गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, October 18, 2023

आठवणीतील शब्द-स्वर (लेखांक ९)


                                  
    बालपण हवेसे-नकोसे

मित्रहो,
लग्नाची खरी मजा ग्रामीण भागातील लग्न कार्यातच येते.लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बैलगाड्या,त्यात चिल्ल्या-पाल्यांसह बसलेली वऱ्हाडी मंडळी,रस्त्यावरील प्रत्येक गावात शिरताना वाजणारी 'वाजंत्री',लग्नाच्या गावी पोहोचल्यावर होणारी तिथली व्यवस्था, जानवशावरील मुक्काम, पाहुण्यांचा गलबला, फाऱ्या लावून वर डहाळ्या टाकून केलेला 'एअर-कंडिशन' मंडप,  वधुपक्षाची धावपळ, लग्नानंतरच्या पंगती,लाडू खाण्याच्या शर्यती,पियक्कडांची रस्सेदार भाजीची खास तर्री वाली शेवटची 'सुवासिक' पंगत, ही सगळी मजा आता इतिहासजमा झाली आहे.बुफे युगात 'ते आले, लग्न लावले, जेवले व गेले' असे झाले आहे.
     माझ्या काकांचं लग्न मला आठवतं.वय किती ते मात्र आठवत नाही.बहुतेक पाच/सहा वर्ष असावे.त्यावेळी लग्न ठरलं रे ठरलं की पाहुण्यांची वर्दळ सुरू व्हायची ती लग्नानंतरचा सत्यनारायण आणि दुसऱ्या दिवशीची मटणाची खास पंगत आटोपल्याशिवाय संपायची नाही.डेळ-माथन,हळद असे एकामागे एक कार्यक्रम असायचे. या प्रसंगी नातेवाईकांसोबतच गावातील स्त्री पुरुष मंडळी पण असायची.काकांच्या लग्नात पण हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर नवरदेवाची वरात निघाली.लग्न वर्धा जिल्ह्यातील देवळी या गावी होते.दमनीत नवरदेव,पाठीमागे काही छकडे,बैलबंड्या,खाचरं यात वऱ्हाडी. आणि समोर डफडेवालले पैदल. गावातून निघताना डफडेवाल्यांचा गोंगाट संपला की पुढील गाव येईपर्यंत शांतता असायची.पुढच्या गावाची शिव लागली की गाव संपेपर्यंत डफडेवाले जीव तोडून वाजवायचे. असे करत करत एकदाचे लगीनगाव आले.नवरदेव व वऱ्हाडी यांच्या विश्रांतीसाठी केलेल्या एखाद्या इमारतीतील व्यवस्थेला जानोसा म्हणत.(ही व्यवस्था बहुतेक एखाद्या शाळेत केलेली असायची.)तेथे सगळ्यांची फराळ-पाण्याची व्यवस्था होती.लग्न मंडपातून नवरीकडच्या लोकांकडून निरोप आला की सर्वप्रथम मानवाईक मंडळी जायची.तिथे मंडपाबाहेर त्याचे पाय धुवून नारळ,शेला देऊन गळ्यात हार घालून स्वागत केल्या जायचे.तेथेही पानाचे तबकात सिगारेटची पाकीटं, विडीची बिंडलं फिरत असायची. नेहमी विडी पिणारे यावेळी सिगारेटचे झुरक्यावर झुरके मारतांना दिसायचे.नंतर नवरदेवाला घेऊन जाण्यासाठी नवरीचा भाऊ किंवा सख्खा भाऊ नसेल तर चुलत वगैरे भाऊ यायचा.आणि यावेळी नवरदेवाचे रुसण्याचे सोंग सुरू व्हायचे. मग रुसवा काढण्यासाठी नवरीकडचे मानवाईक येऊन रुसवा काढायचे.आणि नवरदेव एकदाचा लग्नमंडपात दाखल होऊन लग्न लागायचे.नंतर जेवणाच्या पंगती उठायच्या.शेवटची पंगत हमखास पेताड पाहुण्यांची असायची. त्यांच्यासाठी वांग्याच्या भाजीवरील तरी खास राखून ठेवलेली असायची. यानंतर निरोप समारंभ सुरू व्हायचा.याला हारा-डेरा म्हणायचे.नवरदेव नवरीने सगळ्यांच्या पाया पडणे,निघताना नवरीने घरच्यांच्या गळ्यात पडून रडणे होऊन नवरदेव नवरीसह परत निघायचा.(चौथी इयत्ता उत्तीर्ण होईपर्यंत म्हणजे १९६० पर्यंत मी एस.टी.पहिली नव्हती.जवळपासच्या गावी जायचं म्हटलं बैलगाडी एकमेव साधन असे. तसेच त्या काळात आजच्यासारखे एस.टी. चे जाळेही विणलेले नव्हते नातेवाईकांची गावे पण जवळपास असायची.जवळच्या नातेवाईकांकडे पैदल आणि दूरच्या नातेवाईकांकडे बैलगाडीने जायची पद्धत होती.)
     थोडे वय वाढल्यानंतर एखादी लग्नपत्रिका घरी येऊन पडली की, लग्नाला जायची तयारी सुरू व्हायची.कपड्यांचा वगैरे तेव्हा प्रश्न नसायचा.एक जोड रोज रोज वापरण्यासाठी व एक जोड खास कार्यासाठी असायचा. दिवाळीला शिवलेला ड्रेस पुढच्या दिवाळीपर्यंत नवाच ठेवायचा.तोपर्यंत मागच्या दिवाळीचा ड्रेस वापरायचा.त्यामुळे आमची खास तयारी म्हणजे चिंचा जमा करण्याची! लग्नघरी पोहोचलो की टिवल्या-बावल्या करत वेळ घालवणे,धिंगाणा घालणे,मारामाऱ्या करणे यात वेळ घालवायचो. पण नेमके लग्न लागायच्या वेळी मंगलाष्टकं सुरू झाली की,सजग होऊन बँडवल्यांसमोर ४/५ जण रांगेत बसायचो आणि 'वाजंत्री बहु गलबला' झाले की, सगळ्यांनी बँडवाल्यांना दिसतील, अशा प्रकारे चिंच खाणे, चोखणे सुरू करायचो.आमच्या या चिंचा प्रकारामुळे वाजंत्र्यांची  खऱ्या अर्थाने फेंssss फेंssss उडायची.या प्रकारामुळे शिव्या मिळून कधी कधी आमचाही बँड वाजायचा.पण यात मजा यायची.हळू हळू वय वाढत गेल्यावर बऱ्याच इतर गोष्टींचे ज्ञान वाढून जुन्या गमती जमती मधील मजा कमी होत गेली. पुढे स्वतःच भाग्योदय मंडळात अकॉर्डियन वाजवून 'सोफिस्टिकेटेड' बँडवाला बनलो.


 

Saturday, October 14, 2023

राग-रंग (लेखांक २८) जैजवंती.

     खमाज थाटोत्पन्न जैजवंती राग नावाप्रमाणेच अतिशय गोड,  चित्ताकर्षक व मर्मस्पर्शी आहे.कुणी याला जैजैवंती तर कुणी जयजयवंतीअसेही म्हणतात. थोडा कठीण असल्यामुळे फार कमी गायक हा राग गाताना दिसतात.याला संपूर्ण-संपूर्ण जातीचा वक्र राग असे म्हटले तरी हरकत नाही.यात अल्हैया,छाया आणि देस अंग एकमेकांत मिसळलेले दिसून येतात.अनेक गायक याला बागेश्री अंगाने पण गाताना दिसतात.परंतू देस अंगाचे (रेमपनिसां) रूप जास्ती प्रचलित आहे.या रागाचा विस्तार तीनही सप्तकात मुक्तपणे केल्या जातो.याचा गायन वादन समय रात्रीचा दुसरा प्रहर असून.वादी स्वर रिषभ व संवादी स्वर पंचम आहे.यात दोन्ही गांधार व दोन्ही निषाद स्वरांचा प्रयोग केल्या जातो.हा गारा नावाच्या रागाला जवळचा आहे.

