गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, May 15, 2024

कं-दर्प


     सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच काल नाशिकला झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला'  असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

     कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार समजल्या

 जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.

      १९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला होत्व. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.

     कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.

     स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी,  वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा 

कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.

       दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे  विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प  कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.

     कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?

-सुधाकर कदम

१६ मे २०२४

Sunday, May 12, 2024

मध्यस्थ...

 

      चाटूगिरी या एका शब्दामुळे चाटू, चमचे, पळी, सराटा बगैरे सर्व चमचा-कुळातील वस्तूंच्या बाबतीत एक वेगळाच समज मानव प्राण्यांमध्ये तयार झालो आहे. ढवळाढवळ करणाऱ्या या वस्तूंना हीन लेखण्याचा माणसाचा प्रयत्न मुळातच निषेधार्ह आहे. खरे म्हणजे हात व ज्यात ढवळाढवळ करायची त्या वस्तूमधील मध्यस्थ म्हणजे चमचा-कुळ होय. पण माणसाच्या नको तिथे ढवळाढवळ करण्याच्या सवयीमुळे व नको तिथे 'चाटूगिरी' करण्याच्या पद्धतीमुळे या मध्यस्थांवर फालतूचे आरोप लागून बदनामी होत आहे. 'चाटणे' या शब्दावरून 'चाटूगिरी' हा शब्द आला असला, तरी गरम द्रावणात फिरवल्या जाणाऱ्या पळीलाच आजकाल चाटू म्हणायला लागल्यामुळे समस्त चमचावंशज अत्यंत नाराज झाले आहेत.वास्तविक चमचा-कुलोत्पन्न समस्त वस्तूंचे मानव जातीवर असंख्य उपकार आहेत. कारण खाद्यपदार्थ तयार करताना गरम गरम पदार्थांमध्ये फक्त हीच मंडळी ढवळाढवळ करू शकते. इतरांची बिशाद नाही. ही मंडळी नसती तर माणसांचे किती हाल झाले असते ! अन्न शिजतानाच या मंडळींचा उपयोग होतो असे नाही; आजकाल तर, जेवतानाही काटे-चमचे वापरण्याचा प्रकार रूढ होत चालला आहे. केळीच्या पानावरील गरमसूत जेवण जाऊन चिनीमातीच्या 'डीश' मधील अन्न काठ्या-चमच्याने खाण्यांचे दिवस आले आहेत.

      तर अशा या हाता-तोंडाच्या मध्यस्थांवरून  माणसातील मध्यस्थांना यांची नावे देणे म्हणजे कृतघ्नपणा नव्हे का? आणि माणसातील मध्यस्थांनाही दोन्ही बाजूकडून चटके बसत नाही का? उलट हातातोंडातील मध्यस्थांना फक्त एकीकडचाच चटका बसतो. तोंड फुंकर मारायला तयार असतं. पण माणसातील मध्यस्थांना तर कोठून कसे चटके बसतील, हे सांगताच येत नाही. त्यातल्या त्यात लग्नातल्या मध्यस्थांबद्दल तर न बोललेलेच बरे !

