गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, February 28, 2021

सरगम - मधुरिका गडकरी



      विदर्भातील रसिले गझलगायक म्हणून सुधाकरजी कदम संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरूपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे.यवतमाळजवळील आर्णी येथील गांधर्व संगीत विद्यालयाचे ते प्राचार्य आहेत.त्यामुळे संगीत संवर्धनाचे,अध्यापनाचे त्यांचे कार्य सतत सुरू असते.संगीताची ओळख,जाण विद्यार्थ्यांना करून देतानाच गीतमंच,एक सूर एक ताल, कविता,गायन,वगैरे अनेक उपक्रमही त्यांच्या नावावर जमा आहेत.आणि हे सारे करता करताच विद्यार्थ्यांकरता त्यांनी अनेक सुंदर स्वररचना तयार केल्या.यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळांमधून ही गाणी समूह स्वरूपात सादर होत असतात.
       'सरगम' या पुस्तकात विद्यार्थ्यांना गाता येतील व सहज समजतील अशा सुलभ व मधुर स्वररचना श्री.कदम यांनी पेश केल्या आहेत.मराठीतील नामवंत कवींच्या उत्तम काव्यरचनांना त्यांनी संगीतबद्ध केले आहे.महाराष्ट्रातील सर्व संगीत शिक्षकांनी प्रस्तुत रचना सरगम मार्गदर्शनानुसार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या,तर संपूर्ण संगीत जगतासाठी तो एक प्रशंसनिक उपक्रम ठरू शकेल निःसंशय!
           'सरगम'ला प्रस्तावना देण्यात यशवंत देव व पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कुठेही कमतरता ठेवली नाही.शब्दांची कुठलीही कंजुषी केलेली नाही.परंतु पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते संलग्न व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक नव्हे अनिवार्य असते.त्याबाबतीत मात्र संगीताच्या दुनियेतील मान्यवरांचे अपेक्षित सहकार्य सरगम प्रसारणासाठी लाभलेले नाही हे कटू सत्य आहे.सुधाकरजी कदम यांची धडपड केवळ 'सरगम' प्रकाशनापुरती नसून,ते पुस्तक संगीतोपासक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे ही आहे.अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ कवींच्या सुंदर व लोकप्रिय रचना निवडताना त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय पानोपानी येतो.संपूर्ण गीत लिपीबद्ध करताना वाद्यवृंदासाठी आवश्यक असलेला स्वरसमूह देखील वेगवेगळा लिपीबद्ध केलेला आहे.एकूण,पाश्चात्य पद्धतीप्रमाणे ऑर्केस्ट्रा संचातील प्रत्येक वाद्यांसाठी केलेली स्वतंत्र स्वरबद्धता त्यांनी या पुस्तकात वापरली आहे.आज अगदी लहानसहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवला जातो.त्यामुळे संगीताची जुजबी ओळख विद्यार्थ्यांना करून देणे; त्यासाठी संगीत शिक्षकांना अतिशय उपयोगी ठरणारे असे हे पुस्तक आहे.संगीत जगताच्या प्रथम पायरीवर पाऊल ठेवताना सर्वांसाठी मौलिक ठरणारी सुधाकर कदमांची ही 'सरगम' आहे.
           'सरगम' निर्मिती विद्यार्थ्यांवर राष्ट्रीयत्वाचे संस्कार व्हावेत,धार्मिक,प्रांतिक व भाषिक विवादीत्व संपून त्यांची शक्ती राष्ट्रउभारणीच्या विधायक कार्यास लागावी या उच्च  हेतूने केली असल्याचे कदम यांनी पुस्तकाच्या मनोगतात स्पष्ट केले आहे.महाराष्ट्रातील तमाम संगीत शिक्षकांनी ही गीते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली तरच माझ्या प्रयत्नाचे चीज होणार आहे,अन्यथा... हे अंतरीच्या गाण्यातील उद्गारही यात व्यक्त झालेले आहेत.सरगम निर्मितीसाठी प्रोत्साहित करणाऱ्या पं. जितेंद्र अभिषेकींपासून संगीत क्षेत्रातील  अनेक दिग्गजांचे जे प्रोत्साहन त्यांना वेळोवेळी लाभले,त्या सर्वांचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख प्रस्तावनेत आहे.यावरून सरगमची श्रेष्ठ मौलिकता सिद्ध होते.
           कविवर्य कुसुमाग्रज,विंदा करंदीकर,गौतम सुत्रावे,वा.गो.मायदेव,द.ना.गवाणकर,गोविंद, शंकर बडे,वसंत बापट,संत तुकडोजी महाराज,बहिणाबाई चौधरी,शिवा राऊत,यशवंत देव,मंगेश पाडगावकर,गंगाधर महांबरे, शंकर वैद्य,कलीम खान,विजय देशमुख,गजेश तोंडरे,सौ. मंगला पत्की,कृष्णराव भट्ट,माया भट्टाचार्य, नर्मदाप्रसाद खरे,रवी शुक्ल,इ.नामवंत कवींच्या रचनांना संगीताच्या उपासकांनी,विद्यार्थ्यांनी अधिक लोकाभिमुख करावे म्हणून हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच,पण अनुकरणीयही.
            'सरगम'ची मौलिकता फार मोठी आहे.पण सरगमची खरी उपयुक्तता शाबीत होण्यासाठी महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उदार मानसिकता व संपूर्ण सहकार्य सर्वार्थाने आवश्यक व अपेक्षित आहे.भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात आगामी सव्वीस जानेवारीपासून या पुस्तकानुरूप विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावभक्तीयुक्त रचनांची ओळख व त्यांच्या फुलणाऱ्या गायकीतून त्याचे प्रसारण झाल्यास 'सरगम' निर्मितीमागील लेखकाचा उद्देश संपूर्णतः फलद्रुप होऊ शकेल.शिक्षक क्षेत्रातील व सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सरगमची दखल खऱ्या अर्थाने घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी तसेच दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शाळाशाळांतून वितरीत करावी इतकाच मानस प्रस्तुत सरगम समीक्षालेखनाचा आहे.आर्णीसारख्या महानगरांपासून दूर असलेल्या ठिकाणच्या एका गुणी,विद्वान,मान्यवर संगीत प्राचार्यांच्या प्रस्तुत 'सरगम'चे स्वागत व उपयोग तमाम रसिक व शासनासाठी एक फार मौलिक उपलब्धी आहे हेच खरे!

रविवार दि. १ नोव्हेंबर १९९७
------------------------------------------------
मधुरिका गडकरी
४९,फ्रेंड्स ले-आउट नं.४ 
रवींद्र नगर,नागपूर २२
-------------------------------------------------

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षर_मानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ '#चकव्यातून_फिरतो_मौनी' मधून...




 

No comments:





संगीत आणि साहित्य :