गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, May 8, 2026

सामना

      लोकसभेचा सामना जाहीर झाल्याबरोबर  भारतातील समस्त राजकीय संघ धूळ झटकून कंबर कसून मैदानात उतरले आहे. हा सामना जरा लवकर व्हावा अशी काही संघांची इच्छा होती. तर जुन्या विजेत्या संघाला तयारी व 'साफसफाईकरिता' वेळ मिळावा म्हणून हा सामना उशीरा व्हावा असे वाटत होते. आपाल्या कप्तानपदाला शह देणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर पाठवून नवीन खेळाडूंना वाव देवून आपले कप्तानपद कायम ठेवण्याकरिता हा वेळ मिळणे आवश्यक होते. यात ते काही अंशी सफलही झाले.

     या सामन्यात अखिल भारतीय स्तरावरील सर्व संघ खेळणार असले तरी त्यातील दोनच संघ अत्यंत बलाढ्य  असल्यामुळे विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार यावर प्रेक्षकांमध्ये करोडो रूपयांचा सट्टा लावणे सुरू झाले आहे. (खेळावर लावलेला सट्टा, जुगार या संज्ञेत मोडत नसल्यामुळे यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करायला हाकत नाही. "जमी तो जमी, नहीं तो मोहंमद शमी !") या सामन्याचे वैशिष्ठ्य म्हणजे संघाचा विजय हा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. ज्या संघावर प्रेक्षक खूष तो संघ जिंकणार. पण प्रेक्षक मात्र कोणावर खूष आहे या बाबतीत ताकास सूर लागू देत नाही.

     या सामन्यातील प्रत्येक संघ आपला संघ कसा चांगला आहे याचे तुणतुणे सतत वाजवून आम्ही जिंकलो तर काय काय करणार याचे (फुटके) ढोल बडवत असतात. पण आजकाल प्रेक्षकही या दोन्ही आवाजाला सरसावल्यामुळे मुळीच दाद देत नसल्याचे दिसून येते. था देशव्यापी सामन्याला अमाप खर्च येतो. खेळ जरी राजकीय संघ खेळणार असले व विजयी संघ जरी पाच वर्षे मलिदा खाणार असला, तरी हा खर्च मात्र प्रेक्षकांच्या पैशातून होणार असतो. ही परंपरा फार प्राचीन असल्यामुळे यात बदल घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. तरीपण कोणे एके काळी शेषन नामक मुख्य पंचाने सामन्याच्या सुरवातीला होणाऱ्या धुळवडीच्या मैदानी आतिषबाजीवर बंदी घातत्यामुळे कोट्यावधी रूपये वाचले होते असे म्हणतात. पण त्यामुळे सर्व संघांना झीम्मा, फुगडी या बायंकी खेळावर समाधान मानून दुधाची तहान ताकावर भागशवी लागली होती अशी वदंता आहे. यावेळी मात्र एका स्त्री खेळाडूला तिच्याच संघातल्या लोकांनी फुगडी घालायला मनाई केल्यामुळे तिने खो-खो खेळायला सुरवात केली आहे.

     स्त्री व पुरुष खेळाडूंनी एकत्र खेळण्याचा हा एकमेव खेळ असल्यामुळे समानतेचे युग आल्याची सर्वांना खात्री पटते. प्रेक्षक वर्गही सामन्याच्या दिवशीपर्यंत चेअरींग' देवून खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असतात. या खेळात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा अगोदरच्या खेळात अधिक मजा येत असल्यामुळे प्रेक्षक व खेळाडू आपले एकमेकावर किती प्रेम् आहे हे दाखविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतांना दिसून येतात. खेळ सांघिक जरी असला तरी प्रत्येक खेळाडूला एक एक मैदान वाटून देवून त्याला एकटे सोडण्यात येते. या मैदानात प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू उत्तरलेला असतो. प्रत्येक  संघातील खेळाडूंना विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर होळीच्या बोंबांप्रमाणे बो बो बोंबा मारायचे प्रशिक्षण खास ढंगात दिल्या जात असल्यामुळे 'रसिक' प्रेक्षकांना  'शिमग्याची' मजा लुटायला मिळते,

     ते काहीही असले तरी यावेळी  प्रेक्षकांना मात्र ते आपल्या खऱ्या-खुऱ्या मायबापापेक्षाही जास्ती मान देवून, सामना जिंकून देण्याची विनंती करीत असतात. या सामन्यातील खेळाडू आपआपल्या संघाच्या रंगसंगतीचे कपडे वापरत असल्यामुळे लात, निळा, भगवा, तिरंगी, लात-हिरवा,पिवळा अशा विविध रंगाचे मिश्रण पाहण्याचा अभूतपूर्व योग समस्त भारतवासीयांना दर निवडणुकीत बघायला मिळतो.यातील काही खेळाडू सरावासाठी आलेला निधी हडपून बसतात. त्यामुळे संघांतर्गत दुफळी सुरू होते.पण वरची फळी जर मजबूत असली तर या दुफळीचा फारसा परिणाम होत नाही.

