गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, March 5, 2026

माझी मराठी गझल गायकी...

माझी 

(तिसरे गझल एल्गार मराठी गझल संमेलन,विशेषांक   

२०२६ मधून साभार...धन्यवाद नाना. Nana Lodam )


     मराठी गझल-गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही. माझ्या अगोदर मराठी गझल, गझलसारखी गाण्याचा फारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गायन हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली. तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली. माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली व आपले जगजितसिंग यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे. त्या काळात आर्णी, यवतमाळ सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका व कॅसेट सुद्धा मिळत नव्हत्या.ऑर्केस्ट्राच्या काळात प्रॅक्टिस संपल्यावर रात्री बारा नंतर पाकिस्तान रेडिओवरून जेवढे काही ऐकायला मिळायचे त्यावरून मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो. पुढे स्व. सुरेश भटांनी मला मेहदी हसन व फरीदा खानमच्या कैसेट दिल्या. हळूहळू गुलाम अली, जगजितसिंग, बेगम अख्तर यांच्या कैसेट जमा करून माझा गझल गायकीचा अभ्यास सुरु झाला. मराठी गझल गायची म्हणजे वरील मंडळीचे नुसते अंधानुकरण करून भागणार नव्हते, तर प्रत्येकाची गझल गाण्याची पद्धत, बंदिशीची बांधणी, शब्दानुरूप वेगवेगळ्या स्वरगुच्छांची पखरण, शब्द फेक, शेर सादर करण्याची पद्धत, श्रोत्यांना आपलेसे करण्याची हातोटी, सादरीकरणातील जोरकसपणा व हळुवारपणातील बारकावे, या सगळ्याला साजेसे व्यक्तिमत्व आणि योग्य साथीदारांची योग्य संगत म्हणजेच गझल गायकीची रंगत होय. ह्या सगळ्या बाबी कठोर साधना व आत्मपरीक्षण करून मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोठे मला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही रसिकांकडून प्रचंड दाद मिळत गेली. पहिल्याच बैठकीत सादर केलेल्या गझलेला व सुरावटीला दाद मिळवणे यात सारे काही आले. असे मला वाटते. माझी स्वतःची वेगळी अशी गायनशैली तयार व्हावी म्हणून आवडत असूनही मराठीतील लोकप्रिय व प्रसिद्ध गायकांची भावगीते, नाट्यगीते मी अभ्यासली नाहीत. वारंवार ऐकली सुद्धा नाहीत. १९६० मध्ये यवतमाळला आल्यावर (माझे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील 'दोनोडा') मी तबला शिकायला सुरुवात केली. वडील आदरणीय पांडुरंगजी कदम है वारकरी संप्रदायाचे विदर्भातील प्रसिद्ध गायक व हार्मोनियम वादक. गायनाचे व हार्मोनियम वादनाचे प्रारंभिक धडे त्यांनीच गिरवून घेतले. यवतमाळलाच शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरु असतांना १९६५ मध्ये 'शिवरंजन' ऑर्केस्ट्रामध्ये संगीत संयोजन, एकॉर्डियन वादन व गायन असे अनेक व्याप सांभाळता सांभाळता चाली बसविण्याचा छंद जडला. लहान मुलांसाठी बालगीते विद्यार्थ्यांसाठी समुहगीते, नाटकांसाठी नाट्यगीते अशा विविध प्रकारच्या गाण्यांना स्वरबद्ध करीत गेलो. ऑर्केस्ट्राच्या प्रत्येक कार्यक्रमात मी स्वरबद्ध केलेले एकतरी प्रेमगीत किंवा भक्तिगीत सादर केल्या जात असे. ऑर्केस्ट्राच्या १० वर्षाच्या कालावधीत एकॉर्डियन, हार्मोनियम, तबला, मेंडोलिन, आर्गन, गिटार व इतर तालवाद्य हाताळता हाताळता प्राविण्य मिळत गेले. त्यासाठी या दहा वर्षातील दिवसाचे रोज दहा ते बारा तास ऑर्केस्ट्राच्या खोलीतच सतत रियाज करावा लागला.(अकॉर्डियन आणि मेंडोलीन शिकविणारे कोणीच नसल्यामुळे 'एकलव्य' बनून साधना केली.) याचा फायदा म्हणजे मी आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होऊन आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झालो. त्या काळात आकाशवाणी कलावंत म्हणून मिरवण्यात मजा यायची. संगीत विशारद ही पदवी प्राप्त झाल्यावर १९७२ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या वीस हजार लोकवस्तीच्या गावात इच्छा नसतांनाही आर्थिक तडजोडीसाठी संगीत शिक्षक म्हणून रुजू झालो. तेथे सरोद व संतूर ही वाद्ये आणून मनसोक्त रियाज केला.(येथे पण एकलव्यच) काही सरोदवादनाचे तर काही संतूरवादनाचे जाहीर कार्यक्रमही केले. या वेळी गायन की वादन अशा द्विधा मनस्थितीत असतांना स्व. छोटा गंधर्व व स्व. जितेंद्र अभिषेकी यांनी मला मोलाचे मार्गदर्शन करून गायन कायम ठेवले. जितेंद्र अभिषेकी यांचा स्वतःचा असा बाज होता तर छोटा गंधर्व यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. गायनातील मूर्च्छना पद्धतीबद्दल शास्त्रीय ज्ञान विशारदच्या परीक्षेच्या वेळी माहीत झाले होते. प्रात्यक्षिकाचे धडे मात्र स्वतः छोटा गंधर्वांनी मला दिले. याचा उपयोग मला गझल गाताना नेहमीच होत गेला. माझ्या गझल गायकीवर या दोन थोर कलावंतांचे फार मोठे ऋण आहे.ऑर्केस्ट्रामध्ये असताना १९६५ पासून मी विविध गीत प्रकार स्वरबद्ध करून गात आलो आहे.पण खऱ्या अर्थाने ज्या रचनेला  गझल  म्हणता येईल अशी रचना 

'आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही 

आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही' 

ही यवतमाळचे कवी मित्र शंकर बड़े यांनी लिहीलेली व मी स्वरबद्ध केलेली पहिली गझल होय.

नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उदघाटनप्रसंगी माझा कार्यक्रम गडकरी सभागृहात झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कविवर्य सुरेश भट होते. या कार्यक्रमात वरील गझल ऐकून त्यांनी त्यांच्या काही गझला मला स्वरबद्ध करायला दिल्या. आर्णी मुक्कामी त्या स्वरबद्ध करून दुस-या नागपूर वारीत त्यांना ऐकविल्या. त्यांना आवडल्या व आमची कुंडली जुळली. दोघेही मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे मनाने ही एकत्र आलो. १९८० पासून आम्ही दोघांनी एकत्र कार्यक्रम करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते काही गझला त्यांच्या पद्धतीने ऐकवायचे. मध्यंतरानंतर मी हार्मोनियम व तबल्याची साथ घेऊन स्वरबद्ध गझल ऐकवायचो. १९८० ते १९८२ या कालखंडात गझल व गझल गायकी लोकापर्यंत पोचविण्याकरीला आम्ही दोघे प्रसंगी पदराला खार लावून महाराष्ट्रभर 'वणवणलो' हळुहळू माझा पूर्णपणे तीन तासांचा फक्त मराठी गझल गायनाचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला 'अशी गावी मराठी गझल' हे शीर्षक सुरेश भटांनीच दिले. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र असा प्रवास करत करत १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहातील कार्यक्रमाने '#अशी_गावी_मराठी=गझल' चा झेंडा पुण्यात रोवला. या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गाण्याचा तीन तासांचा कार्यक्रम करणारा एकही गायक महाराष्ट्रात नव्हता,(असता तर सुरेश भट त्याला सोबत घेऊन गझल व गझल गायकीच्या प्रचारार्थ फिरले असते.) 'अशी गावी मराठी गझल' हा मराठी गझलगायनाचा महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम होता याचे पुरावे म्हणजे त्यावेळच्या वर्तमानपत्रातील बातम्या. म. सा. प. च्या कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण व आकाशवाणी पुणे केंद्राने निमंत्रितांसमोरील कार्यक्रमाचे एक तासाचे केलेले ध्वनिमुद्रण, या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले होते.या कार्यक्रमाला रमण रणदिवे, प्रदीप निफाडकर, अनिल कांबळे,म.भा.चव्हाण,ज्योती बालिगा संगीता जोशी, वगैरे त्यावेळच्या नवोदित व आताच्या प्रस्थापित गझलकारांसोबतच 'सोबत 'कार ग. वा. बेहरेसारख्या अनेक मान्यवर व्यक्ति उपस्थित होत्या. पुण्यातील रमण रणदिवे, प्रदिप निफाडकर, व अनिल कांबळे यांच्या गझला कार्यक्रमामधून सर्वप्रथम मी गायिल्या आहेत.      

