गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, September 16, 2023

राग-रंग (लेखांक २४) केदार

"Music is a higher revelation than all wisdom and philosophy" Ludwigvan Beethoven. केदार हा एक प्राचीन राग आहे,राग केदार, ज्याला केदारा पण म्हटल्या जाते. शिवाच्या (शंकर,महादेव) नावावरून हे नाव ठेवल्याचेही बोलल्या जाते.ज्यात ख्याल, ठुमरी, ध्रुपद अशा शास्त्रीय गीत प्रकारच्या विभिन्न शैलीं सोबतच यावर इस आधारित हल्के शास्त्रीय गीत सुद्धा सामिल आहे. गुरु ग्रंथ साहेबानुसार राग केदारा (ਕੇਦਾਰਾ) मनाला आत्माच्या वास्तविक चरित्राला अवगत करते. (थोडे विषयांतर होईल पण हे मांडणे मला आवश्यक वाटते.मी मागील लेखात लोक संगीता विषयी बोललो होतो.जगातील सर्व देशातील लोकसंगीताचा अभ्यास केला तर सर्वत्र काही ना काही साम्य आढळतेच.हंगेरीच्या जिप्सी समुदायातील लोकगीतांमध्ये 'शिवरंजनी' रागाचे स्वर सापडतात.सैबेरीयाच्या लोकसंगीतात 'सिंदूरा', रशियाच्या स्योलेन्सखमध्ये 'भूपाली',दून नदीच्या आसपास 'दुर्गा', किवमध्ये 'झिंझोटी','गुणकली','जौनपुरी',येरवानमध्ये जोगिया.मंगोलियाच्या राष्ट्रीय वाद्यवृन्दामध्ये 'भूपाली','धानी','मालकौंस','मेघ' आणि 'दुर्गा' रागांचे दर्शन झाल्याचे 'संगीत चिंतामणी'कार आचार्य बृहस्पती यांनी त्यांच्या ग्रंथात नमूद करून ठेवले आहे.यावरून संगीताला भाषेचे बंधन नसते हे लक्षात येते.एखादी गोष्ट माहीत नसणे हा काही अपराध नाही,पण माहिती असून मुद्दाम त्याकडे लक्ष न देणे वा माहिती असून खोटे ठरविणे हे मात्र अत्यंत वाईट आहे.संगीताचे बाबतीत नीर क्षीर विवेक बुद्धीने त्या त्या बाबींचे विश्लेषण करायला हवे.जगात सर्वत्र सात स्वर मान्य आहेत.या स्वरांच्या संवादातून प्राचीन काळी त्या त्या प्रांतात अनेक सुरावटी तयार झाल्या.त्या लोकसंगीताच्या स्वरूपात आजही जिवंत आहेत.) केदार राग आपल्या समोर प्रत्येक वेळी गंभीर,जटिल, समृद्ध, मादक, सुखदायक,प्रणयी आणि उत्थानकारी अशा वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येतो.रागदारी ही लोकरीच्या गुंडाळ्यासारखी आहे.धागा ओढत जा स्वेटर विणत जा...प्रत्येक क्षणाला नवनवीन वीण. ज्याची जशी मेहनत तशी त्याची कलाकुसर.प्रत्येकाचा पोत वेग-वेगळा.यात कल्पनाशक्तीला पण भरपूर वाव असतो. कलाकारी केली तर खरंच हे अफाट काम आहे. केदारमधील मी सर्वप्रथम शिकलो ती 'सोच समझ मन मीत पिहरवा' त्यावेळी 'सोचण्याची' व समजण्याची कुवत नसल्यामुळे अर्थ कळला नाही.पण राग स्वरूप कळून आले.त्यातील स्वरांची गोडी कळून आली.स्वरांचं एक बरं असतं.शब्द मिळाले तरी छान, न मिळाले तरी छान. सोबतीला शब्दच हवेच असा काही आग्रह नसतो.आणि आलेच तर नाही पण म्हणत नाही.तसे नसते तर वाद्यसंगीत रसिकप्रिय झालेच नसते.तसेच शब्द स्वरांची सांगड तर कुणालाही आवडणारच ना! 'कान्हा रे,नंद नंदन' ही केदारमधील माझी आवडती अशी एक लडिवाळ चीज आहे.