गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, October 9, 2023

उत्कट भावनेची सर्वस्पर्शी कविता

                  #काळोखाच्या_तपोवनातून

     विदर्भातील सुधाकर कदम हे प्रामुख्यानं संगीतकार, गझलगायक म्हणून सर्वविदित असले तरी एक कवी, गझलकार, गीतकार, विडंबनकार, देखील आहेत. 'मीच आहे फक्त येथे पारसा' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. प्रदीर्घ कालावधीनंतर आता त्यांचा 'काळोखाच्या तपोवनातून' हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशीत झालाय्. त्यात त्यांनी गझल, कविता, अभंग, द्विपदी, मुक्तछंद आदी काव्यप्रकार हाताळले आहेत. चिंतनात्मक कवितेबरोबरच, वरवर हलकाफुलका वाटणारा परंतु अंतर्मुख करायला लावणारा हजल विडंबन हा काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच सहजतेनं मिश्कील शैलीत अक्षरबद्ध केलाय्. त्यांच्या हजलमधील नर्मविनोद वाचकांना आवडणारा आहे. तपस्वी असल्याशिवाय काळोखाच्या तपोवनातून प्रवास नाही करता येत. भरजरी दुःखाचे चांदणे लेवून वेदनेची कोजागरी साजरी करण्याची कवीला हातोटी लाभलीय्. चिंतनाची डूब असणाऱ्या कविता अन् खट्याळपणाचा बाज या दोन्ही निरनिराळ्या बाजू एकाच वेळी वाचकांसमोर येतात. हे कदमांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे.
     गझलसम्राट सुरेश भटांचा सहवास लाभल्यानं गझलेची खरी ताकद काय असते, गीतातील तरलता, मनाला स्पर्शून जाणारा भाव याचा आदमास कवीला आलेला आहेच. कदम मुलत: संगीतकार असल्यानं गझल, गीताचा फार्म समजून घेण्याचा त्यांना फारसा प्रयास करावा लागला नाही. फाॅर्म्स हाताळताना त्यातील काव्यमूल्य हरवणार नाही. याची त्यांनी कवी म्हणून काळजी घेतलीय्. राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितेबरोबरच नातेसंबंधावरही भाष्य करणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत. निसर्गाची टवटवीत शब्दचित्रंही त्यांनी रेखाटली आहेत. जगाकडे, स्वतःकडे अन् निसर्गाकडे पाहण्याची सहजदृष्टी काळोखाच्या तपोवनातून प्रतिबिंबित होते.
     एका माणसाचं पुढं जाणं, त्यानं प्रगती करणं, दुसऱ्या माणसाला रुचत नाही, पचत नाही. त्याचे पाय ओढण्याची त्याच्यात ईर्षा असते. माणसाची जात अन् खेकड्याची जात यात फारशी तफावत नाही. इथूनतिथून त्यांची चाल वाकडीच असते. त्यात शिकार होते ती सरळमार्गी माणसाची. राजकारण असो की समाजकारण त्यातल्या चढाओढी, ओढाओढी नित्यनेमानं निदर्शनास येत राहातात. दिवसेंदिवस माणूस आत्मकेंद्रीत होत चाललंय् याची कितीतरी उदाहरणं पाहावयास मिळतात. 'छोटी बहर' मध्ये कदम म्हणतात.

माणसातील खेकडे
चालताती वाकडे

राजकारणात ज्या हवे
तेच बनती माकडे

     देवधर्म श्रद्धा अंधश्रद्धा याबाबत कदमांची मतं अगदी ठाम अन् परखड आहेत. देवाचा निवास दगडी मंदिरात नसतो तर तो माणसाच्या हृदयमंदिरात असतो. परंतु त्याचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न नाही करत. काबा असो की काशी, देवाला शोधण्यासाठी त्यांची निरंतर पायपीट सुरूच असते. देवाच्या शोधार्थ सुरू असलेल्या भटकंतीत देव कधीच गवसत नाही. फक्त दिखाव्याला तो बळी पडतो. अन् स्वतःची फसगत करून घेतो. 'तुझे आहे तुजपाशी' याचा त्याला नेहमीच विसर पडत आलाय. हातचं न राखता कवितेतून सत्य सांगणं, अनुभवाचं बोल पोटतिडकीनं मांडणं हे कवीचं आद्य कर्तव्यच ठरतं. अनुभवातून प्रकट झालेला हा शेर अध्यात्माचं सध्यात्म सांगणारा आहे.