      सध्या एकमेकांच्या संघातील खेळाडू चोरून सामना रंगविण्याचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे.परंतू या प्रकारामुळे देशातील समस्त संघ मेटाकुटीला आले असून मूळ खेळाडू नाराज होऊन लाल-हिरवे होऊन 'आवजी-जावजी हाय हाय'चे नारे लावताना दिसत आहे.या 'आवजी-जावजी' प्रकारामुळे शीतयुद्ध सुरू झाले आहे.तसेच संस्थांतर्गत रंगयुद्धही सुरू झाले असून 'आवजी-जावजी'वाल्या खेळाडूंना परत पाठविण्याची तयारी समस्त भारतवासी प्रेक्षक करीत असल्याचे दिसत आहे.पण हे काही बरोबर नाही.याला 'स्पोर्ट्समन स्पिरिट' म्हणत नाही.खेळाडू तो खेळाडू, मग तो कोणत्या का संघाचा असेना त्याला 'चेअरींग' दिलेच पाहिजे.

*** *** आगे बढो हम तुम्हारे साथ हय....

भारत माता की जय!!! जय हिंद!!!हिंदुस्थान जिंदाबाद!!!

स्वर शब्दोत्सव...१६ रचना.

      

● खालील सर्व रचना आपण या लिंकवर ऐकू शकता...

https://youtu.be/atBscdyrFV0?si=W1-Opeg4z__GKBSU


१. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले...सुरेश          

    वाडकर

२. काय होते या मनाला सांजवेळी...राधिका             

   -ताम्हणकर

३. ययाती...मयूर महाजन

४. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले...

    प्राजक्ता सावरकर शिंदे

५. जीवन सांभाळतो मी तू दिलेल्या                     

    प्राक्तनाला... मयूर महाजन

६. विसरून वेदनांना मज गायचेच आहे...

    प्राजक्ता सावरकर शिंदे

७. हा भाव भावनांचा चालूय खेळ सारा...

    मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे

८. वेदनेचा सूर देऊन काळजाला...मयूर   

     महाजन

९.  भाव भावनांचा चालूय खेळ सारा...

      प्राजक्ता सावरकर शिंदे

१०.इंद्रियात म्हाता सारी इंद्रायणी...मयूर                  

     महाजन

११. कशी वेदना विसरायाची सांग मला तू...

      मयूर महाजन

१२.जीवनाची एकतारी...मयूर महाजन

१३.आर्त गाण्यातून फुलता एक नात्याची             

     कहाणी...प्राजक्ता सावरकर शिंदे

१४.काकडारतीच्या वेळी मन होतसे          

     चकोर...मयूर महाजन

१५.रे मना! तुज काय झाले सांग ना! मयूर      

      महाजन

१६.हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे...              

      मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिदे

Saturday, May 2, 2026

जगत मी आलो असा (लेखांक २७)

                               गझलकट्टा

       मराठी गझल गायकीच्या सुरवतीच्या काळात सुरेश भट आणि मी महाराष्ट्रात दौरे करत असताना अधून मधून सुरेश भटांची सासुरवाडी असलेल्या सदाशिव पेठेतील पुण्याच्या पंतांच्या गोटातील चिरेबंदी वाड्यात नवोदित गझलकरांच्या मैफली जमायचा.पुण्यातील आजचे नावाजलेले बहुतेक गझलकार त्यावेळी नवोदित होते.आणि गाणारा मात्र एकमेव मी.त्यामुळे माझ्याशी सगळ्यांचीच घसीट असायची.त्यावेळी मी रमण रणदिवे,इलाही जमादार,अनिल कांबळे, प्रदीप निफाडकर,संगीता जोशी,म.भा. चव्हाण वगैरेंच्या गझला स्वरबद्ध केल्या होत्या.कार्यक्रमात पण गात होतो.तो काळच काही वेगळा होता.सर्वजण मराठी गझलने पछाडलेले होते.माझा मुक्काम जरी सुरेश भटांच्या सासुरवाडीला असायचा तरी नाश्ता, जेवण मला बाहेर करावे लागायचे.भटांना बाहेर जेवायची हुक्की आली तर त्यांच्या सोबत एखादवेळी मी सोबत असायचो.त्यामुळे नवोदित गझकारांनी दिलेले निमंत्रण मी अगत्याने स्वीकारायचो.या काळात अनिल,प्रदीपच्या घरचा पाहुणचार मी चाखला आहे.

