गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 15, 2021

सुधाकरी तोडी...



     हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामधील दहा थाटात नसलेल्या सुरावटीत खालील गझल स्वरबद्ध झाली आहे.यात रिषभ,गांधार,निषाद कोमल असून मध्यम व धैवत स्वर वर्ज आहेत.गायला थोड्या कठीण असलेल्या या सुरावटीच्या बांधणीला मी "#सुधाकरी_तोडी" असे नाव दिले आहे.शास्त्रीय संगीतातील विद्वानांना हे कितपत मान्य होईल ते माहीत नाही.ते "बिलासखानी तोडी" स्वीकारतात पण #सुधाकरी_तोडी ?????? असो!

Monday, December 6, 2021

काळोखाच्या तपोवनातही प्रकाशाची वाट...



           मराठी साहित्यात आणि त्यातही गझलच्या प्रांतात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.ज्यांची शब्दसंपत्ती वाचकांना अंधाराच्या पायवाटे सोबत चालतांना प्रकाशाची उधळन करीत दिशा दाखवतील असा अनुभव सातत्याने मिळत राहतो.पुस्तक हाती पडल्यावर सुटत नाही असा सुधाकर कदम यांचा “ काळोखाच्या तपोवनातून ” हा गझल संग्रह वाचताना वाचकांना आत्मभान देत जातो. सुधाकर कदम हे अवघ्या महाराष्ट्राला गझल संगीतबध्द करणारे  संगीतकार म्हणून माहीत असले तरी ते शब्दाचे पूजक आणि साधक आहेत.त्यांनी गझल,कविता,विडंबनकार,गीतकार असा बराच प्रवास  केला आहे.त्यांचा हा संग्रह वाचतांना वाचकांना भावतरलता आणि त्याचवेळी त्यांचे जीवन चिंतनाचा अनुभव वाचायला मिळतो.
 माणस माणसांपासून वर्तमानात दूर जाता आहेत.माणसांची नाते सैल होता आहेत.नात्यातही व्यवहार पाहिला जातो आहे.स्वार्थाच्या बाजारातील बंध अधिक घटट होत  असल्याने नाते विरळ होता आहेत.याचे कारण ती नाती हदयांसी बांधली गेलेली नाही हे वर्तमानातील वास्तव आहे.आपण जेव्हा हदयाशी नाते सांगत बंध निर्माण करतो तेव्हा त्याचा अनुभव वेगळाच असतो.त्यातील अनुभूतीचा आंनदही अनुभवायला हवा आहे.ते  लिहितात...

 कधी कुणाला अपुल्या हदयी वसवून बघ ना
 अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना

खरेतर कविता,गझलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असताना अनेकदा कवी जीवन तत्वज्ञानाचे दर्शन घडवत असतो. अनेकदा समाजाचे वास्तव दर्शनही त्या शब्दांच्या माध्यमातून घडते . त्यासाठी कवी आपल्या जीवनाचे अनुभव,आपल्या भोवताल मध्ये जे काही दिसते तेही शब्दात नेमकेपणाने व्यक्त करीत वाचकांना आनंद आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडवितांना दिसतात. वरवरच्या सौंदर्यांच्याला भाळत लोक त्याचे कौतूक करतील पण ते सौंदर्य ज्या काटयावरती टिकून आहे त्या काटयांच्या वाटयालाही दुःख आहेच.समाज व्यवस्थेतही सत्याच्या वाटेने जाणा-याच्या वाटयाला काटयासारखी उपेक्षा येत असते.आपण शेर समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर बरेच काही उलगडत जाते.त्यामुळे आपल्या भोवतालमध्ये जे काही दिसते आहे ते खेदाने व्यक्त करताना म्हणतात...

 मिळती जरी फुलांना अगणित घरे सुखाची
 काटयास मात्र येथे कसलाच ना निवारा

गझल,कवितामधून प्रेम व्यक्त केले जाते. प्रत्येकाच्या तारूण्यात मनातील भावभावनांच्या  गंधीत आठवणी  असतातच.त्या काळात मनातील भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून  कविता आधार बनतात.तर वाचकांही तारूण्यातील प्रेमासाठी अनेकदा शेर उपयोगी पडत असतात. जीवन अनुभव घेऊन आपला प्रवास सुरू राहीला तर वय वाढत जाते पण मनातील भावना मात्र सतत ताज्या आणि टवटवीत असतात.त्या जुन्या आठवणीना आजही उजाळा देताना  कदम लिहितात...अर्थात हा अनुभव प्रत्येकाचाच असतो.आनंदाच्या आठवणी नेहमीच प्रसन्न असतात..

मनात माझ्या अजूनही तू तशीच आहे
फुलासारखी प्रसन्नताही अजून तशीच आहे..

माणसांच्या ढोंगीपणाचा कळसही आपल्या भोवतालमध्ये सातत्याने दिसत असतो.माणसं वरवर फारच देखावा करतात.वर्तनातील बाहय वर्तन बदलते .मात्र अंतरिक परीवर्तनाची कास असावी लागते ती हरवली जाते.माणसं बदलतात मात्र या बदलाने फार काही साधले जात नाही.अनेकदा भगवे वस्त्र अंगावर घेतले जात असले तरी वरून साधू बनता येईल पण त्या वस्त्राच्या आत असलेला त्याग आणि वैराग्य आतून यायला हवे असते.त्यामुळे वस्त्र परीधान करूनही भोगाची वृत्ती संपत नाही त्याबददल खंत समाजाला असतेच.असे सर्वच क्षेत्रात सुरू आहे..त्या देखाव्यावरती प्रहार करताना गाळ अंतरिच्या या गझलेत ते लिहितात..

