गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, March 1, 2021

लेखा-जोखा



पुरस्कार...
"Outstanding Young Person"(१९८३),
"समाजगौरव"(१९९५),
"संगीत भूषण"(१९९६), 
"Man Of TheYear2001"(यु.एस.ए.),
"कलादूत"(२००२),
"कलावंत"(२००३), 
"शान-ए-गज़ल"(२००५),
"महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार"(२००६),
"गझल गंगेच्या तटावर..."(२००८),
"सुरेश भट पुरस्कार" आणि,"गझल गंधर्व" उपाधी(२००९) .
"जीवन गौरव" (२०१८)
____________________________________________
 
 अल्बम्स...
1. ‘भरारी’...मराठी गझल गायकीच्या इतिहासातील पहिला अल्बम.१९८३.
2. ‘झुला’ (तीन भाग) मराठी पाठ्यपुस्तकातील कविता.१९८७
3. ‘अर्चना’ (भक्तिगीते) २००६ टी सिरीज कं.
4. ‘खूप मजा करू’ (बालगीते) २००७ फाऊंटन म्य़ुझिक कं.
5. ‘काट्यांची मखमल’ (मराठी गझल) २०१२ युनिव्हर्सल म्युझिक कं.
6.‘तुझ्यासाठीच मी...’ (मराठी गझल) २०१४ युनिव्हर्सल म्युझिक कं.
 ____________________________________________

 -पुस्तके-
१. ‘सरगम’ शालोपयोगी गीतांची स्वरलिपी.(प्रस्तावना - संगीतकार यशवंत देव.)
२. ‘फडे मधुर खावया...’ निवडक (विषयांतर) लेख.
३. चकव्यातून फिरतो मौनी’ (गौरवग्रंथ)
४. ’मीच आहे फक्त येथे पारसा’ (कविता संग्रह)
५. ’फडे मधुर खावया’ची दुसरी आवृत्ती. 
_____________________________________________
ब्लॉग - www.gazalgazal.blogspot.com 
 
Facebook Page - Gazalgandharv Sudhakar Kadam
_____________________________________________
■ अशी गावी मराठी गझल" या माझ्या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...
 
● मराठी ग़ज़लों के गायक श्री सुधाकर कदम ने संगीत के कई आयामों को पार किया है.अब उन्होंने मराठी़ ग़ज़लों को आकाशवाणी तथा अन्य मंचो के जरिये जनमानस तक पहुंचाना प्ररंभ किया है.  
-दै.नवभारत,नागपुर.१९८० 
 
●पाटण- येथील नाट्यांजली संस्थेतर्फे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम पार पडला.त्यांना  शेखर सरोदे यांनी तबल्याची उत्तम साथ दिली.............
-दै.लोकमत,नागपुर.२६.९.१९८०
 
●यवतमाळ-स्थानिक विर्दभ साहित्य संघाच्या वतीने प्रख्यात गायक श्री सुधाकर कदम यांच्या गझल गायनाचा सुश्राव्य कार्यक्रम येथे नुकताच संपन्न झाला.त्यांना तबल्याची साथ शेखर सरोदे यांनी दिली व संचलन वि.सा.संघाचे अध्यक्ष जगन वंजारी यांनी केले.
-दै.लोकमत,नागपुर.१३.१०.१९८०
 
●वर्धा-स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. 
-दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१
 
●कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात......
-दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२
 
●सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला....... 
-तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.
 
 ●सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर   सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ   स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे....
-सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ ऑगष्ट १९८२.         
 
●सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला.......
-दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.
 
● ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला......
-दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२. 
 
●मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी........
-दै.सकाळ,पुणे.
 
●गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते........
-अनंत दीक्षित,सकाळ
 
●सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले......
-दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२
 
●Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches.......
 -The Hitwad,Nagpur.23/4/1984 
 
 
●सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली..........
-दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४
 
१०.कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला. असावा...
-दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४
 
११.मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है..........
-दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९
 ____________________________________________

मान्यवरांचे आशिर्वादपर बोल... 
 