     गझलगायनाच्या कार्यक्रमात गझलांची निवड अतिशय महत्वाची असते. गझलांचा मतला जर श्रोत्यांच्या हृदयात घुसणारा असला तर पुढील शेर ते मनापासून ऐकतात. तसेच गझलची बंदिश तयार करतानाही अनेक अवधाने ठेवावी लागतात. गझलचे शब्द व भाव स्पष्टपरणे श्रोत्यांपर्यंत पोचतील अशी बंदिश व गायकीची पद्धत असायला हवी. तसेच एखाद्या शेरातील विशिष्ट शब्द खुलवायचा असेल तर त्याला स्वरांची वेगळी ट्रिटमेंट द्यावी लागते. नुसत्या बंदिशीने है काम भागत नाही. खरे तर बंदिश तयार करणे हा शब्दप्रयोगच माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. गझल वाचता वाचता आतल्या आत खळबळ सुरू होवून एखादी सुरावट उफाळून बाहेर येते. ती खरी बंदिश होय. ती आपली नसते... आपण फक्त माध्यम असतो. आलेल्या चाली आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते. तसेच जाणकार श्रोतेही काही प्रमाणात ओळखू शकतात. शेराची सजावट मात्र अविर्भाव, तिरोभाव आणि मूर्च्छना पद्धतीने अतिशय चांगल्या प्रकारे करता येते. पण त्यासाठी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते. बंदिश बांधतांनाही याचा उपयोग होतो. शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळतेच. उदाहरणेच द्यायची झाली तर अनेक देता येतील पण जागेअभावी काही मोजकी उदाहरणे देत आहे.आर्णी (जि. यवतमाळ) मुक्कामी माझे घरी सुरेश भटांना 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची, तापलेल्या अधीर पाण्याची' ही गझल सुचली. लगेच मला देऊन चाल बसवायला सांगितले. मी हार्मोनियम घेऊन बसलो. गझल वाचता वाचता भुपाळीचे स्वर मनात रुंजी घालायला लागले. बंदिश तयार झाली. पण त्यातील 'अधीर' या शब्दाला दिलेली सुरावट मनात ठसत नव्हती. अख्खी रात्र जागून झाल्यानंतर भुपाळीत नसलेला 'शुद्ध निषाद' सहाय्याला आला व 'अधीर'ला आधार देता झाला तेव्हा कुठे समाधान झाले. रात्रभराची माझी तगमग सुरेश भट बघत होते. पण बोलले काहीच नाही. सकाळी मात्र मनापासून दाद देऊन त्यांनी माझा रात्रभरचा शीण घालविला. पुढे प्रत्येक कार्यक्रमात या गझलेने दाद घेतली. 'हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही', 'या फुलांनी छेडली रानाल गाणी', 'मी असा त्या बासरीचा सूर होतो', 'दिशा गातात गीते श्रावणाची","हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी" अशा अनेक उत्तमोतम रचना आम्ही एकत्र असताना तयार झाल्या आहे. कार्यक्रमात गझल गाताना एखाद्या शब्दाला स्वरांनी कुरवाळण्याची किंवा शब्दार्थ नेमकेपणाने श्रोत्यांना कळावा म्हणून काही तरी वेगळे करण्याची उर्मी ऐनवेळी दाटून येते. अशा वेळी जर योग्य प्रकारचे स्वर लावल्या गेले तर तो शब्द परिणाम कारक ठरतो. 'कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता. यातील 'वेगळा' या शब्दाचा वेगळेपणा दाखविण्यासाठी मूळ बंदिश 'कल्याण' रागातील असूनही मी 'कोमल रिषभा'चा प्रयोग करून 'वेगळे'पण सिद्ध करून रसिकांची दाद घ्यायचो.तसेच उ. रा. गिरीच्या 'या एकलेपणाचा छेडीत मी पियानो' यातील 'तिमीरात हरवलेली निद्रा अनाथ माझी' या ओळीतील 'हरवलेली' या शब्दाला स्वरांद्वारे 'हरविल्याचा' आभास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न नेहमी दाद घ्यायचा. या गझलेची मूळ बंदिश 'मालकंस' रागात आहे. दुसरी ओळ आहे 'ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरांनो' यातील 'भैरवी' शब्दाला 'भैरवी' तच नेऊन पुन्हा 'मालकंसा'त येणे म्हणजे तयारीचे काम. पण याचा जो काही 'परिणाम' ऐकणा-यांवर होतो तो कायम लक्षात राहणारा असतो.

