लोकसभेचा सामना जाहीर झाल्याबरोबर भारतातील समस्त राजकीय संघ धूळ झटकून कंबर कसून मैदानात उतरले आहे. हा सामना जरा लवकर व्हावा अशी काही संघांची इच्छा होती. तर जुन्या विजेत्या संघाला तयारी व 'साफसफाईकरिता' वेळ मिळावा म्हणून हा सामना उशीरा व्हावा असे वाटत होते. आपाल्या कप्तानपदाला शह देणाऱ्या खेळाडूंना संघाबाहेर पाठवून नवीन खेळाडूंना वाव देवून आपले कप्तानपद कायम ठेवण्याकरिता हा वेळ मिळणे आवश्यक होते. यात ते काही अंशी सफलही झाले.
या सामन्यात अखिल भारतीय स्तरावरील सर्व संघ खेळणार असले तरी त्यातील दोनच संघ अत्यंत बलाढ्य असल्यामुळे विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालणार यावर प्रेक्षकांमध्ये करोडो रूपयांचा सट्टा लावणे सुरू झाले आहे. (खेळावर लावलेला सट्टा, जुगार या संज्ञेत मोडत नसल्यामुळे यावर कोणीच काही बोलत नाही. त्यामुळे तुम्हीही प्रयत्न करायला हाकत नाही. "जमी तो जमी, नहीं तो मोहंमद शमी !") या सामन्याचे वैशिष्ठ्य म्हणजे संघाचा विजय हा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. ज्या संघावर प्रेक्षक खूष तो संघ जिंकणार. पण प्रेक्षक मात्र कोणावर खूप आहे या बाबतीत ताकास सूर लागू देत नाही.
या सामन्यातील प्रत्येक संघ आपला संघ कसा चांगला आहे याचे तुणतुणे सतत वाजवून आम्ही जिंकलो तर काय काय करणार याचे (फुटके) ढोल बडवत असतात. पण आजकाल प्रेक्षकही या दोन्ही आवाजाला सरसावल्यामुळे मुळीच दाद देत नसल्याचे दिसून येते. था देशब्यापी सामन्याला अमाप खर्च येतो. खेळ जरी राजकीय संघ खेळणार असले व विजयी संघ जरी पाच वर्षे मलिदा खाणार असला, तरी हा खर्च मात्र प्रेक्षकांच्या पैशातून होणार असतो. ही परंपरा फार प्राचीन असल्यामुळे यात बदल घडून येण्याची शक्यता फार कमी आहे. तरीपण कोणे एके काळी शेषन नामक मुख्य पंचाने सामन्याच्या सुरवातीला होणाऱ्या धुळवडीच्या मैदानी आतिषबाजीवर बंदी घातत्यामुळे कोट्यावधी रूपये वाचले होते असे म्हणतात. पण त्यामुळे सर्व संघांना झीम्मा, फुगडी या बायंकी खेळावर समाधान मानून दुधाची तहान ताकावर भागशवी लागली होती अशी वदंता आहे. यावेळी मात्र एका स्त्री खेळाडूला तिच्याच संघातल्या लोकांनी फुगडी घालायला मनाई केल्यामुळे तिने खो-खो खेळायला सुरवात केली आहे.
स्त्री व पुरुष खेळाडूंनी एकत्र खेळण्याचा हा एकमेव खेळ असल्यामुळे समानतेचे युग आल्याची सर्वांना खात्री पटते. प्रेक्षक वर्गही सामन्याच्या दिवशीपर्यंत चेअरींग' देवून खेळाडूंना प्रोत्साहीत करीत असतात. या खेळात प्रत्यक्ष सामन्यापेक्षा अगोदरच्या खेळात अधिक मजा येत असल्यामुळे प्रेक्षक व खेळाडू आपले एकमेकावर किती प्रेम् आहे हे दाखविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतांना दिसून येतात. खेळ सांघिक जरी असला तरी प्रत्येक खेळाडूला एक एक मैदान वाटून देवून त्याला एकटे सोडण्यात येते. या मैदानात प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू उत्तरलेला असतो. प्रत्येक संघातील खेळाडूंना विरुद्ध संघाच्या खेळाडूंवर होळीच्या बोंबांप्रमाणे बो बो बोंबा मारायचे प्रशिक्षण खास ढंगात दिल्या जात असल्यामुळे 'रसिक' प्रेक्षकांना 'शिमग्याची' मजा लुटायला मिळते,
ते काहीही असले तरी यावेळी प्रेक्षकांना मात्र ते आपल्या खऱ्या-खुऱ्या मायबापापेक्षाही जास्ती मान देवून, सामना जिंकून देण्याची विनंती करीत असतात. या सामन्यातील खेळाडू आपआपल्या संघाच्या रंगसंगतीचे कपडे वापरत असल्यामुळे लात, निळा, भगवा, तिरंगी, लात-हिरवा,पिवळा अशा विविध रंगाचे मिश्रण पाहण्याचा अभूतपूर्व योग समस्त भारतवासीयांना दर निवडणुकीत बघायला मिळतो.यातील काही खेळाडू सरावासाठी आलेला निधी हडपून बसतात. त्यामुळे संघांतर्गत दुफळी सुरू होते.पण वरची फळी जर मजबूत असली तर या दुफळीचा फारसा परिणाम होत नाही.
सध्या एकमेकांच्या संघातील खेळाडू चोरून सामना रंगविण्याचा नवीनच प्रकार सुरू झाला आहे.परंतू या प्रकारामुळे देशातील समस्त संघ मेटाकुटीला आले असून मूळ खेळाडू नाराज होऊन लाल-हिरवे होऊन 'आवजी-जावजी हाय हाय'चे नारे लावताना दिसत आहे.या 'आवजी-जावजी' प्रकारामुळे शीतयुद्ध सुरू झाले आहे.तसेच संस्थांतर्गत रंगयुद्धही सुरू झाले असून 'आवजी-जावजी'वाल्या खेळाडूंना परत पाठविण्याची तयारी समस्त भारतवासी प्रेक्षक करीत असल्याचे दिसत आहे.पण हे काही बरोबर नाही.याला 'स्पोर्ट्समन स्पिरिट' म्हणत नाही.खेळाडू तो खेळाडू, मग तो कोणत्या का संघाचा असेना त्याला 'चेअरींग' दिलेच पाहिजे.
*** *** आगे बढो हम तुम्हारे साथ हय....
भारत माता की जय!!!