गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, July 20, 2026

सरणावर कळले होते...



 .  आज पुनः #सुरेश_भट  आठवले...😢


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते


ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाही

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते


गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या

पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते


घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली

जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


■ जुन्या कॅसेटवरून उतरवलेले.

Live 1980 ●headphone Please

Sunday, July 19, 2026

या नवा सूर्य आणू चला यार हो...

 

.                       साठवणीतील आठवण

१९८० मध्ये जेव्हा सुरेश भट आणि मी मराठी गझल व गझल गायकीच्या प्रचार,प्रसारासाठी महाराष्ट्राच्या भ्रमंतीवर निघालो होतो, तेव्हाच्या अगदी सुरवातीच्या काळात सुरेश भटांच्या उपस्थितीत गायिलेली ही गझल आहे. मी स्वतः हार्मोनियम वाजवून गात असल्यामुळे त्या काळी तबला वादक तालमणी प्रल्हाद माहुलकर आणि मी,असे दोघे मिळून कार्यक्रम करायचो.त्यावेळच्या ध्वनिव्यवस्थापकाने कॅसेटवर  हे ध्वनिमुद्रण केले होते. कॅसेटवरून कसेबसे कॉम्प्युटरवर उतरवले.ते आपणासमोर सादर आहे.आवडण्या न आवडण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे.चांगली असो वा वाईट,आपली प्रतिक्रिया मात्र आवश्यक.


सूर्य केव्हाच अंधारला यार हो

या नवा सूर्य आणू चला यार हो


हे नवे फक्त आले पहारेकरी

कैदखाना नवा कोठला यार हो


जे न बोलायचे तेच मी बोलतो

मीच माणूस नाही भला यार हो


ओळखीचा निघे रोज मारेकरी

ओळखीचाच धोका मला यार हो


आज घालू नका हार माझ्या गळा

मी कुणाचा गळा कापला यार हो


-#सुरेश_भट


●heasphone please...

Friday, July 17, 2026

पोवाडा...महाराष्ट्र मायभू आमुची...शाहीर अण्णा भाऊ साठे●

 


क्रांतिकारी शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...🌹🙏🌹



Wednesday, July 15, 2026

'लाजणे बरे नाही' सुरेश भट,सुधाकर कदम.

 




      ●अशी गावी मराठी गझल●

सुरेश भट यांच्या निवेदनासह त्यांचीच गझल...

महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे.१९८२


"हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही

चेहरा  गुलाबाने  झाकणे  बरे नाही"


जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे 

मागचे जुने देणे टाळणे बरे नाही


ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा 

आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही


जाहली न कोणाची आज राख रांगोळी 

आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही


आज मोकळे  बोलू, आज मोकळे होवू ! 

जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही


कालचा तुझा माझा, चंद्र वेग‌ळा होता 

हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही


मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली 

हाय, लाजणाऱ्याने जागणे बरे नाही


गझल - सुरेश भट

गायक - सुधाकर कदम


● old live... headphon please

वारकरी


 

जगत मी आलो असा (लेखांक ३७)



   ●अरुणावतीच्या तीरावर (भाग १)●

     आर्णीच्या नोकरीबद्दल मागील एका लेखात आलेच आहे. संगीत शिक्षक म्हणून नाईलाजाने का होईना एकदाचा रुजू झालो. वर्ष होते 1972. त्यावेळी संस्थाध्यक्ष होते चिद्घनानंद भारती. ही संस्था माहूरचे महंत श्री दत्तराम भारती यांच्या योगदानातून उभी राहिली होती. त्यामुळे श्री महंत दत्तराम भारती नावानेच ही शाळा ओळखली जात होती/आहे. जसा चिद्घनानंद भारतींचा आर्णी, माहूर परिसरात दरारा होता तसा यवतमाळ जिल्हाभर या शाळेचा दरारा होता. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कडक शिस्त, नावाजलेले हुशार असे शिक्षक, अतिशय मृदू पण शिस्तीचे कडक असे मुख्याध्यापक हे या शाळेचे वैशिष्ठय होते. शंकरराव बुटले हे त्यांचे नाव. पांढरे शुभ्र धोतर, पांढराच शर्ट व पांढरी टोपी ही त्यांची वेशभूषा. उत्तम शिक्षण, खेळ, कला, संगीत, नाटक व विविध शालेय उपक्रम यामुळे त्यांच्या कार्यकाळात शाळा खूप नावारूपाला आली होती. मी रुजू झालो तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. संगीत क्षेत्रात जरी मी नाव कमावले होते तरी पण एक शिक्षक म्हणून मी शून्य होतो. पण बुटले गुरुजींनी माझ्यातील गुण-दोषासह मला स्वीकारले व मार्गदर्शन केले. सुरूवातीला प्रत्येक तासिकेला वर्गावर जाऊन संगीताची तासिका घ्यावी लागायची. पण माझ्यातील तडफ व संगीताविषयीची आत्मीयता पाहून त्यांनी मला वेगळा संगीत कक्ष दिला. त्यावेळी माझ्याकडे हार्मोनियमसुद्धा नव्हती. शाळेची हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्यामुळे माझे कार्यक्रम सुरू होते. वेतन इतके कमी की, कसेबसे घर चालायचे. त्यामुळे हार्मोनियम घेण्याचा प्रश्नच नव्हता. यवतमाळला असेपर्यंत ऑर्केस्ट्राची हार्मोनियम वापरायचो. यवतमाळलाही माझ्याकडे स्वतःची हार्मोनियम नव्हती. असे असतानाही मी हार्मोनियमचा हात कसा तयार केला असेल याचा विचार करावा. असो!