 भगव्यास पांघरूनी वरतून शुध्द झालो.
 पण गाळ अंतरिचा तो राहिला बिचारा

माणसांचे जीवन खरेतर त्या एका नियती नावाच्या अनामिक शक्तीशी जोडलेले आहे.जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे हे संतानी वास्तव सांगितले आहेच.मात्र तरी जीवन रूपी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करावा लागतो.त्यातून सुटका करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यावर मात करणे होत नाही.जे संचिती असते ते भोगावेच लागते.कारण नियती जोखडून ठेवत असते..त्या संदर्भाने कवी लिहितात..

आयुष्याच्या चक्रव्यूहातून कधीच सुटका नसते.
नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारून बसते.

जीवनात दुःख सामावलेले आहे.ते दूर करण्याचा प्रयत्न सातत्याने माणसं करीत असतात.अशा परीस्थितीत वास्तवाचा स्वीकार करीत त्यावर मात करण्याची गरज आहे.मात्र या कालचक्रातील या वर्तूळात हे घडत राहाणार आहे त्याला आपण का भ्यावे ? त्याला सामोरे जाताना आपण अधिक आंनदाने प्रवास करायला हवा.त्याकरीता मानवी जीवनात हास्य हा महत्वाचा उपाय आहे.माणसांने सतत हसत रहावे आणि त्याच बरोबर इतरांना हास्य देत रहावे हे जीवनसूत्र पाळत गेलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात म्हणून कवी लिहितात.

 हासुनी हसवायचा हा मंत्र घे
 दुःख का कुरवाळतो तू सांग ना!

आपण जीवनात सुख दुःखाचा अनुभव घेत असतो.त्या अनुभवात हसणे आणि रडणे या नैसर्गिक क्रीया घडत असतात.खरेतर जीवनात कोणताही अनुभव आला तरी त्या परीस्थितीत आपले आपणच जगत असतो.हा सारा अनुभव आपला व्यक्तीगत असतो.त्यामुळे या काळात आपण स्वतःला समजावत दुःखाच्या काळात सुखाने फुलता यायला हवे.अर्थात आपण जीवनाकडे कसे पाहतो याला अधिक महत्व आहे.त्यामुळे वाचकांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलावे म्हणून ते म्हणतात 

हसूनी वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

जीवनात माणसांने आपला प्रवास कसा सुरू ठेवायचा यामागे प्रत्येकाचे असे काही तत्वज्ञान असू शकते.जीवन अनुभव भिन्न असले तरी अनेकदा दुःखावर मात करण्यासाठी असलेले मार्ग समान असू शकतात.त्या संदर्भाने कवी वाचकांना काही सांगू पाहता आहेत.त्याच बरोबर आपला अध्यात्मिक प्रवास हा देखील मुक्तीसाठी असतो.ती मुक्ती प्राप्त करण्यासाठी लोक कितीतरी विविध मार्गाने प्रयत्न करतात.मात्र कवी मुक्तीचा साधा सोपा उपाय सांगता आहेत.कवी त्यासाठी अभंग या प्रकारात उपदेश करतांना लिहितात

 दीन दुःखितांना / मदत जे करी
 तेणे मुक्ती चारी / साधलिया

माणसं जीवनभर आपला प्रवास सुरू ठेवताना तो सुखाचा व्हावा म्हणून  एका शक्तीमान असलेल्या निर्मिकाची प्रार्थना करीत असतात.ती प्रार्थना प्रत्येक धर्माची व्यक्ती करीत असते.आपला देव वेगळा असला तरी त्याचेकडे मागणे एकच आहे.ते मागणे जीवनशुध्दी आणि जीवनातील दुःख कमी करण्यासाठी असते.जीवनातील दुःखाचे मुळ कारण केवळ तृष्णा आहे हे कवीला माहित आहे.आपली जीवनातील तृष्णा संपली , की जीवनानंदाचा प्रवास सुरू होईल म्हणून ते अज्ञाताची हाक या कवितेत लिहितात..

 कोणाचिही करा / एकत्र प्रार्थना
 मिटवाया तृष्णा / निरागस

जीवनाच्या वास्तवाचे दर्शन अनेकदा काव्यातून वाचकांना होत असते.आपण जीवनभर आपले आपले असे करत जगतोच.स्वार्थाच्या पलिकडचा प्रवास तसा फारसा होत नाही.अशा परीस्थितीत आपण बरेच काही गमावत असतो.त्या गमविण्याची चिंता आयुष्याच्या शेवटी लागते.अशा परीस्थितीत जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जीवनाच्या वास्तवाचे दर्शन घडते.जीवनाचा प्रवास प्रत्येकाला एकटयालाच करायचा आहे.सोबत कोणीच नसते अखेरच्याक्षणी..मात्र ही जाणीव आयुष्यात होत नाही..जीवनाचे वास्तव दर्शित करताना कवी सांगू पाहाता आहेत.

 सरणावरती चढतो जेव्हा
 कोणी नसते त्याच्या पाठी

आपल्या भोवती जे काही दिसते त्याच्या वेदना साहित्यातून येण्याची गरज असते.साहित्य हे अनुभवाची मांडणी असते.त्या अनुभवाच्या शिवाय येणारे साहित्य हे वाचकांच्या अंतकरणाला स्पर्श करू शकणार नाही.मात्र अलिकडे साहित्यातही बरेच काही घडते आहे.साहित्यातील वास्तवाचे दर्शन ते घडवितात.आपण गरीबीच्या वेदना पोटभर आहार घेऊन मांडल्याने त्यातून त्या साहित्यातून फार काही परीवर्तन घडण्याची शक्यता नाही.अनुभव शुन्यतेची मांडणी समाज परीवर्तन करू शकणार नाही.ही जाणीव निर्मळ अंतकरणाच्या लेखकाला असते म्हणून कवी ती सल मांडताना लिहितात

 ए.सी.त बसोनी / शेतक-यावरी
 लिही कांदबरी / मुंबईत

माणसं ढोंगीपणाने वागत असतात ,त्या ढोंगीपणावर केलेला प्रहार अनेकदा वाचताना मिळतोच.समाजातील या वास्तवाचे निरिक्षण करीत असताना ,त्यांना काय म्हणावे  ? असे प्रश्न पडतो तेव्हा कवी अत्यंत सोप्या भाषेत त्याची उत्तरे देऊ पाहाता आहेत.उत्तम समाजाची निर्मिती हे प्रत्येक चांगल्या माणसांचे स्वप्न असते.त्या प्रवासात चांगली माणसं कोणती याची उत्तरे आपल्याला मिळत जातात..कवी काही माणसांची लक्षणे नमूद करतात..ते लिहितात..

