गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, March 24, 2026

ये कैसी शाम है...उर्दू ग़ज़ल

ये कैसी शाम है के दिल को कुछ क़रार नहीं

छलकता जाम नहीं, कोई ग़मगुसार नहीं


दिल के बहलाने को ये बात ठीक है लेकिन

किसी फरिश्ते पे अब मेरा ऐतबार नहीं


मुझे न शौक है हरदम इसे सुनाने का

ये शायरी है मेरी, कोई इश्तिहार नहीं


तेरी इक आह पे क़ुर्बान हुयी सल्तनते

वो कौन है जो इस अदा पे जाँनिसार नहीं


गुलुकारा - प्राजक्ता सावरकर शिंदे

शायर - डॉ.दिलीप पांढरपट्टे 'रिंद'

मोसिकार - 'शान-ए-ग़ज़ल' सुधाकर कदम

तबला - पांडुरंग पवार

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

गिटार - विशाल रामनगरीया

निज़ामत -शाहीर सुरेशकुमार वैरालकर


Live S.M.Joshi Sabhagruh, pune.

●headphone please

Sunday, March 22, 2026

मराठी गझल गायकीला पडलेलं _ स्वप्न...जैमिनी कडू

.   


     सन १९६५-६६! अकरावीपुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी मला अमरावतीच्या नमुना विभागातील श्री. गंगारामजी भगत (दादा) यांच्याकडे ठेवले होते. अमरावती शहरातील भगत परिवार म्हणजे चालते बोलते लॉजिंग-बोर्डिंग होते. तत्कालीन प्रख्यात बलवंत ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ते एक भागीदार. त्या काळचे अमरावती शहर म्हणजे कापूस, ज्वारी व न्याचे प्रख्यात माहेरघर. त्यामुळे मध्यप्रदेशचा बहुतांश व्यापार अमरावतीमधून चालत असे. अमरावती ते बुऱ्हाणपूर, इटारसी, मुलताई, खंडवा, भोपाळ अशा बलवंत बसेस चालत. त्यामुळे भगत कुटुंबाचा सामाजिक परिवारही मोठाच होता. रोजच चार-पाच पाहुणे दादांकडे मुक्कामाला असत. स्वयंपाकघर सतत चालू असे. दादांचे धाकटे चिरंजीव नारायणराव, कमलाताई त्याच्या सुविद्य पत्नी दोघेही स्वभावाने अक्षरशः सज्जनपणाचा कळस. येणाऱ्या प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत होई अन् येणारा जेवूनच जायचा, अशा या भगत परिवारात मला शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले.

     या भगत कुटुंबातील आमच्या कमलाकाकूंचा नातेवाईक असलेला सुधाकर कदम नावाचा समवयीन मुलगा अधूनमधून मुक्कामाला यायचा. अत्यंत रेखीव, सुहास्यवदनी, गव्हाळा रंग, मध्यम उंची, डौलदार कुरळे केस, उठावदार व्यक्तिमत्त्व. सुधाकरची पहिले भेट झाली ती याच वर्षी. आम्ही दोघेही कलाप्रेमी असल्याने बहुधा आमची भेट मैत्रीत बदलली. सुधाकरच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाला सदाबहार गायकीची नैसर्गिक देणगी लाभलं होती तर माझ्या व्यक्तिमत्त्वाला प्रखर वक्तृत्वाची नैसर्गिक देणगी लाभली होती. यवतमाळातील शिवरंजन ऑर्केस्ट्राचा सर्वेसर्वा म्हणजे सुधाकर अन् अमरावतीमधील बोडे बंधूंच्या आराधना ऑर्केस्ट्रामध्ये मी मंचसंचालक. सुधाकरचे वडील पांडुरंगजी कदम हे कृषी (कुणबी) संस्कृती, सभ्यता व व्यवस्थेतील एक बऱ्यापैकी प्रस्थापित शेतकरी. वारकरी संप्रदायाचे नैसर्गिक लाभलेल्या सुरेल आवाजात भजन गाणारे. माझे वडील भाऊसाहेब कडू हेही याच संस्कृतीतील एक नामवंत शिक्षक. ही सारी पार्श्वभूमी कदाचित आमच्या गाढ मैत्रीचे सूत्र असावे. अजून एक म्हणजे चळवळ्या स्वभाव. यवतमाळच्या कलाक्षेत्रातला चळवळ्या सुधाकर तर अमरावतीच्या साहित्यनाट्य क्षेत्रातला चळवळ्या मी. मुंबईच्या चित्रपटसृष्टीत येऊन काही करण्याची दोघांचीही इच्छा. कधीच पूर्ण न झालेली. शिक्षणपूर्ती नंतर उदरनिर्वाहासाठी सुधाकर आर्णीला श्री. दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत झाला.मी ही पदवीनंतर नोकरीच्या शोधात नागपूरला आलो.त्यामुळे काही काळ भेटीगाठी थांबल्या.           

