गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, February 10, 2026

कविश्रेष्ठ सुरेश भटांना घराघरात पोहोचविणारे दोन महानुभाव

 


       सुधाकर कदम आणि  भीमराव पांचाळे


   अमरावती येथे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला  अमरावतीच्या मोर्शी रोडवरील  श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रारंभ झाला असून दिनांक आठ ला सायंकाळी या अखिल भारतीय एल्गार गझल संमेलनाचा समारोप होणार आहे. समारोप जरी होत असला तरी या अखिल भारतीय एल्गार संमेलनामध्ये सहभागी झालेले गझलकार गीतकार रसिक गायक हा गजलेचा संदेश आपापल्या गावात आपापल्या परिसरात घेऊन जाणार आहेत.


     आजची परिस्थिती वेगळी आहे. सोशल मीडिया बराच प्रभावी झालेला आहे. नियतकालिके पण भरपूर निघालेली आहेत आणि ते सर्व प्रकारच्या साहित्याला स्थान देत आहेत. पण सुरेश भटांचा जो काळ होता त्या काळात ही परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया तर नव्हताच .पण आज जसे गजलांचे भरपूर कार्यक्रम होतात .भरपूर संमेलने होतात त्या प्रमाणात त्या काळात होत नव्हती. सुरेश भट लिहीत होते.स्वतः सादर करीत होते. पण त्यांच्या गजलांनाना कवितांना गीतांना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याचे पहिले काम जर कोणी केले असेल तर त्या माणसाचे नाव आहे सुधाकर कदम. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या या माणसाने सुरेश भटांची गझल हृदयापासून गाऊन त्याचे वेगवेगळे कार्यक्रम करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन त्यांना सुप्रसिद्ध लेखक,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ #नरेंद्र_जाधव व सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक #राजदत्त यांच्या हस्ते #गजलगंधर्व हा  सन्मान बहाल करण्यात आला. आज #गझलनवाज भीमराव पांचाळे सुरेश भटानंतर हे काम करीत आहेत. श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांचा वारसा पुढे चालविला आहे .एवढेच नव्हे तर ज्याप्रमाणे सुरेश भट यांनी एक पिढी निर्माण केली त्याचप्रमाणे या दोघांनी पिढी निर्माण करण्याचे काम केले आहे. 


#सुधाकर_कदम यांचे आर्णी हे तसे लहान गाव. 

यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. पण या माणसाचे संगीतावर व गायनावर अफाट प्रेम होते .त्या प्रेमाची सुरुवात जरी आर्केस्ट्रा पासून झाली असली तरी त्यांना जेव्हा खरा सूर गवसला तेव्हा कविवर्य सुरेश भटांचा स्पर्श त्यांना झाला व ते भटांचे गजलांचे कवितांचे गीतांचे भक्त झाले. सुधाकररावांचे आणि भट साहेबांचे नाते जवळचे होते. एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. तासंतास सुखदुःखाच्या गप्पा व्हायच्या .पण संगीताचे आणि गायनाचे विषय रात्र रात्रभर जागून काढत होते आणि त्यामुळे सुधाकरराव कदम यांनी सुरेश भटांच्या ज्या ओळी लोकांसमोर सादर केल्या त्या लोकांनी उचलून धरल्या डोक्यावर घेतल्या .सुधाकर कदम यांना सुरेश भट #महाराष्ट्राचे_मेहदी_हसन म्हणायचे. इतकी त्यांच्या शब्दात व स्वरात प्रगल्भता होती. पण ती त्यांना सहजासहजी प्राप्त झाली नव्हती .त्यासाठी त्यांना भरपूर परिश्रम करावे लागले. भरपूर रियाज करावे लागले. तो रियाज ते परिश्रम त्यांनी आपल्या स्वरामध्ये आणि सुरामध्ये उतरविले. त्यामुळे सुधाकर कदम यांनी सुरेश भटांच्या गीतांना गजलांना कवितांना खऱ्या अर्थाने न्याय दिला. तसे सुद्धा  सुधाकर कदम हे आर्णीला संगीत विषयाचे अध्यापक होते.पत्रकारिताही करीत होते. अभिनयही करीत होते . वाद्य वाजविणे हा तर त्यांचा छंदच होता.एका अर्थाने त्या काळात सुधाकर कदम हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मराठी गझल कशी गावी हे शिकावे ते सुधाकर कदम यांच्याकडूनच. सुरेश भट आणि यशवंत देव त्यांना #पहिले_गझल_गायक म्हणून संबोधित होते आणि ते खरेही होते. कारण सुरेश भटांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेले आहे 