■ स्वरराज छोटा गंधर्व - "मराठी गझल गायकीच्या नवीन वाटचालीस माझा आशिर्वाद आहे."(१९७५)
 
■ पं.जितेंद्र अभिषेकी - "सातत्य आणि परिश्रम आपणास यश मिळवून देईल."(१९७७)
 
■ सुरेश भट - "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन".(१९८१) आणि "गझलनवाज".(१९८२)
 
■ गजानन वाटवे - "मला आवडलेला गझलिया...
"(१९८३)
 
■ डा.यु.म.पठाण - "मराठी गझलेस योग्य स्वरसाज चढविला".(१९८३)
 
■ मा.सुधाकरराव नाईक - "शब्द-स्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार".(१९८५)

■"सुधाकर कदमांनी ’काट्यांची मखमल’ या अल्बमद्वारे खर्‍या अर्थाने काट्यांची मखमल करून रसिकांना तृप्त करण्याचे काम केले आहे..."
-कवी-संगीतकार यशवंत देव - 
 
■ "बर्‍याच कालावधीनंतर इतकी सुरेल गाणी मी गात आहे,यात सर्व काही आले..."
-सुरेश वाडकर -
 
■  "मेलोडी हा माझा ’विक पॉईंट’ आहे.’काट्यांची मखमल मधील सर्वच गझला मेलोडिअस आहेत.तसेच सुधाकरजींनी वैशालीकडून खूप छान गाऊन घेतले..."
 -संगीतकार अशोक पत्की -
 
■  "सुरेशजीं (वाडकर) सोबत सर्वप्रथम गाण्याची संधी सुधाकरजींनी (कदम) मला देऊन माझे एक स्वप्न पूर्ण केले...त्याबद्दल काय बोलावे कळत नाही..."
-वैशाली माडे -
 ___________________________________________
काही गायक,पत्रकार,समीक्षक,अभ्यासक,संशोधक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया...........
 
●१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता.व्यक्तिशः मला गझलेबद्दल प्रेम असल्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले होते.कदमांनी सर्व गझला स्वतः स्वरबद्ध केल्या होत्या.चाली अत्यंत आकर्षक,अर्थाला अनुरुप अशा होत्या.एकूण कार्यक्रम निटनेटका,चांगला झाला व कदमांबद्दल कौतुक वाटले.एकच व्यक्ती हार्मोनियम वाजविते,गाते,बोलते व संगीतही देऊ शकते,हे वेगळेपण होतेच.
-करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे-  
(पार्श्वगायिका,कोल्हापुर.) 
 
 ● Tha pioneer in tha introduction of MARATHI GAZAL GAYAKI.(2003)
-Maharashtra Jaycees- 
 
 ● विदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम महाराष्ट्राला परिचित आहेत.मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे. (’सूरसुधा’दिवाळी अंक,१९९६)
-मधुरिका गडकरी- 
(ज्येष्ठ संगीत समीक्षिका,नागपुर.)
 
● आर्णीसारख्या आडगावात राहूनही सुधाकर कदमांनी आपल्या गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला.आपले वेगळेपण ठसविण्यासाठी अनवट अशी वाट निवडली.’मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला.हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे.हिंदी-हिंदुस्थानी,मराठी या केवळ भाषा नाहीत.भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते.संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यांमुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो.गझलच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे.कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे.अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाळ.सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले.ही वाट वहीवाट नव्हती.हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती.सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.
-वामन तेलंग-
(संपादक-तरुण भारत,नागपुर) 
 कार्तिकएकादशी/१९९८
 
 ● ’हरचंद सुरीली नग़्मोंसे, जज़बात जगाए जाते है,उस वक़्त की तल्ख़ी याद करो,जब साज़ मिलाए जाते है’....
 
      एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती,किमया,करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे.माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले त्याचे गमक वरील शरामध्ये आहे.या साडेतीन दशकात मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकले.त्यांची गझल गायकी ऐकली.सुधाकर जेव्हा गझल गायकीकडे वळले त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टिकाही झाली.गझलचा आशय,अर्थ.भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे यात गझल गायकाचे कौशल्य आहे.आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा अधिक अवधान बाळगले आहे.पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून विलंबित ख्याल गायक,ज्याला अक्षर मंत्राचा साक्षात्कार झाला आहे,तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल.या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे.स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले.त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कासलीकरांकडे असायचा.यावेळी त्यांच्या घराला सम्मेलनाचे रूप यायचे.या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे असत.छोटा गंधर्व सुधाकरशी विशेष सलगीने,आपुलकीने वागत असतांना मी पाहिले आहे.अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात गाजली.त्यांच्या मैफिलींचे इतिवृत्त वर्तमानपत्रांतून समिक्षणात्मक रुपाने मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा.
-रसिकाग्रणी राजे मधुकरराव देशमुख-
 (माहुरगड.जि.नांदेड) 
 
 ● १९७९ ते १९८० या काळात विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम सुरू केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले.मैफिलीचा दर्जा प्राप्त करणा-या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरू झाले.गझलचा परिचय झाला.मराठी गझलची सुरवात सुरेश भटांपासून मानली तर गझल गायनाची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल.म्हणजे मराठी गझल गायकीचे वय फार फार तर ३० ते ३५ वर्षे मानावे लागेल.
-डाँ.राजेश उमाळे-
 (सुप्रसिद्ध मराठी गझलगायक,संगीतकार,संशोधक.
अमरावती.) 
 
 ● गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गायक म्हणून ज्यांचा गौरव केला .ज्यांना स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली.ज्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनी २००९ साली’गझलगंधर्व’या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा ’तो’ कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम होय.
-प्रा.काशिनाथ लाहोरे-
(दै.लोकमत प्रतिनिधी.यवतमाळ)
 
● पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला.यावेळी जेष्ठ गझल गायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे.अशी गावी मराठी गझल या स्वरुपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत.गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते.सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला.
-अनंत दीक्षित-
 दै.लोकमत,पुणे.
(संपादकीय १७ मार्च २००९)
 
● कवीला काय म्हणायचे आहे ? काय सांगायचे आहे ? काय सुचवायचे आहे ? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो तरी आशयाचा एखादा पैलू,अर्थाचा पदर रसिकाला गझल वाचून पुर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ’समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्या शिवाय राहत नाही तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुरावटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो.आणि मला वाटतेगझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे.ही जाण सुधाकर कदमांना आहे याचा मनापसून आनंद झाला.ती जसजशी विकसित झली,तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
-प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत-
कवी,गझलकार,संशोधक.
(लोकमत, ’साहित्यजत्रा’ १०/७/१९८३)
 
● मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमँनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे,मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे.सुरेश भट सुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे.
-मनोज पाटील माहुरे-
(काठोडा,यवतमाळ.)
 
 ● सुरेश भट म्हणजे मराठी गझल हे समीकरण जसे रुढ झाले आहे तसे १९९० च्या दशकात मराठी गझल गायकी म्हणजे सुधाकर कदम हे समीकरण रुढ होते,नव्हे ख-या अर्थाने सुरवातच सुधाकर कदमांनी केली.१९८२ मध्ये पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला ’अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम मराठी गझल गायकीबद्दल मार्गदर्शक ठरावा असा होता.स्वतः सुरेश भटांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सुधाकर कदमांनी सादर केलेल्या...

 ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही,चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’’
"झिंगतो मी कळे ना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला"
 
या सारख्या अनेक गझलांच्या बंदिशी आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे.या कार्यक्रमानंतर कदमांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम केले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी एकलव्यासारखी साधना करून अतिशय कष्टाने मराठी गझल गायक म्हणून मान्यता मिळविली.त्या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा सलग तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही गायक नसल्याचे सुरेश भट सांगत.
-अनिल कांबळे-
(गझलकार,पुणे.)

● कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ’अशी गावी मराठी गझल’हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.
इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले.
-अजीम नवाज राही-
 
 ●Sir, Aapanach aamhala marathi gazal aikayala shikawile, aapanach mala protsahit karun gayala shikawile. Aapanas nirogi dirghayushya labho.
-Dr. Sushil Deshpande-
Karanja lad 
 
● Marathi ghazals have great potential. Contemporary singers should sing and promote it. Hats off to Suresh Bhat ji and Sudhakar Kadam ji for their commendable job!
-Sayeed Mohiuddin... Riyadh.

 ●गझल समजू इच्छिणारासाठी मोठा खजिना !  
          अहो, आजकाल जे गझलकारांचं पीक आलंय (की तण माजलंय असं म्हणू..?) त्यांना गझल आणि गझलगायकीचा अभिन्न सम्बन्ध असतो हेच माहीत नाहीये.....! गेल्या हिवाळ्यात महाराष्ट्रात आलो असताना चुकून गझलच्या एका कार्यक्रमाला बसावं लागलं.... (तरन्नुम नव्हतीच, त्यामुळे त्या कार्यक्रमाला ’मुशायरा’ म्हणायची माझीतरी तयारी नाही.) आजूबाजूला बसलेले लोक काहीजणांच्या 
काव्यवाचनाला खुर्चीतून उसळून दाद देत होते. शेवटी एकानं न राहवून मला विचारलं की मी एकदम शान्त कसा बसलोय...? मी सांगितलं की जे काही ऐकू येतंय, त्यात शेर कुठेच नाहीयेत, हिन्दी फिल्लमचे डायलॉग असावेत तसं काहीतरी आहे हे.... आणि भलाभला संगीतकार शीर्षासन करून उभा राहिला तरी यातल्या ओळींना चाल लावू शकणार नाही..... आता यांना मी गझलेचे शेर कसे  म्हणू आणि काय दाद देऊ...?आणि अशा वेळी कविवर्य भटांनी आपली प्रत्येक रचना आपल्याला गायला लावून एका अर्थाने गझल आणि गायकीचा अभिन्न सम्बन्ध लोकांसमोर ठेवला होता, तो सगळा इतिहास आठवतो............ असो.
-स्वामीजी निश्चलानन्द (हिमाचल प्रदेश)
17 सितंबर २०१२
--------------------------------------------------------------------
प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून....


