गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Saturday, April 20, 2024

लोपला चंद्रमा...मराठी गझल.


     डॉ.श्रीकृष्ण राऊतांची 'लोपला चंद्रमा' ही वेगळ्या ढंगात स्वरबद्ध झालेली बहुप्रतिक्षित गझल पद्म श्री सुरेश वाडकरांच्या मधाळ आवाजात नुकतीच ध्वनिमुद्रित केली.ही गझल माझ्या प्रत्येक कार्यक्रमात 'वन्समोअर' घ्यायची. खरे तर ही सुरावट जवळ-जवळ ४२/४४ वर्षांअगोदरची आहे.पण सुरेशजींनी एकदम नवी करून तिला वेगळीच झळाळी दिली.बऱ्याच वर्षात अशा प्रकारची रचना रसिकांना ऐकायला मिळाली नसावी असे मला वाटते.
       संगीत संयोजन जयपूरचे ऋषिकेश सोनी यांचे असून, यातील ठसकेदार तबला व ढोलक संगत किशन कथक (जयपूर) आणि बहारदार बॅंजो वादन फल्ला भाई (अलवर) यांचे आहे. 'व्हाईस रेकॉर्डिंग' मुंबईच्या आजीवासन स्टुडिओमध्ये केले असून,बाकी ध्वनिमुद्रण,मिक्सिंग, मास्टरिंग 'रॅप' स्टुडिओ जयपूर,राजस्थान येथे केले आहे.
 #sudhakarkadamscomposition

●headphone or earphone please


 

Tuesday, April 16, 2024

आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज... डॉ.श्रीकृष्ण राऊत.


         १९८० ते १९९० हे दशक मराठी कवितेत ख-या अर्थाने ‘गझल दशक’ होते. असं म्हणावयाला हरकत नाही.मंगेश पाडगावकरांचा 'गझल'(१९८१) सुरेश भटांचा ’एल्गार’ (१९८३) खावर यांचा 'गझलात रंग माझा '(१९८५)आणि 'माझिया गझला मराठी'(१९८६)आणि श्रीकृष्ण राऊत यांचा 'गुलाल'(१९८९) हे गझलसंग्रह याच दशकात प्रकाशित झालेत.ह्याच दशकात सुरेश भटांच्या ’रंग माझा वेगळा’, ’एल्गार’ ह्या कार्यक्रमांना अगदी तिकिट विकत घेऊन रसिक श्रोत्यांनी गर्दी केली.मराठी गझलचा प्रचार-प्रसार करणारं एक गझलव्रत ह्या काळात सुरेशभटांनी घेतलं होतं. गावोगावच्या नव्याने लिहू लागलेल्या गझलकारांना पत्रातून-प्रत्यक्ष भेटीत सुरेश भट त्यांना इस्लाह देत. मेनका, लोकमत, लोकसत्ता इ. नियतकालिकात नवोदितांच्या गझलांना प्रसिद्धी देणारी सदरे ह्याच दशकात प्रसिद्ध होत होती.गझलने भारावलेल्या सांस्कृतिक वातावरणाची दखल घेण्यासाठी ठाण्याच्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात ’गझलचे मराठी कवितेवर आक्रमण’ असा परिसंवाद ठेवल्या गेला.
         १९८० - १९९०ह्या दशकाच्या आरंभीच टेप रेकॉर्डर आणि कॅसेट संस्कृती आम होऊ लागली होती.'चुपके चुपके रात दिन आँसू बहाना याद है' ही गुलाम अलींची गझल एवढी लोकप्रिय झाली की तिला 'निकाह' चित्रपटात बॅकग्राऊंडला का होइना पण स्थान मिळाले. मराठी गझलगायनाच्या जन्मासाठी आवश्यक असे सांस्कृतिक पर्यावरण तयार झालेले होते. संगीताची उत्तम जाण असलेले सुरेश भट मराठी गझलेच्या प्रसारासाठी गुणी गझलगायकाच्या शोधात होते.त्याच दरम्यान त्यांची सुधाकर कदमांची भेट झाली आणि मराठी गझल गायनकलेला पहिला गायक-संगीतकार मिळाला.
प्रस्तुत ग्रंथातील तीन लेख ह्या संदर्भात अतिशय महत्वाचे आहेत.
           1.'सुरेश भटांसोबतचे दिवस ' ह्या सुधाकर कदम ह्यांच्या लेखात १९७७- ७८ ला झालेल्या सुरेश भटांच्या पहिल्या भेटीपासूनच्या बारीक-सारीक घटनांचा सविस्तर तपशील आपल्याला वाचायला मिळतो.भट आता हयात नाहीत आपल्या करिअरसाठी त्यांच्या नावावर 'काहीही ' खपवण्याचे प्रयत्न काही व्यावसायिक कलावंतांनी केलेत.त्यामुळे हा तसाच प्रकार असावा अशी शंका येणे रास्त आहे.पण दुस-या बाजुने त्या काळातली सुरेश भटांनी सुधाकर कदमांना लिहिलेली पत्रे वाचली की ह्या शंकाचे निरसन होते.त्यातल्या काही महत्वाच्या पत्राच्या फोटो इमेजेस ह्या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.त्या काळात पु.ल.देशपांडे,व.पु.क¬ाळे यांच्या कथाकथनाच्या आणि सुरेश भटांच्या काव्यगायनाची कॅसेट पुण्याच्या अलुरकर कॅसेट कंपनीने काढली होती.त्या कॅसेट कंपनीकडून सुरेश भटांच्या गझला सुधाकर कदमांच्या चालीत काढण्याचे चालले होते.अरेंजर म्हणून आनंद मोडक सहाय्य करतील असा उल्लेख १९.१२.८१ ला सुरेश भट यांनी लिहिलेल्या पत्रात आहे.
कुठल्या तरी कारणाने ही कॅसेट निघाली नाही.पण तो पर्यंत सुरेश भट यांच्या दहा-बारा गझलांच्या चाली सुरेश भटांना आवडतील अशा गझलगायन शैलीत सुधाकर कदमांनी तयार केल्या होत्या.

            2.'माझी मराठी गझलगायकी' ह्या आपल्या दुस-या लेखात सुधाकर कदमांनी आपल्या वडिलांकडून १९५८ ला हार्मोनियम शिकले. नंतर तबला,गिटार,सरोद अशी वाद्ये शिकल्याचा उल्लेख आहे.मी तेव्हापासूनच गझल गायला सुरुवात केली होती.असेही ते म्हणू शकले असते.पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही.स्वतःच्या परिपक्व चाली घेऊन आपला जाहीर कार्यक्रम ज्या दिवशी पहिल्यांदा सादर करता ते तुमचे रसिकमान्य असलेले पहिले गझलगायन ह्याची नम्र जाणीव त्यांना आहे.
           3.'मराठी गझलगायनाविषयी थोडेसे'ही सुरेश भटांची प्रतिक्रिया 'केसरी'त प्रकाशित झालेली आहे.सुधाकर कदमांचे गझलगायन हे भावगीत गायनापेक्षा कसे वेगळे आहे.हे सुरेश भट यांनी अधोरेखित केले आहे. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प मध्ये झालेल्या सुधाकर कदमांच्या 'अशी गावी मराठी गझल' ह्या कार्यक्रमाचे निवेदन दस्तुरखुद्द सुरेश भट ह्यांनी केले होते.त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो ह्या ग्रंथात दिलेला आहे.तसेच ह्या कार्यक्रमातील सुरेश भट यांच्या निवेदनासह सुधाकर कदमांनी गायिलेल्या इतर अनेक गझला-गीतेही अभ्यासक - संशोधकांसाठी यु ट्युबला उपलब्ध आहेत. सुधाकर कदम हे 'महाराष्ट्राचे मेहदी हसन'आहेत असा अभिप्राय सुरेश भट यांच्या हस्ताक्षरात ह्या ग्रंथात आपल्याला सापडतो.
सुधाकर कदम तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी सारख्या आडवळणाच्या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. त्यांच्या प्रेमाखातर सुरेश भट अनेकदाआर्णीला मुक्कामी रहायचे. 'ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची '(दि. ९/९/¬८१-आर्णी)'हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी' (दि. १२/९/८१-आर्णी) 'येणारा दिवस मला हेटाळत हसणारच'( ३०/१२/¬ ८१-काठोडा) ह्या प्रसिध्द गझला आणि 'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद '( १२/९/८१ -आर्णी) ही प्रसिद्ध नात सुरेश भटांनी आर्णी-काठोडा मुक्कामातच लिहिल्या आहेत. भटांच्या हस्ताक्षरातील ह्या रचनांचे फोटो ह्या ग्रंथात आहेत.
त्यातील गझलसंहिते सोबतच स्वरांच्या काही नोटेशनच्या नोंदी सुधाकर कदमांच्या हस्ताक्षरात आढळतात. गझल लेखनासोबतच त्या गझलची चाल बांधण्याच्या प्रक्रियेत भट आणि कदम हे दिग्गज एकाचवेळी सहभागी असण्याचा तो सुवर्णक्षण होता.

ह्या कालखंडात असे भाग्य सुधाकर कदमांशिवाय अन्य गायकाला लाभले नाही.
म्हणूनच हा ग्रंथ आद्य मराठी गझलगायकाचा दस्तावेज ठरतो.
           अगदी बालपणी तबला,संवादिनी अशी वाद्ये शिकणारे सुधाकर कदम पुढे गायनाकडे वळले.गायनासोबत पुढे मेंडोलिन,अॅकाॅर्डियन¬,संतुर,सरोद अशी वाद्ये वाजवण्यात त्यांचा हातखंडा झाला.गायन की वादन ह्या द्वैतातून त्यांना पं.जितेन्द्र अभिषेकी बुवांनी सोडवले.आणि त्यांची गायनाची वाट नक्की झाली. वरील सर्व वाद्यांच्या वादनप्रभुत्वाने त्यांना संगीतकार म्हणून परिपक्व केले. 
            सुधाकर कदम हे भाग्यवान आहेत, ते ह्या अर्थानं की त्यांचे गुरुवर्य पुरुषोत्तम कासलीकर ह्यांचा लेख जसा ह्या ग्रंथात आहे तसाच त्यांची शिष्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. सीमा काशेट्टीवार ह्यांचाही लेख आहे.कोणत्याही कलेत कलावंताचे योगदान हे त्या कलावंताच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढीशी सांधलेले असते. ह्या दुव्यालाच आपण परंपरा म्हणतो.अशा परंपरेच्या संदर्भातच त्या कलावंताच्या योगदानाचे मूल्यांकन होऊन त्या कलावंताचे ऐतिहासिक स्थान प्रस्थापित होत असते.ह्या दृष्टीने मला हे दोन्ही लेख त्यातील प्रामाणिक भावनाभिव्यक्तीच्या अंगाने अघिक मोलाचे वाटतात.
          यशवंत देव, अशोक पत्की,सुरेश वाडकर,वैशाली माडे,अनुराधा मराठे ह्या संगीत आणि गायन क्षेत्रातील नामवंतानी सुधाकर कदमांच्या चालींचा मुक्तकंठाने केलेला गौरव हा प्रस्तुत ग्रंथाचा आत्मा आहे.
           राम जोशी,सौ.रजनी करकरे-देशपांडे,सीमा गादेवार,मधुरिका गडकरी ह्या संगीतातल्या जाणकारांनी,सुधाकर कदमांनी बांधलेल्या गझलांच्या बंदिशीतले संगीतसौंदर्य आस्वादकतेने त्यांच्या लेखात अनावरित केले आहे. हे सर्व लेख अभ्यासकांनी,रसिकांनी¬ मुळातूनच वाचावेत असे आहेत.
          १९८० ते १९९० ह्या दशकातील सुधाकर कदमांच्या मराठी गझलगायनाच्या कारकिर्दीचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या दोन मान्यवरांनी लिहिलेले लेख ह्या ग्रंथाचे ऐतिहासिक महत्ता विशद करणारे शीलालेख ठरावेत इतके मौल्यवान आहेत.ते दोन मान्यवर आहेत ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षित आणि ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर.ज्येष्ठ संपादक अनंत दीक्षितांनी वेगवेगळ्या निमित्ताने दोन लेख लिहिलेत.
त्यातला पहिला लेख दै.सकाळ मध्ये लिहिला,त्याला निमित्त होते सुधाकर कदमांच्या कोल्हापूरात संपन्न झालेल्या गझलमैफिलीचे .दुसरा अग्रलेख दै.लोकमत मध्ये त्यांनी लिहिला त्याला निमित्त होते सुधाकर कदमांना पुण्यात 'गझलगंधर्व' उपाधी प्रदान करण्यात आली,त्या सोहळ्याचे.
          ज्येष्ठ गझलअभ्यासक शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे मराठी गझलच्या उगमाचा,विकासाचा आणि संवर्धनाचा चालता-बोलता इतिहास आहेत.सुरेश भट-सुधाकर कदमांच्या अनेक मैफिलींचे नेटके निवेदन त्यांनी केले आहे.अगदी सुरेश भटांच्या मांडीला मांडी लावून प्रथमतः मराठी गझलगायनाची मुहूर्तमेढ रोवणा-या सुधाकर कदमांचे योगदान वैराळकरांनी आपल्या लेखात अधोरेखित केले आहे.
         कदमांच्या वाढदिवशी १३ नोव्हेंबर २००९ ला नेटवरील 'गझलकार' ब्लाॅगवर त्यांचा एक विशेषांक मी संपादित करून प्रकाशित केला होता.त्यातील सर्व लेख ह्या ग्रंथात समाविष्ट आहेत.तसेच प्रस्तुत ग्रंथाच्या निमित्ताने तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर,डॉ.राम पंडित,डॉ.किशोर सानप,शाहिर सुरेशकुमार वैराळकर,दिलीप पांढरपट्टे,म.भा.चव्हाण,दत्ता जाधव ह्यांनी लिहिलेल्या लेखांनी हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.

