गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, January 6, 2024

राग_रंग (लेखांक ३८) ललित


    ललित हा फार प्राचीन राग आहे.याच्या जातीबद्दल व त्यात घेतल्या जाणाऱ्या स्वरांबद्दल विभिन्न मते असून बराच वाद आहे.सध्या मात्र दोन अलग अलग ललित आहेत.एक पूर्वी थाटातून उत्पन्न होणारा कोमल धैवत असलेला ललित.दुसरा मारवा थाटातून उत्पन्न होणारा शुद्ध धैवत असलेला ललित.(मारवाआणि पूर्वी क्रमशः कर्नाटक पध्दती मधील गमनाश्रम आणि कामवर्धिनी मेलकर्ता आहे.) यातील पूर्वी थाटोत्पन्न ललित उत्तर भारतीय संगीतामध्ये जास्ती लोकप्रिय आहे.यात पंचम स्वर नसल्यामुळे याची जाती षाडव षाडव आहे.यात रिषभ,धैवत स्वर कोमल असून दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.पण यातील मध्यम स्वर केदार,हमीर,
गौडसारंग, बिहाग,बसंत,मारुबिहाग,पुर्वी वगैरे रागाप्रमाणे येत नाही.ललित मधील मध्यम स्वराला षड्ज समजून ललितचे स्वर घेतल्यास तोडी राग स्वच्छपणे दिसतो.
ललित रागाचे वैशिष्ठय म्हणजे याच्या अवरोहात दोन्ही मध्यम पाठोपाठ घेतल्या जातात.ज्यामुळे हा राग स्पष्टपणे दिसून येतो.परज,पुरिया धनाश्री,पूर्वी,श्री हे राग पूर्वी थाटजन्य असले तरी प्रत्येकाचा गानसमय वेगवेगळा आहे.हे विशेष.थाट म्हणजे घरचा प्रमुख व राग म्हणजे त्याची वेगवेगळ्या स्वभावाची पण एकमेकांशी घट्ट जुळलेली मुले...असेच काहीसे! ललीतचा गानसमय प्रातःकाल आहे.वादी स्वर शुद्ध मध्यम व संवादी स्वर षड्ज आहे.हा एक मध्यम स्वर प्रधान राग आहे.ललित नाव 'ललिता' शब्दापासून आले असावे.ज्याचा अर्थ कोमल,आकर्षक,सुंदर,मधुर आवाजाचा/ची वगैरे...
     कोणत्याही रागाच्या स्वरांशी मैत्री करण्याचा सोपा उपाय म्हणजे चित्रपट गीते.चित्रपट संगीतामध्ये प्रयोग केल्या जाणारे राग व मैफलीत गायक/वादकांद्वारे शास्त्रीय संगीत ऐकणे हे शास्त्रसार समजून घेण्यास उपयोगी पडते.हा माझा ऑर्केस्ट्रातील वावरामुळे अनुभव आहे.
        शास्त्रीय संगीत शिकत असताना ललित राग शिकलो.पण भिडला तो पंडित जसराज यांच्या 'रतनारे नैनो में मोहन की मूरत' या झपतालातील चिजेने,संगीत मृच्छकटिक नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायिलेल्या 'हे सखी शशी  वदने' या नाट्यगीताने,आणि नंतर जगजीत सिंगच्या १९७९ मध्ये आलेल्या 'come alive' अलबम मधील सईद राही यांच्या 'कोई पास आया सवेरे सवेरे' या गझलच्या बंदीशीने... अगदी पार वेडे केले होते.दहा मात्राचा झपताल न वापरता फक्त पाच मात्रा वापरून ही बंदिश बनविली होती. त्यातही सुरवातीलाच गांधाराला षड्ज करून ललीतमध्ये भूपाची छाया दाखवत घेतलेला आलाप,मधील गिटार सोबतचे 'नोटेशन' सगळंच अफलातून होतं ! तेव्हापासून मी ललिताच्या जो प्रेमात पडलो तो आजतागायत.
       काही गुणीजणांचा थाट या प्रकारावर/बद्दल आक्षेप आहे.ते म्हणतात थाटाच्या कितीतरी अगोदर राग अस्तित्वात आले.राग गायिल्या जातात,थाट नाही.त्यामुळे थाटाला जनक म्हणनेच मुळात चूक असून,राग एक निश्चित स्वरसमूह असून त्या अंतर्गत थाट येत असतो.तसेच थाट पद्धतीत अनेक विसंगती दिसून येते.त्यामुळे थाटापेक्षा रागांग प्रकार योग्य वाटतो.प्रत्येक रागाची एक विशेषता असते.ओळख असते.
ज्यामुळे तो ओळखल्या जातो.ही विशेषता थाट पद्धतीमध्ये नेहमी दिसत नाही.
    उस्ताद बडे गुलाम अली खान, पं. डी. व्ही. पलुस्कर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अमीर खान, पं.रवी शंकर,  कुमार गंधर्व, पं. मणी प्रसाद, किशोरी आमोणकर,पं जितेंद्र अभिषेकी, इंद्राणी मुखर्जी, पं. जगदीश प्रसाद, परवीन सुलताना, पं. जसराज, पं. भीमसेन जोशी,पं.अजय चक्रवर्ती,उस्ताद राशिद खान,पं. हरिप्रसाद चौरसिया,डॉ.अश्विनी भिडे, पं. निखिल बॅनर्जी, पं.उल्हास कशाळकर, पं. व्यंकटेश कुमार, पं. राजन साजन मिश्र, पं. विजय कोपरकर, पं. रॅम कुमार मलिक,समित मलिक, उस्ताद मशकुर अली खान वगैरे गायक/वादकांनी सादर केलेला ललित युट्युबवर उपलब्ध आहे.
● हिंदी,उर्दू...
'प्रीतम दरस दिखाओ' लता. चित्रपट-चाचा जिंदाबाद, संगीत-मदन मोहन (१९५९). 
'तू है मेरा प्रेम देवता' मन्ना डे,रफी.चित्रपट-कल्पना, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९६०)
'एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल' लता,रफी. चित्रपट-लीडर, संगीत- नौशाद (१९६४). 
फारसी गझल...झकेरीया राहीं.चित्रपट-लीडर (१९६४)
'तू है सरापा ताजमहल' गायक-उस्ताद नजाकत अली, सलामत अली.चित्रपट-ताजमहल (पाकिस्तान).संगीत-निसार बजमी (१९६८). 
'बडी धीरे जली रैना भी' रेखा भारद्वाज. चित्रपट-इश्किया, संगीत-विशाल भारद्वाज (२०१०). 
'साच कहूँ सून ले सभई' गायक-भाई संदीप सिंग हजुरी रागी, पंजाबी.गुरुबानी. 
'कोई पास आया सवेरे सवेरे' गायक/संगीतकार-जगजीत सिंग. उर्दू गझल. 
● मराठी...
'ते माझे घर,ते माझे घर,जगावेगळे असेल सुंदर' आशा.संगीत-सुधीर फडके, चित्रपट-पोष्टातील मुलगी (१९५४). 
'विनायका हो सिद्ध गणेशा' गायक-रामदास कामत, संगीत-विश्वनाथ मोरे.नाटक-दार उघड बया दार उघड. 
'हे सखे शशी वदने' गायक-पंडित जितेंद्र अभिषेकी. नाटक-संगीत मृच्छकटिक. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी, रविवार दि. ७ जानेवारी २०२४.


 

राग-रंग (लेखांक ३७) राग आसावरी

              
दहा थाटांची ग्रंथानुसार शास्त्रीय माहिती...