     कचेऱ्यांमध्ये सुद्धा अशा मध्यस्थांची फार गरज असते. 'बॉस' गरम असला की मध्यस्थच त्याला थंड करू शकतात. थंड करताना त्याला बॉसची स्तुती करावी लागते. नसलेल्या गुणांची तारीफ करावी लागते. पण म्हणून काय त्याला 'चमचा' म्हणायचे ? वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे, त्याच्या प्रत्येक गोष्टीला मान हलविणे, भाजीपाला नेऊन देणे, सिगारेट पेटवून देणे, वाढदिवसाला घरची सर्व कामे करून भेटवस्तूही देणे, या माणूसकी, बंधुभाव, प्रेम, त्याग शिकविणाऱ्या गोष्टी अंगिकारल्याबरोबर त्याला चमचा, चाटू वगैरे उपमा देणे बरोबर आहे का ? उलट अशी माणसे आपल्याजवळ नसल्यामुळे आपले किती नुकसान होते, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा ! कारण बस, रेल्वेचे आरक्षण; शाळा-कॉलेजमधील प्रवेश,  पुढाऱ्यांच्या भेटी, साहेबाकडील जिल्हा व तहसील कचेऱ्यातील काम, कोर्टातील व पोलिस ठाण्यातली कामे आणि काळ्या बाजारातील वस्तू वगैरे मिळवायला मध्यस्थाशिवाय पर्याय नसतो. 'अडत्या' नामक एक मध्यस्थ तर धान्यबाजारातील देवाप्रमाणे असतो. शेतकरी व खरेदीदार यामधला महत्त्वाचा दुवा म्हणजे हा मध्यस्थ ! पण ह्याला अडत्या किंवा दलाल असे म्हणतात. तर मंडळी! या मध्यस्थांशिवाय माणूस काहीच करू शकत नाही. दिल्लीत तर ह्यांनाच पॉवर-ब्रोकरही म्हणतात. अशी एकूण वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात तर राजकारणी मंडळीत प्रत्येकागणिक एक दलाल म्हणजे मध्यस्थ आढळतो. एकूण झालेल्या खरेदीमध्ये मोठ मोठे मध्यस्थ दलाली खाताना दिसून आले आहेत. पण ही दलाली मात्र देशाच्या दृष्टीने घातक ठरून सरकारी तिजोरीला मोठे खिंडार पाडणारी ठरते.  तसेच बँकांचे कर्ज न फेडता ते बुडवून पळून जाणारी मंडळी सुद्धा देशाची गुन्हेगार  आहे.या लोकांना जेरबंद करून तो पैसा का वसूल केल्या जात नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो.पण त्यासाठी  लागणारा बुद्धिमान मध्यस्थ त्यांच्या जवळ नसल्यामुळे नुसताच प्रश्न उभा राहतो. आणि प्रश्न फक्त उभा राहून सुटत नसतो. तो सोडवावा लागतो. पण सोडवल्याही तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा सोडवणारी मंडळी 'चोर चोर मौसेरे भाई' नसतील तेव्हा ! राजकीय दूधभाऊ तर एका स्तनातले दूध तू पी. दुसऱ्या स्तनातले मी पितो, असे म्हणून देशाला शुष्क करीत असतात.

     सध्या निवडणूक सुरू आहे.निकाला अगोदर मतदारांना पैसे देऊन फितविण्याऱ्या व निकाल लागल्यावर निवडून आलेल्यांची खरेदी-विक्री करण्याऱ्या राजकीय मध्यस्थांचा धंदा तेजीत येऊन त्यांची चांदीच चांदी होते! 

     खरे म्हणजे प्रगल्म लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून आपणच आपला डिंडीम पिटून, मतदानाच्या अगोदरच्या दिवशी राजकीय दलालांच्या... माफ करा हं! राजकीय मध्यस्थांच्या हस्ते 'मतपरिवर्तन' (साम, दाम, दंड, भेदाने का होईना) करून आपणच आपल्या प्रगल्भ लोकशाहीचा गळा घोटत असतो. षण राजकारण करायचे म्हटले की हे सर्व करावेच लागणार ! शेषन् सारखा मध्यस्थही जिथे हात टेकतो तिथे इतरांचे काय ?

     राजकारणाचा धंदा बद करणारा, चाटूगिरीपासून पुढाऱ्यांना दूर ठेवणारा, कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणारा, भारताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्याला रोखणारा, सर्वसामान्य नागरिकांबद्दल आत्मीयता बाळगणारा मध्यस्थ या भारतवर्षी केव्हा जन्म घेईल कुणास ठाऊक!