 

Sunday, February 28, 2021


 

सुधाकर कदम - रजनी करकरे-देशपांडे

.            गायक_वादक_संगीतकार ‘सुधाकर कदम’ 
           -करवीर कोकिळा सौ़. रजनी करकरे-देशपांडे

     १९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. आणि हा कार्यक्रम आंबा टॅनीन ऍंन्ड पोल्सन उद्योगाचे व्यवस्थापक श्री़ वा़. रा़. राजंदेकर ह्या माणूसवेड्या व संगीतप्रेमी व्यक्तीने आखला होता़. श्री राजंदेकर मला आपली मानसकन्या मानत होते. त्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले़. मी ही एक गायिका आहे. गझल हा उर्दू-हिन्दी भाषेतला प्रसिद्ध गायन प्रकाऱ. मराठीत गझलेला मानाचे स्थान देण्याचे काम कविवर्य सुरेश भट ह्यांनी केले़. आणि सुरेश भटांच्या गझलेबद्दल व्यक्तिशः मला प्रेम असल्यामुळे व त्यांच्याच जवळजवळ सर्व गझला व गीते सुधाकर कदम गाणार आहेत असे समजल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची एक वेगळी उत्सुकता मनात होतीच़. कदमांनी सर्व गीते गझल स्वतःच स्वरबद्ध केल्या होत्या़. चाली आकर्षक, अर्थाला अनुरुप अशा होत्या़. विशेष म्हणजे कार्यक्रमात ते स्वतःच निवेदन करत होते. त्यामुळे नीटनेटकेपणा होता़. एरवी निवेदक कंटाळवाणे बोलून श्रोत्यांना नकोसे करू शकतो़. एकूण कार्यक्रम चांगला झाला व कदमाबद्दल कौतुक वाटले़. एकच व्यक्ती हार्मोनियम वाजवते, गाते, बोलते व संगीतही देऊ शकते, हे वेगळेपण होतेच़. गझल, ठुमरी ह्या प्रकारच्या गायनाला तबला साथ फार तयारीची लागते. पुण्याचा शेखर सरोदे नामक एक तरुण तबलजी कदमानी साथीला आणला होता़. तबला साथी मुळे कार्यक्रम बहारदार झाला़. कार्यक्रमानंतर ओळखही झाली आणि नंतर पत्रव्यवहाराने ती दृढ झाली़. कोल्हापुरातील पहिल्या कार्यक्रमापासून माझी ओळख झाल्याने ते परत आले तेव्हा माझे घरी राजंदेकर बाबाबरोबर आले़. यावेळी संगीत गप्पा- एकमेकांचे संगीतातील नवीन उपक्रम ह्यातूनच एक स्नेहबंध जुळत गेला़. पुढे अधुन मधुन एकमेकांची विचारपूस करणे, नवीन वार्ता कळवणे वगैरे देवाण घेवाण सुरू झाली़. सुरेश भट, नारायण कुळकर्णी कवठेकर आणखी काही वैदर्भीय कवी यांच्या एकत्रीत परिचयाचे दुवे जुळले़.
 सुधाकर कदम यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावचे़. त्यांच्या परिचयामुळेच हे गांव कळले. त्यांचे काम ही कळले़. गाण्याबरोबरच हार्मोनियम, सरोद वादनातील त्यांची गती कळली़. तब्येतीच्या तक्रारी झेलत संगीत साधनेचे काम ते नेटाने करताना आढळले़. १९९६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या ललितकला मानद शिक्षिका म्हणून मी काम करत असल्याने कदमांविषयी डॉ़. भारती वैशंपायन ह्यांच्याशी बोलून, सुधाकर कदमांना सुगम संगीताची कार्यशाळा घेण्यास निमंत्रण दिले़. ह्याच सुमारास श्री कदमांचे ‘सरगम’ हे शालोपयोगी विविध गीत प्रकारांच्या स्वरलिपीचे पुस्तकही पाहण्यात आले. त्यातील एक दोन गीते सामुदायिकरित्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवली़. ह्या निमित्ताने दोन तीन दिवस सौ़. कदमांसह ते विद्यापीठ गेस्टरुममध्ये राहिले़. त्यांची शिकविण्याची सुंदर धाटणी, प्रसन्न व्यक्तिमत्व ह्यामुळे विद्यार्थी वर्ग खुश होता़. समुहगीते चांगल्यातर्‍हेने तयार झाली़. चाली सोप्या पण आकर्षक होत्या़. सहसा गायक व संगीतकार एकत्र मिळत नाहीत. पण कदमांचे ठायी हा दुर्मिळ योग आहे़. त्यांनी मलासुध्दा बर्‍याच सुरेख चाली देऊन गाणी सांगितली आहेत़. नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला़. संपूर्ण महाराष्ट्रभर असे गीत प्रचाराचे कार्य करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णार्थाने साकार झालेले नाही़. सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे सततचे सहकार्य अपेक्षित आहे़.
 मला आमच्या या कलाकाराचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे़. आर्णी सारख्या गावात राहुनही त्यांनी मोठे प्रचारकार्य केले आहे़. सामाजिक बांधिलकी जपली आहे़. पुण्या-मुंबईत वास्तव्य असते तर अशा कलाकाराचे अधिक चीज झाले असते़. संगीताबरोबरच चित्रकलेचे अंग ही कदमांकडे आहे़ जिथे संगीत असते तिथे चित्रकलाही जुळ्या बहिणीप्रमाणे हजर असते़. अशा या कलाकाराचा परिचय मला राजंदेकर बाबामुळे जवळून झाला. व संगीत स्नेहबंध दृढ झाले ह्याचा मनाला फार संतोष वाटतो़.