भैरव भैरवि आसावरी, यमन बिलावल ठाट।
तोड़ी काफ़ी मारवा, पूर्वी और खमाज।।
शुद्ध सुरन की बिलावल, कोमल निषाद खमाज
म तीवर स्वर यमन मेल, ग नि मृदु काफ़ी ठाट।।
गधनि कोमल से आसावरी, रे ध मृदु भैरव रूप।
रे कोमल चढ़ती मध्यम, मारवा ठाट अनूप।।
उतरत रे ग ध अरु नी से, सोहत ठाट भैरवी।
तोड़ी में रेग धम विकृत, रेधम विकृत ठाट पूर्वी।।

      प्राचीन भारतीय संगीत तज्ज्ञांच्या मतानुसार आसावरी राग 'श्री' रागाची प्रमुख रागिणी आहे.ऋतू,वेळ,भाव आदींचे वैज्ञानिक विश्लेषण करून त्यांनी १३२ प्रकारच्या राग-रागिणींची कल्पना केली आहे.परंतू आधुनिक विद्वानांनी हा भेद बाजूला ठेवून सगळ्याला राग ही संज्ञा दिली असल्याचे म्हटले आहे.या रागांची लक्षणे इ.स.१८९९ मधील 'रागप्रकाशिका' या ग्रंथात दिली आहेत.
     आसावरी हा एक थाट असून त्यातूनच निर्माण झालेला आसावरी राग होय.याला जनक राग असेही म्हणतात.यात गांधार,धैवत व निषाद हे तीन स्वर कोमल आहेत.वादी स्वर कोमल धैवत असून संवादी स्वर कोमल गांधार आहे. 
आरोह: सारेमपध॒सां
अवरोह: सांनि॒ध॒पमग॒रेसा
पकड़: रेमपनि॒ध॒प
हा राग उत्तरांगवादी आहे. जातीऔडव-संपूर्ण असून गानसमय दिवसाचा प्रथम प्रहर आहे. आसावरी थाट उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामधील महत्वाचा मानल्या जातो. भातखंडे पद्धतीनुसार वर्गीकरणपद्धतीनुसार आसावरी थाटात आसावरी, जौनपुरी, गंधारी, देवगांधार, सिंधुभैरवी, देसी, कौशी, दरबारी कानडा, अडाणा, नायकी कानडा या रागांचा अंतर्भाव होतो. खट, झीलफ यांचाही समावेश याच थाटात करण्यात येतो. या सर्व रागांचे तीन उपवर्ग पडतात : (१) दोन्ही गंधार घेणारे खट, झीलफ, देवगांधार (२) दोन्ही ऋषभ घेणारे गंधारी, सिंधुभैरवी (३) अवरोहात धैवत वर्ज्य करणारे दरबारी कानडा व अडाणा.हिंदुस्थानी संगीतशास्त्रानुसार दरबारी कानडा, अडाणा व कौशी हे राग रात्रिगेय असून या थाटातील बाकीचे राग दिनगेय आहेत. दाक्षिणात्य पद्धतीतील नटभैरवी मेल आसावरी थाटाशी जुळता आहे. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये आसावरी थाटाला  'नटभैरवी मेल' या नावाने ओळखतात.
     आसावरीच्या मूळ स्वरूपात रिषभ,गांधार, धैवत व निषाद ह्या चार कोमल स्वरांचा उपयोग केल्या जात होता.जवळ जवळ भैरवी प्रमाणेच. जेव्हा पंडित भातखंडे यांनी उत्तर भारतीय रोगांना दहा थाटात बंदिस्त केले तेव्हा त्यांनी थाटाच्या प्रमुख रागाच्या स्वरूपात आसावरी रागाला शुद्ध रिषभाच्या रुपात निवडले.त्यामुळे मूळ आसावरी रागाला 'कोमल रिषभ आसावरी' या नावाने ओळखल्या जायला लागले.नवीन आसावरीमुळे,आसावरीची लोकप्रियता कमी होऊन जौनपुरी रागाची लोकप्रियता वाढली.गमतीची गोष्ट अशी आहे की, शुद्ध रिषभाच्या आसावरीपेक्षा जौनपुरीची लोकप्रियता वाढल्यामुळे कोमल रिषभ आसावरी पुनः लोकप्रिय झाला.फक्त 'आसावरी' हे शीर्षक असलेले बहुतेक ध्वनिमुद्रण कोमल रिषभ आसावरी रागात आहे, देव गंधार रागात कोमल गांधारासोबतच शुद्ध गांधाराचाही अल्प प्रयोग केल्या जातो.आसावरी,जौनपुरी व देवगंधार हे तीनही राग जवळ जवळ सारखेच आहेत.पंडीत ओंकारनाथ ठाकूर यांचेसह अनेक संगीत विशेषज्ञ आसावरी व जौनपुरी या दोन रागांना वेगळे मानत नव्हते. तसेच काही गायक कोमल रिषभ आसावरीला 'आसावरी तोडी' असे पण संबोधतात.एक 'जोगी आसावरी' पण आहे.
      शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रथम आसावरी व नंतर जौनपुरी राग शिकलो.पण दोन्ही राग इतके सारखे आहेत की, कोणत्या रागात कोणते स्वर कसे घ्यायचे ते कळत नव्हते.त्यातही जौनपुरी कळला तो किशोरी आमोणकारांचा ऐकल्या नंतर. कोमल रिषभ आसावरी तर त्यावेळी माहीतही नव्हता.सर्वप्रथम आकाशवाणीवरुन पंडित भीमसेन जोशी यांच्या ऐकण्यात आला.तेव्हा कळला. नवीन नवीन राग माहिती करून घेण्याची उत्सुकता असायची.पण सांगणार कोण?विचारणार कोणाला? आर्थिक परिस्थितीमुळे मानसिक परिस्थियी पण गरीबच ठेवावी लागायची.असो!
     उत्तर भारतीय शीख प्रणालीत आसावरी व कोमल रिषभ आसावरी हे दोन्ही राग दिसून येतात.हे दोन्ही राग श्री गुरू ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचा एक एक हिस्सा आहे.तसेच शीख गुरू श्री रामदासजी आणि श्री गुरू अर्जुन देवजी यांनी या रागांचा प्रयोग केल्याचा उल्लेख आहे.श्री गुरू ग्रंथ साहेबात कोमल रिषभ आसावरी 'राग असावरी सुधंग' या रुपात दिसून येते.
     उस्ताद बडे गुलाम अली खान, सवाई गंधर्व, पंडित ओंकारनाथ ठाकूर, उस्ताद अमीर खान, उस्ताद शराफत हुसैन खान, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज,पंडित राजन साजन मिश्र, मंजिरी आलेगावकर, पं. उल्हास कशाळकर, पं. उदय भवाळकर, पं.जयतीर्थ मेवूंडी, पं. व्यंकटेश कुमार, पं.सुरेश बापट (जोगी आसावरी), पंडित राधा गोविंद दास, 
उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), उस्ताद असद अली खान (रुद्र वीणा), इम्रत खान (सुरबहार), पंडित हरिप्रसाद चौरसिया (बासरी), आतिष मुखोपाध्यय (सरोद)...यात आसावरीचे सर्व प्रकार आलेले आहेत.पंजाबी भक्तिगीते व कीर्तन यात बहुतेक शुद्ध रिषभाचा आसावरी दिसतो.
 
