गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, June 11, 2026

राग-रंग...मल्हार




बहुत प्रकार अपुल्या देशी मल्हाराचे
मज वेड असे पण आंनद मल्हाराचे
 -सुधाकर कदम

     मल्हार प्रकार वर्षाकालीनआहे असे मानतात.पण का? याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही.या राग प्रकाराचा पाऊस किंवा पावसाळ्याशी तसा काहीच संबंध नसावा असे मला वाटते.'दीप' रागाच्या संदर्भात जशी मिथके पेरली तशीच मल्हार प्रकारामध्ये सुद्धा पेरल्या गेली आहेत.जर 'मल्हार' प्रकारातील गायनामुळे पाऊस पडत असेल तर अवर्षणग्रस्त भागात जाऊन कुणी मल्हार गाऊन पाऊस का पाडत नाही?आणि हा प्रकार पावसाळ्यातच का गातात? इतर ऋतूमध्ये तो गायिल्या जात नाही काय?असे अनेक प्रश्न मला पडले आहे.(दीप राग गायिल्याने दिवे पेटतात, अंगाचा दाह होतो आणि मेघमल्हार  गायीला की दाह शांत होतो.तसेच ताना-रिरी नावाच्या दोन भगिनी नदीवर घागर भरताना झालेल्या डुबुक डुबुक आवाजातून मेघ मल्हाराचे स्वर मिळणे', हे वैज्ञानिक कसोटीवर कसे तोलायचे? रागांना काळ-वेळात बांधणे मला अनैसर्गिक वाटते.तानसेन 'संगीत सम्राट' होते हे मान्य! (मी ग्वाल्हेरला जाऊन त्यांच्या मजारी समोर नतमस्तक झालो होतो.) पण त्यांचा मोठेपणा अधिक गडद करण्यासाठी असली मिथके तयार करणे मला तरी योग्य वाटत नाही.बरे, तानसेनाच्या अगोदर किंवा नंतर हा चमत्कार घडल्याचा कुठेच उल्लेख नाही.) मुळात कोणताही राग व सुरावटी भक्कम तयारीनिशी केव्हाही चखलपणे गायिल्या/वाजविल्या गेल्या तर त्या गोड वाटणारच! तसे नसते तर सुगम संगीतात झालेल्या अनेक रचना बारमाही गोड वाटल्याच नसत्या.यावर शास्त्रीय संगीतातील शास्त्री सहमत होणार नाही.पण त्यांनीही यावर जरा डोळसपणे विचार करायला हरकत नाही.यात मी शास्त्रीय गायकांना किंवा अभ्यासकांना कमी लेखतो असा गैरसमज कोणी करून घेऊ नये.कारण इतर गायनशैली सुद्धा शास्त्रीय संगीताचाच आधार घेते हे खरे आहे. पण शास्त्रीय संगीताची निर्मिती लोकसंगीतामधूनच झाली हे पण तेवढेच सत्य आहे.आणि ते केव्हाही गोडच वाटते.
     मल्हाराचे अनेक प्रकार आहेत.शुद्ध मल्हार,पट मल्हार,मेघ मल्हार,सूर मल्हार,गौड मल्हार,नायकी मल्हार,कानडा मल्हार,मीराबाई की मल्हार,धुलिया मल्हार,चरजू की मल्हार वगैरे वगैरे. 'मियाँ की मल्हार' त्यातीलच एक पण लोकप्रिय राग आहे.मल्हार 'देस अंग','कानडा अंग','गौड अंग' अशा तीन अंगाने गातात.दक्षिण भारतीय मल्हारचा उत्तर भारतीय मल्हारशी स्वरांच्या दृष्टीने तिळमात्रही संबंध नाही.मल्हार प्रकारावर अनेक प्रबंध लिहिल्या गेले. संशोधन झाले.या संदर्भात संशोधकांनी आपापली मते मांडली.'मेघ' रागासोबत 'मल्हारी' हे नाव पण समोर आलेले दिसते.तसेच महाराष्ट्रात 'मल्हारी मार्तंड' नावही प्रचलित आहे.पण या दोन्हीचा मल्हार राग प्रकाराशी तसा काहीही संबंध नाही.
     मल्हार प्रकारातील अनेक मल्हार लोकप्रिय आहेत.पण मला अतिशय भावला तो किशोरी आमोणकरांचा 'आनंद मल्हार.' आणि तो त्याच गाऊ जाणे.पंडित भीमसेन जोशींचा मियामल्हार ऐकणीयच... मोठा ख्याल झाल्यावर छोट्या ख्यालामधील विजेच्या गडगडासारख्या कडकडणार्‍या ताना आणि स्वरांचे बेहेलावे एखाद्या धबधब्याखाली बसल्यावर अंगावर पडणार्‍या जलप्रपाताप्रमाणे चिंब-चिंब करून टाकायचे.पण तेथे चिंब होण्याकरीता ’चातक’ बनून वाट बघावी लागायची.सुगम संगीत वा गझल गायन ऐकताना ही वाट बघण्याची प्रक्रिया म्हणा किंवा अंतराय म्हणा कमी लागतो.अर्थात सुगम संगीत वा गझल गायकी आणि शास्त्रीय गाणे बजावणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.पण गझल गायकी म्हणजे 'गागर मे सागर' असे मोठमोठे गायक सुद्धा म्हणायचे.
    