साधीसुधी ही माणसे 

माझ्या कवितेची धनी 


     सुधाकर कदम हे साधे सरळ ग्रामीण भागात राहणारे व्यक्तिमत्व होते .त्यांनी खऱ्या अर्थाने सुरेश भटांच्या काव्यावर प्रेम केले आणि ते आपल्या स्वरांच्या आणि सुरांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले .अर्थातच ते लोकांना आवडले. त्याला कारणही तसेच होते .

आजच्यासारखा व्यावसायिक रंग त्या काळात शिरलेला नव्हता. कवी गायक आणि रसिक त्यांचे एक अतूट नाते होते.आज सुधाकर कदम यांनी वयाची 77 री गाठलेली आहे. तरीपण त्याच जोमाने त्याच अंत:करणाने ते सुरेश भटांचे आपल्या शब्दात  सुरातून गुणगान करीत असतात हे त्यांचे मोठेपण आहे. गझल संमेलनाने त्यांचा मानसन्मान केला आहे. आणि ते त्याला पात्रही आहेत. 


#भीमराव_पांचाळे 


    सुधाकर कदमानंतर सुरेश भटांच्या संपर्कात आले ते भीमराव पांचाळे. भीमराव पांचाळे यांनी सुरेश भटांना सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपल्या शब्दांमध्ये आपल्या स्वरांमध्ये आपल्या सुरांमध्ये प्राण ओतले.  अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या लहानशा ग्रामीण भागात राहणारे हे व्यक्तिमत्व. पण आपल्या गझल गायनाने त्यांनी पूर्ण विश्व व्यापले आहे. गझलनवाज या उपाधीने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची गझल पेश करण्याची अदा आगळीवेगळी आहे. ते शब्दाची फेक इतक्या सुंदर रीतीने करतात की ती रसिकांच्या काळजात जाऊन बसते. सुरेश भटानंतर गजलेचा वारसा चालविणारे गायन करून  लोकांसमोर पेश करणारे जे काही लोक आहेत त्यामध्ये भीमराव पांचाळे यांचे नाव सर्वपरिचित आहे. ठिकठिकाणी गझल संमेलन घेऊन गजलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी सुरेश भट यांच्या गझल उपक्रमाला खतपाणी घातले आहे. आज ठिकठिकाणी गझल संमेलने कवी संमेलने नवीन नवीन गझलकार लोकांसमोर यावया लागलेले आहेत. काही काही गझलकार तर इतके दमदार आहेत की ते समोरच्या रसिकांवर मोहिनी करून जातात. अशा पिढीला विचारपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे .या कामात भीमरावांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे आणि ते महत्त्वाचे आहे. 


     सुरेश भटांनी ज्याप्रमाणे स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांनाही प्रोत्साहन दिले गजलेची बाराखडी तयार केली. ती अनेकांना पाठविली. अनेकांच्या गजला दुरुस्त करून दिल्या .त्यांना प्रोत्साहन दिले. तेच काम आज श्री भीमराव पांचाळे व श्री सुधाकर कदम करीत आहेत. मंगेशकर परिवारातील #आशा_भोसले #लता_मंगेशकर #हृदयनाथ_मंगेशकर या लोकांनी,सुप्रसिद्ध गायक श्री #सुरेश_वाडकर यांनी श्री सुरेश भट यांना घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न तर केलाच आहे .पण त्याचबरोबर सुधाकर कदम आणि भीमराव पांचाळे यांनी केलेले प्रयत्न हे घराघरापर्यंत सुरेश भट यांना प्रत्यक्ष घेऊन गेलेले आहेत. 