     गुरु ग्रंथ साहेबानुसार हा राग बिलावल व सोरठ या दोन रागांमिळून बनला आहे.हा राग गुरुबानी नंतरच्या खंडात दिसून येतो.या रागात शिखांचे नववे गुरू तेगबहाद्दूर द्वारा फक्त चार भजनांची रचना केल्या गेली आहे.या भजनांना त्यांचे चिरंजीव आणि उत्तराधिकारी गुरू गोविंद साहेब सिंग यांनी १७०५ मध्ये यात जोडले होते.या रागाचा उल्लेख भारतीय शास्त्रीय संगीताच्या कुठल्याच ग्रंथात केलेला नसल्याचा उल्लेख केला आहे. रागमालामध्ये हा राग मिळत नाही. परंतु १४ व्या शताब्दीच्या सुरवातीला याला 'जावंता' नावाने ओळखल्या जात होते. सध्या खमाज थाटातील एक महत्वपूर्ण राग म्हणून याला मान्यता आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार जैजैवंती (ਜੈਜਾਵੰਤੀ) राग साधन साध्य झाल्याचा आनंद व तृप्तीची भावना व्यक्त करतो.सोबतच काही तरी गमावल्याचे दुःखही व्यक्त करतो.आनंद आणि दुःख  ह्या दोन्ही भावनांचा अतिरेक होऊ देत नाही.


     उस्ताद बडे गुलाम अली खान, उस्ताद फतेह अली खान, पं. भीमसेन जोशी, पं. कृष्णराव, पं. जसराज, पं. राजन साजन मिश्र, पं. विनायकराव पटवर्धन, पं. जगदीश प्रसाद, पं.व्यंकटेश कुमार गुरव,पं. अजय चक्रवर्ती, पं. दिनकर कैकिणी,पं.अजय पोहनकर, उस्ताद राशीद खान, पं.उल्हास कशाळकर, शुभदा मराठे,फरीद हसन, उस्ताद शराफत हुसेन खान, कौशिकी चक्रवर्ती, डॉ.निवेदिता कौर, जयश्री पाटणकर, पं. विजय कोपरकर, पं. विजय देशमुख व इतर वादकांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

        मी शिकत असताना 'मोरे मंदर अब क्यों नहीं आये' ही चीज शिकविल्या गेली.पुन्हा तेच, काव्याचा भावार्थ न कळता फक्त रागरूप कळणे! मला जैजवंती राग खऱ्या अर्थाने आवडला तो पंडित जसराजजींची 'चंद्रवदन राधिका' ही झपलातील चीज ऐकल्यानंतर.व्यक्तिमत्व दरबारी होतेच पण त्यांची गाण्याची पद्धतही अतिशय आकर्षक होती.पुढे सुरेश भटांसोबत मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करताना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने १९८२ मध्ये आयोजित केलेल्या 'अशी गावी मराठी गझल' या फक्त मराठी गझल गायकीच्या,महाराष्ट्रातील तीन तासाच्या पहिल्या वहिल्या कार्यक्रमात सुरेश भटांचीच 

'दिशा गातात गीते श्रावणाची

कुणाला याद तान्हेल्या तृणाची

ही जैजवंती रागात स्वरबद्ध केली गझल गायिलो होतो.यातील 'तान्हेल्या' या शब्दाकरिता मी जैजवंती रागात नसलेल्या कोमल धैवताचा प्रयोग करून प्रचंड दाद घेतली होती.त्याबद्दल पुण्याच्या केसरी या दैनिकाने दि.२५/७/१९८२ च्या अंकात याबद्दल "या बंदिशीतील कोमल धैवताचा रागबाह्य प्रयोग (तिरोभाव) लक्षणीय वाटला. विशेषतः 'तान्हेल्या' शब्दाच्या स्वरा-सहीत उच्चारणात तो मनावर ठसला." असा उल्लेख केला होता.गझल गायकीमध्ये असा एखाद्या शब्दाचा अर्थ अधिक सक्षमपणे रसिकांपर्यंत पोहचविण्याकरिता प्रयोग केला तर तो आवडतोच.हा माझा गझल गायक व संगीतकार म्हणून इतक्या वर्षाचा अनुभव आहे.असो!

या रागात खूप कमी गाणी आहेत.पण जी आहेत ती अगदी अफलातून...

● हिंदी चित्रपट गीते...

'हमारे बाद अब महफिल में अफसाने बयां होंगे' लता. चित्रपट-बागी, संगीत-मदन मोहन (१९५३).           

'मनमोहना बडे झुठे' लता. चित्रपट-सीमा, संगीत-शंकर जयकिशन (१९५५). 

'बैरन हो गई रैन' मन्ना डे. चित्रपट-देख कबीरा रोया, संगीत-मदन मोहन (१९५७). 

'मौसम सुहाना दिल है दिवाना' लता. चित्रपट-सुवर्ण सुंदरी, संगीत-आदि नारायण राव (१९५७). 

'जाईए हम से खफा हो जाईए' लता. चित्रपट-चालबाज, संगीत-मदन मोहन (यात चारुकेशी पण दिसतो.) १९५८. 

'दिल का दिया जलाया' नूर जहां. चित्रपट-कोयल, संगीत-खुर्शीद अन्वर (१९५९). 

'ये दिल की लगी कम क्या होगी' लता. चित्रपट-मुगले आझम, संगीत- नौशाद (१९६०). 

'जिंदगी आज मेरे नाम से शरमाती है' रफी. चित्रपट-सन ऑफ इंडिया, संगीत-नौशाद (१९६२)

'वो जो मिलते थे कभी हम से दिवानो की तरह' चित्रपट-अकेली मत जइयो, संगीत-मदन मोहन (१९६३). या गाण्यात तीव्र माध्यमाचा सुंदर प्रयोग केल्या गेला आहे.

'बालमवा बोलो ना बोलो ना' लता. चित्रपट-पिकनिक, संगीत-एस.मोहिंदर (१९६६). 

'सुनी सुनी साज की सतार पर' किशोर कुमार. चित्रपट-लाल पत्थर, संगीत शंकर जयकिशन (१९७१). 

'मोरे नैना बहाये नीर' लता. चित्रपट-बावर्ची, संगीत-मदन मोहन (१९७२). 

'मैं राधा तू शाम' शंकर एहसान लॉय, कमल हसन, शंकर महादेवन. चित्रपट-विश्वरूप, संगीत एहसान नुरानी,लॉय मेंडोंसा. 

गांधीजींचे आवडते भजन 'रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम' जैजवंती रागावर आधारित आहे.

दक्षिण भारतातील अनेक चित्रपटात जैजवंतीचा मुक्तहस्ताने वापर केला आहे.

● नॉन फिल्मी...

'दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला' -गुलाम अली.


 

पुरस्कार...