        इंटरनेटचे तंत्रज्ञान सुधाकर कदमांसारख्या कितीतरी कलावंतांसाठी वरदान ठरले आहे. 'गझलगंधर्व' 
(www.gazalgazal.blogspot.com) हा  कदमांचा ब्लॉग नेटवर आहे. त्यात बेगम अख्तर -मेहदी हसन - 
गुलाम अली -मधुराणी -जगजित सिंग यांच्या गझलांविषयी गायन कलेच्या अंगाने कदमांनी लिहिलेले लेख आहेत.१९८६ ते १९९६ या काळात हाथरसच्या  
'संगीत ' मासिकातील  'नग्म- ए - ग़ज़ल ' आणि  'अपने अपने गीत ' ह्या दोन सदरात  उर्दू -हिन्दी गझल - गीतांना कदमांनी लावलेल्या चालींची   नोटेशन्स प्रसिद्ध झाली होती . ती अभ्यासकांना  त्यांच्या ब्लॉगवर वाचायला मिळतात. तसेच  कदमांनी गायिलेल्या गझला - गीते यू ट्युबवर रसिकांसाठी पहायला-ऐकायला  उपलब्ध आहेत.
इंटरनेट नसते तर  कदमांच्या योगदानाचा हा  अमूल्य खजिना काळाच्या पोटात कधीच गडप झाला असता.
        वादन-गायन-लेखन अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या सुधाकर कदमांच्या कारकिर्दीचा आलेख वाचकांसमोर मांडताना मला संपादक म्हणून समाधान आहे.
आणि 
मित्र म्हणून अभिमानही.

प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत
जठारपेठ,
अकोला
------------------------------------------------------------------
.                   
                        प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची ही पोस्ट वाचल्यानंतर सुधाकर कदम यांच्याविषयी, त्यांच्या आठवणीविषयी लिहिण्याचा मोह आवरत नाहीये. मला वाटतं, मराठी गझलगायक म्हणून सुधाकर कदमांचं मोठेपण मांडण्याची हिच वेळ आहे. ही बाब खरीच आहे, सुधाकर कदम यांना पाहिजे तशी संधी आणि प्रसिद्धी त्यांच्या गायनकलेच्या किंवा सृजनशीलतेच्या काळात विदर्भात आणि तिथून मुंबई-पुण्याकडं मिळाली नाही.

- [ ] मी साधारणत: आठ वर्षांचा असेल १९८१ मध्ये खामगावच्या घरी सुधाकर कदमांची मैफल झाली. ती मैफल आणि ते दोन दिवस मला आजही लक्षात आहेत. माझ्या वडिलांचे (बी.एल.जाधव) मित्र म्हणून सुधाकर कदम, त्यांच्याबरोबर वडिलांचे लहान भावासारखे असलेले कवी कलीम खान(ज्यांच्या आर्णीच्या घरातला माझा आणि आमच्या खेड्यातल्या घरातला त्यांचा जन्म), कवी श्रीकृष्ण राऊत, नारायण कुळकर्णी-कवठेकर आणि शेखर सरोदे(ॲड. असीम सरोदेचे काका) असे सगळे दोन दिवस आमच्या घरी मुक्कामी होते. रात्री मैफल झाली. कदाचित ती माझी ऐकलेली पहिली मैफल आणि म्हणूनच आजही ती स्मरणात आहे. सुरेश भटांच्या मराठी गझला सुधाकर कदमांनी गायल्या होत्या. तबल्यावर शेखर सरोदे होते. कलीम खान, नारायण कवठेकर यांचं निवेदन होतं. संध्याकाळी सुरू झालेली मैफल मध्यरात्री उशिरापर्यंत चालली होती, हे मला दुसऱ्यादिवशी कळलं होतं. त्या मैफलीत एक उर्दू नज़्म सुधाकर कदमांनी दोनदा गायली होती. ते शब्द पाठ झाले होते, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी... नंतर कळलं ती प्रसिद्ध नज़्म जगजितसिंग यांची पहिली नज़्म होती. वडिलांकडे गजलांच्या एलपी रेकाॅर्डचा नंतर कॅसेटचा मोठा खजाना आहे. माझ्या लहानपणापासून मी गुलाम अली-मेहदी हसन-हुसेन बक्श ऐकत आलोय. त्यामुळं लहान वयातच गाणं ऐकण्याची सवय लागलेली होती. आणि म्हणूनच सुधाकर कदमांची ती मी आयुष्यात ऐकलेल्या पहिल्या मैफलीची आठवण खोलवर मनात रुजली असेल कदाचीत. 
- [ ] पुढे जेव्हा मला गझल कळायला लागली, तेव्हा त्या मैफलीची रेकाॅर्डेड कॅसेट मी कित्येकदा ऐकली. (आजही सुधाकर कदमांच्या त्या रेकांर्डिंगच्या कॅसेटस् वडिलांकडे आहेत.) महान गझलकार सुरेश भट यांच्या सुरूवातीच्या काळातल्या जवळजवळ सर्वच गाजलेल्या गझला सुधाकर कदमांनी त्या मैफलीत स्वत:च्या चालीत गायल्या होत्या. नंतर जेव्हा मी मुंबईत आलो आणि काही गझलनवाजांच्या मराठी गझला ऐकल्या तेव्हा तर सुधाकर कदम यांच्या गझल गायकीचं, त्यांच्या सृजनशिलतेचं, त्यांच्या मखमली आवाजाचं मोठेपण प्रकर्षानं जाणवलं. कुठेही उगाचच स्वर लांबवणे किंवा स्वरच्छल नाही की कुठे उगीच काही वेगळी हरकत घेतल्याचा आव. शास्त्रीय संगितातल्या रागदारीत राहून शब्दांना न्याय्य न्याय देणारी गझलगायकी, हेच सुधाकर कदमांच्या गझलगायनाविषयीचं माझं ठाम मत आहे. मला गझल आणि गायकी समजून-उमजून ऐकण्याचा चांगला कान देवानं दिलाय, म्हणूनही मी म्हणत असेल. त्यामुळेच कलेच्या बाजारीकरणाच्या जगात सच्च्या रसिकांपर्यंत पोहोचण्यात सुधाकर कदम कमी पडले, हेही आवर्जून सांगावं लागेल. तो त्यांचा की परिस्थितीचा की विदर्भातल्या आडमार्गाला असलेल्या आर्णीसारख्या केवळ नावालाच तालुका असलेल्या गावाचा दोष आहे, याचा विचार मी जेव्हा मुंबईतल्या प्रसारमाध्यमामधला आघाडीचा पत्रकार म्हणून करतो, तेव्हा काही प्रश्नांची उत्तरं शोधायची नसतात, हे लक्षात येतं. 
- [ ] आज कवी प्रा.श्रीकृष्ण राऊत यांची सुधाकर कदम यांच्यावरील ही सुरेख पोस्ट वाचल्यावर आपसूकच ३८ वर्षांपासून मनात दाटलेल्या आठवणींना लिहितं करावंसं वाटलं....

- Ashish Jadhao
-------------------------------------०------------------------
● अक्षर मानव प्रकाशन,
पुणे
किंमत-पोस्टेजसह ३००रु.
● पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 
8888858850 गुगल पे.
9822400390
या क्रमांकावर फोन करून पुस्तक बुक करता येईल.
● ऑनलाइन पेमेंट करिता खाते क्र.
A/c no : 053312100004140
IFSE Code : BKID0000533
बँक ऑफ इंडिया,पुणे.


 

Friday, April 5, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक ३०)

       १९८०/८१/८२ या काळात पुण्यातील तेव्हाचे नवोदित, समवयस्क गझलकार इलाही जमादार,अनिल कांबळे, म.भा.चव्हाण,रमण रणदिवे,प्रदीप निफाडकर,दीपक करंदीकर वगैरे वगैरे मंडळी मी महाराष्ट्रातील एकमेव मराठी गझल गायक असल्यामुळे फार सलोख्याने,मित्रत्वाच्या नात्याने वागायचे.यातील बहुतेकांच्या रचना स्वरबद्ध करून माझ्या कार्यक्रमात गायिलो आहे.सुरेध भट आणि मी,

आम्ही विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यावर माझे पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद,फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृग,गांधर्व संगीत विद्यालय असे अनेक कार्यक्रम होत गेले. पुढे १९८४ नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आर्णी ते पुणे,मुंबई संपर्क हळू हळू कमी झाला. महाराष्ट्र शासनाच्या #गीतमंच विभागासाठी बरीच गाणी स्वरबद्ध करून दिल्यामुळे 'रिसोर्स पर्सन' म्हणून राज्य स्तरावरील प्रशिक्षण वर्गात संगीत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी व बालचित्रवाणी करीता गाणी रेकॉर्ड करायची असल्याने अधून मधूम पुण्यात येणे होत होते.
      २००३ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन पुण्यात स्थायिक झालो तेव्हा वरील काही मंडळी 'प्रतिथयश' या पदाला पोहोचली होती.मी अनेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एक-दोन सोडले तर सर्वजण आपल्या तोऱ्यात असलेले दिसले.म्हणजे खास पुणेरी...तरी पण सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून दर महिन्याला #गझलकट्टा  आयोजित करायचो.प्रतिसाद चांगला मिळायचा पण आर्थिक झळ मात्र मलाच बसायची.याच दरम्यान बालचित्रवाणीला असलेले मित्र विकास कशाळकर यांना काही बालगीतं स्वरबद्ध करून हवी होती.(या अगोदर मी आर्णीला असताना कुमाग्रजांचे 'महाराष्ट्रगीत' व विंदा करंदीकरांचे 'उठ उठ सह्याद्रे' ही दोन गीते बालचित्रवाणीकरिता त्यांनी माझ्याकडून स्वरबद्ध करून घेतली होती.) त्यांनी मला विचारले.मी होकार दिला.व मीरा सिरसमकर यांची दोन गीतं नेहा दाऊदखाने (सध्याची नेहा सिन्हा) या बाल गायिकेकडून गाऊन घेतली.ही गाणी माझ्या वेगळ्या बाजामुळे छान झाली.त्यावरून सिरसमकरांच्या डोक्यात बालगीतांचा अल्बम करण्याची कल्पना आली.आणि मग '#खूप_मजा_करू' हा बालगीतांचा अल्बम आकाराला येऊन फाउंटन म्युझिक कंपनी तर्फे तो बाजारात आला.पुण्यात आल्यानंतरचे हे माझे पहिले काम होते.
      आर्णीला असताना नागपूरच्या कवयित्री आशा पांडे यांची गीते-भक्तिगीते वर्तमानपत्रांमधून प्रकाशित व्हायचची.त्यांच्या ओघवती लिखाणामुळे परिचय नसतानाही मी अनेक गीते स्वरबद्ध करून संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यायचो.गझलकार प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची आशा पांडेंशी ओळख होती.त्यानेच मला त्यांना भेटायला सांगितले.एकदा आकाशवाणीचे (नागपूर) ध्वनिमुद्रण संपल्यानंतर आशा पांडे यांना भेटलो.गप्पा-गोष्टी-चर्चा झाल्या त्यानंतर विषय संपला.
     मी पुण्यात स्थायिक झसल्यावर त्यांनी भक्तीगीतांच्या अलबमचे प्रपोजल समोर ठेवले.मी तत्काळ स्वीकारले.आणि कामाला लागलो. अभिषेकी बुवांशी जुनाच संबंध असल्यामुळे व मला थोड्याफार प्रमाणात त्यांचे मार्गदर्शन लाभलेले असल्यामुळे ते गुरुसमानच होते.आणि तसेच गाणे शौनकचे होते. म्हणून शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजात अल्बम करायचे निश्चित केले.हे प्रपोजल घेऊन मी शौनकला भेटलो.यवतमाळच्या एका कार्यक्रमाल बुवांसोबत बालशौनक पण होता.त्यांच्या जेवणाची व्यवस्था मी बघत होतो.ती आठवण ताजी झाली.आणि शौनकचा होकार आला. अनुराधाबाई पण तयार झाल्या आणि आमच्या रिहलस सुरू झाल्या अनुराधा बाईंची प्रॅक्टीस त्यांच्याकडे व्हायची. शौनकच्या प्रॅक्टीससाठी कधी मी शौनककडे जायचो तर कधी शौनक माझ्याकडे यायचे.शौनक कडील प्रॅक्टीस विद्याताई आवर्जून ऐकायच्या.आणि प्रॅक्टीस संपली की पहिल्या मजल्यावरील संगीत कक्षातून खाली आलो की चालींवर छान छान प्रतिक्रिया देऊन प्रोत्साहित करायच्या.खरे म्हणजे माझी आणि त्यांची ही पहिलीच भेट होती.पण पहिल्या भेटीत परकेपणा जाणवला नाही.या महिना दीड महिन्याच्या कालखंडात त्यांच्याशी अनेकदा मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.त्यांच्या या प्रेममय वागण्यामुळे इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे व कौटुंबिक जबाबदरीमुळे बुवांकडे गुरुकुल पद्धतीने शिकू न शकल्याची खंत मनात घर करून गेली.नंतर हा अलबम पुण्यातील एलकॉम स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झाला.याचे संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले होते.मिलिंद सोबतचा हा माझा पहिला प्रोजेक्ट होता.त्यानंतर आमची जी नाळ जुळली ती आजतागायत जुळून आहे.या अलबमचे शीर्षक होते 'अर्चना'.याच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कवी  सुधीर मोघे आणि कवी गंगाधर महांबरे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा अलबम टी सिरीजतर्फे बाजारात आला .वर्ष होते २००६. हा माझा दुसरा अलबम. त्यानंतर संगीतकार म्हणून माझ्या कामाने जो वेग घेतला तो आजतागायत कायम आहे. हे अभिषेकी बुवांचे व विद्याताईंचे आशीर्वादच समजतो.