     आता बरेच गायक कविश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या गजलांचे कार्यक्रम सादर करीत आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे शब्दसुरांच्या झुल्यावरचे श्री #सुरेश_शुक्ल  #दत्तप्रसाद_रानडे गझलरत्न प्रा.#राजेश_उमाळे आमच्या अमरावतीचे श्री #सुरेश_दंडे पुण्याचे प्रा. डॉ. चंद्रकिरण घाटे अशी बरीच मंडळी सुरेश भटांचा कित्ता गिरवीत आहेत. आमच्या अमरावतीकरांसाठी ही गौरवाची बाब आहे. कारण की सुरेश भट हे अमरावतीचे होते आणि दि. सात आणि आठ फेब्रुवारीचे हे अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनही अमरावतीत होत आहे .त्यानिमित्त आमच्या अमरावतीच्या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि महाराष्ट्र बाहेरही हे गझलकार हे गीतकार हे  आपापल्या परीने सुरेश भटांना न्याय देत आहेत .हे निश्चितच मैलाचा दगड ठरणारे आहे. या सर्वांना माझा गझल संमेलनानिमित्त मानाचा मुजरा. 

-प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे 

संचालक 

मिशन आयएएस 

अमरावती 

9890967003


Tuesday, February 3, 2026

आर्णीच्या मातीचा गंध...वामन तेलंग

     माझे मित्र सुधाकर कदम यांचे नाव प्रामुख्याने संगीतकार म्हणून आणि विशेषत्वाने मराठी गझल गायक म्हणून सर्वविख्यात आहे़. आर्णी-यवतमाळच्या भागात संगीत शिक्षक म्हणूनही ते अनेकांना परिचित आहेत़. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व संगीताच्या दुनियेशी मेळ खाणारे आहे़. म्हणजे असे की भरपूर उंची, गोरापान रंग, नीटस नाक-डोळे आणि डोक्यावरील कुरळ केस असे त्यांचे दर्शन आहे़. त्यावरून सहजपणे कुणालाही वाटून जावे की, हा माणूस नक्कीच गायक-कलावंत असणार! फार कमी लोकांना अशी एकरूपता लाभत असते़. आपण पाहतोच ! निसर्गाने ज्यांच्या कंठामध्ये मधाचे पोवळे ठेवले आहे त्यांना रंग आणि रूप देतांना मात्र त्याने फार कंजूषपणा केलेला आहे़. अर्थात यालाही-अपवाद असतोच़. विशेषतः जे गझल गायक-कलावंत असतात ते तर निश्चितच याला अपवाद दिसून येतील़. सर्वच कसे देखणे, रुबाबदार! सुधाकर कदम हेही त्याच मालिकेतले़. आर्णीसारख्या आडगावात राहूनही त्यांनी गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला़. संगीताच्या प्रसारासाठी संगीताची शाळा काढली़. स्वतःच्या पदराला खार लावून घेत कार्यक्रम केले़. आपले आणि आपल्या वाद्यवृंदाचे वेगळेपण ठसविण्यासाठी गझल या प्रकारातील गीतांची निवड केली़. ती करतानाही त्यांनी अनवट अशी वाट निवडली़. ‘मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला़. हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे़. हिंदी,