 ज्याच्या तोंडामध्ये / तंबाखू नि बिडी
 तयासी पाखंडी / म्हणावे गा

व्यसनापासून मुक्त असलेला समाज हा नेहमीच चांगल्या समाजाचे लक्षण आहे.या कविता संग्रहात कधी गझल , कधी अंभग ,कधी  निव्वळ कविता अनुभवायला मिळते.शब्दाचा फुलोरा न करता जीवन तत्वज्ञानाचे दर्शन या संग्रहात घडते.अत्यंत सुक्ष्म निरिक्षणही आपल्याला अनुभवायला मिळते.संगीत साधनेने जीवनाला मिळालेला आंनदाचा मार्गही अनुभवता येतो.कविता संग्रह अत्यंत वाचनीय झाला आहे.कविता संग्रहाचे अविनाश वानखेडे यांचे मुखपृष्ठही वाचकांना चिंतन करण्यास भाग पाडते.
 कविता संग्रहाचे नाव- काळोखाच्या तपोवनातून
 कवी- सुधाकर कदम
 प्रकाशक-स्वयं प्रकाशन,सासवड,पुणे
 पाने-९६
किंमत-१५०
-संदीप वाकचौरे
----------------------------

◆ काळोखाच्या तपोवनातून
◆ कवी : गझलगंधर्व सुधाकर कदम
◆ प्रस्तावना : डॉ. राम पंडित 
◆ मुखपृष्ठ : डॉ. अविनाश वानखडे 
◆ प्रकाशक : स्वयं प्रकाशन मो. 8888769659

*प्रकाशन २४ डिसेंबर २०२१*
एस. एम. जोशी सभागृह, पुणे
सायं. ६.०० वा.

संग्रह मिळवण्यासाठी तपशील -
किंमत रु. १५० + टपालखर्च ५० 
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.
google pay - 8888858850


 

 

Pioneer gazal singer in marathi


वर्ष १९८१

     बँ.अंतुले मुख्यमंत्री असतांना,नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मा.रा.सु.गवई यांचे काँटेजवर एका भव्य शामियान्यात काव्य - संगीत मैफल सुरेश भटांनी आयोजित केली होती.मी चळवळीचा कार्यकर्ता असल्यामुळे गवई साहेबांच्या काँटेजवरच होतो.या मैफिलीत एक तरूण गायक मराठी गझला पेश करून उपस्थितांची दाद घेताना मी पाहिला.मैफिल अतिशय सुंदर झाली.कार्यक्रमानंतर अंतुले साहेबांचे हस्ते त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्याच प्रसंगी मा.जवाहरलालजी दर्डा यांनी त्या तरूण गायकाल मिठी मारुन ’हा आमच्या यवतमाळचीच नव्हे तर विदर्भाची शान आहे’ असे जाहीरपणे सांगितले. शामियान्याच्या एका कोप-यात उभे राहून हा सर्व सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला.हा तरूण गायक म्हणजे सुधाकर कदम होय. सुधाकर कदमांना मी सर्वप्रथम येथे पाहिले.यावेळी सुरेश भटांसोबत सावलीप्रमाणे वावरणारा एक तरुण होता.त्याचे नाव शाहिर सुरेशकुमार वैराळकर.

     त्या नंतर मा.शरद पवारांनी वर्धा या गावी १८ ते २० सप्टेंबर १९८१ ला भव्य शेतकरी मेळावा घेतला होता.तेथेही सुधाकर कदमांचा कार्यक्रम झाला.त्यात ’सूर्य केव्हाच आंधारला यार हो’ ही सुरेश भटाची गझल गाऊन समा बांधला होता.या प्रसंगी शरद पवार,पद्मसिंह पाटील,सुधाकरराव देशमुख,रावसाहेब वडनेरकर,सुरेश भट,ना.धो.महानोर,विट्ठल वाघ,प्रा.देविदास सोटे वगैरे मंडळी उपस्थित होती.

     त्या नंतर यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी दि.२७ व २८ मार्च १९८२ ला बाबुराव बागुल यांचे अध्यक्षतेखाली दलित साहित्य सम्मेलन झाले.याचे उद्घाटन म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाँ.सुरेंद्र बारलिंगे यांचे हस्ते झाले होते.तेथेही मी होतो.या साहित्य संम्मेलनात सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा रंगलेला कार्यक्रम मी स्वतः पाहिला.या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही कलाकार महाराष्ट्रात नव्हता.आणि जे कोणी करत असतील तो फुटकळ स्वरुपाचा प्रयत्न असावा.तसे नसते तर सुरेश भटांनी निश्चीतच या संदर्भात कोणाचा तरी उल्लेख केला असता.या कालावधीत औरंगाबादचे नाथ नेरळकरही आशालता करलगीकर यांना सोबत घेऊन हिमांशु कुळकर्णी यांच्या गझलांचे कार्यक्रम करीत असल्याचे दिसून येते.परंतू पुढे त्यांनी ते बंद केले.तरीही जर कोणी दावा करीत असेल तर त्याने लेखी पुरावे द्यावे.मी मरेपर्यंत त्याची गुलामी करीन.