     आता हेच बघा ना ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल मेहदी हसन यांनी मियामल्हार मध्येच त्यांच्या ढंगात पेश केलेली गझल असो वा जगजीत सिंग यांची 'फिर पानी दे मौला' असो...दोघांचाही बाज वेगवेगळा आहे.या दोन्ही गायकांची खासियत म्हणजे त्यांचा खर्ज.मंद्र सप्तकातील त्यांची कारागिरी सरळ हृदयाला भेदून जाणारी आहे.मग जगजित यांचे ’फिर पानी दे मौला’ असो की मेहदी हसन यांचे’मुझसे खफा हो बैठा’ इथे मात्र एकदम बरसातच!असो...
 ●हिंदी
          चित्रपटांमध्येही या रागाचा तुरळक प्रयोग झालेल आहे.वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं,वाणि जयराम यांनी गायिलेल गुड्डी चित्रपटातील ’बोल रे पपीहरा..’ हे अतिशय सुंदर आणि लोकप्रिय झालेलं गाणं...परंतू मला मन्ना डे यांच्या प्रायव्हेट अल्बमधील ’नाच रे मयूरा...’हे गीत अतिशय आवडतं.'लपक झपक तू आ रे बदरवा' (मल्हार रागावर आधारित मन्ना डेंनी गायिलेले विनोदी गीत) चित्रपट-बुटपॉलिश.'ना ना ना बरसो बादल' (मियाँ मल्हार) चित्रपट-सम्राट पृथ्वीराज चौहान. 'भय भंजन वंदना सुनो हमारी' (मियाँ मल्हार) चित्रपट-बसंत बहार.'करो सब निछावर'(मियाँ मल्हार) चित्रपट-सह्याद्री की लडकी. 'नाच मेरे मोर जरा नाच' (मियाँ मल्हार) चित्रपट-तेरे द्वार खडा भगवान. 'बरसो रे बरसो रे' (मेघ मल्हार) चित्रपट-तानसेन.'दुख भरे दिन बिते रे भैय्या' (मेघ मल्हार) चित्रपट-मदर इंडिया.'तन रंग लो जी आज मन रंग लो' (मेघ मल्हार) चित्रपट-कोहिनूर.'हाले दिल युं उन्हें सुनाया गया' (मियाँ मल्हार) चित्रपट-जहांआरा. 'अंग लग जा बालमा' चित्रपट-मेरा नाम जोकर.'छायी बरखा बहार,पडे अंगना फुहार' (सूर मल्हार) चित्रपट-चिराग.'बोल रे पपिहरा' (मियाँ मल्हार) चित्रपट-गुड्डी. 'कहां से आये बदरा' (मेघ मल्हार)
'बिजुरी चमके बरसे मेहा' (मियाँ मल्हार)'बरसों रे मेघा मेघा (मेघ मल्हार) चित्रपट-गुरू. 'घिर घिर आये बदरिया' (मियाँ मल्हार) चित्रपट-सरदारी बेगम. 'बादल उमड बढ आये' (मियाँ मल्हार) चित्रपट-साज.'काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ'...लगान.'मल्हार' (अल्बम) मियाँ मल्हार,
गायक-मामे खान,मनीषा अग्रवाल.'मेरे ती गिरीधर गोपाल' लता मंगेशकर. (मियाँ मल्हार).'घन गरजत बादर आये'
(मियाँ मल्हार,कोक स्टुडिओ) आयेशा ओमर,फ़रिहा परवेज,झारा मदानी.
●मराठी
'आज कुणीतरी यावे' (मियाँ मल्हार) चित्रपट- मुंबईचा जावई. 'घन घन माला' (मियाँ मल्हार) चित्रपट-वरदक्षिणा. 'जन पळभर म्हणतील हाय हाय' (मियाँ मल्हार) भावगीत.
'जिवलगा कधी रे येशील तू' चित्रपट-सुवासिनी.'सावन घन गरजे बजाये' नाटक पंडितराज जगन्नाथ,गायक-प्रसाद सावकार. 'माना मानव वा परमेश्वर' (मियाँ मल्हार) सुधीर फडके.(याचे गीतकार आणि संगीतकार विदर्भातील अमरावतीचे मनोहर कवीश्वर होते.) 'कुहू कुहू कुहू येईल साद' अनुराधा पौडवाल. 'मेघा नको बरसू अता' जयंत मल्हार रागावर आधारित अप्रतिम मराठी गीत.अल्बम-घन घुंघुरवाळा आला.गायिक-अपर्णा बिवलकर. वरील सर्व गाणी मल्हार प्रकारांवर आधारित आहेत.
      आज आपण जगगितसिंग यांनी गायिलेली निदा फाज़ली यांची ’गरज बरस प्यासी धरती को फिर पानी दे मौला’ ही गझल ऐकू या...यातील व्हायोलिन आणि बासरी या दोनच वाद्याचा वापर हे आणखी एक वैशिष्ठ्य आहे.त्यातल्या त्यात व्हायोलिन तर थेट भिडणारेच...तसेच नेहमीचा केरवा ताल येथे वेगळ्या पण गझलेला पूरक पद्धतीने शब्दांसोबत चालत (ठुमकत-ठुमकत) आपल्या समोर आलेला दिसून येतो.हे ही जग्गूभाईंचे वैशिष्ठ्य आहे...
       याच रागातील मेहदी हसन यांनी गायिलेली  फरहत शहज़ात यांची अतिशय सुंदर अशी  ’एक बस तू ही नही मुझसे खफा हो बैठा’ ही गझल ज्यांना रागविस्ताराच्या आलापासह (Live) ऐकायची असेल युट्युबवर जाऊन सर्च करावी व आनंद घ्यावा.
       
(शास्त्रीय गायक/वादकांची 'स्पेसिफिक' अशी नावे सांगण्याची गरज नाही.कारण नेटवर सहज सापडतात.पण सुगम संगीतातील नावे सांगावी
लागतात.)
-------------------------------------------------------------------------
● दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी.



आसवांचे जरी हसे झाले

       १९८० मध्ये सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले असताना रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा सुरु असताना एकदम काय झाले माहीत नाही.एक गझल मला लिहून घ्यायला सांगितली व जरा यमनच्या स्वरात गुणगुणून दाखवता काय? (ही विनंतीवजा आज्ञाच होती) असे विचारले. मतला होता... 


