गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, January 31, 2024

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २५)


     १९७२ मध्ये आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू
झाल्यावर ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस, कार्यक्रम, शाळा आणि संगीत विद्यालय हा सगळा व्याप सांभाळणे कठीण व्हायला लागले.शेवटी नाईलाजाने ऑर्केस्ट्रा सोडण्याचा निर्णय घेतला.ऑर्केस्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ मी आणि  शंकर बडे आम्ही दोघे होतो.शंकरचेही लग्न झाल्यामुळे तो ही पोटापाण्याच्या व्यवस्थेला लागला होता.त्यामुळे त्यालाही बोरी अरब येथील व्यवसाय ,कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करणे कठीण होत चालले होते. शेवटी दोघांनीही १९७५ चे गणेशोत्सव,दुर्गोत्सवाचे कार्यक्रम आटपून ऑर्केस्ट्रा सोडला.आम्ही दोघे नसल्यामुळे ऑर्केस्ट्रा बंद पडला हे मात्र वाईट झाले.त्यांची खंत दोघांनाही होती,पण नाईलाज होता.
       ऑर्केस्ट्रा सुटल्यानंतर गायक गायिका अविनाश जोशी,रतन जोशी,प्रभा मॅथ्यू,तबला शेखर सरोदे,गिटार अविनाश गिरी,सूत्र संचालन शंकर चौधरी,सुरेश गांजरे यांना घेऊन मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम सुरू केले.ऑर्केस्ट्राच्या स्थापने पासून स्वरबद्ध केलेल्या शालेय कविता,काही नाटकांना संगीत दिले होते,त्यातील गाणी,शंकर बडेने लिहिलेली वऱ्हाडी गाणी व गझला या व्यतिरिक्त विदर्भातील अनेक कवींच्या रचना असा बराच मोठा साठा माझ्याकडे होता.त्यामुळे ऑर्केस्ट्रा सोडला तरी माझी सांगीतिक वाटचाल सुरूच होती.हे सुरू असताना सुरेश भटांची भेट झाली व त्यांच्या गझल,कविता स्वरबद्ध करायला सुरुवात केली.१९७९ पर्यंत काही रचना स्वरबद्ध करून कार्यक्रमात घेणे सुरू केले होते.(यावर, त्यावेळी भरात असलेल्या नागपूरच्या 'दैनिक नागपूर पत्रिका' या वर्तमानपत्राच्या विशेष पुरवणीत सुरेश गांजरे यांनी एक लेख लिहिला होता,तो खाली दिला आहे.) तसेच सुरेश भट व माझ्या एकत्र मैफलीही सुरू झाल्या होत्या.या मैफिलीतील माझी सुरवात  नव्यानेच स्वरबद्ध झालेल्या 'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो' किंवा 'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे' या गीताने करायचो.अशाच एका मैफिलीतील 'माझिया गीतात वेडे' चे साउंड सिस्टिमवाल्याने विविध अडथळ्यासह  केलेले ध्वनिमुद्रण आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घावे.          
------------------------------------------------------------------------
.                मराठी गझल गायक सुधाकर कदम
                                               -सुरेश गांजरे

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.
विशेष पुरवणी,दि.४/१२/१९८०




 

Thursday, January 25, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर(लेखांक २४)

.                       
                             ● जर-तर ●

     सुरेश भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील रमेश माहुरे पाटील या रसिक मित्राकडे गप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,
आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती पुष्पा सुरेश भट), चित्तरंजन सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी कलीम खान असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.

हवा जरासा आसरा
तुझ्या मनाचा कोपरा
सुगंध अलगद हेरतो
गुलाब तू की मोगरा
-अशोक माहूरे

माझ्या खुळया मनाला हेही पसंत होते !
डोळ्यात या तुझ्या जे फसवे वसंत होते!!
आम्हा कफल्लकांच्या प्रेमास जात कुठली ?
खोटे तुझे दिलासे पण जातीवंत होते !!
-मनोज माहुरे

ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.
सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांचे वडील बंधू पांडुरंग पाटील यांच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,
टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.
दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.
एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका  गातात वगैरे वगैरे...
आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.
      भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.
उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर
'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' 
( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ  "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ  याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....

'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'

(ही सुरेश भटांच्या हस्ताक्षरातील नात माझ्या ब्लॉगवर टाकली असता एका भामट्याने तेथून कॉपी करून त्यावर लेख लिहून जणू काय त्याच्याकडेच ही नात लिहिल्या गेली असा आभास निर्माण केला.माझा किंवा माझ्या ब्लॉगचा उल्लेख करण्याचे साधे सौजन्य त्या महाभागाने दाखविले नाही.म्हणून मी 'भामटा' हा शब्द वापरला.)