● आधारित चित्रपट गीते...
'चले जाना नहीं नैना मिलाके' लता. चित्रपट- बड़ी बहन,संगीत-हूस्नलाल भगतराम (१९४९). 
'तू ने हाये मेरे ज़ख़्म-ए जिगर को छू लिया' लता.चित्रपट- नगीना (जुना),संगीत-शंकर जयकिशन (१९५१). 
'ना ये चाँद होगा,न तारे रहेंगे' गीता दत्त, हेमन्त कुमार.चित्रपट - शर्त, संगीत-हेमन्त कुमार (१९५४). 
'पिया ते कहा गयो नेहारा' लता. चित्रपट-तूफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 
'बेरेहम असमान मेरी मंजिल बता है कहां' तलत महमूद.
चित्रपट-बहाना, संगीत-मदन मोहन (१९६०). 
 'मुझे गले से लगालो बहुत उदास हूं मैं' आशा,रफी.चित्रपट -आज और काल, संगीत-रवी (१९६३). 
'रुक जा रात ठहर जा रे चंदा' लता. चित्रपट-दिल एक मंदिर, संगीत-शंकर जयकिशन (१९६३). 
'लो आ गई उनकी याद वो नहीं आए' लता. चित्रपट-दो बदन, संगीत-रवी (१९६६). 
सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है' मुकेश. चित्रपट-तीसरी कसम, संगीत-शंकर जयकिशन (१९६६). 
'हमें और जीने की चाहत ना होती' किशोर कुमार.चित्रपट- अगर तुम ना होते, संगीत-आर.डी. बर्मन (१९८३). 
'सुन साहिबा सुन प्यार की धून, लता. चित्रपट-राम तेरी गंगा मैली, संगीत-रवींद्र जैन (१९८५). 
'जादू तेरी नज़र' उदित नारायण.चित्रपट- डर,संगीत-शिव-हरी (१९९३). 
'सिलसिला ये चाहत का ना मैं ने बुझने दिया' श्रेया घोषाल. चित्रपट-देवदास, संगीत-इस्माईल दरबार,मॉन्टी शर्मा (२००२). 

' तुम जिद तो कर रहे हो,हम क्या तुम्हे सुनाए' -मेहदी हसन (युट्युब पाकिस्तान). 
'जदों होली जय लेंदा मेरा ना' नूरजहाँ.- चित्रपट-अत्त खुदा दा वैर,(पाकिस्तान). 
'जब भी चाहें इक नई सूरत सजा लेते हैं लोग' मेहदी हसन.(पाकिस्तान). 
'मुझे आवाज दे तू कहां है' मेहदी हसन. चित्रपट-घूंघट (पाकिस्तान). 
● मराठी...
'अवघे गरजे पंढरपुर' पंडित जितेंद्र अभिषेकी. 
'काय वधिं मे ति सुमति'
'तीर्थ विट्ठल क्षेत्र विट्ठल' पंडित भीमसेन जोशी, संगीत-राम फाटक. 
प्रेमभावे जीव जगि या नटला' संगीत नाटक-मानापमान. 
'छेडिली मी आसावरी' सुधीर फडके. 
'दुर आर्त सांग कुणी छेडिली असावरी' मूळ गायक,संगीतकार माहीत नाही. 
-----------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, दि.५ जानेवारी २०२४.


 

Wednesday, January 3, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २२)

.                       ●प्रश्न आणि उत्तर●

     काही प्रश्न आणि उत्तरे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही.मग तो शिक्षक असो,कलाकार असो की सामान्य माणूस असो! कारण प्रश्न एक व उत्तर दुसरे असा प्रकार नेहमीच घडत असल्याने तो एक मनोरंजनाचा भाग ठरतो. कसा?  हे बघा! दोन बहिरे सकाळी सकाळी भेटल्यावर...
'काय ? फिरायला निघाला वाटतं?' पहिला.
'नाही, नाही, फिरायला निघालो!' दुसरा.
'असं असं, मला वाटलं फिरायला निघालात.' पहिला.     
      १९८३ मध्ये  पुण्याच्या 'रस्टन ग्रीव्हज्' कंपनीतर्फे राजवाडे हॉलमध्ये माझा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम झाला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भावगीत गायक स्व. गजाननराव वाटवे हे होते.(माझ्याबद्दल "मला आवडलेला गझलिया" असा उल्लेख त्यांचा रोजनिशीमध्ये असल्याचे,दैनिक सकाळामध्ये आलेल्या त्यांच्यावरील एका लेखामुळे बऱ्याच कालावधीनंतर मला कळले.तो लेख माझ्याकडे आहे.) सूत्र संचालन सध्याचे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील, तत्कालीन प्रसिद्ध संगीत समीक्षक स्व. श्रीरंग संगोराम यांनी केले होते. कार्यक्रमानंतर एक व्यक्ती मला भेटायला आली व 'ओळखलं का?' हा प्रश्न बंदुकीच्या गोळीसारखा नेम धरून माझ्याकडे भिरकावती झाली,  मी पडलो भिडस्त ! (१९८२ मध्ये पुण्यात बरेच कार्यक्रम झालेले असल्याने कुणीतरी रसिक असावा म्हणून उगीच त्याला इतक्या लोकांमध्ये ओळखले नाही असे कसे म्हणायचे?) म्हणून 'वाऽ वाऽ ओळखले ना!' असे म्हणून सुटकायचा प्रयत्न करायला लागलो तर तो जवळ येऊन ह्याSSS ह्याSSS असे चार मजली हसत, 'मला वाटलंच ओळखाल म्हणून, उगीच नाही मी माझ्या भाच्याला सांगितलं!' असे म्हणून लहानग्या भाच्याला पुढे करून नमस्कार करायला सांगितले. मी प्रतिनमस्कार करून त्याला कटविण्याकरिता 'बराय येतो' असे म्हणताच तो जळूप्रमाणे चिटकून म्हणाला, 'मी सध्या पुण्यातच आहे. उद्या घरी या ना!' मी त्याला टाळण्याकरिता होयबाची भूमिका वठवत हो हो म्हणून जायला निघालो, तसा आडवा होऊन म्हणतो कसा, 'कसे याल?' मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते, तशी माझी झाली. माझ्या चेहन्यावरचे भाव पाहून त्याला मात्र आसुरी आनद झालेला मला दिसला आणि बरोबर पेचात पकडल्याचा आव आणत स्वतःचे नाव विचारायला लागला. आता मात्र माझे सातही स्वर बेसूर झाल्याचे लक्षात आले व अSSS आSSS SSS SSS SSS अशी बाराखडी सुरू झाली, पण आता का माघार घेतली तर पुढे कठीण जाईल हे लक्षात येऊन हो म्हणालो, 'चेहरा आठवतो हो, पण नाव काही आठवत नाही! खूप लोक ठिकठिकाणी भेटतात प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवू शकत नाही.' वगैरे वगैरे प्रकार करून त्याच्याकडून त्याचे नाव वदवून घेतले व कशीबशी बोळवण करून सुटकेचा श्वास टाकला. खरे म्हणजे त्याने सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीला मी कधीच भेटलो नव्हतो.
    शिक्षक असताना तर प्रश्न एक व उत्तर दुसरे असे नेहमीच घडत गेले. नागरिकशास्त्राच्या एका प्रश्नपत्रिकेत 'नागरी जीवनाचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता का असते?' असा प्रश्न होता. एका विद्यार्थ्याने उत्तर लिहिले, 'पावसाळ्यात खूप पाऊस येऊन नदीला पूर आल्यास घरे वाहून जाऊ नयेत म्हणून नागरी जीवनाचा पाया मजबूत करणे आवश्यक असते.' इतिहासाच्या एका प्रश्नपत्रिकेत 'बौध्दकालीन स्तुपांची माहिती लिहा' असा प्रश्न होता. उत्तर लिहिले गेले, 'बौध्द काळात दोन प्रकारचे तूप प्रसिध्द होते. १) गायीचे तूप २) म्हशीचे तूप.
     सातवीच्या विज्ञानविषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नासोबत 'आकृती काढा' असे लिहिले होते व एका पठ्याने प्रश्न सोडवून सोबत एक तोंड वासलेल्या कुत्रीचे चित्र काढले व त्याखाली 'ही आकुत्री आहे' असे मोठ्या टेचात लिहून ठेवले. ही उत्तरपत्रिका पूर्ण शाळाभर फिरली व दाद घेऊन गेली.
      याच प्रश्नपत्रिकेत दुसरा प्रश्न होता 'सुर्यकुलाचे घटक कोणते ?' उत्तर होते- तीळ, जवस, करडई, शेंगदाणा, वगैरे वगैरे सूर्यफुलाचे घटक आहेत. सूर्यकुलाला सूर्यफूल समजून इतरांना बिगफूल बनविणाऱ्या या विद्यार्थ्याचेही 'कौतुक' झाले.
     प्रश्न एक व उत्तरे दुसरे यातून इतिहासही सुटला नाही. एक प्रश्न होता, 'इतिहासातील दोन बाजींबद्दल थोडक्यात माहिती द्या.' एकाचे उत्तर होते, 'माझ्या घरी दोन ऐतिहासिक बाजी आहेत. एकीवर माहा बा झोपतो व एकीवर माही माय!'
     मायबोलीची चिरफाड तर सदैव सुरूच असते. याला कोण जबाबदार हे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनीच शोधावे. प्रश्न होता 'वर्णाचे प्रकार लिहा.' उत्तर होते, 'वर्णाचे दोन प्रकार आहेत १) साधे वर्ण २) फोडणीचे वर्ण.
     विद्यार्थ्यांचे एक सोडा, मोठी माणसे तरी प्रश्न तसे उत्तर देतात काय ? एकदा आणींच्या बसस्थानकावर चौकशी खिडकीवर जाऊन 'माहूर बस किती वाजता आहे?' असा प्रश्न फेकला तर तेथील चौकशी साहेब, होऽऽ होऽऽ, साहेबच मुद्राभिनय करून सल्ला देतो. 'टाईमटेबल देखो ना, एज्युकेटेड तो दिख रहे हो, कहाँ कहाँसे आ जाते यहाँ पर !' मला सांगा, हे प्रश्नाचे उत्तर झाले काय ?
     जगत असताना हे असेच सदैव घडत असते. प्रश्न विचारतो एक अन् उत्तर मात्र दुसरेच मिळत असते. बालपणी आईवडिलांची उत्तरे, तरुणपणी शिक्षक-प्राध्यापकांची उत्तरे, नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तरे व आयुष्यभर बायकोची उत्तरे... आपण ठोंब्या असल्याचा साक्षात्कार करणारीच असतात. त्याला मात्र इलाज नाही.