काबा-काशी फिरून पाहिले
सारा फक्त दिखावा आहे

     देवाच्या अन् दैवाच्या नावानं माणसाचं शोषण केलं जातं. धनाच्या, कष्टाच्या रूपानं हे शोषण अव्यहात होत राहतं. यावर रिकामटेकडे भरपेट खात राहातात. हा अभंगही अंतर्मुख करून जातो.

रिकामटेकडे/ फुकाचे खाती
कष्टकऱ्या हाती/ टाळ देती//

     जो माणूस माणसाला प्रेम अर्पितो, दीनदुःखितांच्या व्यथांना आपल्या ओंजळीत घेतो, त्यांची फुले करतो, त्यांना दिलासा देतो, मनात मानवतावाद सदैव जिवंत ठेवतो त्यालाच चारीधामंच दर्शन घरबसल्या होतं. इथं प्रदर्शन नसतं. संताची शिकवणही याहून निराळी नाही. याच पायवाटेवरून जाणारा हा अभंग.

दीन दु:खितांना/ मदत जे करी
तेणे मुक्ती चारी/ साधियेल्या//

     माणसाला सप्तरंगी इंद्रधनुष्याचं मोठं आकर्षण असतं. त्याचं जीवन कधी एकाच रंगात रंगू नाही शकत. प्रत्येकाच्या जीवनाचे रंग निराळे, विश्व निराळे असते. जीवनात शुभ्र अन् काळा रंग सुखदुःखाचं प्रतीक म्हणून येतात. माणूस सुखाशी जसा लळा लावतो तसा दुःखाशी नाही लावत. शुभ्रता तर सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. पण दुःखाची, काळोखाची गर्द छाया नको नकोशी वाटत राहाते. माणसाला काळोखाच्या तपोवनातूनही प्रवास करता आला पाहिजे. असं कवीला वाटत राहातं.

असा कसा तुझा रंग जीवना तुझा निराळा
कधी हवासा, कधी नकोसा शुभ्र व काळा

     मातीच्या, आकाशाच्या, पाण्याच्या, हवेच्या जातीची विचारपूस माणूस नाही करत. परंतु माणसाच्या जातीची चौकशी तो हस्ते परहस्ते करत राहतो. जाती-धर्माची ठावठिकाणी ठाऊक करून घेतल्याशिवाय पुढची वाटचाल नाही करता येत. तो जात विरहीत समाजरचनेवर बोलत राहिला तरी जात त्याला गोचिडासारखी चिकटलेली असते. जातीच्या चक्रविवाहातून त्याची कधी सुटका नसते. समाजातील भयाण वास्तवाची जाणीव कदम त्यांच्या शेरातून करून देतात.

मानतो कोठे खरे तर जात आपण?
चिकटुनी बसते किती ती जन्मतः पण

     मातीतून फुल उगवते. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. आपण त्या सुगंधानं मत्त प्रसन्न होऊन जातो. परंतु हा सुगंध वाटण्यासाठी याला किती यातना कराव्या सहन लागतात. याकडं आपलं लक्ष नाही जात फुलाच्या रोपाला आधी मातीत गाडून घ्यावं लागतं. मातीचं अस्तर फाडून त्याला वर यावं लागतं. फुलांवरती हा एक प्रकारचा सुगंधी कहर असतो. निसर्गाच्या संबंधात तत्वज्ञानाची जोड देत ही सष्टाक्षरात कविता कदम अशी लिहितात.

