Monday, September 14, 2026
तूच माझे गीत कोमल....
तूच माझे गीत कोमल, भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना, तू अंतरी विश्वास रे...
प्राण माझे फूल झाले पाऊली मी वाहिले
तूच त्याचा गंध झाला विश्व हे गंधाळले
जागविली तूच माझ्या लोचनी अभिलाष रे
तू ढगांच्या पार नाही, तू सदा साक्षात रे
तू दयेची सावली तू आशयाचा हास रे
एक तुझिया मीलनाची लागलीसे आस रे
तू क्षमा शांतीत आहे होतसे आभास रे
प्रात संध्या तूच आहे तूच अश्रू ऱ्हास रे
श्वास तू घेताच माझे डोलती निश्वास रे
Saturday, September 12, 2026
मैत्री...
एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा, अडी-अडचणीत कामी येण्याचा, वेळप्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याचा व संकटकाळी धावून जाण्याचा अलिखित करार म्हणजे 'मैत्री'!
संघटन करून राहण्याची वृत्ती जेव्हापासून माणसाने जोपासली, तेव्हापासूनच नात्यांसोबत मैत्री हा प्रकारही अस्तित्वात आला असावा.
समविचारी, समआचारी व्यक्तीशीच मैत्री जुळते. कुठे ना कुठे तरी एखादा सूर जुळल्याशिवाय मैत्री होऊच शकत नाही. भिन्न भिन्न विचाराच्या व्यक्तींमधेही एखादा समान धागा मैत्री निर्माण करताना दिसतो.
मैत्रीचे व मित्रांचे अनेक प्रकार, अनेक पद्धती आपणास दिसून येतात. त्यातील राजकीय मैत्री हा फार गहन विषय आहे.हिंदी-चिनी भाई भाई म्हणत १९६२ मध्ये युद्ध पुकारून देशाच्या उत्तर पूर्व भागाचा लचका तोडणाऱ्या चीनची मैत्री साऱ्या जगाला माहीत आहे. (सध्याही युद्ध न करता पुन्हा तोच प्रकार सुरू आहे.) पंडित नेहरू व लॉर्ड माउंटबॅटन यांच्या मैत्रीची चर्चा आजही चवीने केली जाते. हिटलर मुसोलिनी मैत्री सुद्धा प्रसिद्ध आहे. महायुद्धाच्या काळात 'मित्रराष्ट्र' हा शब्द तर परवलीच्या शब्दाइतका महत्वाचा ठरला होता.
कृष्ण सुदाम्याची मैत्री सर्वश्रुतच आहे. या मैत्रीला कोणते नाव द्यावे कळत नाही.धन्य तो कृष्ण व धन्य तो सुदामा! आज तर मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या आईवडिलांना त्यांच्या गावरान पेहेरावामुळे ओळख न दाखवणारे महाभाग आपण बघतो.ते अशा सुदाम्याला काय ओळख दाखविणार?
कृष्णाच्या मित्रप्रेमात गरिबी श्रीमंती आड आली नाही. तशीच कर्ण व दुर्योधनाच्या मैत्रीतही कोणत्याच बाबी आड आल्या नाहीत.पांडव आपले सख्खे भाऊ आहेत हे समजल्यावर जर कर्णाने जर दुर्योधनाचा पक्ष सोडला असता तर युद्धिष्ठिराऐवजी तोच हस्तिनापूरच्या गादीवर बसला असता. पण मृत्यू समोर दिसत असूनही त्याने मित्राशी इमान राखून मृत्यूला कवटाळले व मैत्रीची शान वाढविली.
मित्र कसा असावा याबद्दल प्रत्येकाचे मत सारखेच असते.पण हे मत मित्राने आपल्याशी कसे वागावे याबद्दलचे असून,स्वतःवर पाळी आल्यावर मात्र यात बदलही होऊ शकतो. मैत्रीची जाण ठेवून मित्राचे उपकार स्मरून वागणाऱ्यांची, अपवाद सोडून वानवाच आहे.मतलबापुरते मैत्रीचे ढोंग करणारेच बहुतकरून दिसून येतात.तुम्हाला वापरून फेकणारी मित्राची ही जात अतिशय घातक असून केसाने गळा कापण्यात वस्ताद असते.त्यामुळे मित्रासाठी जीव देणारे वा जीव लावणारे आता इतिहासजमा झाल्यातच जमा आहे. असे जरी असले तरी पण प्रत्येकाला एका सच्च्या मित्राची सतत आवश्यकता भासत असते, हे ही तितकेच खरे!
माणसाच्या आयुष्यात मित्राईतकेच महत्व मैत्रिणीलाही आहे. (हे बायकोला कसे समजावून सांगावे हा प्रश्नच आहे.) पण विवाहित पुरुषाला जर एखादी मैत्रीण असली तर बायको खपवून घेत नाही. (अर्थात, बायकोला जर मित्र असला तर नवराही खपवून घेत नाही.ही गोष्ट वेगळी.) मोठमोठेपुढारी,राजकारणी,नेते,साहित्यिक ,गायक,
संगीतकार,संशोधक यांना त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या मैत्रिणी (यांना ते 'प्रतिभा' असे म्हणतात.) त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनलेल्या दिसतात. (हे विधान सगळ्यांनाच लागू होते असे नाही.) ह्या 'प्रतिभां'च्या निकट सानिध्यामुळे बरीच मंडळी आपले ध्येय साध्य करतांना दिसून येते. (कुणाकुणाची पत्नी पण त्याची 'प्रतिभा' असू शकते.) विवाहित पुरुषांच्या मैत्रिणीमुळे त्यांच्या घरात कलह निर्माण झाल्याच्याही अनेक घटना आहेत. ते काहीही असले तरी मैत्रीण असणे ही आयुष्यातील एक सुखद अनुभूती आहे असे अनेकजण मान्य करतांना दिसतात.कोणाच्या नशिबात असते,कोणाच्या नाही! त्यामुळे उगाच जळफळाट करून घेण्यात काहीच अर्थ नाही.
