गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Sunday, April 10, 2022

मराठी गझल व सुधाकर कदम...प्रा.अशोक राणा



   गझल हा फारसी प्रकार माधव ज्युलियनांनी मराठीत आणला.त्याला मराठमोळे रूप दिले ते सुरेश भटांनी आणि मराठी गझल कशी गावी हे शिकवले सुधाकर कदम यांनी. #अशी_गावी_मराठी_गझल या शीर्षकाखाली महाराष्ट्रभर गझलगायनाचे कार्यक्रम करून गझल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय त्यांना जाते.या कार्यक्रमात कविवर्य सुरेश भटांनी निवेदन करून त्यांच्या ऐतिहासिक कार्यावर शिक्कामोर्तब केले. 

     असा हा लोकविलक्षण गायक व संगीतकार . माझा मित्र आहे याचा मला अभिमान आहे . त्याची प्रारंभीची वाटचाल मी पाहिली आहे . त्याचबरोबर या क्षेत्रावर आपला ठसा उमटविण्याकरता त्याने केलेला संघर्ष व त्यात त्याची ससेहोलपटसुध्दा मी जवळून अनुभवली । 

     यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या सध्याच्या तालुक्याच्या गावी ( तालुका पण खूप नंतर झाला. ) संगीत शिक्षक म्हणून सुधाकर कदम यांनी आपल्या कामगिरीचा प्रारंभ केला .( त्याअगोदर यवतमाळच्या भाग्योदय कला मंडळात वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी गायक , वादक व संगीतकार म्हणून १० वर्षे काम केले होते . ) विदयार्थ्यांपर्यंत संगीत कलेतील सौंदर्य व लय पोचविण्यात त्यांनी आपले सारे कसब पणाला लावले . पाठ्यपुस्तकातील कवितांना चाली लावून त्याचे गायन शाळा - शाळांमधून केले . पुढे त्याच्या कॅसेट्स महाराष्ट्रत लोकप्रिय झाल्यात . वडील वारकरी संप्रदायाचे गायक असल्यामुळे सुधाकरवर बालपणीच संगीताचे संस्कार झाले होते . वारकरी संप्रदायातील सर्वसमावेशकतेचा वारसाही त्याला लाभला . त्याचा खरा लाभ आर्णीच्या श्री महंत दत्तराम भारती विद्यालयाच्या विदयार्थ्यांना झाला . ते विदयार्थी धन्य होत , ज्यांना सुधाकर कदमांसारखा गुरू लाभला . 

     यवतमाळच्या समर्थवाडीत सुधाकरचे घर होते . मी यवतमाळ येथील हिंदी हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून १९७९ मध्ये रुजू झालो . याच शाळेत संगीत शिक्षक पदावर विनायक भिसे कार्यरत होते . दोघेही कलाशिक्षक असल्यामुळे बहुतांश प्रसंगी दोघांवर सारख्याच जबाबदाऱ्या यायच्या . त्यामुळे आमची दोघांची गट्टी जमली . पदवी परीक्षेसाठी मी संगीत विषय घेतल्यामुळे मला अमोलचंद महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला . या महाविद्यालयात प्रा . पुरुषोत्तमराव कासलीकर हे विभाग प्रमुख होते . त्यांच्याकडे माझे संगीत शिक्षण सुरू झाले . तेथेच माझा परिचय सुधाकर कदमांशी झाला . 

