गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, July 15, 2026

'लाजणे बरे नाही' सुरेश भट,सुधाकर कदम.

 




      ●अशी गावी मराठी गझल●

सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२


"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा  गुलाबाने  झाकणे  बरे नाही"


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे 

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा 

आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची आज राख रांगोळी 

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही


आज मोकळे  बोलू, आज मोकळे होवू ! 

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा, चंद्र वेग‌ळा होता 

हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली 

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


गझल - सुरेश भट

गायक - सुधाकर कदम


● old live... headphon please

वारकरी


 

जगत मी आलो असा (लेखांक ३७)



   ●अरुणावतीच्या तीरावर (भाग १)●

     आर्णीच्या नोकरीबद्दल मागील एका लेखात आलेच आहे. संगीत शिक्षक म्हणून नाईलाजाने का होईना एकदाचा रुजू झालो. वर्ष होते 1972. त्यावेळी संस्थाध्यक्ष होते चिद्घनानंद भारती. ही संस्था माहूरचे महंत श्री दत्तराम भारती यांच्या योगदानातून उभी राहिली होती. त्यामुळे श्री महंत दत्तराम भारती नावानेच ही शाळा ओळखली जात होती/आहे. जसा चिद्घनानंद भारतींचा आर्णी, माहूर परिसरात दरारा होता तसा यवतमाळ जिल्हाभर या शाळेचा दरारा होता. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कडक शिस्त, नावाजलेले हुशार असे शिक्षक, अतिशय मृदू पण शिस्तीचे कडक असे मुख्याध्यापक हे या शाळेचे वैशिष्ठय होते. शंकरराव बुटले हे त्यांचे नाव. पांढरे शुभ्र धोतर, पांढराच शर्ट व पांढरी टोपी ही त्यांची वेशभूषा. उत्तम शिक्षण, खेळ, कला, संगीत, नाटक व विविध शालेय उपक्रम यामुळे त्यांच्या कार्यकाळात शाळा खूप नावारूपाला आली होती. मी रुजू झालो तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. संगीत क्षेत्रात जरी मी नाव कमावले होते तरी पण एक शिक्षक म्हणून मी शून्य होतो. पण बुटले गुरुजींनी माझ्यातील गुण-दोषासह मला स्वीकारले व मार्गदर्शन केले. सुरूवातीला प्रत्येक तासिकेला वर्गावर जाऊन संगीताची तासिका घ्यावी लागायची. पण माझ्यातील तडफ व संगीताविषयीची आत्मीयता पाहून त्यांनी मला वेगळा संगीत कक्ष दिला. त्यावेळी माझ्याकडे हार्मोनियमसुद्धा नव्हती. शाळेची हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्यामुळे माझे कार्यक्रम सुरू होते. वेतन इतके कमी की, कसेबसे घर चालायचे. त्यामुळे हार्मोनियम घेण्याचा प्रश्नच नव्हता. यवतमाळला असेपर्यंत ऑर्केस्ट्राची हार्मोनियम वापरायचो. यवतमाळलाही माझ्याकडे स्वतःची हार्मोनियम नव्हती. असे असतानाही मी हार्मोनियमचा हात कसा तयार केला असेल याचा विचार करावा. असो!