     आयुष्यात आपली वाहव्वा व्हावी, सत्कार व्हावा, एखादा तरी शासकीय पुरस्कार मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते.नुसतेच वाटत नसते तर प्रत्येकजण या सुखाकरीता आसुसलेला असतो.परंतू काही खास लोकच पात्र ठरतात, त्याला आपण काय करू शकतो ?
     खरे म्हणजे शासकीय पुरस्कारासाठी पात्र होणे ही एक फार मोठी कला आहे.ती साऱ्यांनाच जमते असे नाही.ज्याला जमली त्याला जमली.येऱ्या गबाळ्याचे ते काम नोहे.आमचा एक साहित्यिक मित्र हा खेळ करण्यात पटाईत होता.(पण....अती पटाईत असल्यामुळे कुठेच काही जमले नाही.) कोणत्या तरी मंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळून सन्मानित व्हावे यासाठी निळ्या टोपीचा आश्रय घेऊन  काँग्रेसशी अंग-संग सुरू केला.दलितोद्धारक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी नको नको ती सोंगे केली.पण दलित काही फसले नाही.व काँग्रेसवाल्यांनीही धतुरा दाखवला.तरी पण काँग्रेसचे शासन असेपर्यंत त्याचे लांगुलचालन सुरूच होते.पुढे काँग्रेसचे शासन जाऊन युतीचे सरकार आले.आमच्या या मित्राने लगेच कोलांटउडी घेऊन भगवी पताका खांद्यावर घेतली.व सेना भवनाच्या वाऱ्या करून 'कीर्तन' करणेही सुरू केले.इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्ष किती वाईट होता यावर साहित्य निर्मितीही सुरू केली.हे सगळे कशाकरीता तर मान-सन्मान, अध्यक्षपद, सत्कार,पुरस्कार या 'आत्मिक' सुखाकरीता. पण भगवे सरकारही याला पूर्णपणे ओळखून असल्याने त्याची कुठेच वर्णी लागली नाही.थोड्याच दिवसात हा 'वार'करी भगवी पताका उतरवून संयुक्त मोर्चाची पंचरंगी पताका खांद्यावर घेऊन फिरायला लागला...तर मंडळी शासकीय पुरस्काराची लालसा माणसाला किती लाचार बनविते हे आपल्या लक्षात आलेच असेल!
     आदर्श संगीत शिक्षकाचा राज्य/राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असे आम्हासही वाटत होते.पण त्याकरीता करावे लागणारे लांगुलचालन न जमल्यामुळे जिल्हा समितीने निवड केल्यावरही आम्हाला टाळण्यात आले.खोलात जाऊन चौकशी केल्यावर कळले की,आर्णीत शिवजयंती उत्सव सुरू केल्यामुळे लागलेल्या कलमांमुळे पुरस्कारापासून वंचित करण्यात आले.
आपल्याच महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती साजरी केल्यामुळे आपल्यावरच कलमा लागतात व न्यायालयाचे खेटेही घ्यावे लागतात हे कळले.तसेच साध्यासुध्या किरकोळ कलमा लागल्यामुळे आपल्या देशात पुरस्कारापासून वंचित केल्या जावू शकते,पण ३०२,४२० वगैरे पर्यंतच्या कलमा लागलेली व्यक्ती मात्र आमदार, खासदार,मंत्री होऊ शकते. हे पाहून आम्हाला आमच्या शिक्षकी पेशाची लाज वाटायला लागली.व आपण शिवजयंतीसारखे समाजविघातक काम करण्यापेक्षा खून,मारामाऱ्या,बलात्कार,जाळपोळ वगैरेंसारखी 'राष्ट्रीय' कार्ये केली नाही याचे वैषम्य वाटायला लागले.या सगळ्या अनुभवामुळे पुरस्कार मिळविणे ही सुद्धा एक कला आहे हे आम्हाला पटायला लागले.ज्याने काहीही न करता फक्त 'कलाबाजी' केली तो जिंकला.व जो नुसतेच 'कार्य' करत राहिला तो हरला.
      शासकीय पुरस्कार मिळविण्यासाठी समोरची व्यक्ती आदर्शच असली पाहिजे असे काही नाही.ती फक्त मालदार व 'दर्शनीय' असली तरी चालते.एक तर त्या व्यक्तीला चांगले राजकीय वजन हवे.किंवा राजकीय वजन पेलण्याची क्षमता तरी हवी.तसेच लाळघोटेपणा हा दुसरा गुणही त्याच्या रोमारोमात भिनलेला असायला हवा.हे दुसरे 'क्वालिफिकेशन' यात अतिशय महत्वाचे असते.अर्थात योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळतच नाही,असेही नाही.कधी-मधी, चुकून-माकून अनेक योग्य व्यक्तींनाही पुरस्कृत केल्याचे दिसून येते.पण अशी उदाहरणे कमीच!
     पुरस्कार मिळल्यावरही कधी कधी काय गंमत घडते बघा! १९९६ मध्ये आर्णीतील (यवतमाळ) माझ्या सर्वंकष कार्याबद्दल तसेच संगीत व मराठी गझल गायन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मा. बा. गांधी चॅरिटेबल ट्रस्टचा कै. मोतीलालजी बंग हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा  पुरस्कार (मानपत्र व ५००० रुपये रोख) माझ्या नावे जाहीर झाला.पुरस्कार वितरणाचा नयनरम्य सोहळा आर्णीतच झाल्यामुळे पाहुणा व यजमान अशी दुहेरी भूमिका वाटयाला आली. सरस्वती स्तवन,स्वागतगीत आम्हीच सादर केले.व थोड्याच वेळात पुरस्कार घ्यायलाही पुढे आलो.त्यामुळे आपल्या लग्नात आपणच बँड वाजवण्याचा आनंद काय असतो तो आम्हाला उपभोगायला मिळाला.
      पुरस्कारामुळे व्यक्तीचे मोठेपण वाढते की, व्यक्तीमुळे पुरस्काराला मोठेपणा येतो हे अजूनपर्यंत आम्हाला कळले नाही.कारण काही सामान्य व्यक्ती पुरस्कारामुळे मोठ्या झाल्याचे तर काही पुरस्कार व्यक्तींमुळे मोठे झाल्याचे आम्ही पाहिले आहे.थोर समाजसेवकाला दंगली घडवतांना पाहून, आदर्श शिक्षकाला मद्यपान करून गटारात लोळताना पाहून, गुणवंत कामगाराचे अवगुण पाहून, समजगौरवाचा 'माज' पाहून, देशबंधूंच्या देशविघातक कारवाया पाहून, हरिभक्तपरायणाची स्त्री भक्ती पाहून, वनमित्राची आरामशिन पाहून, पर्यावरणवाद्याचा (वृक्षमित्र) लाकडाचा धंदा पाहून, सर्वोदयवाद्याच्या अनेक खाजगी संस्था व जमवलेली माया पाहून, वेदशास्त्रसंपन्नाचे बायाबापड्यांना नादी लावणे पाहून, व्यसनमुक्तीवाल्याचे दारूकाम पाहून उपाध्या व पुरस्कार किती तकलादू असतात ते कळले.तरी पण त्याची ओढ मात्र कमी होत नाही.

-सुधाकर कदम


 

Monday, October 9, 2023

उत्कट भावनेची सर्वस्पर्शी कविता

                  #काळोखाच्या_तपोवनातून

     विदर्भातील सुधाकर कदम हे प्रामुख्यानं संगीतकार, गझलगायक म्हणून सर्वविदित असले तरी एक कवी, गझलकार, गीतकार, विडंबनकार, देखील आहेत. 'मीच आहे फक्त येथे पारसा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. प्रदीर्घ कालावधीनंतर आता त्यांचा 'काळोखाच्या तपोवनातून' हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशीत झालाय्. त्यात त्यांनी गझल, कविता, अभंग, द्विपदी, मुक्तछंद आदी काव्यप्रकार हाताळले आहेत. चिंतनात्मक कवितेबरोबरच, वरवर हलकाफुलका वाटणारा परंतु अंतर्मुख करायला लावणारा हजल विडंबन हा काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच सहजतेनं मिश्कील शैलीत अक्षरबद्ध केलाय्. त्यांच्या हजलमधील नर्मविनोद वाचकांना आवडणारा आहे. तपस्वी असल्याशिवाय काळोखाच्या तपोवनातून प्रवास नाही करता येत. भरजरी दुःखाचे चांदणे लेवून वेदनेची कोजागरी साजरी करण्याची कवीला हातोटी लाभलीय्. चिंतनाची डूब असणाऱ्या कविता अन् खट्याळपणाचा बाज या दोन्ही निरनिराळ्या बाजू एकाच वेळी वाचकांसमोर येतात. हे कदमांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे.
     गझलसम्राट सुरेश भटांचा सहवास लाभल्यानं गझलेची खरी ताकद काय असते, गीतातील तरलता, मनाला स्पर्शून जाणारा भाव याचा आदमास कवीला आलेला आहेच. कदम मुलत: संगीतकार असल्यानं गझल, गीताचा फार्म समजून घेण्याचा त्यांना फारसा प्रयास करावा लागला नाही. फाॅर्म्स हाताळताना त्यातील काव्यमूल्य हरवणार नाही. याची त्यांनी कवी म्हणून काळजी घेतलीय्. राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितेबरोबरच नातेसंबंधावरही भाष्य करणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाची टवटवीत शब्दचित्रंही त्यांनी रेखाटली आहेत. जगाकडे, स्वतःकडे अन् निसर्गाकडे पाहण्याची सहजदृष्टी काळोखाच्या तपोवनातून प्रतिबिंबित होते.
     एका माणसाचं पुढं जाणं, त्यानं प्रगती करणं, दुसऱ्या माणसाला रुचत नाही, पचत नाही. त्याचे पाय ओढण्याची त्याच्यात ईर्षा असते. माणसाची जात अन् खेकड्याची जात यात फारशी तफावत नाही. इथूनतिथून त्यांची चाल वाकडीच असते. त्यात शिकार होते ती सरळमार्गी माणसाची. राजकारण असो की समाजकारण त्यातल्या चढाओढी, ओढाओढी नित्यनेमानं निदर्शनास येत राहातात. दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्रीत होत चाललंय् याची कितीतरी उदाहरणं पाहावयास मिळतात. 'छोटी बहर' मध्ये कदम म्हणतात.

