गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, December 30, 2020

सुरेश भट आणि मी...


          माझी आणि भटांची पहिली भेट मुंबईला झाली. मी आणि शंकर बडे त्या वेळी मुंबानगरीत हात पाय मारत होतो. १९७७/७८ची घटना असावी. दिवसभर दूरदर्शन, एच.एम.व्ही संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची भेट अशी भटकंती करुन थकलेल्या अवस्थेत रात्री पंढरीनाथ सावंतांकडे खास माशाच्या कोकणी कालवणाचे जेवण झाल्यावर चर्चा सुरू असताना अचानक पंढरीनाथ सावंतांनी सुरेश भट मुंबईत असल्याचे सांगितले. आम्ही दुसरे दिवशी भटांना भेटायला आमदार निवासात पोहचलो. शंकरची भटांशी नुकतीच ओळख झाली होती. त्याने माझी ओळख करून दिली. लगेच भटांनी सवयीप्रमाणे ‘‘गाऊन दाखवा’’ असा आदेश दिला. बिना साथीने मला जसे जमेल तसे गाऊन दाखवले, हे प्रकरण इथेच संपले. त्यानंतर नागपुरच्या विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटनाप्रित्यर्थ गडकरी सभागृहात माझा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते.या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी सरोद वादन केले. त्यानंतर मराठी-उर्दू गझला सादर केल्या. माझ्या स्वररचना भटांना आवडल्या. इथून आमची मैत्री सुरु झाली. सुरुवातीला त्यांनी ‘हा ठोकरुन गेला’ ‘कुठलेच फुल आता पसंत नाही’ अशा आणखी तीन गझला स्वरबद्ध करायला दिल्या. एक महिन्यानंतर नागपूरला चक्कर झाली तेव्हा त्यांना ‘ठोकरुन’ व ‘पसंत नाही’ या दोन गझला ऐकवल्या. ‘ठोकरुन’ची बंदिश त्यांना आवडली. पण ‘पसंत नाही’ वर मात्र ‘तू घरंदाज बाईला तमाशात नाचवले’ अशा शेरा मारला. त्यावरुन काहीतरी चुकल्याचे लक्षात आले. माझा पडलेला चेहरा पाहून गझलची शब्दानुरुप बंदिश कशी असायला हवी हे कळावे म्हणून मेहदी हसन, फरीदा खानम, गुलामअली यांच्या ध्वनिफिती देऊन त्यांच्या गायकीचा अभ्यास करायला सांगितले. तो पर्यंत मी अनेक गाणी बसविली होती, अनेक नाटकांना संगीत दिले होते. पंधरा वर्षांचा ऑर्केस्ट्राचा अनुभव होता. तरी सतत वर्षभर या ध्वनिफितीतील बंदि्शी, शब्दोच्चार, शब्दानुसार स्वररचना, शब्दफेक, भावाभिव्यक्ती याचा अभ्यास केला आणि नंतर आमचा मराठी गझला महाराष्ट्रभर पोहचवण्याचा ऐतिहासिक दौरा सुरु झाला. 
या दरम्यान मी जसा नागपूरला जायचो,तसे भटही आर्णीला यायचे.आर्णीला गझल आणि संगीत याशिवाय दुसरी चर्चा नसायची. भटांच्या गझला, माझ्या बंदिशी आणि रंगलेल्या मैफिली असा नुसता जल्लोष असायचा. 
           भटांसोबतच्या काही वर्षांच्या सहवासात अनेक मजेदार घटना घडल्या. खरे म्हणजे ‘त्या’ आमच्यातील वैयक्तिक ठेवा  आहेत. एकदा नागपूरला गायक अनिल खोब्रागडे, कादरभाई, गायिका प्रमोदिनी क्षत्रिय, व्हायोलिन वादक प्रभाकर धाकडे वगैरे मंडळी सोबत मैफल जमविण्याचे ठरले होते. मैफल रात्री होती. मी दुपारी भटांकडे पोहोचलो. सायंकाळ झाल्यावर त्यांनी आपण जरा बाहेर जाऊ असे म्हणून व त्यांच्याकडे असलेली हार्मोनियम त्यात टाकून आम्ही निघालो. भटांचा त्या दिवशीचा मूड जरा वेगळाच वाटला. सदैव बोलणारे भट त्या दिवशी अबोल होते. जवळ-जवळ एक तास दिशाहीन भटकंती झाल्यावर हळूच म्हणाले ‘‘सुधाकर आपण कुठं तरी बसू या का? या वेळेपर्यंत 8 वाजले होते. 9 वाजता आमची मैफल ठरली असल्यामुळे मी त्या काळजीत. पण भटांनीच कुठेतरी बसू म्हटल्यावर नाही म्हणणे शक्य नव्हते. म्हणून माझ्या साळ्याकडे-अनिल चांदेकरकडे मोर्चा वळवला. त्याच्याकडे पोहोचल्याबरोबर सौ. चांदेकरांना झुणका भाकर व पोळ्या करण्याचा हुकूम करुन भट बैठकीत एका बाजूला कागद पेन घेऊन बसले. एव्हाना रात्रीचे 10 वाजले. आमच्या मैफलीचे काय झाले ते आपण समजू शकता. थोड्याच वेळात त्यांनी ‘हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’ हा मतला मला दिला व चाल बसत गेली, तिकडे गझल पूर्ण होत गेली. रात्री दोन अडीच वाजता पूर्ण गझल लिहून मला कागद दिला.