     १९८१ मध्ये ’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले.१९८२ मध्ये ’गझलनवाज’उपाधी दिली.१९८३ मध्ये महाराष्ट्र जेसीजने ’Out Standing Young Person'हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले.गोंदिया येथे ३०/१०/१९८३ रोजी मा.छेदीलालजी गुप्ता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(जेसीजने दिलेल्या सन्मानपत्रात ’Pioneer in the introduction of MARATHI GAZALS'असा स्पष्ट उल्लेख आहे.) आता मला सांगा वरील सर्व मान-सन्मान सुधाकर कदमांना काहीच न करता मिळाले असतील काय ? या अगोदर ५/७ वर्षे तरी त्यांनी मराठी गझल गायकीसाठी मेहनत घेतली असेल ना ?

     मराठी गझल गायकीला तशी फार मोठी परंपरा नाही.जास्तीत जास्त ३५ वर्ष,फारच ओढाताण केली तर ४० वर्षे,बस्स ! तेही ओढून ताणूनच,त्यापलीकडे ही परंपरा जात नाही.त्यातही महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्रांचे लेखी पुरावे जर पाहिले तर हा काळ आणखी कमी होतो.आणि इतिहास लिहीतांना तोंडी माहितीपेक्षा लेखी माहितीला जास्ती महत्व असते.लेखी पुरावे आणि विविध संस्थांनी मराठी गझल गायकीतील योगदानाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचा विचार केला तर मराठी गझल गायकीची सुरवात सुधाकर कदम यांचे पासून झाल्याचे दिसून येते.सुरवातीच्या काळात सुरेश भट आणि सुधाकर कदम विदर्भात फिरले.नंतर मराठवाडा आणि शेवटी पश्चिम महाराष्ट्र.या वेळी कार्यक्रमाचे निवेदन कधी सुरेश भट तर कधी डाँ.सुरेशचंद्र नाडकर्णी करायचे.३/४ वर्षे महाराष्ट्रभर भ्रमंती केल्यानंतर "अशी गावी मराठी गझल" ह्या कार्यक्रमाची सांगता १५ जुलै १९८२ ला पुण्यात महाराष्ट्र परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात झाली.या कार्यक्रमाचे निवेदन स्वतः सुरेश भटांनी केले.प्रमूख उपस्थिती डाँ,सुरेशचंद्र नाडकर्णी यांची होती.आयोजक होते ग.वा.बेहरे (कार्याध्यक्ष) आणि राजेंद्र बनहट्टी (कार्यवाह).

यानंतर कदमांनी एकट्याने कार्यक्रम करणे सुरु केले

     .या कार्यक्रमाचे निवेदन आर्णीचे कवी कलीम खान करायचे.(काही कार्यक्रमांचे निवेदन प्रसिद्ध कवी प्रा.नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी सुद्धा केले) मध्यप्रदेशातील इंदूर येथील जाल सभागृहातील दि.२८ आँक्टोबर १९८९ चा कार्यक्रम या दोघांनी चांगलाच गाजवला.मराठी गझल गायनाचा मध्यप्रदेशातील हा पहिला वहिला कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध रंगकर्मी श्री बाबा डिके आणि अभिनेता चंदू पारखी उपस्थित होते.

"अशी गावी मराठी गझल" या कार्यकमावरील तत्कालीन विविध वर्तमानपत्रांच्या निवडक प्रतिक्रीया...

१) स्थानिक ’स्वरशोधक’ मंडळातर्फे यवतमाळचे सुधाकर कदम यांच्या मराठी गझल गायनाचा कार्यक्रम को-आँपरेटीव्ह बँकेच्या सभागृहात संपन्न झाला.सतत तीन तास पर्यंत बहुसंख्य रसिक या आगळ्या मैफिलीची खुमारी लुटत होते.स्वर आणि शब्दांची उत्कृष्ट सांगड घालून सादर केलेल्या गझला वर्धेच्या रसिकांच्या बराच काळ पर्यंत स्मरणात राहतील. ..............

●दै.नागपुर पत्रिका,११/४/१९८१


२) कोमल हळवी गझल श्री सुधाकर कदम त्यातल्या भावनेला फंकर घालीत हळुवारपणे फुलवितात.त्यातील शब्दांच्या मतितार्थाचे हुबेहुब चित्र रसिकांपुढे प्रकट करतात..............

●दै.लोकसत्ता,मुंबई.१४/७/१९८२


३) सुधाकर कदम याच्या गझल गायकीने,रसिक पुणेकरांना बेहद्द खूष केले.हा तरूण गायक प्रथमच पुण्यात आला,पुणेकरांनी त्याला प्रथमच ऐकले. आणि परस्परांच्या तल्लीनतेने साहित्य परिषदेच्या सभागृहाला श्रवण सुखाचे नवे लेणे अर्पण केले.सुधाकर कदम सुंदर गातात.त्यांच्या मधुर स्वरांना सारंगीची आणि तबल्याचीही सुरेख साथ लाभली होती.त्यामुळे आजचा कार्यक्रम चांगलाच रंगला............

●दै. तरूण भारत,पुणे.१६/७/१९८२.


४) सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी ’सा’ लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्स्फूर्तपणॆ स्वागत केले.आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका....गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दाच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझल गायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे............

.●सुभाष इनामदार, सा.लोकप्रभा,मुंबई.दि.१५ आँगष्ट १९८२.


५) सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदम यांचे स्वर यातून फुललेली गझल भावपूर्ण,अर्थपूर्ण आणि उत्कंठापूर्ण होती.गझल गायनाचा ढंग हा शब्दांना अधिक अर्थ देतो.गझलांचे जे वैशिष्ठ्य उत्कंठा वाढवून धक्का देणे-तो प्रकार सुधाकर कदम यांच्या गायकीत प्रामुख्याने दिसला........................... 

●दै.लोकसत्ता,२३/७/१९८२.