माणसातील खेकडे
चालताती वाकडे

राजकारणात ज्या हवे
तेच बनती माकडे

     देवधर्म श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत कदमांची मतं अगदी ठाम अन् परखड आहेत. देवाचा निवास दगडी मंदिरात नसतो तर तो माणसाच्या हृदयमंदिरात असतो. परंतु त्याचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न नाही करत. काबा असो की काशी, देवाला शोधण्यासाठी त्यांची निरंतर पायपीट सुरूच असते. देवाच्या शोधार्थ सुरू असलेल्या भटकंतीत देव कधीच गवसत नाही. फक्त दिखाव्याला तो बळी पडतो. अन् स्वतःची फसगत करून घेतो. 'तुझे आहे तुजपाशी' याचा त्याला नेहमीच विसर पडत आलाय. हातचं न राखता कवितेतून सत्य सांगणं, अनुभवाचं बोल पोटतिडकीनं मांडणं हे कवीचं आद्य कर्तव्यच ठरतं. अनुभवातून प्रकट झालेला हा शेर अध्यात्माचं सध्यात्म सांगणारा आहे.

काबा-काशी फिरून पाहिले
सारा फक्त दिखावा आहे

     देवाच्या अन् दैवाच्या नावानं माणसाचं शोषण केलं जातं. धनाच्या, कष्टाच्या रूपानं हे शोषण अव्यहात होत राहतं. यावर रिकामटेकडे भरपेट खात राहातात. हा अभंगही अंतर्मुख करून जातो.

रिकामटेकडे/ फुकाचे खाती
कष्टकऱ्या हाती/ टाळ देती//

     जो माणूस माणसाला प्रेम अर्पितो, दीनदुःखितांच्या व्यथांना आपल्या ओंजळीत घेतो, त्यांची फुले करतो, त्यांना दिलासा देतो, मनात मानवतावाद सदैव जिवंत ठेवतो त्यालाच चारीधामंच दर्शन घरबसल्या होतं. इथं प्रदर्शन नसतं. संताची शिकवणही याहून निराळी नाही. याच पायवाटेवरून जाणारा हा अभंग.

दीन दु:खितांना/ मदत जे करी
तेणे मुक्ती चारी/ साधियेल्या//

     माणसाला सप्तरंगी इंद्रधनुष्याचं मोठं आकर्षण असतं. त्याचं जीवन कधी एकाच रंगात रंगू नाही शकत. प्रत्येकाच्या जीवनाचे रंग निराळे, विश्व निराळे असते. जीवनात शुभ्र अन् काळा रंग सुखदुःखाचं प्रतीक म्हणून येतात. माणूस सुखाशी जसा लळा लावतो तसा दुःखाशी नाही लावत. शुभ्रता तर सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण दुःखाची, काळोखाची गर्द छाया नको नकोशी वाटत राहाते. माणसाला काळोखाच्या तपोवनातूनही प्रवास करता आला पाहिजे. असं कवीला वाटत राहातं.

असा कसा तुझा रंग जीवना तुझा निराळा
कधी हवासा, कधी नकोसा शुभ्र व काळा

     मातीच्या, आकाशाच्या, पाण्याच्या, हवेच्या जातीची विचारपूस माणूस नाही करत. परंतु माणसाच्या जातीची चौकशी तो हस्ते परहस्ते करत राहतो. जाती-धर्माची ठावठिकाणी ठाऊक करून घेतल्याशिवाय पुढची वाटचाल नाही करता येत. तो जात विरहीत समाजरचनेवर बोलत राहिला तरी जात त्याला गोचिडासारखी चिकटलेली असते. जातीच्या चक्रविवाहातून त्याची कधी सुटका नसते. समाजातील भयाण वास्तवाची जाणीव कदम त्यांच्या शेरातून करून देतात.

मानतो कोठे खरे तर जात आपण?
चिकटुनी बसते किती ती जन्मतः पण

     मातीतून फुल उगवते. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. आपण त्या सुगंधानं मत्त प्रसन्न होऊन जातो. परंतु हा सुगंध वाटण्यासाठी याला किती यातना कराव्या सहन लागतात. याकडं आपलं लक्ष नाही जात फुलाच्या रोपाला आधी मातीत गाडून घ्यावं लागतं. मातीचं अस्तर फाडून त्याला वर यावं लागतं. फुलांवरती हा एक प्रकारचा सुगंधी कहर असतो. निसर्गाच्या संबंधात तत्वज्ञानाची जोड देत ही सष्टाक्षरात कविता कदम अशी लिहितात.

मातीचे अत्तर
त्यास ना उत्तर
फुलांच्या वरती
सुगंधी कहर

     गझल अन् अभंगातून सामाजिक आशयाची भरगच्च मांडणी करणाऱ्या कदमांनी प्रेम या सदाबहार विषयातली चिरतरुण उत्कटताही सहजस्फर्तपणे अविष्कृत केलीय्. प्रेमामध्ये किती किती तरी तऱ्हा असतात त्या त्यांनी द्विपदीतून नेमकेपणाने सांगितल्यात.

प्रारंभाला उधळण तुझी सवय ही जुनी
झेपावते विजेसम नागमोडी कल्लोळुनी

     '#काळोखाच्या_तपोवनातून' जीवन रसाचे उत्कट दर्शन घडविताना अनेक कविता वाचकांशी सुसंवाद साधतात त्याचं कारण कदमांच्या कवितेत गेयता, प्रासादिकता अधिक प्रमाणात आहे.
     व्यंग विडंबनेतूनही समाजाचं दुःख प्रभावीपणे मांडता येतं. लोकांना जेव्हा सत्य थेटपणानं सांगण आवडत नाही तेव्हा रचनाकाराला उपरोधिक शैलीचा वापर करावा लागतो. विडंबनकार हा भाष्यकार असतो. त्याच्या भाष्याने हास्य निर्माण होत असले तरी त्यातील सल अन् पीळ कटूसत्याचा असतो. विडंबनकार अशा सत्याची रुजवात करत असतो. विडंबनात्मक हजलेचे हे शेर पाहा.

कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी

आर्त भक्त म्हणावया
भोंग्यावरती 'कल्लोळे'

    सुधाकर कदमांनी जवळपास सर्वच काव्यप्रकार सैल हाताने लिहिले आहेत. गीत संगीताचं सांगीतिक नातं अतूट असतं. हे स्वतः गीतकार संगीतकार असूनही गीतांच्या बाबतीत त्यांनी हात आखडता का घेतला हे कळायला मार्ग नाही.

काळोखाच्या तपोवनातून (काव्यसंग्रह)
कवी: सुधाकर कदम
प्रकाशक: स्वयं प्रकाशन पुणे
पृष्ठे: ९५ मूल्य: १५०

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
'उत्सव' पुरवणी
दैनिक सामना,
रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

राग-रंग (लेखांक २७) बिलावल


गीतवाद्यविनोदेन कालो गच्छति धीमताम |
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

अर्थात:- बुद्धिमान लोक गायन, वादन, विनोदात आपला वेळ घालवतात.आणि मूर्ख लोक निद्रा,भांडण आणि विविध व्यसनात आपला वेळ घालवतात.

