गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, June 30, 2026

पियानो...उ.रा.गिरी


 या एकलेपणाचा छेडीत मी पियानो

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरांनो

तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
का जागता तुम्हीही माझ्यासवे कळ्यांनो

शब्दात आसवांची बांधू कशी समाधी
व्हा हद्दपार आता डोळ्यातल्या तळ्यांनो

व्याकूल यामिनीला कुठली पहाट माझ्या
आता उषा उद्याची विसरून जा दिशांनो
                      ◆●◆


नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार दै. तरुण भारतचे माजी संपादक  वामन तेलंग यांना जाऊन तिथीप्रमाणे पाच वर्ष झालीत.

                त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

                               🌹🙏🌹

-----------------------------------------------------------------------

  ●सोबत नागपुरातील माझ्या कार्यक्रमावरील त्यांचा लेख. 

         #तरुण_भारत/#मध्यमा/बुधवार/दि. २७ जून/८४

    दि. १५ जून. वेळ सायंकाळची. नागपुरात पावसाची एखाद-दुसरी सर येऊन गेलेली. बाताबरण काहीसे निवळलेले, पण उष्मा कमालीचा, तरीही धनवटे रंग मंदिर रसिक श्रोत्यांनी भरलेले. गच्च वगैरे नाही. तशी अपेक्षा कुणाचीही नव्हती. कार्यक्रम थोडा वेगळा होता. मराठी गीत गझल गायनाचा. कलावंतही नवा होता. सुधाकर कदम, धनवटे रंग मंदिरात आपला कार्यक्रम व्हावा चांगल्या उपस्थितीत व्हावा अशी सुधाकरची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तसे विदर्भात आणि मराठवाडचात त्याचे कार्यक्रम झाले होते. पुणे, कोल्हापूर, मुंबई इकडेही त्याने दाद घेतली होती. यवतमाळ जिल्हयात तर तो ख्यातच होता. राहणारा त्याच जिल्ह्यातला आर्णीचा. त्यामु‌ळे त्या परिसरात तो प्रसिद्ध होता आणि स्वाभाविकच धनवटे रंग मंदिर गाजवावे अशी त्याची इच्छा होती. योग जुळून आला. ड्रॅमॅटिक टॅलेन्ट्स' ही संस्था पुढे आली. श्रद्धा पराते, अरुणा पवार, आणि अन्य चाहते मदतीला धावले, रंग मंदिर श्रोत्यांनी बऱ्यापैकी भरले, प्रारंभिक उपचार आटोपले आणि नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली.

     वेळ सायंकाळची, सायंकाळच्या प्रार्थनेची. कवठेकरांनी ओळ दिली...

'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे... 

आणि सुधाकर कदमांनी सूर लावला. आवाज मोकळा, जरा जाडा. उच्यार स्पष्ट, गीत-सुरेश भटांचे, साथीला तबल्यावर श्री. माहुलकर, शब्द आणि सूर यांचे नाते जुळले. कदमांची मराठी गीत-गझलांची ही मैफल मग रंगू लागली.

     'गझल' हा उर्दू-हिदीचा लास बाज. त्याचा चाहता वर्गही फार मोठा. तुलनेत मराठी बाण्याची गझल म्हणजे जेमतेमच. कविवर्य सुरेश भटांनी ती अलिकडच्या काळात रुजवली-फूलबली, आपला असा एक प्रवाहच भटांनी निर्माण केला. या प्रवाहात मग अनेक कवी सामील झाले. अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, अमरावतीचा सांगोळे ही त्यातली काही महत्त्वाची नावे

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना 

आरती जी गात आहे तीच माझी वेदना...