●'अर्चना' मधील गीतांची युट्युब लिंक खाली देत आहे.आनंद घ्यावा....
https://youtu.be/DKkZmnDd-WU?si=aY-YTRfHogl_zodw

-----------------------------------------------------------------------
#अर्चना तयार होतानापासून लोकार्पणापर्यंतची काही क्षणचित्रे...

पुण्यातील वारजे येथील माझ्या घरी शौनक अभिधेकींची प्रॅक्टीस.....



प्रकाशन सोहळा - डावीकडून गायिका अनुराधा मराठे,कवी/संगीतकार सुधीर मोघे,कवी गंगाधर महांबरे,अस्मादिक,गायक शौनक अभिषेकी.

'अर्चना' मधील भक्तीगीतांचे सादरीकरण...



रसिकांनी तुडुंब भरलेले यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,पुणे.


 

Wednesday, March 27, 2024

आठवणीगील शब्द स्वर (लेखांक २९)

.                          #प्र_मुख_पा_हुणा

     माझ्या आयुष्यातील ३१ वर्षे आर्णी या गावी संगीत शिक्षक म्हणून गेली.या ३१ वर्षांत परिसरातील विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देण्यासाठी 'गांधर्व संगीत विद्यालयाची स्थापना व अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळाचे परिक्षा केंद्र', नाट्यप्रेमींसाठी 'अभिनय' कला मंडळ, संगीत प्रेमींसाठी 'सरगम', आमची शाळा माहुरच्या दत्त शिखराचे महंत दत्ताराम भारती यांच्यामुळे सुरू झाली म्हणून 'दत्त जयंती उत्सव समिती', 'तालुका पत्रकार संघ' 'शिवजयंती उत्सव समिती' 'शिवसेना शाखा' इत्यादींची स्थापना.समाजकारण,

पत्रकारिता,वर्तमानपत्रासाठी स्फुट लेखन,मराठी गझल गायनाचे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम, हिंदी/मराठी कवी संमेलने,गझल गायन स्पर्धा,आकाशवाणी सांस्कृतिक संध्या,विविध सांगीतिक कार्यक्रम  अशी अनेक आयोजने वगैरे वगैरे उपद्व्याप केलेत.

     कलाकारांच्या आयुष्यात कोणत्या वेळी कोणता अनुभव वाट्याला येईल हे सांगता येत नाही.वरील सर्व प्रकारांमुळे नावारूपास आल्यावर  घडलेला एक किस्सा ऐकण्यासारखा आहे.एकदा एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलावणे झाले. संगीतकारांनाही चांगले दिवस येत असल्याचे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला! कार्यक्रमाच्या दिवशी मी छानसे कपडे घालून, अत्तर वगैरे फवारून समारंभस्थळी पोहचलो! तर अध्यक्षच बेपत्ता। एका तासाने अध्यक्ष आल्यावर उद‌घाटन सोहळा आटोपला. भाषणबाजी झाल्यावर मी जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात आयोजकांनी मला थांबवून भावगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून माझी पदावनती करून टाकली. थोडा राग आला पण म्हटले 'चलता है।' थोड्याच वेळात स्पर्धा सुरू झाली. पण हार्मोनियम वादक नदारद ! फक्त तबल्यावर गाणे कसे म्हणावे हा प्रश्न स्पर्धकाला पडला. तेवढ्यात आयोजक पुन्हा माझ्याकडे आले व हार्मोनियम वाजवायची विनंती करायला लागले. पण मला 'पेटकर' बनविण्याचा त्यांचा धूर्त बेत हाणून पाडून मी तेथून निघून आलो. तेव्हापासून प्रमुख अतिथी पदाचा जो धसका मी घेतला. तो आजतागायत ! (काही दिवसांनी कळले की, 'पेटकर कम परीक्षक म्हणून हाताशी ठेवण्याकरिताच मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले होते म्हणून!)

Saturday, March 16, 2024

तू दिलेले दुःख....

राग_रंग (लेखांक ४३) राग धानी.

पूजाकोटिगुणं स्तोत्रं स्तोत्राकोटिगुणो जप:| जपात्कोटिगुणं गानं गानात् परतरं न हि || अर्थात, पुजेपेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ स्तोत्र,स्तोत्रापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ जप, आणि जपापेक्षा करोडो पटीने श्रेष्ठ 'गान'.गाना पेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. धानी राग हा काफी थाटातून उत्पन्न झालेला अतिशय गोड राग आहे.भारतीय संगीतांर्गत येणाऱ्या रागांचे वर्गीकरण करण्यासाठी थाट अथवा मेल व्यवस्था करण्यात आली आहे.भारतीय संगीतांमध्ये सात शुद्ध, चार कोमल आणि एक तीव्र अशा प्रकारे एकूण बारा स्वरांचा प्रयोग केल्या जातो एका रागाच्या रचनेसाठी या बारा स्वरातील कमीत कमी पाच स्वरांचे असणे आवश्यक असते.संगीतांमध्ये थाट रागांच्या वर्गीकरणाची पद्धत आहे.सप्तकातील बारा स्वरामधील कर्मानुसार मुख्य सात स्वरांच्या समुदायाला थाट असे म्हणतात. यातूनच रागोत्पत्ती होते.थाटालाच मेल असेही म्हणतात. दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये ७२ मेल प्रचलित आहे.उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र १०थाटांचाच प्रयोग केल्या जातो. याची सुरवात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी करून प्रचलित केले.(दहा ऐवजी आणखी एक-दोन थाट वाढविले असते तर प्रचलित दहा थाटात न बसणारे राग पण थाट पद्धतीत चपखल बसले असते.) सध्या राग वर्गीकरणाची हीच पद्धत प्रचलित आहे. कल्याण, बिलावल, खमाज, भैरव, पूर्वी, मारवा, काफी, आसावरी, तोड़ी आणि भैरवी... भातखंडेंजी द्वारा प्रचलित असलेले हेच ते दहा थाट होय.सर्व प्रचलित,अप्रचलीत रागांना या दहा थाटात सामील करून घेतले आहे. भारतीय संगीतांमध्ये त्या स्वरसमूहाला थाट म्हणतात ज्यात रागांचे वर्गीकरण केल्या जाऊ शकते,किंवा करतात.१५व्या शताब्दीच्या उत्तरार्धात 'राग तरंगिणी’ या ग्रंथाचे लेखक लोचन कवी यांनी राग वर्गीकरणाची पारंपरिक 'ग्राम आणि मूर्छना' पद्धतीमध्ये परिवर्तन करून मेल अथवा थाट पद्धतीची स्थापना केली.लोचन कविंच्या म्हणण्यानुसार त्या काळी सोळा हजार राग प्रचलित होते. यातील मुख्य असे राग ३६ होते.सतराव्या शताब्दीमध्ये थाटांर्गत रागांचे वर्गीकरण प्रचलित झाले होते. थाट पद्धतीचा उल्लेख सतराव्या शताब्दीतील ‘संगीत पारिजात’ आणि ‘राग विबोध’ नामक ग्रंथांमध्ये सुद्धा केल्या गेला आहे. लोचन द्वारा प्रतिपादित थाट पद्धतीचा प्रयोग जवळ-जवळ तीनशे वर्षांपर्यंत होत होता. एकोणविसाव्या शताब्दीच्या शेवटी व विसाव्या शताब्दीच्या सुरवतीच्या दशकात पंडित विष्णु नारायण भातखण्डे यांनी भारतीय संगीताच्या विखुरलेल्या सुत्रांना एकत्र करून अनेक सिद्धांतांमध्ये सुधारणा केली. भातखंडेंद्वारे निर्धारित दहा थातातील सातवा थाट काफी आहे. त्यातूनच उत्पन्न झालेला धानी राग एक चंचल प्रकृतिचा राग आहे.('चंचल प्रकृतीचा' म्हणजे काय ते कळले नाही.) यात ख्यालआणि विलंबित रचना गायिल्या जात नाही,असे म्हणतात. चंचल प्रवृत्तीमुळे मध्य व द्रुत लयीयील शृंगारिक व भक्तीरसपूर्ण रचना यात गायिल्या जातात. नेहमीप्रमाणे गोड लोकधून असलेल्या या रागाला शूद्र राग म्हटल्या जातो. (रागांचे मूळ असलेल्या लोकधूनांना शूद्र श्रेणीत ठेऊन कमी का लेखल्या जातात ते मला आजतागायत कळले नाही.)असो! या रागात कोमल गंधार एक अत्यंत प्रभावशाली असून न्यास स्वर आहे.हा स्वर या रागाचा केंद्रबिंदू आहे.तसेच कोमल निषाद सुद्धा न्यासाचा स्वर आहे.काही काळापूर्वी रिषभाला अवरोहात वर्ज न करता या रागाला औडव-षाडव जातीचा मानल्या जात होते.पण सद्य काळात रिषभ वर्ज्य करुन औडव-औडव जातिचा मानतात. तरी पण काही गुणिजन शुद्ध रिषभाचा प्रयोग करून धानी राग गाताना दिसतात.म्हणजेच हा राग आज दोन्ही प्रकारे गायिल्या जातो हेच सिद्ध होते.काफी थाटातील असल्यामुळे धानी गाताना खूप काळजी घ्यावी लागते.रिषभ,धैवत लागल्यास भीमपलासी व्हायला वेळ लागत नाही. अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळातर्फे दर वर्षी संगीत शिक्षक संमेलन घ्यायचे. अंदाजे १९७७/७८ वर्षी हे संमेलन अहमदाबाद येथे आयोजित केले होते.या संमेलनात एक बडा ख्याल गायिल्यानंतर पंडित गंगाधर तेलंग यांनी गायिलेल्या 'आंगनवा आये जोगी' या धानीतील बंदीशीने मी धानीच्या प्रेमातच पडलो.तो पर्यंत धानी हे नाव फक्त ऐकूनच होतो. ● चित्रपट गीते... 'चांद मध्यम है आसमा चुप है' लता.संगीत-मदन मोहन.चित्रपट-रेल्वे प्लॅटफॉर्म (१९५५). 'मेघा रे बोले घनन घनन' आशा,रफी. संगीत-उषा खन्ना.चित्रपट-दिल दे के देखो (१९५९). 'रात सुहानी झुमे जवानी' लता. चित्रपट-रानी रुपमती.संगीत-एस.एन. त्रिपाठी (१९५९). 'निगाहें न फेरो' रफी,सुमन कल्याणपूर.चित्रपट-ब्लॅक प्रिन्स.संगीत-दुलाल सेन (१९५९) 'प्रभू तेरो नाम' लता.चित्रपट-हम दोनो.संगीत-जयदेव (१९६१). 'कभी तनहाइयों में भी हमारी याद आयेगी' मुबारक बेगम.चित्रपट-हमारी याद आयेगी. संगीत-स्नेहल भाटकर (१९६१). 'ना ना ना रे ना ना हाथ ना लगाना, सुमन कल्याणपूर.चित्रपट-ताजमहाल. तिलक कामोद धानीचे मिश्रण (१९६३). 'रात भी है कुछ भिगी भिगी' लता.चित्रपट-मुझे जीने दो.संगीत-जयदेव (१९६३). तेरे हम ओ सनम तू जहां मैं वहां' रफी,सुमन कल्याणपूर.संगीत-सरदार मलिक.चित्रपट-बचपन. (१९६३).'ये खामोशियां ये तनहाईयां' आशा,रफी. चित्रपट-ये रास्ते है प्यार के. संगीत-रवी 'मुकद्दर आजमाना चाहता हूँ' रफी.चित्रपट-दूर की आवाज. संगीत-रवी (१९६४). 'मन मोरा नाचे तन मोरा नाचे' लता.चित्रपट-दो दिल.संगीत-हेमंत कुमार (१९६५). 'कुछ दिल ने कहां कुछ भी नहीं' लता.चित्रपट- अनुपमा. संगीत-हेमंत कुमार (१९६६) 'तडप ये दिन रात की' लता. चित्रपट-आम्रपाली.संगीत-शंकर जयकिशन. (१९६६) 'भगवान ने अपने जैसा' लता. चित्रपट-छोटा भाई.(१९६६). 'खिलते हैं गुल यहां' किशोर-लता. संगीत-एस.डी. बर्मन.चित्रपट-शर्मिली (१९७१). 'बदन पे सितारे लपेटे हुए' रफी. चित्रपट-प्रिन्स.संगीत-शंकर जयकिशन (१९६९) 'तुम जो मिल गये हो तो ऐसा लगता है' रफी.चित्रपट-हंसते जख्म.संगीत-मदन मोहन (१९७३). 'पांव में डोरी' चित्रपट-चोर मचाये शोर. संगीत-रवींद्र जैन (१९७४). 'दिल में तुझे बिठाकर, कर लुंगी मैं बंद आंखे' चित्रपट-फकिरा.संगीत-रवींद्र जैन (१९७६). 'गोरी तेरा गांव बडा प्यारा मैं तो गया वारा आके यहां रे' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'आज से पहले आज से ज्यादा' येसुदास.चित्रपट-चितचोर. 'ले तो आये हो हमे सपनो के गांव में' हेमलता.संगीत-रवींद्र जैन (१९७७). 'आयी ना कुछ खबर मेरे यार की' (धानी आणि मधुकौंस रागाचे मिश्रण) किशोर,आशा,संगीत-बप्पी लहरी. चित्रपट-शराबी.(१९८४) ● नॉन फिल्मी... 'तुम कोलाहल कलह में' आशा.संगीत-जयदेव.(अनफरगेटेबल ट्रीट १९७१). 'साडे नाल वे'(छोटा ख्याल) गायिका-दृष्टी आणि स्निग्धा जहागीरदार.संगीत संयोजन-ओंकारनाथ हवालदार.(ताज फेस्टिव्हल). 'मुसफिर चलते चलते थक गया है' गझल.-गुलाम अली. ● मराठी... 'निर्गुणाचा संग धरिला जो आवडी' संत गोरा कुंभारांचा हा अभंग अनेकांनी गायीला आहे.. 'अवघाची संसार सुखाचा करीन' (धानी व भीमपलासीचे मिश्रण) संगीत-मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.(संत ज्ञानेश्वरांचे हे पद १९३१ मध्ये कान्होपात्रा या संगीत नाटकात गोहरबाई कर्नाटकी आणि राजहंस यांनी सर्वप्रथम गायिले आहे.तसेच बाल गंधर्वांनी हे अधिक लोकप्रिय केले.) -----------------------------------------------------------------------