    आर्णीमध्ये माझ्या मित्र मंडळीत सर्व जाती धर्माचे लोक होते. मी संगीत शिक्षक व गायक असल्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करायचे.करीम चाचा सोबत मस्ती पण करायचो, शिव्या खायचो.निषादचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही नोकरी करत होतो.त्यावेळी शेजारी पिंजारी बुढा-बुढी राहात होती.ते दोघे निषादला सांभाळायचे.नंतर तर ते आमच्या घरातील सदस्य बनले होते.एक वर्षानंतर सुलभाने नोकरी सोडली.त्यानंतरही पिंजारी कुटुंबाने माझ्या तिन्ही मुलांना आजी-आजोबासारखे प्रेम दिले, माया केली.अर्थात त्यांच्या शेवटच्या काळात आम्हीही त्यांची काळजी घेतली. 
     कंबलपोष बाबांच्या उरुसात पूर्वी फक्त कव्वाल्या व्हायच्या.मी तेथे कव्वाल्यासोबतच वऱ्हाडी कवी संमेलन घेणे सुरू केले.यात शंकर बंडे, मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी अशी दिगग्ज मंडळी असायची. नंतर भजन स्पर्धा सुध्दा सुरू झाल्या.त्या काळी जत्रा,उरूस म्हणजे लहान मुलांसोबतच हौस्या-गौश्या-नौश्यांची मजा असायची.परिसरातील खेड्यातील लोकांची आवश्यक सामानाची खरेदी चालायची. खास आकर्षण म्हणजे तंबूतील दोन मध्यांतर असलेला चित्रपट.चित्रपट बघायला जायचे म्हणजे बसण्याकरिता सोबत सतरंजी घेऊन जावे लागायचे. त्या चित्रपटाच्या जाहिराती म्हणजे वेगळंच काम होतं.आर्णीला अशीच एक बारमाही टॉकीज होती.तिथल्या भोंग्यावर आरती लागली की आता चित्रपट सुरू होणार हे गावकऱ्यांना कळायचे.यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या दोनोडा या मूळ गावी सकाळी घंटी वाजली की शाळा सुरू होणार हे कळायचे.सायंकाळी घंटी वाजली की मारूतीच्या देवळात आरती सुरू होणार हे कळायचे.आर्णीत आरती सुरू झाल्यावर चित्रपट सुरू होणार हे कळायचे.आरती म्हणजे प्रत्यक्षातील आरती नव्हे.तर 'मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की' ही रेकॉर्ड!
     हळू हळू भटांच्या गझला स्वरबद्ध व्हायला लागल्या. आणि आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करायचे ठरवले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी पहिला प्रयोग केला.त्यात एक गझल भटांनी त्यांच्या पद्धतीने सादर करायची व नंतर मी हार्मोनियम तबल्यासह ताला-सुरात एक गझल सादर करायची.हा कार्यक्रम लोकांनी आनंद घेत ऐकला.पण आम्हा दोघांनाही त्यात मजा आली नाही.कारण एकाची लिंक लागत नाही तो दुसऱ्याचा नंबर यायचा. तेव्हा दोघांनी अर्धा अर्धा कार्यक्रम करायचे ठरवले.हा प्रयोग यशस्वी झाला.
त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीने अनेक कार्यक्रम केले.१९८२ च्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण तीन तासांची मैफल होईल इतक्या गझला स्वरबद्ध झाल्यावर फक्त माझ्या गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या तीन तासाच्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः सुरेश भटांनी केले.शीर्षक होते
"#अशी_गावी_मराठी_गझल"! दुसऱ्या दिवशी याच शिर्षकाचा स्वतः भटांनी निवेदन केलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवडक रसिकांसमोर सादर करून प्रसारित करण्यात आला.त्या नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृह,मराठे यांचे संगीत विद्यालय अशी कार्यक्रमांची रांग लागली.पश्चिम महाराष्ट्रातील काही कार्यक्रमाचे सूत्र संचालन कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी तर कधी पुण्यातील प्रसिद्ध संगीत समीक्षक श्रीरंग संगोराम करायचे.राजवाडे सभागृहातील कार्यक्रमाला तर नावाजलेले भावगीत गायक गजाननराव वाटवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     अशा प्रकारे 'अशी गावी मराठी गझल' च्या मैफली गाजत असताना १९८२ च्या शेवटास  मी स्वरबद्ध केलेल्या गझलांची कॅसेट काढावी असे भटांच्या मनात आले.तसे अलुरकरांशी बोलणेही झाले.त्या काळी पुण्याच्या अलुरकर म्युझिक कंपनीचे महाराष्ट्रभर नाव होते.सुरेश भटांनी मला तसे पत्रही पाठवले.त्यात या कॅसेटचे संगीत संयोजन आनंद मोडक करतील असाही उल्लेख होता.(ते पत्र व माझ्याकडे लिहिलेली नात खाली देत आहे.) नंतर कुठे माशी शिंकली कोण जाणे.हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.पण लगेच एच एम व्ही कंपनीने काढलेली सुरेश वाडकरांच्या आवाजातील सुरेश भटांच्या गीत-गझलांची कॅसेट बाजारात आली.संगीतकार होते स्व.रवी दाते.
    ही सुवर्णसंधी हुकल्यानंतर मी या संदर्भात शेवटपर्यंत भटांशी बोललो नाही.शेवटी वीस वर्षांनंतर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला सुरेश वाडकरांकडून गाऊन घेण्याची संधी मला मिळाली.२०१२ मध्ये युनिव्हर्सल कंपनीतर्फे "#काट्यांची_मखमल" हा अल्बम बाजारात आला.या अल्बममध्ये वैशाली माडे माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वप्रथम वाडकरांसोबत युगल गझल गायिली.त्या नंतर सुरू झालेले माझे काम आज २०२४ मध्येही त्याच जोमाने सुरू आहे. 
    (तसा तर २००६ मध्ये टी सिरीजने बाजारात आणलेला  #अर्चना हा पंडित शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजातील भक्तीगीतांचा अल्बम पहिला आहे. पुण्यात स्थायिक झाल्यावर खरे काम तेथून सुरू झाले.) 
१९८२ #मध्येच_जर_पहिला_अल्बम_बाजारात_आला_असता_तर?

Saturday, January 20, 2024

राग रंग (लेखांक ३९) गोरखकल्याण

                             
राग गोरख कल्याण सम सम्वाद द्वितीय रात्रि  ओडव षाडव मान ।
थाट खमाज मानत गुनि जन , गोरख राग बखान ।।

