गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, February 28, 2021

कलादूत - आशिष ढबाले



        ’शुन्यातून विश्व निर्माण करणे’ प्रत्येकालाच जमते असे नाही.परंतू सुधाकर कदम याला अपवाद आहेत.
आर्णीसारख्या छोट्याशा गावात राहूनही त्यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आपला रसिक वर्ग निर्माण केला.आज सुधाकर कदम यांना विविध क्षेत्रातील मान्यवर ओळखतात.याला कारण त्यांचे विस्तारलेले कार्यक्षेत्र !वारकरी संप्रदायात रमणारे वडील पांडुरंगजी कदम यांचेकडून संगीताचे बाळकडू मिळालेल्या तसेच भाग्योदय कला मंडळाच्या ’शिवरंजन’ ऑर्केस्ट्रापासून (१९६५) संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या सुधाकर कदम यांनी केवळ गायक म्हणून मर्यादित न राहता ऑर्गन,हार्मोनियम,मेंडोलिन,तबला,सरोद ही वाद्येही अपार मेहनत घेऊन आत्मसात केली.नागपुर आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व वादक झालेत.
         आर्णीच्या महंत दत्तराम भारती विद्यालयात (१९७२) संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी संगीताचे वाळवंट असलेल्या या गावात गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना केली.पालक व विद्यार्थ्यांमध्ये संगीतप्रेम निर्माण करण्याकरीता पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांच्य़ा पुण्यतिथी निमित्त संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू केले.वाढती विद्यार्थी संख्या व पालकांचा प्रतिसाद पाहून सुधाकर कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा म्हणून स्वतःच्या खिशाला खार लावून छोट्या स्वरूपात कार्यक्रम करण्यास सुरवात केली.सादरीकरणाबरोबरच विद्यार्थ्यांना भविष्याचे दृष्टीने फायद्याचे रहावे या करीता त्यांना संगीताच्या विविध परीक्षांना बसविण्यास सुरवात केली.त्यासाठी महत्प्रयासाने अखिल भारतीय संगीत महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र मिळवले.(१९७३ ते २००३ पर्यंत त्यांनी केंद्र व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.)
         नौकरी,संसार,संगीत वर्ग.स्वतःचा रियाज या सर्व गोष्टी सांभाळीत त्यांनी संगीताचा प्रसार व प्रचार वाढविण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रातून संगीतविषयक लेखन सुरू केले.त्याचबरोबर हाथरस (उत्तर प्रदेश) येथून प्रकाशित होणाऱ्या भारतीय संगीताला वाहिलेल्या एकमेव अशा “संगीत” मासिकाकरीता “नग़्म-ए-ग़ज़ल’ व “प्रसारगीत” या स्तंभाकरीता संगीत संयोजन व स्वरलिपी तसेच मुंबईच्या “नादब्रह्म”,”संगीत अध्यापक” या त्रैमासिकांकरीता लेख.सांगीतिक शब्दकोडे,विविध कवींच्या मराठी-हिंदी गीतांना चाली लावून त्याची स्वरलिपी प्रसिद्ध करणे सुरू केले.
         महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रमा करीता फिरताना आलेले गमतीशीर अनुभव मांडण्याकरीता नागपुरच्या तरूण भारत या दैनिकात “विषयांतर” या सदरासाठी स्फूट लेखन केले.इयत्ता १ ते १० वी च्या
पाठ्यपुस्तकातील कविता स्वरबद्ध करून शैक्षणिक दृक-श्राव्य साधन म्हणून ’झुला’ नामक ऑडिओ-व्हिडिओ कॅसेटची निर्मिती केली.नागपुर आकाशवणीच्या “ग्रामीण कला क्षेत्र” या कार्यक्रमाकरीता लोकगीतांचे संगीत नियोजन करून कार्यक्रम दिलेत.पुण्याच्या बालचित्रवाणी करीता समुहगीते संगीतबद्ध केली.यवतमाळ जिल्ह्यावरील माहितीपटाचे शिर्षक गीत स्वरबद्ध करून निवेदनही केले.आकाशवाणी पुणे करीता “अशी गावी मराठी गझल” या कार्यक्रमाचे विशेष ध्वनिमुद्रण १९८२ मध्ये करण्यात आले.यवतमाळ जिल्हा प्रौढ साक्षरता अभियानांतर्गत तयार झालेल्या “अक्षरगाणी” या साक्षरतापर गीतांच्या ध्वनीफितीचे संगीत दिग्दर्शनही केले.