मातीचे अत्तर
त्यास ना उत्तर
फुलांच्या वरती
सुगंधी कहर

     गझल अन् अभंगातून सामाजिक आशयाची भरगच्च मांडणी करणाऱ्या कदमांनी प्रेम या सदाबहार विषयातली चिरतरुण उत्कटताही सहजस्फर्तपणे अविष्कृत केलीय्. प्रेमामध्ये किती किती तरी तऱ्हा असतात त्या त्यांनी द्विपदीतून नेमकेपणाने सांगितल्यात.

प्रारंभाला उधळण तुझी सवय ही जुनी
झेपावते विजेसम नागमोडी कल्लोळुनी

     '#काळोखाच्या_तपोवनातून' जीवन रसाचे उत्कट दर्शन घडविताना अनेक कविता वाचकांशी सुसंवाद साधतात त्याचं कारण कदमांच्या कवितेत गेयता, प्रासादिकता अधिक प्रमाणात आहे.
     व्यंग विडंबनेतूनही समाजाचं दुःख प्रभावीपणे मांडता येतं. लोकांना जेव्हा सत्य थेटपणानं सांगण आवडत नाही तेव्हा रचनाकाराला उपरोधिक शैलीचा वापर करावा लागतो. विडंबनकार हा भाष्यकार असतो. त्याच्या भाष्याने हास्य निर्माण होत असले तरी त्यातील सल अन् पीळ कटूसत्याचा असतो. विडंबनकार अशा सत्याची रुजवात करत असतो. विडंबनात्मक हजलेचे हे शेर पाहा.

कणव न येई शेतकऱ्यांची
असले नेते त्यांच्या गाठी

आर्त भक्त म्हणावया
भोंग्यावरती 'कल्लोळे'

    सुधाकर कदमांनी जवळपास सर्वच काव्यप्रकार सैल हाताने लिहिले आहेत. गीत संगीताचं सांगीतिक नातं अतूट असतं. हे स्वतः गीतकार संगीतकार असूनही गीतांच्या बाबतीत त्यांनी हात आखडता का घेतला हे कळायला मार्ग नाही.

काळोखाच्या तपोवनातून (काव्यसंग्रह)
कवी: सुधाकर कदम
प्रकाशक: स्वयं प्रकाशन पुणे
पृष्ठे: ९५ मूल्य: १५०

बदीऊज्जमा बिराजदार
(साबिर सोलापुरी)
'उत्सव' पुरवणी
दैनिक सामना,
रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 

राग-रंग (लेखांक २७) बिलावल


गीतवाद्यविनोदेन कालो गच्छति धीमताम |
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

अर्थात:- बुद्धिमान लोक गायन, वादन, विनोदात आपला वेळ घालवतात.आणि मूर्ख लोक निद्रा,भांडण आणि विविध व्यसनात आपला वेळ घालवतात.