     बुटले गुरुजींनी संगीत कक्ष दिल्यानंतर मी त्या कक्षात सायंकाळी संगीताचे वेगळे वर्ग घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे पाहून बुटले गुरुजींनी मला 'गायनाव्यतिरिक्त काही वाद्य शिकविता येईल काय' असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी शाळेच्या फंडातून हवी ती वाद्ये आणायची परवानगी दिली. त्यांनी परवानगी देताच मी मुंबईला जाऊन सतार व संतूर ही दोन वाद्ये आणली. आणि स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. यवतमाळचा नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक विभागात तबला वादन करून सहकार्य करणारा मित्र शेखर सरोदे, उस्ताद शेख दाऊद खान यांच्याकडे तबल्याच्या उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला होता. तेथे माझी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केली होती. त्या निमित्त हैदराबादला गेलो असता तेथून एक स्वरमंडळ घेऊन आलो. त्याचेही पैसे मला शाळेकडून मिळाले. माझी मेहनत हळूहळू रंग भरत होती. शाळेतील 26 जानेवारी म्हणजे तीन दिवसांचा नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवच असायचा. या तिन्हीमध्ये माझा सहभाग अनिवार्य असल्यामुळे आर्णी व परिसरातील रसिकांची ओळख व्हायला लागली. म्हणून मी गावातील रसिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मित्र मिळून 'स्वर-गंगा' नावाची (बिन पगारी, फुल अधिकारी) संस्था स्थापन केली.या संस्थेचे उद्घाटन अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचे शिष्य पं. मनोहरराव कासलीकर यांच्या गायनाने केले. या कार्यक्रमाला आर्णी व परिसरातील रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम बुटले गुरुजींच्या परवानगीने शाळेच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता. एकीकडे यवतमाळचा ऑर्केस्ट्रा, दुसरीकडे माझे सोलो कार्यक्रम या व्यतिरिक्त शाळा व संगीत वर्ग अशी खूप ओढाताण होत होती. पण जिद्द आणि मेहनत करण्याची मानसिक तयारी हे सर्व माझ्याकडून करून घेत होती. वरील सगळ्या बाबींमुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींप्रमाणेच माझ्यातील नसलेल्या चुका दाखवून मुख्याध्यापक व संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडे चुगल्या करणारी मंडळी पण तयार होऊ लागली. पण हे प्रमाण कमी होते. तसेच मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष माझी ससेहोलपट बघत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत कुठलेच प्रकरण आले नाही. माझी कार्यशैली, स्वच्छ चारित्र्य, स्वाभिमानी स्वभाव, शाळेतील शिक्षक म्हणून ठेवलेली आब याबद्दल संस्थाध्यक्ष माझ्या बाबतीत अत्यंत उदार धोरण ठेवून होते.

000000

क्रमशः

---------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती. रविवार दि.१३ जुलै २०२६

प्रमाण व बोली भाषा...



   महाराष्ट्रात विविध बोली भाषा बोलल्या जातत.या विविध बोलीभाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रमाण भाषेच्या अत्याभिमानी (दुराभिमानी) लोकांनी बोली भाषेचे आभार मानायला हवे.'पानी' या शब्दावरून हिणवणाऱ्या विद्वानांना विदर्भ हा मध्यप्रदेशात होता.त्यामुळे तेथील बोलीभाषेत पाण्याला हिंदी प्रमाणे पानी उच्चारल्या गेले.अजूनही बरेच ग्रामीण लोक असाच उच्चार करतात.ही त्यांची चूक नाही.विदर्भातीलच झाडीपट्टीच्या भागात अजूनही'ज' चा उच्चार 'ज्य' असाच करतात.अकोल्याकडे 'ळ' चा उच्चार 'ड' सदृश्य होतो.बहिणाबाईंचे काव्य प्रमाण भाषेत नाही म्हणून ते टाकावू ठरते काय?महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांच्या भक्तीगीतांमधून बोलीभाषेतील अनेक शब्द वापरले आहेत.लीळाचरित्र,ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आले आहेत.मग लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीकडे पण तुच्छतेने बघाल काय?महाराष्ट्रातील बोली भाषेची अशी शेकडो उदाहरणे देता येईल.असो!

"अति शहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण उगाच पडली नसावी.

'प्रार्थना' वंदना विटणकर


     वंदना विटणकर यांची ही कविता महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच (पुणे) विभागा करीत स्वरबद्ध करून पुण्यातील अनेक प्रशिक्षण वर्गातून महाराष्ट्रातील संगीत शिक्षकांना शिकविली होती.आर्णीच्या माझ्या संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केली होती तो व्हीडिओ मिळाला...सादर आहे.


