. 'अवघाची संसार सुखाचा करीन' (धानी व भीमपलासीचे मिश्रण) संगीत-मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.(संत ज्ञानेश्वरांचे हे पद १९३१ मध्ये कान्होपात्रा या संगीत नाटकात गोहरबाई कर्नाटकी आणि राजहंस यांनी सर्वप्रथम गायिले आहे.तसेच बाल गंधर्वांनी हे अधिक लोकप्रिय केले.) -----------------------------------------------------------------------

Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४




संगीत आणि साहित्य :