     याच काळात माझी सुरेश भटांची भेट झाली.अमरावतीपासून ओळख असल्यामुळे त्यांनी विचारपूस केली आणि मी बेरोजगार आहे हे कळल्याबरोबर त्यांनी त्यांच्या 'बहुमत' नामक साप्ताहिकात संपादकत्वाचे काम दिले.त्यावेळी ते खामल्यात राहत असत.

     सुधाकर आर्णीला श्री.महंत दत्तराम भारती विद्यालयात स्थिरावला.मी अमरावती सोडून नागपूरला आलो, रोजगाराच्या शोधार्थ अन् पत्रकार म्हणून स्थिरावलो. संगीत शिक्षक होऊन सुधाकर शिक्षक म्हणून मर्यादित राहिला नाही.आर्णीत गांधर्व संगीत विद्यालय स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे दालन खुले करून दिले.त्यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्रही मिळवले व आर्णी सोडेपर्यंत ३१ वर्षे ते चालविले.शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवसेना शाखेची मुहूर्तमेढही रोवली.त्याच्या प्रयत्नाने विदर्भातील पहिला-वहिला आमदार श्रीकांत मुनगिनवारच्या रूपाने त्याने शिवसेनेला दिला.पत्रकारीतही केली.अभिनय कला मंडळाची स्थापना करून एकांकिका स्पर्धांचे आयोजन केले.कलावंत मेळावे,मराठी गझल गायन स्पर्धा,संगीत विद्यालयाचा वार्षिकोत्सव असे विविध उपक्रम राबवून युवा विश्वाच्या व्यक्तिमत्व विकासाची चळवळ राबवित राहिला.पण गझलगायकी मात्र सोडली नाही. सुधाकरने शिवसेनेचा आमदार व्हायचे ठरविले असते तर दिग्रस विधानसभा मतदार संघातून (विदर्भातून पहिलाच) शिवसेनेचा आमदार म्हणून हमखास विजयी झाला असता.पण राजकारणापेक्षा नैसर्गिक लाभलेले  अन् चिरस्थायी असलेले गीत-संगीताचे क्षेत्र त्याने सोडले नाही.राजकारण कायमचे मागे पडले.इकडे मी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार व्हायचे ठरवले असते तर एका वजनदार काँग्रेसी नेत्याच्या शब्दावर इंदिरा काँग्रेसचा आमदार झालो असतो.परंतु भांडवलदाराच्या पैशावर त्याचा चमचा होण्याचे नाकारले.पत्रकार व पुढे शिक्षक म्हणूनच कार्यरत राहिलो.सुधाकर व माझ्या व्यक्तिमत्वातली ही साम्यस्थळे आजवरच्या मैत्रीतील अतूट धागे आहेत.फरक इतकाच की, सुधाकर पुण्यात जाऊन संगीत क्षेत्रातील त्याची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिला व मी नागपुरात राहिलो.