हे प्रभो जगदीश्वरा स्वीकार आमुची प्रार्थना

सन्मती देई सदा फुलवी मनी सद्भावना...


प्रेममय रूपे तुझी विश्वात साऱ्या व्यापली

जीवनाची धारणा चरणी तुझ्या सामावली

थोर हा महिमा तुझा गण्यास देई प्रेरणा..


झळकसी गगनातुनी हसतोस तू सुमनातुनी

होऊनी जलधार तू देतोस रे संजीवनी

सर्वदा आनंददाता तूच देवा पावना...


लोपवी अज्ञान हे सृजनत्व देई ईश्वरा

हो कृपेची साउली सकलास तू करुणाकरा

उजळुनी अंधार ने तेजाकडे जनजीवना...

डावीकडून...तबला - निषाद कदम,,गायक - सच्चिदानंद डाखोरे,रेणू कदम,भाग्यश्री जाधव.साईड रिदम - किशोर कोरडे.हार्मोनियम - अस्मादिक.


●headphone please


'काळोखाच्या तपोवनातून' काव्यसंग्रह समीक्षा.


 .                       '#काळोखाच्या_तपोवनातून' 

    सुधाकर कदम ह्यांची जीवननिष्ठा जपणारी कविता.


        मराठीचे आद्य गझलगायक  असलेले आणि #गझलगंधर्व  या नावाने ओळखले जाणारे सुधाकर कदम  यांच्या कवितांची ओळख  महाराष्ट्रातील काव्य रसिकांना '#मीच_आहे_फक्त_येथे_पारसा' ह्या संग्रहा द्वारे झालेलीच आहे. मुळात गायक-संगीतकार असलेले सुधाकर कदम #गीतकार, #गझलकार, #अभंग रचनाकार, सशक्त #विडंबनाकार अशा सर्व पातळीवर आपल्याला पुन्हा भेटतात ते त्यांच्या  काळोखाचा तपोवनातून ह्या दुसऱ्या काव्यसंग्रहातून, या संग्रहात सुधाकर कदम यांनी मराठीतील जवळपास सर्व काव्यप्रकार हाताळले आहेत हे विशेष.  दीर्घ आणि व्यापक असा अनुभव, सकारात्मक विचारशैली,  उस्फुर्त सृजनशीलता, शब्द सौंदर्य ह्या सोबत नेमक्या सुरांची साथ त्यामुळे कवितेला लाभलेली लयबद्धता ह्या सर्व अनुषंगाने सुधाकर कदम यांची कविता काव्य रसिकांना आकर्षून घेणारी ठरते.  पुण्यासारख्या आधुनिक शहरामध्ये राहत असले तरीही मूळ विदर्भातील रहिवासी असलेल्या सुधाकर कदम यांना ग्रामीण भागात जगणाऱ्या शेतकऱ्याच्या दुःखाची आणि वेदनेची जाणीव आहे. आपल्या कवितेमधून शेतकऱ्यांचे दुःख मांडतांना कवी म्हणतात,


 चिल्यापिल्यासंगे।उन्हापावसात

 राबतो शेतात। सालोसाल...

 जीवापलीकडे। मेहनत करी

 तरीही भाकरी। मिळेचि ना...

  ए.सी.त बसोनि। शेतकऱ्यावरी

 लिही कादंबरी। मुंबईत...