   गोरख कल्याण हा उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील खमाज थाटोत्पन्न राग आहे. हे नाव उत्तर प्रदेशातील गोरखपुर मधील एका परिसरातील लोक-गीतामधून उत्पन्न झाल्याने पडल्याचे मानल्या जाते. नाव जरी गोरख कल्याण असले तरी यात कल्याण दिसत नसल्यामुळे काही संगीतकार, गायक, संगीततज्ज्ञ
याला फक्त गोरख म्हणणे पसंत करतात.हा एक अतीशय गोड राग आहे. उत्तर भारतीय संगीताच्या नियमानुसार रागातील आरोहावरोहात पाच स्वर आवशयक असतात.पण गोरख कल्याण हा एकमेव असा राग आहे की, ज्यातील आरोहात कोमल निषाद वक्र स्वरूपात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सा रे म ध हे फक्त चारच स्वर लागतात.ही एक मजेशीर बाब आहे.असो!
     या रागात मध्यम स्वर एकदम मजबूत आहे. वादी स्वर षड्ज असून या स्वरासोबत मध्यम स्वर हा एक विश्राम स्वर पण आहे, जो याला 'नारायणी' रागापासून वेगळा करतो. (कर्नाटक संगीतामधून आलेला नारायणी राग खमाजचाच एक प्रकार आहे. गांधार वर्ज करून खमाज गायिला की तो नारायणी होतो.दक्षिणेतील 'हरिकांभोजी' थाट खमाज थाटाप्रमाणे आहे.)/नारायणी रागाचा वादी आणि न्यास स्वर पंचम आहे. गोरख कल्याणमधील मन्द्र सप्तकातील  कोमल निषाद हा विश्राम स्वर आणि रागाचे  प्रमुख लक्षण दाखविणारा स्वर आहे.आरोहातील वर्जित निषाद या रागाला  बागेश्री पासून वेगळा करतो किंवा ठेवतो.तसेच पंचम वर्ज असल्यासारखाच असल्यामुळे दुर्गा रागाला पण दूर ठेवतो.  आरोहात  कोमल निशादाचा अल्प प्रयोग सर्वत्र केल्या जातो. आणि त्यामुळे या रागाचे सौंदर्य अधिक वाढते.तसेच यात पंचम या स्वराचाही अल्प प्रयोग करून रंजकता वाढविण्याचा प्रयत्न  केल्या जातो. अर्थात काही संगीतकार याच्याशी सहमत नाही.या रागाचा विस्तार तीनही सप्तकांमध्ये केल्या जातो.हा विस्तार अतिशय मनमोहक असतो.
     याचा वादी स्वर षड्ज व संवादी स्वर मध्यम आहे. काही विद्वान याचा वादी स्वर मध्यम व संवादी स्वर षड्ज मानतात. पण गानसमय मात्र रात्रीचा दुसरा प्रहर मानतात.म्हणून मग वादी संवादीच्या दृष्टीने उत्तरांग प्रधान आणि गानसमयाच्या दृष्टीने पूर्वांग प्रधान व्हायला हवा.वास्तविकता ही आहे की,गोरख कल्याण पूर्वांग प्रधान राग आहे.त्यामुळे अधिकांश विद्वानांनी षड्ज,मध्यम स्वराला वादी,संवादी स्वर म्हणून मान्यता दिली आहे. रागातील वादी संवादी स्वरांचे स्थान बुद्धिबळातील राजा व वजीरा प्रमाणे असतात,हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.गोरख कल्याण रागात तर यांचे विशेषच महत्व आहे.व ते सतत जाणवत असते.बाकी सगळे स्वर या दोन स्वरांभोवती अक्षरशः गोंडा घोळताना दिसतात.
आरोह- सा  रे म, ध S (कोमल)नी ध सां
अवरोह- सां ध ध (कोमल)नी ध  म, रे म रे सा (कोमल) ऩी S ध़ सा
पकड- (कोमल) नी ध म, रे म रेसा (कोमल) ऩी S ध़ S सा, रे म
     (एके काळी मुक्त असलेली संगीत कला काही काळानंतर मंदिर, राज-दरबार, सरदार-जागीरदार भवन आणि कोठे वगैरे मधून मुक्त होऊन आकाशवणीमध्ये बंद होते की काय,अशी परिस्थिती असताना पुन्हा संगीत प्रसारक,लेखक, संशोधक,
गायक,वादक यांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.शाळा,महाविद्यालयातून संगीताचे सूर घुमायला लागले.
मोठं-मोठी संमेलने व्हायला लागली.पण गेल्या काही वर्षात शाळांतमधील संगीत विषय बंद करण्याकडे सरकार व संस्थाचालकांचा कल दिसायला लागल्यामुळे शाळेत किलबिलणारे संगीताचे स्वर हळू हळू लोप पावत चालले आहेत. पुढे चालून महाविद्यालयातील संगीत विभाग बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जे संगीत मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते,ज्या संगीतामुळे सर्व जग एकत्र येऊ शकते त्या संगीत विषयाला सर्वत्र दुय्यम,तिय्यम स्थान दिल्या जायचे.आणि आता तर स्थानच न ठेवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.असो..'कालाय तस्मै महा'!)

     उस्ताद सलामत अली नजाकत अली खान,गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी,कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, उस्ताद उमीद अली खान, पंडित राजन साजन मिश्र,मालिनी राजूरकर, श्रुती सडोलीकर,  विणा सहस्रबुद्धे, पंडित जगदीश प्रसाद, उस्ताद राशिद खान,परवीन सुलताना, देवकी पंडित,अरमान राशिद खान,संजीव अभ्यंकर,सम्राट पंडित (जगदीश प्रसाद पंडितचा मुलगा), पं. कैवल्यकुमार गुरव, जयतीर्थ मेउंडी,  रमाकांत गायकवाड, मौमिता मित्रा, डॉ.प्रवीण गावकर,  झीशान खान, रागेश्री वैरागकर, आस्था-प्रदीप चोप्रा (धृपद),ऋषी-वरुण मिश्रा, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, राजेश-रिषभ प्रसन्ना, गुलाम हसन खान, देवर्शी भट्टाचार्य, राजेंद्र कंदलगावकर, अर्चना कान्हेरे, गिरीश गोसावी, डॉ. कल्याणी देशमुख,शुजात अली खान, सुमित्रा गुहा, परितोष पोहनकर, मनाली बोस, अमित कुमार रथ, पं. तुषार दत्त, पं. देवशीष डे, मेघना घेरकर, विनय रामदासन, रोंकिनी गुप्ता.
     पंडित बुधादित्य मुखर्जी (सतार), डॉ.एन. राजम (व्हायोलिन)  उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया (बासरी)-सुनील देव (सतार) जुगलबंदी, राहुल शर्मा (संतूर), पुर्बायन चटर्जी (सतार), सौमिक दत्त (सरोद), संदीप चटर्जी (संतूर), विनय भिडे (गायन)-अनिर्बन दासगुप्ता (सरोद) जुगलबंदी, पं. सुब्रतो डे (सतार), साकेत साहू (व्हायोलिन), फारुख लतीफ (सारंगी), पंडित विश्वमोहन भट (मोहनवीणा)-रोनू मुजुमदार (बासरी) जुगलबंदी, लोकेश आनंद (शहनाई), पं. रबीन घोष (व्हायोलिन), विष्णू देव (बासरी), एस.आकाश (बासरी), नारायण हिरेकोलची (व्हायोलिन), देबस्मिता भट्टाचार्य (सरोद), कमला शंकर (हवाइयन गिटार) या कलाकारांचे गायन/वादन युट्युबवर उपलब्द्ध आहे.
 ● या रागावर आधारित हिंदी,मराठी चित्रपट गीते ,गझला,आणि भक्तीगीते...
'दिल की कश्ती भवर में आयी है' लता. चित्रपट-पालकी, संगीत-नौशाद (१९६७). 
'बा होशो हवास में दिवाना' रफी.चित्रपट-नाईट इन लंडन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६७). 
'फिर भोर भई जागा मधूबन' देवकी पंडित. चित्रपट-साज, संगीत-उस्ताद झाकिर हुसैन (२०१०). 
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' लता. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
'किसी रंजीश को हवा दो के मै जिंदा हूँ अभी' चित्रा सिंग. 
'दोस्त बन बन के मिले मुझ को मिटाने वाले' जगजीत सिंग.
कबीर भजन- अभिजीत शेनॉय.अल्बम-निनाद (२०१४). 
'सलोनी सांवरी सुरत' गायिका-सुस्मिता दत्त, भजन. 
'मन लोभले मन मोहने' पंडित जितेंद्र अभिषेकी. संगीत-राम फाटक. 
'कंठातच रुतल्या ताना' आशा भोसले. गीत-गंगाधर महांबरे, संगीत-श्रीनिवास खळे (१९९९). 
'स्वप्नात साजणा येशील का' आशा भोसले. चित्रपट-गोंधळात गोंधळ, संगीत-विश्वनाथ मोरे. 
'मोगरा फुलला' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
----------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.१४ जानेवारी २०२४