६) ’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही’ या गझलेचा प्रारंभच कदमांनी नजाकतीने केला.त्यातील ’नाही’ या शब्दावरील स्वरांचा हळुवारपणा सुखावुन गेला..............

●दै.केसरी,पुणे. दि.२५/७/१९८२.


७) मराठी गझल कशी गावी हे जाणून घ्यायचे असेल तर श्री सुधाकर कदमांची मैफल एकदा तरी ऐकावी.......... ●दै.सकाळ,पुणे.


८) गायकीतील फारसं कळो वा न कळो सुरेश भटांचे शब्द आणि सुधाकर कदमांचे स्वर एक वेगळं इंद्रधनुष्य घेऊन येतं.त्यांच्या मैफिलीत कधी चांदण्यांचे स्वर तर कधी स्वरांचे चांदणे होते.......................

●अनंत दीक्षित,दै.सकाळ,कोल्हापुर.६ जुलै १९८२


९) सुधाकर कदम यांनी उर्दू गझलप्रमाणे मराठी गझल कशा गायिल्या जातात याचे उत्कृष्ट दर्शन यावेळी रसिकांना करून दिले............

●दै.लोकमत,औरंगाबाद.३/३/१९८२


१०) Mr.Kadam's speciality is his throw of words coupled with exact modulations.His presentation is perfect & systematic wich at once impresses & touches................

●The Hitwad,Nagpur.23/4/1984


११) सुधाकर कदम की गायकी के अंदाज़ को समय समय पर दाद मिली...

●दै.नवभारत,नागपुर. ६ जुलाई १९८४


१२) कदाचित सुरेश भट यांच्या गझलची प्रकृती आणि सुधाकर कदम यांच्या आवाजाची जातकुळी एक असावी म्हणून सुरेश भटांच्या गझलमधील आत्मा सुधाकर कदम यांच्या आवाजाला गवसला असावा............

●दै.लोकमत,नागपुर.१३/७/१९८४


१३) मराठी गज़ले भी उर्दू की तरह सुमधूर होती है....................

●दै.चौथा संसार,इंदौर.२७/१२/१९८९


-मस्त कलंदर

१४.१०.२०११

Monday, October 4, 2021

श्रेष्ठ कलाकार,श्रेष्ठ माणूसही...दिलीप पांढरपट्टे




     सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.
माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.
(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)
     त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी
अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या
काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची मैफल कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या
त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.
     सुधाकरजी हे केवळ गायक व संगीतकार नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. 'फडे मधुर खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.
     'काट्यांची मखमल' आणि 'तुझ्यासाठीच मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.
     यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे 'तंत्र' ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा 
पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.
'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,
हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'
अशा भावनेने जगणारा हा कलंदर कलावंत आहे. 
म्हणून मला ते एक श्रेष्ठ कलाकार वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही!
---------------------------------------------------------------------
●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...


 

 

Thursday, August 26, 2021

गझल गायकीचा वारकरी...डॉ.किशोर सानप


      सुधाकर कदम, १३ नोव्हेंबर १९४९ रोजी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दोनोडा या खेडेगावी जन्मलेला एक उमदा गायक माणूस. बाप पांडुरंग, वारकऱ्याचं घराणं. खुद्द पांडुरंग बाप अनवट चालीत भजनं गात असे. गायनाचा पांडुरंगी गळा आणि वारकरी गायनाची परंपरा सुधाकरला बाळकडूच्या रूपातच मिळाली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावी संगीत शिक्षकाची नोकरी केली.
आर्णीसारख्या खेडेगावांतून महाराष्ट्राला आणि बृहन्महाराष्ट्रातल्या रसिकराजांवर गझल गायकीची मोहिनी घालणारा सुधाकर म्हणजे गझलनवाज, #गझलगंधर्व, गझलचा स्वरताज, सुधाकर गझल गायकीसाठी, आपलं अख्खं आयुष्य साधना, तपश्चर्या करून; गझलांना स्वरसाज देताना, धुंदीत आणि गुंगीतच जगला. रमला. खरंतर सुधाकरचा अवतार सुफियाना गायकालाच शोभणारा. चेहऱ्यावर कारुण्यभाव, जगातलं दुःख नष्ट व्हावं ही चिंता. मानेवर वाढवलेल्या केसांच्या बटांची शाही झालर, गहुवर्णी देहयष्टी. जणू आपल्याच धुंदीत गाणारा फकीर, आपल्याच मस्तीत आणि धुंदीत जगला आणि रमलाही. खरंतर सुधाकर म्हणजे, गझल गायकीचा वारकरीच. अजूनही त्याचा रियाज, गायकी आणि गायकीची वारी थांबलेली नाही.

     गायन हा सुधाकरचा श्वास आहे. प्राण आहे. आत्मा आहे. गझलेच्या देहातला श्वास, आत्मा गायनाच्या स्वरानं उजागर करण्याच्याच साधनेत रत असलेला हा कलावंत आहे. म्हणूनच कवी सुरेश भट, संगीतकार यशवंत देव, राम पंडीत, पत्रकार अनंत दीक्षित, कवी श्रीकृष्ण राऊत आदिंसह सर्वदूर रसिकांनीही सुधाकर कदमच्या गझल गायकीला हृदयात अढळ स्थान दिलं आहे. #आद्य_मराठी_गझल_गायक आणि #गझलनवाज म्हणून समाजानं त्याचा गौरवही केला आहे.