      वर्षानुवर्ष शेतामध्ये राबत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सालोसाल अंधारच आहे. जिवापाड मेहनत करून  आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबियांना दोन वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. अंगावर  व्यवस्थित कपडे सुद्धा मिळत नाहीत. अशा दयनीय अवस्थेत शेतकरी जगत असताना त्याचे हिरवेगार शेत पाहून शेठ सावकार त्याला त्याने घेतलेल्या कर्जासाठी तोडत असतात. अनेकदा तर कर्जबाजाऱ्याला आत्महत्या सोडून दुसरा उपाय दिसत नाही. अशावेळी मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये बसून वातानुकूलित वातावरणात बसून काही लोक शेतकऱ्यांच्या जीवनावर कथा कादंबरी कविता लिहीत असतात आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि वेदना समजून घेतली म्हणून  त्यांना पुरस्कारही मिळत असतात. हा विरोधाभास आपल्या कवितेतून व्यंगार्थ स्वरूपात सुधाकर कदम यांनी चपखलपणे व्यक्त केला आहे. सुधाकर कदम यांचे शेती जीवनाविषयीचे निरीक्षण फार उत्तम आहे. जेव्हा शेतकरी शेतामध्ये काबाडकष्ट करतो त्यावेळी शेतकऱ्याची पत्नी  किंवा ग्रामीण शेती मातीतील स्त्री जे काम करत असते त्याबद्दल ते म्हणतात,


 घरघरून उठता जात्यामधून विठ्ठल

 कष्टवतीच्या घामाचा चोहीकडे परीमल


      शेती-मातीत राबणाऱ्या स्त्रीच्या घामाला येणाऱ्या  वासाला परीमल म्हणणे आणि कष्ट करणाऱ्या स्त्रीला कष्टवती  म्हणून संबोधने हे काम बहुदा मराठी भाषेमध्ये  सुधाकर कदम यांनी पहिल्यांदा केले असावे. सौंदर्यवती, लावण्यवती, रुपवती ह्या शब्दासोबत स्त्रीसाठी पहिल्यांदा 'कष्टवती' हा शब्द  वापरून मराठी भाषेत नव्या शब्दांची भर टाकत भाषेला समृद्ध करण्याचे कामही सुधाकर कदम करत आहेत असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरते.  कष्ट करून शेतकऱ्याला समर्थ साथ देणाऱ्या स्त्री बद्दल बोलताना म्हणतात,


 किती संकटे येऊ दे

 दूर ठेऊया दुःखाला

 तू  असता संगे माझ्या

 घरपण येई घरट्याला


       फक्त शेतकऱ्यासंदर्भातच नव्हे तर संपूर्ण मानव जातीच्या अर्धांगिनीच्या कार्याचा गौरव  करत स्त्रीचे महत्त्व अधोरेखित करणारी घरपण ही कविता आहे असे आपल्या लक्षात येते.सुधाकर कदम यांचे निसर्गभान खूप लाघवी आहे. आपल्या कवितेमध्ये आपल्या शब्दातून त्यांनी अतिशय विलोभनीय असा निसर्ग टिपला आहे. शेती आणि निसर्ग यांचा समन्वय आपल्या शब्दातून मांडताना कवी म्हणतात,


अवघं लाघव हिरवं तुडुंब

द्यावी वाटे येथे मनालाही डूब

भरल्या  शेताच दर्शन घडता

सृष्टीपुढे झुके आपसुक माथा


      बहरलेले हिरवेगार शेत, रानामध्ये उभा जोंधळा, बरबटी अशी वेगवेगळी पिके, माळरानावर फुललेली रानफुले असे सृष्टीचे वेगळे रंग आणि हिरवा निसर्ग पाहून  ह्या निसर्गामध्ये रममाण झाले पाहिजे, डुबून गेले पाहिजे अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गावरील अनिल कविता या संग्रहामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. अनवट सूर सारख्या कवितेमधून वर्षा ऋतूचे वर्णन श्यामरंग सारख्या कवितेतून  निसर्ग, प्रेम, राधाकृष्ण अशा अलवार संदर्भातून कवी आपला मनोभाव उलगडतात.  पाऊस,चैत्रपालवी, निसर्ग किमया अशा रचनांमधून तर जिवंत निसर्ग आपल्या शब्दातून कवींनी रेखाटला आहे. आठवण सारख्या कवितेमधून संध्या समयीच्या कातर आठवणी असताना विविध ऋतूंचे रंग पृथ्वीचे अंगण सजवतात आणि आठवणीचा न्यारा श्रावण  व्याकूळ करतो अशी भावना कवी व्यक्त करतात. निसर्गाचे हे अल्हाददायक रूप असे वाचकाला भुरळ घालते.  तसेच रणरणत्या उन्हात निसर्गाचे भयावह रूप सुद्धा कधी कधी दिसून येते. रखरखत्या उन्हात दिसणारा निसर्ग टिपताना सुधाकर कदम म्हणतात,