       सुधाकरला मी 'मराठी गझल गायकीला पडलेले स्वप्न' म्हणतो. सुधाकर अव्वल दर्जाचा संगीतप्रेमी. संगीतातील वादन कलेपासून अन्य सर्व घटकांचे त्याचे ज्ञान विलक्षण असेच होते. वयाच्या १० व्या वर्षापासून तबला वादनाचे धडे घेत, वडिलांकडून हार्मोनियम धडे घेतल्यामुळे १६ व्या वर्षी यवतमाळच्या शिवरंजन या ऑर्केस्ट्रामध्ये अकॉर्डिअन वाजवायला लागला. तसेच तो नागपूर आकाशवाणीचा मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाला, सरोद-संतूरसारखी वाद्ये सुध्दा तो लिलया हाताळत असे. अशातच विदर्भ साहित्य संघाने नव्यानेच संगीत विभाग सुरू करायचे ठरवले. उद्घाटनानिमित्त गडकरी सभागृहात सुधाकरचा कार्यक्रम ठरविण्यात आला.यावेळी सुधाकरने एक तास सरोद वादन व एक तास गायन असा कार्यक्रम केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा म्हणजे सुरेश भट होते.(अमरावतीत असताना सुरेश भटांच्या हाताखाली वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी मला दीर्घ काळ मिळाली. तसेच त्यांच्या नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकाचा संपादक होतो.) सुधाकरने गायिलेली शंकर बडे यांची गझल व बंदिश त्यांना खूप आवडली. माझ्या माहितीप्रमाणे तो मराठी गझल गायनाचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग होता. या प्रयोगला दादांनी मनापासून दाद दिली.

      त्याच्या गायकीला अनुवांशिकतेची साथ असली तरी आजच्या त्याच्या गायकीला त्याच्या परिश्रमाची,प्रयोगाची पार्शवभूमी आहे. मराठी शिक्षण क्षेत्रातील पहिला असा संगीत शिक्षक की, ज्याने पाठ्यक्रमातील कवितांना चाली लावून विदयार्थ्यांना शिकविले. मराठी गझल कशी गावी, हे त्याने प्रभावीरीत्या सिद्ध केले.गीत-संगीतातील सर्व बारकावे हेरून,गझलमधील भावार्थाला प्राशन करून शब्दरूप द्यायचे अन् शब्दशक्तीला बाधा पोहचू न देता आपल्या गायकीतून सादर करायचे तेव्हा रसिक श्रोत्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर यायचा, वाहव्वा! मी गझलश्रवणप्रेमी आहे.परंतू गझलेतील काव्य-शास्त्रीय संगीत-शास्त्रीय ज्ञानाचा यत्किंचितही गंध नसलेला गझलश्रवणप्रेमी आहे.गझल ऐकताना कर्णमाध्यमातून मेंदू व हृदय यांना भावणाऱ्या अलौकिक अशा भावना शब्दशक्तिमधील उच्चार अभिव्यक्तीत उणीव असेल तर बाधित होतात, याचा अनुभव घेतलेला. सुधाकर हा कौटुंबिक सदस्य असल्याने कौटुंबिक गझल मैफली झडत असत. त्यावेळी अलौकिक प्रत्यय अनुभवता येत असे. अशा अलौकिक गायकीच्या सुधाकरला मराठी गझलसाम्राट सुरेश भटांनी दिलेल्या पावतीचा मी जिवंत साक्षीदार आहे. 

     सुधाकरच्या आवाजातून त्यानेच स्वरबध्द केलेली भटांची 'कुठलेच फूल आता मजला पसंत नाही, ही गझल जेव्हा घनदाट रानातील झुळझुळणाऱ्या झऱ्यासारखी बाहेर पडली तेव्हा भटांनी त्याला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' म्हटल्याचे याची देही याची डोळा मी पाहिले आहे. 

