गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, May 1, 2017

जीवनाची गझल आनंदाने गाणारे कवी सुधाकर कदम

     प्रत्येक वय वाढलेला माणूस अनुभवाने समृद्ध आणि परिपक्व होईलच असे नाही.वय वाढले म्हणजे चिंता वाढली,काळजी वाढली आणि प्रकृतीच्या समस्याही वाढल्या असे बर्‍याच जणांच्या बाबतीत होते.आपण असे केले तर लोकांना काय वाटेल,तसे केले तर समाज काय म्हणेल, ही खरे तर अनावश्यक गोष्ट काही जणांच्या बाबतीत मनात अगदी घट्ट बसते.आणि ज्या वयात खरे तर आयुष्यात मनसोक्त जगायचं असतं त्या वयात काही माणसे चौकटीतलं आयुष्य जगून एक एक दिवस पुढे ढकलत असतात.
काही काही माणसे मात्र याला अपवाद असतात.त्यांना आयुष्याचा प्रत्येक दिवस बोनस असल्यासारखा वाटतो.खरे तर आलेला प्रत्येक क्षण ते उपभोगत असतात...जगत असतात.सकारात्मक उर्जेने आयुष्यातील संकटांवर मात करत असतात.आणि नव-नवीन आव्हाने स्वीकारत असतात.अशाच एका हव्या-हव्याशा वाटणार्‍या व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.ते नाव म्हणजे गझलगंधर्व,कवी सुधाकर कदम.
     कवी सुधाकर कदम यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९४९ रोजी खरांगणा (गोडे),जि.वर्धा (विदर्भ) येथे झाला. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.ज्यांचा उल्लेख खुद्द सुरेश भट "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन" असा करतात.त्या महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घ्यायलाही आपणासही नक्कीच आवडेल.मराठी गझल गायकी महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात रुजवण्यासाठी व पोहचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा कलावंत म्हणून सुधाकर कदम यांचं नाव आदराने घेतल्या जातं.एक थोर गझल गायक म्हणून त्यांचा सुरेश भट व संगीतकार यशवंत देव यांनी तर गौरव केलेलाच आहे,पण विशेष म्हणजे सुरेश भटांच्या सहव्या स्मृ्तीदिनानिमित्त त्यांना ’सुरेश भट स्मृती पुरस्कार’ प्रदान करताना डॉ.नरेंद्र जाधव आणि ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ’गझलगंधर्व’ या किताबाने गौरविण्यात आले.
     १९८३ साली त्यांचा मराठी गझल गायनाचा महाराष्ट्रातील पहिला ’भरारी’ हा अल्बम प्रसिद्ध झाला.बालगीतांची निकड लक्षात घेऊन त्यांच्या १३ बालगीतांचा ’खूप मजा करू’ हा अल्बमही प्रसिद्ध झाला आहे.त्यांच्या अर्चना ह्या भक्तीगीताच्या गुलशनकुमार प्रस्तुत सीडीमध्ये शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे सारख्या मातब्बर गायकांनी गायन केले आहे.त्यांनी संगीत दिलेल्या ’काट्यांची मखमल’ या मराठी गझल अल्बमसाठी स्वरसाज चढवलाय तो सुरेश वाडकर,वैशाली माडे यांनी.गीतकार दिलीप पांढरपट्टे आणि संगीतकार सुधाकर कदम यांचा ’तुझ्याचसाठी मी...’ हा अल्बमही रसिकांची मने जिंकून गेला.
बालभारती वर्ग १ ते ४ कविता ’झुला’चे संगीतही त्यांचेच.कुमार भारती इयत्ता ८ ते १० चा ’झुला’ही त्यांचाच.’सरगम’,वर्तमानपत्रातील विषयांतर सदरातील ’फडे मधुर खावया...’ गाजलेले स्फूट लेखही त्यांचेच.
एक संगीतकार आणि कवी म्हणून त्यांची बहरलेली प्रतिभा त्यांच्या कार्यशैलीची चुणुक दाखविते.समाजातील ढोंगीपणावर नेमके बोट ठेवताना आपल्या ’पांगळे’ ह्या कवितेत ते उद्गारतात...

