गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Thursday, July 2, 2020

.                      #एक_कलंदर_कलावंत
                 
          खरे म्हणजे या माणसाबद्दल दोन चार शब्द लिहिणे तेही माझ्यासारख्याने,तसे ऐपतीबाहेरचे काम आहे.तरी पण या माणसाबद्दल माझ्या मनात जो आदर, जिव्हाळा,आपुलकी आहे;ती मला ऐपतीबाहेर काम केल्याशिवाय स्वस्थ बसू देणार नाही. याची जाणीव होती  म्हणून गांधर्व संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्य हा प्रयत्न! माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काही लिहितो तेव्हा लिहिणाऱ्याचे त्या व्यक्तीसोबत निश्चितच काही तरी स्नेहबंध असतात,नाते असते?यापैकी काहीच नसेल तर किमान शत्रुत्व तरी असते आणि यापैकीच कोणत्या तरी कारणामुळे आपण आपल्या भावना शब्दरूपात व्यक्त करतो.
              सुधाकर कदम यांच्याशी माझे नाते काय?काय संबंध? खूपदा शोधूनही या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही.कारण  शालेय जीवनात त्यांचा विद्यार्थी म्हणून आणि सध्या असलेली आदरयुक्त मैत्री,यापैकी नेमका कुठल्या भावनेने त्यांच्याशी बांधला जाऊन कोणत्या भावनेने मी लिहीत आहे,याचा उलगडा होणे कठीणच!
तरी पण या व्यक्तीशी  कुठे तरी माझ्या मनाच्या तारा जुळल्या आहेत एवढे मात्र निश्चित.मी जेव्हा पाचव्या इयत्तेमध्ये आर्णीला शिकायला आलो त्याच वर्षी सुधाकर कदम हे संगीत शिक्षक म्हणूनआमच्या शाळेत रुजू झाले.स्वभावाने थोडे रागीट वाटणाऱ्या (असणाऱ्या) कदम सरांनी आमचे विद्यार्थी जीवन सप्तसुरात न्हाऊन काढले.अगोदर बेसूरी वाटणारी  शाळा आणि आम्ही विद्यार्थी सुरात आलो.संगीत शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची ही पावतीच नाही का?
               पुढे जसजसा काळ पुढे सरकत गेला,सुधाकर कदमांच्या व्यक्तिमत्वाचा एक एक पैलू उजळत गेला, अनुभवास येऊ लागला.संगीताच्या क्षेत्रात तर त्यांनी आर्णीसारखे खेडेवजा गाव प्रसिद्ध केलेच,पण त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी करून आम्हा तरुणांना एक दिशा दिली.अनेक संस्था स्थापन केल्या.अनेक उपक्रम राबविले आणि आजही राबवित आहेत.आम्हा आर्णीकरांना संगीत,नाट्य,साहित्य या अभिजात कलांचा कलांच्या रसास्वादाची जाण करून दिली.नाटक,संगीत,व्याख्यान,कविसम्मेलनं कशी पाहावी,कशी ऐकावी याचे भान करून दिले.एवढेच नव्हे तर आर्णीसारख्या छोट्याशा गावातील कलाकारांचे चेहरे त्यांच्या अविरत अविश्रांत परिश्रमामुळे मुंबई दूरदर्शनवर झळकलेले आर्णीकरांना पाहता आले.
                मी ज्या खेड्यात राहतो त्या काठोडा गावी प्रसिद्ध गझलकार कविश्रेष्ठ सुरेश भट,प्रसिद्ध तबला वादक विठ्ठलराव क्षीरसागर (पुणे),बासरी वादक स्व.दत्ता चौगुले (वसमत),पुणे आकाशवाणीचे सारंगीवादक पैगंबरवासी लतीफ अहमद खान,कवी लक्ष्मीकांत तांबोळी (देगलूर),पं. जितेंद्र अभिषेकींचे पट्टशिष्य राजा काळे यांच्यासारखे थोर कलावंत,साहित्यिक केवळ सुधाकर कदमांमुळे आमच्याकडे येऊन गेले.माहुरे कुटुंबाला संगीत आणि सूर यांचा अगदी जवळून परिचय करून दिला.काठोड्यात जमलेल्या त्यांच्या मैफिलींनी व त्यामुळे घडलेल्या सहवासामुळे आमचे गळे जरी तयार झाले नाही तरी कसं मात्र उत्तम प्रकारे तयार होऊन कानसेन या संज्ञेस पात्र झालो एवढे मात्र निश्चित.
              मराठी गझलला योग्य प्रकारच्या बंदिशी बांधून मराठी गझल,गझलसारखी सादर करून सन्मानाने श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचे फार मोठे कार्य त्यांनी सर्वप्रथम केले.मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात खरोखरच सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमॅनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे.मराठी  गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेले दान आहे.सुरेश भटसुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे. जवळच्या सुरांची मुक्त उधळण समर्थपणे व मुक्तपणे करूनसुद्धा आमच्या समाजाचा दळभद्रीपणा असा की,ते श्रीमंत स्वर आम्ही वेचून पदरात सामावून घेऊ शकलो नाही.कारण आमचा पदरच तोकडा पडला.त्यांच्या संगीत साधनेला,उपासनेला,मेहनतीला आपण कधीच न्याय देऊ शकलो नाही असे खेदाने म्हणावे लागते.पण आपल्याच मस्तीत जगणाऱ्या सुधाकर कदमांनी कोण न्याय देतो वा देत नाही याची कधीच फिकिर केली नाही.प्रखर स्वाभिमानी,पैसा, नावलौकिक,प्रसिद्धी यासाठी लाळघोटेपणा,चाटूगिरी,चरण छू इत्यादी किळसवाणे प्रकार कधीच केले नाहीत.पण आजच्या जगाचे मुख्य क्वालिफिकेशन तेच असल्यामुळे हा कलावंत लौकिक दृष्ट्या मागे राहिला.त्यामुळेच हा असाधारण व्यक्तिमत्वाचा धनी मात्र कधी कधी एकाकी वाटतो.
                संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २५/२६ वर्षांपासून पोटतिडकीने कार्यरत असलेले सुधाकर कदम आजही एकाकी वाटतात याचे कारण आपली बहुजन समाजाची साहित्य व संस्कृतीबद्दलची अनासक्ती हेच आहे.पण या ध्येयवेड्या माणसाने या गोष्टीची कधीच दखल घेतली नाही.घेतलेला वसा सोडला नाही."जिसका जितना आचल होता है,उतनीही सौगात उसे मिलती है",असे सांगत सप्तस्वरांच्या सानिध्यात राहणारा, स्वरांच्या अवगुंठानात जगणारा कलंदर आजही झुंजत आहे.पुढेही झुंजत राहणार याची खात्री आहे.
               सध्या आर्णीत सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमांना जो प्रतिसाद मिळत आहे तो पाहून उशिरा का होईना त्यांची मेहनत फळाला येत आहे.त्यांची जिद्द व धडपड एक रूप घेऊन आकाराला येत आहे हे ही नसे थोडके!
               शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,खूप काही सोसूनही त्यांनी स्वतःतला कलावंत जिवंत ठेवून संगीतावरील अपार श्रद्धा जपली.ईश्वर या लढवय्या कलावंतास दीर्घायु-आरोग्य देवो.बस!

-मनोज पाटील माहुरे
मु.काठोडा, ता. आर्णी
जिल्हा यवतमाळ

(गांधर्व संगीत विद्यालय,आर्णी. रौप्यमहोत्सवी स्मरणिका,१९९९ मधून...)




संगीत आणि साहित्य :