     त्यानंतर 'सुरेश भटांची गझल व सुधाकरची गायकी' एक समीकरणच झालेले अख्ख्या महाराष्ट्राने अनुभवले. सुरेश भटांची गझल अन् सुधाकरची अनुरूप स्वररचना,संगीतसाथ म्हणजे अलौकिक सांगीतिक अनुभव.

'सूर्य केव्हाच अंधाराला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो'

 हा सुरेश भटांचा प्रत्ययकारी विद्रोह तेवढ्याच प्रत्ययकारी अदाकारीने सुधाकरच्या गझलगायकीतून कानावर यायचा. तेव्हा रसिक भावविभोर न झाला तरच नवल. विद्रोह हा पोवाड्यातून अधिक परिणामकारकरीत्या अभिव्यक्त होतो.तो विद्रोह सुधाकर आपल्या गझल गायकीतून उत्कटपणे सादर करू शकत होता,अशा गझल गायकीतून शृंगार अन् करूण रसातली गझल रसिक श्रोत्यांच्या पसंतीला न उतरली तरच.

            सुधाकरमध्ये एक कवी पण दडलेला आहे.

'सरगम तुझ्याचसाठी,गीते तुझ्याचसाठी

गातो गझल मराठी प्रिये तुझ्याचसाठी'

ही त्याची रचना '#सरगम_तुझ्याचसाठी' या त्याच्या बंदिशींवर आधारित कार्यक्रमामधून त्याच्या मुली भैरवी,रेणू सादर करायच्या.सुधाकर हा शास्त्रीय संगीतातील योगी.त्यामुळे त्याच्यातील कवी संगीतमय कविता प्रसवणारा. नैसर्गिक सौंदर्यभावाची देणगी लाभलेल्या मायेने आपल्या गोंडस मुलाला साजशृंगाराने सजवून त्याचे सौंदर्य अधिक खुलवावे,तसे सुधाकरचे त्याच्याच काव्याबाबत .हा रसाविष्कार त्याच्या गझलगायकीतही रसरसून भरलेला आहे.कवी,कुशल संघटक, संगीतकार,गायक,संगीतकार,शिक्षक आणि पत्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या सुधाकरलाही अखेर सांस्कृतिक विषमतेचा बळी व्हावे लागलेच.अक्षरशः पुण्यात राहूनसुद्धा कृषी संस्कृती,सभ्यता व व्यवस्थेतही कोहिनूर पैदा होतात,आहेत,झालेत.परंतू कोळसा खाणीतील कोळशाला जशी रत्नाची पारख नसते,तसेच या व्यवस्थेतील प्रज्ञावंतांचे होते.कृषी व्यवस्थेला नैसर्गिक उत्पादन करण्याची कला ठाऊक असते,मात्र त्या नैसर्गिक उत्पादनाचे कृत्रिम मार्केटिंग करण्याची कला अवगत नसते.परिणामी कृषकाचा गहू खाणाऱ्याला जितका माहीत होतं नाही,तितका 'टाटाचा बाटा' माहीत होतो.दूध उत्पादक कृषकाचे दूध त्याच्या व त्याच्या गायी-म्हशीच्या नावे ओळखल्या जात नाही.ते 'हल्दिराम' वा 'दिनशॉ' च्या नावाने ओळखले जाते.तसे काही सुधाकरचे झाले आहे.