 वेदनेला येई। उदयास्ती रंग

 रोजची दुपार। पेटवीते अंग

 देहा फुटे झरा। पाणी शोधताना

 कोस कोस धाव। वेगाने घेताना

 डोळ्यावर दाटे।  कारूण्याचे धुके

 जनावरांचेही। हंबरणे मुके


      उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी तगमग, जीवाची होणारी लाहीलाही, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल प्रवास करणारी जनता, पाण्यावाचून जनावराचे हंबरणे हे सर्व अंगावर येणारे दाहक वर्णन निसर्गाचाच एक भाग आहे. तोही तितक्याच प्रभावीपणे चितारण्याचे काम कवींनी केलेले दिसून येते. अर्थात  जिथे पाण्याचे दुर्भिक्ष  आपल्या कवितेमधून दाहकतेने कवी मांडत असतात त्याच वेळी,


डोईवर एक। दुजी कटीवर

घेउनी घागर। सुंदरी ही...


      अशा शब्दात पाणी भरायला निघालेल्या रमणीचे वर्णन सुद्धा कवी तितके स्थापनेने करत असतात. सुधाकर कदम यांनी नजाकत भरल्या अश्या प्रणय रचना काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहातून काव्यरसिकांच्या समोर ठेवल्या आहेत. कल्लोळ सारखी  प्रणयरम्य कविता गणितीय भाषेत जाते. पूर्णत्वा, वर्तुळ, लांब त्रिज्येला जोडता  अशा शब्दात  प्रणयाचे पूर्णत्व कवींनी अधोरेखित केले आहे. प्रणयरम्य कवितेमध्ये गणितीय भाषा हा एक वेगळाच प्रयोग सुधाकर कदम यांनी या कवितेत केलेला दिसून येतो. ताळेबंद, प्रेमामध्ये, अत्तराचा फाया, रेशीम रात, भुलवा अशा अनेक कविता या संग्रहात प्रणयाच्या नवीन, अल्लड आणि आल्हाददायक भावभावनासह आलेल्या आहेत.


 नसे तू राधिका। नसे मीही कृष्ण

 बासरीची तान। नसे तेथे...

 (भुलवा)


 किंवा


 ना मी कृष्णा ना तू राधा

 का व्हावी गे सावळ बाधा ?


      असे प्रश्न विचारत कवींनी राधा-कृष्णाची प्रीत शब्दांकित केली आहे. राधा,कृष्ण, ययाती, द्रोपदी, जानकी अशा काही पुरातन व्यक्ती प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेत फार सहजतेने केलेला दिसून येतो. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार ह्याबाबत बोलत असताना कवी म्हणतात,


 ना महाभारत, न रामायण तरीही

 जानकी अन् द्रोपदी लागे पणाला


      असे सांगून मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा भीष्म द्रोणाचार्य विदुर आणि पांडव असे धर्माचे रक्षण करते लोक बसलेले असताना स्त्रियांवर रामायण महाभारत काळातही अन्याय झाला आहे  असेल तर कवी सांगतातच पण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत नसले तरी  आजही स्त्रियांना डावावर लावावे अशी वस्तू समजले जाते असे ते निक्षून सांगतात. स्त्रियांना फक्त पुरुषापासून त्रास होतो असे नाही तर स्त्री सुद्धा स्त्रीची शत्रू असल्याचे कवी आपल्या कवितेचे सांगताना म्हणतात,


सासुरवासिनी 

चाहूल घेऊन 

सडासंमार्जन 

करो लागे...


