गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Friday, November 21, 2025

म.सा परिषद, पिंपरी चिंचवड तर्फे सत्कार...

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष श्री राजन लाखेंच्या हस्ते सत्कार स्वीकारताना...१५/११/२०२५

 

म.सा.प.पिंपरी चिंचवड कार्यक्रम...



'हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे 
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे '

'गाऊन सोसले मी, सोसून गायिले मी 
आयुष्य जाळले मी, प्रिये तुझ्याचसाठी... '

ह्या गझला आहे गझल गंधर्व सुधाकर कदम यांच्या, तर

'लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा, चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला 
सांगतो मी खरे, फार झाले बरे, फक्त त्यांनी तुझा चेहरा पाहिला... '

ही गझल आहे गझलकार श्रीकृष्ण राऊत यांची. अशा एकाहून एक सरस गझलांनी रंगलेल्या मैफलीत रसिक वृंद न्हाऊन निघाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित 'सरगम तुझ्याचसाठी' हा संगीतमय कार्यक्रम निगडी येथील साहित्य परिषदेच्या शांता शेळके सभागृहात संपन्न झाला. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, संगीतकार सुधाकर कदम उपस्थित होते. सुनीता बोडस यांनी सर्व कलाकारांची ओळख करून दिली.
आयुष्याच्या वाटचालीत येणारे अनुभव, सुख दुःखाच्या विविध भावना असलेल्या आशयपूर्ण रचना गायक मयुर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यावेळी सहकलाकार मुकुंद पेटकर (हार्मोनियम), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला), आशिष कदम (की बोर्ड) यांनी साथ दिली. सदर कार्यक्रमात ईला पवार यांचा त्यांच्या सांगीतिक वाटचालीबद्दल सत्कार करण्यात आला.
राजन लाखे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सूत्रसंचालन केले आणि चोखंदळ रसिकांचे आभार मानले.


 

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा...

ये न ये टिपूरसे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ?
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा

गायक - मयूर महाजन आणि प्राजक्ता सावरकर शिंदे.

शब्द - ज्योती राव ( बालिगा )

सहकलाकार - मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.



 

सरगम तुझ्याचसाठी...

                       सरगम तुझ्याचसाठी, गीते तुझ्याचसाठी
                       गातो गझल मराठी, प्रीये तुझ्याचसाठी

व्याकुळ ही विराणी, गाते तुझी कहाणी
शिवरंजनी दिवाणी, प्रीये तुझ्याचसाठी

घन सावळा गरजतो, बेबंद तान घेतो
बरसून शांत होतो, प्रीये तुझ्याचसाठी

सोसून गायिले मी, गाऊन सोसले मी
आयुष्य जाळले मी, प्रीये तुझ्याचसाठी

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 

तुझे तुला जगायचे...



हसून वा रडूनिया तुझे तुला जगायचे
असेच दुःख झेलुनी सुखासवे फुलायचे

कधी कुठे असायचे कधी कुठे नसायचे
खुडून टाकले तरी नभात भिरभिरायचे

सुगंध घेउनी सवे दवात रोज न्हायचे
पुन्हा पुन्हा फलूनिया खुशाल दर्वळायचे

मधाळ चांदरातही न राहिली मिठीत या
म्हणून का उगीच मी तुझ्याविना झुरायचे

हवे तसे जगावयास ना मिळे कुणासही
कठोर सत्य हेच तर कशास मग रडायचे

गायक - मयूर महाजन 
गायिका - प्राजक्ता सावरकर शिंदे
शब्द आणि संगीत - #गझलगंधर्व​ सुधाकर कदम

सहकलाकार-मुकुंद पेटकर (हार्मोनियम),प्रभंजन पाठक (व्हायोलिन), ओंकार भुसारे (तबला),आशिष कदम (की बोर्ड) आणि सूत्र संचालन - शाहीर सुरेशकुमार वैराळकर.

दि.१५ नोव्हेंबर २०२५,महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.शांता शेळके सभागृह, प्राधिकरण,
निगडी,पुणे.


 .

Sunday, October 26, 2025

अक्षरवेध (सुरेश भट विशेषांक) दिवाळी अंकाचे प्रकाशन.महाराष्ट्र साहित्य परिषद,पिंपरी चिंचवड शाखा.संपादक-राजन लाखे.●माझे_मनोगत.

 

  


   



                 आणि 'अक्षरवेध' मधील लेख

.                          ●सुरेश भट आणि मी●

 

          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७-७८ ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. (नंतर याच गझलच्या बंदीशीवरून मला '#महाराष्ट्राचे_मेहदी_हसन' ही उपाधी पण दिली.) त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. दहा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदिशी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा #अशी_गावी_मराठी_गझल सुरु झाला.

 

      या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 


       भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का?" या वेळेपर्यंत ८ वाजले होते. ९ वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे १० वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला व जेवण वाढायला सांगितले.आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.


- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.

         विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर

‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.

‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.

‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.

‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.

‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.

अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.

 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हा शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा." यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू? तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. १९८२ पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘#गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदार्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.

       आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना १९८१-८२ च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी ६ वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.

       सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील ६५ च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.

         आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छा-अच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

 

-सुधाकर कदम

सी-१-सी/१३,गिरीधर नगर,

वारजे-माळवाडी,पुणे-५८.

 मोबा.8888858850


(● हा लेख माझा वैयक्तिक अनुभवाचा ठेवा आहे. यातील कुठल्याही घटनेचा उल्लेख कुणी स्वतःच्या लेखात करण्या अगोदर परवानगी घेणे आवश्यक.)


◆ ज्या गझलच्या बंदीशिवरून 'महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन' ही उपाधी सुरेश भटांनी दिली,त्या गझलची युट्युब लिंक.

https://youtu.be/pnu2_4bjcPE?si=KlXN9J8e3d02sgUD

Tuesday, September 9, 2025

रे मना, तुज काय झाले सांग ना!


  


   दक्षिण भारतीय संगीत तज्ज्ञ म्हणतात की,भारतीय शास्त्रीय संगीताला काही मुसलमान संगीकारांनी भ्रस्ट केले.तर काही मुसलमान संगीतकरांचे म्हणणे आहे की,मुसलमान संगीत तज्ज्ञांनी  भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी सजवले,त्यास सौंदर्यपूर्ण केले.

      इतिहास पहिला तर भारतीय व्यापाऱ्यांचे अरब व्यापाऱ्यांशी शेकडो वर्षांपासून व्यापरिक संबंध होते.हजरत मुहम्मदाच्या जन्मापूर्वीचे काही अरबी ग्रंथ रामपूरच्या 'रजा पुस्तकालयात' सुरक्षित आहेत,त्यात काही विशिष्ठ गीतांची 'स्वरलिपी' पण आहे.जी सामगायन करणाऱ्या 'गात्रवीणा विधी'ने प्रभावित आहे.यावरून हे लक्षात येते की,अरब लोक इस्लामचा उदय होण्या अगोदरपासून भारतीय स्वरविधीशी परिचित होते.दक्षिण भारताशी तर अरब व्यापाऱ्यांचा संबंध फार प्राचीन आहे.इसवी सन ८६८ मध्ये जाहज नामक एका अरबी लेखकाने भारतीय संगीताची भरपूर तारीफ केली आहे.यात विशेषकरून 'एकतारा'ची (एकतंत्री वीणा) चर्चा महत्वाची समजल्या जाते.स्पेनचा इतिहासकार काजी साइद उदलूस्मीने,ज्यात रागांच्या स्वरांचे वर्णन आहे असे भारतीय ग्रंथ आमच्यापर्यंत पोहोचले असा उल्लेख इसवी सन १०१७ मध्ये केला आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५७.) अमीर खुसरोने भारतीय संगीत जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे.(संदर्भ:-'अरब और हिंद के ताल्लुकात', लेखक-सैयद सुलेमान नदवी, हिंदुस्तानी एकेडेमी,पृ.१५८.) भारतीय संगीत शिकण्यासाठी विदेशातून अनेक विद्यार्थी भारतात येत असल्याचा उल्लेख 'खिलजी कालीन भारत,या ग्रंथातील पृष्ठ क्रमांक १८० वर आहे.इसवी सन ७५३ ते ७७४ च्या मधल्या काळात अनेक भारतीय ग्रंथ अरबस्थानात नेऊन त्याचे अरबी भाषांतर करण्यात आले.त्यावेळी बगदादमध्ये खलिफा मन्सूर याचे शासन होते.खलिफा हारूनच्या (७८६ ते ८०८) काळात अनेक अरब विद्यार्थ्यांना विभिन्न विद्यांच्या अध्ययनासाठी भारतात पाठविले व भारतातील विद्वानांना बगदादला बोलविले.प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ शेख बहाउद्दीन झकेरीयाचा संगीत संप्रदाय अरबी संगीताच्या प्रभावाखाली होता.झकेरीया सुफींच्या सुहरवर्दी परंपरेचे महापुरुष होते.यांचे कार्यक्षेत्र सिंध प्रांत असल्यामुळे पंजाब आणि सिंधच्या लोकगीतांचा  या संप्रदायावर पूर्ण प्रभाव होता.खैबर खिंडीतून आलेले मुसलमान व अरबस्थानातून आलेले मुसलमान यांचा स्वभाव,चरित्र,संगीत इत्यादींमध्ये  खूप तफावत होती. भलेही दोघांचे धार्मिक संबंध असेल पण सांस्कृतिक संबंध नव्हते. अरबी संगीत आणि इराणी संगीत भिन्न आहे.अमीर खुसरोला याचे ज्ञान होते.इरानी संगीताचे चार 'उसूल' आणि 'बारा पडद्यांचा' अभ्यास असूनही त्याने भारतीय संगीतालाच श्रेष्ठ मानले आहे.चिश्ती परंपरेतील प्रसिद्ध पुरुष शेख निजामुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर खुसरोच्या ज्या रचना गायिल्या जातात, त्या सर्व भारतीय लोकधुनांवर आधारित शुद्ध भारतीय आहे.(संदर्भ - 'संगीत चिंतामणी)