Saturday, March 9, 2024

राग-रंग (लेखांक४२) नंद

दो मध्यम अरु शुद्ध स्वर, गावत राग आनंद । थाट कल्याण षाडव संपूर्ण, प्रथम रात्री सुखचंद ।। एखाद्या चित्रपटातील गाण्यामुळे एखाद्या रागाची माहिती व्हावी म्हणून लेख लिहावासा वाटणे हे त्या चित्रपटगीताचे,त्या संगीतकाराने केलेल्या कामाचे श्रेय आहे असे मला वाटते.'मेरा साया' या चित्रपटातील 'तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' हे ते गाणे होय. त्यावरून नंद रागावर लिहायची तीव्र इच्छा झाली. संगीतकार होते मदन मोहन.मदन मोहन यांची बहुतेक गाणी कुठल्या ना कुठल्या रागावर आधारित असायचीच.प्रत्येक रागातील स्वरांच्या आरोहावरोहाचा एक नियम असतो.आणि या नियमांना धरूनच संगीत रचना केल्या जातात.निदान पहिली ओळ तरी त्या रागाचे रूप दाखवीत असते.पुढे संगीतकाराचा कलाविष्कार वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे आयाम देत रचना खुलवित जातो.पाश्चात्य संगीतात याला "improvisation" असे म्हणतात. नंद हा राग कल्याणजन्य राग आहे,यात दोन्ही मध्यमाचा प्रयोग केल्या जातो.बाकी स्वर शुद्ध आहेत.जाती षाडव संपूर्ण असून गानसमय रात्रीचा प्रथम प्रहर आहे.यालाच कुणी आनंदी, आनंदी कल्याण, नंद कल्याण असेही म्हणतात.हा राग बिहाग, गौड-सारंग ,हमीर, कामोद या रागांना अतिशय जवळचा आहे.सा ग म प नी सा,सां नी ध प...हे बिहाग अंग,अवरोहात सां ध नि प ध तीव्र म प ग...गौड सारंग अंग, ग म ध प...हमीर अंग, तीव्र म प ध तीव्र म प ग...कामोद अंग स्पष्टपणे दिसून येते.ह्या सुरावटी घेतल्यानंतर प्रत्येक वेळी 'ग म ध प रे सा' हे स्वर घ्यावेच लागतात.तेव्हा नंद राग स्पष्ट होतो. या रागाचा विस्तार मध्य आणि तार सप्तकामध्ये अधिक प्रमाणात केल्या जातो. कल्याण परिवारातील शृंखलेतील आवडता राग म्हणून याचा उल्लेख करता येईल. हा राग ऐकणारे बरेच असतील पण गाणारे मात्र कमीच दिसून येतात. या रागाच्या उत्पत्तीबद्दल अनेक प्रवाद आहेत.ते शोधणे कठीण आहे. तरी पण असे म्हणतात की,या रागाची कल्पना १९०० च्या दशकात सुचून प्रत्यक्षात आली असावी.कारण बऱ्याच कालावधीपासून मेहबूब खान (दरसपिया) द्वारा रचलेला विलंबित ख्याल 'ए बारे सैंय्या तोहे सकल बन ढूंढू' लोकप्रिय झालेला दिसून येतो. दरसपिया हे तानरसखान यांचे शिष्य व 'आफताब-ए-मोसिकी' फैयाज खान यांचे सासरे होते. त्या कालावधीमध्ये अत्रौली (जयपूर) घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान आणि आग्रा घराण्याचे बुजुर्ग गायक/वादकांमध्ये संगीत शास्त्रावर चर्चा होऊन विचारांच्या आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होती.या प्रक्रियेतूनच दरसपिया यांची रचना दोन्हीकडील उस्तादांनी आपापल्या घराण्याच्या यादीमध्ये सामील करून घेतल्यामुळे सर्वत्र पसरली.आज सर्वच घराण्यात या रागाला मान्यता आहे.आग्रेवाले उस्ताद विलायत हुसेन खान (प्राणपिया) द्वारा रचित सुरवातीची बंदिश 'अजहूँ न आए श्याम,बहुत दिन बीते' आजही लोकप्रिय आहे. 'जाने दो मुझे जाने दो' आशा भोसले. संगीत-आर.डी. बर्मन.गझल. 'धन्य तूचि कांता' नाट्यगीत,नाटक-अमृत सिद्धी.गायक-गंगाधर लोंढे. संगीत-मास्टर कृष्णराव. 'एन्ना पलिसु' enna palisu पं. भीमसेन जोशी. पुरंदरदासांच्या या रचनेची सुरवात नंद रागाने होते.पुढे विविध सुरावटी दिसतात. 'आनंद सुधा बरसे' नाट्यगीत.गायक- रामदास कामत, संगीत-पंडित जितेंद्र अभिषेकी.नाटक-मीरा मधुरा. 'पाखरा जा त्यजुनीय' नाटक-संगीत वाहिनी,मूळ गायक-पु.ल. आणि अर्चना कान्हेरे. संगीत-श्रीधर पार्सेकर. ----------------------------------------------------------------------------- 'दैनिक उद्याचा मराठवाडा', रविवार दि.१० मार्च २०२४

Saturday, March 2, 2024

राग-रंग (लेखांक ४१) राग हमीर.