      या कडव्यामध्ये एक स्त्री आपले घर-अंगण सारवते आहे सजवते आहे. असे वर्णन दिसत असले तरी सासुरवाशीण ह्या एकाच शब्दात सासूच्या दडपणाखाली, धाकाखाली काम करणारी स्त्री आपल्या समोर उभी राहते. स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार  याप्रमाणेच आपल्या समाजातील जातिभेद अजूनही कायम आहेत. त्यालासुद्धा सुधाकर कदम यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडली आहे.


 किती प्रबोधन केले तरीही

 जात नसे त्या असती जाती


       या ओळी मधून संत काळापासून तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विभूतींनी  जात हे संबोधन नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले.  मात्र तरीही या समाजातील जातीभेद संपला नाही. 'नाठाळाचे माथी लाठी' अशी भूमिका घेतली तरी  तुकारामाचे कुणी ऐकले नाही. आणि जीवनभर विठ्ठल विठ्ठल करणाऱ्या चोखामेळ्याला जिवंतपणी तर गाभाऱ्यात प्रवेश मिळालाच नाही. आणि  मरणोत्तर  पायरीवर जागा मिळाली म्हणून धन्यता मानावी लागली. ही सर्व शोकांतिका सुधाकर  कदम यांनी आपल्या रचनेत कधी व्यंगात्मक रीतीने तर कधी सरळसोट हल्ला चढवत मांडली आहे. देवाधर्माच्या नावाने जो व्यवहार या जगात चालू आहे त्याच्यावर अनेक ठिकाणे कवींनी  शाब्दिक हल्ला चढविला आहे.


 विश्वात्मकतेला

 चौकटीत कोणी

 बांधतो अज्ञानी

 न्यूनगंडे...


       अशा अभंगरचना मधून आज अज्ञानी लोक संपूर्ण  विश्व भावनेला चौकटीमध्ये बंदिस्त करत आहे. ही जाणीव कवींना अस्वस्थ करते. जगाच्या कल्याणासाठी समाधानासाठी 'अत्त दीप भव' ही भावना मनामध्ये रुजली पाहिजे, वाढली पाहिजे असे कवीला आवर्जून वाटते. तशी ती जाणीव त्यांनी 'रे मना' या कवितेमध्ये व्यक्त सुद्धा केलेली दिसून येते. एकंदर समृद्ध काव्यानुभूती, विविध प्रतीके प्रतिमांचा वापर, समर्पक आणि चपलख उदाहरणे, सकारात्मक जीवननिष्ठा ह्या सर्वांचा एकत्रित दस्तावेज म्हणजे काळोखाच्या तपोवनातून  हा संग्रह आहे असे म्हणावे वाटते. स्वयं प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या ह्या सुंदर संग्रहाचे मुखपृष्ठ यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे प्रा.अविनाश वानखेडे यांनी तयार केलेले असून, ते अगदी समर्पक असे आहे. राम पंडित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना संग्रहाची श्रीमंती वाढवते. कवितेचे बहुतांश प्रकार सुधाकर कदम यांनी या संग्रहात हाताळले आहेत. मात्र मुक्तछंद हा काव्यप्रकार यात दिसून येत नाही. कवी मुळात गायक असल्यामुळे आपल्या कविता लयबद्ध कशा होतील याचा विचार त्यांच्या अंतर्मनात असल्याने  तसे घडले असावे असे वाटते. कवी शब्दाचे ऋण मानतात, शब्द आणि कविता त्यांच्यासाठी काय आहे ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर,


 आकळेल अर्थ

 घालता आवर्त

 एका एका आर्त

 शब्दाचा तो...

 शब्दाचा तो भाव

 समजून घेता

 संपेल आर्तता

 मनातील...


