कोण्या एका रागाचे नाव कोण्या एका गावाशी/जागेशी जोडलेले असण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे राग 'जौनपुरी होय.उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये गावाच्या नावाने घराणे आहेत.पण राग मात्र एकच 'जौनपुरी'! १३९४ ते १४७९ मध्ये जौनपूर हे एक स्वतंत्र राज्य होते.यावर 'शर्की' वंशाची हुकूमत होती.(१५ व्या शताब्दीमध्ये वाराणाशी आणि जौनपूर हे उत्तर भारतीय संगीताचे मुख्य क्षेत्र होते.)
ख्वाजा-ए-जहां मलिक सरवर या राज्याचे पहिले शासक होते.(जे कधी नसिरुद्दीन शाहचे वजीर होते.) या राज्याचे शेवटचे शासक होते सुलतान हुसेनशाह शर्की (१४५८-१४८५) काही इतिहास तज्ज्ञ हा काळ १४५८ ते १५०५ असा सांगतात. सुलतान हुसेनशाह शर्की हे फार मोठे संगीत प्रेमी व जाणकार होते.त्यांना गंधर्व उपाधीने नावाजले होते.ते ख्याल गायकीला प्रोत्साहन देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.त्यांनी 'मल्हार शाम','गौड शाम' आणि 'भूपाल शाम' या सारखे दुर्लभ राग बनविल्याचेही सांगितले जाते.आपल्या संगीत प्रेमापोटी त्यांनी आणखी एक राग तयार केला, ज्याला नाव दिले राग 'हुसैनी'.हाच हुसैनी पुढे जौनपुरी नावाने प्रसिद्ध झाला.जो आज उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक लोकप्रिय राग असून बहुतेक सर्व गायक वादक हा राग आवर्जून सादर करताना दिसतात.या कालखंडात दिल्ली आणि जौनपूर सत्तासंघर्ष चरम सीमेवर होता.शेवटी बहलोल लोदीने जौनपुरवर ताबा मिळवून दिल्लीमध्ये सामिल करून घेतल्यामुळे हुसेन शर्की आपले राज्य गमावून बसले.पण त्यांच्या या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांची आठवण संगीत प्रेमींच्या मनात कायम राहणार आहे.
जौनपुरी राग आसावरी थाटातून उत्पन्न झाला आहे. याला जीवनपुरी असेही म्हटले जाते. या रागात 'गांधार' ‘धैवत’आणि ‘निषाद’ हे स्वर कोमल आहेत.आरोहात गांधार वर्ज असून अवरोहात सातही स्वर लागतात.त्यामुळे याची जाती षाडव संपूर्ण आहे.वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.गानसमय दिवसाचा दुसरा प्रहर.हा राग उत्तरांग प्रधान आहे. याचा विस्तार मध्य आणि तार सप्तकात केल्या जातो.याला गंभीर प्रकृतीचा का राग मानतात. आसावरी आणि जौनपुरी एकदम जवळचे राग आहेत.त्यामुळे गाताना फार सावधगिरी बाळगावी लागते.आसावरीमध्ये आरोहात निषाद वर्ज आहे तर जौनपुरीमध्ये आरोहात निषाद घेतल्या जातो.या रागात पूर्वांगात 'सारंग' व उत्तरांगात 'आसावरी' दिसून येतो. सध्या अप्रचलीत असलेला 'गांधारी' राग जौनपुरीशी बराच मिळता-जुळता आहे.
आरोह– सा रे म प ध नी सां
अवरोह– सां नी ध प, म ग, रे सा
पकड़– म प, नी ध प, ध म प ग S रे म प
भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक खास अशी बाब आहे की,दोन रागांचे स्वर एकसारखे असूनही स्वरलगावाच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे राग वेगवेगळे होतात.प्रत्येक रागात वेगवेगळ्या पद्धतीने स्वर लावल्यामुळे प्रत्येक रागाचे वेगळे रूप आपल्या समोर येते.राग जौनपुरी, राग दरबारी कानडा आणि राग अडाणा या रागांचे स्वर सारखेच आहेत.परंतू ज्या पद्धतीने गायिल्या जाते त्याने प्रत्येक राग पूर्णपणे वेगळा होतो.