कल्याणहिं के थाट में, दोनों मध्यम जान, ध-ग वादी-संवादि सों, राग हमीर बखान। हमीर हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातला एक राग आहे. याला हंबीर असेही म्हणतात. रागचंद्रोदय या ग्रंथात हमीरचा उल्लेख आहे. केदारश्याम आणि कामोद हे हमीरचे समप्रकृती राग आहेत.केदार, गौड़ सारंग, नंद हे राग अमूर्त श्रेणीत येतात.दिवसाच्या पाचव्या प्रहरी किंवा रात्रीच्या पहिल्या प्रहरी गायिल्या जाणाऱ्या दोन्ही मध्यम स्वर असलेल्या राग शृंखलेतील हा एक राग आहे.कल्याण थाटोत्पन्न या रागात तीव्र मध्यम स्वराचा अल्प प्रयोग केल्या जातो.तरी पण याचा थाट मात्र कल्याण! संस्कृत विद्वान यात तीव्र मध्यम घेण्याच्या विरोधात आहेत.(पण आज तीव्र मध्यम या रागाचे एक अंग बनला आहे.) ते याला बिलावल थाटोत्पन्न मानतात.कारण हा बिलावल रागाशी मिळता -जुळता आहे.आणि मला तरी हे तर्कसंगत वाटते.याचा वादी स्वर धैवत असून संवादी स्वर गांधार आहे.येथे सुद्धा राग गायन समय सिद्धांतानुसार विरोधाभास दिसून येतो.ज्या रागाचा वादी स्वर पूर्वांगात असतो तो राग समय सिद्धांतानुसार दुपारच्या बारा वाजल्यापासून मध्यरात्रीच्या बारा वाजेपर्यंत गायिल्या/वाजविल्या जायला हवा.याच प्रकारे उत्तरांगवादी राग उत्तरांगात म्हणजे मध्यरात्रीच्या बारा वाजल्यापासून दिवसा दुपारच्या बारा वाजेपर्यंत सादर व्हायला हवा.परंतू हमीर रागाचा वादी स्वर धैवत असूनही गानसमय रात्रीचा पहिला प्रहर मानल्या जातो.अशा प्रकारे सिद्धांत आणि व्यवहार परस्पर विरोधी दिसून येतो.याला अपवाद म्हणता येईल काय? 'हमीर कल्याणी' नावाचा दक्षिण भारतीय राग उत्तर भारतीय 'केदार' रागाशी मिळता जुळता आहे.त्याचा उत्तर भारतीय हमीर रागाशी काहीच संबंध नाही.दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये 'केदारम्' नावाचा वेगळा राग आहे.उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमधील केदार,कामोद नी हमीर रागात बरेच साम्य आहे.केदारमध्ये मध्यम,कामोदमध्ये पंचम आणि हमीरमध्ये धैवत स्वर सगळ्यात प्रबळ आहेत.धैवत या रागाचा प्राण स्वर आहे.ज्यावर न्यास होतो. हा राग उत्तरांगप्रधान असल्यामुळे याचा विस्तार मध्य व तार सप्तकामध्ये खुलून दिसतो.याची विशेषता म्हणजे यातील धैवत निषदाला स्पर्श करून घेतल्या जातो.त्यामुळे गोडवा अधिक वाढतो.या रागातील सगळ्यात लोकप्रिय चित्रपटगीत 'मधूबन में राधिका नाचे रे' हे आहे.संगीताचे लक्ष रस-परिपाक हे असल्यामुळे गीत-वाद्य-गायन यांच्यातील पारस्पारिक सांमजस्य साधले की, 'मधूबन में राधिका' सारखे गाणे तयार होते.संगीतकार -गायक-वादक एकरूप झाले की रसमय वातावरणाची वृष्टी होते.त्यात मुख्यतः व्यष्टीला नसून समष्टीला प्राधान्य असते. सगळ्यांच्या सफलतेत प्रत्येकाची सफलता असते.कोणा एकाची त्यात महत्वपूर्ण नसते.सगळ्यांचा सामूहिक प्रयत्न म्हणजे यश,सफलता होय. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत आचार्य बृहस्पती यांच्या 'संगीत चिंतामणि' या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील एका समीक्षका बद्दलचा एक उतारा आहे,तो असा:- 'संगीत के उभरने के साथ शब्दार्थ पीछे छोड़ दिया जाता है, छोड़ दिया जाना चाहिए । संगीत को चाहिए कि उसे (शब्दार्थ को) खा जाए और शब्दार्थ को भी चाहिए कि वह खाया जाए ।('अनुपरागविलास', भूमिका, पृष्ठ १३) "जब आलोचकों का दृष्टिकोण यह हो जाए, तब संगीत की नैया का भगवान ही मालिक है। अमीर खुसरो या सदारंग यदि इस युग में होते, तो अवश्य ही पागल हो जाते। बंदिशों के साहित्य को भ्रष्ट करने का उत्तरदायित्व भी शब्दार्थ की ओर ध्यान न देनेवाले उस्तादों पर है। 'क्रमिक पुस्तक-मालिका' में संगृहीत, परंतु अर्थ की दृष्टि से अपूर्ण एवं भ्रष्ट बंदिशों के प्रचार का उत्तरदायित्व उस परंपरा के नेताओं पर है। इस युग में तो ऐसे व्यक्ति भी उस्ताद कहलाने लगे, जिन्होंने केवल मुखड़ा गाकर जीवन बिता दिया और नई पीढ़ी के मन में यह बात डाल गए कि न तो बंदिश की आवश्यकता है और न अर्थ की। तबले पर ठेका आरंभ कराकर 'आ, ई, ऊ, ओ' का आधार लो, बहलावे करो, तानें मारो, टीप पर खड़े न हो, गला बरावर हिलाते रहो, बस गवैए बन जाओगे। यही कारण है कि जो 'गाना' कभी बजाने और नाचने की अपेक्षा 'उत्तम' कहलाता था, उसकी 'रीढ़' ही गायब हो गई है। उसका अस्थिपंजर लुप्त हो गया है । सितार और सरोद के लोकप्रिय होने का कारण यह है कि इन्हें बजानेवाले आलाप में लय का ढोंग नहीं करते, जबकि गायक प्रायः आरंभ से ही तबले पर ठेका आरंभ करा देते हैं, उस ठेके की लय का गायक के तथाकथित विलंबित गान से कोई संबंध नहीं होता। 'तिरकिट' देखकर 'सम' आ जाना पर्याप्त समझा जाता है। 'लय' की डोर इस गाने में नहीं रहती । सितार या सरोद के 'जोड़' में ताल भले ही न हो, 'लय' रहती है, एक क्रम रहता है। ये लोग जव 'मसीतखानी' गत बजाते हैं, तब श्रोताओं के सम्मुख ठेका स्पष्ट रहता है, सितार वादक एवं सरोद-वादक तरह-तरह से बनकर आते हैं है। तबलेवाले तंत्री-वादकों के साथ बजाकर इस युग में यशस्वी और मुखड़ा पकड़ते हैं। हुए है। अच्छे तबला वादक अतिविलंबित प्रेमी गायकों को दूर से ही नमस्कार करना चाहते हैं। इस स्थिति की जिम्मेदारी भी 'उस्तादों' पर है । शब्द और अर्थ केवल गायक की संपत्ति थे। राग, ताल और लय तो बीन, सितार, सरोद और बाँसुरी में भी हैं। शब्द, अर्थ और लय की ओर जब गायकों ने ध्यान देना छोड़ दिया।प्रत्येक युग में मानव नवीनता की खोज में पागल रहा है, आज भी संगीत- जगत् में ऐसे व्यक्ति हैं, जो नए मार्ग की खोज में हैं, परंतु इनमें से अधिकांश ऐसे हैं, जिनमें पर्याप्त अध्ययन की कमी है, ये प्रचलित रागों में मनमाना उत्पात करके लोगों का ध्यान अपनी ओर आकृष्ट करते हैं। इनकी 'बंदिशों' की भाषा प्रायः अशुद्ध होती है, इनके द्वारा आविष्कृत राग सचमुच बीहड़ होते हैं। आज भारतीय संगीत को पुनः गंभीर चिंतन की आवश्यकता है । " 'मधूबन में राधिका नाचे रे' अशी गाणी लोकप्रिय होण्याची कारणे वरील उताऱ्यात नक्कीच मिळते.असो! हमीर रागातील काही लोकप्रिय चिजा... 'चमेली फूली चंपा' चीज-यशवंत जोशी,कुमार गंधर्व, शुभा मुद्‌गल,उल्हास कशाळकर वगैरे वगैरे,...'जा जा रे जा रे रंगरेज्या'-कुमार गंधर्व, 'ढीठ रंगरवा कैसे घर जाऊ'-पद्मा तळवलकर, 'मैं तो लागी रे तोरे चरनवा' -उस्ताद मुबारक अली खान, ● मराठी-हिंदी चित्रपट असो वा मराठी-हिंदी सुगम संगीत असो,यातील काही रचना सोडल्या तर बहुतेक स्वररचना संपूर्णतः एका विशिष्ट रागात बांधलेल्या नसतात.त्या पक्त 'त्या' रागावर आधारित असू शकतात.एखाद्या गीतात एकापेक्षा अनेक रागांच्या छटा पण दिसू शकतात. 'छेड दिए मेरे दिल के तार' उस्ताद अमीर खान,उस्ताद अमानत अली खान, चित्रपट-रागिनी, संगीत-ओ.पी.नैय्यर (१९५८). 'मधूबन में राधिका नाचे रे' रफी. चित्रपट-कोहिनुर, संगीत-नौशाद (१९६०). 'मैं तो तेरे हसीन खयालों में खो गया' रफी. चित्रपट-संग्राम, संगीत-चित्रगुप्त (१९६५). 'ए हौसला कैसे झुके' शफाकत अली.चित्रपट-डोर, संगीत-सलीम सुलेमान (२०२१). 'सूर की गती मैं क्या जानूं' मुकेश.(नॉन फिल्मी) संगीत-नरेश भट्टाचार्य. 'कोकिळा गा' आशा भोसले. चित्रपट-बायकोचा भाऊ, संगीत-वसंत प्रभू (या गीतात हमीर+केदार आहे.) (१९६१). 'हे जगदीश सदाशिव शंकर' नाट्यगीत. नाटक-कट्यार काळजात घुसली. 'नमन नटवरा विस्मयकारा' नांदी, नाटक-संगीत मानापमान. 'विमल अधर निकटी मोह हा पापी' नाटक विद्याहरण. (हे नाट्यगीत सुरेश हळदनकर यांनी लोकप्रिय केले.) 'हेतु तुझा फसला' मराठी नाटक संशयकल्लोळमधील गीत. ----------------------------------------------------------------------- दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.३/3/२०२४

मज गायचेच आहे (गझल)

अवांतर...____✍️____



     कवी/कवयित्री म्हणजे शब्दरूपी कोळशाच्या खाणीचे मालक/मालकीण. या खाणीतून ते काव्य रुपी हिरा बाहेर काढतात.संगीतकार या हिऱ्याला पैलू पाडून चमकदार बनवतो.आणि संगीत संयोजक आकर्षक असे स्वरांचे कोंदण तयार करून पैलू पडलेल्या काव्यरूपी हिऱ्याला अधिक आकर्षक करतो.ह्या तिघांचे समसमा योगदान असले तर एकूण काम उच्च दर्जाचे होते.एक जरी कमी पडला तर त्याचा दर्जा कमी झाल्याचे दिसून येते.हे आपण हिंदी,मराठी चित्रपट गीते,गझल,भावगीते,नाट्यगीते,भक्तिगीते ऐकताना नेहमी अनुभवतो.काही गीतांचे शब्द सुंदर असतात पण सुरावट चांगली नसते.काही सुरावटी सुंदर असतात पण शब्द इतके चांगले नसतात.तर काही वेळा हे दोन्ही चांगले असले नि संगीत संयोजन चांगले नसले तरी त्या गाण्याची प्रत कमी झालेली दिसते.
       आपलेही तसेच आहे.जन्म झाल्यावर आई,वडील आणि गुरू आपल्याला पैलू पाडण्याचे काम करतात. आपल्यातील कला-गुणांची कदर करणारा योग्य संयोजक जर भेटला तर आपलेही जीवन आनंदी बनून सुकर होते.हे सूत्र सर्व क्षेत्रातील लोकांना लागू आहे.त्यासाठी माणसातील हिऱ्याला आपण हिरा आहो हे कळायला हवे.अथवा त्याला तशी जाणीव करून द्यायला हवी.तसेच पैलू पाडत असतानाच्या वेदना सहन करण्याची शक्ती त्याच्यात हवी.तरच तो चमकदार बनतो. त्यांनतर कोंदणाचा प्रश्न येतो.आणि हाच प्रश्न आयुष्यात महत्वाचा ठरतो.
      अनेकदा खाणीतील हिऱ्याला पैलू न पाडल्या गेल्यामुळे आयुष्यभर कोळसा म्हणूनच आयुष्य काढण्याचे वाटयाला आल्याचेही दिसून येते. याला काय म्हणावे ?
● चार गाणी, चार प्रकार...ऐका... फरक कळेलच.😊
#sudhakarkadamscomposition


 

Wednesday, February 21, 2024

आठवणीतील शब्द स्वर...

   (लेखांक २७)
     ग्रीष्म ठेवलास तू अता, श्रावणास पांघरून जा

       मराठी गझल गायकीच्या सुरवतीच्या काळात #सुरेश_भट  आणि मी महाराष्ट्रात दौरे करत असताना अधून मधून सुरेश भटांची सासुरवाडी असलेल्या सदाशिव पेठेतील पुण्याच्या पंतांच्या गोटातील चिरेबंदी वाड्यात नवोदित गझलकरांच्या मैफली जमायचा.पुण्यातील आजचे नावाजलेले बहुतेक गझलकार त्यावेळी नवोदित होते.आणि गाणारा मात्र एकमेव मी.त्यामुळे माझ्याशी सगळ्यांचीच घसीट असायची.त्यावेळी मी रमण रणदिवे,इलाही जमादार,अनिल कांबळे, प्रदीप निफाडकर,संगीता जोशी,म.भा. चव्हाण वगैरेंच्या गझला स्वरबद्ध केल्या होत्या.कार्यक्रमात पण गात होतो.तो काळच काही वेगळा होता.सर्वजण मराठी गझलने पछाडलेले होते.माझा मुक्काम जरी सुरेश भटांच्या सासुरवाडीला असायचा तरी नाश्ता, जेवण मला बाहेर करावे लागायचे.भटांना बाहेर जेवायची हुक्की आली तर त्यांच्या सोबत एखादवेळी मी सोबत असायचो.त्यामुळे नवोदित गझकारांनी दिलेले निमंत्रण मी अगत्याने स्वीकारायचो.या काळात अनिल,प्रदीपच्या घरचा पाहुणचार मी चाखला आहे.
     माझ्या म.सा.प.च्या कार्यक्रम अगोदर ९ जून १९८२ ला '#गझल_संध्या' या शीर्षकाखाली महाराष्ट्रातील पहिला मराठी गझल मुशायरा म.सा. प.ने घडवून आणला होता. अडीच तास चाललेल्या या मुशायऱ्यात तेव्हाचे नवोदित राजेंद्र शहा,ज्योती बालिगा,प्रदीप निफाडकर,सतीश इनामदार,इलाही जमादार,अनिल कांबळे,रमण रणदिवे हे सहभागी झाले होते. समारोप  सुरेश भटांच्या गझलांनी झाला होता. या मुशायऱ्याचे खुमासदार सूत्र संचालन मराठी आणि उर्दू शेरोशायरी पेरत डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी केले होते.
     १५ जुलै १९८२ चा पुण्याच्या महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेला #अशी_गावी_मराठी_गझल हा मराठी गझल गायनाचा संपूर्ण तीन तासाचा महाराष्ट्रातील पहिला ऐतिहासिक कार्यक्रम मी पैसे संपत आल्यामुळे अलका टॉकीजसमोरील हॉटेलमधील सकाळच्या नाश्त्यावर केला.रात्रीचे जेवण त्यावेळचे सहाय्यक पोलीस कमिशनर श्री उत्तरावर यांचेकडे घेतल्याचे आठवते.मुशायरा व गझल गायन या दोन्ही कार्यक्रमास पुणेकर रसिकांनी जबरदस्त दाद दिली होती.माझ्या कार्यक्रमा नंतर जवळ जवळ तीन ते चार मिनिट टाळ्यांचा कडकडाट होत होता.ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट व कार्यक्रम अवडल्याची पावती होती.
     या काळापर्यंत वरील सगळे गझलकार एक असल्याप्रमाणे वागायचे.पण जस-जसे नाव होत गेले तस-तसे सर्वजण आपापले वेगळेपण जोपासायला लागले.२००३ मध्ये पुण्याला स्थायिक झालो तेव्हा ही बाब मला प्रकर्षाने जाणवली. म्हणून सगळयांना एकत्र आणण्यासाठी मी #गझलकट्टा  सुरू केला.काही जण सहभागी झाले.काहींना यात फारसे गम्य दिसले नाही.नवोदित मात्र यात रस घेत होते. समीर चव्हाण आणि निषाद कदम आयोजनांसाठी कष्ट घ्यायचे.मुली भैरवी आणि रेणू त्यांना सहकार्य करायच्या.समीर नोकरी निमित्त पुणे सोडून गेल्यावर सर्व (आर्थिक आणि शारीरिक) भार निषादवर येऊन पडला. समीर पुणे सोडून गेल्यानंतर काही महिने आमचा कट्टा चालला.आर्थिक आणि शारीरिक भाराच्या बाबतीत एकपात्री व्हायला लागल्यावर निषादने अंग काढून घेतले.या गझलकट्ट्याचा एक फायदा झाला तो असा की, अनेक नवोदित गझलकारांच्या गझला स्वरबद्ध झाल्या.
गझलकट्ट्याचा नियमच असा होता की,दर महिन्याला गझलकाराने नवीन गझल सादर करायची. व मी काही गझला स्वरबद्ध करून (भैरवी,रेणू,व्हायोलिनिस्ट जांभेकरांची मुलगी श्रद्धा यांच्याकडून) सादर  करायच्या.रेणू,भैरवी लग्नानंतर कानपूर,दिल्ली निघून गेल्या.माझ्या स्वररचना गाऊन घ्यायला कोणीच नसल्यामुळे शेवटी गझलकट्टा बंद झाला.
     तर सांगायचा मुद्दा हा की, पंतांच्या गोटातील वाड्यात जेव्हा एकत्र जमायचे तेव्हा सुरेश भटांच्या गझलांसह महाराष्ट्रातील इतरही नवोदित गझलकरांच्या अनेक गझला स्वरबद्ध केल्या होत्या.त्याच काळात सतीश डुंबरेची एक छोट्या बहरची गझल मी स्वरबद्ध केली होती.अनेक कार्यक्रमात सादरही केल्याचे आठवते.अशाच एका कार्यक्रमातील कॅसेटवर केलेले ध्वनिमुद्रण मला मिळाले.ते आपल्यासमोर सादर करीत आहे. ऐका, आवडल्यास तुमची.नावडल्यास माझी...