ज्या कोणी ही बंदिश केली त्याला साष्टांग दंडवत.हा सायंकाळी उशिरा गायिल्या जाणाऱ्या रागांमध्ये सगळ्यात लोकप्रिय रागांपैकी एक आहे.ज्या कोणी केदार रागाची रचना केली,त्याच्या सांगीतिक जाणिवेची व बुद्धिमत्तेचे कौतुक करावेसे वाटते.१७ व्या शताब्दीतील ग्रंथांनुसार केदार राग मोगल कालीन संगीतकारांचा आवडता असून मैफलीतील प्रमुख रागापैकी एक होता,असे संगीत विद्वानांचे मत आहे. केदार रागाला दक्षिण भारतीय संगीत पद्धतीने पण स्वीकारले आहे.ज्याला 'केदारम्' म्हटल्या जाते.यात अनेक संगीतकारांच्या कलाकृती आजही आपण ऐकू शकतो.जसे त्रिमूर्ती संगीतकार श्री मुत्थुस्वामी दिक्षितार यांचे 'आनंद नटाना प्रकाशम्'.याच्यासारखाच कर्नाटकातील हमीर कल्याण आहे. केदार रागाचे अनेक प्रकार आहे. शुद्ध केदार,चांदनी केदार, मलुहा केदार, जलधर केदार, सावनी केदार, बसंती केदार, केदार बहार, नट केदार, आनंदी केदार, शाम केदार, तिलक केदार वगैरे वगैरे.यातील रसिकप्रिय असे काहीच प्रकार आहेत.पं.भातखंडेंच्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीनुसार केदार रागाचे चार प्रकार महत्वाचे मानले गेले आहे. १.शुद्ध केदार,२.चांदनी केदार, ३. मलुहा केदार आणि ४. जलधर केदार. ● जलधर केदार गाणाऱ्यांमध्ये पं.रामाश्रय झा 'रामरंग', पं.गणपतराव बेहरे,गंगुबाई हंगल, पं. सी.आर.व्यास, पं. डी. व्ही.पलुस्कर, पं. भीमसेन जोशी.● मलुहा केदार :- पं. सी.आर.व्यास,उस्ताद अली अकबर खान (सरोद),डॉ. लालमणी मिश्र (वीणा),उस्ताद विलायत हुसेन खान,उस्ताद लताफत हुसेन खान,पं.के.जी.गिंडे, उस्ताद शराफत हुसेन खान,पं. भीमसेन जोशी,पं. अरुण द्रविड.निशांत पनीक्कर.● चांदनी केदार :- उस्ताद अमीर खान, बसवराज राजगुरू, श्रुती सडोलीकर,पं. बुधादित्य मुखर्जी (सतार),उस्ताद विलायत खान-उस्ताद इम्रत खान (सतार),उस्ताद शाहिद परवेज (सतार),उस्ताद तन्वीर अहमद खान.● बसंती केदार-यात बसंत आणि केदार रागाचे मिश्रण असावे हे स्पष्टपणे दिसते.हा राग उस्ताद अल्लादिया खान साहेबांनी प्रचलित केला असे म्हणतात.उच्च कोटीचे सादरीकरण पं. मल्लिकार्जुन मन्सूर, केसरबाई केरकर,मोगुबाई कुर्डीकर,मास्टर कृष्णराव, किशोरी अमोणकर.● नट केदार :- पं. राम मराठे, मोगुबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर.● केदार बहार :- पं. एस.एन. रातांजनकर. ● तिलक केदार (तिलक कामोद व केदार रागाचे मिश्रण) :- मास्टर कृष्णराव. ● श्याम केदार (श्याम कल्याण व केदार रागाचे मिश्रण) :- अब्दुल हलीम जाफर खान, निखिल बॅनर्जी (सतार). ● आनंदी केदार (नंद व केदार रागाचे मिश्रण).● मांड केदार :-बसवराज राजगुरू.● आडंबरी केदार :- मल्लिकार्जुन मन्सूर ● विविध गायक/वादकांनी सादर केलेला केदार युट्युबवर उपलब्ध आहे.उस्ताद बडे गुलाम अली खान,पं. भीमसेन जोशी, जयश्री पाटणकर,मालिनी राजूरकर,पं. शिवकुमार शर्मा (संतूर),रोनू मुजुमदार (बासरी),पं. निखिल बॅनर्जी (सतार),पं. बुद्धदेव दासगुप्ता (सरोद),रहीम फहीमुद्दीन डागर (धृपद),पं. राजन साजन मिश्र,पं. वसंतराव देशपांडे,उस्ताद राशीद खान,किशोरी आमोणकर,पद्मा तळवलकर,अश्विनी भिडे,पं. सत्यशील देशपांडे,अरुण कशाळकर,पं.