     -हघा ओळी श्रीकृष्ण राऊतच्या. (डॅडी देशमुखांच्या सिनेमासाठीही त्याने गीते लिहिली आहेत.) सुरेश भटांच्या गझलांबरो बरच कदमांनी हे ही गीत पेश केले आणि दाद घेतली.तसा मराठी माणूस दाद वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. कविता गझल वगैरे लिहिण्याच्या आणि अन्यही सांस्कृतिक भानगडी तो करतो पण हवी तशी दाद काही त्यांच्याकडून जात नाही. कदमांच्या कार्य क्रमात मात्र जरा वेगळेच दृश्य दिसले.

     नारायण कुळकर्णी कवठेकरांनीही कधी पाडगावकरांच्या, कधी बोरकरांच्या, कधी उर्दू कवींच्या तर कधी स्वतःच्याही मार्मिक ओळी नमूद करीत कार्यक्रमाला अनुकूल असे वातावरण सारखे जिवंत ठेवले.आणि रसिकांनी हा कार्यकम उचलून धरला.

'सायंकाळी म्हणाव्यात कविता रात्री 

गावी गझल सकाळी म्हणावे स्तोत्र

दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र

    -हया ओळी स्वतः कवठेकरांच्या. वास्तवाचे भान जागवणाऱ्या अन् त्याच बरोबर श्रोत्यांना एकदम विश्वासात घेणाऱ्या, आश्वासक शब्दांनी कवितांच्या ओळींची पेरणी करीत करीत कवठेकरांनी कार्यक्रमाचे सारथ्य केले आणि कदमांनी सुरेश भट, उ. रा. गिरी, अनिल कांबळे, श्रीकृष्ण राऊत, आर्णीचाच कलीम खान आदींच्या सरस रचना पेश करीत हा कार्यक्रम यशस्वी केला. कधी शृंगाराचे विभ्रम, कधी याचना, कधी यातना असे नानाविध भाव कदमांनी जागे केले.

'पहाटे पहाटे मला जाग आली 

तुझी रेशमाची मिठी मैल झाली'


असा नर्म शृंगार फुलवित असताना 

'जवळ येता तुझ्या दूर सरतस तू

ऐनवेळी अशी काय करतेस तू'

अशी काहीशी लाडिक अनु घोडी धीट रचनाही सादर करून कदमांनी श्रोत्यांची तब्येत खुश केली.

     प्रेम, विहर, विरहातील आर्तता, शृंगा राच्या कला हा नेहमीच कवींच्या आणि गीत-रचनाकारांच्या तब्येतीचा विषय राहिला आहे. 

'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची

तापलेल्या अधीर पाण्याची' 

ह्या ओळी लिहिणे तसे सोपे आहे. कवी त्यात रमतो आणि इतरेजनांना रमवतोही पण त्या सोबतच कलावंत कवीच्या भाळी दुःखाचा एक अभिलेखही लिहिलेला असतो. हा अभिलेख त्याचे बलस्थान असते.

     गीत-गझलांची निवड, सूर यांचा दिलेला त्याला साज व सादरीकरण प्रत्येकच बाबतीत एक अभिजात चोखंदळपणा सिद्ध करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता दुःखाच्या अमिट अभिलेखाने झली. रचना होती उ. रा. गिरी यांची. स्वर होते अर्थातच सुधाकर कदमांचे आणि दाद घेणारी याचना होती-


'पा एकलेपणाचा छेडीत मी पियानो 

ओठांस भैरवीच्या दंशून जा स्वरानो

-वामन तेलंग

Monday, June 29, 2026

आली लाजत आज सकाळ...कवी-उ.रा.गिरी



     जगातील कोणतेही सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, सांगीतिक वैविध्याचे भांडार हे कोणत्याही एका व्यक्तीने तयार केलेले नाही. तसेच त्यासंबंधीचे नियम, कायदे, कानूनही एका व्यक्तीने बनविलेले नाही. त्यात सातत्याने बदल होत गेला आहे. माणसाच्या आयुष्यात यातील संगीत, काव्य,चित्रकला हया कलेचे रुप महत्वपूर्ण (Sjgnificant Form)) आहे. या कलांकडे दोन प्रकारांनी बघता येते. व्यावहारिक (Practical) आणि कलात्मक (Aesthetic). यात कलात्मक दृष्टी ही व्यावहारिक दृष्टीपेक्षा अधिक सत्य आहे.असे क्लाइव बेल (Cive Bell) म्हणतो.