     बुटले गुरुजींनी संगीत कक्ष दिल्यानंतर मी त्या कक्षात सायंकाळी संगीताचे वेगळे वर्ग घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे पाहून बुटले गुरुजींनी मला 'गायनाव्यतिरिक्त काही वाद्य शिकविता येईल काय' असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी शाळेच्या फंडातून हवी ती वाद्ये आणायची परवानगी दिली. त्यांनी परवानगी देताच मी मुंबईला जाऊन सतार व संतूर ही दोन वाद्ये आणली. आणि स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. यवतमाळचा नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक विभागात तबला वादन करून सहकार्य करणारा मित्र शेखर सरोदे, उस्ताद शेख दाऊद खान यांच्याकडे तबल्याच्या उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला होता. तेथे माझी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केली होती. त्या निमित्त हैदराबादला गेलो असता तेथून एक स्वरमंडळ घेऊन आलो. त्याचेही पैसे मला शाळेकडून मिळाले. माझी मेहनत हळूहळू रंग भरत होती. शाळेतील 26 जानेवारी म्हणजे तीन दिवसांचा नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवच असायचा. या तिन्हीमध्ये माझा सहभाग अनिवार्य असल्यामुळे आर्णी व परिसरातील रसिकांची ओळख व्हायला लागली. म्हणून मी गावातील रसिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मित्र मिळून 'स्वर-गंगा' नावाची (बिन पगारी, फुल अधिकारी) संस्था स्थापन केली.या संस्थेचे उद्घाटन अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचे शिष्य पं. मनोहरराव कासलीकर यांच्या गायनाने केले. या कार्यक्रमाला आर्णी व परिसरातील रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम बुटले गुरुजींच्या परवानगीने शाळेच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता. एकीकडे यवतमाळचा ऑर्केस्ट्रा, दुसरीकडे माझे सोलो कार्यक्रम या व्यतिरिक्त शाळा व संगीत वर्ग अशी खूप ओढाताण होत होती. पण जिद्द आणि मेहनत करण्याची मानसिक तयारी हे सर्व माझ्याकडून करून घेत होती. वरील सगळ्या बाबींमुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींप्रमाणेच माझ्यातील नसलेल्या चुका दाखवून मुख्याध्यापक व संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडे चुगल्या करणारी मंडळी पण तयार होऊ लागली. पण हे प्रमाण कमी होते. तसेच मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष माझी ससेहोलपट बघत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत कुठलेच प्रकरण आले नाही. माझी कार्यशैली, स्वच्छ चारित्र्य, स्वाभिमानी स्वभाव, शाळेतील शिक्षक म्हणून ठेवलेली आब याबद्दल संस्थाध्यक्ष माझ्या बाबतीत अत्यंत उदार धोरण ठेवून होते.

000000

क्रमशः

---------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती. रविवार दि.१३ जुलै २०२६

प्रमाण व बोली भाषा...



   महाराष्ट्रात विविध बोली भाषा बोलल्या जातत.या विविध बोलीभाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रमाण भाषेच्या अत्याभिमानी (दुराभिमानी) लोकांनी बोली भाषेचे आभार मानायला हवे.'पानी' या शब्दावरून हिणवणाऱ्या विद्वानांना विदर्भ हा मध्यप्रदेशात होता.त्यामुळे तेथील बोलीभाषेत पाण्याला हिंदी प्रमाणे पानी उच्चारल्या गेले.अजूनही बरेच ग्रामीण लोक असाच उच्चार करतात.ही त्यांची चूक नाही.विदर्भातीलच झाडीपट्टीच्या भागात अजूनही'ज' चा उच्चार 'ज्य' असाच करतात.अकोल्याकडे 'ळ' चा उच्चार 'ड' सदृश्य होतो.बहिणाबाईंचे काव्य प्रमाण भाषेत नाही म्हणून ते टाकावू ठरते काय?महाराष्ट्रातील अनेक संतांनी त्यांच्या भक्तीगीतांमधून बोलीभाषेतील अनेक शब्द वापरले आहेत.लीळाचरित्र,ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वऱ्हाडी शब्द आले आहेत.मग लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीकडे पण तुच्छतेने बघाल काय?महाराष्ट्रातील बोली भाषेची अशी शेकडो उदाहरणे देता येईल.असो!

"अति शहाणा त्याचा बैल रिकामा" ही म्हण उगाच पडली नसावी.





संगीत आणि साहित्य :