गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, March 22, 2013

खरा हिरो…




सध्याच्या युगाचा 
खरा हिरो कोण ?
दिसे समोरून 
मिडियाच…

बाबा रामदेव 
अण्णाजी हजारे
माध्यमांचे तारे 
वर्षभरी…

राजकाण्यांना 
शिव्यांची लाखोली 
वाहोनि आपुली 
खाज काढी…

मुजोर उद्धट 
अर्धे हळकुंड 
बनलेत पुंड 
यांचेमुळे…

वाहिन्यांचे लक्ष 
TRP वरती 
व्यावसायिक दृष्टी 
ठेवोनिया…

जाहिराती द्वारे 
पैसा कमावणं
हाच दृष्टीकोन 
माध्यमांचा…

कोवळ्या मनात 
विखार पेरून 
सत्तेचा सोपान 
चढू पाहे…

वातावरणात 
दांभिकपणाच 
फाजील श्रद्धेचं 
स्तोम दिसे…

जाहिरातींमध्ये 
मस्तवाल दृष्ये 
टाकती सहर्षे 
पैशासाठी...

गरमा गरम 
दृष्ये ही पाहून 
लैंगिक शिक्षण 
मिळतसे...?

नवसंस्कृतीचा 
असे हा विकास 
आपण मागास 
ठरतसे...

मोडीत काढाया 
राज्यघटनेला 
निघाला काफिला 
आपलाच…

निवृत्त वरीष्ठ 
नोकरशहांचा 
आणि माध्यमांचा 
खेळ सारा…

सुधाकर कदम

Thursday, March 14, 2013



जेव्हा मनुष्य कोणत्याही कारणामुळे का होईना,पण स्वतःचा दृष्टीकोन तपासून पाहतो आणि त्याची हडसून-खडसून चिकित्सा करतो,तेव्हाच त्यात बदल होतो...

डॉ.अल्बर्ट एलिस

Monday, February 4, 2013

जीवनाचा खेळ रंगाया हवा...

सुरेश वाडकर आणि वैशाली माडे यांनी गायिलेली दिलीप पांढरपट्टे यांची एक सुंदर गझल...

जीवनाचा खेळ रंगाया हवा
मांडलेला डाव मोडाया हवा 

काळजाचे गीत मी गाऊ कसे ?
वेदनेचा सूर लागाया हवा

याचसाठी मी न काही बोललो
जो दिला तो शब्द पाळाया हवा

जीवघेण्या त्या निरोपाच्या क्षणी
हुंदका येईल, दाबाया हवा

जिंदगी ही शाप झाली इश्वरा
मृत्युचा उःशाप तू द्याया हवा



Monday, January 28, 2013


 (महा)राष्ट्रधर्म 

माझे तुझेपण 
अवतरले की 
सारी आपुलकी
दूर जायी...

माथी भडकती 
भावना चळती 
संहाराची नीति 
स्विकारता...

कसोटीच्या क्षणी 
आक्रीत घडते 
थरकापविते 
सामान्याना...

जातीची खिंडारे 
भरता भरे ना 
तरीही राज्यांना 
भोके पाडी...

होते सामाजिक 
विभाजन जेव्हा 
एकोप्याला तेव्हा 
तडा जाते...

दूर आसामात 
हिंसाचार होता 
येथे का ’स्त्रैणता’ 
सुरू होई...?

समाज कंटक 
अफवास्त्र सोडी 
होई तोड-फोडी 
चहुकडे...

गट-तटवार 
जात-धर्म-राज्य 
यालाच सुराज्य 
म्हणावे का...?

कितीदा चुकीची 
होते हाताळणी 
तरिही ’गुळणी’ 
तोंडात का...?

पोळी भाजण्यात 
राजकीय पक्ष 
नेहमीच दक्ष
असतात...

आपापला स्वार्थ 
साधण्यासि वेगे 
पेटविती दंगे 
जागोजागी...

फुटीरतावाद 
राज्या-राज्यातला 
विवादाला साद 
घालितसे...

सर्व जनतेने 
ठेवोनि एकोपा 
भावबंध जपा 
सांगणे हे...!

जय हिंद ! जय महाराष्ट्र

सुधाकर कदम

//सुधाकरी//













संगीत आणि साहित्य :