           कलाकृती फक्त बघण्याची किंवा ऐकण्याची वस्तू नाही. त्या कलाकृतीत रसिक ध्यानमग्न होवून तल्लीन व्हायला हवे. सौंदर्य स्वादाचे तसे तीन स्तर आहेत. १) आपल्या इंद्रियाद्वारे सौंदर्यास्वाद घेणे. २) आंतरिक अनुभूती ३) त्यात स्वत; हरवणे. यापैकी एका तरी प्रकाराने माणसाला आनंद घेता येणे यातच त्या कलाकाराचे यश आहे. शब्द, छंद, अलंकार हे कवितेचे माध्यम आहे. तसे स्वर, ताल, लय, हे संगीताचे माध्यम आहे. यांची एक विशेषता ही की याला कोणताच बाह्य आधार नसतो. हे संगळे कलाकाराच्या आत उर्मी रुपाने सतत जागृत राहून बाहेर येण्यासाठी तडफ़ड करीत असते. या तडफडीतून बाहेर आलेली कोणतीही रचना मग ती कविता असो,चित्र असो,एखादी सुरावट असो वा कोणत्याही प्रकारची अभिव्यक्ती असो. ती आपला प्रभाव माणसाच्या मनावर पाडतेच. 

एवढी मोठी प्रस्तावना करण्यामागचा उद्देश एकच की , हे अमक्याने निर्माण केले,ते अमक्याने निर्माण केले हा जो भ्रम पसराविण्यात आला आहे तो दूर व्हावा...बस! संगीत किंवा त्यातील राग, ताल, स्वर,शब्द,लिपी,काव्य ही एकाची निर्मिती नसून यासाठी खूप मोठा कालावधी लागला असून आपणास माहित नसलेल्या अनेक व्यक्तींचा यात हात आहे.शास्त्रीय संगीतातील महत्वाचे वाद्य तानपुरा...! याचा शोध कोणी लावला हे आजतागायत कोणी सांगू शकले नाही.याचे कारण मी वर लेलेल्या वक्तव्यात आहे.

          आजचा आपला विषय आहे. राग भूप... या रागात पाचंच स्वर आहेत. सा रे ग ध प... सर्व स्वर शुध्द. हा राग अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पाठ्यक्रमात प्रारंभिक म्हणजे पुर्वप्राथमिक वर्गात शिकविल्या जातो... ठरलेली सरगम, लक्षणगीत, ख्याल पुढे वरच्या वर्गात गेल्यावर मोठा ख्याल वैगरे वैगरे... परंतू खरा भूप राग इथे कळतच नाही. भूप कळायला तेवढ्याच ताकदीने गाणारा वा गाणारी आणि रंगवणारा वा रंगविणारी हवी. तरच भूप कळतो, आवडायला लागतो. त्यामुळे मैफ़िलीतही हा राग फ़ार कमी ऐकायला मिळतो. मी मी म्हणणारे गायकसुध्दा त्याच्या वाटेला जात नाही. मी अनेकांच्या गळ्यातून भूप ऐकला परंतू खरा भूप कळला आणि भावला तो किशोरी आमोणकरांच्या ’सहेला’ मुळे ! त्यानंतर शिवकुमारच्या संतुर आणि हरिप्रसादच्या बासरी वरील भुपाने वेडं केलं. "काल ऑफ दी व्हॅली"तील भूपाची किती पारायणे केली याची गणतीच नाही... तर असा हा भूप ऐकायला सोपा, रंगवायला कठीण ...