     १९७५ पासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम मी केले. भटांच्या साठ टक्के गझला स्वरबद्ध करून गायिलो. सोबतच श्रीकृष्ण राऊत, उ. रा. गिरी, नारायण कुळकर्णी कवठेकर,ललित सोनोने, शंकर बडे, गंगाधर पुसतकर, अनिल पाटील,रवी चापके, संगीता जोशी, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, अनिल कांबळे, म. भा. चव्हाण, रमण रणदिवे, सतीश डुंबरे, मंगेश पाडगांवकर, सदानंद डबीर, मनोहर रणपिसे, ए. के. शेख, घनश्याम धेंडे, दिलीप पांढरप‌ट्टे, शिवाजी जवरे, प्रमोद खराडे,चित्तरंजन भट, समीर चव्हाण,ज्योती बालिगा,चंदना सोमाणी, धुमाळ पिता-पुत्र,दीपक करंदीकर,अनंत ढवळे, संदीप गावंडे, राज यावलीकर, किरण पिंपळशेंडे,बदीउज्जमा बिराजदार,मसूद पटेल,वंदना वैराळकर,मीनाक्षी व स्मिता गोरंटीवार,सचिन साताळकर, आशा पांडे,डॉ. मनोज सोनोने,शिल्पा देशपांडे, संजय इंगळे,प्रियांका गिरी,संजय गोरडे, प्रतिभा सराफ,गौरी शिरसाट,विद्या देशपांडे,प्रशांत वैद्य,डॉ.संगीता म्हसकर,अल्पना देशमुख नायक,सुधीर बल्लेवार,निर्मला सोनी,हेमंत जाधव,दिवाकर जोशी,कवी कुमार,शरद काळे,विशाल राजगुरू,ज्योत्स्ना राजपूत,सुधाकर इनामदार,अंजली पंडित दीक्षित,डी.एन.गांगण,कालिदास चवडेकर,गंगाधर मुटे,गजानन मिटके पर्यंतच्या जुन्या नव्या गझलकारांच्या रचना मी स्वरबद्ध केल्या आहेत. माझा गझल गायकीचा वारसा सध्या अभिषेकी घराण्याचे प्रसिद्ध गायक #मयूर_महाजन  आणि गायिका व

