१९८० मध्ये सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले असताना रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा सुरु असताना एकदम काय झाले माहीत नाही.एक गझल मला लिहून घ्यायला सांगितली व जरा यमनच्या स्वरात गुणगुणून दाखवता काय? (ही विनंतीवजा आज्ञाच होती) असे विचारले. मतला होता...
आसवांचे जरी हसे झाले
हे तुला पाहिजे तसे झाले
यमन हा दोघांच्याही आवडीचा राग...त्यांनी सहज म्हटले व मी पण सहज गंमत म्हणून हार्मोनियम घेऊन यमनची सुरावट छेडत बसलो. चाल बसवणे हा उद्देश नसताना आणि निव्वळ फावल्या वेळेतील गप्पा सुरू असताना यमन छेडता छेडता सहजच सुचलेली सुरावटीत त्यांना ऐकविली.लगेच "व्वा! क्या बात है कदम साहेब" अशी मजेशीर दाद देऊन ते पलंगावर पहुडले. आम्ही पण झोपण्याची तयारी करायला लागलो.पाच-दहा मिनिटातच 'ती जरा पुन्हा एकदा ऐकवता काय?' अशी विचारणा केली.मी पुनः हार्मोनियम काढली व सुरावट आठविण्याचा प्रयत्न करायला लागलो.कारण गंमत म्हणून सहज गुणगुणलो होतो.बऱ्याच प्रयत्नानंतर थोड्या फार फरकाने आठवली.आणि जशी आठवली तशी भटांना ऐकवली.त्यानंतर ते व आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
आज हे आठविण्याचे कारण म्हणजे जीर्ण झालेली जुनी डायरी...मी सध्या मुलीकडे नांदेड सिटीला मुक्कामी आहे.१४ तारखेला सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी मैफल जमवावी म्हणून मयूर, प्राजक्ताला फोन केला.
मयूरकडे सुरेश भटांच्या शिकविलेल्या माझ्या बंदीशींच्या बऱ्याच गझला आहेत.अनेक कार्यक्रमातून त्याने सादर केल्या आहेत.पण प्राजक्ताकडे माझ्या बंदीशीची सुरेश भटांची एकही गझल नव्हती.म्हणून मग वारजे येथील माझ्या निवास स्थानावरून निषादला डायरी पाठवायला सांगितली.तर त्याने सगळ्या डायऱ्या पाठवून दिल्या.माझ्या शेवटच्या (म्हणजे मी कार्यक्रम करीत असतानाच्या वेळची) डायरीतील दोन गझला मोबाईलवर गाऊन तयार करण्यासाठी प्राजक्ताला पाठविल्या.नंतर १९७५ पासूनची जुनी डायरी चाळायला लागलो.त्यात ही गझल दिसली.व जुनी 'आठवण' ताजी झाली.बस्स!इतकेच...
आसवांचे जरी हसे झाले,
हे तुला पाहिजे तसे झाले
चंद्र आला निघूनही गेला
ऐन वेळ असे कसे झाले
शोधुनी मी तुला कुठे शोधू
चेहऱ्यांचेच आरसे झाले
संपले हाय बोलणे माझे
जे तुझ्याशी कसे बसे झाले
●
दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.८/६/२०२६


No comments:
Post a Comment