Saturday, October 9, 2021
Monday, October 4, 2021
श्रेष्ठ कलाकार,श्रेष्ठ माणूसही...दिलीप पांढरपट्टे
सुधाकर कदम यांचा माझा स्नेहसंबंध सुमारे पंधरा वर्षांचा आहे आणि दिवसेंदिवस हा स्नेह वाढतच आहे हे मी सुरुवातीलाच आनंदाने सांगू इच्छितो.
माझ्या आठवणीप्रमाणे ते मुंबईत बांद्र्याला झालेल्या गझल संमेलनात मला पहिल्यांदा भेटले.
यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीहून ते लांबलचक आणि खडतर प्रवास करून मुंबईच्या या संमेलनात गझल सादर करण्यासाठी आले होते. त्यांची ही तळमळ आणि गझलसाठी प्रसंगी शारीरिक आणि मानसिक त्रास सोसण्याची तयारी मला तेव्हा खूपच भावली होती.
(त्यांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास तेव्हाही होता, हे लक्षात घेतले तर त्यांच्या या प्रवासातले त्यांचे धाडस लक्षात येते.)
त्याच संमेलनात 'शब्द झाले सप्तरंगी' या माझ्या गझलसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. तो संग्रह मी त्यांना आवर्जून भेटही दिला होता.या घटनेला सात-आठ वर्षे उलटून गेली आणि सुधाकरजींचा एके दिवशी
अचानक फोन आला. दरम्यानच्या काळात ते निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाले होते आणि माझ्या
काही गझलांना त्यांनी चाली लावल्या होत्या हे मला त्यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणातून कळले. त्यांच्या गायनाबद्दल आणि संगीतकार म्हणून असलेल्या त्यांच्या मातब्बरीबद्दल मला आधीपासूनच आदर होता. त्यामुळे या फोनमुळे मी साहजिकच हरखून गेलो आणि त्यांच्या चालींमध्ये त्यांच्याच आवाजात त्या गझला ऐकण्याची उत्सुकता वाटू लागली. यथावकाश आमची भेटही झाली; आणि त्या भेटीची मैफल कशी झाली ते कळलेच नाही. पुण्यातल्या वारजे इथल्या
त्यांच्या घरी पुढे अशा अनेक मैफली जमल्या. त्यांच्या कुटुंबियांच्या स्नेहशील स्वभावामुळे त्यांच्या घरी बसलो की, वेळ कापरासारखा उडून जातो हा अनुभव मला नेहमीच येतो.
सुधाकरजी हे केवळ गायक व संगीतकार नाहीत; तर ते एक चांगले वाचक आणि लेखकही आहेत. 'फडे मधुर खावया' या त्यांच्या छोटेखानी गद्य पुस्तकात अनेक खुमासदार लेख आहेत. त्यातून त्यांच्या बहुश्रुतेचे आणि एकूणच जगण्याकडे बघण्याच्याउमद्या वृत्तीचे प्रत्यंतर येते.
'काट्यांची मखमल' आणि 'तुझ्यासाठीच मी' या दोन गझल अल्बममध्ये माझ्या गझलांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. सुरेश वाडकर आणि वैशाली माडे या लोकप्रिय गायक-गायिकांनी या गझल गायिल्या आहेत. सुधाकरजींनी या दोघांकडून ज्या कौशल्याने या गझला गाऊन घेतल्या आहेत, ते केवळ थक्क करणारे आहे. त्यांच्या आजवरच्या संगीतसाधनेचा आणि व्यासंगाचा पुरा अर्क या गझल अल्बममध्ये उतरला आहे असे निश्चितपणे म्हणता येते.
यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात बहुतेक सर्व आयुष्य व्यतीत झाल्यामुळे त्यांना मुंबई-पुण्याचा फारसा 'वारा' लागलेला नाही हे त्यांना भेटल्यावर एक-दोन मिनिटांतच कुणालाही सहज पटेल. प्रसिध्दीची फारशी सोय नसल्याने आणि त्यासाठी अंगी असावे लागणारे 'तंत्र' ही त्यांच्याकडे नसल्याने ते म्हणावे तितके प्रसिध्दीच्या झोतात आले नसतीलही, पण तो त्यांचा
पिंडच नाही असे मला वाटते. त्याची त्यांना फार खंतही नाही.कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जीवन समरसून जगण्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे आयुष्यात काय मिळाले, काय नाही याचा ते फारसा विचार करीत नाहीत, कधी केलाच,तर तो स्थितप्रज्ञतेने किंवा साक्षीभावानेच करताना ते दिसतात.
'मैं जिंदगीका साथ निभाता चला गया,
हर फिक्रको धुएँमे उडाता चला गया'
अशा भावनेने जगणारा हा कलंदर कलावंत आहे.
म्हणून मला ते एक श्रेष्ठ कलाकार वाटतात आणि एक श्रेष्ठ माणूसही!
---------------------------------------------------------------------
●डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित गझलगंधर्व सुधाकर कदम सन्मानग्रंथ #चकव्यातून_फिरतो_मौनी मधून...
Subscribe to:
Posts (Atom)