उल्हास कशाळकर,पं.व्यंकटेश कुमार,पं.अजय चक्रवर्ती,अनुपमा भागवत (सतार),कौशिकी चक्रवर्ती,जयतीर्थ मेवूंडी,अपूर्वा गोखले,ओंकार दादरकर,सावनी शेंडे,मौमिता मित्रा,राजेंद्र कुलकर्णी (बासरी),सुचिष्मीता दास,मनाली बोस,पुर्बायन चटर्जी (सतार),पं. पिनाकीन व्यास वगैरे वगैरे... केदारमधील तराण्यावर एक नृत्य पण उपलब्ध आहे. ● केदार रागावर आधारित चित्रपट गीते... 'पंछी बावरा चांद से प्रीत लगाये' खुर्शीद. चित्रपट-भक्त सूरदास (१९४२). 'उठाये जा उनके सितम' लता.चित्रपट-अंदाज. संगीत-नौशाद (१९४९). 'मैं पागल मेरा मनवा पागल' तलत महमूद. चित्रपट-आशियाना. संगीत-मदन मोहन (१९५२). 'साजन बिना निंद न आवे' लता.चित्रपट-मुनीमजी.संगीत-एस.डी. बर्मन (१९५५). 'हमको मन की शक्ती दे मन विजय करे' वाणी जयराम.चित्रपट-गुड्डी.संगीत-वसंत देसाई (१९७१). 'दरशन दो भगवान नाथ मोरी अखियां प्यासी रे' मन्ना डे, हेमंत कुमार,सुधा मल्होत्रा.चित्रपट-नरसी भगत.संगीत-रवी.(१९५७). 'बेकस पे करम किजीए' लता.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद.(१९६०). 'कान्हा जा रे लता,मन्ना डे. चित्रपट-बूट पॉलिश, तेल मॉलिश.संगीत-चित्रगुप्त (१९६१). 'आप यूं ही अगर हम से मिलते रहे देखीये एक दिन प्यार हो जायेगा' लता,रफी.चित्रपट-एक मुसफिर एक हसीना.संगीत-ओ.पी.नय्यर (१९६२). 'किसी की याद' रफी.चित्रपट-जहांआरा. संगीत-मदन मोहन (१९६४). 'इतने करीब आके भी क्या जाने किस लिए' तल महमूद,मुबारक बेगम.चित्रपट-शगून.संगीत-खय्याम (१९६४). 'जाओ रे जोगी तुम जाओ रे' लता.चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन (१९६४). 'मिल जा रे जाने जाना' लता.चित्रपट-बेनजीर. संगीत-एस.डी. बर्मन (१९६४). 'आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है'-किशोर, लता.चित्रपट-घर.संगीत-आर.डी. बर्मन (१९७८). 'बोले तो बांसुरी सही' येसुदास.चित्रपट-सावन को आने दो. संगीत-राजकमल.(१९७९). 'पल दो पल का साथ हमारा' रफी,लता.चित्रपट-द बर्निंग ट्रेन.संगीत-आर.डी. बर्मन (१९८०). 'हर वक्त तेरे हुस्न का होता है समा और' महेंद्र कपूर.चित्रपट-चिंगारी.संगीत-रवी (१९८९). ● गैर फिल्मी.... 'भुली बिसरी चंद उमीदे' गझल -मेहदी हसन. 'ख़ब्रुम रसीदु आईएम शब' फ़ारसी कव्वाली.नुसरत फ़तेह अली खान - भाग १ , भाग 2 'भगवद्गीतेतील मंत्र' -जितेन्द्र अभिषेकी. 'गोकुल में बाजत शाम बधाई' भक्तीगीत. पं. जसराज. 'कब की खडी जमुना' भक्तिगीत. परवीन सुलताना. ● मराठी चित्रपट गीते... 'ही कुणी छेडिली तार' आशा भोसले,पं. वसंतराव देशपांडे.चित्रपट-गुळाचा गणपती.संगीत-पु.ल.देशपांडे. 'तुझी नि माझी फुलली प्रीती' आशा भोसले,वसंतराव देशपांडे.चित्रपट-वैजयंता.संगीत-वसंत पवार. 