      'बिलावल' थाटाचे मूळ एकोणविसाव्या शतकाच्या सुरवातीला उत्तर भारतीय संगीतात रुजले.बिलावल रागमाले मध्ये हा राग भैरव रागिणीच्या रुपात प्रगट झालेला दिसतो.परंतू आज हा बिलावल थाटाचा प्रमूख मानल्या जातो.रागमाला बिलावलला भैरवाच्या पुत्र रुपात बघतात.पण या दोन्ही रागात आज काहीच साम्य व संबंध नाही.
      उत्तर भारतातील शीख परंपरेतील रागांपैकी एक राग बिलावल आहे.आणि तो शीखांचा पवित्र ग्रंथ ,श्री गुरू ग्रंथ साहेबांचा एक भाग आहे.त्यातील प्रत्येक रागाचे नियम कडकपणे पाळल्या जातात.त्यामुळे त्यातील स्वरांची संख्या, कोणत्या स्वरांचा उपयोग कसा करायचा,त्यांची परस्पर प्रतिक्रिया काय, याचा धून रचताना उपयोग केला जाते. हे नियम पाळूनच धून रचल्या जाते.,श्री गुरू ग्रंथ साहेबात एकूण साठ रागांच्या रचना आहेत.साठ रागांच्या या साखळीत बिलावल तेहत्तीसवा राग आहे.या रागाच्या रचना पृष्ठ संख्या ७९५ ते ८५९ म्हणजेच ६४ पानांवर दिसून येते.
     बिलावल थाट भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तर भारतीय  शैलीत वर्णन केलेल्या दहा थाटांपैकी एक आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहे.यात कोमल निषादाचा प्रयोग केला अलैह्या बिलावल राग तयार होतो.याच्या अवरोहात कोमल निषादाचा अल्प प्रयोग वक्र रुपात केल्या जातो.याचा वादी स्वर धैवत आहे,पण धैवतावर न्यास केल्या जात नाही.याचे न्यास स्वर पंचम आणि गांधार आहे.या रागात धैवत गांधार संगती महत्वपूर्ण आहे.मींड स्वरूपात ती आपल्या समोर येते.पंडित विष्णु नारायण भातखण्डे कृत ‘क्रमिक पुस्तक मालिका’ 
(भाग-१)अनुसार ‘बिलावल’ थाटाचा आश्रय राग ‘बिलावल’च आहे. या थाटांतर्गत येणारे मुख्य राग :- अल्हैया बिलावल, बिहाग, देसकार, सरपरदा,मलुहा केदार, जलधर केदार, लच्छासाख, कामोद नट, केदार नट, बिहागडा, सावनी, छाया, गुणकली, दीपक, पट बिहाग, नट बिहाग, नट, हेमकल्याण, दुर्गा, शंकरा, पहाड़ी, भिन्न षड्ज, हंसध्वनि, मांड वगैरे वगैरे.या रागाचा गायन-वादन  समय सकाळचा पहिला प्रहर आहे. (संदर्भ : भातखंडे-संगीतशास्त्र (भाग १), हाथरस, १९६४)                    
        बिलावल रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:-बिलावल,अलैह्या बिलावल,देवगिरी बिलावल, कुक्कुभ बिलावल, लच्छासाख बिलावल, नट बिलावल,शुक्ल बिलावल,यमनी बिलावल वगैरे वगैरे.यातील पं. भीमसेन जोशींनी गायिलेला यमनी बिलावल व पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायिलेला शुक्ल बिलावल ऐकण्यासारखा आहे. (यमनी बिलावल रागाचा थाट  कल्याण मानला जातो.यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.याची जाती संपूर्ण मानल्या जाते. वादी स्वर पंचम और संवादी षडज असून,गायन समय दिवसाचा पहिला प्रहर आहे.देवगिरी बिलावल याचा समप्रकृतिक राग आहे.)
       रवींद्रनाथ टागोरांच्या 'रवींद्र संगीतात' बिलावल रागाच्या अनेक स्वरूपांचा प्रयोग केल्याचे खालील यादीवरून कळून येते.● बिलावल-अजी हेरी सोंगसर अमृतो,देखा जोड़ी दिले, देखो सोखा भूल,अरे सोम तारे देखो,ओकी सोखा मुचो अंखी,तुमी के गो सोखिरे केनो.● अलैह्या बिलावल-अजी मेघ केते गेचे,बोस अची हे,हृदयोये चिली जेगे,के रे ओय दकिचे,खोमा करो अमय,ओइ पोहेलो तिमिरोराती,प्रोभु एलेम कोथाय,संगसरेते चारिधर.● देवगिरी बिलावल-देबाधिदेब मोहदेब,सबसे आनंद करो.● कुक्कुभ बिलावल-कोथाय तुमी अमी.● लच्छासाख बिलावल-बोहे निरंतर अनंता.● नट बिलावल-मोन जेन मनोमोहोन.●शुक्ल बिलावल-
नित्यो नबो सत्यो ताबो.● मिश्र बिलावल-शुनेचे तोमर नाम, सोखा हे की दिये आमी.● मिश्र अलैह्या/मिश्र केदार-काचे चिली ड्यूरे.

      'बिलावलके प्रकार' म्हणून प्रो.बी.आर.देवधर यांचे दीड तासाचे ध्वनिमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे.यात बिलावल रागाच्या सर्व प्रकारावर सविस्तर चर्चा व गायन आहे. युट्युबवरच 'राग बिलावल राग अल्हैया बिलावल पर गुणीजनो के अपने अपने विचार' या शीर्षकांतर्गत पंडित श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, पंडित गजानन जोशी, पंडित रामाश्रय झा, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर, प्रो.बी.आर.देवधर, पंडित कुमार गंधर्व यांचेही ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे.गांधर्व महाविद्यालय दिल्ली द्वारे आयोजित .'भारतीय शास्त्रीय संगीत चर्चा' म्हणून 'राग बिलावल विचार गोष्ठी' (१९५४-१९६०) आयोजित करण्यात आली होती.यात पंडित विनयचंद्र मौदगल्य, पंडित यामध्ये  पं.  श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, उस्ताद विलायत हुसेन खान, प्रो.बी.आर.देवधर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित व्ही.आर.आठवले, उस्ताद चांद खान, उस्ताद मुश्ताक अली खान हे सहभागी झाले होते.ही चर्चा पण अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. याशिवाय उस्ताद विलायत हुसेन खान (यांचे १९३४ मधील ध्वनिमुद्रण), पंडित भीमसेन जोशी,  अजय चक्रवर्ती यांनी गायिलेले बिलावल प्रकार ऐकू शकता.

● बिलावल थाटावर आधारित गाणी...

'ऐ दिल है मुश्किल जीना यहां' रफी,गीता दत्त.चित्रपट-सी. आय.डी. संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५६). 
'उडे जब जब जुल्फे तेरी' आशा,रफी. चित्रपट-नया दौर.संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५७). 
'दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा' लता.चित्रपट-मधुमती.संगीत-सलील चौधरी (१९५८). 
'लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो' लता. चित्रपट-व ह कौन थी.संगीत-मदन मोहन (१९६४). 
'इक प्यार का नगमा है' लता,मुकेश. चित्रपट-शोर. संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७२). 
'भोर आई गया अन्धियारा' मन्ना डे, किशोर कुमार,लक्ष्मी शंकर.चित्रपट-बावर्ची. संगीत- आर.डी. बर्मन (१९७२). 
'सारे के सारे ग म को लेकर गाते चले' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-परिचय. संगीत-आर.डी. बर्मन (१९७२). 
'मै जट यमला पगला' रफी.चित्रपट-प्रतिज्ञा. संगीत- लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७५). 
'छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा' किशोर कुमार.चित्रपट-याराना.संगीत-राजेश रोशन (१९८१). 
'जिंदगी गम का सागर भी है' किशोर कुमार.
चित्रपट-सौतन.संगीत-उषा खन्ना (१९८३). 
'गली में आज चांद निकला' अलका याज्ञिक.
'दिल है छोटा सा,छोटीसी आशा' मिनमिनी.चित्रपट-रोजा. संगीत-ए.आर.रहमान (१९९२). 
चित्रपट-जख्म.संगीत-एम.एम.करीम (१९९८)
'कौन कहता है कि भगवान आते नही' भक्तीगीत-मीनाक्षी मुकेश वर्मा.संगीत-मॅक व्ही (२०२२)
'ओम् जय जगदीश हरे' आरती-अनुराधा पौडवाल.