३५/जी३ प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी, रंकाळा पार्क, कोल्हापूर
----------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...)


 

 


 

कलादूत - आशिष ढबाले



        ’शुन्यातून विश्व निर्माण करणे’ प्रत्येकालाच जमते असे नाही.परंतू सुधाकर कदम याला अपवाद आहेत.
आर्णीसारख्या छोट्याशा गावात राहूनही त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आपला रसिक वर्ग निर्माण केला.आज सुधाकर कदम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर ओळखतात.याला कारण त्यांचे विस्तारलेले कार्यक्षेत्र !वारकरी संप्रदायात रमणारे वडील पांडुरंगजी कदम यांचेकडून संगीताचे बाळकडू मिळालेल्या तसेच भाग्योदय कला मंडळाच्या ’शिवरंजन’ ऑर्केस्ट्रापासून (१९६५) संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर कदम यांनी केवळ गायक म्हणून मर्यादित न राहता ऑर्गन,हार्मोनियम,मेंडोलिन,तबला,सरोद ही वाद्येही अपार मेहनत घेऊन आत्मसात केली.नागपुर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व वादक झालेत.
         आर्णीच्या महंत दत्तराम भारती विद्यालयात (१९७२) संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी संगीताचे वाळवंट असलेल्या या गावात गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना केली.पालक व विद्यार्थ्यांमध्ये संगीतप्रेम निर्माण करण्याकरीता पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांच्य़ा पुण्यतिथी निमित्त संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.वाढती विद्यार्थी संख्या व पालकांचा प्रतिसाद पाहून सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा म्हणून स्वतःच्या खिशाला खार लावून छोट्या स्वरूपात कार्यक्रम करण्यास सुरवात केली.सादरीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्याचे दृष्टीने फायद्याचे रहावे या करीता त्यांना संगीताच्या विविध परीक्षांना बसविण्यास सुरवात केली.त्यासाठी महत्प्रयासाने अखिल भारतीय संगीत महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र मिळवले.(१९७३ ते २००३ पर्यंत त्यांनी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.)
         नौकरी,संसार,संगीत वर्ग.स्वतःचा रियाज या सर्व गोष्टी सांभाळीत त्यांनी संगीताचा प्रसार व प्रचार वाढविण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रातून संगीतविषयक लेखन सुरू केले.त्याचबरोबर हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रकाशित होणाऱ्या भारतीय संगीताला वाहिलेल्या एकमेव अशा “संगीत” मासिकाकरीता “नग़्म-ए-ग़ज़ल’ व “प्रसारगीत” या स्तंभाकरीता संगीत संयोजन व स्वरलिपी तसेच मुंबईच्या “नादब्रह्म”,”संगीत अध्यापक” या त्रैमासिकांकरीता लेख.सांगीतिक शब्दकोडे,विविध कवींच्या मराठी-हिंदी गीतांना चाली लावून त्याची स्वरलिपी प्रसिद्ध करणे सुरू केले.
         महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रमा करीता फिरताना आलेले गमतीशीर अनुभव मांडण्याकरीता नागपुरच्या तरूण भारत या दैनिकात “विषयांतर” या सदरासाठी स्फूट लेखन केले.इयत्ता १ ते १० वी च्या
पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून शैक्षणिक दृक-श्राव्य साधन म्हणून ’झुला’ नामक ऑडिओ-व्हिडिओ कॅसेटची निर्मिती केली.नागपुर आकाशवणीच्या “ग्रामीण कला क्षेत्र” या कार्यक्रमाकरीता लोकगीतांचे संगीत नियोजन करून कार्यक्रम दिलेत.पुण्याच्या बालचित्रवाणी करीता समुहगीते संगीतबद्ध केली.यवतमाळ जिल्ह्यावरील माहितीपटाचे शिर्षक गीत स्वरबद्ध करून निवेदनही केले.आकाशवाणी पुणे करीता “अशी गावी मराठी गझल” या कार्यक्रमाचे विशेष ध्वनिमुद्रण १९८२ मध्ये करण्यात आले.यवतमाळ जिल्हा प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत तयार झालेल्या “अक्षरगाणी” या साक्षरतापर गीतांच्या ध्वनीफितीचे संगीत दिग्दर्शनही केले.