      शब्दांचा भाव म्हणजेच अर्थ समजून घेतला म्हणजे मनातील  सर्व जळमटे आणि दुःख नष्ट होतील अशी अपेक्षा कवी सुधाकर कदम यांनी व्यक्त केली असून ती यथार्थ पणे योग्य आणि रास्त आहे यात शंका नाही. सुधाकर कदम यांच्या काळोखाच्या तपोवनातून ह्या संग्रहासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!


 -किरण शिवहर डोंगरदिवे

 वॉर्ड नंबर 7 समता नगर मेहकर

 ता मेहकर जि बुलढाणा 443301

मोबा 7588565576


 काळोखाच्या तपोवनातून ( कविता)

 सुधाकर कदम  मो.8888858850

 स्वयं प्रकाशन पुणे

 पृष्ठ 96, किंमत 150

---------------------------

Tuesday, June 30, 2026

पियानो...उ.रा.गिरी


 या एकलेपणाचा छेडीत मी पियानो

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो

तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
का जागता तुम्हीही माझ्यासवे कळ्यांनो

शब्दात आसवांची बांधू कशी समाधी
व्हा हद्दपार आता डोळ्यातल्या तळ्यांनो

व्याकूल यामिनीला कुठली पहाट माझ्या
आता उषा उद्याची विसरून जा दिशांनो
                      ◆●◆


नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दै. तरुण भारतचे माजी संपादक  वामन तेलंग यांना जाऊन तिथीप्रमाणे पाच वर्ष झालीत.

                त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

                               🌹🙏🌹

-----------------------------------------------------------------------

  ●सोबत नागपुरातील माझ्या कार्यक्रमावरील त्यांचा लेख. 

         #तरुण_भारत/#मध्यमा/बुधवार/दि. २७ जून/८४

    दि. १५ जून. वेळ सायंकाळची. नागपुरात पावसाची एखाद-दुसरी सर येऊन गेलेली. बाताबरण काहीसे निवळलेले, पण उष्मा कमालीचा, तरीही धनवटे रंग मंदिर रसिक श्रोत्यांनी भरलेले. गच्च वगैरे नाही. तशी अपेक्षा कुणाचीही नव्हती. कार्यक्रम थोडा वेगळा होता. मराठी गीत गझल गायनाचा. कलावंतही नवा होता. सुधाकर कदम, धनवटे रंग मंदिरात आपला कार्यक्रम व्हावा चांगल्या उपस्थितीत व्हावा अशी सुधाकरची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तसे विदर्भात आणि मराठवाडचात त्याचे कार्यक्रम झाले होते. पुणे, कोल्हापूर, मुंबई इकडेही त्याने दाद घेतली होती. यवतमाळ जिल्हयात तर तो ख्यातच होता. राहणारा त्याच जिल्ह्यातला आर्णीचा. त्यामु‌ळे त्या परिसरात तो प्रसिद्ध होता आणि स्वाभाविकच धनवटे रंग मंदिर गाजवावे अशी त्याची इच्छा होती. योग जुळून आला. ड्रॅमॅटिक टॅलेन्ट्स' ही संस्था पुढे आली. श्रद्धा पराते, अरुणा पवार, आणि अन्य चाहते मदतीला धावले, रंग मंदिर श्रोत्यांनी बऱ्यापैकी भरले, प्रारंभिक उपचार आटोपले आणि नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.

     वेळ सायंकाळची, सायंकाळच्या प्रार्थनेची. कवठेकरांनी ओळ दिली...

'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे... 

आणि सुधाकर कदमांनी सूर लावला. आवाज मोकळा, जरा जाडा. उच्यार स्पष्ट, गीत-सुरेश भटांचे, साथीला तबल्यावर श्री. माहुलकर, शब्द आणि सूर यांचे नाते जुळले. कदमांची मराठी गीत-गझलांची ही मैफल मग रंगू लागली.