बिलावल रागावर आधारित सगळ्यात जास्ती गाणी तामिळ चित्रपटात आहेत.
__________________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

Saturday, October 7, 2023

आठवणीतील शब्द-स्वर....


                      ● फिक्कर कराची नाय! ●

    १९६८ ची गोष्ट आहे.आमच्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा रोडवरील मोहदा या खेडेवजा गावात होता.त्यावेळी आजच्यासारख्या सुबक गाड्यांची भरमार नव्हती.खाजगी बस वाहतूक बंद झाल्यामुळे त्यातील एक खटारा गाडी यवतमाळच्या वाणिज्य महाविद्यालयाने (दाते कॉलेज) विद्यार्थिनींकरिता 'कॉलेज बस' म्हणून घेतली होती.ही खेकडा छाप बस आम्ही बाहेरगावच्या कार्यक्रमासाठी भाड्याने घ्यायचो.तिच्या वेगाची लिमिट जास्तीत जास्त तासी चाळीस किलोमीटर इतकी असल्यामुळे बाहेर गावी जायचे म्हटले की,आम्ही लवकर निघत असू.तर अशी ही बस घेऊन आम्ही थोडे उशिराच मोहद्याला पोहोचलो.उशीर झाल्यामुळे गेल्या गेल्या कार्यक्रम सुरू करावा असे ठरले.त्याप्रमाणे गावात पोहोचल्या बरोबर 'स्टेज'ची चौकशी करून बस तेथे लावली.वाद्य उतरवायची सुरवात होत नाही तो आयोजकांपैकी एकजण जवळ येऊन म्हणाला,
 'तुमचा पुंगी पेटारा गाडीतच राहू द्या.पयले जेवन कराले चाला!' 
मी म्हटले 'अगोदरच उशीर झाला आहे तर कार्यक्रम झाल्यावर जेवू!' 
पण तो काही ऐकायलाच तयार मव्हता, म्हणतो कसा 'उशिराची फिक्कर कराची नाय, पयले जेवन मंग कारेकरम!' 
(मी मनात म्हटले जास्तच उशीर झाला तर लोक आमचे 'क्रियाकर्म' केल्याशिवाय राहणार नाही.) शेवटी नाईलाजाने मुक्कामाच्या ठिकाणी गेलो.तिथली व्यवस्था पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो. सोयरे असल्याप्रमाणे गेल्याबरोबर पाय धुवायला पाट-पाणी-साबण,टर्किशचा नवा कोरा टॉवेल, बसायला गाद्या, टेकायला लोड-तक्के इतकी चांगली व्यवस्था असूनही कार्यक्रमाचे टेन्शन असल्यामुळे मी आयोजकांना पुन्हा पुन्हा कार्यक्रमाचे सांगायला लागलो तर तेही  म्हणाले, 'फिक्कर कराची नाय,पयले जेवन मंग कारेकरम!' 
मी म्हणालो 'लोकं?' 
उत्तर आले 'लोका-बिकायचं पाहून घेवू पण तुमी फिक्कर कराची नाय!' 
शेवटी सगळी काळजी बाजूला ठेवून पाहुणचारासारखे असलेले चारी ठाव जेवण चापून जेवलो.तोपर्यंत अकरा वाजत आले होते. म्हणून पुनः आयोजकांना म्हटले 'कार्यक्रम?'.....'फिक्कर कराची नाय!' 
या उत्तरानंतर मात्र मी मनात म्हटले यांना जरी 'फिक्कर' नसली तरी कार्यक्रम तर आपल्याला करायचा आहे.म्हणून हळूच सर्व वादक मंडळीला घेऊन स्टेजजवळ उभ्या असलेल्या गाडीतून वाद्य उतरवून स्टेजवर घेतली व स्वरात मिळवणे सुरू केले.वाद्य लावून होईपर्यंत सर्व कलाकार स्टेजवर आले.त्यावेळी अकरा वाजून गेले होते.समोर दहा-पंधरा श्रोते! म्हटलं दहा पंधरा तर दहा पंधरा!'टायटल' ट्यून सुरू केली की येतील हा विचार करून साउंड सिस्टिमवाल्याला माईकची अरेजमेंट करायला सांगितली.त्याने बाबा आदमच्या काळातील आगपेटीच्या आकाराचा काळ्या रंगाचा चपटा चौकोनी माईक समोर ठेवला.
मी म्हटले,'आम्हाला सहा माईकची गरज आहे.एका माईकने भागणार नाही!' 
यावर म्हणतो कसा,'साहेब ,सहा माईकची बरोबरी ह्या एकलाच करते.आतापावतर या माईकवर नाटकंचे नाटकं काहाडले.तुमचा ऑर्केस्ट्रा म्हंज्ये का?' 
आणि तुच्छतेची एक नजर आमच्यावर टाकून एम्प्लिफायर जवळ जाऊन त्याचे कान पिळत बसला.मी आपल्या डोक्यावर हात मारून घेत प्रेक्षक जमा करण्याकरीता टायटल ट्यून सुरू केली.जशी टायटल ट्यून सुरू झाली तशी  आयोजक मंडळी धावत-पळत स्टेजवर आली व त्यापैकी म्होरक्याने रागावून ट्यून बंद करायला सांगितले. 
मी चिडून म्हटले, 'राजेहो, रात्रीचे बारा वाजायला आले व तुम्ही कार्यक्रम करू देत नाही!' 
यावर तोच उसळला व म्हणाला 'तुमी का आमले मार खाले लावता का राजे हो?' (मला कळेना की, कार्यक्रम सुरू करण्याचा व मार खाण्याचा संबंध काय!) 
'म्या मंघानीच सांगितलं ना का कारेकरमाची फिक्कर कराची नाय म्हनून!' 
'रात्रीचे बारा वाजत आले ना,नंतर लोक येणार नाही!' मी.
'लोकं बिकं येतेत, तुमी जरा दम धरा अन् आमी सांगू तवा कारेकरम सुरू करा,आमचं 'पॅक' हाये!' आयोजक.
'पॅक?' मी.
'हो' आयोजक.
'म्हणजे' मी.
'म्हंज्ये असं का,आमच्या गावतनी दोन गनपती मंडय हायेत.दोनी मंडयाचं 'पॅक'हाये.यक दिवस त्यायचा कारेकरम आदुगर होते न दुसऱ्या दिवसी आमचा! आज त्यायचा दिवस हाये.थे तिकून कीर्तन आयकू येते ना?थे खतम झालं का आपला कारेकरम सुरू कराचा!' आयोजक.
'पण कार्यक्रम ऐकायला लोकं लागतील ना!' मी.
'तिथल्ला कारेकरम झाला का सारे लोकं इकडं यिवून बसतीन.म्हनून मी मंघानपासून सांगून राह्यलो का 'फिक्कर कराची नाय' म्हनून!' आयोजक.
तर मंडळी नंतर आम्ही 'फिक्कर' न करता दोन तासात कार्यक्रम गुंडाळून वापस आलो.


 

Saturday, September 30, 2023

राग_रंग (लेखांक २६) राग पिलू.