     सन १९७५ पासून तर आजतागायत सुधाकर कायम गझल गायकीचा रियाझ करीतच आहे. '#अशी_गावी_मराठी_गझल' या गझल गायनाचे शेकडो धुंद करणारे कार्यक्रम सुधाकरनं आजवर केले आहेत. खुद्द सुरेश भटांनी सुधाकरच्या गझल गायन कार्यक्रमात गझलांचं निवेदन केलं आहे. सुरेश भटांनी गझलेला शब्द दिला. मराठीत गझल अजरामर केली. सुरेश भटांच्याही आधी माधवराव पटवर्धनांनी गज्जलांजली (१९३५) पहिल्यांदा मराठीत आणली. पुढे मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकरांसह अनेक दिग्गज कवींनीही गझलचा प्रभाव लक्षात घेऊन गझल लेखनात उमेदवारी केली. परंतु मराठी रसिकांच्या हृदयावर साम्राज्य केले ते गझलसम्राट सुरेश भट आणि गझलराज कवी श्रीकृष्ण राऊत यांच्या हृदयस्पर्शी गझलांनीच. मराठी गझलला लोकप्रिय आणि रसिकमान्य करण्यात या दोन्ही कवींचं योगदान अनन्यसाधारण आहे. गझलेला दिलेल्या शब्दांना अस्सल स्वरांची गायकी दिली ती #आद्य_मराठी_गझल_गायक सुधाकर कदम यांनी.

     सुरेश भटांची गझल आणि सुधाकरची गायकी, असा दीर्घ प्रवास विसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकात झालेला आहे. विशेष म्हणजे गझलसम्राट विदर्भपुत्र सुरेश भटांनी गझलेला दिलेल्या शब्दांना स्वरांचा साज चढविण्याचे महत्कार्य विदर्भपुत्र सुधाकर कदमांनीच सुरुवातीच्या काळात केले. सुरेश भटांच्या लोकप्रियतेला सुधाकरनं स्वरांची सलामी दिली. गझल गायकीत सुधाकरने आपले अनन्यसाधारण स्थानही कमावले. मराठी गझल गायकीची सन १९७५ पासूनच सुरूवात करून मराठी गझल गायकीला भूमीही उपलब्ध करून दिली. पुढे विदर्भातील अकोल्याचे गझलनवाज भीमराव पांचाळेनी गझल गायकीत सर्वदूर चार चांद लावले. याच पाऊलवाटेवर राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार, माधव भागवत, रफिक शेख यांनीही गझल गायन क्षेत्रांत गायकी विकसित केली आहे. सुधाकरनं मराठी गझल गायकीची वहिवाट निर्माण केली, हे त्याचे योगदान मराठी गझल गायन क्षेत्रांत अलौकिक मानायला हरकत नाही.

     खुद्द सुधाकर गझल गायनाबाबत म्हणतो, गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकारांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या सुरावटी तयार कराव्या लागतात. संगीत हे केवळ तंत्र नसून अंतर्मनातून स्फुरणारी ती एक शक्ती असून ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. मात्र त्यासाठी
तपश्चर्या करणे आवश्यक असते. कोणतीही कलासिध्दी अंत:करणाला पिळवटून निष्काम साधनेनंच प्राप्त करता येतं. खरंतर कलासाधना ही मुळात ईश्वराचीच भक्ती असते.सुधाकर कलेला ईश्वरप्राप्तीचे साधन मानतो. खरेतर कलेला ईश्वररूप मानणारा हा कलावंत कलेश्वराचाच भक्त आहे. कलेच्या भक्तीतूनच तो कलेचे अद्वैत साध्य करतो.सुधाकरला कलेचे अद्वैत साधले आहे. कलेच्या भक्तीतून गायकीच्या मुक्तीकडे त्याने
आजवर प्रवास केला आहे.

     कलेला पांडुरंग मानणारा हा स्वरांचा वारकरी आहे. पांडुरंगपुत्र आहे. सुधाकरला पांडुरंगानंच जन्म दिला. ज्याचा बापच पांडुरंग, त्याच्या कलाभक्तीला कोण अवरोध करणार? स्वरांचा सुधा-कर कलेचं दैवत पांडुरंगाची भक्ती करतो. गझल गायकीचं पंढरपूर निर्माण करणारा सुधाकर गझलेच्या पांडुरंगाचा निस्सिम वारकरी आहे. केला अभिमान पावठणी, ही वृत्ती अंगी बाणल्यामुळे कमालीची नम्रता, लिनता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देताना दिसते. कलावंताला अभिमानच पचवता येत नाही. अभिमान सोडून बाकीचं सर्वकाही पचवता येतं. सुधाकर कदम हा कलावंतांचं मानबिंदू तर आहेच, परंतु कलासाधक म्हणून तो आजवर जगत आला. जगत राहील यावरही विश्वास आहे..

     कलावंताला पूर्णत्वाचा ध्यास असतो. पावठणी तुडविल्याशिवाय कोणताही कलावंत कलेच्या पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही, सुधाकर कलावंत आणि कलासाधक म्हणून कलेला,

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । 
कर कटावर ठेवोनिया ||

     मानूनच एकाग्रचित्तानं स्वरांची नवनवोन्मेषशाली निर्मिती करतो. शब्दांचे अर्थविश्व स्वरांच्याच नजाकतीतून उलगडून दाखविण्यासाठीही तो कायम साधनारत असतो. सुधाकर कलेला पांडुरंग मानतो.

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार |
मज विश्वंभर बोलवितो ॥

किंवा

माझे सर्व भांडवल ।
बोलविले बोल पांडुरंगे ।।

     असंच मानतो. म्हणूनच, कलेचे अद्वैत किंवा कलेच्या पूर्णत्वाला पोहोचण्याची कलासाधकाच्या मुक्तीची वाट त्याला सापडली आहे. सुधाकर गायन कलेचा वारकरी आहे. कलामुक्तीच्या परमोच्च वाटेवरून प्रवास करणारा अस्सल कलासाधक आहे.