आसवांचे जरी हसे झाले

हे तुला पाहिजे तसे झाले


यमन हा दोघांच्याही आवडीचा राग...त्यांनी सहज म्हटले व मी पण सहज गंमत म्हणून हार्मोनियम घेऊन यमनची सुरावट छेडत बसलो. चाल बसवणे हा उद्देश नसताना आणि निव्वळ फावल्या वेळेतील गप्पा सुरू असताना यमन छेडता छेडता सहजच सुचलेली सुरावटीत त्यांना ऐकविली.लगेच "व्वा! क्या बात है कदम साहेब" अशी मजेशीर दाद देऊन ते पलंगावर पहुडले. आम्ही पण झोपण्याची तयारी करायला लागलो.पाच-दहा मिनिटातच 'ती जरा पुन्हा एकदा ऐकवता काय?' अशी विचारणा केली.मी पुनः हार्मोनियम काढली व सुरावट आठविण्याचा प्रयत्न करायला लागलो.कारण गंमत म्हणून सहज गुणगुणलो होतो.बऱ्याच प्रयत्नानंतर थोड्या फार फरकाने आठवली.आणि जशी आठवली तशी भटांना ऐकवली.त्यानंतर ते व आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.


     आज हे आठविण्याचे कारण म्हणजे जीर्ण झालेली जुनी डायरी...मी सध्या मुलीकडे नांदेड सिटीला मुक्कामी आहे.१४ तारखेला सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी मैफल जमवावी म्हणून मयूर, प्राजक्ताला फोन केला.


     मयूरकडे सुरेश भटांच्या शिकविलेल्या माझ्या बंदीशींच्या  बऱ्याच गझला आहेत.अनेक कार्यक्रमातून त्याने सादर केल्या आहेत.पण प्राजक्ताकडे माझ्या बंदीशीची सुरेश भटांची एकही गझल नव्हती.म्हणून मग वारजे येथील माझ्या निवास स्थानावरून निषादला डायरी पाठवायला सांगितली.तर त्याने सगळ्या डायऱ्या पाठवून दिल्या.माझ्या शेवटच्या (म्हणजे मी कार्यक्रम करीत असतानाच्या वेळची) डायरीतील दोन गझला मोबाईलवर गाऊन तयार करण्यासाठी प्राजक्ताला पाठविल्या.नंतर १९७५ पासूनची जुनी डायरी चाळायला लागलो.त्यात ही गझल दिसली.व जुनी 'आठवण' ताजी झाली.बस्स!इतकेच... 


आसवांचे जरी हसे झाले,

हे तुला पाहिजे तसे झाले


चंद्र आला निघूनही गेला

ऐन वेळ असे कसे झाले


शोधुनी मी तुला कुठे शोधू

चेहऱ्यांचेच आरसे झाले


संपले हाय बोलणे माझे

जे तुझ्याशी कसे बसे झाले

दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.८/६/२०२६

इतना मुझे सोचा करो ना

 


सुरेशजीने अपने खास अंदाज़ में गायी हुई समीर की यह उर्दू ग़ज़ल मुझे बहुत पसंद है।क्यों की ग़ज़ल, गायन और बंदिश सभी दिल लुभानेवले है।यह ग़ज़ल जनसंमोहिनी राग पर आधारित है।लेकिन इसके शेरों में आनेवाला तीव्र मध्यम मन को मोह लेता है। इसे एकदम गले से उतारना मुश्किल था।लेकिन सुरेशजीने इसे बखुबी उतारकर चार चांद लगा दिए है।

आप भी सूनकर लुत्फ़ उठाईएगा...पसंद आए तो डॉ शब्द लिखीएगा।

आठवण...मित्रवर्य वामन तेलंग यांची

     माझ्यातील गायक/संगीतकारावर प्रेम करण्या सोबतच माझ्यातील कवी/लेखकास हेरून प्रोत्साहित करणारे नागपुरच्या  तरुण भारत या दैनिकाचे माजी संपादक मित्रवर्य #वामन_तेलंग  यांना जाऊन बघता बघता तीन वर्ष झालीत.त्यांच्या जाण्याने वैयक्तिक माझे खूप नुकसान झाले आहे.... ते जर माझ्या आयुष्यात आले नसते तर माझ्यातील कवी/लेखक लोकांना माहितीच झाला नसता...

     '#फडे_मधुर_खावया...' हे 'निवडक विषयांतराचे' पुस्तक त्यांच्यामुळेच प्रकाशित झाले.या पुस्तकाला प्रस्तावना पण त्यांचीच आहे...ती खाली देत आहे.

