गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, August 16, 2026

'खुसखुशीत' कं-दर्प

      सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे. 

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार
समजल्या जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.
      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.
     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.
     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 
कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.
       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.
     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

दै.विदर्भ मतदार, अमरावती.१५ ऑगस्ट २०२६


विनम्र अभिवादन!...


    आज १७ ऑगस्ट, पंडित जसराज यांचा स्मृतिदिन  !   

           पंडितजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

                               🌹🙏🌹

     स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदी’ या अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ‘ईश्वरानुभूती’ देणारे तपस्वी गायक, तसंच देश-विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीतसंपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे ‘गानगुरू’ म्हणजे पंडित जसराज. 

     पंडित जसराज हे ७० वर्षांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. पं.जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं. मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना दे’ ऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते स्वत: तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोरमध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून ‘तुम तो सुन्नी शागीर्द हो’ अशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे. 

     पंडित जसराज म्हणत असत की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे.  माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे ते, जय हो. पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी ‘गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्स’ ही ही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील होते. पंडित जसराज यांचं काम ऐवढं मोठं आहे की आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघानं (आयएयू) ११ नोव्हेंबर २००६ रोजी सापडलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज यांच्या सन्मानार्थ “पंडितजसराज” असं नाव दिलं, असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार होते. साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानायचे. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल की जसराज हे व्ही. शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही. शांताराम यांची कन्या. 

     भारत सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले होते. केवळ भारतच नव्हे तर इतर देशांमध्येही त्यांचे चाहते होते. पं. संजीव अभ्यंकर, कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत.झाले.त्याचप्रमाणे अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांचे शिष्य आहेत. आपल्या कुटुंबासह अमेरिकेत मुक्कामी असताना १७ ऑगस्ट २०२० रोजी यांचे अमेरिकेत निधन झाले.

Monday, August 10, 2026

हिरवे हिरवे गर्द चिमुकले दाट धुक्याने हळु पांघरले...

हिरवे हिरवे गर्द चिमुकले,दाट धुक्याने हळु पांघरले

बेट नव्हे हते नंदनवन जणु निळ्या जांभळ्या जळात वसले


त्या बेटाचा समुद्र गहिरा,लाटांमधुनी खेळे वारा

हलती होड्या डुलती नौका सोडुनी थोडा दूर किनारा


तिथली झाडे अन् फुलवेली,रंग सृष्टीचे मोहक ल्याली

क्षणात हसती क्षणी कुजबुजती जाणुन पक्षांची मधुबोली


मेघ चुंबितो त्याचे शिखर,सुंदर तिथला अवघा डोंगर

पायथ्याशी त्या घरे चिमुकली,पलीकडे ते पवित्र मंदिर


गायिका-नेहा दाऊदखाने (नेहा सिन्हा)

गीत-मीरा सिरसमकर

संगीत-सुधाकर कदम

ध्वनिमुद्रण - एल्कॉम स्टुडिओ,पुणे


       हे एक निसर्ग गीत असून याची बंदिश #वृंदावनी_सारंग या रागात आहे.याचे आरोहावरोह असे...सा रे म प नि सां,सां नि प म रे सा.असे आहेत.अवरोहात नि हा स्वर कोमल आहे.दुपारी गायिला जाणारा हा एक गोड राग आहे. आणि याचाच भाऊ  मधमाद सारंग या रागात अनेक चित्रपट गीते,भावगीते,भक्तिगीते आणि गझल आहेत.

          ’जादुगर सैयाँ,छोड मोरी बैयाँ’ हे ’नागिन’ (१९५४) या चित्रपटातील  हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लताबाईंनी गायिलेलं त्या काळात अतिशय गाजलेलं गाणं वृंदावनी सारंग या रागातच आहे.’रानी रुपमती’ (१९५९) या चित्रपटातील एस.एन.त्रिपाठी यांनी संगीतबद्ध केलेले भरत व्यास यांचे ’आ लौटके आजा मेरे मीत...’ हे गीत मधमाद सारंग या रागात आहे.याच चित्रपटातील रफी-लता यांनी गायिलेले ’झननन झन झननन झन बाजे पायलिया...’ हे अती सुंदर गीत वृंदावनी सारंग रागात आहे. ’संथ वाहते कृष्णा माई...’ हे ग.दि.मां.चे.दत्ता डावजेकरांनी संगीतबद्ध केलेले आणि सुधीर फडके यांनी गायिलेले सर्वांगसुंदर गीतही वृंदावनी सारंग या रागात आहे.एवढेच नव्हे तर ’कजरा मोहब्बतवाला,अखियों मे ऐसा डाला...’ हे ’किस्मत’ (१९६८) या चित्रपटातील ओ.पी.नैय्यर यांनी संगीत दिलेलं आणि आशाबाईंनी गायिलेलं धडकेबाज गाणंही  वृंदावनी सारंग याच रागात आहे.