छोटी बहर

जायचेच ना निघून जा
सावलीसही धरून जा

ग्रीष्म ठेवलास तू अता
श्रावणास पांघरून जा

का अजून वाट पाहशी
वाट वेगळी करून जा

तो तुझा प्रवेश संपला
रंग तेवढे पुसून जा

ठेच खायच्या वयात तू
नीट उंबरा बघून जा

तबला-विठ्ठल क्षीरसागर #viththalkshirsagar
●headphone or earphone please...
#sudhakarkadamscomposition


 

पद्म श्री सुरेश वाडकरांचे मनोगत...

.  आजीवासन स्टुडिओ,मुंबई, दि.२८ जानेवारी २०२४
    (चर्चा,ध्वनिमुद्रण आणि सुरेशजींचे मनोगत.)








 

ये न ये असे गडे चांदणे...

 खास व्हॅलेंटाईन डे आणि वसंत पंचमी निमित्त मी स्वरबद्ध
केलेली गझलकारा ज्योती बालिगा राव यांची सुरमई भेट...
विशेष म्हणजे गायिका प्राजक्ता सावरकर शिंदेचे पद्म श्री सुरेश वाडकरांसोबतचे हे पहिले युगल गीत आहे.आणि ती सुद्धा सुंदर गायिली.या गझलनुमा गीताचे सुंदर संगीत संयोजन मिलिंद गुणे यांनी केले असून मिक्सिंग, मास्टरिंग अजय अत्रे यांनी केले आहे.ध्वनिमुद्रण पंचम स्टुडिओ, पुणे. ऐका तर...

ये न ये असे गडे चांदणे पुन्हा पुन्हा
हो न हो कधी असे जागणे पुन्हा पुन्हा...

का जपून बोलशी ? शब्द शब्द तोलशी ? 
हे असे न व्हायचे  बोलणे पुन्हा पुन्हा...

माझिया मनातला चंद्र मी तुला दिला
का अनोळखी तुझे वागणे पुन्हा पुन्हा...

सांग एकदा मला ही तुझी कशी  कला?
जाळणे पुन्हा पुन्हा. टाळणे पुन्हा पुन्हा...

दुःख जीवनातले काय मी न सोसले?
हे तुझे न सोसवे  हासणे पुन्हा पुन्हा...

बासरी - संदीप कुलकर्णी
गिटार - राधिका अंतुरकर

 
#Sureshwadkar  #सुरेश_वाडकर 

●headphone or earphone please...


 

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २८)

.                            -हुकलेली संधी-

     पन्नास पंचावन वर्षांपूर्वी एच. एम.व्ही.कंपनीची यवतमाळ जिल्ह्याची डीलरशिप दीपक देशपांडेचा मोठा भाऊ अरुण देशपांडे याच्या 'अरुण रेडिओ' कडे होती.एच. एम.व्ही च्या सर्व ध्वनिमुद्रिका अरुण रेडिओ मार्फत जिल्ह्यात वितरित व्हायच्या.दीपक आमच्या ऑर्केस्ट्रात तबला वाजवायचा.त्या कालखंडात सुगम संगीतावर योग्य प्रकारे तबला वाजवणारा यवतमाळातील एकमेव कलाकार म्हणजे दीपक. ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस संपल्यानंतर कधी-मधी रात्री दिपकच्या माध्यमातून नवीन आलेली एखादी रेकॉर्ड ऐकत बसायचो.'शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), ब्रजभूषण काबरा (गिटार) यांची 'कॉल ऑफ दि व्हॅली'  ही 'लॉंग प्ले रेकॉर्ड' आली असता कितीतरी पारायणं अरुणला कळू न देता आम्ही गुपचूप केली. त्याच कालखंडात माझ्या मुंबई वाऱ्या सुरू होत्या.माझा साळा हेमंत चांदेकर (त्यावेळी लग्न व्हायचे होते,प्रेम प्रकरण सुरू होते.) याला त्याच वेळी (अंदाजे १९७०/७१)  कॅनरा बँकेच्या मुंबई शाखेत नौकरी मिळाली होती. एकदा मुंबईला गेलो असता एच. एम.व्ही.च्या कार्यालयात जाऊन आम्ही (मी आणि हेमंत) यवतमाळचे डीलर 'अरुण रेडिओ' कडून आल्याची थाप मारून ध्वनिमुद्रण ऐकायची इच्छा व्यक्त केली.डीलर म्हटल्यानंतर तेथील अधिकाऱ्याने एका कर्मचाऱ्याला वरच्या मजल्यावरील स्टुडिओत घेऊन जाण्यास सांगितले.स्टुडिओमध्ये  प्रसिद्ध संगीतकार हेमंत कुमार यांनी स्वरबद्ध केलेल्या एका बंगाली गाण्याचे ध्वनिमुद्रण होणार होते.त्याची प्रॅक्टीस सुरू होती.आम्ही डीलर असल्याचे हेमंतदांना सांगून स्टुडिओत बसायची परवानगी घेतली.गायिका त्यांची मुलगीच होती.त्यावेळी 'ट्रॅक' पद्धत नव्हती.गायक वादक एकत्र प्रॅक्टीस करायचे.प्रॅक्टीस 'ओके' झाली की ध्वनिमुद्रण सुरू व्हायचे. तर थोड्याच वेळात ध्वनिमुद्रणाला सुरवात झाली.वादकांमधील अकॉर्डियन वादकाच्या चुकीमुळे टेक वर टेक होत होते.मी पण यवतमाळच्या ऑर्केस्ट्रात अकॉर्डियन वाजवायचो.त्यामुळे 'त्या' अकॉर्डियन प्लेअरला जमत नसलेल्या पीसचे नोटेशन माझ्या डोक्यात आले व मी ते सहज वाजवू शकलो असतो.'मी वाजवून बघू का' असे विचारायची उत्कट इच्छा झाली होती.पण  रिटेक मुळे त्रस्त झालेल्या हेमांतदांच्या त्रस्त चेहऱ्याकडे पाहून विचारायची हिंमत झाली नाही.त्यांच्या समोर मी बच्चा होतो.शेवटी एकदाचे ध्वनिमुद्रण संपले व आम्ही तेथून निघून आलो.बाहेर आल्यावर  बोलत बोलता  हेमंतला म्हटले, अकॉर्डियनचा 'तो' पीस मी सहज वाजवू शकलो असतो'. त्यावर हेमंत म्हणाला 'तू तिथेच का बोलला नाही.मी तशी विनंती हेमंत कुमार यांना केली असती.अरे,हे जर तू केले असतेस तर कदाचित तुझ्या मुंबईतील कामाची सुरुवात झाली असती.' पण माझ्या भिडस्त स्वभावामुळे म्हणा किंवा आपल्याकडून दुसरा कलाकार अपमानित होऊ नये या विचाराने म्हणा माझी एक संधी हुकली.


 

Friday, February 2, 2024

●दुःख माझे देव झाले●


     याच काळात गझलगायक सुधाकर कदम आणि त्यांची तबल्यावर साथ करणारे शेखर सरोदे यांची भेट झाली. शब्द, छंद, सूर आणि ताल यांची घट्ट मैत्री जमली. सुधाकर कदम सालाबादप्रमाणे नवरात्रात माहूर गडावर हजेरी लावायला जाणार होते. दुर्धर आजाराने अपंगत्व आलेल्या माझ्यासारख्याला गड चढणे अशक्य होते. पण म्हणतात ना! मित्र आणि आत्मविश्वास काहीही करू शकतो. सुधाकर आणि शेखर यांनी त्यांच्या हाताची पालखी केली. मला बसवले आणि आम्ही मैत्रीचा माहूर गड सर केला. रेणुका मातेच्या चरणी पोहचलो. गड चढायला सुरुवात करतानाचे दुःख, शिखरावर पोहचता पोहचता देव झाले होते. भावना शब्दबद्ध झाल्या- ‘दुःख माझे देव झाले’.  पुढे हीच गझल सुधाकर कदमांनी स्वरबद्ध केली. त्यांच्या हरेक गझल मैफिलीत ती आवर्जून गायली जायची. त्यांच्या १९८२ मध्ये आलेल्या 'भरारी' शीर्षकाच्या कॅसेट मध्ये ती समाविष्ट केली गेली. पुढे ही गझल 'लोकमत' च्या रविवार पुरवणीत १२ ऑगस्ट १९८४ ला प्रकाशित झाली. माझ्या गझलेचा प्रवास चिंतनातून लेखन, लेखनानंतर प्रकाशन, आणि त्यांचे गायन असा संथ गतीने सुरू होता. वाचल्या जाणारी गझल आता गुणगुणल्या जाऊ लागली होती. 
सुधाकर कदमांचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी गझल गायनाचे कार्यक्रम होत होते. आता नागपुरातील धनवटे रंगमंदिर गाजवावे अशी त्यांची इच्छा होती. योग जुळून आला. दिनांक १५ जून १९८४ ला धनवटे रंगमंदिरात भारदस्त आवाजाचे धनी सुधाकर कदम यांनी सूर लावला- 

'दुःख माझे देव झाले शब्द झाले प्रार्थना
आरती जी गात आहे तीच माझी वेदना'
(गझल ऐकण्यासाठी लिंक 
https://youtu.be/DBcwSSSmbw0 )
आणि माझ्या ‘दुःखाचा देव’ मराठी माणसाच्या मनाच्या गाभाऱ्यात विराजमान झाला. ‘तरुण भारत’च्या ‘मध्यमा’ पुरवणीत या मैफिलीचा वृत्तांत वामन तेलंग यांनी सविस्तर लिहिला. 
सुरेश भटांच्या गझलेसोबत माझीही गझल गायली जात आहे याचे समाधान होते.
□ श्रीकृष्ण राऊत

●२०२१ च्या 'नायक' दिवाळी अंकातील श्रीकृष्ण राऊतांचा लेख...
..........................................................................