-------------------------------------------------------------------------

.                      आर्णीच्या मातीचा गंध 

                                        -

     माझे मित्र सुधाकर कदम यांचे नाव प्रामुख्याने संगीतकार म्हणून आणि विशेषत्वाने मराठी गझल गायक म्हणून सर्वविख्यात आहे़. आर्णी-यवतमाळच्या भागात संगीत शिक्षक म्हणूनही ते अनेकांना परिचित आहेत़. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व संगीताच्या दुनियेशी मेळ खाणारे आहे़. म्हणजे असे की भरपूर उंची, गोरापान रंग, नीटस नाक-डोळे आणि डोक्यावरील कुरळ केस असे त्यांचे दर्शन आहे़. त्यावरून सहजपणे कुणालाही वाटून जावे की, हा माणूस नक्कीच गायक-कलावंत असणार! फार कमी लोकांना अशी एकरूपता लाभत असते़. आपण पाहतोच ! निसर्गाने ज्यांच्या कंठामध्ये मधाचे पोवळे ठेवले आहे त्यांना रंग आणि रूप देतांना मात्र त्याने फार कंजूषपणा केलेला आहे़. अर्थात यालाही-अपवाद असतोच़. विशेषतः जे गझल गायक-कलावंत असतात ते तर निश्चितच याला अपवाद दिसून येतील़. सर्वच कसे देखणे, रुबाबदार! सुधाकर कदम हेही त्याच मालिकेतले़. आर्णीसारख्या आडगावात राहूनही त्यांनी गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला़. संगीताच्या प्रसारासाठी संगीताची शाळा काढली़. स्वतःच्या पदराला खार लावून घेत कार्यक्रम केले़. आपले आणि आपल्या वाद्यवृंदाचे वेगळेपण ठसविण्यासाठी गझल या प्रकारातील गीतांची निवड केली़. ती करतानाही त्यांनी अनवट अशी वाट निवडली़. ‘मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला़. हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे़. हिंदी, उर्दू-हिंदूस्थानी, मराठी या केवळ भाषा नाहीत़. भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते़. संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यामुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो. गझल च्या संदर्भात ते अधिकच खरे आहे़. कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे़. अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाऴ. अव्वल इंग्रजीच्या काळात केव्हा तरी मराठीने गझलचे वृत्त-लेखन स्वीकारले़. त्या सर्व तपशिलामध्ये जाण्याचे येथे कारण नाही़. सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले़. ही वाट वहिवाट नव्हती़. हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती़. सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला़. कित्येक वर्ष तो या खटाटोपीच्या मागे होता़. पुढे त्याने स्वर-लेखन केले़. त्याचा अर्थ असा की तेथे स्वर हा घटक प्रधान होता़. ‘लेखन’ ही दुय्यम बाब होती़. त्याच्या कार्यक्रमातही ‘गझल’ हा प्रकार प्रधान होता; ‘मराठी’ हा त्याचा पेहराव होता़. कित्येक वर्ष तो या केंद्राभोवती घुटमळत रमला़. अगदी परवा परवा पर्यंत त्यात अंतराय असे आले नव्हते़. मराठीतील कवी आणि त्यांच्या रचना यांचेशी त्याची सलगी होती खरी, पण त्यामागचा हेतू ‘गझल रचना मिळणे’ हा होता़. कदाचित्‌ त्या जोशाजोशात त्याने कविता-लेखनही करून पाहिले असेल, पण तेही पुन्हा गाण्यासाठीच होते़. असे असताना, माझ्या समजुती प्रमाणे, तो अचानक स्फुट लेखनाकडे वळला़. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकामधून त्याच्या संपादकीय पृष्ठावर ‘विषयांतर’ हा स्तंभ येत होता आणि त्यातील हलक्या-फुलक्या लिखाणामुळे तो स्तंभ वाचकांच्या व लेखनाची सुरसुरी असणार्‍यांच्या आवडीचा स्तंभ झाला होता़. सुधाकरने अलगद त्या स्तंभावर झेप घेतली आणि गायनीकळा लाभलेला सुधाकर कदम लेखन-कलेने बाधित झाला!

 सुधाकर कदम यांच्या गायक असण्याचा, तो शिक्षक असण्याचा, वाद्यवृंद संघटक असण्याचा वर मी थोड्या अधिक तपशिलाने उल्लेख केला आहे़. त्याला तसेच कारण आहे़. आयुष्याची मोलाची बरीच वर्षे या क्षेत्रामध्ये झिजतांना माणसांचे जे चित्रविचित्र नमुने आणि अनुभव त्याच्या गाठी जमा झाले होते; त्या अनुभवांना त्याच्या ‘विषयांतर’ मधील स्फुट-लिखाणाने एक चांगला पाट मिळाला आहे़. संगीताची जाण ठेवणार्‍यांना आणि विशेषतः गीत-गायकांना कवितेची-काव्याची व बर्‍या-वाईट साहित्याची ओळख असायलाच हवी असते़. सुधाकरच्या ठिकाणी ती ओळख पिण्डतःच होती़. त्याच्या या पुस्तकात संग्रहित झालेल्या स्फुट-लेखांवरुन वाचकांना त्याची सहजच कल्पना येईल़. उदाहरणावरून यातील शीर्षकाचा स्फुटलेख पहा़. त्याची सुरवातच श्री़. म़. माटे आणि त्यांच्या ‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ या पाठाच्या उल्लेखाने होते़. जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर ‘माटे मास्तरांचा हा धडा’ अनेकांनी अभ्यासिला असेल़.परंतु नेमक्या ठिकाणी त्याचा संदर्भ देण्याचे कसब त्यातल्या फारच थोड्यांना साधले असेल़. मुळात साहित्य व त्याची आवड असेल तरच पाठ्यक्रमातून जाणारे असे संदर्भ संबंधिताला आठवतील, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे़. स्फुटासाठी सुधाकरच्या कामी हा संदर्भ जसा हुकुमासारखा येतो त्याचप्रमाणे गायकी कलेतील प्रत्यक्षातला अनुभवही कामाला येतो़. हे अनुभव इतर सामान्य अनुभवापेक्षा वेगळे असतात, आणि लेखकाच्या हातोटीमुळे ते पैलूदार बनतात़. त्याचाही प्रत्यय या संग्रहात वाचकांना ठिकठिकाणी आल्याखेरीज राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो़.

      सुधाकर कदमचे हे लिखाण अर्थातच स्फुट स्वरूपाचे आणि विरंगुळ्यासाठी केलेले लिखाण आहे़. अशा लिखाणाची खुमारी त्याच्या मांडणीत, आणि लेखकाचे ठायी असणार्‍या निरीक्षणाच्या ताकदीत सामावलेली असते़. तसे त्यातले अनुभव, त्यातले प्रसंग, प्रसंगविशेषी दिसून येणार्‍या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार आपल्या नित्याच्या अवलोकनाचाही असतो़. परंतु त्याकडे आपले लक्ष जातेच असे नाही़. लेखक आणि वाचक यांच्यात हीच एक रेषा असते़. वाचक जेव्हा ही रेषा ओलांडतो तेव्हा तोही लेखक होऊ शकतो़. ज्यांना ती रेषा पार करता येत नाही त्यांना या प्रकारच्या लेखनामुळे एकप्रकारचा विविध पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो़.