'नवीन आले साल आजला' आशा भोसले. चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'आज मी आळविते केदार' मधुबाला जव्हेरी.चित्रपट-अवघाची संसार. संगीत-वसंत पवार. 'गा रे कोकिळा गा' आशा भोसले.चित्रपट-बायकोचा भाऊ. संगीत-वसंत प्रभू.(सुरवात हमीर सारखी वाटते) 'दिवा लाविते दिवा' आशा भोसले.चित्रपट-तू सुखी रहा.संगीत-वसंत पवार. 'प्रभूपदास नमित दास' नांदी. गायक-रामदास कामत,प्रकाश घांग्रेकर, भालचंद्र पेंढारकर,अरविंद पिळगांवकर.नाटक-पुण्यप्रभाव. 'वालीवध ना खलनिर्दालन' सुधीर फडके.गीत रामायण. 'सत्यम् शिवम् सुंदरा' उत्तरा केळकर. चित्रपट-सुशिला.संगीत-राम कदम (१९७८) --------------------------------------------------------------------------- दै. उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी. दि.१७.९.२०२३

Saturday, September 9, 2023

राग-रंग (लेखांक २३) सोहोनी.

न नादेन विना गीतं न नादेन विना स्वर: | न नादेन विना नृतं तस्मान्नादात्मकं जगत || अर्थात नादाशिवाय ना गीत,ना स्वर, ना नृत्य,अवघे जग नादात्मक आहे. सोहनी राग मारवा थाटातुन उत्पन्न झाला आहे.सा, रे॒, ग, म॑, प, ध, नि हे मारवा थाटाचे स्वर आहेत.म्हणजेच मारवा थाटात रिषभ स्वर कोमल, मध्यम स्वर तीव्र व बाकी स्वर शुद्ध आहेत.राग मारवा, ‘मारवा’ थाटाचा आश्रय राग आहे.ज्यात रिषभ कोमल और मध्यम तीव्र असतो पण पंचम स्वर वर्ज आहे.आरोहावरोहात सहा स्वर लागत असल्यामुळे याची जाती षाडव-षाडव ठरते.याचा वादी स्वर रिषभ तथा संवादी स्वर धैवत आहे.ह्या रागाच्या गायन-वादनासाठी दिवसाचा चौथा प्रहर योग्य मानला गेला आहे. सोहनी रागाची उत्पत्ती मारवा थाटातील असल्यामुळे सोहनीमध्ये सुद्धा मारव्याचेच स्वर लागत असले तरी आरोहात रिषभ वर्ज आहे. आरोह-सा ग म॑ ध नि सां. अवरोह-सां नी ध म॑ ग रे॒ सा. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या या रागाचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.याला चंचल प्रकृतीचा राग मानतात.(पण 'मुगले आझम' चित्रपटातील बडे गुलाम अली खान साहेबांनी गायिलेले 'प्रेम जोगन बनके' ऐकल्यावर हे पटत नाही.) असो! सोहनी हा मारवा थाटातील अतिशय गोड आणि लोकप्रिय राग आहे.याच थाटातील पुरीया,साजगिरी, ललित (●काही गायक ललित रागात शुद्ध धैवताचा प्रयोग करतात.परंतु अधिकांश गायक यात कोमल धैवताचा प्रयोग करतात. कोमल धैवताच्या ललितचा प्रचार अधिक असल्याने हा प्रकार अतिशय लोकप्रिय आणि कर्णप्रिय पण आहे. भातखंडेंनी यात शुध्द धैवत मान्य केल्यामुळे याला मारवा थाटात बसविण्याचा अवघड प्रयत्न केला. खरे तर ललित राग भातखंडे प्रणित दहा थाटातील कुठल्याच थाटात योग्य प्रकारे बसत नाही. ह्याला जबरदस्ती मारवा थाटात बसविले आहे. ललित आणि मारवा रागाचे स्वर आणि स्वरूप दोन्ही बिलकुल मेळ खात नाही. दोन्ही रागांचे स्वर भिन्न आहेत. ललित रागात शुद्ध मध्यम, जो रागाचा वादी स्वर असून एकदम प्रबळ आहे,तो स्वर मारवा