     'गझल' हा उर्दू-हिदीचा लास बाज. त्याचा चाहता वर्गही फार मोठा. तुलनेत मराठी बाण्याची गझल म्हणजे जेमतेमच. कविवर्य सुरेश भटांनी ती अलिकडच्या काळात रुजवली-फूलबली, आपला असा एक प्रवाहच भटांनी निर्माण केला. या प्रवाहात मग अनेक कवी सामील झाले. अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, अमरावतीचा सांगोळे ही त्यातली काही महत्त्वाची नावे

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना 

आरती जी गात आहे तीच माझी वेदना...

     -हघा ओळी श्रीकृष्ण राऊतच्या. (डॅडी देशमुखांच्या सिनेमासाठीही त्याने गीते लिहिली आहेत.) सुरेश भटांच्या गझलांबरो बरच कदमांनी हे ही गीत पेश केले आणि दाद घेतली.तसा मराठी माणूस दाद वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. कविता गझल वगैरे लिहिण्याच्या आणि अन्यही सांस्कृतिक भानगडी तो करतो पण हवी तशी दाद काही त्यांच्याकडून जात नाही. कदमांच्या कार्य क्रमात मात्र जरा वेगळेच दृश्य दिसले.

     नारायण कुळकर्णी कवठेकरांनीही कधी पाडगावकरांच्या, कधी बोरकरांच्या, कधी उर्दू कवींच्या तर कधी स्वतःच्याही मार्मिक ओळी नमूद करीत कार्यक्रमाला अनुकूल असे वातावरण सारखे जिवंत ठेवले.आणि रसिकांनी हा कार्यकम उचलून धरला.

'सायंकाळी म्हणाव्यात कविता रात्री 

गावी गझल सकाळी म्हणावे स्तोत्र

दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र

    -हया ओळी स्वतः कवठेकरांच्या. वास्तवाचे भान जागवणाऱ्या अन् त्याच बरोबर श्रोत्यांना एकदम विश्वासात घेणाऱ्या, आश्वासक शब्दांनी कवितांच्या ओळींची पेरणी करीत करीत कवठेकरांनी कार्यक्रमाचे सारथ्य केले आणि कदमांनी सुरेश भट, उ. रा. गिरी, अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, आर्णीचाच कलीम खान आदींच्या सरस रचना पेश करीत हा कार्यक्रम यशस्वी केला. कधी शृंगाराचे विभ्रम, कधी याचना, कधी यातना असे नानाविध भाव कदमांनी जागे केले.

'पहाटे पहाटे मला जाग आली 

तुझी रेशमाची मिठी मैल झाली'


असा नर्म शृंगार फुलवित असताना 

'जवळ येता तुझ्या दूर सरतस तू

ऐनवेळी अशी काय करतेस तू'

अशी काहीशी लाडिक अनु घोडी धीट रचनाही सादर करून कदमांनी श्रोत्यांची तब्येत खुश केली.

     प्रेम, विहर, विरहातील आर्तता, शृंगा राच्या कला हा नेहमीच कवींच्या आणि गीत-रचनाकारांच्या तब्येतीचा विषय राहिला आहे. 

'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची

तापलेल्या अधीर पाण्याची' 

ह्या ओळी लिहिणे तसे सोपे आहे. कवी त्यात रमतो आणि इतरेजनांना रमवतोही पण त्या सोबतच कलावंत कवीच्या भाळी दुःखाचा एक अभिलेखही लिहिलेला असतो. हा अभिलेख त्याचे बलस्थान असते.

     गीत-गझलांची निवड, सूर यांचा दिलेला त्याला साज व सादरीकरण प्रत्येकच बाबतीत एक अभिजात चोखंदळपणा सिद्ध करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता दुःखाच्या अमिट अभिलेखाने झली. रचना होती उ. रा. गिरी यांची. स्वर होते अर्थातच सुधाकर कदमांचे आणि दाद घेणारी याचना होती-


'पा एकलेपणाचा छेडीत मी पियानो 

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरानो

-वामन तेलंग





संगीत आणि साहित्य :