राजकीय मैत्रीबद्दल तर न लिहिलेलेच बरे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात केव्हा गळा घालून 'चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा' हे गाणे आळवील हे सांगता येत नाही. या चुम्माचाटीमुळे पक्षांची शकलं झालेली आपण सर्वजण बघत आहोतच.राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो व कोणी कोणाचा मित्र नसतो. वेळ पाहून रंग बदलणारी ही जमात आहे. त्यामुळे यांच्यावर जास्ती लिहीण्यात काही मजा नाही.
----------------------------------------------------------------
दै. विदर्भ मतदार, अमरावती. रविवार दि. १२/९/२६
Wednesday, September 9, 2026
माझी पहिली स्वररचना...
माझ्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा प्रारंभ वयाच्या सोळाव्या वर्षी (१९६५) ऑर्केस्ट्रा पासून सुरु झाला.सध्या २०२६ सुरू आहे.म्हणजे ६० वर्षे उलटलीत.या प्रवासात मराठी/हिंदी मिळून जवळ जवळ ३५० स्वर रचना झाल्या आहेत.त्यातील काही उत्तर प्रदेशातील #हाथरस येथून प्रकाशित होणाऱ्या '#संगीत' मासिकात स्वरलिपीसह उपलब्ध आहेत.तर काही... कॅसेट्स,सीडी,युट्युब वा अन्य 'ऑडिओ प्लॅटफॉर्म्स'वर पद्मश्री सुरेश वाडकर,अनुराधा मराठे,पं. शौनक अभिषेकी,वैशाली माडे,वैशाली सामंत,रसिका जानोरकर,मयूर महाजन,प्राजक्ता सावरकर शिंदे,राधिका ताम्हणकर देशपांडे,गायत्री गायकवाड गुल्हाने,नेहा दाऊदखाने,कल्पिता उपासनी,उत्कर्षा शहाणे,दिनेश अर्जुना,भैरवी कदम,रेणू कदम,प्रशांत कदम,आदित्य फडके,अविनाश जोशी,वैशाली पुल्लीवार,रफिक शेख,डॉ. सुशील देशपांडे, मोहन भिवरकर,सचिन डाखोरे या गायक/गायिकांच्या आवाजात उपलब्ध आहेत.नागपूर आकाशवाणीवरून सादर झालेल्या सर्व रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या असतील असे नाही.ज्या रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत,त्या पोहोचवण्याचा प्रयत्न संगीतकार म्हणून सध्या सुरू आहे.
खालील रचना ऑर्केस्ट्रामध्ये असताना १९६५ मध्ये स्वरबद्ध झाली.माझ्या आयुष्यातील ही पहिली स्वर रचना होय.
चल आपण दोघे लहान होऊ या
बालपणीचा काळ सुखाचा फिरुनी पाहू या
तुझे नि माझे जग ते सुंदर होते त्या वेळी
नभी विहरती स्वैर पाखरे चिंता ना कसली
कळ्या फुलांशी कुजबुज हितगुज
फिरुनी चल करू या...
किती कहाण्या गेल्या रंगुन, गच्चीवर गप्पा
कवितांच्या कोड्यात कितीदा येत लारीलप्पा
भातुकलीचा खेळ मजेचा, फिरुनी खेळू या...
घेऊन हाती हात उपवनी स्वच्छंदे फिरलो
उन्हात वणवण कधी भटकलो पावसात भिजलो
तरुण मनाला अजुन आवडे गारा वेचाया...
-कवी अज्ञात
(त्यावेळी कवीचे नाव लिहून ठेवावे, ही पण अक्कल नव्हती.😊)
Sunday, September 6, 2026
सुधाकरी तोडी...
जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.
बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' हे आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी अप्रतिम गायिले आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!
मी सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये नसलेल्या एका नव्या सुरावटीत मराठी गझल स्वरबद्ध केली.या रागाला 'सुधाकरी तोडी' असे नाव दिले आहे.थाट-भैरवी, वादी स्वर-रिषभ,संवादी स्वर-पंचम.गानसमय-दिवसाचा पहिला प्रहर.
आरोह-सा कोमल रे कोमल ग प कोमल नि सां. अवरोह-सां कोमल नि प कोमल ग कोमल रे सा.आरोहावरोहात पाच स्वर असल्यामुळे शास्त्रानुसार याची जाती औडव-औडव ठरते.
#याला_मान्यता_मिळेल_की_नाही_मला_माहित_नाही. कारण मी शास्त्रीय संगीतातील पंडित,
डॉक्टर, प्राध्यापक वा कुठल्या महाविद्यालयाचा संगीत विभाग प्रमुख नाही.असो!
शब्द आहेत
'माझी गझल गुलाबो भरते हसून प्याला,
माझ्या नशेत अवघा जातो बुडून प्याला'.
रसिकांना ऐकण्यासाठी युट्युब लिंक:-
बिलासखानी तोडी
दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.
इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)
अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'
(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात
शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)
'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)
धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.
जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे!
बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!
https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu
#मैफल
रे मना, तुज काय झाले सांग ना!
का असा छळतो जीवाला सांग ना!
हारण्याचीही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!
हासुनी हसवायचा हा मंत्र घे
दुःख का कुरवळतो तू सांग ना!
सूर लावून गुणगुणावे गीत हे
ते नि तू का वेगळा रे सांग ना!
गीत/संगीत - सुधाकर कदम
गायक - मयूर महाजन
तबला - किशोर कोरडे
सरोद - नितीश पुरोहित