     सुधाकर कदमच्या या पुस्तकातून त्याच्या वाचकांना असा आनंद मिळेलच याविषयी मला मुळीही शंका नाही़. अशी शंका नसणे हे लेखक म्हणून सुधाकरचे यशच मानले पाहिजे़.


-वामन तेलंग, 

संपादक,दैनिक तरुण भारत.

नागपूर : कार्तिक एकादशी / १९९८)



 

Sunday, June 7, 2026

गझलगंधर्व सुधाकर कदम...डॉ.राम पंडित,मुंबई.

 गझलगंधर्व सुधाकर कदम

#गझलनवाज सुधाकर कदम

#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन सुधाकर कदम

अशा विविध संबोधनांनी मराठी गझल रसिकांना परिचित असलेले मराठीचे #आद्य_मराठी_गझलगायक,#संगीतकार,#कवी,#लेखक.


.          महाराष्ट्रातील गझलविधा खेडोपाडी रुजविण्याचे महत्कार्य स्व.सुरेश भटांसोबत फक्त गझलनवाज सुधाकर कदम यांनीच केले.वऱ्हाडातील आर्णी या छोट्या गावातून हा गझल फकीर गावोगावी भटांच्या गझला चालीसह पोहोचवीत होता तेव्हा आजचे नामवंत भावगीत गायक कोळी गीतांवर गुजराण करीत होते.जेव्हा सुधाकर कदम आर्थिक विवंचनेत होते तेव्हा सुरेश भटांनी  स्वखर्चाने आपल्यासोबत महाराष्ट्रभर गझल वाचन-गायनाचा कार्यक्रम करण्याची गळ घातली अन् कदमही आढेवेढे न घेता,कारणे न देता त्यांच्या सोबतीचे फकीर बनले.गाठीशी चांगली नोकरी असताना तिच्या बळावर अथवा अन्य निकषांवर गायन कार्यक्रम मिळविणे,त्यानंतर आर्थिक स्थैर्याची खात्री झाल्यावर व थोडे बहुत नाव झाल्यावर कलेला वाहून घेणे हे कलेच्या क्षेत्रात नेहमीच घडते.पण तदपूर्वीच नोकरी सोडून गायनासाठी आवकाची पर्वा न करता ,न कंटाळता,न वैतागता शेवटपर्यंत संघर्षरत राहणारे सुधाकर कदम हे एकमेव गायक होय.

           सुरेश भटांनी लेखी स्वरूपात ज्यांना गझलनवाज या उपाधीने गौरविले आहे ते एकमेव सुधाकर कदमच आहेत.शाहीर सुरेशकुमार वैराळकरांच्या आयोजनाखाली झालेल्या एका समारंभात त्यांना गझलगंधर्व ही पदवी बहाल करण्यात आली पण कदमांना त्या पदव्या मिरविण्याचा हव्यास नसावा.त्यांच्या अनेक हिंदी-उर्दू गझल,गीतांवरील स्वरलिपी काका हाथरसीच्या #संगीत  कार्यालयाच्या ग्रंथात अंतर्भूत आहेत.त्यावरून #पंडित  ही उपाधी ते सहजपणे लावू शकतात पण ही पदवी शासन दरबारातून किंवा विद्यापीठातून मिळत नाही हे सर्वश्रुत आहे.अशी पदवी स्वयंघोषितच लावतात.स्वतःला बिरुद चिटकवून घेण्याचा त्यांना तिटकारा आहे.

          सुधाकर कदमांचा आवाज,शास्त्रीय संगीताची जाण व गझल ही शब्दप्रधान गायकी आहे या गोष्टींचे भान व रागात गझल बांधण्याचे कसब हे गुण भटांना भावले व त्यामुळेच भटांनी त्यांना सोबत घेतले.

           सुधाकर कदमांच्या गझलगायनाने प्रेरित होऊन विदर्भातील अनेक गायक गझलगायनकडे वळले.त्यातील राजेश उमाळे,मदन काजळे, विजय गटलेवार, भीमराव गुलाबराव पांचाळे ही नावे नमूद करता येईल. कदमांच्या शैलीचा शिक्का आपणावर बसू नये म्हणून काही गायकांनी शब्दांपेक्षा सरगम व वाद्यवृंदाच्या पेशकशीचा आधार घेत आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला.कवीचे गझलेतील भाव तिच्यातील शब्दांद्वारे व आपल्या स्वर व सुरांच्या सहाय्याने रसिक श्रोत्यांच्या मनबुद्धीत संप्रेषित करणे हे गझलगायकाचे आद्य कर्तव्य आहे.(शब्दांना गौण मानून आलापांद्वारे आपले नैपुण्य प्रदर्शित करणे नव्हे.)याचा अनेक लब्धप्रतिष्ठित गवैयांना विसर पडतो 

           सुधाकर कदमांनी सरकार दरबारी पायऱ्या झिजवून अनुदान-याचक बनून जलसे केले नाहीत की आपले गायन क्षेत्र सोडून गझल लेखन क्षेत्रात लुडबुड केली नाही.खरे तर ते लेखक कवीही आहेत.तालवृत्तांएवढेच त्यांना छंदवृत्तांचेही ज्ञान आहे,पण त्यांनी शिष्यवर्ग घडवला तो आपल्या गायन क्षेत्रातच.

           सांदिपनी बनून आश्रमासाठी माधुकरी मागण्याचीही त्यांना आवश्यकता भासत नाही हे विशेष.

          वडील पांडुरंगपंत हे संगीत तज्ञ व संवादिनी वादक असल्याने सुधाकर कदमांना संगीताची गोडी लागणे स्वाभाविकच होते.त्यांनी सुधाकर कदमांना पुरुषोत्तम कासलीकर यांच्याकडे शिकण्यास पाठविले.अल्पावधीतच संगीत विशारद ही पदवी कदमांनी श्रेष्ठ श्रेणीत प्राप्त केली.'#अशी_गावी_मराठी_गझल' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी विविध ठिकाणी,विविध गावी केले.