     सन १९८० ते १९८३ या चार वर्षात सुधाकर कदम आणि कवी सुरेश भटांनी 'अशी गावी मराठी गझल' हा तीन तासांचा गझल गायनाचा कार्यक्रम पहिल्यांदा सुरू करून सर्वदूर लोकप्रिय केला. संगीतकार यशवंत देव यांनी आणि अनेक गझलकार, कवी, पत्रकार, चाहत्यांनी सुधाकरचा गौरवही केला. सन १९८१ मध्ये गझल गायनाची पहिलीवहिली ध्वनिफित भरारी या नावानं आली. सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, सतीश डुंबरे यांच्या गझलांना नव्यानव्या चाली आणि स्वरांजली देऊनच; अणूरेणू या थोकडा, सुधाकर आकाशाएवढा अशी भरारी सुधाकरनं संगीत आणि गायन क्षेत्रात घेतली. सुधाकरनं अनेकांच्या गझलांना स्वतःच्या चाली दिल्या. स्वयंभू स्वरही दिले. बहुतांश सुधाकरनं सुरेश भटांच्या गझलांना मात्र स्वरसाज चढविला. मराठीत ताकदीनं गझल लिहिणाच्या श्रीकृष्ण राऊतांच्याही गझलांना स्वर आणि आवाज दिला. कवीच्या शब्दांच्या खोलीत दडलेला आशय आणि अर्थाना, सुधाकरनं गायकीतून उजागर केले. कवीच्या शब्दतळाशी जाणे सोपे नव्हते. सुधाकर कवींच्या शब्दतळाशीच नव्हे तर शब्दडोहापर्यंत पोहून येतो. नंतरच तो शब्दांना स्वर आणि सांगितिक रचनांचा ईश्वरी सांजशृंगार चढवून रसिकांसमोर सादर करतो. मंत्रमुग्ध होणे कसे असते? हे सुधाकरच्या गझल गायकीने मैफिलींनी मराठी रसिकांना शिकविले. सुधाकर हा गझलेच्या सुरांनी संबंध परिसराला रोमांचित करणारा आणि मंत्रमुग्ध करणारा कलावंत आहे.

     सुधाकर कदम गेल्या चाळीस वर्षांपासून अथकपणे जीवाची आणि तब्यतेची पर्वा न करता कलासाधना करीतच आहे. नव्या चाली आणि नवे सूर देण्याची त्यांची तळमळ अस्सल असते. सुधाकरच्या गायकीचा आजवर मोठा गौरवही झाला आहे. स्वरराज छोट्या गंधर्वांनी सन १९७५ मध्येच, मराठी गझल गायकीच्या नवीन वाटेचा वाटसरू संबोधून चाळीस वर्षांपूर्वीच सुधाकरचं कलावंतपण उमेदीतच भक्कम मानलं होतं. पंडित जितेंद्री अभिषेकींनी, सुधाकरच्या सातत्य आणि परिश्रमपूर्वक कलासाधनेला यशाची गुरुकिल्ली मानली. गझलसम्राट कवी सुरेश भटांनी सन १९८१-८२ मध्येच सुधाकरला 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' आणि 'गझलनवाज' ह्या मौलिक उपाधींनी गौरविले. गजानन वाटवेंनी, 'मला आवडलेला गझलिया', तर डॉ. यु. म. पठाणांनी, 'मराठी गझलेस स्वरसाज चढविणारा कलावंत' म्हटले. मा. सुधाकरराव नाईकांनी, 'शब्दस्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार' म्हणून गौरव केला. समाजाच्या आणि संस्कृतीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सुधाकरच्या गझल गायकीचा आजवर गौरवच केला आहे.

     सन १९८३ ते आजतागायता सुधाकरला अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवांकित केले गेले. समाजगौरव पुरस्कार, संगीतभूषण पुरस्कार, मॅन ऑफ दि इअर, आऊटस्टँडिंग यंग पर्सन, कलादूत, कलावंत, शान-ए-गझल, गझलगंधर्व, गझल गंगेच्या तटावर, भट गझल पुरस्कार, महाकवी संतश्री विष्णुदास पुरस्कार. सुधाकरचे म्युझिक अल्बमही दरम्यानच्या काळात गाजले. खपलेही. भरारी (मराठी गझलांचा पहिला अल्बम), झुला (पाठ्यपुस्तकातील कविता), अर्चना (भक्तिगीत), खूप मजा करू (बालगीतं), काट्यांची मखमल (मराठी गझल) तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी गीतांची स्वरलिपी, फडे मधुर खावया (विविध विषयांवरील ललित लेखसंग्रह) ही पुस्तकेही सुधाकरच्या कलासाधना आणि कलालेखणीतून साकार झाली आहेत.

     गौरवानं धुंद होण्यापेक्षा सुधाकरला कलासाधनेतच धुंद होता आलं. गौरव आणि मानसन्मानांनी सुधाकर मोहरला नाही. उलट सुधाकरचे स्वर अधिक मोहरले. कलावंताला गौरवानं मोहरण्यापेक्षा कलेतच अधिकाधिक मोहरता-फुलता-बहरता आलं पाहिजे. सुधाकरला हे जमलं. सुधाकरला कलेची वारी करणारा वारकरी होणं जमलं. खूप कलावंतांना कलावंत तर होता येतं. परंतु कलेचा वारकरी होणं नाहीच जमत. सुधाकर याही अंगाने स्वतःचं वेगळेपण जपत आला आहे. कलेशी कुठलीही तडजोड त्याने केली नाही. कलावंत म्हणून तो कधी याचक बनला नाही. सुधाकर कलासाधकच बनला. कलावंतांच्या तडजोडी कायम नाकारत कलेच्या धुंदीत, गुंगीतच आपल्या स्वरांचं अस्सल इमान त्याला एकाकीपणातही जपता आलं. इमान जपणारा कलावंत आजच्या मानसन्मानासाठी हपापलेल्या कलावंतांच्या जगात शोधूनही कुणी सापडत नाही. सुधाकर त्याला अपवाद आहे.