रागात पूर्णपणे वर्ज्य आहे. खरे तर ललित रागाला एक अलग थाट मानायला हवे होते. या थाटात ललित, मेघ रंजनी तथा ललित रागाप्रमाणे दोन्ही मध्यमाचा प्रयोग होऊ शकणारे व भविष्यात निर्माण होणारे राग यात बसवता आले असते. जोपर्यंत दहा थाटच मान्य आहेत तोपर्यंत कोमल धैवताच्या ललित रागाला पूर्वी थाटात ठेवणेच योग्य वाटते.) भटियार (●अधिकतर विद्वान भटियार रागाला बिलावल थाटान्तर्गत मानतात. बिलावल थाटातील राग मानण्याचे कारण यात शुद्ध मध्यम हा प्रधान स्वर आहे.आणि मारवा रागात शुद्ध मध्यमाचा प्रयोगच होत नाही. तसेच रागस्वरूपाच्या दृष्टीने पण मारव्याच्या जवळपास जात नाही.) बिभास (●बिभास रागाचे तीन प्रकार आहेत. शेवटचे दोन प्रकार क्रमशः पूर्वी आणि मारवा थाट जन्य राग आहेत. तीनही बिभास एक दुसऱ्यापासून वेगळे आहेत. त्यातील भैरव थाट जन्य बिभास अधिक प्रचारात आहे.) हे राग पण सुंदर आहेत. सोहनी रागामध्ये ख्याल आणि ठुमरी हे गायकीचे दोन्ही प्रकार मान्य आहेत.पण ठुमरी अंगाच्या गायकीत याचा अधिक प्रयोग होत असल्याचे दिसून येते.या रागाचा प्रयोग दोन प्रकारे केल्या जातो.पहिल्या प्रकारात औडव-षाडव जाती अंतर्गत आरोहात रिषभ आणि पंचम तथा अवरोहात पंचम स्वराचा प्रयोग होत नाही.दुसऱ्या प्रकारात आरोहात रिषभ आणि अवरोहात पंचम स्वराचा उपयोग केल्या जात नाही.सोहनीमध्ये पुरीया व मारवा रागाच्याच स्वरांचा प्रयोग केल्या जातो.परंतू त्याचा प्रभाव आणि भावाभिव्यक्तिमध्ये खूप फरक आहे.या रागात मींड, गमक याचा योग्य प्रयोग केल्यास यातील भाव अधिक चांगल्या तऱ्हेने प्रकट होतात. सोहनी दक्षिण भारतातील 'हंसनंदी' रागप्रमाणे आहे.जर हंसनंदी रागात शुद्ध रिषभाचा प्रयोग केला तर तो ठुमरी अंगाच्या सोहनी रागाप्रमाणे वाटतो. हा लेख लिहिण्यामागचे मुख्य कारण उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायिलेले मुगले आजम चित्रपटातील 'प्रेम जोगन बनके' हे गाणे आहे.रसिकांनी जरूर ऐकावे.या रागात हिंदी व मराठी गाणी खूपच कमी आहेत... ● चित्रपट गीते... 'कुहू कुहू बोले कोयलिया' लता,रफी.चित्रपट-सुवर्ण सुंदरी.संगीत-आदि नारायण राव (१९५७) 'प्रेम जोगन बनके' उस्ताद बडे गुलाम अली खान.चित्रपट-मुगले आजम.संगीत-नौशाद (१९६०). (या चित्रपटा संबंधात अनेक किस्से प्रचलित आहेत. चित्रपटाचे निर्माता निर्देशक के.आसिफ यांनी संगीतकर म्हणून नौशाद यांची निवड केली.त्यावेळी नौशाद फिल्म इंडस्ट्रीत जवळ जवळ वीस वर्षांपासून काम करीत होई.सफल ससंगीतकर म्हणून त्यांना ओळखले जात होते.या वेळेपर्यंत त्यांनी जवळ जवळ पन्नास चित्रपटांना संगीत दिले होते. त्यातील सर्वच गाणी लोकप्रिय झाली होती.बैजू बावरा,मदर इंडिया सारखे सफल चित्रपट त्यांच्या नावावर होते.त्यामुळे सर्व निर्मात्यांची संगीतकार म्हणून पहिली पसंती त्यांना असायची.के. आसिफ यांनी जेव्हा उस्ताद बड़े गुलाम अली खान यांना चित्रपटात गायची विनंती केली तेव्हा खान साहेबांनी साफ नकार दिला.