           कदम म्हणतात,मराठी गझल जशी उर्दूकडून आली तशीच गझलगायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.त्यांनी आपली गायन शैली मेहदी हसन,फरीदा खानम,गुलामअली,जगजितसिंह यांच्या गायकीवरून तयार झाली हे प्रामाणिकपणे मान्य केले आहे.वडिलांचे वारकरी भजन,गायन व शिवरंजनी ऑर्केस्ट्रामधील संयोजन व अकॉर्डियन,सोबत तबला,मेंडोलिन,सरोद,संतूर इत्यादी वाद्यांवर त्यांनी प्राविण्य मिळवले.एवढेच नव्हे तर मुलगा तबला वादक व दोन्ही मुलींना गायक म्हणून घडविले.

           सुधाकर कदमांना बंदिश तयार करणे ही संकल्पना,हा शब्दप्रयोग अयोग्य वाटतो.ते म्हणतात गझल वाचता वाचता आतल्या आत खळखळ सुरू होऊन एखादी सुरावट बाहेर येते,ती खरी बंदिश असते.ती आपली नसते...आपण फक्त माध्यम असतो.आलेल्या चाली (म्हणजे उर्दूतील आमद) आणि बांधलेल्या चाली यातील तफावत आत्मपरीक्षण केल्यास लक्षात येते.शब्द आणि स्वर दोन्हीही दमदार असतील तर दाद हमखास मिळते.

           वरील निष्कर्ष सुधाकर कदमांच्या प्रदीर्घ रियाज, अवलोकन,अध्ययन यातून उतरले आहेत हे सहज लक्षात येईल.गझलगायक संगीतकार असूनही त्यांनी आपल्या तालिमीत शिष्य गायक तयार करून त्यांना आपल्या गायनाच्या कार्यक्रमात संधी दिली हे मी फक्त कदमांच्या बाबतीत अनुभवले.एवढेच नव्हे तर गायनाची वर्कशॉप घेण्याची त्यांना गरजही भासली नाही.ते मूलतः कवी व लेखक असल्याने गझल सृजनाचे वर्कशॉप घेऊन मिळकत करणे त्यांना अशक्यही नव्हते.पण गझल गायनाला निष्ठा वाहिल्यामुळे गझलकरांच्या क्षेत्रात चमकोगिरी करून स्वतःचे स्तोम माजविणे व त्या बळावर शासनाकडे गझल भंडारा घालण्यासाठी हात पसरणे त्यांना उचित वाटले नाही.

           गझलच्या नावाखाली एखादी संस्था काढून दरवर्षी गझल उरूस भरवणे चोहीकडे चालले असताना अशा मोहाला कदम बळी पडले नाहीत ही स्पृहणीय बाब होय.त्यासाठी लागणारी लाचारी,संधिसाधुत्व,दूरदृष्टी ठेऊन मैत्री जोडण्याचे कसब (गरज संपतच तोडण्याची चलाखी) इ.चा अभाव असल्याने ते अर्थार्जनात मागे पडले असावेत,पण त्यांना या गोष्टीची खंत नाही.

           गझल लेखन ही आता विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी राहिली नाही.या पूर्वार्ध वाक्याचा उत्तरार्ध असा की,गझल गायन ही आता विशिष्ट व्यक्तींचीही मक्तेदारी उरलेली नाही.डॉ.राजेश उमाळे,मदन काजळे,दत्तप्रसाद रानडे,विजय गटलेवार,दिनेश अर्जुना, आदित्य फडके,मयूर महाजन इ.कदमांचे प्रसंशक व शिष्य यांनी माझे हे म्हणणे सत्य ठरविले आहे.

           सुरेश भटांच्या 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची' या गझलेसाठी भूपाळीचे स्वर कदमांना खुणावीत होते.पण अधीर या शब्दासाठी उचित सुरावट आढळेना अन् अवचित भूपाळीत अंतर्भूत नसलेला शुद्ध निषाद त्यांच्या मनात हजर झाला अन् तापलेल्या अधीर पाण्याची ही दुसरी ओळही स्वरबद्ध झाली.हा किस्सा इथे उद्धृत करण्यामागे हेतू एवढाच की कदमांपासून गझलगायनाची प्रेरणा घेणाऱ्या व अन्य गायकांनी हे जाणावे की, खरी चाल ,बंदिश ही आपण बांधली अशी गर्वोक्ती व्यर्थ आहे.

           इथे एक किस्सा नमूद करतो...

नबाब संत रहीम हे अत्यंत दानशूर होते तेवढेच विनम्रही होते.दोन हात उंचावून याचकांना दान देताना त्यांची दृष्टी जमातीकडे लावलेली असे.यावर गंग कवीने विचारले, 

          सीखे कहां नबाबजूं ऐसी देनी देन

          ज्यों ज्यों कर उंचा करा त्यों त्यों नीचे नैन

रहीम उतरले,

          देन हार कोई और है भेजत सो दिन रैन

          लोग भरम हम पै धरे यात नीचें नैन

नामवंतांनी 'देन हार कोई और है' याचं भान ठेवणं आवश्यक आहे अन् 'याते निचें नैन' ही वृत्ती बाणवणेही गरजेचे आहे.