 

Wednesday, December 27, 2023

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २१)

.                             -दोन आठवणी-

      यवतमाळला नगर पालिका संगीत महाविद्यालयात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना दोन महत्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या.त्या म्हणजे तत्कालीन नगर पालिकेचे अध्यक्ष संगीत प्रेमी आदरणीय स्व. बाबासाहेब घारफळकर आणि माहुरचे राजे स्व. मधुकरराव उपाख्य बाबुरावजी देशमुख.दोघेही संगीतावर अपार प्रेम करणारे.बाबासाहेब बाल गंधर्वांची पदे अप्रतिम गायचे. ते आले की जवळ जवळ तीन तासांची मैफल ठरलेली असायची.या निमित्ताने आम्हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्षपणे बालगंधर्वांची गायकी ऐकायला मिळायची.दुसरे राजे मधुकरराव...ते आले की, आल्या आल्या दहा रुपयाची नोट काढून चपराशाला पेढे आणण्याकरिता पिटाळायचे.(त्या काळी, म्हणजे १९७० च्या दशकातील दहा रुपये...त्या दहा रुपयांची आजची किंमत किती असेल विचार करा.) कासलीकर गुरुजींच्या मैफली सोबतच गोड पेढ्यांनी सगळ्यांचे तोड गोड व्हायचे.त्यांनी त्या काळातील बहुतेक गायक/वादक ऐकले होते.पंडित उस्ताद अमीर खान, जसराज त्यांचे आवडते गायक होते.ते रसिक तर होतेच पण उत्कृष्ट लेखक,उत्कृष्ट शिकारी होते.सह्याद्री बुक्स तर्फे त्याचे शिकारीवरील 'शिकारनामा' हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.यात त्यांनी केलेल्या १४ शिकारीचे वर्णन आहे.या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी आमहू उभयता  उपस्थित होतो..माझे संगीत शिक्षण,ऑर्केस्ट्रा,नेहरू युवक केंद्रातील काम,मेंडोलीन वादन,गायन प्रवास ते बघत आले होते.आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर गांधर्व संगीत विद्यालय स्थापन केले.त्याच्या वार्षिकोत्सवाला राजे आवर्जून उपस्थित राहायचे.मी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत जसराजजींच्या बंदिशी गायचो.  पंडितजी त्यांचेही आवडते गायक असल्यामुळे माहूरला त्यांच्या वाडयात माझ्या अनेक मैफली आयोजित करून माहुरकरांना ऐकवायचे.माहुरच्या रेणुकादेवीसमोर ललिता पंचमीला आम्ही हजेरी लावायचो.त्या काळी सभामंडपात ही हजेरी असायची.गाणारे व ऐकणारे गाभाऱ्यात मावतील इतके असायचे.हळू हळू गर्दी वाढायला लागली, तसे माझे मित्र असलेलले प्रमुख भोपी स्व. रेणूकदासजींनी या हजेरीला संगीत संमेलनाचे रूप देण्याचे ठरवून मंदिराच्या बाहेर प्रांगणात हजेरी लावण्याची ध्वनिवर्धकासह सोय करून आयोजनाची जबाबदारी माझ्यावर टाकली.जोपर्यंत माझ्यावर जबाबदारी होती त्या कालखंडात छोटा गंधर्वां सारखी दिगग्ज मंडळी या संगीत संमेलनात गाऊन गेली.

     माझ्या सांगीतिक प्रवासाचे साक्षीदार असलेल्या स्व.बाबुरावजी यांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवा निमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकात एक लेख लिहिला होता.तो खाली देत आहे. नक्की वाचा...आपणासही आवडेल.


                          #प्रेम_पिया_हम_पाये 


‘हरचंद सुरीली नग़मोंसे

जज़बात जगाये जाते है,

उस वक़्त की तलखी याद करो,

जब साज़ मिलाये जाते है।’


     निःसंशय सुरेल गीतांनी आपल्या भावना उल्हासित, प्रफुल्लित होतात़. परंतु त्या एकमेवाद्वितीय क्षणाची उत्कटता लक्षात घ्या की जेव्हा वाद्ये स्वरात मिळविली जातात़. निःसंशय तो क्षण शब्दातीत, वर्णनातीत आहे़. तितकाच शब्दातीत, वर्णनातीत तोहि क्षण आहे की जेव्हा गायक तन्मय होऊन गात असतो. आणि स्वरवेडा श्रोता आपले प्राण कानात आणून ऐकत असताना आत्मविस्मृतीत जातो़. एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती, किमया, करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे़. माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले. त्याचे गमक वरील शेरमध्ये आहे़.