 

Wednesday, January 10, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २३) ●आर्णीतील उपद्व्याप●


      आर्णीला नोकरी तर मिळाली.पण घर मिळणे कठीण होऊन बसले होते.संगीतवाले म्हणजे बँड, तमाशेवाले असा काहीतर समज आर्णीकरांचा होता.आणि तो संयुक्तिक असावा.कारण त्यावेळी वीस हजार लोकवस्तीच्या या गावात बाराही महिने तमाशाचा फड ठिय्या देऊन असायचा.कशी-बशी एक खोली मिळाली.पण मालक इतका कटकट्या होता की, छोटे अडॅप्टर लावून ट्रान्झिस्टर रेडिओ लावला तर इलेक्ट्रीक बिल वाढते म्हणून ओरडायचा. मी यवतमाळात जरी मस्ताडलेला प्राणी होतो तरी आर्णीत मात्र मास्तर असल्यामुळे गोगलगाय झालो होतो.पहिली दोन वर्ष मला कठीण गेली. पण नंतर लक्षात आले की येथे शेर नाही तर सव्वाशेर झाल्याशिवाय काही आपला निभाव लागणार नाही.म्हणून मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.प्रथम संगीत विद्यालय सुरू केले.नंतर संगीत विद्यालयातर्फे छोटे-मोठे सांगीतिक कार्यक्रम सुरू   केले.संस्थाध्यक्ष चितघनानंदजी भारती नाटकाचे शौकीन होते.त्यांना मला घेऊन संत दामाजी हे नाटक बसवायचे होते.या नाटकात ते बिदरच्या बादशहाचे पात्र करून मला दामाजीपंत बनवणार होते. परिसरात भारतीजींचा रुबाब एखाद्या बादशहापेक्षा कमी नव्हता.पण त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे नाटक काही रंगमंचावर आले नाही.
        छोट्या-मोठ्या सांगीतिक कार्यक्रमामुळे आर्णी व परिसरातील संगीत प्रेमी हळू हळू माझ्याशी जुळायला लागले.तसेही रोजच्या शालेय प्रार्थना,१५ ऑगष्ट,२६ जानेवारीच्या कार्यक्रमातील सहभागामुळे माझ्याबद्दल गावकरी व विद्यार्थ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हायला लागला होता.शाळेत मी अत्यंत कडक होतो.पण शाळेच्या बाहेर 'मऊ मेणहूनी...'! गावातील काही संगीत प्रेमींच्या सहकार्याने साहित्य,संगीताच्या जोपासनेसाठी 'स्वर-गंगा' ही संस्था स्थापन करून शाळेच्या विज्ञान विभागाच्या हॉल मध्ये कार्यक्रम घेणे सुरू केले.या उपक्रमा करीता शाळेतील संगीत प्रेमी शिक्षकांसोबतच मुख्याध्यापक स्व.शंकरराव बुटले गुरुजींचे मोलाचे सहकार्य मिळत होते.वरील सगळ्यांच्या सहकार्यामुळे अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख स्व.पंडित बाळासाहेब कासलीकर,नागपूर आकाशवाणीचे तार शहनाई वादक स्व.बाबासाहेब देशपांडे, कविवर्य स्व.सुरेश भट,दैनिक तरुण भारतचे संपादक स्व.वामन तेलंग,विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार स्व.आप्पामार्जिने, कवी स्व.शंकर बडे, प्रा.श्रीकृष्ण राऊत,मिराताई ठाकरे,नारायण कुळकर्णी कवठेकर,हास्य सम्राट फेम मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी यांचे कार्यक्रम आयोजित करता आले तसेच सिंधुताई सपकाळ, विसुभाऊ बापट यांचे, शाळेसह आर्णीच्या विविध संस्थांमध्ये कार्यक्रम आयोजित करून आर्थिक मदत मिळवून दिली आहे.या वेळी प्रत्येकाचा मुक्काम माझेकडेच असायचा.सिंधुताई सपकाळ तर अनेकदा आर्णीला येऊन गेल्या.(त्या वेळी त्या सेलिब्रेटी नव्हत्या.) आणि जितके दिवस कार्यक्रम असेल तितके दिवस त्यांचा मुक्काम माझ्याकडे असायच्या. सुलभा सगळ्यांची आवभगत अगदी जिव्हाळ्याने करायची.
        पण गावातील लोकप्रियता,शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन असो की, १५ ऑगस्ट,२६ जानेवारी असो माझा वावर आणि सहभाग लक्षणीय असायचा. त्यामुळे मुख्याध्यापक,
संस्थाध्यक्ष यांची माझ्याशी विशेष जवळीक असायची.या सगळ्यामुळे काही शिक्षकांच्या पोटात दुखायला लागले.व त्यांच्या 'काड्या' सुरू झाल्या.त्यावेळी मी ऑर्केस्ट्रामध्ये असल्यामुळे कार्यक्रम सुरूच असायचे.मी आर्णीला आणि ऑर्केस्ट्रा ग्रुप यवतमाळला.ज्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती त्या काळात शाळा करून बाहेरगावचे कार्यक्रम करणे किती जिकरीचे असेल हे वाचक जाणू शकतील.मग कधी कधी सलग कार्यक्रम असले की,शाळा संपल्याबरोबर यवतमाळ गाठणे.तेथून भाड्याच्या बसने कार्यक्रमाचे गाव गाठणे,कार्यक्रम करून वापस यवतमाळ व सकाळची पहिली बस पकडून आर्णी...सरळ शाळेत.जागरणामुळे डोळे लाल असायचे.नेमके हेच पकडून पर्यवेक्षकाने 'कदम सर माझ्याकडे लाल डोळे करून बघतात',अशी तक्रार मुख्याध्यापकांकडे करणे,शाळेपेक्षा कार्यक्रमाकडे त्यांचे लक्ष असते, तासिकांवर उशिरा जातात,शिक्षक कक्षात झोपतात वगैरे वगैरे बालिश तक्रारी सुरू झाल्या.परंतू मुख्याध्यापक (स्व.शंकरराव बुटले) व संस्थाचालक (स्व.राजकमलजी भारती) माझी ससेहोलपट बघत असल्यामुळे त्यांच्याकडे तक्रार गेल्यावर दुर्लक्ष करायचे.
       १९७२ ते २००३ या ३१ वर्षांच्या कालखंडात मी आर्णीत बरेच उपदव्याप केलेत.गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना, इयत्ता १ ते १० वीच्या पाठयापुस्तकातील कवितांना स्वरबद्ध करून 'झुला' नामक कॅसेटची तीन भागात निर्मिती, शाळेत 'दत्त जयंती उत्सव समिती', गावात 'शिवजयंती उत्सव समिती स्थापन करून शिवजयंती उत्सव साजरा करणे',विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धा,मराठी गीत-गझल गायन स्पर्धा, आकाशवाणी सांस्कृतिक संध्या, नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय कला मंडळ','शिवसेनेची स्थापना', 'पत्रकार संघाची स्थापना', 'मराठा सेवा संघ',' वृक्षारोपण कर्यक्रम',वऱ्हाडी कवी संमेलन, हास्य-व्यंग (हिंदी) कवी संमेलन वगैरे वगैरे...या सगळ्या उपदव्यापात आर्थिक गणित मात्र 'व्यस्त' असायचे.त्यामुळे बायको 'त्रस्त' असायची. पण या व्यस्त-त्रस्ततेची झळ तिने मला कधीच लागू दिली नाही.
---------------------------------------------------------------------
गांधर्व संगीत विद्यालयाच्या वार्षिकोत्सव प्रसंगी आयोजित हास्य-व्यंग कवी संमेलनातील कवींचे स्वागत करताना मी... डावीकडे खाली बसलेले, सुप्रसिद्ध मंच संचालक व कवी किरण जोशी आणि एकदम उजवीकडे, प्रसिद्ध हास्य-व्यंग कवी एहसान कुरेशी. #Kiranjoshi #ehsanquraishi #sudhakarkadam