      सुधाकर आणि माझ्यातील आणखी एक साम्यस्थळ म्हणजे आम्ही दोघांनीही आंतरजातीय विवाह केला आहे.माझी बायको कलार समूहातील,सुधाकरची बायको आमच्या प्रिय सुलभा वहिनी या ब्राह्मण समूहातील.माझी बायको 'कुणबी' होऊ शकली नाही,पण मूळच्या ब्राह्मण असलेल्या सुलभा वहिनी अगदी सुलभ रित्या 'कुणबी' झाल्या.जातीने नव्हे प्रवृत्तीने.ब्राह्मण तरुणीशी आंतरजातीय विवाह करणाऱ्या बहुजन तरुणांची अवस्था कशी होते,हे मी अनुभवून आहे. म्हणूनच मला सुलभा वहिनींचा खूप खूप अभिमान आहे की, त्यांनी सुधाकरचे जीवनसाथी होण्याचे ज्या दिवशी निश्चित केले त्याच दिवशी आपले ब्राह्मण्य सुलभरीत्या त्यागले अन्  कुणबित्व स्वीकारले. सुधाकर आज जे काही मिळवू शकला त्यात सुलभा वहिनींचा वाटा तितकाच आहे, जितका गझलगायकीत संगीताचा.सुधा-सुलभा या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या जीवनात ज्या दोन गझलांनी आणि एका अभंगाने जन्म घेतला, त्या भैरवी अन्  रेणू या पोरी व निषाद हा पोरगा.तिघेही स्वरसंगीत घेऊनच जन्मले अन् आपल्या पित्याच्या स्वरसंगीतमय जीवनातील अविभाज्य असे घटक होऊन राहिलेत.मराठी गझलगायकीला पडलेले 'सुधाकर कदम' नावाचे स्वप्न आज अत्यंत कृतकृत्य जीवन जगत आहे.मणक्यांच्या दुखण्यामुळे थोडा वेग कमी झाला असला तरी आवेग कमी झालेला दिसत नाही. हे त्याच्या एकामागून एक रसिकांच्या सेवेत येत असलेल्या अल्बम्सवरून दिसते आहे. अशीच दीर्घतम संगीतसेवा त्याच्याकडून घडण्यासाठी दीर्घायुरारोग्यासाठी निसर्गाजवळ प्रार्थना करतो.


(पत्रकार,लेखक,समाजसुधारक)

५,आर.एम.एस.कॉलनी,

मानेवाडा रोड

नागपूर.


(प्रा.श्रीकृष्ण राऊत संपादित,#अक्षरमानव प्रकाशित सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी २०१८ मधून...)

-----------------------------------------------------------------------

ज्या गझलवरून '#महाराष्ट्राचे_मराठी_मेहदी_हसन ही उपाधी दिली.त्या गझलची लिंक....

https://youtu.be/fnibDhN5x7o





 

Saturday, March 21, 2026

जगत मी आलो असा (लेखांक २१)


                                 ●पैलू

     कवी/कवयित्री/म्हणजे शब्दरूपी कोळशाच्या खाणीचे मालक/मालकीण. या खाणीतून ते काव्य रुपी हिरा बाहेर काढतात. संगीतकार या हिऱ्याला पैलू पाडून चमकदार बनवतो.आणि संगीत संयोजक आकर्षक असे स्वरांचे कोंदण तयार करून पैलू पडलेल्या काव्यरूपी हिऱ्याला अधिक आकर्षक करतो.ह्या तिघांचे समसमा योगदान असले तर एकूण काम उच्च दर्जाचे होते.एक जरी कमी पडला तर त्याचा दर्जा कमी झाल्याचे दिसून येते.हे आपण हिंदी,मराठी चित्रपट गीते,गझल,भावगीते,नाट्यगीते,भक्तिगीते ऐकताना नेहमी अनुभवतो.काही गीतांचे शब्द सुंदर असतात पण सुरावट चांगली नसते.काही सुरावटी सुंदर असतात पण शब्द इतके चांगले नसतात.तर काही वेळा हे दोन्ही चांगले असले नि संगीत संयोजन चांगले नसले तरी त्या गाण्याची प्रत कमी झालेली दिसते.

       आपलेही तसेच आहे.जन्म झाल्यावर आई,वडील आणि गुरू आपल्याला पैलू पाडण्याचे काम करतात. आपल्यातील कला-गुणांची कदर करणारा योग्य संयोजक जर भेटला तर आपलेही जीवन आनंदी बनून सुकर होते.हे सूत्र सर्व क्षेत्रातील लोकांना लागू आहे.त्यासाठी माणसातील हिऱ्याला आपण हिरा आहो हे कळायला हवे.अथवा त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी.तसेच पैलू पाडत असतानाच्या वेदना सहन करण्याची शक्ती त्याच्यात हवी.तरच तो चमकदार बनतो. त्यांनतर कोंदणाचा प्रश्न येतो.आणि हाच प्रश्न आयुष्यात महत्वाचा ठरतो.