       कुणाशी नाते जुळते ते उगीचच नाही़. खटपट, प्रयत्न करुन जुळविण्याची ही बाब नाही़. आपल्या काही ऋणानुबंधाच्या गाठी पडलेल्या असतात़. त्या केव्हा पडलेल्या असतात याची आपल्याला कल्पनाही नसते़. परंतु केव्हातरी अनाहुतपणे ती आपल्याला सापडते. आणि त्या गाठीचे रहस्य उलगडत जाते़. त्यावेळी जो आनंद होतो त्या सुखद संवेदनांचं वर्णन करता येत नाही़. माझा आणि सुधाकर कदम यांचा संबंध आला त्याचं रहस्य या ऋणानुबंधाच्या गाठीत आहे़. मला एकवेळा गुरुवर्य पुरुषोत्तमराव कासलीकर म्हणाले होते, “बाबुरावजी, स्वरराजांच्या स्वराला मधाची उपमा दिल्याने मधाची महती वाढते, स्वरराजांची नाही!" आज एका निमित्ताने सुधाकर कदम विषयी लिहीत आहे, तेव्हा मला नेमकं वरील विधान आठवलं. वाटते की माझ्या लिहीण्याने सुधाकरची शान वाढत नाही; वाढलीच तर माझी वाढेल़. मी एक स्वरवेडा माणूस आहे़; तो कानी पडला की माझं मन तिकडे धाव घेते़. त्यावेळी माझी जात कोणती पुसू नका. आठवते़ सुधाकर स्वराचा ठेवा आहे़. स्वराचा वाहता निर्झर आहे़. त्या ठेव्याजवळ बेभान होऊन धाव घेणे हा मधुकराचा स्वभावधर्मच आहे़. नाही तरी ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ आपल्याला हाच संकेत देतो की नाही?

       या साडेतीन दशकात अतूट, अजोड सहवासातून मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकलं आहे़. नाट्यपदे ऐकली आहेत़. त्यांची गझल गायकी ऐकली आहे़. पदेही ऐकली आहे़. हे सर्व ऐकून माझे मन प्रसन्न झाले आहे़. याचे कारण हे की या वेगवेगळ्या गायकीमधून जात असतांना त्यांनी आपला स्वर सोडला नाही़. तालाचे तर भान ठेवलेच पण गायकी ही श्रोत्यांना प्रसन्न करणारी असावी याचेही अवधान ठेवले. यातच त्यांच्या गायकीचे गम्य आहे़. सुधाकर जेव्हा गझल गायकी कडे वळले; त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टीकाही झाली असेल, पण ते बरोबर नाही़. साचेबंद ख्याल गायकी आणि राग दारीच्या पूर्वापार चालत असलेल्या मजबूत बंदिशी मधून ते घरसले असे म्हणता येईल का? महाराष्ट्रीय श्रोता नाट्यपदवेडा आहे़. ख्याल ऐकल्यानंतर आपल्या आवडत्या नाट्यगीताची तो फरमाईश करतोच़. परंतु त्या नाट्यपदाला कोणता रागाधार आहे. वगैरे चौकशा करुन त्या पदाचा उपमर्द करतो का? नाही ना?


दिले नादॉं तुझे हुवा क्या है ।

आखिर इस दर्द की दवा क्या है ॥


      ही मिर्झा गालिबची गझल कोणत्या एका रागाच्या ख्याल गायकी अंगाने गायची. हा जगावेगळा अट्‌टाहास वरील गझलचा आशय, अर्थ, भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे; यात गझल गायकाचे कौशल्य आहे़. आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा आधक अवधान बाळगले आहे़. पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून, विलंबित ख्याल गायक, ज्याला अक्षरमंत्राचा साक्षात्कार झाला आहे, तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल़. या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे़.

       स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले़. त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्योत्तम श्री पुरुषोत्तम कासलीकरांकडे असे़. अशावेळी मला आवर्जून बोलाविल्या जायचे़ .स्वरराज आले की कासलिकरांच्या घराला सम्मेलनाचे रुप यायचे़. या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे पेश असत़. छोटा गंधर्व त्यांचेशी विशेष सलगीने, आपुलकीने वागत असतांना मी त्यांना पाहिले आहे़. अनेकदा हार्मोनियमच्या साथीला सुधाकर कदम यांना बरोबर घेऊन जायचे़.माहुरचे आद्य दैवत श्री रेणुकादेवी़. रेणुकेचे नवरात्र हे माहुरच्या खास आकर्षणाचा काऴ. त्यातल्या त्यात ललिता पंचमीचे महत्व तर अनन्य साधारण़. आपली संगीत सेवा रेणुकेच्या चरणी अर्पण करण्यास दूरजवळचे अनेक कलाकार येत़. त्यात सुधाकर कदम हे प्रामुख्याने असत़. त्या दिवशीच्या संचलनाची जिम्मेदारी आम्ही त्यांचेवर टाकत असू़. ही जबाबदारी ते रात्री नऊपासून सकाळी सुर्योदयापर्यंत निरलसपणे पार पाडत़. संगीत महफिलीचे संचलन करणे ही स्वयं एक कलाच आहे़. त्याला संगीताचा आत्मा ओळखणारा जाणकारच हवा़. येर्‍या गबाळ्याचे ते काम नाही़. संगीताप्रमाणे गोड वाणी, प्रसन्न मुद्रा, उत्तम जोपासलेले शरीर सौष्ठव, मनमिळाऊ स्वभाव या सर्वामुळे ते त्या नऊ-दहा तासाच्या स्टेजवर मानापमानातल्या धैर्यधरासारखे वाटत़. यावेळचा त्यांचा पोषाखही अगदी प्रसंगाला अनुरुप असा चोखंदळ असे़. अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्र- मध्यप्रदेशात गाजली़. त्यांच्या मैफिलींचे वृत्त वर्तमान पत्रातून मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा़.

       सुधाकर कदम आर्णीला़ स्थायिक झाले़. गांधर्व संगीत विद्यालय ही स्वतंत्र संस्था निर्माण करून संगीताचे दान त्यांनी दिले़. या संस्थेच्या विद्यमाने ते दरवर्षी संगीत सम्मेलन घेतात़. या वेळी ते जीव ओतून त्यात राबतात़. सम्मेलन असते एक ना दोन दिवसाचे़ पण त्यामागचे जे कष्ट एक महिना आधीपासून उपसावे लागतात; याचा प्रामाणिक आढावा घेतला तर सम्मेलन काय असते ते कळेल़. संगीत सम्मेलनासोबतच अभिनय कला मंडळ, शिवजयंती उत्सव समिती, तालुका पत्रकार संघ, सरगम, अशा अनेक संस्थांची स्थापना करून सामाजिक, राजकीय, सांगीतिक, बौध्दिक या सर्व स्तरावर आपल्या जीवनाची वाटचाल दमदारपणे चालत असता त्यांनी थोड्याच काळात अमाप लोकप्रियता मिळवली़. हिंदू आणि मुस्लिम समाजात ते सारखेच लोकप्रिय आहेत़. हरदिल अजीज़ आहेत़. भावी आयुष्यात त्यांना आणखी लोकप्रियता मिळो, सगळ्यांचे हरदिल अजीज़ होवो ही या रौप्य महोत्सव प्रसंगी कामना.


-राजे मधुकरराव देशमुख (माहूर)


(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्य महोत्सवी विशेषांक १९९९)

-----------------------------------------------------------------------


     १९८२ ची गोष्ट असेल, त्या वेळी माहुरला ललिता पंचमी च्या दिवशी रात्रभर संगीत सेवा असायची, अनेक नामवंत कलावंत सेवेला येत असत. सुधाकर कदम ह्या कार्यक्रमाचं नियोजन करीत असत. त्या वर्षी मी गेलो आणि गायची संधी मिळाली. बाल कलावंत म्हणून कौतुकही झालं. २, ४ दिवसानीच एक पत्र आलं, "छान गायलास, पण ह्या कौतुकाने हुरळून जाऊ नकोस, रियाजात राहा माझे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तुझाच सुधाकर कदम."

     एका मोठ्या कालावंताकडून मिळालेल्या त्या पहिल्या शुभेच्छा होत्या, आजही ते पत्र मी जपून ठेवलं आहे. संगीत, साहित्य आणि वक्तृत्वाच्या माझ्या प्रवासात आजही कदम सर वेळोवेळी माझं कौतुक करतात. दुसऱ्याला मनमोकळी दाद देणे , कौतुक करणे हा एक दिव्य गुण आहे, ईश्वरानी तो सगळ्यांनाच दिला नाही. कदम सर ह्या दिव्य गुणाचे धनी आहेत. 