नाही सोवळे ओवळे
आम्ही संपूर्ण नागोळे

पाठी बांधून फिरतो
अहंपणाचे गाठोळे

देह केला जरी दीप
पेटण्याचेच सोहळे

बाह्यांगाला गवसणी
आत निव्वळ भोंगळे

हिणकस गाळो जाता
होतो नेमके पांगळे

    शेतकर्‍यांचे चाललेले हाल बघूनसर्वसामान्य माणूस अस्वस्थ होत असतो.मग सुधाकर कदम यांच्यासारखा संवेदनशील कवी स्वस्थ कसा बसेल ? ते म्हणतात...

व्यवहारवादी जगाच्या भट्टीत
भाजतो सतत शेतकरी...

पिळते जरी त्या,संसार चरक
तरीही नरक होऊ ना दे...

अनेक पिढ्यांच्या सहनशक्तीने
भोगतो जगणे मृतवत...
होण्यासाठी येथे पुन्हा पस्थापित
कोणते गणीत जुळवावे...?

      स्त्रीचे सौंदर्य हा कवीच्या आवडीचाच विषय.तिची प्रत्येक अदा त्याला पण इतरत्र छोट्या छोट्या गोष्टीत दिसली नसती तरच नवल...

तुझा मादक आवाज
जशी सागराची गाज

तुझ्या केसाचे कुरळ
पाडी मनाला भुरळ

तुझे गुलबासी ओठ
जसा प्राजक्ताचा देठ

तुझी गाभुळली काया
जणू अत्तराचा फाया

    वसंत ऋतूच्या आगमनाने माणूस सुखावतो.हाच वसंत सुधाकर कदमांच्या नजरेच्या कॅमेर्‍या असा बंद होतो...

गारव्यात ऊब घेऊनी अनंत
आलाय वसंत लडिवाळ...

सृजनाचा ऋतू गळती थांबवी
कोवळी पालवी लेवोनिया...

पळस,कांचन,गुलमोहराला
रक्तवर्णी माळा लगडती...

    आपल्या ययाती या कवितेतून प्रियतमेशी हितगूज साधताना कदमांची प्रतिभा अशी खुलून येते.

स्पर्शून एकदा तू केले मला ययाती
या भग्न मंदिराशी का जोडतेस नाती ?

आता अशा घडीला मी काय बा करावे
तेजाळलेस देहा लावून एक ज्योती

माझे न राहिले ते तू मागते कशाला
स्वप्नातल्या असे ह्या बिनपालखी वराती

हा पीळ आतड्याचा कोणासही न कळला
मधुपात्र हे रिकामे हातात फक्त माती

    आपल्या ’निथळ’ या कवितेतून तिच्या सौंदर्याची तारीफ करताना सुधाकर कदमांचे शृंगारिक बोल असे बाहेर पडतात...

थेंबाथेंबाला छळतो तुझा आवेगी निथळ
अन् बेसावध क्षणी मना पडते भुरळ

वळणाच्या वळणाची तुझी कमनीय काया
हुंगताच बेहोषतो मत्त अत्तराचा फाया

उजळूनी अलगद तेजाळत भिडतेस
मारूनिया मज मिठी तूच विरघळतेस

    शेतकर्‍यांची दारूण व्यथा प्रकट करताना त्यांच्यातला कवी हळवा बनला नसता तर नवलच...

मेल्यावरी मला देऊ नका अग्नी
भुकेच्या ज्वाळांनी पोळलो गा...

     आयुष्यातील जगण्याचं सूत्र अधोरेखित करताना त्यांच्यातला कवी आक्रमक होऊन सांगू इच्छितो...

पापाच्या झाडाला
मोहाची डहाळी
पुण्य कैसे भाळी
फळावरी...?