संगीतकार विदुषी #प्राजक्ता_सावरकर_शिंदे हे दोघे समर्थपणे चालवित आहेत. प्रसिद्धी माध्यमे व कॅसेट कंपल्या मला आर्णीसारख्या लहानशा गावात वास्तव्य असल्यामुळे वश झाल्या नाहीत. तसेच स्वाभिमानी स्वभावामुळे लाळघोटेपणा व पायचाटूपणाही जमला नाही. त्यामुळे ख-या अर्थाने मराठी गझलगायकीची सुरुवात करून आणि शेकडो कार्यक्रम करूनही तसा दुय्यमच राहिलो.आज  माझ्या जवळचा मराठी गझलांच्या बंदिशीचा खजिना पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. यात वाद नाही. सध्या मी पुण्यात स्थायिक झालो असून माझ्यापरीने मराठी गझलगायकी करिता जे काही करता येईल ते करण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या बंदिशींवर आधारित सरगम तुझ्याचसाठी हा मराठी गझलांचा कार्यक्रम माझ्या मुली महाराष्ट्रभर करीत होत्या.सध्या मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे हा कार्यक्रम करीत आहे. गझलगायकी शिकणा-या नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, बंदिशींवर सतत नवीन प्रयोग मी करीत आहे. मराठी गझल माझा प्राण आहे.

'गेला जरी फुलांचा हंगाम दूर देशी 

आयुष्य राहिलेले जाळून मोहरू या' 

असे म्हणून माझी मराठी गझलगायकीची साधना सुरूच ठेवणार आहे. बस! 


-सुधाकर कदम

सी १ सी/१३,गिरीधर नगर,

मुंबई बेंगलोर हायवे,

वारजे माळवाडी,

पुणे ५८

मोबा-८८८८८५८८५०

------------------------------------------------------------------------

"#अशी_गावी_मराठी_गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-ऑपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.#नागपुर_पत्रिका,११/४/१९८१

२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.#लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२

३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. #तरूण_भारत,पुणे.१६/७/१९८२.

४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.#लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.

५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.#लोकसत्ता,२३/७/१९८२.

६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.#केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.

७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.#सकाळ,पुणे.

८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.#सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२

९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.#लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२

१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The #Hitwad,Nagpur.23/4/1984

११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.#नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४

१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.#लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.#चौथा_संसार,इंदौर.२७/१२/१९८९




Monday, March 2, 2026

विदर्भाचे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम-डॉ.श्रीकृष्ण राऊत

           विदर्भपुत्र सुरेश भटांच्या रूपाने जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या १७ मार्च २००९ च्या पुणे  लोकमतच्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. ' म्हणजे १९६९ पासून 'अशी गावी मराठी गझल' या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.

            सुधाकर कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख  ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.

            सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.

            सुधाकर कदमांच्या ह्या  योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर  विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

■ डॉ.श्रीकृष्ण राऊत

('लोकराज्य' डिसेंबर २०११)

.

Saturday, February 28, 2026

आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज - डॉ श्रीकृष्ण राऊत


                               

         १९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेश भटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.

         १९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
           1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.

            2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.

           3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदाआर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.

ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.

           अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले.

            सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
          यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.

           राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी मुळातूनच वाचावेत असे आहेत.

          १९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.
त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
          ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.

         कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

        इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व'
(www.gazalgazal.blogspot.com) हा  कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम अख्तर -मेहदी हसन -
गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात हाथरसच्या 
'संगीत ' मासिकातील  'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि  'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात  उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची   नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना  त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच  कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला  उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर  कदमांच्या योगदानाचा हा  अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.

        वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि
मित्र म्हणून अभिमानही.

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला



-----------------------------------------------------------------

अवखळ मन हे ऐकत नाही...

   माझ्या रचनेवर सुरावट येणे फार कमी वेळा घडते.