          कवितांची ऑडिओ व व्हिडिओ विकत घेणे प्रत्येकाला सोईचे नाही ही, जाणीव ठेवून त्यांनी “एक सूर-एक ताल” नामक राष्ट्रीय एकात्मतापर गीतांचे पुस्तक प्रकाशित केले.अतिशय महत्वाचे व महत्वाचे म्हणजे सार्क देशाच्या “राष्ट्रीय संगीत” या ग्रंथात सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केलेल्या तीन हिंदी गीतांचा समावेश होणे, हे महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
          सुधाकर कदम यांनी केवळ स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता परिसरातील कलावंतांना मंच मिळावा म्हणून “सरगम” संस्थास्थापन केली.नाट्यप्रेमी लोकांना
एकत्र करून “अभिनय” या संस्थेची स्थापना करून कित्येक वर्षे विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थी तयार करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या “गीतमंच” द्वारे मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे हजारो विद्यार्थ्यांकडून शिबीराद्वारे गीतमंचाची गीते बसवून घेतली.यात त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक गाणी होती.त्यातील कुसुमाग्रजांचे ’महाराष्ट्रगीत’ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी अजूनही गात आहेत.तसेच “अशी गावी काविता” हा शैक्षणिक कार्यक्रमही जिल्हाभर यशस्वीपणे राबविला.
नेहरू युवक केंद्र यवतमाळाच्या सहाय्याने अनेक सांस्कतिक कार्यक्रमात सहभाग.यातील महत्वाचा म्हणजे पंजाबातील जगरांव येथील नुकतेच ’ब्ल्यू स्टार’ ऑपरेशन झाले असताना अतिरेक्यांची दहशत असतानाही तेथे जावून राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता त्यांनी दिग्दर्शित केलेला “महाराष्ट्र दर्शन” हा कार्यक्रम होय.
          माहूरगडावर ललिता पंचमीच्या संगीत महोत्सवाचे आयोजन व निवेदन अशा दोन्ही भूमिका त्यांनी अनेक वर्षे निभावल्या.यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या १९९३ मध्ये जवळ पास १३०० शिक्षकांना “एक सूर-एक ताल” या मोहिमे अंतर्गत कविता गायनाचे प्रशिक्षण दिले.परंतू 
मुळातच अती संवेदनशील असणाऱ्या या कलावंताने संगीता सोबतच समाजकार्यातही तितक्याच मोठ्या प्रमाणात झोकून दिले.जनसामान्यातील स्वच्छ 
प्रतिमेमुळे हा कलाकार येथेही अग्रेसर राहिला.आपल्या परिसरात अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन वृक्षारोपणासारखे राष्ट्रीय उपक्रम आपल्या युवा सोबत्यांच्या सहकार्याने राबविले.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगीत साहित्य उपलब्ध करून दिले.शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यास प्रोत्साहन देऊन जनमानसात अभिरुची वाढविली.
           जवळ जवळ ११ वर्षे पत्रकारिता केली.आर्णी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी अनेक वर्षे भूषविले.”कलावैदर्भी” या संस्थेद्वारे विविध क्षेत्रातील लोकांना सन्मानित केले.या सगळ्या धबडग्यात शालोपयोगी गीतांच्या स्वरलिपीचे “सरगम” व तरूण भारत वृत्तपत्रातील विषयांतर सदरात प्रकाशित झालेल्या स्फूट लेखांचे “फडे मधुर खावया...” ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली.यातील “सरगम” या पुस्तकाला इचलकरंजी फाऊंडेशानचा ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कारही मिळाला.
        अशा या मनस्वी कलावंताच्या संगीत व मराठी गझल गायनातील योगदानाची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कृत केले.पण विदर्भातील कलावंत पुण्या-मुंबईत गेल्याशिवाय विदर्भातील जनता त्यास मोठा कलावंत मानत नाही.हे आमचे दुर्दैव... एक वर्षापूर्वी हा वैदर्भीय कलावंत पुण्यात स्थायीक होऊन कार्यक्रम,म्युझिक अल्बम द्वारे कार्यरत झाला.गायक,संगीतकार,पत्रकार,लेखक,कवी,शिक्षक,
समाजसेवक अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणाऱ्या या कलाकारास “कलादूत” पुरस्कारा निमित्त विदर्भातील सर्व रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा !

(कलादूत पुरस्काराच्या निमित्त)
दैनिक लोकदूत,यवतमाळ.दि.२१.११.२००४
____________________________________________
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित आणि #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून ...



 

सरगम - मधुरिका गडकरी



      विदर्भातील रसिले गझलगायक म्हणून सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरूपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.त्यामुळे संगीत संवर्धनाचे,अध्यापनाचे त्यांचे कार्य सतत सुरू असते.संगीताची ओळख,जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच,एक सूर एक ताल, कविता,गायन,वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.आणि हे सारे करता करताच विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरूपात सादर होत असतात.
       'सरगम' या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री.कदम यांनी पेश केल्या आहेत.मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुसार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या,तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरू शकेल निःसंशय!
           'सरगम'ला प्रस्तावना देण्यात यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही.शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही.परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक नव्हे अनिवार्य असते.त्याबाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतील मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे कटू सत्य आहे.सुधाकरजी कदम यांची धडपड केवळ 'सरगम' प्रकाशनापुरती नसून,ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही आहे.अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो.संपूर्ण गीत लिपीबद्ध करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेला स्वरसमूह देखील वेगवेगळा लिपीबद्ध केलेला आहे.एकूण,पाश्चात्य पद्धतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यांसाठी केलेली स्वतंत्र स्वरबद्धता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे.आज अगदी लहानसहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो.त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे.संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी मौलिक ठरणारी सुधाकर कदमांची ही 'सरगम' आहे.
           'सरगम' निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत,धार्मिक,प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च  हेतूने केली असल्याचे कदम यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तरच माझ्या प्रयत्नाचे चीज होणार आहे,अन्यथा... हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही यात व्यक्त झालेले आहेत.सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींपासून संगीत क्षेत्रातील  अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले,त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे.यावरून सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिद्ध होते.
           कविवर्य कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,गौतम सुत्रावे,वा.गो.मायदेव,द.ना.गवाणकर,गोविंद, शंकर बडे,वसंत बापट,संत तुकडोजी महाराज,बहिणाबाई चौधरी,शिवा राऊत,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे, शंकर वैद्य,कलीम खान,विजय देशमुख,गजेश तोंडरे,सौ. मंगला पत्की,कृष्णराव भट्ट,माया भट्टाचार्य, नर्मदाप्रसाद खरे,रवी शुक्ल,इ.नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी,विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच,पण अनुकरणीयही.
            'सरगम'ची मौलिकता फार मोठी आहे.पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून या पुस्तकानुरूप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणाऱ्या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास 'सरगम' निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रुप होऊ शकेल.शिक्षक क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सरगमची दखल खऱ्या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी तसेच दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळांतून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षालेखनाचा आहे.आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी,विद्वान,मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत 'सरगम'चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे!

रविवार दि. १ नोव्हेंबर १९९७
------------------------------------------------
मधुरिका गडकरी
४९,फ्रेंड्स ले-आउट नं.४ 
रवींद्र नगर,नागपूर २२
-------------------------------------------------

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...




 

Sunday, January 31, 2021

गझलगंधर्व सुधाकर कदम यांची 'काट्यांची मखमल'-प्रा. डॉ.श्रीकृष्ण राऊत

.   #गझलगंधर्व सुधाकर कदमांची #काट्यांची_मखमल :                                               
.                               -श्रीकृष्ण राऊत