          कवितांची ऑडिओ व व्हिडिओ विकत घेणे प्रत्येकाला सोईचे नाही ही, जाणीव ठेवून त्यांनी “एक सूर-एक ताल” नामक राष्ट्रीय एकात्मतापर गीतांचे पुस्तक प्रकाशित केले.अतिशय महत्वाचे व महत्वाचे म्हणजे सार्क देशाच्या “राष्ट्रीय संगीत” या ग्रंथात सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केलेल्या तीन हिंदी गीतांचा समावेश होणे, हे महाराष्ट्रवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
          सुधाकर कदम यांनी केवळ स्वार्थी दृष्टीकोन न ठेवता परिसरातील कलावंतांना मंच मिळावा म्हणून “सरगम” संस्थास्थापन केली.नाट्यप्रेमी लोकांना
एकत्र करून “अभिनय” या संस्थेची स्थापना करून कित्येक वर्षे विदर्भ स्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले.भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थी तयार करून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेच्या वतीने होणाऱ्या “गीतमंच” द्वारे मार्गदर्शक म्हणून अनेक वर्षे हजारो विद्यार्थ्यांकडून शिबीराद्वारे गीतमंचाची गीते बसवून घेतली.यात त्यांनी स्वरबद्ध केलेली अनेक गाणी होती.त्यातील कुसुमाग्रजांचे ’महाराष्ट्रगीत’ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी अजूनही गात आहेत.तसेच “अशी गावी काविता” हा शैक्षणिक कार्यक्रमही जिल्हाभर यशस्वीपणे राबविला.
नेहरू युवक केंद्र यवतमाळाच्या सहाय्याने अनेक सांस्कतिक कार्यक्रमात सहभाग.यातील महत्वाचा म्हणजे पंजाबातील जगरांव येथील नुकतेच ’ब्ल्यू स्टार’ ऑपरेशन झाले असताना अतिरेक्यांची दहशत असतानाही तेथे जावून राष्ट्रीय एकात्मता शिबीराकरीता त्यांनी दिग्दर्शित केलेला “महाराष्ट्र दर्शन” हा कार्यक्रम होय.
          माहूरगडावर ललिता पंचमीच्या संगीत महोत्सवाचे आयोजन व निवेदन अशा दोन्ही भूमिका त्यांनी अनेक वर्षे निभावल्या.यवतमाळ जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या १९९३ मध्ये जवळ पास १३०० शिक्षकांना “एक सूर-एक ताल” या मोहिमे अंतर्गत कविता गायनाचे प्रशिक्षण दिले.परंतू 
मुळातच अती संवेदनशील असणाऱ्या या कलावंताने संगीता सोबतच समाजकार्यातही तितक्याच मोठ्या प्रमाणात झोकून दिले.जनसामान्यातील स्वच्छ 
प्रतिमेमुळे हा कलाकार येथेही अग्रेसर राहिला.आपल्या परिसरात अल्पबचतीचे महत्व पटवून देऊन वृक्षारोपणासारखे राष्ट्रीय उपक्रम आपल्या युवा सोबत्यांच्या सहकार्याने राबविले.गरीब होतकरू विद्यार्थ्यांना संगीत साहित्य उपलब्ध करून दिले.शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यास प्रोत्साहन देऊन जनमानसात अभिरुची वाढविली.
           जवळ जवळ ११ वर्षे पत्रकारिता केली.आर्णी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्थानही त्यांनी अनेक वर्षे भूषविले.”कलावैदर्भी” या संस्थेद्वारे विविध क्षेत्रातील लोकांना सन्मानित केले.या सगळ्या धबडग्यात शालोपयोगी गीतांच्या स्वरलिपीचे “सरगम” व तरूण भारत वृत्तपत्रातील विषयांतर सदरात प्रकाशित झालेल्या स्फूट लेखांचे “फडे मधुर खावया...” ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली.यातील “सरगम” या पुस्तकाला इचलकरंजी फाऊंडेशानचा ’ग्रंथोत्तेजक’ पुरस्कारही मिळाला.
        अशा या मनस्वी कलावंताच्या संगीत व मराठी गझल गायनातील योगदानाची दखल घेऊन अनेक संस्थांनी पुरस्कृत केले.पण विदर्भातील कलावंत पुण्या-मुंबईत गेल्याशिवाय विदर्भातील जनता त्यास मोठा कलावंत मानत नाही.हे आमचे दुर्दैव... एक वर्षापूर्वी हा वैदर्भीय कलावंत पुण्यात स्थायीक होऊन कार्यक्रम,म्युझिक अल्बम द्वारे कार्यरत झाला.गायक,संगीतकार,पत्रकार,लेखक,कवी,शिक्षक,
समाजसेवक अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणाऱ्या या कलाकारास “कलादूत” पुरस्कारा निमित्त विदर्भातील सर्व रसिकांच्या हार्दिक शुभेच्छा !

(कलादूत पुरस्काराच्या निमित्त)
दैनिक लोकदूत,यवतमाळ.दि.२१.११.२००४
____________________________________________
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित आणि #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून ...



 

No comments:





संगीत आणि साहित्य :