    स्वत:चे न्यूनत्व झाकण्याकरिता दुसऱ्याच्या तत्वज्ञानाचा आधार घेणार्‍यांवर त्यांचा शब्दरूपी आसूड असा चालतो..

झाकण्याकरिता
स्वत:चे न्यूनत्व
दुसर्‍याचे तत्व
सांगू नये...

   माणसाचा स्वत:च्याच मनाशी सतत संघर्ष चालू असतो.आपल्या अंतर्मनाशी सततचा संवाद नक्की कशासाठी असतो ?

रे मना, तुज काय झाले सांग ना !
का असा छळतो स्वतःला सांग ना !

हारण्याची ही मजा घे एकदा
जिंकुनी तुज काय मिळते सांग ना !

हासुनी हसवायचा घे मंत्र हा
दुःख का कुरवाळतो तू सांग ना !

     सुधाकर कदम यांनी अनेक वाद्य वाजविण्याचे ज्ञान आत्मसात केले आहे.नागपूर आकाशवाणीचेही ते गायक व वादक होते.त्यांना आजवर अनेक पुरस्काल लाभले आहेत.त्यात प्रामुख्याने
’आउट स्टॅंडिंग यंग पर्सन’,
’समाजगौरव’,
’संगीतभूषण’,
’मॅन ऑफ द इयर’,
’कलादूत’,
’कलावंत’,
’शान-ए-ग़ज़ल’,
’महाकवी संतश्री विष्णूदास पुरस्कार’,
’गझल गंगेच्या तटावर’,
’सुरेश भट पुरस्कार’ तसेच
’गझलगंधर्व’ उपाधी...
इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.
खरे तर शब्द साहित्य सम्मेलनात आम्ही एकदाच भेटलोय पण फेसबुक व फोनच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा या माणसाचे माणूसपण आणि मोठेपण सतत जाणवत राहते.कधी त्यांचा नातू अबीरशी दंगामस्ती करतानाचे फोटो तर कधी समाजातील व्यंगावर नेमके बोट ठेवून केलेली कविता फेसबुकवर झळकत राहते.काही माणसे दुसर्‍याला सतत हवी-हवीशी वाटतात...सुधाकर कदम त्यापैकी एक !

-रमेश धनावडे
रविवार पुरवणी
'कवितेच्या सूरातून'
दै.पुढारी
अलिबाग-रायगड
दि.३० एप्रिल २०१७.


आठवण...


Wednesday, April 26, 2017

राग तोडी...