आल्यावर तिचा राग शोधायला जावे तर कोड्यात पडायला होते.नुकतीच ध्वनिमुद्रित झालेली ही रचना कोणत्या रागात आहे हे आपण रसिकांनीच सांगावे...गायक मयूर बद्दल काय बोलू? या रचनेची बंदिश मंद्र सप्तकातील पंचमपासून तार सप्तकातील मध्यमापर्यंत जाणारी आहे.मयूरने  मंद्र पंचम ते तार मध्यम आपल्या दमदार गायकीनेअतिशय सुंदर रीतीने निभवला.हे कौतुकास्पद आहे.ऐका तर...अवखळ मन!

अवखळ मन हे ऐकत नाही

होई भरकट पुन्हा पुन्हा ही


किती बंधने घाला त्यावर

तरी होतसे पुन्हा प्रवाही


धरती अंबर जेथे मिळते

त्या क्षितिजाला अंतच नाही


साधे सोपे असूनही पण

गूढ भासते सारे काही


गायक - मयूर महाजन

तबला - अपूर्व द्रविड

सतार - प्रसाद गोंदकर

गिटार - राधिका अंतुरकर

संगीत संयोजक - मिलिंद गुणे

ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.

मिक्सिंग,मास्टरिंग - अजय अत्रे

Wednesday, February 25, 2026

●#गझलगंधर्व_सुधाकर_कदम● -डॉ.राम पंडित,मुंबई.


#गझलनवाज #महाराष्ट्राचे_मेहदी_हसन #आद्य_मराठी_गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक. अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले सुधाकर कदम...





.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या पुण्याच्या भरत नाट्य मंदिर येथे आयोजित एका भव्य समारंभात त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र जाधव व प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते #गझलगंधर्व ही उपाधी बहाल करण्यात आली.या प्रसंगी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी,रसिकराज उल्हासदादा पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या #संगीत  कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून #पंडित  ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.

'#अशी_गावी_मराठी_गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संगीत संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचारी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना,सुरेश दंडे,मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे,रसिक जानोरकर,गायत्री गायकवाड गुल्हाने,राहुलदेव कदम,मदन काजळे,डॉ.सुशील देशपांडे,कल्पिता उपासनी,सचिन डाखोरे,मोहन भिवरकर,आदित्य फडके,

इत्यादी कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

                 इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

               सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

             लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी '#देन_हार_कोई_और_है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् '#याते_निचें_नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.

'मौनी' मधून...


 रसिकहो,

      आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने माझ्या #सांगीतिक_कारकिर्दीला या वर्षी, म्हणजे २०२६ ला बरोबर ६१ वर्षे होत आहेत. १९६५ ला ऑर्केस्ट्रा पासून सुरू झालेली वाटचाल आपणा सर्व रसिक चाहत्यांच्या आशीर्वादाने,प्रेमाने व शुभेच्छांनी #अकॉर्डिअन वादक,आकाशवाणी मान्यताप्राप्त #गायक,#मेंडोलीन वादक,#सरोद वादक,#संगीत_शिक्षक, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचा #केंद्र_व्यवस्थापक,#संगीतकार,#कवी,#लेखक ते मराठी गझल गायकी महाराष्ट्राला देऊन ती रुजविण्यासाठी सुरेश भटांसोबत संपूर्ण आयुष्य घालवले म्हणून महाराष्ट्र जेसीजतर्फे '#पायोनीअर_ऑफ_मराठी_गझल_गायकी', (मराठी गझल गायकीचे जनक)  '#शान_ए_ग़ज़ल',#कलादूत '#गझल_गंधर्व','#साहित्य_निष्ठा_जीवन_गौरव',यवतमाळ जिल्हा साहित्य संमेलनाचे #अध्यक्षपद पंडित #कुमार_गंधर्व_स्मृती पुरस्कार,#गझल_साधना व #गझलमित्र पुरस्कार असे अनेक स्वर्णमयी टप्पे घेत घेत २०२६ पर्यंत पोहोचली.आज वयाच्या सत्त्याहत्तरीतही त्याच जोमाने काम करण्याची ऊर्जा आपण सतत देत आहात,त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! कायम आपल्या ऋणात..

आपलाच

सुधाकर कदम





संगीत आणि साहित्य :