     उर्दू-हिंदूस्थानी, मराठी या केवळ भाषा नाहीत़. भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते़. संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यामुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो. गझल च्या संदर्भात ते अधिकच खरे आहे़. कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे़. अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाऴ. अव्वल इंग्रजीच्या काळात केव्हा तरी मराठीने गझलचे वृत्त-लेखन स्वीकारले़. त्या सर्व तपशिलामध्ये जाण्याचे येथे कारण नाही़. सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले़. ही वाट वहिवाट नव्हती़. हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती़. सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला़. कित्येक वर्ष तो या खटाटोपीच्या मागे होता़. पुढे त्याने स्वर-लेखन केले़. त्याचा अर्थ असा की तेथे स्वर हा घटक प्रधान होता़. ‘लेखन’ ही दुय्यम बाब होती़. त्याच्या कार्यक्रमातही ‘गझल’ हा प्रकार प्रधान होता; ‘मराठी’ हा त्याचा पेहराव होता़. कित्येक वर्ष तो या केंद्राभोवती घुटमळत रमला़. अगदी परवा परवा पर्यंत त्यात अंतराय असे आले नव्हते़. मराठीतील कवी आणि त्यांच्या रचना यांचेशी त्याची सलगी होती खरी, पण त्यामागचा हेतू ‘गझल रचना मिळणे’ हा होता़. कदाचित्‌ त्या जोशाजोशात त्याने कविता-लेखनही करून पाहिले असेल, पण तेही पुन्हा गाण्यासाठीच होते़. असे असताना, माझ्या समजुती प्रमाणे, तो अचानक स्फुट लेखनाकडे वळला़. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकामधून त्याच्या संपादकीय पृष्ठावर ‘विषयांतर’ हा स्तंभ येत होता आणि त्यातील हलक्या-फुलक्या लिखाणामुळे तो स्तंभ वाचकांच्या व लेखनाची सुरसुरी असणार्‍यांच्या आवडीचा स्तंभ झाला होता़. सुधाकरने अलगद त्या स्तंभावर झेप घेतली आणि गायनीकळा लाभलेला सुधाकर कदम लेखन-कलेने बाधित झाला!

        सुधाकर कदम यांच्या गायक असण्याचा, तो शिक्षक असण्याचा, वाद्यवृंद संघटक असण्याचा वर मी थोड्या अधिक तपशिलाने उल्लेख केला आहे़. त्याला तसेच कारण आहे़. आयुष्याची मोलाची बरीच वर्षे या क्षेत्रामध्ये झिजतांना माणसांचे जे चित्रविचित्र नमुने आणि अनुभव त्याच्या गाठी जमा झाले होते; त्या अनुभवांना त्याच्या ‘विषयांतर’ मधील स्फुट-लिखाणाने एक चांगला पाट मिळाला आहे़. संगीताची जाण ठेवणार्‍यांना आणि विशेषतः गीत-गायकांना कवितेची-काव्याची व बर्‍या-वाईट साहित्याची ओळख असायलाच हवी असते़. सुधाकरच्या ठिकाणी ती ओळख पिण्डतःच होती़. त्याच्या या पुस्तकात संग्रहित झालेल्या स्फुट-लेखांवरुन वाचकांना त्याची सहजच कल्पना येईल़. उदाहरणावरून यातील शीर्षकाचा स्फुटलेख पहा़. त्याची सुरवातच श्री़. म़. माटे आणि त्यांच्या‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ या पाठाच्या उल्लेखाने होते़. जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर ‘माटे मास्तरांचा हा धडा’ अनेकांनी अभ्यासिला असेल़.परंतु नेमक्या ठिकाणी त्याचा संदर्भ देण्याचे कसब त्यातल्या फारच थोड्यांना साधले असेल़. मुळात साहित्य व त्याची आवड असेल तरच पाठ्यक्रमातून जाणारे असे संदर्भ संबंधिताला आठवतील, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे़. स्फुटासाठी सुधाकरच्या कामी हा संदर्भ जसा हुकुमासारखा येतो त्याचप्रमाणे गायकी कलेतील प्रत्यक्षातला अनुभवही कामाला येतो़. हे अनुभव इतर सामान्य अनुभवापेक्षा वेगळे असतात, आणि लेखकाच्या हातोटीमुळे ते पैलूदार बनतात़. त्याचाही प्रत्यय या संग्रहात वाचकांना ठिकठिकाणी आल्याखेरीज राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो़.