चित्रपटात गायची बिलकुल इच्छा नसल्याचे सांगितले. यावर के.आसिफ यांनी मागाल तेवढे मानधन देण्याचे कबूल केले.त्यावेळी बड़े गुलाम अली खान यांनी २५००० रुपये मानधन सांगितले.त्या काळी मोठ्यातला मोठा गवैय्या ५०० रुपयांच्या वर मानधन घेत नसे.पण के.आसिफ यांनी २५००० रुपये देऊन त्यांच्याकडून गाऊन घेतले.) 'झुमती चली हवा' मुकेश.चित्रपट-संगीत सम्राट तानसेन (१९६२) 'कही दीप जले कही दिल' लता.चित्रपट-बीस साल बाद (१९६२) 'जीवन ज्योत जले' आशा भोसले.चित्रपट-गृहस्थी. संगीत-रवी (१९६३) 'कान्हा रे कान्हा' लता. चित्रपट-ट्रक ड्रायव्हर. संगीत-सोनिक ओमी (१९७०) ● मराठी... 'जिवलगा कधी रे येशील तू' आशा भोसले. चित्रपट-सुवासिनी.संगीत-सुधीर फडके (१९६१) 'सख्या रे घायाळ मी हरिणी' लता. चित्रपट-सामना. संगीत-भास्कर चंदावरकर (१९७४) 'नंदाघरी नंदनवन फुलले' भावगीत -सुमन कल्याणपूर. ------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र'पुरवणी.रविवार दि.१०.१०.२०२३.

Saturday, September 2, 2023

राग_रंग (लेखांक २२) दुर्गा...

स्त्रीलिंगी नाव असलेल्या 'कलावती','सरस्वती','बागेश्री', 'धनाश्री','मधुवंती','रागेश्री' 'सावनी','भैरवी' अशापैकीच एक राग 'दुर्गा'! नाव जरी स्त्रीलिंगी असले तरी ह्या रागांना 'ही' राग न म्हणता 'हा' राग असे पुल्लिंगीच संबोधल्या जाते.ही पण एक गंमत आहे. हा राग बिलावल थाटातून निर्माण झालेला मधुर राग आहे.बिलावल थाटाने भारतीय शास्त्रीय संगीताला मोहून टाकणारे खूप राग बहाल केले आहेत.त्यातीलच अतिशय साधा,सोपा पण गोड असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ‘दुर्गा’ हा राग आहे. बिलावल थाटाचे पूर्वीचे ग्रंथातील नांव, ‘धीरशंकराभरण’ हेआहे. या थाटातून बावीस रागांची निर्मिती होते, असे ग्रंथकार सांगतात. रात्री गायल्या जाणाऱ्या रागातील लोकांना आवडणारा, मधुर वाटणारा हा राग आहे. या रागाची प्रकृती गंभीर म्हणता येणार नाही, किंवा चंचल म्हणता येणार नाही. कर्नाटक संगीतातील ‘शुद्ध सावेरी’ या रागाशी साधर्म्य सांगणारा हा राग, मात्र दोन्ही रागांचे चलन वेगळे आहे. कर्नाटक संगीतातून जरी हा राग आला असला, तरी उत्तर हिंदुस्थानी संगीतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.खरे म्हणजे संगीताच्या शैली जरी भिन्न असल्या तरी भेद केवळ दोनच असते. ते म्हणजे,चांगले वा वाईट.म्हणून शैलींमुळे नाही तर खास विशेष गुणांनी कलांना महान बनविल्या जाते असे म्हटले तर वावगे होणार नाही. संगीताचा मुख्य आधार नाद आहे.ज्याला मनुष्य आपल्या कंठाद्वारे व विविध वाद्यांद्वारे उत्पन्न करतो.या नादाचे नियम काही सिद्धांतानुसार करण्यात आले असून, या सिंद्धांताच्या आधारावर संगीतातील सात स्वरांची निश्चिती करण्यात आली आहे.आणि तेच संगीत कलेचा प्राण आहे.संगीताचे मुख्य माध्यम स्वर आणि लय हे आहे.हे माध्यम अतिशय आंतरिक आहे.आपणाला यास बाहेरून एकत्र करायची गरज पडत नाही.