     यवतमाळ हे कलारसिकांचे गाव आहे . तेथील काही संगीत प्रेमींकडे गाण्याच्या मैफिली नेहमीच होत . तेथे भिसेंसोबत तानपुरा संगत करायला मी जात असे . तेथे सुधाकर कदम यांचेही गायन हमखास होत असे . भिसे व सुधाकर हे दोघेही कासलीकर गुरुजींचे शिष्य होते.त्यामुळे कासलीकरांनी आयोजित केलेल्या समारंभामध्ये सुधाकरचीही हजेरी राही.वर्षातून एकदा संगीत महोत्सवाचे आयोजन कासलीकर गुरुजी अमोलकचंद महाविदयालयात करीत असत .त्यात विदर्भातील नामवंत कलाकार आपली कला सादर करीत असत.अशाच एका महोत्सवात सुधाकर कदम यांनी #संतूर_वादन केले. .त्याचे रेखाचित्र पेन्सिलने रेखाटले होते . त्यापूर्वी पं . शिवकुमार शर्मा यांचे हुबेहूब रेखाचित्र काढल्याबद्दल मला शाबासकी मिळाली होती.संतूर वादनात मार्गदर्शन न मिळाल्यामुळे पुढे सुधाकरने  फारशी मजल मारली नाही . त्याचा बराचसा काळ विविध कलांशी आपले नाते सांगण्यातच गेला. एक हरहुन्नरी कलावंत व मनमिळावू शिक्षक अशी ओळख करवून देण्यात भरपूर मेहनत केली . अनेक नव - नव्या कवींच्या रचना गाऊन त्याने कवींचा स्नेह संपादन केला . त्यात भर पडली ती एका प्रस्थापित कवीची व ते म्हणजे सुरेश भट . 

      सुरेश भटांच्या कविता सुमन कल्याणपूर , लता मंगेशकर , आशा भोसले , सुरेश वाडकर , अरुण दाते , वगैरे गायकांनी गायिल्या होत्या . त्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती . गझल हा फारसी काव्यप्रकार मराठमोळेपणात घोळवून त्यांनी मराठी गझलकार म्हणून ख्याती प्राप्त केली होती . त्यांचे हे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न तत्कालिन अनेक प्रस्थापित कवींनी करून पाहिला . पण त्यांना यात यश मिळाले नाही . या काव्यप्रकारावर आपली पकड कायम राहावी याकरीता सुरेश भट सतत सावधगिरी बाळगून खूप मेहनत घ्यायचे . त्यांनी काही वृत्तपत्रांमध्ये सदरे लिहून गझल कशी लिहावी याचे धडे नवकवींना दिलेत . ' गझलेची बाराखडी ' या नावाने त्यांनी अनेकांना दस्तावेज पाठविला . एक चळवळ म्हणून सुरेश भटांनी सातत्याने हा उपक्रम राबविला . मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयामध्ये बी . ए . भाग २ मध्ये असताना सुरेश भटांचा ' रंग माझा वेगळा ' हा काव्यसंग्रह मराठी कला साहित्य या प्रश्नपत्रिकेसाठी नेमलेला होता . तो विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे एका वहीत त्यातील सर्व कविता मी लिहून काढल्या . त्यांच्या अनुकरणातून मीही गझला लिहिल्यात . त्या कुणी तरी गाव्यात म्हणून मी गायकाच्या शोधात होतो . सुधाकर कदम माझी गझल केव्हा तरी गायील अशी आशा मला होती . पण त्याला माझ्या गझला दाखविण्याचे धाडस मला झाले नाही . 

      पुढे सुरेश भटांचा व सुधाकर कदमांचा परिचय झाला . जवळीक वाढली . एकमेकांकडे येणेजाणे सुरू झाले . सुरेश भटांच्या गझला सुधाकरने स्वरबध्द करून कार्यक्रमांमधून व आकाशवाणीवरून गायला सुरुवात केली . अशा प्रकारे सुरेश भट व सुधाकर कदम हे समीकरणच बनले . यातूनच ' #अशी_गावी_मराठी_गझल ' या कार्यक्रमाची निर्मिती झाली . आपल्या आवाजात सुरेश भटांच्या गझला अल्बमच्या रूपाने रसिकांपुढे येतील अशी आशा सुधाकरला असावी व तसे ते स्वाभाविकही होते . कारण की सुरेश भटांनी तसे आश्वासन त्यांना दिल्याचे माझ्या ऐकिवात होते.

     सुरेश भटांचा ' एल्गार ' हा संग्रह त्याच्या सामाजिक आशयातील गझलांमुळे आगळावेगळा ठरला . त्यातील बहुतांश गझलांची निर्मिती सुधाकर कदमांच्या आर्णी येथील निवासस्थानी झाली होती . त्यावेळी ते वर्षातील अनेक दिवस , आठवडे आर्णीला राहत असल्याचे माझ्या काही मित्रांनी मला सांगितले . सुरेश भटांना एक दिवस सांभाळणे हे एक आव्हानच असायचे हे त्यांच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे . या पार्श्वभूमीवर सुधाकर कदम यांची किती दमछाक झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी . 