       अकबराच्या दरबारात ग्वाल्हेर परंपरेचे मर्मज्ञ तसेच फारसी परंपरेचे विदेशी कलाकार पण होते.या काळची परिस्थिती संगीतामध्ये नव-नवीन प्रयोग करण्यास अतिशय अनुकूल अशी होती. असे अबुल फजल यांच्या 'आईने अकबरी' मधील उल्लेखावरून कळून येते.या काळात अनेक प्रयोग झाले.या प्रयोगातूनच तानसेनाचा 'मियां मल्हार,'दरबारी कानडा'   

(कानडा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचा समूह आहे, ज्याला कान्हडा म्हणूनही ओळखले जाते. कानडा हे नाव कर्नाटक संगीत परंपरा आणि कन्नड देशात उद्भवले असावे असे सुचवते. या गटातील राग वेगवेगळ्या थाटांचे आहेत, परंतु विशेषतः आसावरी किंवा काफी थाटाचे आहेत.कानड्याचे एकूण १८ प्रकार मानले जातात.त्यात 

शाम कानडा,मंगल कानडा, कोलाहल कानडा, मुद्रिक कानडा, नागध्वनी कानडा, टंकी कानडा, जैजवंती कानडा, गारा कानडा, काफी कानडा, बागेश्री कानडा, सुघराई कानडा, सुहा कानडा, शहाणा कानडा, अडाना कानडा, हुसैनी कानडा,अभोगी कानडा, कौशी कानडा, नायकी कानडा हे प्रकार आहेत.यातील अनेक प्रकार आज नामशेष झाले आहेत.)  

'मियां की तोडी'(गुजरी अथवा गुर्जरी तोडी,देसी तोफा,हुसैनी तोडी,आसावरी उर्फ कोमल रिषभ आसावरी असे तोडीचे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.)  

धोंधूचा 'धोंधू की मल्हार', चरजूचा 'चरजू की मल्हार' (मेघ मल्हार,रामदासी मल्हार,गौड मल्हार,सूर मल्हार,देश मल्हार,नट मल्हार,धुलिया मल्हार,मीरा की मल्हार असे मल्हारचे पण अनेक प्रकार आहेत).या प्रकारे नवीन राग संगीत जगताला मिळत गेले.ही परंपरा पुढेही सुरू राहिली.

     जहांगीरच्या काळात तानसेनाचा मुलगा बिलास खान याने 'बिलासखानी तोडी' नामक अतिशय गोड रागाची रचना केली. हा राग भैरवी थाटोत्पन्न मानतात.याला जवळचे असे भैरवी, भूपाल तोडी व कोमल रिषभ आसावरी हे तीन राग आहेत. हे तीनही राग समप्रकृतिक असले तरी चलन,स्वर लागाव,वर्ज स्वर यामुळे एकदम वेग-वेगळे आहेत.बिलासखानी तोडीचे चलन तोडीप्रमाणे असल्यामुळे यातील गांधार स्वर तोडीप्रमाणेच अती कोमल लावायला हवा.यात पंचम हा न्यास स्वर आहे.पण अवरोहात याला घेतल्या जात नाही.तसेच आरोहात वर्ज असलेला निषाद कधी कधी रंजकता वाढविण्याकरिता घेतल्या जातो.हा एक अतिशय गोड आहे पण गायला मात्र कठीण आहे.हा मींडप्रधान राग आहे.याची प्रकृती शास्त्रानुसार शांत आणि गंभीर आहे.या रागात हिंदी वा मराठीत गाणी नसल्यातच जमा आहे.'लेकिन' या चित्रपटातील गुलजार यांचे शब्द व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या 'झुठे नैना बोले सांची बतीया' ह्या आशा भोसले व पं.सत्यशील देशपांडे यांनी गायिलेल्या एका अप्रतिम गाण्यासाठी हा लेख प्रपंच केला आहे. ज्या रसिकाने हे गाणे ऐकले नसेल त्याने जरूर ऐकावे! 

     बिलासखानी रागावर आधारित एक माझेच गीत २०१८ मध्ये स्वरबद्ध केले होते..स्पॉटिफाय (spotify) युट्युब (youtube) सह इतर सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गीत उपलब्ध आहे.अलबमचे शीर्षक आहे '#रे_मना!

https://youtu.be/kCYnWcTeP5o?si=6fFq1WZ2B0p86xTu


                 #मैफल 


रे मना, तुज काय झाले सांग ना!

का असा छळतो जीवाला सांग ना!


हारण्याचीही मजा घे एकदा

जिंकुनी तुज काय मिळते सांग ना!


हासुनी हसवायचा हा मंत्र घे

दुःख का कुरवळतो तू सांग ना!


सूर लावून गुणगुणावे गीत हे

ते नि तू का वेगळा रे सांग ना!


गीत/संगीत - सुधाकर कदम

गायक - मयूर महाजन

तबला - किशोर कोरडे

सरोद -नितीश पुरोहित








संगीत आणि साहित्य :