तसेच संगीतामध्ये दोन अशा विशेषता आहे,की ज्या दुसर्‌या कोणत्याच कलांमध्ये नाहीत.त्यातील एक आहे ’काकु’.काकु हा शब्द ’के’ धातुपासून उत्पन्न झाला आहे.ज्याचा अर्थ आहे ’लोकोपतापयोः...’ म्हणजे ध्वनीची हृदयापासून निघणारे सुक्ष्मभाव व्यक्त करण्याची क्षमता...! ही शक्ती किंवा क्षमता फक्त ध्वनी किंवा स्वरातच आहे,शब्दात नाही.दुसरी विशेषता ही आहे,की ध्वनीमध्ये कर्षण (ताणणे)गूण आहे.याला आपण कितीही मात्रांपर्यंत ओढू (ताणू) शकतो.शब्दाला जर जास्ती ओढ दिली तर शब्दत्वाची हानी होऊन त्याचे ध्वनीत परिवर्तन होते.या दोन विशेषत्वामुळे संगीतामध्ये जी सुक्ष्म भाव व्यक्त करण्याची शक्ती येते ती अन्य कोणत्याच कलांमध्ये नाही.स्वरांमध्ये जो सलगपणा (Immediacy) आहे तो अन्य कोणत्याच माध्यमात नाही.शब्दाच्या भावाभिव्यक्तित अडथळा येऊ शकतो परंतू स्वरांच्या भावामध्ये तो येत नाही.ही एक सरळ भाषा आहे.जिचा उपयोग पशु-पक्षी सुद्धा करतात.ध्वनीचे वैशिष्ठ्य म्हणजे ती एका हृदयातून निघते आणि दुसर्‌या हृदयात पोहोचते..शब्दांना समजणे कठीण जाऊ शकते पण स्वर म्हणजे मानवाची मातृभाषा आहे.त्याची अभिव्यक्ती हृदयातून होते आणि त्यामुळेच या भाषेने पशु-पक्षी सुद्धा प्रभावित होतात..असो! दुर्गा रागात गांधार व निषाद वर्ज असल्यामुळे याची जाती औडव औडव आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहेत.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर रिषभ आहे.गानसमयरात्रीचा पहिला प्रहर. हा पूर्वांगप्रधान राग आहे.संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक-वादक अत्यंत सोप्या अशा या रागातून काय अप्रतिम चित्र उभे करतात,ते त्यांच्या गायन,वादनातून दिसून येते.या रागातली 'गावत दुर्गा रागिनी’ हे पं. शंकरराव व्यास, यांनी रचलेले लक्षणगीत व "सखी मोरी रुमझुम...' ही प्रसिद्ध बंदिश शास्त्रीय संगीताच्या रसिकांनी नक्कीच ऐकली असेल.सा रे म प ध सा इतक्याच स्वरात रंगणाऱ्या या रागात विविध स्वरांच्या मुर्छना केल्या तर वेगवेगळे राग आपणास दिसून येतात.जसे:- धैवताला षड्ज मानून दुर्गा रागाचे स्वर घेतले असता 'मालकौंस', रिषभाला षड्ज केल्यास 'धानी', मध्यमाला षड्ज केल्यास 'भूप', पंचमाला षड्ज केल्यास 'मधमाद सारंग'! विभिन्न स्वरांपासून आरंभ होणाऱ्या सप्तकाच्या क्रमशः आरोहावरोहाला 'मुर्छना' असे म्हणतात.संगीतातील 'ग्राम' ही संकल्पना मुर्छना पद्धतीचा आधार आहे. या रागात चित्रपट किंवा इतर गीते फारशी नाहीत.पण जी काही आहेत ती श्रवणीय आहे.तसे पाहिले तर शास्त्रीय संगीत व चित्रपट संगीताचा उद्देश केवळ मनोरंजन असल्याचे दिसून येते.फरक इतकाच की शास्त्रीय संगीत कठीण नियमाच्या साखळीत बांधून रसिकांसमोर येते.या उलट चित्रपट संगीत हलक्या-फुलक्या पद्धतीने आणि चित्रीकरणासह लोकांसमोर आल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते व लोकप्रिय होते.