      सुधाकर कदम यांच्या तपश्चर्येला जे अपेक्षित फळ यायला हवे होते तसे मात्र आले नाही . अर्थात सुरेश भटांच्या गझला कॅसेटच्या रूपात रसिकांपर्यंत पोचल्या नाहीत . कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक , प्रत्यक्ष गझल रेकॉर्ड झाल्या त्या अरुण दाते , सुरेश वाडकर ,
इ . पुरुषांच्या आवाजात . एक स्वप्न भंगले . या अनुभवातून सुधाकर जाताना मी पाहिला . म्हणून काही अप्रिय अनुभवाची नोंद मला करावी लागत आहे . त्याबद्दल सुरेश भरांचे भक्त मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे . मी तसे केले नाही तर मात्र मी करणे कठीण जाईल असे वाटते . 

     काही कारणांनी भटांनी काही कालावधीनंतर सुधाकर कदमांना जाहीर कार्यक्रमातर आपल्या गझला गाण्यास मज्जाव केला . एका खाजगी कार्यक्रमात तर त्यांनी कहरच केला नागपूरच्या आमदार निवासात आमदार हरिश माणधना यांनी आमदारांसाठी सुधाकर का यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता . हे जेव्हा सुरेश भटांना कळले तेव्हा ते ताडताड पाय आपटत व काठी हवेत उडवीत तेथे गेले . असा कसा सुधाकर कदम माझ्या गझल गातो ते मी पाहतोच असे म्हणून त्यांनी तेथे धिंगाणा घातला . त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आणि हे सगळे कशासाठी तर मानधनासाठी . ' माझ्या गझला गाऊन पैसे कमवतो , तर मला मानधन शून्य !' अनेक वर्षांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सहवासानंतर व अनेक कार्यक्रम सोबतीने केल्यानंतरचा हा भटांचा अवतार न पाहवता आलेला सुधाकर थोडा खचला होता . 

     आर्णीसारख्या खेड्यातून बाहेर पडण्यासाठी सुधाकरने जे जे आधार शोधलेत ते सो कुचकामी ठरले . शेवटी सेवानिवृत्तीची वाट न पाहता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने घेतला . पुण्यात जाऊन नशीब आजमावण्याचा त्याचा निर्णय खरोखरच शहाणपणाच होता . पण तो त्याने उशिरा घेतला . उशिरा का होईना सुधाकरने संगीत दिलेल्या मराठी गझलच्या अल्बमला सुरेश वाडकर यांच्यासारख्या विख्यात गायकाचा आवाज लाभला हे मात्र आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे . मराठी गझलगायकीचे प्रात्यक्षिक पहिल्यांदा महाराष्ट्राला देणारा सुधाकर कदम मात्र सोईस्कर रीतीने विस्मरणाच्या गर्तेत टाकण्याचा प्रयत्न झाला. नुकत्याच झालेल्या दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्याच्या ऐतिहासिक कामगिरीची जाणीवपूर्वक नोंद घेतली गेली, तेव्हा मात्र हायसे वाटले. 

     आज ' #गझलगंधर्व  ' या सन्मानाने गौरविला गेल्यानंतर त्याची दखल घेणे भाग पडले . त्याच्या या ओळखीसाठी त्याला किती खस्ता खाव्या लागल्या हे मात्र फार कमी लोकांना माहीत आहे . त्याने स्वत : या आठवणी लिहन काढल्या तरच या विषयीची माहिती आपणास मिळू शकेल . पत्रकार म्हणून कार्य करणारा , सडेतोड लिहुन अनेकांची नाराजी ओढवून घेणारा सुधाकर केव्हा तरी या दिशेने आपली लेखणी वळवील अशी आशा करायला हरकत नाही . तसे झाले तर अनेक नव्या दमाच्या गझलगायकांना दिशा मिळेल.आज सुधाकर समाधानी आहे . कारण त्याची स्वप्ने पूर्ण व्हायला लागली आहेत.मराठी गझलगायकीमध्ये आणखी खूप काही करता यावे यासाठी त्याला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा !



 

 

No comments:





संगीत आणि साहित्य :