     माझ्या म.सा.प.च्या कार्यक्रम अगोदर ९ जून १९८२ ला 'गझल संध्या' या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील पहिला मराठी गझल मुशायरा म.सा. प.ने घडवून आणला होता. अडीच तास चाललेल्या या मुशायऱ्यात तेव्हाचे नवोदित राजेंद्र शहा,ज्योती बालिगा,प्रदीप निफाडकर,सतीश इनामदार,इलाही जमादार,अनिल कांबळे,रमण रणदिवे हे सहभागी झाले होते. समारोप  सुरेश भटांच्या गझलांनी झाला होता. या मुशायऱ्याचे खुमासदार सूत्र संचालन मराठी आणि उर्दू शेरोशायरी पेरत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले होते.

     १५ जुलै १९८२ चा पुण्याच्या महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेला "अशी गावी मराठी गझल" हा मराठी गझल गायनाचा संपूर्ण तीन तासाचा महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक कार्यक्रम मी पैसे संपत आल्यामुळे अलका टॉकीजसमोरील हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्यावर केला.रात्रीचे जेवण त्यावेळचे सहाय्यक पोलीस कमिशनर श्री उत्तरवर यांचेकडे घेतल्याचे आठवते.

मुशायरा व गझल गायन या दोन्ही कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी जबरदस्त दाद दिली होती.माझ्या कार्यक्रमा नंतर जवळ जवळ तीन ते चार मिनिट टाळ्यांचा कडकडाट होत होता.ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट व कार्यक्रम अवडल्याची पावती होती.

     या काळापर्यंत वरील सगळे गझलकार एक असल्याप्रमाणे वागायचे.पण जस-जसे नाव होत गेले तस-तसे सर्वजण आपापले वेगळेपण जोपासायला लागले.२००३ मध्ये पुण्याला स्थायिक झालो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. म्हणून सगळयांना एकत्र आणण्यासाठी मी "गझलकट्टा"  सुरू केला.काही जण सहभागी झाले.काहींना यात फारसे गम्य दिसले नाही.

नवोदित मात्र यात रस घेत होते. समीर चव्हाण आणि निषाद कदम आयोजनांसाठी कष्ट घ्यायचे.मुली भैरवी आणि रेणू त्यांना सहकार्य करायच्या.समीर नोकरी निमित्त पुणे सोडून गेल्यावर सर्व (आर्थिक आणि शारीरिक) भार निषादवर येऊन पडला. समीर पुणे सोडून गेल्यानंतर काही महिने आमचा कट्टा चालला.आर्थिक आणि शारीरिक भाराच्या बाबतीत एकपात्री व्हायला लागल्यावर निषादने अंग काढून घेतले.या गझलकट्ट्याचा एक फायदा झाला तो असा की, अनेक नवोदित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध झाल्या.

     गझलकट्ट्याचा नियमच असा होता की,दर महिन्याला गझलकाराने नवीन गझल सादर करायची. व मी काही गझला स्वरबद्ध करून(भैरवी,रेणू,व्हायोलिनिस्ट जांभेकरांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून) सादर  करायच्या.रेणू,भैरवी लग्नानंतर कानपूर,दिल्ली निघून गेल्या.माझ्या स्वररचना गाऊन घ्यायला कोणीच नसल्यामुळे शेवटी गझलकट्टा बंद झाला.

     तर सांगायचा मुद्दा हा की, पंतांच्या गोटातील वाड्यात जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा सुरेश भटांच्या गझलांसह महाराष्ट्रातील इतरही नवोदित गझलकरांच्या अनेक गझला स्वरबद्ध केल्या होत्या.

-----------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती.रविवार पुरवणी.३/५/२०२६

 

उन्ह पावसाचा खेळ....