      अनेकदा खाणीतील हिऱ्याला पैलू न पाडल्या गेल्यामुळे आयुष्यभर कोळसा म्हणूनच आयुष्य काढण्याचे वाटयाला आल्याचेही दिसून येते. याला काय म्हणावे ?


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे


कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे

खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे


सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे

पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे


मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या

म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे


हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही

कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे


-सुधाकर कदम

8888858850

दैनिक विदर्भ मतदार,रविवार पुरवणी.दि.२२/३/२०२६

Saturday, March 14, 2026

जगत मी आलो असा...●जर-तर● लेखांक २०.




     #सुरेश_भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील #रमेश_माहुरे_पाटील या रसिक मित्राकडे गप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती #पुष्पा_सुरेश_भट), मुलगा #चित्तरंजन_भट  सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी #कलीम_खान  असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.

हवा जरासा आसरा

तुझ्या मनाचा कोपरा


सुगंध अलगद हेरतो

गुलाब तू की मोगरा

-अशोक माहुरे

     ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांच्या वडील बंधूच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,

टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.

      दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका  गातात वगैरे वगैरे...आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.

      भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र मरहूम रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर 'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' 

( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ  "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ  याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....

'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद

जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'

(ही सुरेश भटांच्या हस्ताक्षरातील नात माझ्या ब्लॉग टाकली असता एका भामट्याने तेथून कॉपी करून त्यावर लेख लिहून जणू काय त्याच्याकडेच ही नात लिहिल्या गेली असा आभास निर्माण केला.माझा किंवा माझ्या ब्लॉगचा उल्लेख करण्याचे साधे सौजन्य त्या महाभागाने दाखविले नाही.म्हणून मी 'भामटा' हा शब्द वापरला.)

    आर्णीमध्ये माझ्या मित्र मंडळीत सर्व जाती धर्माचे लोक होते. मी संगीत शिक्षक व गायक असल्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करायचे.करीम चाचा सोबत मस्ती पण करायचो, शिव्या खायचो.निषादचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही नोकरी करत होतो.त्यावेळी शेजारी पिंजारी बुढा-बुढी राहात होती.ते दोघे निषादला सांभाळायचे.नंतर तर ते आमच्या घरातील सदस्य बनले होते.एक वर्षानंतर सुलभाने नोकरी सोडली.त्यानंतरही पिंजारी कुटुंबाने माझ्या तिन्ही मुलांना आजी-आजोबासारखे प्रेम दिले, माया केली.अर्थात त्यांच्या शेवटच्या काळात आम्हीही त्यांची काळजी घेतली. 

     कंबलपोष बाबांच्या उरुसात पूर्वी फक्त कव्वाल्या व्हायच्या.मी तेथे कव्वाल्यासोबतच वऱ्हाडी कवी संमेलन घेणे सुरू केले.यात शंकर बंडे, मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी अशी दिगग्ज मंडळी असायची. नंतर भजन स्पर्धा सुध्दा सुरू झाल्या.त्या काळी जत्रा,उरूस म्हणजे लहान मुलांसोबतच हौस्या-गौश्या-नौश्यांची मजा असायची.परिसरातील खेड्यातील लोकांची आवश्यक सामानाची खरेदी चालायची. खास आकर्षण म्हणजे तंबूतील दोन मध्यांतर असलेला चित्रपट.चित्रपट बघायला जायचे म्हणजे बसण्याकरिता सोबत सतरंजी घेऊन जावे लागायचे. त्या चित्रपटाच्या जाहिराती म्हणजे वेगळंच काम होतं.