 

Saturday, January 6, 2024

राग_रंग (लेखांक ३८) ललित


    ललित हा फार प्राचीन राग आहे.याच्या जातीबद्दल व त्यात घेतल्या जाणाऱ्या स्वरांबद्दल विभिन्न मते असून बराच वाद आहे.सध्या मात्र दोन अलग अलग ललित आहेत.एक पूर्वी थाटातून उत्पन्न होणारा कोमल धैवत असलेला ललित.दुसरा मारवा थाटातून उत्पन्न होणारा शुद्ध धैवत असलेला ललित.(मारवाआणि पूर्वी क्रमशः कर्नाटक पध्दती मधील गमनाश्रम आणि कामवर्धिनी मेलकर्ता आहे.) यातील पूर्वी थाटोत्पन्न ललित उत्तर भारतीय संगीतामध्ये जास्ती लोकप्रिय आहे.यात पंचम स्वर नसल्यामुळे याची जाती षाडव षाडव आहे.यात रिषभ,धैवत स्वर कोमल असून दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.पण यातील मध्यम स्वर केदार,हमीर,
गौडसारंग, बिहाग,बसंत,मारुबिहाग,पुर्वी वगैरे रागाप्रमाणे येत नाही.ललित मधील मध्यम स्वराला षड्ज समजून ललितचे स्वर घेतल्यास तोडी राग स्वच्छपणे दिसतो.
ललित रागाचे वैशिष्ठय म्हणजे याच्या अवरोहात दोन्ही मध्यम पाठोपाठ घेतल्या जातात.ज्यामुळे हा राग स्पष्टपणे दिसून येतो.परज,पुरिया धनाश्री,पूर्वी,श्री हे राग पूर्वी थाटजन्य असले तरी प्रत्येकाचा गानसमय वेगवेगळा आहे.हे विशेष.थाट म्हणजे घरचा प्रमुख व राग म्हणजे त्याची वेगवेगळ्या स्वभावाची पण एकमेकांशी घट्ट जुळलेली मुले...असेच काहीसे! ललीतचा गानसमय प्रातःकाल आहे.वादी स्वर शुद्ध मध्यम व संवादी स्वर षड्ज आहे.हा एक मध्यम स्वर प्रधान राग आहे.ललित नाव 'ललिता' शब्दापासून आले असावे.ज्याचा अर्थ कोमल,आकर्षक,सुंदर,मधुर आवाजाचा/ची वगैरे...
     कोणत्याही रागाच्या स्वरांशी मैत्री करण्याचा सोपा उपाय म्हणजे चित्रपट गीते.चित्रपट संगीतामध्ये प्रयोग केल्या जाणारे राग व मैफलीत गायक/वादकांद्वारे शास्त्रीय संगीत ऐकणे हे शास्त्रसार समजून घेण्यास उपयोगी पडते.हा माझा ऑर्केस्ट्रातील वावरामुळे अनुभव आहे.
        शास्त्रीय संगीत शिकत असताना ललित राग शिकलो.पण भिडला तो पंडित जसराज यांच्या 'रतनारे नैनो में मोहन की मूरत' या झपतालातील चिजेने,संगीत मृच्छकटिक नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायिलेल्या 'हे सखी शशी  वदने' या नाट्यगीताने,आणि नंतर जगजीत सिंगच्या १९७९ मध्ये आलेल्या 'come alive' अलबम मधील सईद राही यांच्या 'कोई पास आया सवेरे सवेरे' या गझलच्या बंदीशीने... अगदी पार वेडे केले होते.दहा मात्राचा झपताल न वापरता फक्त पाच मात्रा वापरून ही बंदिश बनविली होती. त्यातही सुरवातीलाच गांधाराला षड्ज करून ललीतमध्ये भूपाची छाया दाखवत घेतलेला आलाप,मधील गिटार सोबतचे 'नोटेशन' सगळंच अफलातून होतं ! तेव्हापासून मी ललिताच्या जो प्रेमात पडलो तो आजतागायत.
       काही गुणीजणांचा थाट या प्रकारावर/बद्दल आक्षेप आहे.ते म्हणतात थाटाच्या कितीतरी अगोदर राग अस्तित्वात आले.राग गायिल्या जातात,थाट नाही.त्यामुळे थाटाला जनक म्हणनेच मुळात चूक असून,राग एक निश्चित स्वरसमूह असून त्या अंतर्गत थाट येत असतो.तसेच थाट पद्धतीत अनेक विसंगती दिसून येते.त्यामुळे थाटापेक्षा रागांग प्रकार योग्य वाटतो.प्रत्येक रागाची एक विशेषता असते.ओळख असते.
ज्यामुळे तो ओळखल्या जातो.ही विशेषता थाट पद्धतीमध्ये नेहमी दिसत नाही.
    उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. डी. व्ही. पलुस्कर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अमीर खान, पं.रवी शंकर,  कुमार गंधर्व, पं. मणी प्रसाद, किशोरी आमोणकर,पं जितेंद्र अभिषेकी, इंद्राणी मुखर्जी, पं. जगदीश प्रसाद, परवीन सुलताना, पं. जसराज, पं. भीमसेन जोशी,पं.अजय चक्रवर्ती,उस्ताद राशिद खान,पं. हरिप्रसाद चौरसिया,डॉ.अश्विनी भिडे, पं. निखिल बॅनर्जी, पं.उल्हास कशाळकर, पं. व्यंकटेश कुमार, पं. राजन साजन मिश्र, पं. विजय कोपरकर, पं. रॅम कुमार मलिक,समित मलिक, उस्ताद मशकुर अली खान वगैरे गायक/वादकांनी सादर केलेला ललित युट्युबवर उपलब्ध आहे.
● हिंदी,उर्दू...
'प्रीतम दरस दिखाओ' लता. चित्रपट-चाचा जिंदाबाद, संगीत-मदन मोहन (१९५९). 
'तू है मेरा प्रेम देवता' मन्ना डे,रफी.चित्रपट-कल्पना, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९६०)
'एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल' लता,रफी. चित्रपट-लीडर, संगीत- नौशाद (१९६४). 
फारसी गझल...झकेरीया राहीं.चित्रपट-लीडर (१९६४)
'तू है सरापा ताजमहल' गायक-उस्ताद नजाकत अली, सलामत अली.चित्रपट-ताजमहल (पाकिस्तान).संगीत-निसार बजमी (१९६८). 
'बडी धीरे जली रैना भी' रेखा भारद्वाज. चित्रपट-इश्किया, संगीत-विशाल भारद्वाज (२०१०). 
'साच कहूँ सून ले सभई' गायक-भाई संदीप सिंग हजुरी रागी, पंजाबी.गुरुबानी. 
'कोई पास आया सवेरे सवेरे' गायक/संगीतकार-जगजीत सिंग. उर्दू गझल. 
● मराठी...
'ते माझे घर,ते माझे घर,जगावेगळे असेल सुंदर' आशा.संगीत-सुधीर फडके, चित्रपट-पोष्टातील मुलगी (१९५४). 
'विनायका हो सिद्ध गणेशा' गायक-रामदास कामत, संगीत-विश्वनाथ मोरे.नाटक-दार उघड बया दार उघड. 
'हे सखे शशी वदने' गायक-पंडित जितेंद्र अभिषेकी. नाटक-संगीत मृच्छकटिक. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि. ७ जानेवारी २०२४.