           सुधाकर कदमांचा परिवार गायन क्षेत्रातच आहे.त्यांचा मुलगा व दोन्ही मुली शिष्य परिवारातच मोडतात.आपण गझलगायन इतरांना शिकवलं तर आपल्याला सरपास करून ते आपल्याहून अधिक विख्यात होतील अशा भयगंडाने शिकू इच्छिणाऱ्यांना त्यांनी कधी विन्मुख पाठविले नाही.गायकांना विद्यादानाची उदारवृत्ती कदमांनी आपल्यात रुजवली आहे.त्यामुळेच आपल्या नॅरेशन्स त्यांनी प्रकाशित करून नवोदित गझलकारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

            ख्यालगायक एखादा राग पेश करताना जी शब्दरचना वापरतो त्या रचनेचा कवी बरेचदा त्यास ज्ञात नसतो. ती रचना त्याला परंपरेने प्राप्त झाली असते.इथे रागाची पेशकश प्रमुख असते.सहसा काव्य संप्रेषित होतेच असे नाही,पण गझलगायनात शब्द हे प्रधान असतात.गायक संगीतकार गझलेला स्वरसाज चढवीत असतो.(सुरावटीवरही गझल पाडून देणारे अनेक महाभाग असतीलही कदाचित अशांना गायनानुकूल न म्हणता गायनानुकूल गझलकार म्हणावे लागेल.) काही गझलगायक (गझलकारास त्याची गझल गायल्याचे मानधन तर देतच नाहीत.) गझल गाताना त्या गझलेच्या कवीचे नावदेखील मैफिलीत सांगण्याचे औदार्य दाखवीत नाहीत.एवढेच नव्हे तर त्याची गझल गाताना अन्य गझलकाराचे शेरही नाव न घेता घुसडतात.हे अनुचित व अनैतिक वर्तन म्हणावे लागेल.सुधाकर कदमांच्या मैफिलीत गझलकाराचा आवर्जून उल्लेख होतो.एवढेच नव्हे ते आपल्या साथीदारांचाही पूर्ण परिचय करून देतात.या गोष्टी गायकाबद्दल श्रोत्यांना अनुकूल मत नोंदविण्यास सहाय्यक ठरतात.गायकाच्या व्यक्तिमत्वाशी एक जमेची बाजू ठरते.विशेषतः कदमांसारखे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल अशांनी ही बंधने अवश्य पाळावी. त्याने त्याचा दिलदारपणा श्रोत्यांना जाणवून अन्य न्यूनतेकडे दुर्लक्ष होईल.

           खरे तर सुधाकर कदम यांचा गौरव ग्रंथ त्यांची गझल गायनातील ज्येष्ठता व स्थान लक्षात घेता फार पूर्वीच यायला हवा होता,पण बाजारात ओरिजनल वस्तू महाग असते व चायनामेड स्वस्त व विपुल प्रमाणात उपलब्ध असते,त्यामुळे चायनाचे तकलादू प्रॉडक्ट् लवकर खपते हेच खरे.

           गझलगायक, गझलकार व गझल रसिकांनी हा ग्रंथ वाचणे अगत्याचे आहे.जेणेकरून या क्षेत्रात पारंगत म्हणून पाय रोवायचा असेल तर किती आर्थिक ,मानसिक व संघर्षाला सामोरा जाणे क्रमप्राप्त आहे हे समजेल.इथे शॉर्टकट नाही हे लक्षात येईल.खोट्या नाण्यांच्या या क्षेत्रात आपले खणखणीत नाणे जाणकारालाच ओळखता येते हेही ध्यानात येईल.


-डॉ.राम पंडित,मुंबई.'पद्मानंद'

४,एटलांता,सेक्टर ४०,सी वुडस-पश्चिम,

नवी मुंबई ४००७०६

मोबा.9819723756

सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे


 कविश्रेष्ठ सुरेश भटांना घराघरात पोहोचविणारे दोन महानुभाव ...

#सुधाकर_कदम आणि #भीमराव_पांचाळे


     अमरावती येथे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला  अमरावतीच्या मोर्शी रोडवरील  श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रारंभ झाला असून दिनांक आठ ला सायंकाळी या अखिल भारतीय एल्गार गझल संमेलनाचा समारोप होणार आहे. समारोप जरी होत असला तरी या अखिल भारतीय एल्गार संमेलनामध्ये सहभागी झालेले गझलकार गीतकार रसिक गायक हा गजलेचा संदेश आपापल्या गावात आपापल्या परिसरात घेऊन जाणार आहेत. 


     आजची परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडिया बराच प्रभावी झालेला आहे. नियतकालिके पण भरपूर निघालेली आहेत आणि ते सर्व प्रकारच्या साहित्याला स्थान देत आहेत. पण सुरेश भटांचा जो काळ होता त्या काळात ही परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया तर नव्हताच .पण आज जसे गजलांचे भरपूर कार्यक्रम होतात .भरपूर संमेलने होतात

 त्या प्रमाणात त्या काळात होत नव्हती. सुरेश भट लिहीत होतेस्वतः सादर करीत होते. पण त्यांच्या गजलांनाना कवितांना गीतांना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे पहिले काम जर कोणी केले असेल तर त्या माणसाचे नाव आहे सुधाकर कदम. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या या माणसाने सुरेश भटांची गझल हृदयापासून गाऊन त्याचे वेगवेगळे कार्यक्रम करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन त्यांना सुप्रसिद्ध लेखक  डॉ नरेंद्र जाधव व सिने दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते गजलगंधर्व हा  सन्मान बहाल करण्यात आला. आज गझल नवाज भीमराव पांचाळे सुरेश भटानंतर हे काम करीत आहेत. श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांचा वारसा पुढे चालविला आहे .एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे सुरेश भट यांनी एक पिढी निर्माण केली त्याचप्रमाणे या दोघांनी पिढी निर्माण करण्याचे काम केले आहे. 

     सुधाकर कदम यांचे आर्णी हे तसे लहान गाव. तालुक्याचे गाव यवतमाळ जिल्ह्यातील गाव. पण या माणसाचे संगीतावर व गायनावर अफाट प्रेम होते .त्या प्रेमाची सुरुवात जरी आर्केस्ट्रा पासून झाली असली तरी त्यांना जेव्हा खरा सूर गवसला तेव्हा कविवर्य सुरेश भटांचा स्पर्श त्यांना झाला व ते भटांचे गजलांचे कवितांचे गीतांचे भक्त झाले. सुधाकररावांचे आणि भट साहेबांचे नाते जवळचे होते. एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. तासंतास सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या .पण संगीताचे आणि गायनाचे विषय रात्र रात्रभर जागून काढत होते आणि त्यामुळे सुधाकरराव कदम यांनी सुरेश भटांच्या ज्या ओळी लोकांसमोर सादर केल्या त्या लोकांनी उचलून धरल्या डोक्यावर घेतल्या .


