'गिल्ली मिस्सळ' म्हटले की प्रत्येक खवैयाच्या तोंडाला पाणी सुटतेच. कारण ही 'डिश' सर्वसाधारण वैदर्भीय खवय्यांची 'मर्मबंधातली ठेव' आहे. महाराष्ट्रभर मिळणाऱ्या या खाऱ्या डिशचे आबालवृध्दांना आकर्षण आहे. याचे कारण मिसळीची चटकदार चव. शेव, गाठी, पापडी, चिवडा (शिळ्या बटाटेवड्याचे व समोस्याचे तुकडे.) व वरून झणझणीत रस्सा आणि थोडे दही... नुसत्या वर्णनानेच तोंडाला पाणी सुटले ना? तर मंडळी, प्रत्येक गावच्या मिसळीची 'किक' थोड्याफार फरकाने सारखीच असते. तरी पण काही काही गावच्या खास खास चवीमुळे त्या त्या गावच्या मिसळी आयुष्यभर लक्षात राहतात. मिसळीमध्येही दोन प्रकार आहेत. एक सुकी मिसळ व दुसरी गिल्ली मिसळ. आपल्याकडे गिल्ली मिसळ लोकप्रिय आहे. कधी कधी रस्सा नाही म्हणून, नाइलाजाने 'फरसाण' या गोंडस नावाने सुकी मिसळही स्वाहा केली जाते. पण खरी मजा मात्र 'गिल्या' मिसळीतच आहे.
अमरावतीच्या राजकमल चौकातील खड्डा हॉटेलमधील दही मारलेली मिसळ मला लहानपणापासून जीव लावून आहे. अमरावतीला गेल्यावर ही मिसळ मारल्याशिवाय अमरावती वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नव्हते. आज ते खड्डा हॉटेल आहे की नाही माहीत नाही.जर असेल आणि 'तीच' चव कायम असेल तर त्या मालकाचा व भट्टी मास्तरांचा, समस्त मिसळप्रेमींनी सत्कार करायला काहीच हरकत नाही.
झणझणीत मिसळीसाठी एके काळी यवतमाळात जुन्या एस. टी. स्टँडवरील एक सिंधी हॉटेल प्रसिध्द होते. बसस्थानकाची नवी इमारत व्हायची होती. तेथे फक्त टिनाचे एक मोठे शेड होते. तेव्हाची ही गोष्ट आहे. या हॉटेलमध्ये रात्रभर ग्राहकांची वर्दळ असायची. यवतमाळातील बहुतांश कलाकार रात्री येथे येत असत. आम्हीही ऑर्केस्ट्राची प्रक्टिस आटोपली की, रात्री एक ते तीनपर्यंत या हॉटेलात दत्तक गेलेले असायचो. इथली मिसळ काही औरच होती. (मालक तिच्यात आपला 'दिल' टाकत होता, असे तेव्हा म्हणायचे.) या खास चवीमुळे रात्री-बेरात्रीसुध्दा 'रसिकांची' खूप वर्दळ राहायची. रात्री तीन ते चार वाजेपर्यंत मिसळ खाऊ घालणारे ते यवतमाळातील एकमेव हॉटेल होते. आम्ही त्यावेळी शिकत असल्यामुळे पैशाची सदाच कडकी असायची. पण अऑर्केस्ट्राचे कलाकार म्हणून आमच्यावर मालकाची सतत मेहेरनजर असायची. उधारी थकलेली असूनही वेळप्रसंगी तोच आम्हाला आर्थिक मदत करायचा. इथली मिसळ अमरावतीच्या मानाने झणझणीत असायची व पहिल्या घासातच आपला 'ठसका' दाखवायची.
पुण्या-मुंबईकडेसुध्दा मिसळ प्रकार आहे. पण तिला विदर्भाच्या मिसळीची सर येत नाही. तिकडे पाव-मिसळ किंवा पाव-भाजी प्रकार खूप चालतो. कारण सर्वसाधारणांचे ते 'खास' अन्न आहे. पण श्रीमंतांची चोचलेगिरी करणारी जीभ या खास अन्नाकडेही वळली व सर्वसाधारणांच्या तोंडचा घास पळवून अस्मानाला भाव भिडवून बसली. (भाववाढीचे महकार्य केल्याबद्दल सगळ्या विक्रेत्यांनी या उच्चभ्रू मंडळींचे आभार मानायला हवे. नाही तर कोण विचारत होते या पाव भाजी व मिसळ पावाला!) पण तेही असो. विषय मिसळचा आहे.
मिसळ हा एक फक्त खाद्यपदार्थ आहे असा आजपर्यंत सार्वत्रिक समज होता. पण वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबद्दलकडे पाहिल्यावर राजकारणातही मिसळ असते.आणि तीही 'गील्ली' व 'सणसणीत' असते याचा अनुभव सर्व महाराष्ट्र वासीयांना आला. खायच्या मिसळीतील बहुतांश पदार्थ बेसनाशी नाळ जोडून असलेले दिसतात. पण या मिसळीत मात्र कोणाची, कोणाशी, कोणत्याच प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. एखाद्या विक्षिप्त माणसाने जर भजी, पेढा, शेव, लाडू, पापडी, जिलेबी, गाठी, गुलाबजाम अशा भिन्न चवीच्या विरुध्द गुणधर्माच्या पदार्थांची मिसळ केली तर तिची चव कशी लागेल याचा अंदाज वाचकांनी घ्यावा व या मिसळीकडे बघावे ! त्यात भरीस भर म्हणून शिळेपाके, नासके पदार्थ टाकले तर? असो!
अशी ही मिसळ तयार तर झाली आहे, पण जनतेला ती कितपत आवडली याचा अंदाज अजूनपर्यंत घेता आलेला नाही. तरी पण तिच्या चेहऱ्यावरून थोडाफार अदमास यायला लागला आहे. खरे तर, ही मिसळ म्हणजे एक चमत्कृती आहे आणि चमत्कार म्हटले की काहीही होऊ शकते. (असे चमत्कार फक्त भारतवर्षातच होऊ शकतात. इतर देशांची काय मजाल आहे!) आणि हे चमत्कार प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही. ही मिसळ अजूनही अनेक चमत्कार दाखविणार आहे. तरी बा अदब ! बा मुलाहिजा । होशियाऽऽऽर!