      'कोंपले फिर फूट आयी शाखपर कहना उसे' ही मेहदी हसन यांनी गायिलेली गझल मूर्च्छना पद्धतीच्या बंदीशीचे साक्षात उदाहरण आहे.'महाफिल में बार बार किसी पर नजर गयी' ही गुलाम अलींनी गायिलेली गझल सुद्धा सारंग रागावरच आधारित आहे.

          मी सुद्धा कमी वाद्यमेळात  थोडा वेगळा प्रयत्न करून पाहिला...आवडल्या नावडल्याचे कळवावे!

●headphone please

Friday, August 7, 2026

तू कवितेतून हरवता...

 


शिल्पा देशपांडे ची एक "युगल गझल"...रसिका जानोरकर व मयूर महाजनच्या आवाजात.

                (●Headphone please)

तू कवितेतून हरवता एकाकी होते अक्षर 

सुरवंट समाधी घेतो कोषात अडकते उत्तर 


केव्हाच्या साजणवेळा क्षितिजावर तिष्ठत बसल्या 

तू रुसल्यावर माझ्याशी हे घडते नाट्य निरंतर 


पारोशा तुजविण वेळा क्षण कळण्याआधी विरती 

डोळ्यांशी लढण्यासाठी अश्रूही होती तत्पर 


तू घरटे सोडुन जाता भिंतींना हसती  दारे 

खिडकीच्या काचेवरती बस एकांताची  टक्कर 


गायक - मयूर महाजन, रसिका जानोरकर 

गझलकार - शिल्पा देशपांडे 

संगीत - गझलगंधर्व सुधाकर कदम  


Live- Sanskruti Arts Festval,  Thane 2015



Wednesday, August 5, 2026

आनंदगाणे


 

माझी शब्द-स्वरसंपदा (भाग १)



 .                      #जगत_मी_आलो_असा 

                             (लेखांक ४०)

.                      #माझी_शब्द_स्वरसंपदा 


       आजमितीस माझ्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख), ’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा' व 'काळोखाच्या_तपोवनातून' (काव्य संग्रह) 

अशी चार पुस्तके,तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), 'अर्चना’ भक्तिगीते (टी सिरीज)', 'खूप मजा करू’ बालगीते (फाऊंटॆन म्युझिक कं), ’ काट्यांची मखमल’ मराठी गझल (युनिव्हर्सल म्युझिक कं), ’ तुझ्यासाठीच मी...’ मराठी गझल ( युनिव्हर्सल म्युझिक कं), काट्यास फूल आले','रे मना!' ह्या कॅसेट्स सीडीज सोबतच खाली दिलेली शेकडो गीते-गझला spotify, gana.com, youtube युट्युब,स्पॉटिफाय व इतर ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.

        मी स्वरबद्ध केलेला  हनीफ़ साग़र,बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत असून. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,

अनुराधा मराठे, वैशाली माडे, वैशाली सामंत,पद्मा सुरेश वाडकर,नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन,अनन्या सुरेश वाडकर, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, कल्पिता उपासनी,डॉ.सुशील देशपांडे,आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे,मोहन भिवरकर सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी मी स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.

       यात मराठीतील कुसुमाग्रज,सुरेशभट,ग.दि.मा.,विंदा करंदीकर,बाबा आमटे,बा.भ.बोरकर,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे,पद्मा गोळे,इंदिरा संत,वसंत भापट,बालकवी,शांता शेळके,सरिता पत्की,शंकर वैद्य,वंदना विटणकर,उ.रा.गिरी,ग्रेस,श्रीकृष्ण राऊर,इलाही जमादार,शिवा राऊत,आशा पांडॆ,श्रद्धा पराते,दिलीप पांढरपट्टे,अनिल कांबळे,संगीता जोषी,म.भा.चव्हाण.रमण रणदिवे,सदानंद डबीर,नारायण कुळकर्णी कवठेकर,शिवाजी जवरे,ललित सोनोने,शंकर बडे,गौतम सुत्रावे,अरूण सांगोळे,बबन सराडकर,शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,'मलंग',प्रथमेश गिरीधारी, सुनीती लिमये,आनंद रघुनाथ,कलीम खान,गजेश तोंडरे,अनंत ढवळे,चित्तरंजन भट,दीपक करंदीकर,मनोहर रणपिसे,घनशाम धेंडॆ,ए.के.शेख,गंगाधर मुटे,बदिउज्जमा 