केसरबाई केरकर,उस्ताद बडे गुलाम अली खान, रोशनआरा बेगम, गिरीजा देवी, मास्टर कृष्णराव, माणिक वर्मा, पं. डी. व्ही.पलुस्कर, उस्ताद नजाकत अली सलामत अली, पंडित भीमसेन जोशी,पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद फतेह अली खान, मालिनी राजूरकर, पंडित राजन साजन मिश्र, किशोरी आमोणकर,वीणा सहस्रबुद्धे,अश्विनी भिडे,आरती अंकलीकर,उस्ताद नुसरत फतेह अली खान, परवीन सुलताना, पंडित अजय चक्रवर्ती,पं. ज्ञान प्रकाश घोष, पं. व्यंकटेश कुमार, पं. जयतीर्थ मेवूंडी, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर,अपूर्वा गोखले,मंजुषा पाटील,मौमिता मित्रा,कौशिकी चक्रवर्ती,पं. हरीश तिवारी,रवींद्र परचुरे,गौरी पठारे,मंजिरी असनारे,उस्ताद बिस्मिल्ला खान (शहनाई), उस्ताद अली अकबर खान (सरोद), पं.पुर्बायन चटर्जी (सतार),उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पं. निखिल बॅनर्जी (सतार), कला रामनाथन (व्हायोलिन), रुपा पानेसर (सतार), कल्याणी रॉय (सतार) अली अहमद हुसैन (शहनाई) जुगलबंदी.अभ्यासकांसाठी या दिग्गजांचे व्हीडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत.
● जौनपुरीवर आधारित हिंदी,उर्दू चित्रपट गीते...
'मेरी याद में तुम ना आंसू बहाना' तलत महमूद. चित्रपट-मदहोश, संगीत-मदन मोहन (१९५१).
‘जाएं तो जाएं कहां’ लता,तलत.चित्रपट-टॅक्सी ड्रायव्हर, संगीत-एस.डी. बर्मन (१९५४). (आधारित)
'रहीए अब ऐसी जगह' सुरैय्या. चित्रपट-मिर्झा गालिब,संगीत-गुलाम मोहम्मद (१९५४).
'पिया ते कहां गयो नेहरा लगा' लता.चित्रपट-तुफान और दिया, संगीत-वसंत देसाई (१९५६).
'दिल छेड़ कोई ऐसा नगमा' लता,आशा,हेमंत कुमार. चित्रपट-इंस्पेक्टर, संगीत-हेमंत कुमार(१९५६).
'टुटे हुये ख्वाबो ने' रफी.चित्रपट-मधुमती, संगीत-सलील चौधरी (१९५८).
'चितनंदन आगे नाचूंगी' लता.चित्रपट-दो कलियां, संगीत- (१९६८).
'आज सोचा तो आंसू भर आये' लता. चित्रपट-हंसते जख्म, संगीत-मदन मोहन (१९७०).
'दिल में हो तुम आंखो में तुम' एस जानकी,बप्पी लहरी. चित्रपट-सत्यमेव जयते, संगीत-बप्पी लहरी (१९८७)
'पल पल है भारी' मधुश्री,चित्रपट-स्वदेस, संगीत-ए.आर. रहमान (२००५).
या रागाची रेंज इतकी भारी आहे की,संगीतकार एस.डी. बर्मन,मदन मोहन,हेमंत कुमार पासून तर बप्पी लहरी, ए.आर.रहमान यांनी जौनपुरीच्या जमिनीवर आपल्या गाण्याची धून बनविली आहे.
● नॉन फिल्मी...
'श्रीराम भजो सुख में दुख में'गायक-के.सी.डे. (१९३०).
'प्रेम भावे जीव जगी या' उस्ताद अब्दुल करीम खान.अल्बम-हिराबाई बडोदेकर मराठी गीते.
'राम प्रभू आधार जगत के' पंडित भीमसेन जोशी.संत तुलसीदास.
● मराठी...
'देवा तुझा मी सोनार' गायक-रामदास कामत. अभंग-संत नरहरी सोनार, संगीत यशवंत देव.
'तुझे रूप चित्ती राहो' गायक/संगीतकार-सुधीर फडके.
चित्रपट-संत गोरा कुंभार.
'अवघे गरजे पंढरपूर' गायक-प्रकाश घांग्रेकर/शौनक अभिषेकी.नाटक-संगीत संत गोरा कुंभार,संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी. (१९७४).
----------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, 'नक्षत्र' रविवार पुरवणी,दि.२४/१२/२०२३