सगळेच लोक चालतात त्याच वाटेवरून सरांना कधीच चलावसं वाटलं नाही. If you want to be a path finder, you must be a path breaker, त्या काळापासून सरांनी प्रस्थापित वाटेवरून चालणं नाकारलं होतं म्हणून मराठी गझलेच्या प्रांतात इतक्या प्रदीर्घ काळापासून आपल्याच मस्तीत , आपल्याच शैलीत, विदर्भातला असूनसुद्धा  ताठ मानेने वाटचाल करणारा तो एकटा टायगर आहे. 

     संगीता शिवाय सरांनी लेखन केलं, समाजकारण केलं, राजकारण केलं, भ्रमंती केली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीचं documentation केलं. पुढच्या पिढीसाठी हा फार मोठा ठेवा आहे.  

सरांच्या कर्तृत्ववाचा आवाका इतका मोठा आहे की तो लेखणीत बांधणं माझ्यासारख्यासाठी अशक्य आहे. 

  ३, ४ महिन्यांपूर्वी यवतमाळ वरुन पुण्याला जाताना सर माझ्या घरी आले, मनमोकळ्या गप्पा केल्या , आनंद वाटत फिरणारा माणुस आपल्या घरी येऊन गेल्या सारखं वाटलं. 

सरांच्या संगीत रचना अनेक नामवंत कलावंतांनी गायल्या आहेत. कवींच्या शब्दांना व ती रचना गाणाऱ्या गायकाच्या गळ्याला न्याय देणारा संगीतकार म्हणजे सुधाकर कदम. 

मेहदी हसनला ऐकताना ,रंजीश ही सही ऐकताना असं वाटतं साधा यमनच तर आहे.. पण नीट ऐकल्यावर लक्षात येतं, मानवी मनातील सर्व भावना व्यक्त करण्यासाठी यमनाला मेहंदी हसनचा गळा शोधावा लागतो. 

कदम सरांना मराठीतला मेहंदी हसन का म्हणत असतील... ?

     शब्द आणि स्वरातील भव्य दिव्यता अत्यंत साधेपणाने मांडणे हा दोघांच्याही संगीतातील स्थायीभाव आहे , ऐकताना वाटतं 'अरे किती सोपं आहे पण म्हणून बघताना त्यातला परमेश्वर दिसतो असं मला सापडलेलं उत्तर आहे. 

आज सरांचा वाढदिवस आहे. 

जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रातील सरांची मुशाफिरी अशीच सुरू राहो व त्यासाठी सरांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 

     कदम सरांच्या आयुष्याकडे बघताना मला असं सतत वाटतं मिर्झा गालिबने हा शेर सरांसाठीच लिहिला असावा

हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले।

बहोत निकले मेरे अरमा, मगर फिर भी कम निकले।

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर।

       - डॉ सुशील देशपांडे

          कारंजा लाड

          १३/११/२०२२

Saturday, December 23, 2023

राग-रंग (लेखांक ३६) जौनपुरी

कोण्या एका रागाचे नाव कोण्या एका गावाशी/जागेशी जोडलेले असण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे राग 'जौनपुरी होय.उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये गावाच्या नावाने घराणे आहेत.पण राग मात्र एकच 'जौनपुरी'! १३९४ ते १४७९ मध्ये जौनपूर हे एक स्वतंत्र राज्य होते.यावर 'शर्की' वंशाची हुकूमत होती.(१५ व्या शताब्दीमध्ये वाराणाशी आणि जौनपूर हे उत्तर भारतीय संगीताचे मुख्य क्षेत्र होते.)

     ख्वाजा-ए-जहां मलिक सरवर या राज्याचे पहिले शासक होते.(जे कधी नसिरुद्दीन शाहचे वजीर होते.) या राज्याचे शेवटचे शासक होते सुलतान हुसेनशाह शर्की (१४५८-१४८५) काही इतिहास तज्ज्ञ हा काळ १४५८ ते १५०५ असा सांगतात. सुलतान हुसेनशाह शर्की हे फार मोठे संगीत प्रेमी व जाणकार होते.त्यांना गंधर्व उपाधीने नावाजले होते.ते ख्याल गायकीला प्रोत्साहन देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.त्यांनी 'मल्हार शाम','गौड शाम' आणि 'भूपाल शाम' या सारखे दुर्लभ राग बनविल्याचेही सांगितले जाते.आपल्या संगीत प्रेमापोटी त्यांनी आणखी एक राग तयार केला, ज्याला नाव दिले राग 'हुसैनी'.हाच हुसैनी पुढे जौनपुरी नावाने प्रसिद्ध झाला.जो आज उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक लोकप्रिय राग असून बहुतेक सर्व गायक वादक हा राग आवर्जून सादर करताना दिसतात.या कालखंडात दिल्ली आणि जौनपूर सत्तासंघर्ष चरम सीमेवर होता.शेवटी बहलोल लोदीने जौनपुरवर ताबा मिळवून दिल्लीमध्ये सामिल करून घेतल्यामुळे हुसेन शर्की आपले राज्य गमावून बसले.पण त्यांच्या या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांची आठवण संगीत प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.

     जौनपुरी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला आहे. याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. या रागात 'गांधार' ‘धैवत’आणि ‘निषाद’ हे स्वर कोमल आहेत.आरोहात गांधार वर्ज असून अवरोहात सातही स्वर लागतात.त्यामुळे याची जाती षाडव संपूर्ण आहे.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर.हा राग उत्तरांग प्रधान आहे. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केल्या जातो.याला गंभीर प्रकृतीचा का राग मानतात. आसावरी आणि जौनपुरी एकदम जवळचे राग आहेत.त्यामुळे गाताना फार सावधगिरी बाळगावी लागते.आसावरीमध्ये आरोहात निषाद वर्ज आहे तर जौनपुरीमध्ये आरोहात निषाद घेतल्या जातो.या रागात पूर्वांगात 'सारंग' व उत्तरांगात 'आसावरी' दिसून येतो. सध्या अप्रचलीत असलेला 'गांधारी' राग जौनपुरीशी बराच मिळता-जुळता आहे.

आरोह– सा रे म प नी सां

अवरोह– सां नी प, म ग, रे सा

पकड़– म प, नी प, म प S रे म प

      भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक खास अशी बाब आहे की,दोन रागांचे स्वर एकसारखे असूनही स्वरलगावाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे राग वेगवेगळे होतात.प्रत्येक रागात वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावल्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे रूप आपल्या समोर येते.राग जौनपुरी, राग दरबारी कानडा आणि राग अडाणा या रागांचे स्वर सारखेच आहेत.परंतू ज्या पद्धतीने गायिल्या जाते त्याने प्रत्येक राग पूर्णपणे वेगळा होतो.

    केसरबाई केरकर,उस्ताद बडे गुलाम अली खान, रोशनआरा बेगम, गिरीजा देवी, मास्टर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. डी. व्ही.पलुस्कर, उस्ताद नजाकत अली सलामत अली, पंडित भीमसेन जोशी,पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद फतेह अली खान, मालिनी राजूरकर, पंडित राजन साजन मिश्र, किशोरी आमोणकर,वीणा सहस्रबुद्धे,अश्विनी भिडे,आरती अंकलीकर,उस्ताद नुसरत फतेह अली खान, परवीन सुलताना, पंडित अजय चक्रवर्ती,पं. ज्ञान प्रकाश घोष, पं. व्यंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवूंडी, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर,अपूर्वा गोखले,मंजुषा पाटील,मौमिता मित्रा,कौशिकी चक्रवर्ती,पं. हरीश तिवारी,रवींद्र परचुरे,गौरी पठारे,मंजिरी असनारे,उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), पं.पुर्बायन चटर्जी (सतार),उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पं. निखिल बॅनर्जी (सतार), कला रामनाथन (व्हायोलिन), रुपा पानेसर (सतार), कल्याणी रॉय (सतार) अली अहमद हुसैन (शहनाई) जुगलबंदी.अभ्यासकांसाठी या दिग्गजांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.