आर्णीला अशीच एक बारमाही टॉकीज होती.तिथल्या भोंग्यावर आरती लागली की आता चित्रपट सुरू होणार हे गावकऱ्यांना कळायचे.यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या दोनोडा या मूळ गावी सकाळी घंटी वाजली की शाळा सुरू होणार हे कळायचे.सायंकाळी घंटी वाजली की मारूतीच्या देवळात आरती सुरू होणार हे कळायचे.आर्णीत आरती सुरू झाल्यावर चित्रपट सुरू होणार हे कळायचे.आरती म्हणजे प्रत्यक्षातील आरती नव्हे.तर 'मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की' ही रेकॉर्ड!

     हळू हळू भटांच्या गझला स्वरबद्ध व्हायला लागल्या. आणि आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करायचे ठरवले.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी पहिला प्रयोग केला.त्यात एक गझल भटांनी त्यांच्या पद्धतीने सादर करायची व नंतर मी हार्मोनियम तबल्यासह ताला-सुरात एक गझल सादर करायची.हा कार्यक्रम लोकांनी आनंद घेत ऐकला.पण आम्हा दोघांनाही त्यात मजा आली नाही.कारण एकाची लिंक लागत नाही तो दुसऱ्याचा नंबर यायचा. तेव्हा दोघांनी अर्धा अर्धा कार्यक्रम करायचे ठरवले.हा प्रयोग यशस्वी झाला.

त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीने अनेक कार्यक्रम केले.१९८२ च्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण तीन तासांची मैफल होईल इतक्या गझला स्वरबद्ध झाल्यावर फक्त माझ्या गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या तीन तासाच्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः सुरेश भटांनी केले.शीर्षक होते"अशी गावी मराठी गझल"! दुसऱ्या दिवशी याच शिर्षकाचा स्वतः भटांनी निवेदन केलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवडक रसिकांसमोर सादर करून प्रसारित करण्यात आला.त्या नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज,

राजवाडे सभागृह,मराठे यांचे संगीत विद्यालय अशी कार्यक्रमांची रांग लागली.पश्चिम महाराष्ट्रातील काही कार्यक्रमाचे सूत्र संचालन कधी डॉ.#सुरेशचंद्र_नाडकर्णी तर कधी पुण्यातील प्रसिद्ध संगीत समीक्षक #श्रीरंग_संगोराम  करायचे.राजवाडे सभागृहातील कार्यक्रमाला तर नावाजलेले भावगीत गायक #गजाननराव_वाटवे  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

     अशा प्रकारे '#अशी_गावी_मराठी_गझल' च्या मैफली गाजत असताना १९८२ च्या शेवटास  मी स्वरबद्ध केलेल्या गझलांची कॅसेट काढावी असे भटांच्या मनात आले.तसे अलुरकरांशी बोलणेही झाले.त्या काळी #अलुरकर_म्युझिक_कंपनीचे महाराष्ट्रभर नाव होते.सुरेश भटांनी मला तसे पत्रही पाठवले.त्यात या कॅसेटचे संगीत संयोजन #आनंद_मोडक करतील असाही उल्लेख होता.(ते पत्र व माझ्याकडे लिहिलेली नात खाली देत आहे.) नंतर कुठे माशी शिंकली कोण जाणे.हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.पण लगेच एच एम व्ही कंपनीने काढलेली सुरेश वाडकरांच्या आवाजातील सुरेश भटांच्या गीत-गझलांची कॅसेट बाजारात आली.संगीतकार होते रवी दाते.