      गझल कोणतीही असो ती जोरकसपणे गायिलीच पाहिजे असा भ्रम बराच काळपर्यंत आपल्याकडे होता.कदाचित त्यावेळी ध्वनिवर्धक नसल्यामुळे कदाचित असे गावे लागत असावे.पण हीच पद्धत पुढेही अनेक वर्षे कायम राहिली.गझलच्या शब्दार्थापेक्षा व त्यातील भावनांपेक्षा फक्त गायकीलाच महत्व दिल्याचे जुने गझल गायक/गायिकांचे गायन ऐकल्यावर प्रामुख्याने जाणवते.प्रेम, विरह,याचना,नाजूक दटावणी,सौंदर्य वर्णन,साक़ी,शराब,मैखाना काहीही असो प्रत्येक शेर ख्यालाप्रमाणे एकसुरी,म्हणजे बंदिशीला धरून गायिल्या जायचा.अर्थात गाणारे पट्टीचे गायक/गायिका असायचे ही बाब वेगळी.पण हळू-हळू गझलमधील शब्दांकडे लक्ष देऊन त्याला अर्थानुरूप बंदिश बनवून शब्दांना सजविण्याचा प्रयत्न सुरू झाला.त्यामुळे पूर्वी गायिल्या जाणार्या् क्षुद्र प्रवृत्तीच्या ठरविल्या गेलेल्या पिलू,खमाज,झिंझोटी वगैरे विशिष्ठ रागांच्या जोखडातून गझल गायकी मुक्त होऊन दरबारी,मालकौंस,सारख्या मान्यवर रागातही गझलच्या बंदिशी तयार व्हायला लागल्या.हा बदल होण्यामागे चित्रपट संगीताचा फार मोलाचा वाटा आहे.
      चित्रपट संगीत लोकप्रिय झाल्यामुळे जुन्या सर्व गझल गायक/गायिकांची मिरासदारी चित्रपटातील सुमधुर गाण्यांमुळे संपुष्टात यायला लागली होती.त्यातील नादमधुरता,शब्दानुरूप स्वर-रचना,शब्दांची फेक,स्वरांचे बेहलावे,पोषक वाद्यवृंद व गायनातील नाजुकता लोकप्रिय व्हायला लागली होती.हा फरक जाणवायला लागल्याबरोबर आपल्या देशातील अनेक गझल गायक/गायिकांनी शास्त्रीय संगीताचा मूळ गाभा कायम ठेवून वरील सर्व प्रकार आत्मसात करून गझल गायकीचा ढंगच बदलून टाकला.यात जगजितसिंग हे अग्रेसर राहिले.ज्या काळात चित्रपटातून सुद्धा मेलोडिअस गाण्यांना उतरती कळा लागली होती त्या काळात मेलोडी कायम ठेवून,कठोर आत्मपरीक्षण करत-करत त्यांनी आपली वेगळी पण लोकप्रिय शैली निर्माण केली.
"मिलकर जुदा हुए तो न सोया करेंगे हम..."
ही क़तील शिफ़ाई यांची,जगजीत-चित्रासिंग यांनी गायिलेली सुंदर गझल ’तोडी’ नामक रागात अतिशय वेगळ्या प्रकारे,रागस्वरूपाला धक्का न लावता बांधलेली आहे.तोडी रागाची अनेक रुपं आहेत.त्यात आपल्या सारख्या रसिक मंडळींनी खोलात जाण्यात काही अर्थ नाही.कारण तो सुद्धा लेखाचा एक वेगळा विषय आहे.या रागात सा रे ग म ध नि असे स्वर लागतात.(अवरोहात पंचम स्वराचा वापर काही गायक करतात.)यातील रिषभ,गांधार,धैवत स्वर कोमल असून मध्यम तीव्र आहे.गानसमय सकाळचा आहे...अर्थात ही वेळ फक्त शास्त्रीय गायन,वादन करणा‌र्‌यांसाठीच आहे.कारण या रागातील जेवढी काही चित्रपट व चित्रपटाबाहेरची गीते,भावगीते,भक्तिगीते आहेत ती सर्वकाळ गोड वाटतात,हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे.
तोडी राग जवळ- जवळ प्रत्येक गायक-वादकाने गायिला-वाजविला असावा.पं.भीमसेन जोशींच्या तोडीतील ताना, मेघांच्या गडगडटाला आव्हान देणार्‌या होत्या.तर प्रत्येक स्वराचे महत्व जाणून त्याचा अतिसुंदर विस्तार किशोरीबाईंच्या गाण्यात दिसून येतो.पं.जसराज यांची प्रत्येक राग गाण्याची
आपली एक वेगळी शैली आहे.तेथे कदाचित शास्त्र थोडे बाजूला पडत असेल.पण ज्याला ’मेलोडी’ म्हणतात ती त्यांच्या गायनात,ऐकतांना सतत जाणवते.याचा अर्थ इतर गायकांनी गायिलेला तोडी ऐकण्या सारखा नाही किंवा नसतो असे नाही.उदाहरण देतांना लोकप्रिय कलाकारांचेव नाव घ्यावे लागते,त्याला इलाज नाही.
अशा या तोडी रागाचे मला सर्वप्रथम आठवते ते ’आशिर्वाद’ या चित्रपटातील
’एक था बचपन...’
हे गाणे.त्यानंतर
’भावभोळ्या भक्तिची ही एकतारी...’
हे श्रीनिवास खळे यांनी तोडीच्या स्वरांसोबत इतर स्वरांचा ताना-बाना करून विणलेल अतिशय तलम गाणं,संगीतकाराच्या प्रतिभेची उत्तुंग झेप दाखविते.खळ्यांनीच स्वरबद्ध केलेला तुकारामाचा अभंग
’अगा करूणाकरा...’
हा अभंग ऐकतांना डोळे आपोआप झरायला लागतात.तसेच ’पिंजरा’ या चित्रपटाती. राम कदमांनी स्वरबद्ध केलेलं व सुधीर फडक्यांनी गायिलेलं
’कशी नशीबानं थट्टा आज मांडली...
’हे ही गाणे तोडी रागा मध्येच आहे.’अमर प्रेम’ या चित्रपटातील
’रैना बीती जाए...’
याचा मुखडाही याच रागात आहे.
साबरी बंधुंनी गायिलेली
’अल्ला हे अल्ला...’
ही सुंदर कव्वाली त्यांच्या गायकीने रात्रीच्या वेळी सुद्धा वेगळ्या विश्वात नेवून तल्लीन करते.तर त्यांनी दुसर्‌या ओळीत कोमल मध्यमाचा वापर वापर करून केलेली स्वरांची बांधणी भल्या-भल्यांनबुचकळ्यात टाकते.त्यांच्या गाण्यातील आर्तता सरळ हृदयात घुसून अमिर खुस्रोच्या ’सूफी’ संगीताची ’खरी’ ओळख पटवते.मध्यमाचा असाच काहीसाप्रयोग अनूप जलोटा यांनी
’तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे’
या गझलच्या बंदिशीत केला आहे,तो पण श्रवणीय आहे.
माझ्या मते गानसमयापेक्षाही त्या त्या रागातील स्वरांचा उपयोग संगीतकार कशा प्रकारे करतो,गायक-गायिका कशा प्रकारे प्रस्तुती करते आणि वाद्यमेळ कसा जमतो यावर श्रोत्यांची आवड-निवड ठरत असावी.तसे नसते तर तोडी रागातील गाणी सकाळ सोडून इतर वेळी कानाला गोड लागलीच नसती.काही-काही गोष्टी परंपरेने ठरवून-ठरवून डोक्यात भरविल्या जातात त्यातलाच गानसमय हा प्रकार असावा असे मला प्रामाणिकपणे वाटते.असो...हा वादाचा मुद्दा आहे.