जरी चित्रपटातील गाण्यांचा शास्त्रीय संगीत हा बेस असला तरी मनोरंजनाच्या शर्यतीमध्ये शास्त्रीय संगीत चित्रपट संगीताच्या मानाने मागेच राहते.म्हणजेच फक्त श्राव्यपेक्षा दृक माध्यमांद्वारे संगीत आबाल-वृद्धांच्या अंतर्मनापर्यंत थेटपणे पोहोचते असे बर्नार्ड शा (१९२५ चे नोबेल पुरस्कार साहित्य विजेता महान नाटककार व कुशल राजनीतिज्ञ मानवतावादी व्यक्तित्व), हर्बर्ट रीड (एक इंग्रजी कला इतिहासकार, कवि, साहित्यिक आलोचक आणि दार्शनिक होते),प्लेटो (प्रसिद्ध दार्शनिक) या पाश्चात्य तज्ज्ञांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटते. दुर्गा राग बहुतेक आजी,माजी कलाकारांनी गायीला व आपापल्या वाद्यांवर अतिशय सुंदर रीतीने सादर केला आहे.याचे सर्व व्हीडिओ युट्युबवर असल्यामुळे आपण बघू शकता. ● चित्रपट गीते... 'ऐ बादे सबा आहिस्ता चल' हेमंत कुमार.चित्रपट-अनारकली.संगीत-सी.रामचंद्र (१९५३). 'ओ दूर के मुसफिर हमको भी साथ ले ले रे' रफी. चित्रपट-उडन खटोला. संगीत-नौशाद (१९५५). 'वृन्दावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा' चित्रपट-मिस मेरी.संगीत-हेमंत कुमार (१९५७). 'चंदा रे मोरी पतीया ले जा' लता,मुकेश.चित्रपट-बंजारन. संगीत-परदेसी (१९६०). 'गीत गाया पत्थरोंने' आशा भोसले,किशोरी आमोणकर,महेंद्र कपूर. चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४). 'जानेवाले ओ मेरे प्राण तेरी खुशी है मेरी बहार' आशा भोसले.चित्रपट-गीत गाया पत्थरोंने.संगीत-रामलाल हिरापन्ना (१९६४) 'हम ईंतजार कंटेंगे तेरा कयामत तक' रफी,आशा.चित्रपट-बहू बेगम.संगीत-रोशन (१९६७). 'सावन का महिना पवन करे सोर'लता,मुकेश. चित्रपट-मिलन.संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल.(१९६७). 'जीवन से ना हार जीनेवाले' गायक,संगीतकार-किशोर कुमार.चित्रपट-दूर का राही (१९७१). 'कहां तक ये मन को अंधेरे छलेंगे' किशोर कुमार.चित्रपट. बातों बातों में.संगीत-राजेश रोशन (१९७९). 'तू इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है' मनहर उधास. चित्रपट-आप ऐसे तो न थे.संगीत-उषा खन्ना (१९८०) ●हिंदी... 'हे राम हे राम' भजन-जगजीत सिंग. 'देवी भजो दुर्गा' भजन-मीता पंडित. 'जय जय जय दुर्गे मां भवानी' गायक-डॉ.रामगोपाल त्रिपाठी. ●मराठी... 'कर हा करी धरीला शुभांगी' संगीत नाटक 'संशय कल्लोळ'. 'चंद्रिका ही जणू' संगीत नाटक 'मानापमान'. 'या लता शिकविती गीत' संगीत नाटक 'धाडिला राम तिने का वनी' गायक- नारायणराव बोडस. 'केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा' -सुमन कल्याणपूर. 'पायो जी मैंने राम रतन धन पायो' 'केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली' आशा.सुरेश भट, हृदयनाथ मंगेशकर. --------------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि.३ सप्टेंबर २०२३.

काट्यांची मखमल..

नुसत्याच तुझ्या हसण्याने...





संगीत आणि साहित्य :