 

राग-रंग (लेखांक ३७) राग आसावरी

              
दहा थाटांची ग्रंथानुसार शास्त्रीय माहिती...

भैरव भैरवि आसावरी, यमन बिलावल ठाट।
तोड़ी काफ़ी मारवा, पूर्वी और खमाज।।
शुद्ध सुरन की बिलावल, कोमल निषाद खमाज
म तीवर स्वर यमन मेल, ग नि मृदु काफ़ी ठाट।।
गधनि कोमल से आसावरी, रे ध मृदु भैरव रूप।
रे कोमल चढ़ती मध्यम, मारवा ठाट अनूप।।
उतरत रे ग ध अरु नी से, सोहत ठाट भैरवी।
तोड़ी में रेग धम विकृत, रेधम विकृत ठाट पूर्वी।।

      प्राचीन भारतीय संगीत तज्ज्ञांच्या मतानुसार आसावरी राग 'श्री' रागाची प्रमुख रागिणी आहे.ऋतू,वेळ,भाव आदींचे वैज्ञानिक विश्लेषण करून त्यांनी १३२ प्रकारच्या राग-रागिणींची कल्पना केली आहे.परंतू आधुनिक विद्वानांनी हा भेद बाजूला ठेवून सगळ्याला राग ही संज्ञा दिली असल्याचे म्हटले आहे.या रागांची लक्षणे इ.स.१८९९ मधील 'रागप्रकाशिका' या ग्रंथात दिली आहेत.
     आसावरी हा एक थाट असून त्यातूनच निर्माण झालेला आसावरी राग होय.याला जनक राग असेही म्हणतात.यात गांधार,धैवत व निषाद हे तीन स्वर कोमल आहेत.वादी स्वर कोमल धैवत असून संवादी स्वर कोमल गांधार आहे. 
आरोह: सारेमपध॒सां
अवरोह: सांनि॒ध॒पमग॒रेसा
पकड़: रेमपनि॒ध॒प
हा राग उत्तरांगवादी आहे. जातीऔडव-संपूर्ण असून गानसमय दिवसाचा प्रथम प्रहर आहे. आसावरी थाट उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामधील महत्वाचा मानल्या जातो. भातखंडे पद्धतीनुसार वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या रागांचा अंतर्भाव होतो. खट, झीलफ यांचाही समावेश याच थाटात करण्यात येतो. या सर्व रागांचे तीन उपवर्ग पडतात : (१) दोन्ही गंधार घेणारे खट, झीलफ, देवगांधार (२) दोन्ही ऋषभ घेणारे गंधारी, सिंधुभैरवी (३) अवरोहात धैवत वर्ज्य करणारे दरबारी कानडा व अडाणा.हिंदुस्थानी संगीतशास्त्रानुसार दरबारी कानडा, अडाणा व कौशी हे राग रात्रिगेय असून या थाटातील बाकीचे राग दिनगेय आहेत. दाक्षिणात्य पद्धतीतील नटभैरवी मेल आसावरी थाटाशी जुळता आहे. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये आसावरी थाटाला  'नटभैरवी मेल' या नावाने ओळखतात.
     आसावरीच्या मूळ स्वरूपात रिषभ,गांधार, धैवत व निषाद ह्या चार कोमल स्वरांचा उपयोग केल्या जात होता.जवळ जवळ भैरवी प्रमाणेच. जेव्हा पंडित भातखंडे यांनी उत्तर भारतीय रोगांना दहा थाटात बंदिस्त केले तेव्हा त्यांनी थाटाच्या प्रमुख रागाच्या स्वरूपात आसावरी रागाला शुद्ध रिषभाच्या रुपात निवडले.त्यामुळे मूळ आसावरी रागाला 'कोमल रिषभ आसावरी' या नावाने ओळखल्या जायला लागले.नवीन आसावरीमुळे,आसावरीची लोकप्रियता कमी होऊन जौनपुरी रागाची लोकप्रियता वाढली.गमतीची गोष्ट अशी आहे की, शुद्ध रिषभाच्या आसावरीपेक्षा जौनपुरीची लोकप्रियता वाढल्यामुळे कोमल रिषभ आसावरी पुनः लोकप्रिय झाला.फक्त 'आसावरी' हे शीर्षक असलेले बहुतेक ध्वनिमुद्रण कोमल रिषभ आसावरी रागात आहे, देव गंधार रागात कोमल गांधारासोबतच शुद्ध गांधाराचाही अल्प प्रयोग केल्या जातो.आसावरी,जौनपुरी व देवगंधार हे तीनही राग जवळ जवळ सारखेच आहेत.पंडीत ओंकारनाथ ठाकूर यांचेसह अनेक संगीत विशेषज्ञ आसावरी व जौनपुरी या दोन रागांना वेगळे मानत नव्हते. तसेच काही गायक कोमल रिषभ आसावरीला 'आसावरी तोडी' असे पण संबोधतात.एक 'जोगी आसावरी' पण आहे.
      शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम आसावरी व नंतर जौनपुरी राग शिकलो.पण दोन्ही राग इतके सारखे आहेत की, कोणत्या रागात कोणते स्वर कसे घ्यायचे ते कळत नव्हते.त्यातही जौनपुरी कळला तो किशोरी आमोणकारांचा ऐकल्या नंतर. कोमल रिषभ आसावरी तर त्यावेळी माहीतही नव्हता.सर्वप्रथम आकाशवाणीवरुन पंडित भीमसेन जोशी यांच्या ऐकण्यात आला.तेव्हा कळला. नवीन नवीन राग माहिती करून घेण्याची उत्सुकता असायची.पण सांगणार कोण?विचारणार कोणाला? आर्थिक परिस्थितीमुळे मानसिक परिस्थियी पण गरीबच ठेवावी लागायची.असो!
     उत्तर भारतीय शीख प्रणालीत आसावरी व कोमल रिषभ आसावरी हे दोन्ही राग दिसून येतात.हे दोन्ही राग श्री गुरू ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचा एक एक हिस्सा आहे.तसेच शीख गुरू श्री रामदासजी आणि श्री गुरू अर्जुन देवजी यांनी या रागांचा प्रयोग केल्याचा उल्लेख आहे.श्री गुरू ग्रंथ साहेबात कोमल रिषभ आसावरी 'राग असावरी सुधंग' या रुपात दिसून येते.
     उस्ताद बडे गुलाम अली खान, सवाई गंधर्व, पंडित ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद अमीर खान, उस्ताद शराफत हुसैन खान, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज,पंडित राजन साजन मिश्र, मंजिरी आलेगावकर, पं. उल्हास कशाळकर, पं. उदय भवाळकर, पं.जयतीर्थ मेवूंडी, पं. व्यंकटेश कुमार, पं.सुरेश बापट (जोगी आसावरी), पंडित राधा गोविंद दास, 
उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), उस्ताद असद अली खान (रुद्र वीणा), इम्रत खान (सुरबहार), पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), आतिष मुखोपाध्यय (सरोद)...यात आसावरीचे सर्व प्रकार आलेले आहेत.पंजाबी भक्तिगीते व कीर्तन यात बहुतेक शुद्ध रिषभाचा आसावरी दिसतो.
 