       सुधाकर कदमचे हे लिखाण अर्थातच स्फुट स्वरूपाचे आणि विरंगुळ्यासाठी केलेले लिखाण आहे़. अशा लिखाणाची खुमारी त्याच्या मांडणीत, आणि लेखकाचे ठायी असणार्‍या निरीक्षणाच्या ताकदीत सामावलेली असते़. तसे त्यातले अनुभव, त्यातले प्रसंग, प्रसंगविशेषी दिसून येणार्‍या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार आपल्या नित्याच्या अवलोकनाचाही असतो़. परंतु त्याकडे आपले लक्ष जातेच असे नाही़. लेखक आणि वाचक यांच्यात हीच एक रेषा असते़. वाचक जेव्हा ही रेषा ओलांडतो तेव्हा तोही लेखक होऊ शकतो़. ज्यांना ती रेषा पार करता येत नाही त्यांना या प्रकारच्या लेखनामुळे एकप्रकारचा विविध पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो़.

    सुधाकर कदमच्या या पुस्तकातून त्याच्या वाचकांना असा आनंद मिळेलच याविषयी मला मुळीही शंका नाही़. अशी शंका नसणे हे लेखक म्हणून सुधाकरचे यश होय.


-वामन तेलंग

संपादक

दै.तरुण भारत,नागपूर

कार्तिक एकादशी/१९८९

----------------------------

फडे मधुर खावया ची प्रस्तावना....


  

प्रथनावृत्ती १९८९
                                      द्वितीयावृत्ती २०२४

 

Monday, February 2, 2026

दुःखाशी नाते जडता जडता जडते..

     गझल या काव्य प्रकारामध्ये सर्वच विषय हाताळले जातात. परंतु गायकीच्या संदर्भात विचार केला तर प्रेम, दुःख, शृंगार, विरह वगैरे विषय असलेल्या गझला बहुतकरून गायिल्या गेल्यात व गायिल्या जात आहे.एवढेच नव्हे तर लोकप्रिय पण झालेल्या दिसतात .हे मराठी गझलच्या बाबतीतच नाही तर (एखादा अपवाद वगळता) उर्दू व इतर भाषिक गझलांमध्येही बघायला मिळते.

      आज आपल्या समोर मुंबईचे गझलकार मनोहर रणपिसे यांची गझल सादर करीत आहे.आज ते आपल्यात नाहीत.पण ही गझल त्यांच्या हयातीतच स्वरबद्ध झाली होती.दुर्दैवाने ते असताना हे काम मी करू शकलो नाही याची खंत आहे.#सरगम_तुझ्याचसाठी​ या कार्यक्रमातून माझ्या मुली भैरवी व रेणू सादर करायच्या.

ही माझी खूप आवडती स्वररचना आहे.कारण ती शब्दांनी आणलेली आहे.शांत,संयत अशी ही गझल मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे या दोघांनी युगल स्वरात तेवढ्यात संयत रीतीने भावपूर्ण गायिली आहे.


दुःखाशी नाते जडता जडता जडते

हे मैत्र अनोखे घडता घडता घडते


घुटमळत राहते फांदीवर स्वप्नांच्या

पाखरू प्रीतीचे उडता उडता उडते


डोळ्यात आसवे सहज कधी का येती

भरतीचे पाणी भरता भरता भरते


प्रेमात मनाच्या सुरेल जुळती तारा

हृदयास हृदय मग जुळता जुळता जुळते


संगीत संयोजन - मिलिंद गुणे #milindgune​ 

ध्वनिमुद्रण व मिक्सिंग - पंचम स्टुडिओ,पुणे

मास्टरिंग - अजय अत्रे,पंचम.#ajayatre​

तालवाद्ये - अपूर्व द्रविड #apurvdravid​

व्हायोलिन - रुचिर इंगळे #ruchiringale​

गिटार - राधिका अंतुरकर #radhikaanturkar​

#mayurmahajan​ #prajaktasavarkarshinde​

#sudhakarkadamscomposition​ #गझलगंधर्व​ #composition​ #marathi​ #music​ #संगीतकार​ #गझल​ #song​ #गीत​ #गीतकार​ #गझलकार

