-सुधाकर कदम
■
श्रीकृष्णाचे मनोगत:- आयुष्याला पुरून उरलेलं ऐश्वर्य
साल १९८०. आम्ही तेव्हा बोरगाव मंजूला भाड्याच्या घरात राहत होतो. एक दिवस अचानक आमच्या घराचा पत्ता विचारत डॅडी देशमुख आले. सोबत वाघ सर होते. आमच्या वेटाळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आमच्या राऊत कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चहापानानंतर डॅडींनी भेटीचे प्रयोजन सांगितले. 'देवकीनंदन गोपाला ' च्या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी 'राघू मैना ' ह्या चित्रपटाचीतयारी सुरू केली होती.त्या चित्रपटाची गीते लिहिण्याचे आमंत्रण घेऊन दस्तुरखुद्द डॅडी आले होते.खरं तर त्यांनी पंधरा पैशाचे एक पोस्टकार्ड टाकले असते तरी मी धावत पळत गेलो असतो. पण कवी - कलावंताचा सन्मान कसा करावा, हा त्यांच्या देहा एवढाच मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे निसर्गदत्त होता.अकोल्याच्या झेडपी रेस्ट हाऊसला गाण्यांची बैठक ठरली होती. मी पोचलो.संगीतकार विश्वनाथ मोरे, त्यांचे सहाय्यक राजाराम जामसंडेकर, दिग्दर्शक राजदत्त, किशोर मोरे, विठ्ठल वाघ ही मंडळी बैठकीला हजर होती. पटकथेतला गीताचा प्रसंग आपल्या विलक्षण कथनशैलीने राजदत्तजींनी आमच्यासमोर जिवंत उभा केला. आता त्या प्रसंगाला साजेशा ओळी लिहिण्याची माझी परीक्षा होती. ही बैठक आठ दिवस चालली.गीताचे साठ सत्तर मुखडे तरी लिहिले असतील. पण राजदत्त साहेबांना काही पसंत येत नव्हते. हार न मानता पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतो आणि हा मुखडा सुचला -
"ठिणग्या ठिणग्यांची
घुंगरं बांधून
उभी आग मी सजली
अहो सांभाळा हो
आता नाचते नाचते बिजली "
राजदत्तजींनी 'ओके ' म्हटले. ह्या गीताचे वीस - पंचवीस अंतरे लिहिले. त्यातले तीन 'ओके' झाले.माझ्या त्या गीताला आशाताई गाणार होत्या.माझ्या मनाची अवस्था भावतरल झाली होती.त्या गीताचं रेकॉर्डिंग झालं.
रेकॉडिंगसाठी मला मुंबईला जाता आले नाही. आशाताईंची भेट होऊ शकली नाही. पणमाझ्या शब्दांचं सोनं करणाऱ्या आशाताईंच्या दैवी स्वराने मला श्रीमंत केलं. ते ऐश्वर्य मी आयुष्यभर मिरवत आलो.
- श्रीकृष्ण राऊत




No comments:
Post a Comment