गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, July 15, 2026

जगत मी आलो असा (लेखांक ३७)



   ●अरुणावतीच्या तीरावर (भाग १)●

     आर्णीच्या नोकरीबद्दल मागील एका लेखात आलेच आहे. संगीत शिक्षक म्हणून नाईलाजाने का होईना एकदाचा रुजू झालो. वर्ष होते 1972. त्यावेळी संस्थाध्यक्ष होते चिद्घनानंद भारती. ही संस्था माहूरचे महंत श्री दत्तराम भारती यांच्या योगदानातून उभी राहिली होती. त्यामुळे श्री महंत दत्तराम भारती नावानेच ही शाळा ओळखली जात होती/आहे. जसा चिद्घनानंद भारतींचा आर्णी, माहूर परिसरात दरारा होता तसा यवतमाळ जिल्हाभर या शाळेचा दरारा होता. स्वच्छ पारदर्शी व्यवहार, कडक शिस्त, नावाजलेले हुशार असे शिक्षक, अतिशय मृदू पण शिस्तीचे कडक असे मुख्याध्यापक हे या शाळेचे वैशिष्ठय होते. शंकरराव बुटले हे त्यांचे नाव. पांढरे शुभ्र धोतर, पांढराच शर्ट व पांढरी टोपी ही त्यांची वेशभूषा. उत्तम शिक्षण, खेळ, कला, संगीत, नाटक व विविध शालेय उपक्रम यामुळे त्यांच्या कार्यकाळात शाळा खूप नावारूपाला आली होती. मी रुजू झालो तेव्हा त्यांनी मला खूप सहकार्य केले. संगीत क्षेत्रात जरी मी नाव कमावले होते तरी पण एक शिक्षक म्हणून मी शून्य होतो. पण बुटले गुरुजींनी माझ्यातील गुण-दोषासह मला स्वीकारले व मार्गदर्शन केले. सुरूवातीला प्रत्येक तासिकेला वर्गावर जाऊन संगीताची तासिका घ्यावी लागायची. पण माझ्यातील तडफ व संगीताविषयीची आत्मीयता पाहून त्यांनी मला वेगळा संगीत कक्ष दिला. त्यावेळी माझ्याकडे हार्मोनियमसुद्धा नव्हती. शाळेची हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्यामुळे माझे कार्यक्रम सुरू होते. वेतन इतके कमी की, कसेबसे घर चालायचे. त्यामुळे हार्मोनियम घेण्याचा प्रश्नच नव्हता. यवतमाळला असेपर्यंत ऑर्केस्ट्राची हार्मोनियम वापरायचो. यवतमाळलाही माझ्याकडे स्वतःची हार्मोनियम नव्हती. असे असतानाही मी हार्मोनियमचा हात कसा तयार केला असेल याचा विचार करावा. असो!

     बुटले गुरुजींनी संगीत कक्ष दिल्यानंतर मी त्या कक्षात सायंकाळी संगीताचे वेगळे वर्ग घेऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार संगीताचे शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे पाहून बुटले गुरुजींनी मला 'गायनाव्यतिरिक्त काही वाद्य शिकविता येईल काय' असे विचारले. मी हो म्हणताच त्यांनी शाळेच्या फंडातून हवी ती वाद्ये आणायची परवानगी दिली. त्यांनी परवानगी देताच मी मुंबईला जाऊन सतार व संतूर ही दोन वाद्ये आणली. आणि स्वतः प्रॅक्टिस करून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले. यवतमाळचा नेहरू युवक केंद्राच्या प्रेरणा युवा मंचाच्या सांस्कृतिक विभागात तबला वादन करून सहकार्य करणारा मित्र शेखर सरोदे, उस्ताद शेख दाऊद खान यांच्याकडे तबल्याच्या उच्च शिक्षणासाठी हैदराबादला गेला होता. तेथे माझी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची एक मैफिल आयोजित केली होती. त्या निमित्त हैदराबादला गेलो असता तेथून एक स्वरमंडळ घेऊन आलो. त्याचेही पैसे मला शाळेकडून मिळाले. माझी मेहनत हळूहळू रंग भरत होती. शाळेतील 26 जानेवारी म्हणजे तीन दिवसांचा नृत्य, नाट्य, संगीत महोत्सवच असायचा. या तिन्हीमध्ये माझा सहभाग अनिवार्य असल्यामुळे आर्णी व परिसरातील रसिकांची ओळख व्हायला लागली. म्हणून मी गावातील रसिक, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर मित्र मिळून 'स्वर-गंगा' नावाची (बिन पगारी, फुल अधिकारी) संस्था स्थापन केली.या संस्थेचे उद्घाटन अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेबांचे शिष्य पं. मनोहरराव कासलीकर यांच्या गायनाने केले. या कार्यक्रमाला आर्णी व परिसरातील रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम बुटले गुरुजींच्या परवानगीने शाळेच्या विज्ञान भवनात आयोजित केला होता. एकीकडे यवतमाळचा ऑर्केस्ट्रा, दुसरीकडे माझे सोलो कार्यक्रम या व्यतिरिक्त शाळा व संगीत वर्ग अशी खूप ओढाताण होत होती. पण जिद्द आणि मेहनत करण्याची मानसिक तयारी हे सर्व माझ्याकडून करून घेत होती. वरील सगळ्या बाबींमुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींप्रमाणेच माझ्यातील नसलेल्या चुका दाखवून मुख्याध्यापक व संस्थेतील पदाधिकाऱ्यांकडे चुगल्या करणारी मंडळी पण तयार होऊ लागली. पण हे प्रमाण कमी होते. तसेच मुख्याध्यापक आणि संस्थाध्यक्ष माझी ससेहोलपट बघत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत कुठलेच प्रकरण आले नाही. माझी कार्यशैली, स्वच्छ चारित्र्य, स्वाभिमानी स्वभाव, शाळेतील शिक्षक म्हणून ठेवलेली आब याबद्दल संस्थाध्यक्ष माझ्या बाबतीत अत्यंत उदार धोरण ठेवून होते.

000000

क्रमशः

---------------------------------------------------------------------

दै. विदर्भ मतदार,अमरावती. रविवार दि.१३ जुलै २०२६

No comments:





संगीत आणि साहित्य :