गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, December 19, 2020

पंडित सुधाकर कदम...सीमा गादेवर

.            १९८१ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश_भट व गझल गायक सुधाकर_कदम हे  मराठी_गझल गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत !

      त्यांच्या " तुझ्यासाठीच मी... ' या अल्बमचे प्रकाशन      झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंत होते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे.            
                                         
 "तुझ्यासाठीच_मी... " या मराठी गझलच्या  अल्बममध्ये 'गझलगंधर्व'  श्री. सुधाकरजी कदम या गायक व "पंडित" ही ऊपाधी  कमीच पडावी अशा या  संगीतकाराने- कवी श्री.दिलीप पांढरपट्टे  व  गायिका  वैशाली माडेसह  एक  न्  एक गझलेला, गाण्याला....  प्रत्येक ओळीचा  व शब्दातला  भाव  जाणून आपल्या  स्वर-साजाने  नवा आलेख  व आशय  दिला आहे.शब्दांना  वेगवगळ्या  सुरावटीतून  गुंफतांना एक  मायाजालच  आपल्याला हळूहळू  आनंदात सामील करीत आपल्या  कानातून थेट हृदयावर साम्राज्य गाजवते  !  
      
            सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही    लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर  खिळवून ठेवणारी रचना----
"किती   सावरावे....  कसे   सावरावे"
      ...किती   बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी  साथ देतात व रूंजी  घालून  गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे  ऐकणाऱ्याचा  खरेच झोक   जातो!    
" तुझा भास झाला पुन्हा आडवेळी,  
पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....."    
               या ओळी  तसेच कोरसचे  सूरही वेगळेच रंग     भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील  
 "ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला,
अरे  ईश्वराला असे ओळखावे..."
                ह्या ओळी तर  प्रणयातला  रस  व शॄंगार केवळ एका ओळीच्या  चालीतून व आवाजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे  तिघंही --- गीतकार,संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व  तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या  विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात.                                                                                   यातीलच     
"आसवांना टाळणे आता नको,
दु:ख  हे सांभाळणे आता नको..."       
या गझलेत  शब्द....सूर...लय व  तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते.  
"बोललो  त्याला किती झाली युगे,
हा अबोला टाळणे आता नको..."      
असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे  यांचे नर्म मधाळ     गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे कळतही  नाही ! 
कसबी संगीतकार  सुधाकरजी यांची नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना...
"घाव  ओला जरासा होता" 
रूपक तालाला 'वेस्टर्न टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच 
"वेदनेचा दिलासा होता" 
या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा...
प्रत्येक गझलेतील  पुढल्या ऊत्तराच्या  ओळींची गंमत लाजवाबच!     
          सुधाकरजींची गझलेला व गीतांना  नव्या नव्या,     अव्वल चाली देउन  अवघी  मैफिल  वेड्यागत आपलीशी      करून  घेण्याची आदत फार फार जुनी  नाही तर  ; केवळ    पंचेचाळीस  वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील  एके       काळचे अत्यंत नम्र,  लोकप्रिय  गायक 
!...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच  तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून  देत आहेत............
याच अल्बमधील
"असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा,   
असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा"      
 या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व  सारंगीचे सूर अचूक    स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत गुलाम अलीच्या गझलां इतकेच  एका मोहक नादमयी अंमला खाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ  होत पुढे पुढे जातो !... एक  हूरहूर   लागून   रहाते.........                                      
 "कळे ना मला  हे  कसा नेमका तू ,       
कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा  तू..."    
          या गझलेला अशी काही सुरावट दिली... की   प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना  मला मदन मोहन या  प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.)          
अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल...                      
 "नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले,
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ  मनाचे  भरले...."     
        हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर.........  अगदी सहजतेने मनाचा ठाव  घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात.....

" अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने,
जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले   !"
            कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये   तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे  वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान न सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना  बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर  मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय  संगीत कलेला एक  नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे.

             "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते"
ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहेअसे मला वाटते.यातील तरल भाव,हळवअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते...
"जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या,
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...."
          यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वारांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.
"मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी,
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..."
            यातील सुरावटीमुळे 'मनाच्या'शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो.
               याच अलबम मधील
"आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा"
हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात.
             सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "#काटयांची_मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम...
         सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच!
(सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "शब्द स्वरांची मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ......     
मराठीतून इतक्या देखण्या सुरावटीच्या गझला  इतके दिवस का नाही  दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते....
"हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे,
गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे"
             आणि या  गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन
याची  हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत......
        ..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा !
 -सीमा     गादे    (गादेवार )    
मुम्बई.
---------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...)
-----------------------------------------------------------

●पहिले छायाचित्र-सीमा गादेवार, सुरेश भट आणि गाताना अस्मादिक...घरगुती मैफल.
●खाली - दैनिक लोकमत,नागपूरचे कात्रण.(रात्री झालेल्या पांढरकवड्याच्या कृषी भवनातील सुरेश भट व माझ्या संयुक्त कार्यक्रमाचे.)


 





संगीत आणि साहित्य :