     झिंझोटी,खमाज,पहाडी सारखाच शास्त्रकारांनी पिलू रागालाही क्षुद्र प्रकृतीचा राग मानले आहे.खरे म्हणजे हा लोकसंगीताचा राग आहे.म्हणजेच शास्त्रीय रागाचे मूळ.पण मुळालाच हीन स्थान देण्याचे कारण काय तेच कळत नाही. कलेच्या विभिन्न शैलींमध्ये तसा काही भेद नसायला हवा.कला ही गुण विशेषतेने मोठी वा महान बनू शकते. म्हणून खरी श्रेष्ठता कलाकारालाच प्राप्त करावी लागते.पिलू राग समजायला मला कित्येक वर्षे लागली.कारण त्यात घेतल्या जाणाऱ्या विविध सुरावटी! पहाडी किंवा पिलू राग गाण्यासाठी खरंच तपश्चर्या करावी लागते.भूप,दुर्गा,तोडी वगैरे रागासारखं हे सरळसोट काम नाही.या रागाला (शास्त्रकार याला रागही मानत नाही.) पिलू हे नाव कसे पडले हे एक कोडेच आहे.प्राचीन ग्रंथांमध्येसुद्धा याचा उल्लेख नाही.ग्रामीण भागात गायीच्या बछड्याला,शेरडीच्या बछड्याला 'पिल्लू' म्हणायचे.पण या शब्दाचा व पिलू रागाचा काहीच संबंध नाही.कदाचित अनेक राग यातून दिसत असल्यामुळे किंवा दाखविता येत असल्यामुळे अनेक रागाचे पिल्लू म्हणजे तर पिलू राग नाही ना! असे काहीसे चमत्कारिक विचार डोक्याचे तरळून जातात.ते काही असो पण पिलू राग म्हणा किंवा धून म्हणा अतिशय गोड आहे.अनेक रागांचा छटा त्यात दाखविता येत असल्यामुळे पिलूची रंजकता वाढत जाते.या रागात ख्याल अभावानेच आढळतात.दादरा,ठुमरी,भक्तीगीत,नाट्यगीत, भावगीत,चित्रपट गीत,गझल यात हा छान रमतो.मध्यमाला षड्ज करून गायिल्या जाणाऱ्या रागांमधील पिलू हा राग अत्यंत लोकप्रिय आहे.भैरवी प्रमाणे यात बाराही स्वरांचा उपयोग ज्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे केल्या जाऊ शकतो.त्यामुळे वादकांमध्ये तर तो अधिकच प्रिय असल्याचे दिसून येते..अनेक जुन्या नव्या वादकांनी आपापल्या वाद्यांवर पिलू अतिशय समर्थपणे रंगविला आहे.पूर्वी दक्षिण भारतीय संगीतामध्ये पिलू रागाचे अस्तित्व दिसत नव्हते.पण आता मात्र जसे तिकडचे राग इकडे (उत्तर भारतात) स्वीकारल्या गेले तसे इकडचे राग पण तिकडे स्वीकारल्या गेलेत.त्यात पिलूही आहे.

     आजची गायन शैली व प्राचीन गायन शैली,तसेच आजचे राग रूप व प्राचीन (काही रागाचे) राग रूप यामध्येही बऱ्याच मोठ्या प्रमाणात तफावत आहे,सामवेदतील संगीत वेगळे,खुसरो काळातील संगीत वेगळे, व आजचे संगीत वेगळे.राग जरी तेच असले तरी त्यांच्या मांडणीत पिढी दरपिढी बदल होत गेला.खुसरोच्या काळातील ख्याल गायकीचे स्वरूप आजच्या ख्याल

गायकीपेक्षा निश्चितच वेगळे असावे.आजची ख्यालगायकी अनेक वर्षातील वेगवेगळ्या संगीत तज्ज्ञाच्या व गायकांच्या त्यांच्या त्यांच्या कंठातील संस्कारातून तयार झाली आहे.घराणे कोणतेही असो राग मात्र तेच आहेत.बदल दिसतो तो फक्त गायकीत.

     मला शोभा गुर्टूच्या 'होरी खेलन कैसे जाऊं' या ठुमरीतील आर्तनेने व्याकुळ केले होते.'नदिया किनारे मोरा गाव','तुम राधे बनो शाम','मोरे सैंय्या नहीं आये' वगैरेतून बरेच काही शिकायला मिळाले.बेगम अख्तरची 'सुध बिसराई' ठुमरी अप्रतिम आहे.यात नाना मुळेंनी तबला संगत व पुरुषोत्तम वालावलकरानी हार्मोनियम संगत केली आहे.अमानत अली व फतेह अली खान यांनी गायिलेली 'बिरहा की रैन' ठुमरी आनंददायी आहे.'शाम भई बिन शाम' उस्ताद राशीद खान,'गोरी तोरे नैन'आणि 'बरसन लागी' गुलाम अली, 'नथ,बेसर, बालम मंगवा दे' (दादरा) अजय चक्रवर्ती,'पिया बिदेस गयो रे' (ठुमरी) व्यंकटेश कुमार.वादकांमधील बहुतेक वादकांनी वाजविलेला पिलू,मिश्र पिलू मी ऐकला आहे.प्रत्येक वेळी तो वेगळाच वाटला. उस्ताद  सख़ावत हुसेन खान साहेबांचा एक व्हीडिओ १९३६ मध्ये वाडिया फिल्म्स द्वारा निर्माण करण्यात आला.उस्ताद अली अकबर खान,उस्तादअमजद अली खान यांची कमाल त्यांच्या वादनातील हुकूमत,

विचार,नजर यातून दिसून येते.ताज्या दमाचा सरोद वादक सौमिक दत्त याने सरोदवर सादर केलेला पिलू पण कमाल आहे.शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या बद्दल मी पामराने काय बोलावे. खरेच पहाडी,पिलू,मांड असे, ज्याला धून म्हणून हिणवले जाते ते राग रंगवणे अत्यंत कौशल्याचे काम आहे.तेथे पाहिजे जातीचे... ऐऱ्या गैऱ्याचे ते काम नोहे!

     काफी थाटातून निर्माण झालेला पिलू दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गावा, असं शास्त्रकारांनी लिहून ठेवलं आहे. मात्र या परिभाषेच्या पलीकडे जाऊन संगीतकाराची दृष्टी या रागाचा एक आगळावेगळा भावबंध शोधतात. क्वचित गहिरा भक्तिभाव, करुण, आर्त भाव, भजनातली तल्लीनता, समूहगानात एकरूप झालेला समर्पित भाव, यांसाठी या रागाचा आकृतिबंध त्यांना मोह घालतो. मग कधी स्पष्टपणे, तर कधी संमिश्र रूपात 'पिलू'चे स्वर तुमच्याभोवती अगदी परिचित असा संमोहनाचा मंत्र टाकतात.

● हिंदी चित्रपट गीते...

'प्रभुजी प्रभुजी तुम राखो लाज हमारी' कानन देवी.चित्रपट-हॉस्पिटल. 'काहे गुमान करे' के.एल.सैगल. चित्रपट-तानसेन.'पा लागू कर जोरी रे' लता.चित्रपट-आप की सेवा मे. 'मोरे सैंयाजी उत्तरेंगे पार' लता.चित्रपट-उडन खटोला. 'झुले मे पवन की आयी बहार' लता,रफी.

चित्रपट-बैजू बावरा. 'पी के घर आज दुल्हनिया चली' शमशाद बेगम.चित्रपट-मदर इंडिया. 'नैना काहे को लगाये' आशा भोसले.चित्रपट-जोर का गुलाम. 'जिंदगी ख्वाब है' मुकेश.चित्रपट-जागते रहो.'मुरली बैरन भई' लता.चित्रपट-न्यू दिल्ली. 'मैं सोया अखियां मीचे' आशा,रफी,चित्रपट-फागुन. 'कैसा जादू बलमा तुने' गीता दत्त.चित्रपट-12 0'clock. 'काली घटा छाये मोरा जिया लहराये' गीता दत्त.चित्रपट-सुजाता. 'सच कहती है दुनिया' लता.चित्रपट-इश्क पर जोर नहीं. 'बडी देर भई कब लोगे खबर' रफी.चित्रपट-बसंत बहार. 'सुर ना सजे क्या गाऊं मैं' मन्ना डे.चित्रपट-बसंत बहार. 'बावरी रे जीने का सहारा' लता.चित्रपट-एक फुल चार कांटे. 'तेरे प्यार का आसरा चाहता हूँ' लता,महेंद्र कपूर.चित्रपट-धूल का फूल.

'विकल मोरा मनवा' लता. चित्रपट-ममता. 'चंदन का पलना रेशम की डोरी' हेमंत कुमार.चित्रपट-शबाब. 'झुले मे पवन के आयी बहार' लता,रफी.चित्रपट-बैजू बावरा. 'अजहू न आये बालमा सावन बीता जाय' रफी,सुमन कल्याणपूर. चित्रपट-सांज और सवेरा. 'धीरे से आजा री अखियां में निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'धड़कते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' सुरेय्या.चित्रपट-शमा.