● जौनपुरीवर आधारित हिंदी,उर्दू चित्रपट गीते...

'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' तलत महमूद. चित्रपट-मदहोश, संगीत-मदन मोहन (१९५१). 

‘जाएं तो जाएं कहां’ लता,तलत.चित्रपट-टॅक्सी ड्रायव्हर, संगीत-एस.डी. बर्मन (१९५४). (आधारित)

'रहीए अब ऐसी जगह' सुरैय्या. चित्रपट-मिर्झा गालिब,संगीत-गुलाम मोहम्मद (१९५४). 

'पिया ते कहां गयो नेहरा लगा' लता.चित्रपट-तुफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६). 

'दिल छेड़ कोई ऐसा नगमा' लता,आशा,हेमंत कुमार. चित्रपट-इंस्‍पेक्‍टर, संगीत-हेमंत कुमार(१९५६). 

'टुटे हुये ख्वाबो ने' रफी.चित्रपट-मधुमती, संगीत-सलील चौधरी (१९५८). 

'चितनंदन आगे नाचूंगी' लता.चित्रपट-दो कलियां, संगीत- (१९६८). 

'आज सोचा तो आंसू भर आये' लता. चित्रपट-हंसते जख्म, संगीत-मदन मोहन (१९७०). 

'दिल में हो तुम आंखो में तुम' एस जानकी,बप्पी लहरी. चित्रपट-सत्यमेव जयते, संगीत-बप्पी लहरी (१९८७)

'पल पल है भारी' मधुश्री,चित्रपट-स्वदेस, संगीत-ए.आर. रहमान (२००५). 

या रागाची रेंज इतकी भारी आहे की,संगीतकार एस.डी. बर्मन,मदन मोहन,हेमंत कुमार पासून तर बप्पी लहरी, ए.आर.रहमान यांनी जौनपुरीच्या जमिनीवर आपल्या गाण्याची धून बनविली आहे.

● नॉन फिल्मी...

'श्रीराम भजो सुख में दुख में'गायक-के.सी.डे. (१९३०). 

'प्रेम भावे जीव जगी या' उस्ताद अब्दुल करीम खान.अल्बम-हिराबाई बडोदेकर मराठी गीते.

'राम प्रभू आधार जगत के' पंडित भीमसेन जोशी.संत तुलसीदास. 

● मराठी...

'देवा तुझा मी सोनार' गायक-रामदास कामत. अभंग-संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव. 

'तुझे रूप चित्ती राहो' गायक/संगीतकार-सुधीर फडके. 

चित्रपट-संत गोरा कुंभार. 

'अवघे गरजे पंढरपूर' गायक-प्रकाश घांग्रेकर/शौनक अभिषेकी.नाटक-संगीत संत गोरा कुंभार,संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी. (१९७४).

----------------------------------------------------------

दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी,दि.
२४/१२/२०२३


 

Friday, December 22, 2023

आठवणीतील-शब्द -स्वर (लेखांक २०)

             

           'तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
            तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी...'

     मराठी गझल गायकीच्या अगदी सुरवातीच्या, म्हणजे सुरेश भट आणि मी महाराष्ट्रभर फिरत असतानाच्या काळातील कार्यक्रमात गायिलेली '#जगलो_असाच_कसा_तरी' ही गझल  जुन्या जीर्ण  कॅसेटमध्ये सापडली.पण कॅसेट इतकी खराब झाली होती की, त्यातील फक्त शेवट कसातरी उतरवता आला. सुरेश भटांनी आग्रहाने ही गझल माझ्याकडून स्वरबद्ध करून घेऊन कार्यक्रमात गायला लावली होती. ही गझल कधी ते त्यांच्या पद्धतीने सादर करायचे, कधी मला गायला सांगायचे. त्या काळात दोन वा तीन माईकवर कार्यक्रम करावा लागायचा. ते पण दर्जेदार असतीलच असे नव्हते.त्या त्या साउंड सिस्टिमवाल्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार चांगले/वांगले असायचे. आमच्यासमोर ''मॉनिटर' पण नसायचे.
कार्यक्रमाची सगळी मदार साउंड सिस्टिमवाल्यावर असायची. रसिकांकडून दाद आली तर कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे असे समजायचे. कार्यकम चांगला वा वाईट करणे त्याच्या मर्जीवर असायचे.  
बिघडवायला तर भोंग्याने मारलेल्या दोन/चार शिट्ट्या सुद्धा पुरायच्या. सिस्टिमवल्याकडे जास्ती करून 'आहुजा' कंपनीचा एम्प्लिफायर,टेप रेकॉर्डर असायचे.हे सुद्धा साउंड सिस्टिमवाल्याने आहुजच्या डेकवर केलेले रेकॉर्डिंग आहे. प्रत एकदमच खराब आहे.तरी पण अनवट रागात कंपोझिशन
असल्यामुळे आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घ्यावी.ही विनंती.

सारंगी - मरहूम उस्ताद लतीफ अहमद खान
तबला - तालमणी प्रल्हाद माहुलकर

●headphone or earphone please...


 

Wednesday, December 20, 2023

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक १९) 'मान आणि धन'