      'बिलावल' थाटाचे मूळ एकोणविसाव्या शतकाच्या सुरवातीला उत्तर भारतीय संगीतात रुजले.बिलावल रागमाले मध्ये हा राग भैरव रागिणीच्या रुपात प्रगट झालेला दिसतो.परंतू आज हा बिलावल थाटाचा प्रमूख मानल्या जातो.रागमाला बिलावलला भैरवाच्या पुत्र रुपात बघतात.पण या दोन्ही रागात आज काहीच साम्य व संबंध नाही.
      उत्तर भारतातील शीख परंपरेतील रागांपैकी एक राग बिलावल आहे.आणि तो शीखांचा पवित्र ग्रंथ ,श्री गुरू ग्रंथ साहेबांचा एक भाग आहे.त्यातील प्रत्येक रागाचे नियम कडकपणे पाळल्या जातात.त्यामुळे त्यातील स्वरांची संख्या, कोणत्या स्वरांचा उपयोग कसा करायचा,त्यांची परस्पर प्रतिक्रिया काय, याचा धून रचताना उपयोग केला जाते. हे नियम पाळूनच धून रचल्या जाते.,श्री गुरू ग्रंथ साहेबात एकूण साठ रागांच्या रचना आहेत.साठ रागांच्या या साखळीत बिलावल तेहत्तीसवा राग आहे.या रागाच्या रचना पृष्ठ संख्या ७९५ ते ८५९ म्हणजेच ६४ पानांवर दिसून येते.
     बिलावल थाट भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तर भारतीय  शैलीत वर्णन केलेल्या दहा थाटांपैकी एक आहे.यात सर्व स्वर शुद्ध आहे.यात कोमल निषादाचा प्रयोग केला अलैह्या बिलावल राग तयार होतो.याच्या अवरोहात कोमल निषादाचा अल्प प्रयोग वक्र रुपात केल्या जातो.याचा वादी स्वर धैवत आहे,पण धैवतावर न्यास केल्या जात नाही.याचे न्यास स्वर पंचम आणि गांधार आहे.या रागात धैवत गांधार संगती महत्वपूर्ण आहे.मींड स्वरूपात ती आपल्या समोर येते.पंडित विष्णु नारायण भातखण्डे कृत ‘क्रमिक पुस्तक मालिका’ 
(भाग-१)अनुसार ‘बिलावल’ थाटाचा आश्रय राग ‘बिलावल’च आहे. या थाटांतर्गत येणारे मुख्य राग :- अल्हैया बिलावल, बिहाग, देसकार, सरपरदा,मलुहा केदार, जलधर केदार, लच्छासाख, कामोद नट, केदार नट, बिहागडा, सावनी, छाया, गुणकली, दीपक, पट बिहाग, नट बिहाग, नट, हेमकल्याण, दुर्गा, शंकरा, पहाड़ी, भिन्न षड्ज, हंसध्वनि, मांड वगैरे वगैरे.या रागाचा गायन-वादन  समय सकाळचा पहिला प्रहर आहे. (संदर्भ : भातखंडे-संगीतशास्त्र (भाग १), हाथरस, १९६४)                    
        बिलावल रागाचे अनेक प्रकार आहेत.जसे:-बिलावल,अलैह्या बिलावल,देवगिरी बिलावल, कुक्कुभ बिलावल, लच्छासाख बिलावल, नट बिलावल,शुक्ल बिलावल,यमनी बिलावल वगैरे वगैरे.यातील पं. भीमसेन जोशींनी गायिलेला यमनी बिलावल व पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांनी गायिलेला शुक्ल बिलावल ऐकण्यासारखा आहे. (यमनी बिलावल रागाचा थाट  कल्याण मानला जातो.यात दोन्ही मध्यमांचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.याची जाती संपूर्ण मानल्या जाते. वादी स्वर पंचम और संवादी षडज असून,गायन समय दिवसाचा पहिला प्रहर आहे.देवगिरी बिलावल याचा समप्रकृतिक राग आहे.)
       रवींद्रनाथ टागोरांच्या 'रवींद्र संगीतात' बिलावल रागाच्या अनेक स्वरूपांचा प्रयोग केल्याचे खालील यादीवरून कळून येते.● बिलावल-अजी हेरी सोंगसर अमृतो,देखा जोड़ी दिले, देखो सोखा भूल,अरे सोम तारे देखो,ओकी सोखा मुचो अंखी,तुमी के गो सोखिरे केनो.● अलैह्या बिलावल-अजी मेघ केते गेचे,बोस अची हे,हृदयोये चिली जेगे,के रे ओय दकिचे,खोमा करो अमय,ओइ पोहेलो तिमिरोराती,प्रोभु एलेम कोथाय,संगसरेते चारिधर.● देवगिरी बिलावल-देबाधिदेब मोहदेब,सबसे आनंद करो.● कुक्कुभ बिलावल-कोथाय तुमी अमी.● लच्छासाख बिलावल-बोहे निरंतर अनंता.● नट बिलावल-मोन जेन मनोमोहोन.●शुक्ल बिलावल-
नित्यो नबो सत्यो ताबो.● मिश्र बिलावल-शुनेचे तोमर नाम, सोखा हे की दिये आमी.● मिश्र अलैह्या/मिश्र केदार-काचे चिली ड्यूरे.