     ही सुवर्णसंधी हुकल्यानंतर मी या संदर्भात शेवटपर्यंत भटांशी बोललो नाही.शेवटी चाळीस वर्षांनंतर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला #सुरेश_वाडकर  यांचेकडून गाऊन घेण्याची संधी मला मिळाली.२०१२ मध्ये युनिव्हर्सल कंपनीतर्फे "#काट्यांची_मखमल" हा अल्बम बाजारात आला.या अल्बममध्ये #वैशाली_माडे  माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वप्रथम वाडकरांसोबत युगल गझल गायिली.त्या नंतर सुरू झालेले माझे काम आज २०२६ मध्येही त्याच जोमाने सुरू आहे.१९८२ मध्येच जर पहिला अल्बम बाजारात आला असता तर?

दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार पुरवणी.

दि.१५/३/२०२६

Wednesday, March 11, 2026

फुलांतल्या वाटा...



दूर गेल्या फुलांतल्या वाटा

ठेवुनी काळजात हा काटा


गुंतणे थांबवू म्हणाला तू

फोडला तूच आणखी फाटा


चिंब झाला जरी किनारा हा

कोरड्या राहिल्या तरी लाटा


दूर चाहुलही तुझी गेली

राहिला फक्त सुन्न सन्नाटा


गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे

शब्द - दिलीप पांढरपट्टे

संगीत - सुधाकर कदम

तबला - पांडुरंग पवार

हार्मोनियम - रामेश्वर ताकतोडे

गिटार - विशाल रामनगरिया

सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर


●Live - S.M.Joshi Sabhagruh, pune.

Monday, March 9, 2026

गातो गझल मराठी...

     बालपणापासून तर संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गाव सोडून पुण्यात स्थायिक होईपर्यंत माझे आयुष्य अतिशय कष्टमय गेले.१९६५ ते १९७५ ऑर्केस्ट्रामधील दगदग, नंतर कोणत्याही सुख-सुविधा नसताना मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार-प्रसारासाठी सुरेश भटांसोबत महाराष्ट्रभर भटकंती.यातून मला १९८२ मध्ये  एक रचना स्फुरली.ती म्हणजे #सरगम_तुझ्याचसाठी !  ही माझी पहिली कविता होय.नंतरच्या काही काळात ती स्वरबद्ध झाली.त्यावेळी माझा धाकटा बंधू स्व.प्रशांत कदम ही गझल सदृश्य रचना त्याच्या कार्यक्रमांमधून सादर करायचा.त्याच्या सोबत हर्षवर्धन मानकर,अनिल रेनकुंटलवार वगैरे पोरं तसेच माझे अनेक विद्यार्थी पण ही रचना गायला लागले.सध्या मयूर महाजन हा पुण्यातील गायक "सरगम तुझ्याचसाठी" शिर्षकांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात या रचनेने करतो.माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब होती/आहे.
         बऱ्याच मोठ्या कालावधी नंतर नुकत्याच झालेल्या वाशीमच्या महाविद्यालयातील कार्यशाळेत ही गझलसदृश्य रचना  त्यातील काव्य व त्याला साजेशा सुरावटी कशा घ्याव्या/घ्यायला हव्या याबद्दल  सविस्तर माहिती देत प्रा.हर्षवर्धन मानकरने (त्या वेळचा 'हर्षू') अतिशय चांगल्या पद्धतीने ही सादर केली.अर्थात स्वरबद्ध करतानाच ह्या सुरावटी आल्याच होत्या.तरी पण  कार्यशाळेतील उपस्थित विद्यार्थी व रसिकांना त्या उलगडून सांगणे महत्वाचे ठरते.त्या बद्दल हर्षूचे मनःपूर्वक अभिनंदन! (तुझ्या गायकीच्या ढंगाने प्रशांतची आठवण ताजी झाली) ऐका तर...

सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
गातो गझल मराठी, प्रिये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रिये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रिये तुझ्याचसाठी
('विराणी' ऐवजी 'मारवा' घेण्याची कल्पना प्रशांतची होती)

तबला - प्रा.अनिल सोनोने
हार्मोनियम - प्रा.डॉ.वतारे
की बोर्ड - आदेश बनसोड

Mobile recording by madhukar bansod, washim





संगीत आणि साहित्य :