     आम्हा कलावंतांच्या आयुष्यात मान आणि धनाचा संबंध, हातातोंडाच्या संबंधाइतका महत्त्वाचा असतो. त्यामुळे मानाचा आणि धनाचा व्यस्त प्रमाणातील अनुभव आमच्या पाचवीलाच पूजला असतो. कधी मान, कधी धन, तर कधी मानासह धन, तर कधी धनासह मान असे प्रकार घडत असल्यामुळे मान आणि धनापैकी किंवा दोन्हीही मिळाले तर 'पदरी पडले पवित्र झाले' असे समजून समाधान मानून घेतो.
     सरस्वती आणि लक्ष्मीचे वाकडे असून, ह्या दोघी एकत्र नांदत नाही, असे म्हणतात.पण सध्याच्या प्रतिथयश कलावंतांकड़े बघून हे पटत नाही. ज्या कलावंतांकडे लक्ष्मी व सरस्वती पाणी भरतात त्या कलावंतांना मानावेच लागते. खरे म्हणजे छोट्या-मोठ्या कलावंतांच्या बाबतीतच वरील उक्ती लागू पडते. कारण त्यांची सरस्वतीची आराधना सुरू असते. एकदा सरस्वती पावली की मग तिला बगल देऊन लक्ष्मीची आराधना सुरू करावी म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. पण सच्चा कलावंत ही गोष्ट मान्य करत नाही. त्यामुळे त्याला आयुष्यभर मानाचे आणि धनाचे गणित जुळवत बसावे लागते.
     खरा कलावंत तसा मानाचाच भुकेला असतो असे म्हणतात. प्रसिध्दी मिळणारा असेल तर पैशाचीही फिकीर न करणारा कलावंत नेहमीच आपण बघतो. त्यांच्या या प्रसिध्दीसाठी हपापलेपणाचा गैरफायदा घेऊन, नुसत्या मानाचा वर्षाव करून अनेक जण त्यांना बापरून घेतात व कलाकार मात्र अमक्या अमक्याच्या घरी बैठक झाली. अमक्या अमक्या गावात मैफल गाजवली या विश्वातच खूष असतो.
     जवळ-जवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी, मुंबईचा गझल गायनाचा कार्यक्रम आटोपल्यावर ठाण्याच्या माझ्या जिवलग मित्राकडे भेटायला गेलो. नाव आम्बेगावकर ! गेल्या गेल्या सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मित्राने मुक्कामाबद्दल विचारले. मी थांबणारच होतो. तसे त्याला सांगितल्यावर तो मासळी आणायला बाजारात निघून गेला. मी फ्रेश होऊन वहिनींशी गप्पा मारत बसलो तेवढ्यात मित्र आला व कार्यक्रम करणार का? असे विचारले. मला आढेवेढे घेण्याचे काहीच कारण नव्हते. होकार देऊन टाकला. रात्री तिथल्याच सी. के. पी. हॉलमध्ये मैफल जमवली. रंगली! रसिकांनाही भावली! कार्यक्रमानंतरचे चहापान व भरपूर मानसन्मान सोबत घेऊन आम्ही घरी आलो. आल्या आल्या मित्राने एक पाकीट माझ्या हातात ठेवले. पाकीट म्हणजे पैसे हे मला माहीत असल्यामुळे मी ते घेण्यास नकार दिला. कारण मित्राकडून अशा मैफिलीचे पैसे घेणे मला अजून जमले नाही. त्यावर मित्र म्हणाला, 'बाबा रे, हे पैसे मी देत नसून इथल्या रसिक मंडळींनी दिलेले मानधन आहे. कारण इकडे फुकटात कार्यक्रम बघण्याची किंवा ऐकण्याची प्रथा नाही. फूल ना फुलाची पाकळी, ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण देतोच. तेच हे पैसे आहेत!' मला आश्चर्य वाटले, कारण तिकीट असलेल्या कार्यक्रमात फुकट कसे घुसता येईल हे पाहणारे 'र-सिक' आमच्या पाहण्यात होते, त्यामुळे हा प्रकार म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. 
     दुसरा किस्सा पुलगावचा आहे. अगोदरच्या दिवशी राळेगावला (जि. यवतमाळ) कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जेवण व आराम करून पुलगावकडे (जि. वर्धा)  निघालो. पण यवतमाळला येईपर्यंत आमचे तबलजी तालमणी प्रल्हाद माहुलकर यांना सडकून ताप भरला. औषधपाणी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. म्हणून कार्यक्रम रद्द करण्यासंबंधी दूरध्वनी करावयाच्या बेतास आलो. पण तबलजीने 'थोडे बरे वाटत आहे, कार्यक्रम करूनच टाकू' असे म्हटल्यामुळे तडक गाडीत बसून पुलगावला गाठले. पोहोचल्याबरोबर आयोजक मंडळींनी हुज्जत घालायला सुरुवात केली. 'उशिरा आल्यामुळे कलेक्शन झाले नाही,' 'ही यायची वेळ आहे का? वगैरे वगैरे... मी त्यांना तबलजीच्या प्रकृतीविषयी सांगितले, पण ती मंडळी काहीच ऐकून न घेता हमरी-तुमरीवर यायला लागली. यावरून त्यांची नियत बिघडल्याचे माझ्या लक्षात आले. जास्ती वाद न घालता सरळ स्टेजवर गेलो व कार्यक्रम सुरू केला.अर्धे मानधन अनामत म्हणून घेतले होते,बाकी मिळण्याची आशा सोडली.व रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून कार्यक्रम पूर्ण करून निघून आलो.मराठी गझल गायनाचे कार्यक्रम करतानाचे हे अनुभव आहेत.सुरेश भट आणि मी त्या काळी महाराष्ट्रभर भटकंती करताना काय काय सोसले ते आम्हा दोघांनाच माहिती. आम्ही दोघे मिळून कार्यक्रम करीत होतो,तेव्हा मरठी गझल गायनाचे कार्यक्रम करणारा एकही कलाकार नव्हता. हे खरे सत्य आज नवरसिकांच्या पचनी पडत नाही ही दुःखाची बाब आहे.असो!
     तिसरा अनुभव आहे (हा किस्सा 'फिक्कर कराची नाय' या शिर्षकांतर्गत आपण वाचला आहे.तरी पण तीन ठिकाणची मानसिकता कळावी म्हणून येथे पुनश्च देत आहे.) यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा या लहानशा गावाचा. मान आणि धन दोन्हीचा वर्षाव करणारे हे गाव कायम लक्षात राहण्याचे कारण मानधन हे नसून, तिथली पध्दत व कार्यक्रमाची मजा हे होय. त्यावेळी मी भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजन ऑर्केस्ट्रामध्ये अॅकार्डीयन वाजवायचो. गणेशोत्सवात मोहद्याचा कार्यक्रम होता. ठरल्याप्रमाणे पोहोचल्याबरोबर नवरदेवाकडील पाहुणे असल्याप्रमाणे हातपाय धुवायला तांब्याच्या घंगाळात गरम पाणी, सुवासिक साबण, नवा कोरा टर्किशचा टॉवेल हा जामानिमा पाहून आश्चर्यचकित झालो. त्यानंतरचा चहा, फराळ, पान-सुपारी आटोपेपर्यंत रात्रीचे नऊ वाजले. म्हणून कार्यक्रम स्थळी जावे म्हणून आयोजकांना 'वाद्य वगैरे स्टेजवर न्यायचे का?' विचारले तर ते म्हणाले, 'फिक्चर करू नका! जेवणबिवण आटपू, मग कार्यक्रमाचा पाहू!' आयुष्यात पहिल्यांदा इतकी बिनफिकरी माणसे भेटल्याने काय बोलावे कळेना. मग विचार केला आयोजकांनाच काळजी नाही तर आपण तरी कशाला लोड घ्यावा ! आणि लोडाला टेकून मस्त ताणून दिली. थोड्याच वेळात जेवणाचे निमंत्रण आले. तोंडात विडा ठेवून घड्याळ बघतो तो अकरा वाजलेले. आता मात्र माझे पाच गेले व दहा राहिले. कार्यक्रमाचे कसे होईल, लोक येतील की नाही... आलेल्या लोकांनी धिंगाणा तर घातला नसेल ना? या काळजीने कोणालाही काही न विचारता सरळ स्टेजवर जाऊन बसलो. तेव्हा एका आयोजकाने खुलासा केला, 'राजे हो! आमच्या गावात दोन मंडळ हायंत. कार्यक्रमाचा गोंधळ होऊ नये म्हणून आम्ही पॅक केलं आहे. एक दिवस त्यांचा कार्यक्रम आगुदर असते अन् एक दिवस आमचा ! आज त्यायच्या कार्यक्रमाची बारी हाय! थे तिकडं कीर्तन आयकू येते ना! थे संपलं का आपला कार्यक्रम सुरू कराचा. तिथल्ले लोक इकडे येते! म्हून तुमाले सांगो का फिक्कर कराची न्हाई म्हून!'या प्रकारामुळे हसावे की रडावे कळेना, पण त्यांच्या 'पॅक'ची गंमत मनाला भावून गेली. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने जुने वैर काढून एकमेकांची डोकी फोडणारी मंडळी एकीकडे व मोहदावासियांनी केलेले 'पॅक' यातून आपण काय शिकावे, काय घ्यावे हे ठरवायला हरकत नाही. त्यांच्या पॅकमुळे आमचा कार्यक्रम रात्री बारा वाजता सुरू झाला. सकाळपर्यंत चालला. पण एक नवी परंपरा जोपासणाऱ्या गावकऱ्यांच्या आदरातिथ्यामुळे व नवी दिशा देण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला रात्रभराच्या जागरणाचेसुध्दा काहीच बाटले नाही. कार्यक्रमाच्या अगोदरचा मान व नंतरचे धन याहीपेक्षा महत्त्वाचे एकोपा व सामंजस्य याचे विचारधन घेऊन वापस आलो.

डावीकडे - तबला वादक प्रल्हाद माहुलकर.


 





संगीत आणि साहित्य :