 

Wednesday, January 31, 2024

आठवणीतील शब्द स्वर (लेखांक २५)


     १९७२ मध्ये आर्णीला संगीत शिक्षक म्हणून रुजू
झाल्यावर ऑर्केस्ट्राची प्रॅक्टीस, कार्यक्रम, शाळा आणि संगीत विद्यालय हा सगळा व्याप सांभाळणे कठीण व्हायला लागले.शेवटी नाईलाजाने ऑर्केस्ट्रा सोडण्याचा निर्णय घेतला.ऑर्केस्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ मी आणि  शंकर बडे आम्ही दोघे होतो.शंकरचेही लग्न झाल्यामुळे तो ही पोटापाण्याच्या व्यवस्थेला लागला होता.त्यामुळे त्यालाही बोरी अरब येथील व्यवसाय ,कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करणे कठीण होत चालले होते. शेवटी दोघांनीही १९७५ चे गणेशोत्सव,दुर्गोत्सवाचे कार्यक्रम आटपून ऑर्केस्ट्रा सोडला.आम्ही दोघे नसल्यामुळे ऑर्केस्ट्रा बंद पडला हे मात्र वाईट झाले.त्यांची खंत दोघांनाही होती,पण नाईलाज होता.
       ऑर्केस्ट्रा सुटल्यानंतर गायक गायिका अविनाश जोशी,रतन जोशी,प्रभा मॅथ्यू,तबला शेखर सरोदे,गिटार अविनाश गिरी,सूत्र संचालन शंकर चौधरी,सुरेश गांजरे यांना घेऊन मी स्वरबद्ध केलेल्या गीत-गझलांचे कार्यक्रम सुरू केले.ऑर्केस्ट्राच्या स्थापने पासून स्वरबद्ध केलेल्या शालेय कविता,काही नाटकांना संगीत दिले होते,त्यातील गाणी,शंकर बडेने लिहिलेली वऱ्हाडी गाणी व गझला या व्यतिरिक्त विदर्भातील अनेक कवींच्या रचना असा बराच मोठा साठा माझ्याकडे होता.त्यामुळे ऑर्केस्ट्रा सोडला तरी माझी सांगीतिक वाटचाल सुरूच होती.हे सुरू असताना सुरेश भटांची भेट झाली व त्यांच्या गझल,कविता स्वरबद्ध करायला सुरुवात केली.१९७९ पर्यंत काही रचना स्वरबद्ध करून कार्यक्रमात घेणे सुरू केले होते.(यावर, त्यावेळी भरात असलेल्या नागपूरच्या 'दैनिक नागपूर पत्रिका' या वर्तमानपत्राच्या विशेष पुरवणीत सुरेश गांजरे यांनी एक लेख लिहिला होता,तो खाली दिला आहे.) तसेच सुरेश भट व माझ्या एकत्र मैफलीही सुरू झाल्या होत्या.या मैफिलीतील माझी सुरवात  नव्यानेच स्वरबद्ध झालेल्या 'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो' किंवा 'माझिया गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे' या गीताने करायचो.अशाच एका मैफिलीतील 'माझिया गीतात वेडे' चे साउंड सिस्टिमवाल्याने विविध अडथळ्यासह  केलेले ध्वनिमुद्रण आपल्या समोर ठेवत आहे.गोड करून घावे.          
------------------------------------------------------------------------
.                मराठी गझल गायक सुधाकर कदम
                                               -सुरेश गांजरे

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.
विशेष पुरवणी,दि.४/१२/१९८०




 

Thursday, January 25, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर(लेखांक २४)

.                       
                             ● जर-तर ●

     सुरेश भटांची भेट झाल्यानंतर हळू हळू जुन्या गझलांसह नवीन झालेल्या गझला स्वरबद्ध करण्यासाठी मला देत गेले.तोपर्यंत मी सरोद वादन व स्वरबद्ध केलेल्या उ.रा. गिरी,शंकर बडे,शिवा इंगोले,बबन सराडकर,श्रद्धा पराते,ग्रेस,नीलकांत ढोले, शरद पिदडी,नीलकृष्ण देशपांडे,गजेश तोंडरे, ’बेताब’ अलिपुरी, इंदू कौशिक, अशोक अंजूम,गोवर्धन भारती, विनू महेंद्र, प्यारेलाल श्रीमाल, यांच्या मराठी-हिंदी गीत-गझलांचा संमिश्र कार्यक्रम करायचो.नंतर सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले की नवीन गझल,नव्या बंदिशी,मैफली,खवैयेगिरी आणि मूड लागलाच तर आर्णी जवळच्याच काठोडा या छोट्याशा गावातील रमेश माहुरे पाटील या रसिक मित्राकडे गप्पा,कॅरम,मैफिल,खाणे,
आराम असा एकूण कार्यक्रम असायचा.एकदा तर पुष्पा वहिनी (श्रीमती पुष्पा सुरेश भट), चित्तरंजन सुद्धा कठोड्याला आले होते.सोबत कवी कलीम खान असायचेच.सुरेश भटांच्या सहवासाने १९८०/८१ मध्ये माहुरे घरातील तरुणाई कविता करायला लागली होती.

हवा जरासा आसरा
तुझ्या मनाचा कोपरा
सुगंध अलगद हेरतो
गुलाब तू की मोगरा
-अशोक माहूरे

माझ्या खुळया मनाला हेही पसंत होते !
डोळ्यात या तुझ्या जे फसवे वसंत होते!!
आम्हा कफल्लकांच्या प्रेमास जात कुठली ?
खोटे तुझे दिलासे पण जातीवंत होते !!
-मनोज माहुरे

ही तरुण कंपनी सुरेश भटांची सेवा तर करायचीच पण तेवढ्याच खोड्या पण करायचे.त्यांच्या गझलांचे विडंबन करून त्यांनाच ऐकवून प्रेमाच्या शिव्या खाणे हे नित्याचे.
सगळे त्यांना बावाजी म्हणायचे.रमेश पाटलांचे वडील बंधू पांडुरंग पाटील यांच्या घराला एक तळघर होते.दुपारचे जेवण झाले की बच्चा कंपनी त्यांना आराम करण्यासाठी तळघरात घेऊन जायचे.थंडगार तळघरात पलंग,खुर्च्या,
टेबल,पंखा अशी व्यवस्था असायची.तेथे यांच्या गप्पा सुरु व्हायच्या.गप्पा करताना कुणी त्यांचे पाय दाबत,कुणी हात दाबत.भटांना अंग दाबून घायची सवय होती.अंग दाबण्यावरून काठोड्याचाच एक किस्सा आठवला.
दुपारची झोप झाली की पालथे पडून पाटलाकडील गड्याला पाठीवर पाय द्यायला लावून पाठ चेपून घ्यायचे.
एकदा मी व कलीम नेहमीप्रमाणे रविवारी काठोड्याला गेलो असता भटांचा विषय निघाला.त्यांच्या गझलांवर चर्चा सुरू झाल्यावर ते किती मोठे कवी आहेत,त्यांच्या कविता मोठ मोठे गायक गायिका  गातात वगैरे वगैरे...
आमच्या ह्या गप्पा गडी ऐकत होता.तो लगेच म्हणाला 'अस्तिन मोठे,म्या त लै येळा त्यायले तुडवलं हाये' त्याच्या या वाक्यावर हास्यकल्लोळ उठला.
      भटांनी एकदा आर्णीला माझ्याकडे मुक्कामी असताना 'नात' (हजरत पैगंबर साहेबांची स्तुती असलेले गीत) लिहिली.ती सर्वप्रथम मला दाखवली व म्हणाले इथल्या उर्दूच्या जाणकारांना बोलव.मी लगेच मित्र रशीद भाईचे वडील करीम चाचांकडे गेलो व त्यांना सुरेश भटांनी मराठीमध्ये नात लिहिल्याचे सांगितले व घरी येण्याचे निमंत्रण दिले.करीम चाचा म्हणजे उर्दू गझलांची चालती बोलती डिक्शनरीच.आर्णीच्या कंबलपोष बाबांच्या दर्ग्यावरील उरुसात होणाऱ्या कव्वालीचे आयोजन,तसेच कव्वाल ठरवण्याचे काम तेच करायचे.
उर्दूवर कमांड असलेले करीम चाचा घरी आले.सुरेश भटांनी त्यांच्या पद्धतीने नात ऐकवली.चाचा एकदम खुश झाले व नात लिहिलेल्या कागदावर
'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' 
( इस्लाममध्ये कोणत्याही कामाचा शुभारंभ  "बिस्मिल्लाह-हिर्रहमा-निर्रहीम" b-ismi-llāhi r-raḥmāni r-raḥīmi بِسْمِ ٱللَّٰهِ ٱلرَّحْمَٰنِ ٱلرَّحِيمِ  याने करतात.'बिस्मिल्लाह'चा अर्थ आहे 'शुभारंभ'!) असे उर्दूमध्ये लिहिले.कारण ती मराठी भाषेत लिहिलेली पहिली नात होती.शब्द होते....

'उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद
जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद'

(ही सुरेश भटांच्या हस्ताक्षरातील नात माझ्या ब्लॉगवर टाकली असता एका भामट्याने तेथून कॉपी करून त्यावर लेख लिहून जणू काय त्याच्याकडेच ही नात लिहिल्या गेली असा आभास निर्माण केला.माझा किंवा माझ्या ब्लॉगचा उल्लेख करण्याचे साधे सौजन्य त्या महाभागाने दाखविले नाही.म्हणून मी 'भामटा' हा शब्द वापरला.)

    आर्णीमध्ये माझ्या मित्र मंडळीत सर्व जाती धर्माचे लोक होते. मी संगीत शिक्षक व गायक असल्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करायचे.करीम चाचा सोबत मस्ती पण करायचो, शिव्या खायचो.निषादचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही नोकरी करत होतो.त्यावेळी शेजारी पिंजारी बुढा-बुढी राहात होती.ते दोघे निषादला सांभाळायचे.नंतर तर ते आमच्या घरातील सदस्य बनले होते.एक वर्षानंतर सुलभाने नोकरी सोडली.त्यानंतरही पिंजारी कुटुंबाने माझ्या तिन्ही मुलांना आजी-आजोबासारखे प्रेम दिले, माया केली.अर्थात त्यांच्या शेवटच्या काळात आम्हीही त्यांची काळजी घेतली. 
     कंबलपोष बाबांच्या उरुसात पूर्वी फक्त कव्वाल्या व्हायच्या.मी तेथे कव्वाल्यासोबतच वऱ्हाडी कवी संमेलन घेणे सुरू केले.यात शंकर बंडे, मिर्झा रफी अहमद बेग,राजा धर्माधिकारी अशी दिगग्ज मंडळी असायची. नंतर भजन स्पर्धा सुध्दा सुरू झाल्या.त्या काळी जत्रा,उरूस म्हणजे लहान मुलांसोबतच हौस्या-गौश्या-नौश्यांची मजा असायची.परिसरातील खेड्यातील लोकांची आवश्यक सामानाची खरेदी चालायची. खास आकर्षण म्हणजे तंबूतील दोन मध्यांतर असलेला चित्रपट.चित्रपट बघायला जायचे म्हणजे बसण्याकरिता सोबत सतरंजी घेऊन जावे लागायचे. त्या चित्रपटाच्या जाहिराती म्हणजे वेगळंच काम होतं.आर्णीला अशीच एक बारमाही टॉकीज होती.तिथल्या भोंग्यावर आरती लागली की आता चित्रपट सुरू होणार हे गावकऱ्यांना कळायचे.यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या दोनोडा या मूळ गावी सकाळी घंटी वाजली की शाळा सुरू होणार हे कळायचे.सायंकाळी घंटी वाजली की मारूतीच्या देवळात आरती सुरू होणार हे कळायचे.आर्णीत आरती सुरू झाल्यावर चित्रपट सुरू होणार हे कळायचे.आरती म्हणजे प्रत्यक्षातील आरती नव्हे.तर 'मैं तो आरती उतारू रे संतोषी माता की' ही रेकॉर्ड!
     हळू हळू भटांच्या गझला स्वरबद्ध व्हायला लागल्या. आणि आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करायचे ठरवले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा या गावी पहिला प्रयोग केला.त्यात एक गझल भटांनी त्यांच्या पद्धतीने सादर करायची व नंतर मी हार्मोनियम तबल्यासह ताला-सुरात एक गझल सादर करायची.हा कार्यक्रम लोकांनी आनंद घेत ऐकला.पण आम्हा दोघांनाही त्यात मजा आली नाही.कारण एकाची लिंक लागत नाही तो दुसऱ्याचा नंबर यायचा. तेव्हा दोघांनी अर्धा अर्धा कार्यक्रम करायचे ठरवले.हा प्रयोग यशस्वी झाला.
त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या पद्धतीने अनेक कार्यक्रम केले.१९८२ च्या पूर्वार्धापर्यंत संपूर्ण तीन तासांची मैफल होईल इतक्या गझला स्वरबद्ध झाल्यावर फक्त माझ्या गझल गायनाचा तीन तासाचा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधव ज्युलियन सभागृहात आयोजित करण्यात आला.महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या तीन तासाच्या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वतः सुरेश भटांनी केले.शीर्षक होते
"#अशी_गावी_मराठी_गझल"! दुसऱ्या दिवशी याच शिर्षकाचा स्वतः भटांनी निवेदन केलेला कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर निवडक रसिकांसमोर सादर करून प्रसारित करण्यात आला.त्या नंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज,राजवाडे सभागृह,मराठे यांचे संगीत विद्यालय अशी कार्यक्रमांची रांग लागली.पश्चिम महाराष्ट्रातील काही कार्यक्रमाचे सूत्र संचालन कधी डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी तर कधी पुण्यातील प्रसिद्ध संगीत समीक्षक श्रीरंग संगोराम करायचे.राजवाडे सभागृहातील कार्यक्रमाला तर नावाजलेले भावगीत गायक गजाननराव वाटवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     अशा प्रकारे 'अशी गावी मराठी गझल' च्या मैफली गाजत असताना १९८२ च्या शेवटास  मी स्वरबद्ध केलेल्या गझलांची कॅसेट काढावी असे भटांच्या मनात आले.तसे अलुरकरांशी बोलणेही झाले.त्या काळी पुण्याच्या अलुरकर म्युझिक कंपनीचे महाराष्ट्रभर नाव होते.सुरेश भटांनी मला तसे पत्रही पाठवले.त्यात या कॅसेटचे संगीत संयोजन आनंद मोडक करतील असाही उल्लेख होता.(ते पत्र व माझ्याकडे लिहिलेली नात खाली देत आहे.) नंतर कुठे माशी शिंकली कोण जाणे.हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही.पण लगेच एच एम व्ही कंपनीने काढलेली सुरेश वाडकरांच्या आवाजातील सुरेश भटांच्या गीत-गझलांची कॅसेट बाजारात आली.संगीतकार होते स्व.रवी दाते.
    ही सुवर्णसंधी हुकल्यानंतर मी या संदर्भात शेवटपर्यंत भटांशी बोललो नाही.शेवटी वीस वर्षांनंतर दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला सुरेश वाडकरांकडून गाऊन घेण्याची संधी मला मिळाली.२०१२ मध्ये युनिव्हर्सल कंपनीतर्फे "#काट्यांची_मखमल" हा अल्बम बाजारात आला.या अल्बममध्ये वैशाली माडे माझ्या संगीत दिग्दर्शनाखाली सर्वप्रथम वाडकरांसोबत युगल गझल गायिली.त्या नंतर सुरू झालेले माझे काम आज २०२४ मध्येही त्याच जोमाने सुरू आहे. 
    (तसा तर २००६ मध्ये टी सिरीजने बाजारात आणलेला  #अर्चना हा पंडित शौनक अभिषेकी आणि अनुराधा मराठे यांच्या आवाजातील भक्तीगीतांचा अल्बम पहिला आहे. पुण्यात स्थायिक झाल्यावर खरे काम तेथून सुरू झाले.) 
१९८२ #मध्येच_जर_पहिला_अल्बम_बाजारात_आला_असता_तर?

