गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Tuesday, December 22, 2020

गझलयात्रा...अमोल सिरसाट


'चकव्यातुन फिरतो मौनी'

         अवलिया हा शब्द सुफी संतांमुळे भारतात आला. सुफी संतांसारखे पायघोळ झगे घालतेले, सतत अल्लाहचे नाव घेत जगणारे लोक म्हणजे अवलिया असा समज प्रचलित आहे. परंतु मराठीत या शब्दाला स्वच्छंदी, छांदीष्ट किंवा आपल्याच धुंदीत जगणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. भारतात गझलही सुफी पंथातील अवलिया संतांनीच आणली. मराठीत गझल रुजविणा-या अवलिया सुरेश भटांबरोबर सर्वप्रथम मराठी गझल गायकी रुजविणासाठी धडपडणारा एक चकव्यातून फिरणारा मौनी म्हणजे सुधाकर कदम! शास्त्रीय संगीतातील बहुतेक वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या सुधाकर कदमांनी सुरुवातीच्या काळात सुरेश भटांबरोबर प्रसंगी पदराला खार लावून मराठी गझलेच्या प्रसार प्रचारासाठी प्रयत्न केला आहे.
 
       फारसी–उर्दू-हिंदी गझल गायकीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. उर्दू गझल गायकीचे चाहते जगभरात पसरले आहेत. मराठी गझल गायकीला तशी परंपरा नाही. मराठीत गझलगायनाचे जे प्रयत्न झाले. त्यात सुगम संगीत आणि भावगीतासारख्या चाली देऊन गझल सादर केल्या जात. १९७५ मधे सुधाकर कदम यांनी ‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही’ ही यवतमाळच्या शंकर बडे यांची गझल १९७५ मधे सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध करून नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटन प्रसंगी सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते. इथूनच सुरेश भट आणि सुधाकर कदम या द्वयींचे सूर जुळले आणि मराठी गझल गायकीच्या परंपरेचा जन्म झाला. भटांनी सुधाकर कदमांना आपल्या अनेक रचना स्वरबद्ध करण्यासाठी दिल्या. हळुहळु त्यांनी स्वरबद्ध केलेल्या मराठीतील काही गझलांचा तीन तासांचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला भटांनी ‘अशी गावी मराठी गझल’ असे शीर्षक दिले आणि महाराष्ट्रभरात या कार्यक्रमाचे प्रयोग सुरु झाले. १५ जुलै १९८२ ला पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना साप्ताहिक ‘लोकप्रभा’ मधे छापून आलेला मजकूर अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी 'सा' लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्फूर्तपणे स्वागत केले. आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका... गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दांच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझलगायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.’ गायकीच्या अंगानेसुद्धा मराठी गझल हा वेगळा प्रकार आहे. गझलेची बंदिश (सोप्या भाषेत चाल) प्रत्येक शब्दाला जिवंत करून अर्थाचे वेगवेगळे आयाम प्राप्त्त करून देत असते. गझलगायक प्रत्येक शब्दाला हळुवारपणे गोंजारत गझलकाराच्या मनातील भावनांचा प्रवाह रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोहोचविण्याचे काम करीत असतो. अशाप्रकारे गझल स्वरबद्ध करून मराठीत सर्वप्रथम गझलगायनाचे श्रेय सुधाकर कदम यांचेकडेच जाते.
            यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या छोट्याशा गावी १३ नोव्हेंबर १९४९ रोजी जन्मलेल्या सुधाकर कदम यांचे वडील पांडुरंग कदम हे वारकरी संप्रदायातील विदर्भातील सुप्रसिद्ध गायक आणि हार्मोनियम वादक होते. सुधाकर कदमांना संगीताचे प्राथमिक धडे त्यांच्याकडूनच मिळाले. यवतमाळला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असतानाच ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रामधे संगीत संयोजन, ऍकॉर्डियन वादन व गायन असा व्याप सांभाळता सांभाळता त्यांना चाली बसविण्याचा छंद जडला. सतत दहा वर्षे दहा बारा तास रियाज करून त्यांनी विविध तंतूवाद्ये आणि तालवाद्ये हाताळण्यात प्राविण्य मिळविले. याचा फायदा आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाला व ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायक-वादकांना त्याकाळात सन्मानाचे स्थान होते. त्यानंतर सुधाकर कदम हे आर्णी येथेच संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.
              सुरेश भट कदमांकडे आर्णीला मुक्कामी असायचे. आर्णीला मुक्कामी असताना त्यांनी अनेक गझला लिहिल्या. त्यापैकी एक गझल म्हणजे –

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

            ही गझल भटांनी लिहिली आणि लगेच सुधाकर कदमांना चाल लावण्यासाठी दिली. ते लगेच हार्मोनिअम घेऊन बसले आणि अख्खी रात्र जागून एक वैशिष्ट्यपूर्ण चाल दिली. भट त्यांची रात्रभराची तगमग पहात होते. त्यांनी सकाळी मनभरून दाद दिली. सृजनासाठी धडपडणा-या प्रत्येकाला ही तगमग स्वस्थपणे जगूच देत नाही. रात्रीअपरात्री भोवताली निरव शांतता असते मात्र कलावंताच्या मनात मात्र प्रचंड वादळ उठलेले असते. तो सगळे प्रहर जागून काढतो तेव्हांच उत्तम कलाकृती निर्माण होतात. सुधाकर कदमांनी भटांसह अनेक गझलकांरांच्या रचनास्वरबद्ध केल्या आहेत. त्याच्या मराठीसह उत्तमोत्तम हिंदी-उर्दू बंदिशींचा खजिना पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सुधाकर कदमांच्या कन्या भैरवी आणि रेणू यासुद्धा त्यांच्या गझलगायकीचा वारसा समर्थपणे चालवित आहेत. त्यांचे चिरंजीव निषाद कदम हे उत्तम तबलावादक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटूंबच गझलमय झाले आहे असे म्हणावे लागेल.
             सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. सुरेश भट तर त्यांना ‘ महाराष्ट्राचे मेहदी हसन’ असे संबोधत असत. पुण्यातल्या त्यांच्या मैफिलींचे निवेदन खुद्द सुरेश भटांनी केले होते. मराठी गझल जनमानसात रुजविण्याचे या मंडळींचे कार्य पाहिले की खरोखरच नतमस्तक व्हावेसे वाटते. आणि म्हणूनच पुणे विद्यापिठाने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत त्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृतिदिनी ‘सुरेश भट स्मृतिपुरस्कार २००९ ‘ व ‘गझलगंधर्व’ हा किताब देऊन सन्मानित केले आहे. पुण्याच्या अक्षर मानव प्रकाशनाने ‘चकव्यातून फिरतो मौनी’ हा गौरवग्रंथ श्रीकृष्ण राऊत यांच्या संपादनात प्रकाशित केला आहे. गायनासाठी स्व.छोटा गंधर्व आणि आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मार्गदर्शन लाभलेले सुधाकर कदम हे एक उत्तम शिक्षक, संगीतकार, गायक, वादक तर आहेतच पण विनोदी लेखक, आणि कवी सुद्धा आहेत. 

सुधाकर कदम सी-१-सी/१३, गिरीधरनगर, वारजे माळवाडी ', पुणे - ४११०५८ भ्रमणध्वनी- ८८८८८५८८५०
..............................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

यापूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या 👉
http://gazalyatra2020.blogspot.com


 





संगीत आणि साहित्य :