      सुधाकर हा जसा एक लोकप्रिय गायक आणि कलावंत आहे. तसाच तो अत्यंत हळवा.. संवेदनशील, कनवाळू माणूसही आहे. बरेचदा कलावंतांना आपलं माणूसपणच टिकवता येत नाही. कला आणि अहंकार टिकविता टिकविता माणूसपण केव्हा गळून पडले, हेही कळत नाही. सुधाकरने माणूसपणही टिकविल. माणूस म्हणून कुटुंबावर-समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटूंबावर समाजातल्या कुटुंबियांवर मित्रांच्या कुटुंबावर अगाध प्रेम केलं. या माणसाला कधी राग येतो का? कधी अहंकार जागा होतो का? कधी हा कलेचं मार्केटिंग करू शकतो का? असे अनेक प्रश्न आम्हा मित्रमंडळीत कायम उपस्थित होतात. अस्सल वैदर्भिय वऱ्हाडी बोलीतून, काय गड्या किती दिवसांनी तुला भेटता आलं? अशी सुरूवात करणार. समाजातल्या सर्वच स्तरांतल्या लोकांशी जवळीक साधून, सुधाकर असंच अघळपघळ बोलून, गळ्यात हात टाकणार. पाठीवर शाबासकी देणार. सर्व बिरूदे विसरून प्रेम करणे सुधाकरला जमले.

     सुधाकर म्हणजे बोलघेवडा. पटकन् लहान मुलासारखा घरात विरघळून जाणार.. लेकराबाळांसह सर्वांशीच युगायुगाचे नाते मानून बोलणार. सुधाकरच्या अंत:करणात एक कुटुंबवत्सल माणूस आणि निरामय प्रेम करणारा सहोदर मित्र दडलेला आहे. जिवघेण्या आजारातून परतल्यावर तो गंमतीनेच मृत्यूच्या दाढेने काबूत घेतल्यावर आपण कसे मृत्यूशी झुंजलो आणि मृत्यूला पराभूत करून मित्रांना भेटायला आलो, हेही सांगणार. सुधाकर कदम म्हणजे एक आनंद. आनंदाचे डोह, आनंदाची पर्वणी, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. सुधाकरच्या मुली, पत्नी, निषादही सुधाकरचेच शोभणारे वत्सल आणि प्रेमळ रूप. सबंध महाराष्ट्रातच सुधाकरचे मैत्रमंडळ. जेथे जातो तेथे तूच माझा सांगाती, हीच वृत्ती सुधाकरला जगण्याची ऊर्जा देणारी आहे.

     सुधाकरने गझल गायनाची सार्वजनिक सुरूवात सन १९७५ नंतर केली. सन १९८० ते १९९० पर्यंत सुधाकर गझल गायक म्हणून गझलनवाज, शान-ए-ग़ज़ल बनला. सन १९९० नंतर गझल गायनाच्या क्षेत्रांत अन्यही अनेक कलावंत उमेदवारी करू लागले. सुधाकरला उमेदवारी करण्याची आणि टिकविण्याची गरजच नव्हती. सुधाकर तर मराठी गझलांना स्वरसाज देणारा आद्य अभिजात कलावंत माणूस. गझलांना चाली, ताल, लय, अर्थघनता, नवस्वर देणारा स्वरसम्राट. गायकाच्या जातकुळीत जन्मून, कलेची वारी करणारा पांडुरंगमय कलासाधक. कलेचा वारकरी जेव्हा कलासाधनेतून पांडुरंगमय होतो, तेव्हाच कला आणि कलावंताचं अद्वैत साकार होते. कोणत्याही कलावंताचं अंतिम ध्येय कलेच्या मुक्तीचा आनंद अनुभवणे असते.

आनंदाचे डोही आनंद तरंग । 
आनंदचि अंग आनंदाचे ॥
काय सांगो झाले काहीचियेबाही ।
आता पुढे चाली नाही आवडीने ॥ 

     या अद्वैतानंदाच्या स्थितीत कलासाधनेचा आनंद लुटणे, हे परमभाग्य ज्याला मिळाले, त्या कलावंताचे नाव आहे, गझलनवाज, गझलगंधर्व, गझलस्वरताज, गझलगायक सुधाकर कदम. कलेचा परम वारकरी. गझल गायकीचाही पांडुरंगमय पांडुरंगपुत्र सुधाकर कदम.
------------------------------------------------------------------

*डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी  मधून...


 

 

Wednesday, August 25, 2021

पत्र...सुरेश भटांचे.

.      सुरेश भट आर्णीला माझेकडे आले की 'रिलॅक्स' व्हायचे.छान मूड लागायचा व गझला लिहायचे... 
१९८० च्या त्यांच्या खालील पत्रावरून कळेलच...
------------------------------------------------------------------
प्रिय सुधाकरराव,
दि.१६ रोजी सायंकाळी साडेचारला सुखरूप पोहोचलो.घरी पोचताच मुलगा परत आल्याचे कळले.फार मोठे दडपण नाहीसे झाले.
मी दि.२१ ला नागपूर सोडत असून चंद्रपूर व मूल 
आटोपून दि.२९ ला परत येईन.
     तुमच्या घरी तुम्ही सर्वांनी  मला फारच आराम दिला.सौ.सुलभाने माझी फारच सेवा केली.असह्य मानसिक दडपण असताना मी कसातरी दिवस काढत होतो.हे दडपण काही अंशी तुमच्या घरी हलके झाले.
जानेवारी महिनाही दौऱ्याचा आहे.२९ व ३० डिसेंबरला नागपूरमध्ये आहे.
     खूप तयारी करा.मुलांना आशीर्वाद.शेखरला (त्या वेळचा तबला वादक) नमस्कार.

तुमचा 
सुरेश भट
---------------
*मानसिक दडपणातून मुक्त झाल्याबरोबर मूल येथे झालेली 'हूल' ही गझल स्वरबद्ध करण्यासाठी पोस्टाने आर्णीला पाठवली होती. ती पण खाली  दिली आहे.



 





संगीत आणि साहित्य :