Saturday, January 31, 2026

 .                       जगत मी आलो असा

                             (लेखांक १५)

             'नग़्म-ए-साग़र' आणि 'सरगम तुझ्याचसाठी' 


     पुण्याला स्थायिक झाल्यावर २००३ मध्ये #समीर_चव्हाणशी ओळख झाली.(पुढे तो माझा जावई झाला.) त्याने पुण्यातील प्रसिद्ध उर्दू शायर #हनीफ़_साग़र यांच्या गझलांचा संग्रह वाचायला दिला.गझला इतक्या उत्कृष्ट व मनभावन होत्या की वाचता वाचता सुरावटी येत गेल्या.१०/१२ गझला स्वरबद्ध झाल्यावर समीरने हनीफ़ साग़रांचे शागिर्द #हमीदभाई यांना ऐकण्यास निमंत्रित केले.त्यांना हा उपक्रम खूप आवडला.कारण अशा प्रकारे त्यांच्या गझला कोणी स्वरबद्ध केल्या नव्हत्या. लगेच त्यांनी पुण्यातील गझल प्रेमींना ह्या उपक्रमाची माहिती दिली.त्याची परिणीती साग़र साहेबांच्या बरसी निमित्त एक मोठा कार्यक्रम करण्याचे ठरण्यात झाली. आणि बालगंधर्वमध्ये याचे आयोजन करण्यात आले.#बालगंधर्व बुक झाल्यावर आमची रोज प्रॅक्टिस असायची.मुलगा #निषाद,मुली #भैरवी आणि #रेणू तिघेही पुण्यात शिकत होते. म्हणजे त्यांची विद्यार्थी दशाच होती.आणि हा त्यांच्या आयुष्यातील पहिलाच मोठा आणि तो ही उर्दू गझलांचा कार्यक्रम होता.या अगोदर '#सरगम_तुझ्याचसाठी' या शिर्षकांतर्गत मी स्वरबद्ध केलेल्या विविध कवींच्या गीत-गझलांचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते.पण ह्या कार्यक्रमाचे महत्व त्यांच्या दृष्टीने मोठे होते.

     असेच एक दिवस प्रॅक्टिस संपल्यावर माझ्या पुतणीने (ती महाविद्यालयीन शिक्षणासाठी माझ्याकडे रहात होती) 'मोठे बाबा, तुम्हाला चाली कशा सुचतात'? असा प्रश्न केला.खरे तर मी सतत वाचत राहतो आणि वाचता वाचता सुरावटी येतात.पण तिला हे सगळे सांगण्यापेक्षा हाताशीच असलेला मित्रवर्य.#अनिल_कांबळे याच्या कविता संग्रह उघडला व त्यातील समोर आलेली कविता गंमत म्हणून ताबडतोब म्हणून दाखवली.तिचे समाधान झाले.पण आलेल्या सुरावटीने मात्र माझी झोप उडविली.गमती गमतीत थोडा अरेबियन टच असलेली सुरावट आली होती.त्यावर बरेच संस्कार करून अनिलनेच त्याच्या 'युनिव्हर्सल पोएट्री फाउंडेशन' संस्थेतर्फे एस.एम.जोशी सभागृहात (२८ मे २००३) आयोजित केलेल्या 'सरगम तुझ्याचसाठी' या कार्यक्रमात सादर केली.या कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन प्रसिद्ध कवी मित्रवर्य #नारायण_कुलळकर्णी_कवठेकर यांनी केले होते.प्रास्ताविक कवयित्री #ज्योत्स्ना_चांदगुडे व मनोगत तथा पाहुण्यांचे स्वागत अनिलने  केले.तसेच श्रोत्यांमध्ये प्रसिद्ध हार्मोनियम वादक

#आप्पा_जळगावकर,पं भीमसेन जोशींचे शिष्य  किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक #श्रीकांत_देशपांडे, डॉ.#विकास_कशाळकर वगैरे दिग्गज मंडळी होती.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार पुरवणी.