Saturday, January 20, 2024

राग रंग (लेखांक ३९) गोरखकल्याण

                             
राग गोरख कल्याण सम सम्वाद द्वितीय रात्रि  ओडव षाडव मान ।
थाट खमाज मानत गुनि जन , गोरख राग बखान ।।

   गोरख कल्याण हा उत्तर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतामधील खमाज थाटोत्पन्न राग आहे. हे नाव उत्तर प्रदेशातील गोरखपुर मधील एका परिसरातील लोक-गीतामधून उत्पन्न झाल्याने पडल्याचे मानल्या जाते. नाव जरी गोरख कल्याण असले तरी यात कल्याण दिसत नसल्यामुळे काही संगीतकार, गायक, संगीततज्ज्ञ
याला फक्त गोरख म्हणणे पसंत करतात.हा एक अतीशय गोड राग आहे. उत्तर भारतीय संगीताच्या नियमानुसार रागातील आरोहावरोहात पाच स्वर आवशयक असतात.पण गोरख कल्याण हा एकमेव असा राग आहे की, ज्यातील आरोहात कोमल निषाद वक्र स्वरूपात येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने सा रे म ध हे फक्त चारच स्वर लागतात.ही एक मजेशीर बाब आहे.असो!
     या रागात मध्यम स्वर एकदम मजबूत आहे. वादी स्वर षड्ज असून या स्वरासोबत मध्यम स्वर हा एक विश्राम स्वर पण आहे, जो याला 'नारायणी' रागापासून वेगळा करतो. (कर्नाटक संगीतामधून आलेला नारायणी राग खमाजचाच एक प्रकार आहे. गांधार वर्ज करून खमाज गायिला की तो नारायणी होतो.दक्षिणेतील 'हरिकांभोजी' थाट खमाज थाटाप्रमाणे आहे.)/नारायणी रागाचा वादी आणि न्यास स्वर पंचम आहे. गोरख कल्याणमधील मन्द्र सप्तकातील  कोमल निषाद हा विश्राम स्वर आणि रागाचे  प्रमुख लक्षण दाखविणारा स्वर आहे.आरोहातील वर्जित निषाद या रागाला  बागेश्री पासून वेगळा करतो किंवा ठेवतो.तसेच पंचम वर्ज असल्यासारखाच असल्यामुळे दुर्गा रागाला पण दूर ठेवतो.  आरोहात  कोमल निशादाचा अल्प प्रयोग सर्वत्र केल्या जातो. आणि त्यामुळे या रागाचे सौंदर्य अधिक वाढते.तसेच यात पंचम या स्वराचाही अल्प प्रयोग करून रंजकता वाढविण्याचा प्रयत्न  केल्या जातो. अर्थात काही संगीतकार याच्याशी सहमत नाही.या रागाचा विस्तार तीनही सप्तकांमध्ये केल्या जातो.हा विस्तार अतिशय मनमोहक असतो.
     याचा वादी स्वर षड्ज व संवादी स्वर मध्यम आहे. काही विद्वान याचा वादी स्वर मध्यम व संवादी स्वर षड्ज मानतात. पण गानसमय मात्र रात्रीचा दुसरा प्रहर मानतात.म्हणून मग वादी संवादीच्या दृष्टीने उत्तरांग प्रधान आणि गानसमयाच्या दृष्टीने पूर्वांग प्रधान व्हायला हवा.वास्तविकता ही आहे की,गोरख कल्याण पूर्वांग प्रधान राग आहे.त्यामुळे अधिकांश विद्वानांनी षड्ज,मध्यम स्वराला वादी,संवादी स्वर म्हणून मान्यता दिली आहे. रागातील वादी संवादी स्वरांचे स्थान बुद्धिबळातील राजा व वजीरा प्रमाणे असतात,हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.गोरख कल्याण रागात तर यांचे विशेषच महत्व आहे.व ते सतत जाणवत असते.बाकी सगळे स्वर या दोन स्वरांभोवती अक्षरशः गोंडा घोळताना दिसतात.
आरोह- सा  रे म, ध S (कोमल)नी ध सां
अवरोह- सां ध ध (कोमल)नी ध  म, रे म रे सा (कोमल) ऩी S ध़ सा
पकड- (कोमल) नी ध म, रे म रेसा (कोमल) ऩी S ध़ S सा, रे म
     (एके काळी मुक्त असलेली संगीत कला काही काळानंतर मंदिर, राज-दरबार, सरदार-जागीरदार भवन आणि कोठे वगैरे मधून मुक्त होऊन आकाशवणीमध्ये बंद होते की काय,अशी परिस्थिती असताना पुन्हा संगीत प्रसारक,लेखक, संशोधक,
गायक,वादक यांनी लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.शाळा,महाविद्यालयातून संगीताचे सूर घुमायला लागले.
मोठं-मोठी संमेलने व्हायला लागली.पण गेल्या काही वर्षात शाळांतमधील संगीत विषय बंद करण्याकडे सरकार व संस्थाचालकांचा कल दिसायला लागल्यामुळे शाळेत किलबिलणारे संगीताचे स्वर हळू हळू लोप पावत चालले आहेत. पुढे चालून महाविद्यालयातील संगीत विभाग बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जे संगीत मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते,ज्या संगीतामुळे सर्व जग एकत्र येऊ शकते त्या संगीत विषयाला सर्वत्र दुय्यम,तिय्यम स्थान दिल्या जायचे.आणि आता तर स्थानच न ठेवण्याचे मोठे षडयंत्र सुरू आहे.असो..'कालाय तस्मै महा'!)

     उस्ताद सलामत अली नजाकत अली खान,गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी,कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद गुलाम मुस्तफा खान, उस्ताद उमीद अली खान, पंडित राजन साजन मिश्र,मालिनी राजूरकर, श्रुती सडोलीकर,  विणा सहस्रबुद्धे, पंडित जगदीश प्रसाद, उस्ताद राशिद खान,परवीन सुलताना, देवकी पंडित,अरमान राशिद खान,संजीव अभ्यंकर,सम्राट पंडित (जगदीश प्रसाद पंडितचा मुलगा), पं. कैवल्यकुमार गुरव, जयतीर्थ मेउंडी,  रमाकांत गायकवाड, मौमिता मित्रा, डॉ.प्रवीण गावकर,  झीशान खान, रागेश्री वैरागकर, आस्था-प्रदीप चोप्रा (धृपद),ऋषी-वरुण मिश्रा, सावनी शेंडे, अनुराधा कुबेर, राजेश-रिषभ प्रसन्ना, गुलाम हसन खान, देवर्शी भट्टाचार्य, राजेंद्र कंदलगावकर, अर्चना कान्हेरे, गिरीश गोसावी, डॉ. कल्याणी देशमुख,शुजात अली खान, सुमित्रा गुहा, परितोष पोहनकर, मनाली बोस, अमित कुमार रथ, पं. तुषार दत्त, पं. देवशीष डे, मेघना घेरकर, विनय रामदासन, रोंकिनी गुप्ता.
     पंडित बुधादित्य मुखर्जी (सतार), डॉ.एन. राजम (व्हायोलिन)  उस्ताद शाहीद परवेज खान (सतार), पंडित रोनू मुजुमदार, राकेश चौरसिया (बासरी)-सुनील देव (सतार) जुगलबंदी, राहुल शर्मा (संतूर), पुर्बायन चटर्जी (सतार), सौमिक दत्त (सरोद), संदीप चटर्जी (संतूर), विनय भिडे (गायन)-अनिर्बन दासगुप्ता (सरोद) जुगलबंदी, पं. सुब्रतो डे (सतार), साकेत साहू (व्हायोलिन), फारुख लतीफ (सारंगी), पंडित विश्वमोहन भट (मोहनवीणा)-रोनू मुजुमदार (बासरी) जुगलबंदी, लोकेश आनंद (शहनाई), पं. रबीन घोष (व्हायोलिन), विष्णू देव (बासरी), एस.आकाश (बासरी), नारायण हिरेकोलची (व्हायोलिन), देबस्मिता भट्टाचार्य (सरोद), कमला शंकर (हवाइयन गिटार) या कलाकारांचे गायन/वादन युट्युबवर उपलब्द्ध आहे.
 ● या रागावर आधारित हिंदी,मराठी चित्रपट गीते ,गझला,आणि भक्तीगीते...
'दिल की कश्ती भवर में आयी है' लता. चित्रपट-पालकी, संगीत-नौशाद (१९६७). 
'बा होशो हवास में दिवाना' रफी.चित्रपट-नाईट इन लंडन, संगीत-लक्ष्मीकांत प्यारेलाल (१९६७). 
'फिर भोर भई जागा मधूबन' देवकी पंडित. चित्रपट-साज, संगीत-उस्ताद झाकिर हुसैन (२०१०). 
'फिर मुझे दीदा-ए-तर याद आया' लता. संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
'किसी रंजीश को हवा दो के मै जिंदा हूँ अभी' चित्रा सिंग. 
'दोस्त बन बन के मिले मुझ को मिटाने वाले' जगजीत सिंग.
कबीर भजन- अभिजीत शेनॉय.अल्बम-निनाद (२०१४). 
'सलोनी सांवरी सुरत' गायिका-सुस्मिता दत्त, भजन. 
'मन लोभले मन मोहने' पंडित जितेंद्र अभिषेकी. संगीत-राम फाटक. 
'कंठातच रुतल्या ताना' आशा भोसले. गीत-गंगाधर महांबरे, संगीत-श्रीनिवास खळे (१९९९). 
'स्वप्नात साजणा येशील का' आशा भोसले. चित्रपट-गोंधळात गोंधळ, संगीत-विश्वनाथ मोरे. 
'मोगरा फुलला' लता.संगीत-हृदयनाथ मंगेशकर.
----------------------------------------------------------------------------
दैनिक उद्याचा मराठवाडा, रविवार दि.१४ जानेवारी २०२४


 





संगीत आणि साहित्य :