बिराजदार,समीर चव्हाण ,जोत्स्ना राजपूत,प्रमोद खराडॆ,

जनार्दन म्हात्रे,महेंद्र राजगुडे,विशाल राजगुरू,जयदीप जोशी,शिल्पा देशपांडे,गजानन मिटके,मीरा सिरसमकर,

रविप्रकाश चापके,ज्योती बालिगा,किरण पिंपळशेंडे,चंदना सोमाणी, संदीप गावंडे,धुमाळ पिता-पुत्र,राज यावलीकर,

रामदास चवरे व दस्तुरखुद्द माझा समावेश आहे.

       तसेच उर्दू-हिंदीतील डॉ राही मासूम रजा, हनुमंत नायडू, शॆरजंग गर्ग, प्रेमनाथ कक्कर, शंकर दीक्षित, श.न.तरन्नुम, बलबीरसिंह रंग, ’राग’ कानपुरी, मोहन वर्मा ’साहिल’, प्रभा ठाकूर, मयंक अकबराबादी, समद रजा, ’शेरी’ भोपाली, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम, सैफुद्दीन सैफ, सुरेश्चंद्र वर्मा, ’निजाम’ रामपुरी, गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, ’सरसपंडित’ कमलप्रसाद (कँवल), बशर नवाज,हनीफ सागर,कलीम खान,दिलीप पांढरपट्टे,समीर चव्हाण,सहदेव रामटेके या कवी गझलकारांचा समावेश आहे.जुन्या पिढीतील मान्यवर ज्येष्ठांपासून आजच्या नवोदितांपर्यंत अनेक मराठी आणि उर्दू कवी गझलकारांच्या रचना स्वरबद्ध केल्या आहेत.


.                 ■ युट्यूबवरर उपलब्ध असलेल्या रचना


■ मराठी गझल

१.कुठलेच फूल आता -सुरेश भट

२.दिवस है जाती कसे -      "

३.झिंगतो मी कळेना-         "

४.जगत मी आलो असा की- "

५.ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची-"

६.सुखाच्या सावल्या साऱ्या- "

७.हे तुझे अशा वेळी लाजणे-  "

८.ही न मंजूर वाटचाल-        "

९.आले रडू तरीही कोणी रडू नये-"

१०.लोपला चंद्रमा- श्रीकृष्ण राउत

११.दुःख माझे देव झाले-   "

१२.काट्यांची मखमल होते-दिलीप पांढरपट्टे

१३.दूर गेल्या फुलातल्या वाटा-         "

१४.जीवनाचा खेळ रंगाया हवा-        "

१५.गाऊ नये कुणीही-                     "

१६.घाव ओला जरासा होता-            "

१७.हसू उमटले दुःख भोगता-           "

१८.कळेना कसा हा जगावेगळा-       "

१९.मी सुखाचे गाव शोधत राहिलो-    "

२०.तराणे-                                     "

२१.येता येता गेला पाऊस-                "

२२.किती सावरावे-                          "

२३.उशीर झाला तुला यायला-इलाही जमादार

२४.जीव लावावा असे कोणीच नही-संगीता जोशी

२५.लोक आता बोलवाया लागले-अनिल कांबळे

२६.मी करू सारखा विचार किती-        "