दि.१/२/२०२६



Friday, January 30, 2026

आग जो दिल में लगी है... पद्मा वाडकर

 



Dear friends,

Put your headphones/earphones on right nowwww for this wonderful urdu ghazal.Composed by me ...

Singer - Padma  Wadkar.

Shayar - Hanif Saghar

Music Arranger - milind gune..

Tabla - pandurang pawar.

Sarangi - Sandeep Mishra

Sarod - abhishek borkar 

Voice Dubbing - Ajiwasan studio, mumbai .

Recording - pancham studio, pune.

Mastering - Ajay Atre


आग जो दिल में लगी है,तो लगी रहने दो

ख़ुश्क होटों पे, मगर अपने हंसी रहने दो


तुमको ठुकरायेगी दुनिया तो सहारा होगा

बस्तियाँ ख़्वाबों की,आंखों में बसी रहने दो


पहली दस्तक है, न खोलो अभी दरवाज़े को

बेवफ़ा दुनिया को कुछ देर खडी रहने दो


मैं इसी तरह रहुंगा लबे दरिया प्यासा

तुम इसी तरह निगाहों को खुली रहने दो


कल ज़माने को उजालों की ज़रुरत होगी

दिल में चिंगारी मुहब्बत की दबी रहने दो

Thursday, January 22, 2026

'कंपोझिशन्स'...२०२५/२६ की।


 रसिकहो,

मागील वर्षीची राहिलेली सर्व कामे या वर्षीच्या जानेवारीत पूर्ण होऊन नवीन कामाला फेब्रुवारीमध्ये सुरवात करीत आहे.

जानेवारीमध्ये पूर्ण झालेली कामे...

१.उर्दूचे प्रसिद्ध शायर हनीफ़ साग़र यांच्या चार गझला:-

गायक-सुरेश वाडकर,पद्मा वाडकर,अनन्या वाडकर आणि रेणू चव्हाण.

२.दोन मराठी गझला:-गझलकार मनोहर रणपिसे,समीर चव्हाण.गायक-सुरेश वाडकर,मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

३.दोन मराठी गीते:-कवी-डॉ रामदास चवरे,सुधाकर कदम.गायक-सुरेश वाडकर आणि मयूर महाजन.


●वरील सर्व रचना मास्टरिंग झाल्यानंतर युट्युबला आपण ऐकू शकाल.

-----------------------------------------------------------------------

२०२६ मध्ये करावयाची कामे...

१.दोन उर्दू गझला:-शायर-सहदेव रामटेके.

गायिका-प्राजक्ता सावरकर शिंदे आणि अनन्या वाडकर.

२. तीन मराठी गझला:-गझलकारा-विजयलक्षमी वानखेडे.गायक-सुरेश वाडकर.

३. तीन मराठी गीते:-कवी-राज यावलीकर, डॉ रामदास चवरे,सुधाकर कदम.गायिका-वैशाली सामंत, प्राजक्ता सावरकर शिंदे आणि अभेद शौनक अभिषेकी.

आग जो दिल में लगी है....


हनीफ़ साग़र साहब की एक ग़ज़ल #पद्मा_सुरेश_वाडकर की आवाज़ में जल्द ही आपकी ख़िदमत में...

                कल ज़माने को उजालों की ज़रुरत होंगी

                दिल में चिंगारी मुहब्बत की दबी रहने दो





संगीत आणि साहित्य :