      माझ्याकडून स्वरबद्ध झालेली बशर नवाज साहेबांची
’न इस तरह भी ख़यालों मे कोई बस जाए’
     ही गझल तोडी रागात आहे.मतला शुद्ध तोडीमध्ये,पण अंतरा मात्र वेगवेगळ्या रागांचा अविर्भाव-तिरोभाव दाखवत मुर्छना पद्धतीने मूळ तोडीवर येतो.ही स्वरांची वेगळी मोहमयी गुंतागुंत आपणास नक्कीच भावेल.ऐका तर...

न इस तरह भी ख़यालो मे कोई बस जाए
मैं अपने आप को सोचूँ किसी की याद आए

तमाम रात रहा नींद का सफर जारी
सजे रहे किसी आँचल के मेहरबाँ साए

तुम्हारे पास पहुँचकर कुछ ऐसा लगता है
सफ़र से जैसे मुसाफिर वतन में आ जाए

वो चंद पल जो बचा लाए थे हम अपने लिए
सितम तो ये है के वो भी न हमको रास आए

हमारी जीत अलग है,हमारी हार अलग
ज़माने वालो को ये बात कौन समझाए

Singer-Rasika Janirkar
Shayar-Bashar Nawaz
Music Composer-Sudhakar
Live,Sanskruti Arts Festival,THANE 20015


Thursday, March 9, 2017

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील मराठी गझल गायकीवरील मनोगत....


’मराठी गझलेचा जागतिक संचार’ ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील मराठी गझल गायकीवरील सडेतोड मनोगत....
संत नामदेव सभागृह,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ....दि १३ जानेवारी २०१७.