Wednesday, May 8, 2024

सामना



     लोकसभेचा सामना जाहीर झाल्याबरोबर  भारतातील समस्त राजकीय संघ धूळ झटकून कंबर कसून मैदानात उतरले आहे. हा सामना जरा लवकर व्हावा अशी काही संघांची इच्छा होती. तर जुन्या विजेत्या संघाला तयारी व 'साफसफाईकरिता' वेळ मिळावा म्हणून हा सामना उशीरा व्हावा असे वाटत होते. आपाल्या कप्तानपदाला शह देणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर पाठवून नवीन खेळाडूंना वाव देवून आपले कप्तानपद कायम ठेवण्याकरिता हा वेळ मिळणे आवश्यक होते. यात ते काही अंशी सफलही झाले.
     या सामन्यात अखिल भारतीय स्तरावरील सर्व संघ खेळणार असले तरी त्यातील दोनच संघ अत्यंत बलाढ्य  असल्यामुळे विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार यावर प्रेक्षकांमध्ये करोडो रूपयांचा सट्टा लावणे सुरू झाले आहे. (खेळावर लावलेला सट्टा, जुगार या संज्ञेत मोडत नसल्यामुळे यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करायला हाकत नाही. "जमी तो जमी, नहीं तो मोहंमद शमी !") या सामन्याचे वैशिष्ठ्य म्हणजे संघाचा विजय हा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. ज्या संघावर प्रेक्षक खूष तो संघ जिंकणार. पण प्रेक्षक मात्र कोणावर खूप आहे या बाबतीत ताकास सूर लागू देत नाही.
     या सामन्यातील प्रत्येक संघ आपला संघ कसा चांगला आहे याचे तुणतुणे सतत वाजवून आम्ही जिंकलो तर काय काय करणार याचे (फुटके) ढोल बडवत असतात. पण आजकाल प्रेक्षकही या दोन्ही आवाजाला सरसावल्यामुळे मुळीच दाद देत नसल्याचे दिसून येते. था देशब्यापी सामन्याला अमाप खर्च येतो. खेळ जरी राजकीय संघ खेळणार असले व विजयी संघ जरी पाच वर्षे मलिदा खाणार असला, तरी हा खर्च मात्र प्रेक्षकांच्या पैशातून होणार असतो. ही परंपरा फार प्राचीन असल्यामुळे यात बदल घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. तरीपण कोणे एके काळी शेषन नामक मुख्य पंचाने सामन्याच्या सुरवातीला होणाऱ्या धुळवडीच्या मैदानी आतिषबाजीवर बंदी घातत्यामुळे कोट्यावधी रूपये वाचले होते असे म्हणतात. पण त्यामुळे सर्व संघांना झीम्मा, फुगडी या बायंकी खेळावर समाधान मानून दुधाची तहान ताकावर भागशवी लागली होती अशी वदंता आहे. यावेळी मात्र एका स्त्री खेळाडूला तिच्याच संघातल्या लोकांनी फुगडी घालायला मनाई केल्यामुळे तिने खो-खो खेळायला सुरवात केली आहे.
     स्त्री व पुरुष खेळाडूंनी एकत्र खेळण्याचा हा एकमेव खेळ असल्यामुळे समानतेचे युग आल्याची सर्वांना खात्री पटते. प्रेक्षक वर्गही सामन्याच्या दिवशीपर्यंत चेअरींग' देवून खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असतात. या खेळात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा अगोदरच्या खेळात अधिक मजा येत असल्यामुळे प्रेक्षक व खेळाडू आपले एकमेकावर किती प्रेम् आहे हे दाखविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतांना दिसून येतात. खेळ सांघिक जरी असला तरी प्रत्येक खेळाडूला एक एक मैदान वाटून देवून त्याला एकटे सोडण्यात येते. या मैदानात प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू उत्तरलेला असतो. प्रत्येक  संघातील खेळाडूंना विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर होळीच्या बोंबांप्रमाणे बो बो बोंबा मारायचे प्रशिक्षण खास ढंगात दिल्या जात असल्यामुळे 'रसिक' प्रेक्षकांना  'शिमग्याची' मजा लुटायला मिळते,
     ते काहीही असले तरी यावेळी  प्रेक्षकांना मात्र ते आपल्या खऱ्या-खुऱ्या मायबापापेक्षाही जास्ती मान देवून, सामना जिंकून देण्याची विनंती करीत असतात. या सामन्यातील खेळाडू आपआपल्या संघाच्या रंगसंगतीचे कपडे वापरत असल्यामुळे लात, निळा, भगवा, तिरंगी, लात-हिरवा,पिवळा अशा विविध रंगाचे मिश्रण पाहण्याचा अभूतपूर्व योग समस्त भारतवासीयांना दर निवडणुकीत बघायला मिळतो.यातील काही खेळाडू सरावासाठी आलेला निधी हडपून बसतात. त्यामुळे संघांतर्गत दुफळी सुरू होते.पण वरची फळी जर मजबूत असली तर या दुफळीचा फारसा परिणाम होत नाही.
      सध्या एकमेकांच्या संघातील खेळाडू चोरून सामना रंगविण्याचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे.परंतू या प्रकारामुळे देशातील समस्त संघ मेटाकुटीला आले असून मूळ खेळाडू नाराज होऊन लाल-हिरवे होऊन 'आवजी-जावजी हाय हाय'चे नारे लावताना दिसत आहे.या 'आवजी-जावजी' प्रकारामुळे शीतयुद्ध सुरू झाले आहे.तसेच संस्थांतर्गत रंगयुद्धही सुरू झाले असून 'आवजी-जावजी'वाल्या खेळाडूंना परत पाठविण्याची तयारी समस्त भारतवासी प्रेक्षक करीत असल्याचे दिसत आहे.पण हे काही बरोबर नाही.याला 'स्पोर्ट्समन स्पिरिट' म्हणत नाही.खेळाडू तो खेळाडू, मग तो कोणत्या का संघाचा असेना त्याला 'चेअरींग' दिलेच पाहिजे.

*** *** आगे बढो हम तुम्हारे साथ हय....
भारत माता की जय!!!


 





संगीत आणि साहित्य :