२७.फुलातला प्रवास दे-ललित सोनोने

२८.मस्तीत गीत गा रे-नारायण कुलकर्णी कवठेकर

२९.पियानो-उ.रा.गिरी

३०.जरा सांजता याद येतेस तू-ए.के.शेख

३१.कसे ओठांवरी गाणे-दीपक करंदीकर

३२.शब्द दंगा घालती रक्तात माझ्या-चित्तरंजन भट

३३.एक प्रार्थना ओठांमधुनी-अनंत ढवळे

३४रानात पाखरांची-म.भा.चव्हाण

३५.दुःख विसरून गायचे होते-अनंत ढवळे

३६.अद्याप सारे आठवे-प्रमोद खराडे

३७गझल चांदण्यांची-समीर चव्हाण

३८.कापली नाहीत अजूनी-जनार्दन म्हात्रे

३९.असे कसे तुझ्याविना-ज्योत्स्ना राजपूत

४०.मनातले तुझे मला-विशाल राजगुरु

४१.तू कवितेतून हरवता-शिल्पा देशपांडे

४२.श्यामरंगी रंगताना-मीनाक्षी गोरंटीवार

४३.नाव आता तिचे तू विचारू नको-श्रीकृष्ण राऊत

४४.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

४५.हे तुझे आभासवाणे-गजानन मिटके

४६.आसवांनी मी मला भिजवू कशाला-सुरेश भट

४७.रंग माझा वेगळा-सुरेश भट

४८.मज झुकता आले नाही-सदानंद डबीर

४९.तुझ्या रूपाचा गुलाब ताजा-म.भा. चव्हाण

५०.जायचेच ना निघून जा-सतीश डुंबरे

५१.तुजपाशी मज टाळायाचे लाख बहाणे होते-सुरेश भट

५२.भास आभासावरी मन-रविप्रकाश चापके

५३.जळलो धुपापरी मी-             "      

५४.जो तो दिसावयाला दिसतो सुखात आहे-     "

५५.मला आठवे ना तुला भेटल्याचे-        "

५६.प्रतिक्षा प्रार्थना झाली-             "

५७.माझी गझल गुलाबो-              "

५८.असे पत्र आता तुला मी लिहावे-            "

५९काट्यास फूल आले-रविप्रकाश चापके

६०.जीवना सांभाळतो मी-सुधाकर कदम

६१.आसवांनी मी मला-सुरेश भट

६२.चंद्र आता मावळाया लागला-सुरेश भट

६३. शेवटी हे दुःख माझे-ज्योती बालिगा

६५. मज सांग आज तुझ्याकडे-ज्योती बालिगा

६६. जेव्हा मला कळे ना-संदीप गावंडे

६७. लिहावे किती मीच माझ्या मनावर-किरण पिंपळशेंडे

६७. शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे-चंदना सोमाणी

६८. वेदनेचा सूर देउन काळजाला-सुधाकर कदम

६९. हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे-   "

७०. सोसण्याचा सूर करणे ज्यास जमले-   "

७१. विसरून वेदनांना मज गायचेच आहे-  "

७२. ये न ये असे कधी चांदणे पुन्हा पुन्हा-ज्योती बालिगा

७३. तू दिलेले दुःख आहे प्राण माझा-राज यावलीकर

७४. काही न बोलण्याची राखून रीत आले-ज्योती बालिगा

७५. जे जे घडावयाचे ते ते घडून गेले-सुधाकर कदम

७६. काय होते या मनाला सांजवेळी-सुधाकर कदम

७७. बावरे होउन कुणाला शोधती डोळे-बबन धुमाळ

७८. जसा हात हातात धरला प्रिये-प्रसन्नकुमार धुमाळ 

७९. स्मरायचे तुला किती-विजयालक्ष्मी वानखेडे

८०. इथेही तिथेही तुझा भास होतो-       "

८१.भीमाच्या गजाली-                         "    

८२. किती रुंजी तरी तिथल्या तिथे घालत रहावे-समीर चव्हाण

८३.अवखळ मन हे ऐकत नाही- सुधाकर कदम

८४. दुःखाशी नाते जडता जडता जडते-मनोहर रणपिसे

८५.या नवा सूर्य आणू चला यार हो-सुरेश भट

८६. हा असा चंद्र अशी रात-                 "

८७.संपली अजुनी कुठे ही रात सजणा- अनिल कांबळे

८८.एकटीच मी निवांत भैरवी बसेन गात-

८९. मला सोसवेना दुरावा तुझा-ज्योती बालिग

९०.उदंड ओसंडुनी कधी वावरता आले- शिवाजी जवरे

९१.रात गेली निघून पाऱ्याची- सुरेश भट

क्रमशः

●मराठी गीते व उर्दू गझल पुढील अंकी...

---------------------------------------------------------------------

दैनिक विदर्भ मतदार,अमरावयी.रविवार दि.१ ऑगष्ट २०२६

भारतीय नागरिक


 





संगीत आणि साहित्य :