गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, March 21, 2026

जगत मी आलो असा (लेखांक २१)


                                 ●पैलू

     कवी/कवयित्री/म्हणजे शब्दरूपी कोळशाच्या खाणीचे मालक/मालकीण. या खाणीतून ते काव्य रुपी हिरा बाहेर काढतात. संगीतकार या हिऱ्याला पैलू पाडून चमकदार बनवतो.आणि संगीत संयोजक आकर्षक असे स्वरांचे कोंदण तयार करून पैलू पडलेल्या काव्यरूपी हिऱ्याला अधिक आकर्षक करतो.ह्या तिघांचे समसमा योगदान असले तर एकूण काम उच्च दर्जाचे होते.एक जरी कमी पडला तर त्याचा दर्जा कमी झाल्याचे दिसून येते.हे आपण हिंदी,मराठी चित्रपट गीते,गझल,भावगीते,नाट्यगीते,भक्तिगीते ऐकताना नेहमी अनुभवतो.काही गीतांचे शब्द सुंदर असतात पण सुरावट चांगली नसते.काही सुरावटी सुंदर असतात पण शब्द इतके चांगले नसतात.तर काही वेळा हे दोन्ही चांगले असले नि संगीत संयोजन चांगले नसले तरी त्या गाण्याची प्रत कमी झालेली दिसते.

       आपलेही तसेच आहे.जन्म झाल्यावर आई,वडील आणि गुरू आपल्याला पैलू पाडण्याचे काम करतात. आपल्यातील कला-गुणांची कदर करणारा योग्य संयोजक जर भेटला तर आपलेही जीवन आनंदी बनून सुकर होते.हे सूत्र सर्व क्षेत्रातील लोकांना लागू आहे.त्यासाठी माणसातील हिऱ्याला आपण हिरा आहो हे कळायला हवे.अथवा त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी.तसेच पैलू पाडत असतानाच्या वेदना सहन करण्याची शक्ती त्याच्यात हवी.तरच तो चमकदार बनतो. त्यांनतर कोंदणाचा प्रश्न येतो.आणि हाच प्रश्न आयुष्यात महत्वाचा ठरतो.

      अनेकदा खाणीतील हिऱ्याला पैलू न पाडल्या गेल्यामुळे आयुष्यभर कोळसा म्हणूनच आयुष्य काढण्याचे वाटयाला आल्याचेही दिसून येते. याला काय म्हणावे ?


हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे

असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे


कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे

खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे


सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे

पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे


मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या

म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे


हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही

कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे


-सुधाकर कदम

8888858850

दैनिक विदर्भ मतदार,रविवार पुरवणी.दि.२२/३/२०२६

No comments:





संगीत आणि साहित्य :