● आधारित चित्रपट गीते...
'चले जाना नहीं नैना मिलाके' लता. चित्रपट- बड़ी बहन,संगीत-हूस्नलाल भगतराम (१९४९). 
'तू ने हाये मेरे ज़ख़्म-ए जिगर को छू लिया' लता.चित्रपट- नगीना (जुना),संगीत-शंकर जयकिशन (१९५१). 
'ना ये चाँद होगा,न तारे रहेंगे' गीता दत्त, हेमन्त कुमार.चित्रपट - शर्त, संगीत-हेमन्त कुमार (१९५४). 
'पिया ते कहा गयो नेहारा' लता. चित्रपट-तूफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 
'बेरेहम असमान मेरी मंजिल बता है कहां' तलत महमूद.
चित्रपट-बहाना, संगीत-मदन मोहन (१९६०). 
 'मुझे गले से लगालो बहुत उदास हूं मैं' आशा,रफी.चित्रपट -आज और काल, संगीत-रवी (१९६३). 
'रुक जा रात ठहर जा रे चंदा' लता. चित्रपट-दिल एक मंदिर, संगीत-शंकर जयकिशन (१९६३). 
'लो आ गई उनकी याद वो नहीं आए' लता. चित्रपट-दो बदन, संगीत-रवी (१९६६). 
सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है' मुकेश. चित्रपट-तीसरी कसम, संगीत-शंकर जयकिशन (१९६६). 
'हमें और जीने की चाहत ना होती' किशोर कुमार.चित्रपट- अगर तुम ना होते, संगीत-आर.डी. बर्मन (१९८३). 
'सुन साहिबा सुन प्यार की धून, लता. चित्रपट-राम तेरी गंगा मैली, संगीत-रवींद्र जैन (१९८५). 
'जादू तेरी नज़र' उदित नारायण.चित्रपट- डर,संगीत-शिव-हरी (१९९३). 
'सिलसिला ये चाहत का ना मैं ने बुझने दिया' श्रेया घोषाल. चित्रपट-देवदास, संगीत-इस्माईल दरबार,मॉन्टी शर्मा (२००२). 

' तुम जिद तो कर रहे हो,हम क्या तुम्हे सुनाए' -मेहदी हसन (युट्युब पाकिस्तान). 
'जदों होली जय लेंदा मेरा ना' नूरजहाँ.- चित्रपट-अत्त खुदा दा वैर,(पाकिस्तान). 
'जब भी चाहें इक नई सूरत सजा लेते हैं लोग' मेहदी हसन.(पाकिस्तान). 
'मुझे आवाज दे तू कहां है' मेहदी हसन. चित्रपट-घूंघट (पाकिस्तान). 
● मराठी...
'अवघे गरजे पंढरपुर' पंडित जितेंद्र अभिषेकी. 
'काय वधिं मे ति सुमति'
'तीर्थ विट्ठल क्षेत्र विट्ठल' पंडित भीमसेन जोशी, संगीत-राम फाटक. 
प्रेमभावे जीव जगि या नटला' संगीत नाटक-मानापमान. 
'छेडिली मी आसावरी' सुधीर फडके. 
'दुर आर्त सांग कुणी छेडिली असावरी' मूळ गायक,संगीतकार माहीत नाही. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, दि.५ जानेवारी २०२४.