ल 'चल चलीये दुनिया दी' नूरजहां,मेहदी हसन.पाकिस्तानी चित्रपट-दुनिया पैसे दी. 'कभी आर कभी पार' शमशाद बेगम.चित्रपट-आर पार. 'अब के बरस भेजो भैय्या को बाबुल' आशा भोसले.चित्रपट-बंदिनी. 'ढुंढो ढुंढो रे साजना ढुंढो' लता.चित्रपट-गंगा जमुना. 'मत मारो शाम पिचकारी' लता.चित्रपट-दुर्गेश नंदिनी. 'तीर ये चुपके' आशा भोसले. चित्रपट -फागुन. 'तेरे बिन सूने नैन हमारे'लता,रफी.

चित्रपट-मेरी सूरत तेरी आंखे. 'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'धीरे से आजा रे निंदिया' लता.चित्रपट-अलबेला. 'बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे' लता.एक फूल चार कांटे. 'तू जो मेरे सूर में गुनगूना ले' येसुदास,हेमलता.चित्रपट-चितचोर.

'परदेसीयों से ना अखियां मिलाना' रफी.चित्रपट-जब जब फुल खिले. 'अपनी कहो कुछ मेरी सुनो' लता, तलत महमूद.चित्रपट-परछाईं. 'तेरे बिन सूने नैन हमारे' रफी,लता.चित्रपट-मेरी सुरत तेरी आंखे.'न झटको जुल्फ से पानी' रफी.चित्रपट-शहनाई.'आज की रात बड़ी शौक बड़ी नटखट है' रफी.चित्रपट-नई उम्र की नई फसल.'अल्ला मेघ दे,पानी दे छाया दे. एस.डी. बर्मन. चित्रपट-गाईड.'बहारों ने मेरा चमन लूटकर' मुकेश.चित्रपट-देवर.'मैं सोया अंखियां मीचे' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट -

'बरसो रे हये बैरी बदरवा बरसो रे'  आशा भोसले. चित्रपट -

'छम छम घुंघरू बोले' आशा भोसले .चित्रपट-काजल.

'पिया पिया ना लागे मोरा जिया' आशा भोसले.

चित्रपट-फागुन. 'सून जा पुकार' आशा भोसले .चित्रपट-फागुन. 'बना दे प्रभुजी' मोहम्मद रफी आणि आशा भोसले. चित्रपट-फागुन. 'एक परदेसी मेरा दिल ले गया'  मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'मैं ने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है' रफी. चित्रपट-बरसात की रात. 'मेरी छोड़ दे कलाई'  मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले. चित्रपट-फागुन. 'न जाओ सैंय्या छुडा के बैंय्या' गीता दत्त.चित्रपट-साहिब बीबी और गुलाम.

'तुम रूठ के मत जाना' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-फागुन. 'है है रसिया तू बड़ा बेदर्दी' आशा भोसले.चित्रपट-दिल दिया दर्द लिया. 'कौन गली गयो शाम' परवीन सुलताना, चित्रपट-पाकिजा. 'दिन सारा गुजारा तोरे अंगना' लता,रफी. चित्रपट-जंगली. 'जाइये आप कहां जायेंगे' आशा.मेरे सनम. 'मेरा प्यार वो है के मरकर भी तुझ को' महेंद्र कपूर. चित्रपट-ये रात फिर न आयेगी.'नदिया किनारे' लता.चित्रपट-अभिमान. 'दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे' किशोर कुमार.चित्रपट-शराबी.

'ये तो सच है के भगवान है' हरिहरन,प्रतिमा राव,घनश्याम वासवानी,संतोष तिवारी,रवींद्र रावल. 'मैं ने रंग ली आज चुनरिया' लता.चित्रपट-दुल्हन एक रात की. 'आज की रात बड़ी शौक़ बड़ी नटखट है' मोहम्मद रफ़ी और आशा भोंसले.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'देखती ही रहो आज दर्पण ना तुम' मुकेश.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.-'इसको भी अपनाता चल' मोहम्मद रफ़ी.चित्रपट

-नयी उमर की नयी फसल. 'कारवां गुज़र गया' मोहम्मद रफी.चित्रपट-नयी उमर की नयी फसल.'मेरी सैंया गुलबिया का फूल: - सुमन कल्याणपुर और मीनू पुरूषोत्तम.-चित्रपट-नयी उमर की नयी फसल. 'ना मानू ना मानू' लता.गंगा जमुना. 'मेरा प्यार भी तू है' लता,मुकेश.-चित्रपट-साथी. 'शोख शोक आँखें' आशा भोसले.चित्रपट-फागुन. 'चेहरा है या चांद खिला है' किशोर कुमार.चित्रपट-सागर. 'तुम्हे दिल से चाहा था हम ने' मोहम्मद अजीज.चित्रपट-मीरा का मोहन.'आज सोचा तो आंसू भर आये' लता.हंसते जख्म.'गैरों पे करम अपनो पे सितम' लता.चित्रपट-आंखे.'तेरे इश्क का मुझ पे हुवा ये असर' आशा भोसले.चित्रपट-नागिन.बाबूल की दुवाये लेती जा' रफी.चित्रपट-नीलकमल. 'ऐ मालिक तेरे बंदे हम' लता,मन्ना डे. चित्रपट-दो आंखे बारह हाथ.(याचा अंतरा मालकंस रागात आहे) 'सावन के झुलों ने मुझको बुलाया' मोहम्मद अजीज.चित्रपट-निगाहें. 'देर से आना जल्दी जाना' अलका याज्ञिक,मनहर उधास.चित्रपट-खलनायक. 'सुरमई अखियों मे' येसुदास. चित्रपट-सदमा./'चुरा लिया है तुम ने जो दिल को' आशा,रफी.यादों की बारात.'ओ साथी रे तेरे बिना भी क्या जीना' किशोर कुमार. चित्रपट-मुकद्दर का सिकंदर.'मैनू इश्क दा लगिया रोग' अनुराधा पौडवाल.चित्रपट-दिल है के मानता नहीं. 'मोरे कान्हा जो आये पलट के' आरती अंकलीकर.सरदारी बेगम. 'घनन घनन' उदित नारायण, सुखविंदर सिंह, अलका याग्निक, शंकर महादेवन, शान, किशोरी गोवारिकर.चित्रपट-लगान. 'तुमको पाया है तो जैसे खोया हूँ' राज सोधा,सैयद अली.चित्रपट-ओम् शांती ओम्.

● नॉन फिल्मी...

'मैं खयाल हूँ किसी और का' -नुसरत फतेह अली खान.'जिन के होटों पे हंसी पाव मे छाले होंगे' -गुलाम अली. 'चिठ्ठी न कोई संदेस' नज्म-जगजीत सिंग.'चाहत देस से आनेवाले' -पंकज उधास. 'नई उमर की नये सितारों'- भूपिंदर सिंह'यह शुभ सुहाग की रात' - मन्ना डे

● मराठी...

'अरे वेड्या मना ' नाटक-शाकुंतल.

'कोण तुजसम सांग' नाटक- सौभद्र.

'परवशता पाश दैवे' नाटक-रणदुंदुभी.

'पावना वामना' नाटक- सौभद्र.

'मी अधना' नाटक-मानापमान.

'हरी मेरो जीवन प्राण अधार' नाटक-मंदारमाला.

'नच सुंदरी करू कोपा' नाटक-सौभद्र.

'तुमबिन मोरी कौन खबर ली' नाटक-अमृतसिद्धी.

'लाविते मी निरांजन' नाटक-वाहतो ही दुर्वांची जुडी.

'दे रे कान्हा चोळी लुगडी' लता.चित्रपट-पिंजरा.

'लावते मी निरांजन' -माणिक वर्मा.

'सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले' -सुमन कल्याणपूर.

'या इथे लक्ष्मणा' सुधीर फडके. गीत रामायण.

'सागरा प्राण तळमळला' -मंगेशकर भावंडं.

'माझे माहेर पंढरी' किशोरी आमोणकर.

'दिवस तुझे हे फुलायचे' -अरुण दाते.

__________________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' रविवार पुरवणी.दि. १ ऑक्टोंबर २०२३.







संगीत आणि साहित्य :