     "सुवर्णाची आभा" या सुरेश वाडकर यांनी गायिलेल्या प्रेमगीतानंतर डॉ.रामदास चवरे यांचे दुसरे गीत 'उन्ह पावसाचा खेळ' आपल्या सेवेत सादर करीत आहे.गायिका आहे प्राजक्ता सावरकर शिंदे.प्राजक्ता म्हणजे 'प्राजक्तच' आहे.सुरांद्वारे सुगंध पसरविणारी.या गीतातील 'पक्षी भरारले दूर' ही ओळ मी सरळ सरळ सांगितली होती.पण तिने 'दूर'  हा शब्द 'दुsssssssर' असा गाऊन  'पक्षी दूरवर गेल्याचे दाखविले' ही तिची कल्पना होती.गीत ऐकल्यावर मी काय म्हणतो ते आपणास कळेल.खरे म्हणजे एखादी कलाकृती जेव्हा जन्माला येते.तेव्हा कवी,गायक/गायिका,संगीतकार,
संगीत संयोजक,ध्वनिमुद्रक,ध्वनिमेळ मिळविणारा (sound  Engineer) VDO creator या सगळ्यांचा मोलाचा वाटा असतो.या सगळ्यांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख करणे माझे कर्तव्य ठरते.असो! आपण हे गीत ऐकावे,
आवडल्यास प्रतिक्रिया नक्की द्याव्या.प्रतिक्रिया म्हणजे मी एक प्रकारचा आशीर्वाद समजतो. त्याने माझी ऊर्जा वाढून अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते.
       गीताच्या मागणीनुसार संगीत संयोजन करण्यात हातखंडा असलेले मिलिंद गुणे यांनी नेहमीप्रमाणे गीत सजविले आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ.न कंटाळता माझ्या सूचनेप्रमाणे अनेक बदल करत मिक्सिंग,
मास्टरिंग करून देणारा 'मास्टर' आहे अजय अत्रे.
अप्रतिम असा व्हिडीओ मुंबईचे श्री विवेक काजरेकर यांनी तयार केला.या सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.

Thursday, April 30, 2026

महाराष्ट्रदिन,कामगारदिन आणि बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमन 🌹💞🌹

        #महाराष्ट_मायभू_अमुची_मराठी_भाषिकांची 

     आर्णी (जि.यवतमाळ) येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना १९८६ मध्ये शिक्षक कलाकार,विद्यार्थी/विद्यार्थिनी यांना घेऊन इयत्ता १ ते १० च्या पाठ्यपुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून तीन भागांमध्ये #झुला नामक कॅसेट तयार केल्या होत्या.त्यात अण्णा भाऊ साठे यांचा जोशपूर्ण असा खालील #पोवाडा पण होता.आज महाराष्ट्रदिना निमित्त आपणा समोर सादर करीत आहे.या कॅसेटमधील बहुतेक कवितांच्या स्वरलिपीचे #सरगम नामक पुस्तक पण प्रकाशित केले होते.या कवितांचे ध्वनिमुद्रण आर्णीलाच आहुजाच्या डेकवर केले होते. त्यामुळे स्टुडिओतील ध्वनिमुद्रणाइतकी सफाई दिसणार नाही.पण जोश मात्र नक्कीच जाणवेल...

गायक - मामा मरगडे,शिक्षक.आर्णी.

संगीत - अर्थातच माझे

सहकलाकार - खंदारे गुरुजी,पुसद.(ढोलकी),  करपे गुरुजी,आर्णी.(हार्मोनियम,कोरस),गजानन घोडेराव गुरुजी,अविनाश गिरी (कोरस).

Wednesday, April 29, 2026

चार श्वासांचा पसारा...वैशाली सामंत


    सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत प्रथमच माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली गात आहे.त्यांचे 'दाजीबा' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.त्या गाण्याचा व माझ्या संगीत दिग्दर्शनाचा एकूणच बाज वेगळा आहे.त्यामुळे राज यावलीकरांचे हे गीत कसे होईल याची काळजी लागली होती.पण वैशाली चौफेर गाणारी आहे हे मला ध्वनिमुद्रण प्रसंगी लक्षात आले.प्रथम तर दोनेक महिने अगोदर सुरावट लक्षात घेवून पूर्णपणे आत्मसात केली.आणि अत्यंत भावपूर्ण,सुरेल गायिली.ध्वनिमुद्रणाचे वेळी काही नविन जागा गळ्यातून निघाव्या म्हणून अक्षरशः घोकंपट्टी केली.जमिनीवर पाय असणारे कलाकार असेच असतात.संगीतकाराचे समाधान होईपर्यंत गात राहतात.

धन्यवाद वैशाली! लवकरच दुसरे गाणे पण आपणास ऐकायला मिळेल.

       उत्कृष्ट संगीत संयोजन नेहमीप्रमाणे मिलिंद गुणेंचे असून मास्टरिंग अजय अत्रेचे आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ,पुणे.व्हाईस डबिंग आजिवासन स्टुडिओ,मुंबई.

तबला- अपूर्व द्रविड, व्हायोलिन - रुचिर इंगळे

व्हिडीओ-विवेक काजरेकर,मुंबई.


●पूर्ण गीत ऐकण्यासाठी युट्युब लिंक...

https://youtu.be/DcWW721jZZs?si=DlwA44uyepjsNZM0





संगीत आणि साहित्य :