 

Wednesday, January 3, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २२)

.                       ●प्रश्न आणि उत्तर●

     काही प्रश्न आणि उत्तरे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही.मग तो शिक्षक असो,कलाकार असो की सामान्य माणूस असो! कारण प्रश्न एक व उत्तर दुसरे असा प्रकार नेहमीच घडत असल्याने तो एक मनोरंजनाचा भाग ठरतो. कसा?  हे बघा! दोन बहिरे सकाळी सकाळी भेटल्यावर...
'काय ? फिरायला निघाला वाटतं?' पहिला.
'नाही, नाही, फिरायला निघालो!' दुसरा.
'असं असं, मला वाटलं फिरायला निघालात.' पहिला.     
      १९८३ मध्ये  पुण्याच्या 'रस्टन ग्रीव्हज्' कंपनीतर्फे राजवाडे हॉलमध्ये माझा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम झाला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भावगीत गायक स्व. गजाननराव वाटवे हे होते.(माझ्याबद्दल "मला आवडलेला गझलिया" असा उल्लेख त्यांचा रोजनिशीमध्ये असल्याचे,दैनिक सकाळामध्ये आलेल्या त्यांच्यावरील एका लेखामुळे बऱ्याच कालावधीनंतर मला कळले.तो लेख माझ्याकडे आहे.) सूत्र संचालन सध्याचे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील, तत्कालीन प्रसिद्ध संगीत समीक्षक स्व. श्रीरंग संगोराम यांनी केले होते. कार्यक्रमानंतर एक व्यक्ती मला भेटायला आली व 'ओळखलं का?' हा प्रश्न बंदुकीच्या गोळीसारखा नेम धरून माझ्याकडे भिरकावती झाली,  मी पडलो भिडस्त ! (१९८२ मध्ये पुण्यात बरेच कार्यक्रम झालेले असल्याने कुणीतरी रसिक असावा म्हणून उगीच त्याला इतक्या लोकांमध्ये ओळखले नाही असे कसे म्हणायचे?) म्हणून 'वाऽ वाऽ ओळखले ना!' असे म्हणून सुटकायचा प्रयत्न करायला लागलो तर तो जवळ येऊन ह्याSSS ह्याSSS असे चार मजली हसत, 'मला वाटलंच ओळखाल म्हणून, उगीच नाही मी माझ्या भाच्याला सांगितलं!' असे म्हणून लहानग्या भाच्याला पुढे करून नमस्कार करायला सांगितले. मी प्रतिनमस्कार करून त्याला कटविण्याकरिता 'बराय येतो' असे म्हणताच तो जळूप्रमाणे चिटकून म्हणाला, 'मी सध्या पुण्यातच आहे. उद्या घरी या ना!' मी त्याला टाळण्याकरिता होयबाची भूमिका वठवत हो हो म्हणून जायला निघालो, तसा आडवा होऊन म्हणतो कसा, 'कसे याल?' मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते, तशी माझी झाली. माझ्या चेहन्यावरचे भाव पाहून त्याला मात्र आसुरी आनद झालेला मला दिसला आणि बरोबर पेचात पकडल्याचा आव आणत स्वतःचे नाव विचारायला लागला. आता मात्र माझे सातही स्वर बेसूर झाल्याचे लक्षात आले व अSSS आSSS SSS SSS SSS अशी बाराखडी सुरू झाली, पण आता का माघार घेतली तर पुढे कठीण जाईल हे लक्षात येऊन हो म्हणालो, 'चेहरा आठवतो हो, पण नाव काही आठवत नाही! खूप लोक ठिकठिकाणी भेटतात प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवू शकत नाही.' वगैरे वगैरे प्रकार करून त्याच्याकडून त्याचे नाव वदवून घेतले व कशीबशी बोळवण करून सुटकेचा श्वास टाकला. खरे म्हणजे त्याने सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीला मी कधीच भेटलो नव्हतो.
    शिक्षक असताना तर प्रश्न एक व उत्तर दुसरे असे नेहमीच घडत गेले. नागरिकशास्त्राच्या एका प्रश्नपत्रिकेत 'नागरी जीवनाचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता का असते?' असा प्रश्न होता. एका विद्यार्थ्याने उत्तर लिहिले, 'पावसाळ्यात खूप पाऊस येऊन नदीला पूर आल्यास घरे वाहून जाऊ नयेत म्हणून नागरी जीवनाचा पाया मजबूत करणे आवश्यक असते.' इतिहासाच्या एका प्रश्नपत्रिकेत 'बौध्दकालीन स्तुपांची माहिती लिहा' असा प्रश्न होता. उत्तर लिहिले गेले, 'बौध्द काळात दोन प्रकारचे तूप प्रसिध्द होते. १) गायीचे तूप २) म्हशीचे तूप.
     सातवीच्या विज्ञानविषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नासोबत 'आकृती काढा' असे लिहिले होते व एका पठ्याने प्रश्न सोडवून सोबत एक तोंड वासलेल्या कुत्रीचे चित्र काढले व त्याखाली 'ही आकुत्री आहे' असे मोठ्या टेचात लिहून ठेवले. ही उत्तरपत्रिका पूर्ण शाळाभर फिरली व दाद घेऊन गेली.
      याच प्रश्नपत्रिकेत दुसरा प्रश्न होता 'सुर्यकुलाचे घटक कोणते ?' उत्तर होते- तीळ, जवस, करडई, शेंगदाणा, वगैरे वगैरे सूर्यफुलाचे घटक आहेत. सूर्यकुलाला सूर्यफूल समजून इतरांना बिगफूल बनविणाऱ्या या विद्यार्थ्याचेही 'कौतुक' झाले.
     प्रश्न एक व उत्तरे दुसरे यातून इतिहासही सुटला नाही. एक प्रश्न होता, 'इतिहासातील दोन बाजींबद्दल थोडक्यात माहिती द्या.' एकाचे उत्तर होते, 'माझ्या घरी दोन ऐतिहासिक बाजी आहेत. एकीवर माहा बा झोपतो व एकीवर माही माय!'
     मायबोलीची चिरफाड तर सदैव सुरूच असते. याला कोण जबाबदार हे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनीच शोधावे. प्रश्न होता 'वर्णाचे प्रकार लिहा.' उत्तर होते, 'वर्णाचे दोन प्रकार आहेत १) साधे वर्ण २) फोडणीचे वर्ण.
     विद्यार्थ्यांचे एक सोडा, मोठी माणसे तरी प्रश्न तसे उत्तर देतात काय ? एकदा आणींच्या बसस्थानकावर चौकशी खिडकीवर जाऊन 'माहूर बस किती वाजता आहे?' असा प्रश्न फेकला तर तेथील चौकशी साहेब, होऽऽ होऽऽ, साहेबच मुद्राभिनय करून सल्ला देतो. 'टाईमटेबल देखो ना, एज्युकेटेड तो दिख रहे हो, कहाँ कहाँसे आ जाते यहाँ पर !' मला सांगा, हे प्रश्नाचे उत्तर झाले काय ?
     जगत असताना हे असेच सदैव घडत असते. प्रश्न विचारतो एक अन् उत्तर मात्र दुसरेच मिळत असते. बालपणी आईवडिलांची उत्तरे, तरुणपणी शिक्षक-प्राध्यापकांची उत्तरे, नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तरे व आयुष्यभर बायकोची उत्तरे... आपण ठोंब्या असल्याचा साक्षात्कार करणारीच असतात. त्याला मात्र इलाज नाही.


 





संगीत आणि साहित्य :