          तारीख    १६ जानेवारी २०१२.मुंबईचे रविन्द्र नाट्य मंदिर,प्रभादेवी.(पु.ल.देशपांडे सभागृह.) एका मराठी गझल अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.सर्वजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.‘काट्यांची मखमल’असे काव्यात्म शीर्षक असलेला हा अल्बम म्हणजे मराठी गझलविश्वातला अनोखा आविष्कार.एक सुरमयी माईलस्टोन.गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाविण्यपूर्ण कल्पना मांडणार्‍या शब्दांनी ह्या गझला अभिव्यक्त झाल्या आहेत. आणि ह्या गझलांना त्या शब्दांना लाभलेल्या गझलगंधर्व सुधाकर यांच्या दीर्घकाळच्या चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना म्हणजे सोन्याला सुगंध.एरवी चकाकतं ते सर्व सोनं नसतं हा आपला नेहमीचा अनुभव.त्याची एक झलक-

"तू हासलीस की ,सगळ्या काट्यांची मखमल होते!
तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते!"
          ही गझलांची हिरवळ कानातून मनात उतरत जाते ती सुरेश वाडकरांच्या मखमली स्वरातून.खूप दिवसांनी एव्हढ्या गोड चाली ऐकल्या आणि कान तृप्त झाले. संगीत ही साधना आहे असं जे म्हटल्या जातं ते काही खोटं नाही.नाही तर प्रख्यात गझलकार दुष्यंतकुमार म्हणतातचना-
कैसे मंज़र सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
          युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने सादर केलेल्या "काट्यांची मखमल" या मराठी गझलच्या अल्बमच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी असेच उद्गार काढले.ते म्हणतात-"काट्यांची मखमल..." ही जलेबी,चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा आहे.
         या अल्बममध्ये वेगवेगळ्या ’मूड्स"च्या ९ गझला आहेत.सुरेश वाडकर आणि वैशाली माडेंच्या स्वरातल्या
"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...","येता येता गेला पाऊस..." आणि "जीवनाचा खेळ रंगाया हवा..." या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते.वाडकरांच्या आवाजात "कळेना कसा हा जगावेगळा मी..." ही सुफियाना ढंगाची आणि "गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी..."ही खास गझलीयत दाखविणारी गझल आहे.दुसरीकडे वैशालीच्या आवाजातील "किती सावरावे,कसे सावरावे...",दूर गेल्या फुलांतल्या वाटा..." आणि ’हसू उमटले दुःख भोगता गंमत आहे..."या तीन ’मूड’च्या तीन गझला आहेत.याबद्दल बोलताना सारेगमपची ही महागायिका म्हणाली,"इतक्या सुरेल आणि आशयपुर्ण गझला मला सुरेशजींसोबत गायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजते आणि याचे सारे श्रेय गझलगंधर्वांना जाते".
          "धांगडधिंगा गाण्याकडे मी लक्ष देत नाही.मला सुरेल गाणी आवडतात.या अल्बममधील गाणी ऐकत राहावीत अशी आहेत.गझलांचे लिखाण ताकदवर आहेतच, त्याला पूरक स्वररचना असून सुरेशजींच्या आणि वैशालीच्या आवाजाची साथ लाभल्यामुळे हा अल्बम श्रवणीय झाला आहे."असे मनोगत अशोक पत्की यांनी केले.  ह्या गझला गाताना मिळालेलं समाधान सुरेश वाडकरांनी पुढील शब्दात मांडले-.." हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे की जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील कारण या गझलांच्या बांदिशींमध्ये संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला असून,वैशाली माडे,दिलीप पांढरपट्टे यांचेसोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला.याचे कारण असे की,फार मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल (मेलोडिअस) गाणे मला गायला मिळाले.मला खात्री आहे की हा अल्बम रसिकांना निश्चितच आवडेल".
          आपले मनोगत व्यक्त करताना सुधाकर कदम म्हणाले,"संगीत म्हणजे केवळ तंत्र नसून ती अंतर्मनातून स्फुरीत होणारी एक शक्ती असून ते इश्वर प्राप्तीचे साधन आहे.मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते,तसेच गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकाराहून वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात..."
          आता तुम्ही म्हणाल की हे गझलगंधर्व आहेत तरी कोण? तर तुमचं काही चुकलं नाही.हा मराठी गझलगायनाच्या इतिहासातील एक महत्वाची कारकीर्द गाजवणारा कलावंत होय. तो आहे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम.हा गझल गायक-संगीतकार 'आपल्याच मस्तीत मी जाई पुढे मात्र बाजारू कवाडे लागती’ अशा खास वैदर्भीय वाणा-गुणाचा आहे.
          विदर्भपुत्र सुरेश भटांच्यामुळे जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझलगंधर्व कदम’ ह्या दैनिक लोकमतच्या (पुणे)अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे.
           सुधाकर  कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझल ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत.
         सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या.
          सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.

प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत
शंकर नगर,जठारपेठ
अकोला (महाराष्ट्र)





 





संगीत आणि साहित्य :