सध्या भाव पडल्यामुळे कांदा या विषयाने उग्र रूप धारण केलेले दिसत आहे.भारत सरकारच्या तळ्यात-मळ्यात धोरणामुळे कधी निर्यात बंदी तर कधी निर्यातीला परवानगी देऊन भरपूर कर लावणे या प्रकारामुळे कांदा उत्पादक मेटाकुटीला आला आहे.त्यामुळेच काल नाशिकला झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'कांद्यावर बोला' असे म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.
कांदा हा गरिबांच्या जेवणातला अनिवार्य घटक आहे. भाव वाढले की कांदे घरात असणे ही तालेवार समजल्या
जाण्याची लक्षणे मानल्या जातात.. झुणका-भाकर आणि कांदा म्हणजे वऱ्हाडी लोकांची खास 'डिश' आहे. मधल्या काळात युतीच्या राज्यात झुणका-भाकरीला राजाश्रय मिळाल्यामुळे सरकार-दरबारीही तिचे वजन वाढले होते. झुणका-भाकरीची खरी मजा कांद्याशिवाय येत नाही. पण कांदा महागला की झुणका-भाकर खाणे गरिबांना परवडत नाही. उच्चभ्रू मंडळी मात्र या खास 'डिश'ची सामूहिक मजा घ्यायला लागली आहे.
१९९७ मध्ये मुंबईच्या विधानभवनात कांदा प्रकार खूप गाजला होत्व. काही 'फेक्या' लोकांनी कांद्याचा चेंडू बनवला व सदैव स्वयंपाकघरात मुक्कामी असणाऱ्या कांद्याला विधानभवनात नेऊन 'एक कांदा फेकू बाई, एक कांदा झेलू' या बायकी खेळाचा शौक पुरा केला आणि तेव्हापासून कांद्याला चांगले दिवस यायला लागले. युती सरकारने तेव्हाच, कांद्याचे भाव वाढणार हे समजून घ्यायला हवे होते. पण असे घडले नाही व परिणाम काय झाला हे तेव्हाच्या सरकारने पहिलेच आहे.
कांद्याला दुसरे नाव आहे कंदर्प ! कंदर्पातील दर्प काही लोकांना सहन होत नाही. पण स्वतःचा 'दर्प' मात्र कायम ठेवणे या लोकांना आवडते. चातुर्मासात चार महिने कांद्याचे दर्शनही न घेणारे, स्वभावातील 'दर्प' मात्र दूर करू शकत नाहीत. त्यामुळे जवळच्या लोकांना जगणे असह्य होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्याची चळवळ राबविणाऱ्यात जसे दोन गट होते तसेच जहाल व मवाळ... तसे कांद्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. जहाल कांदा त्याचेवर हल्ला करणाऱ्याला रडवून 'दे माय धरणी ठाय' करून सोडतो, तर मवाळ कांदा मात्र कसेही वागलात तरी लाडीगोडी लावत असतो. स्वयंपाक घराशी माझा कधीच संबंध येत नसल्यामुळे जहाल कांद्याचे फार कौतुक वाटते. कारण माझ्या समोर सदैव नखं काढून डरकाळणारी, वाघिणीच्या कुळातली बायको जेव्हा
कांद्यासमोर गोगलगाय बनून अश्रू ढाळत बसते तेव्हा मला आसुरी की कोणता तो आनंद उपभोगायला मिळतो.
दर्प म्हणजे वास. तसेच दर्प म्हणजे गर्व हाही अर्थ निघतो. कांदा आणि दर्प याचा जसा जवळचा संबंध आहे तसा माणूस आणि गर्व याचा आहे. 'गर्वाचे घर खाली', 'गर्व माणसाला धुळीत मिळवतो' हे माहिती असूनही प्रत्येक माणसाला कशाचा ना कशाचा गर्व असतो. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हातानेच जाणार हे लक्षात असूनही मीपणा काही सुटत नाही. माणसांचे एक सोडा ! पण सध्याचे आचार्य, भगवान, महंत स्वामी हे सुद्धा 'मी'च्या दर्पातून सुटले नाहीत. 'हा माझा आश्रम आहे!', 'मी जगाचे कल्याण करतो!', 'हे विश्व (त्याच्या मठापुरते) मी निर्माण केले आहे!', 'मला शरण या!', 'मी चमत्कार करतो!', 'मी लोकांना मार्ग दाखवितो!' या 'मी' चा दर्प कं-दर्पापेक्षाही भयानक आहे.
कांदा तसा बहुगुणी आहे. उन्हाळ्यात कांदा जवळ ठेवला तर ऊन लागत नाही. मिरगी येऊन पडल्यास फोडलेला कांदा हुंगवला की शुद्ध येते. कसेही ऊन लागलेले असो कांद्याचा रस त्याला आराम देणारच. तसेच कांदा हा बलवर्धकही आहे. एका दीर्घायू माणसाने तर आपल्या मुलाखतीत, दीर्घायुष्याचे रहस्य रोज एक कांदा खाणे असल्याचे ठासून सांगितले. औषधी गुणांसोबतच कांद्याची भजी, कांद्याचे पिठलं, कांद्याचा झुणका, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे लोणचे हे खाद्य पदार्थ खवैयांच्या जिभेला चाळवल्याशिवाय राहत नाही. दररोज एक कांदा खाल्ल्याने जर दीर्घायुष्य लाभत असेल तर आपला कांद्याविषयीचा 'दर्प' बाजूला ठेवून प्रत्येकाने कांदा खायला काय हरकत आहे ?
-सुधाकर कदम
१६ मे २०२४