’मराठी गझलेचा जागतिक संचार’



’मराठी गझलेचा जागतिक संचार 
ह्या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातील गझल गायन....
संत नामदेव सभागृह,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.दि.१२ जानेवारी २०१७.

मारवा....

हुरहुर लावणार्‍या मारवा रागाची तोंड ओळख गाण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेताना संगीत विद्यालयात झाले होते.पण खरा मारवा कळायला नंतर बराच काळ जावा लागला.तो पर्यंत अरूण दाते यांनी गायिलेल्या ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ या मारव्यातील भावगीताने चांगलेच पछाडले होते.सोबतच ’सुमन कल्याणपुर यांनी गायिलेलं ’शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ पण कानात रुंजी घालत होतं.पण स्वरगंगेमधील ’वचन दिले तू मला’ यातील ’मला’ ला लागलेला कोमल रिषभ काही पिच्छा सोडी ना !मग पुन्हा मारव्याची आळवणी नव्याने सुरू केली.या दरम्यान माझ्या गुरुजींचे गुरूजी आदरणीय छोटा गंधर्व यवतमाळला आलेत.झाडीपट्टीत त्यांचा कार्यक्रम होता.नागपुरवरून पुढे जायचे होते.जाता जाता गुरूजींकडे (यवतमाळ) मुक्कामी आलेत...मला कळल्याबरोबर मी आर्णीहून यवतमाळला पोहोचलो.कारण मला माहित नाही पण ऋषीतुल्य छोटा गंधर्वांचा माझ्यावर खूप जीव होता.विदर्भातील बहुतेक कार्यक्रमात हार्मोनियमच्या साथीला ते मला न्यायचे.तसेच ते इकडेही मला सोबत घेऊन गेले.कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरा लावून त्यांचा स्वरांशी लडिवाळ खेळ सुरू होता.छोटा गंधर्व,तानपुरा,हार्मोनियम आणि मी....अशातच माझ्या डोक्यात मारव्याचा किडा वळवळायला लागला...आणि हिया करून विषय काढलाच.त्यांनी अतिशय बाळबोध प्रकाराने "स्वत:चे घर नसून मजेत राहणारा माणूस म्हणजे मारवा",असे सांगून षड्जाचा कमीत कमी प्रयोग करून मारवा कसा गावा हे प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.हे सांगत असताना मुर्छना पद्धतीने यात भूप,मालकौंस,दुर्गा या रागांच्या छटा पण अतिशय सोप्या पद्धतीने दाखविल्या.तो सर्व सोहळा अजूनही माझ्या डोक्यात अगदी ताजा आहे.
खालील रचना मारवा रागावरच आधारलेली आहे.यातही आपणास छोटा गंधर्वांनी सांगितल्या प्रमाणे वरील रागांच्या थोड्या फार छटा आपणास दिसतील.ही त्यांची देण आहे.तसेच दुसर्‍या ओळीतील ’तुटलो’ या शब्दासाठी वापरलेला कोमल मध्यम आणि त्यासोबत येणारी भूपेश्वरी व भिन्नषड्ज रागाची सुरावट आपणास ’तुटण्याची’ अनुभूती निश्चित देईल.इतकेच नव्हे तर ’जुळलोच नाही’ यासाठी वापरलेल्या कोमल धैवता सोबतची सुरावट ’न जुळण्याचा’ आभास निर्माण करते...ऐका तर.....



जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही!
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही!


जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे;
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही!


कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो;
पण प्रकाशाला तरीही हाय, मी पटलोच नाही!


वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
सुचत गेली रोज गीते; मी मला सुचलोच नाही!



गायक-मयूर महाजन
कवी-सुरेश भट, 
संगीतकार-सुधाकर कदम, 
तबला-निषाद, कदम 
बासरी-रोहित वनकर.
की बोर्ड-कौस्तुभ पाटील.








संगीत आणि साहित्य :