      'बिलावलके प्रकार' म्हणून प्रो.बी.आर.देवधर यांचे दीड तासाचे ध्वनिमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे.यात बिलावल रागाच्या सर्व प्रकारावर सविस्तर चर्चा व गायन आहे. युट्युबवरच 'राग बिलावल राग अल्हैया बिलावल पर गुणीजनो के अपने अपने विचार' या शीर्षकांतर्गत पंडित श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, पंडित गजानन जोशी, पंडित रामाश्रय झा, पंडित ओंकारनाथ ठाकूर, पंडित दत्तात्रय विष्णू पलुस्कर, प्रो.बी.आर.देवधर, पंडित कुमार गंधर्व यांचेही ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे.गांधर्व महाविद्यालय दिल्ली द्वारे आयोजित .'भारतीय शास्त्रीय संगीत चर्चा' म्हणून 'राग बिलावल विचार गोष्ठी' (१९५४-१९६०) आयोजित करण्यात आली होती.यात पंडित विनयचंद्र मौदगल्य, पंडित यामध्ये  पं.  श्रीकृष्ण नारायण रातांजनकर, उस्ताद विलायत हुसेन खान, प्रो.बी.आर.देवधर, पंडित विनायकराव पटवर्धन, पंडित व्ही.आर.आठवले, उस्ताद चांद खान, उस्ताद मुश्ताक अली खान हे सहभागी झाले होते.ही चर्चा पण अभ्यासकांसाठी युट्युबवर उपलब्ध आहे. याशिवाय उस्ताद विलायत हुसेन खान (यांचे १९३४ मधील ध्वनिमुद्रण), पंडित भीमसेन जोशी,  अजय चक्रवर्ती यांनी गायिलेले बिलावल प्रकार ऐकू शकता.

● बिलावल थाटावर आधारित गाणी...

'ऐ दिल है मुश्किल जीना यहां' रफी,गीता दत्त.चित्रपट-सी. आय.डी. संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५६). 
'उडे जब जब जुल्फे तेरी' आशा,रफी. चित्रपट-नया दौर.संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५७). 
'दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा' लता.चित्रपट-मधुमती.संगीत-सलील चौधरी (१९५८). 
'लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो' लता. चित्रपट-व ह कौन थी.संगीत-मदन मोहन (१९६४). 
'इक प्यार का नगमा है' लता,मुकेश. चित्रपट-शोर. संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७२). 
'भोर आई गया अन्धियारा' मन्ना डे, किशोर कुमार,लक्ष्मी शंकर.चित्रपट-बावर्ची. संगीत- आर.डी. बर्मन (१९७२). 
'सारे के सारे ग म को लेकर गाते चले' आशा भोसले,किशोर कुमार. चित्रपट-परिचय. संगीत-आर.डी. बर्मन (१९७२). 
'मै जट यमला पगला' रफी.चित्रपट-प्रतिज्ञा. संगीत- लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९७५). 
'छुकर मेरे मन को किया तूने क्या इशारा' किशोर कुमार.चित्रपट-याराना.संगीत-राजेश रोशन (१९८१). 
'जिंदगी गम का सागर भी है' किशोर कुमार.
चित्रपट-सौतन.संगीत-उषा खन्ना (१९८३). 
'गली में आज चांद निकला' अलका याज्ञिक.
'दिल है छोटा सा,छोटीसी आशा' मिनमिनी.चित्रपट-रोजा. संगीत-ए.आर.रहमान (१९९२). 
चित्रपट-जख्म.संगीत-एम.एम.करीम (१९९८)
'कौन कहता है कि भगवान आते नही' भक्तीगीत-मीनाक्षी मुकेश वर्मा.संगीत-मॅक व्ही (२०२२)
'ओम् जय जगदीश हरे' आरती-अनुराधा पौडवाल.

बिलावल रागावर आधारित सगळ्यात जास्ती गाणी तामिळ चित्रपटात आहेत.
__________________________________________

दैनिक उद्याचा मराठवाडा,'नक्षत्र' पुरवणी,रविवार दि.८ ऑक्टोंबर २०२३.


 





संगीत आणि साहित्य :