     सुधाकर कदम यांना सुरेश भट महाराष्ट्राचे मेहदी हसन म्हणायचे. इतकी त्यांच्या शब्दात व स्वरात प्रगल्भता होती. पण ती त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नव्हती .त्यासाठी त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले. भरपूर रियाज करावे लागले. तो रियाज ते परिश्रम त्यांनी आपल्या स्वरामध्ये आणि सुरामध्ये उतरविले. त्यामुळे सुधाकर कदम यांनी सुरेश भटांच्या गीतांना गजलांना कवितांना खऱ्या अर्थाने न्याय दिला.  तसे सुद्धा  सुधाकर कदम हे आर्णीला संगीत विषयाचे अध्यापक होते पत्रकारिताही करीत होते. अभिनयही करीत होते . वाद्य वाजविणे हा तर त्यांचा छंदच होता.एका अर्थाने त्या काळात सुधाकर कदम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी गझल कशी गावी हे शिकावे ते सुधाकर कदम यांच्याकडूनच. सुरेश भट आणि यशवंत देव त्यांना पहिले गझल गायक म्हणून संबोधित होते आणि ते खरेही होते. कारण सुरेश भटांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेले आहे 


साधीसुधी ही माणसे 

माझ्या कवितेची धनी 


     सुधाकर कदम हे साधे सरळ ग्रामीण भागात राहणारे व्यक्तिमत्व होते .त्यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांच्या काव्यावर प्रेम केले आणि ते आपल्या स्वरांच्या आणि सुरांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले .अर्थातच ते लोकांना आवडले. त्याला कारणही तसेच होते .

आजच्यासारखा व्यावसायिक रंग त्या काळात शिरलेला नव्हता. कवी गायक आणि रसिक त्यांचे एक अतूट नाते होते.आज सुधाकर कदम यांनी वयाची सत्याहत्तरी गाठलेली आहे. तरीपण त्याच जोमाने त्याच अंत:करणाने ते सुरेश भटांचे आपल्या शब्दात  सुरातून गुणगान करीत असतात हे त्यांचे मोठेपण आहे. गझल संमेलनाने त्यांचा मानसन्मान केला आहे. आणि ते त्याला पात्रही आहेत. 


भीमराव पांचाळे 


     सुधाकर कदमानंतर सुरेश भटांच्या संपर्कात आले ते भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे यांनी सुरेश भटांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपल्या शब्दांमध्ये आपल्या स्वरांमध्ये आपल्या सुरांमध्ये प्राण ओतले.  अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या लहानशा ग्रामीण भागात राहणारे हे व्यक्तिमत्व. पण आपल्या गझल गायनाने त्यांनी पूर्ण विश्व व्यापले आहे. गझलनवाज या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची गझल पेश करण्याची अदा आगळीवेगळी आहे. ते शब्दाची फेक इतक्या सुंदर रीतीने करतात की ती रसिकांच्या काळजात जाऊन बसते. सुरेश भटानंतर गजलेचा वारसा चालविणारे गायन करून  लोकांसमोर पेश करणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये भीमराव पांचाळे यांचे नाव सर्वपरिचित आहे. ठिकठिकाणी गझल संमेलन घेऊन गजलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी सुरेश भट यांच्या गझल उपक्रमाला खतपाणी घातले आहे. आज ठिकठिकाणी गझल संमेलने कवी संमेलने नवीन नवीन गझलकार लोकांसमोर यावया लागलेले आहेत. काही काही गझलकार तर इतके दमदार आहेत की ते समोरच्या रसिकांवर मोहिनी करून जातात. अशा पिढीला विचारपीठ उपलब्ध करून देणे

 त्यांना मार्गदर्शन करणे .या कामात भीमरावांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे आणि ते महत्त्वाचे आहे. 


     सुरेश भटांनी ज्याप्रमाणे स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांनाही प्रोत्साहन दिले गजलेची बाराखडी तयार केली. ती अनेकांना पाठविली. अनेकांच्या गजला दुरुस्त करून दिल्या .त्यांना प्रोत्साहन दिले. तेच काम आज श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम करीत आहेत. मंगेशकर परिवारातील आशा भोसले लता मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या लोकांनी  सुप्रसिद्ध गायक श्री सुरेश वाडकर यांनी श्री सुरेश भट यांना घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न तर केलाच आहे .पण त्याचबरोबर सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे यांनी केलेले प्रयत्न हे घराघरापर्यंत सुरेश भट यांना प्रत्यक्ष घेऊन गेलेले आहेत. 


     आता बरेच गायक कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या गजलांचे कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे शब्दसुरांच्या  झुल्यावरचे श्री सुरेश शुक्ल  दत्तप्रसाद रानडे गझलरत्न प्रा. राजेश उमाळे आमच्या अमरावतीचे श्री सुरेश दंडे पुण्याचे प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे अशी बरीच मंडळी सुरेश भटांचा कित्ता गिरवीत आहेत. आमच्या अमरावतीकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. कारण की सुरेश भट हे अमरावतीचे होते आणि दि. सात आणि आठ फेब्रुवारीचे हे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनही अमरावतीत होत आहे .त्यानिमित्त आमच्या अमरावतीच्या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्र बाहेरही हे गझलकार हे गीतकार हे  आपापल्या परीने सुरेश भटांना न्याय देत आहेत .हे निश्चितच मैलाचा दगड ठरणारे आहे. या सर्वांना माझा गझल संमेलनानिमित्त मानाचा मुजरा. 


प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 

संचालक 

मिशन आयएएस 

अमरावती 

9890967003


 





संगीत आणि साहित्य :