           भूप रागाचे मूळ लोकसंगीतात आहे.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील आदिवासींच्या लोकगीतांमध्ये याची सुरावट सापडते. नेमक्या त्या सुरावटीचा उपयोग संगीतकार आर.डी.बर्मन यांनी ’हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ’कांची रे कांची रे...’ या गाण्याच्या धृवपदात जसाच्या तसा केलेला दिसून येतो. गायक आहेत किशोर कुमार लता मंगेशकर. या रागात स्वरबध्द केलेली अनेक गाणी मराठी/हिंदी चित्रपटांमध्ये आहे त्यातील सुधीर फडक्यांनी स्वरब्ध्द केलेले व लताबाईनी गायिलेले ’भाभी की चुडिया’ या चित्रपटातील ’ज्योति कलश छ्लके...’ हे गाणे अतिशय मनमोही आहे. ’घन; श्याम सुंदरा...’ ही भुपाळी सुध्दा तशीच सकाळी सकाळी मनाची सगळी मरगळ दुर करणारी आहे. भुपाळी जरी सकाळी गात असले तरी भूप रागाचा गानसमय शास्त्रीय द्दृष्ट्या सायंकाळचा आहे.तसेच ’लव्ह इन टोकियो’ या चित्रपटातील, शंकर जयकिशन यांनी स्वरब्ध्द केलेले आणि लताबाईनी गायिलेले ’सायोनारा...’ हे गाणे ही याच रागात आहे. या रागाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ’रिषभावर’ मुर्छना केली की ’मधमाद सांरग’, ’गांधारावर’ मुर्छना केली की ’मालकौंस’, ’पंचमावर’ मुर्छना केली की ’दुर्गा’ राग दिसतो. पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या Water या अल्बमध्ये हे स्पष्टपणे दाखविले आहे.

           अशा वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येणा-या भूपात विदर्भातील लाखपुरी या गावचे कवी #उ_रा_गिरी यांची पाठ्यपुस्तकात असलेली ही कविता १९८६ मध्ये स्वरबद्ध करून शालेय वाद्यवृंदासह गाऊन घेतली.(त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक उठाव या मोहिमे अंतर्गत इयत्ता १ ते १० च्या पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून #झुला या शिर्षकांतर्गत तीन कॅसेट तयार केल्या होत्या.याचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री मा. सुधाकरराव नाईक यांचे हस्ते करण्यात आले होते.त्यातीलच ही कविता आहे.) ध्वनिमुद्रण आर्णीच्या आमच्या मुख्याध्यापकांच्या (#शंकरराव_बुटले) घरी केले.१९६५ ते १९७५ अशी दहा वर्षे ऑर्केस्ट्रात संगीत संयोजक म्हणून काढल्यामुळे वाद्यपरिचय व वाद्यमेळ जमवण्याचा अनुभव होता तो येथे कामी आला.माझा हा ग्रामीण प्रयत्न आपल्यासमोर ठेवत आहे...आवडणे न आवडणे तुमच्या हातात आहे....


आली लाजत आज सकाळ

मेंदी भरल्या चरणी बांधुन 

सोनफुलांचे चाळ


किरणांचे भुरभुरते कुंतल

निळसर शुभ्र धुक्याचा अंचल

शुभ कोवळ्या दवबिंदूंची 

गळ्यात मोहनमाळ


ती येता किणकिणला कण कण

रोमांचित थरथरला क्षण क्षण

लहरत गेली मधुर एक स्वर 

लकेर रानोमाळ


दरवळला वाऱ्यावर परिमल

दुनिया बनली अलका स्वप्निल

मुक्त हासले क्षणभर आणिक 

जीवन हे खडकाळ


गायिका - गीता पंत (यवतमाळ)

कवी - उ.रा.गिरी 

संगीत - सुधाकर कदम (आर्णी,यवतमाळ)

ढोलकी - खंदारे गुरुजी (पुसद,यवतमाळ)

कॅसिओ - दस्तुरखुद्द

सहकारी - घोडेराव गुरुजी,मरगडे गुरुजी,अविनाश गिरी,प्रकाश करपे.





संगीत आणि साहित्य :