आमची ठरलेली मैफल हुकली पण रात्र मात्र संस्मरणीय ठरली. या गझलने माझ्या प्रत्येक कार्यक्रमात दाद घेतली हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
- औरंगाबाद, देगलूर, मानवत, नांदेड असा मराठवाड्याचा दौरा आटोपून परत नागपूरला निघालो असताना भटांनी नांदेडला एक तलवार व एक कुकरी विकत घेतली. ती सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्या दुर्दैवाने आमची एस.टी. बस मधल्या कुठल्यातरी थांब्यावर बंद पडली. एस. टी. बदलणे, त्यात सामान टाकून आसन मिळवणे या प्रकारात तलवार व कुकरी बंद पडलेल्या एस. टी. बसमध्येच राहिली. आमची बस व्हाया यवतमाळ नागपुर असल्यामुळे मी यवतमाळला उतरुन दुस-या बसने आर्णीला जाणार होतो. यवतमाळला मी बसमधून बॅग घेऊन उतरत असताना तलवार व कुकरी कुठे आहे असे भटांनी विचारले तसे मी सामान ठेवायची जागा पाहू लागलो व दोन्ही शस्त्र बंद पडलेल्या एस. टी. त राहिल्याचे लक्षात आले. ही गोष्ट मी भटांना सांगितली तसे भट मिश्किलपणे म्हणाले ‘‘कसा रे तू मराठा? साधी तलवार व कुकरी सांभाळता आली नाही!’’ मी क्षणभर विचार केला अन उत्तरलो ‘‘मी तर तलवार अन कुकरीच गमावली तुम्ही तर अख्खी मराठेशाही गमावली !’’ यावर जोरजोरात हसत त्यांनी ‘‘क्या बात है!’’ असा प्रतिसाद दिला.
 विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे दौरे आटोपल्यावर, पुण्यात ‘अशी गावी मराठी गझल’ नावाचा कार्यक्रम झाल्यावर नागपुरातील रसिक मंडळींनी धनवटे सभागृहात माझा एकट्याचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला मी भटांकडे गेलो. बराच वेळ गप्पाटप्पा झाल्यावर कार्यक्रमाविषयी सांगून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यावर
‘‘मी काहून कार्यक्रमाले यावं? असा प्रश्न भटांनी केला.
‘‘माझा कार्यक्रम आहे म्हणून’’ मी.
‘‘तू कोन टिकोजी लागला का?’’ भट.
‘‘टिकोजी नाही पण तुमचा कोणी तरी लागतो ना?’’ मी.
‘‘तुले तं मालूम आहे का मी ऐ-या गै-याच्या कार्यक्रमाले जात नाही!’’ भट.
अशी गंमत सुरू असताना भटांनी कपाटातली ‘अंगूर की बेटी’ काढली.  मलाही आग्रह केला परंतु दिवसाढवळ्या ‘दारूकाम’ न करण्याचे ठरवल्यामुळे ‘नाही’ म्हणालो. लगेच भट म्हणाले ‘‘आता सांग तू का म्हंतं ते!’’ यावर मी, ‘‘पिदाडांशी जास्ती बोलत नसतो’’असे म्हणताच भट खो खो करुन हसायला लागले व ‘‘लयच चालू आहे रे तू!’’ असे म्हणून पुन्हा जोरजोरात हसायला लागले.
 मराठवाडा दौ-याचे वेळी औरंगाबाद मुक्कामी लोकमत कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यावर दुसरे दिवशी सकाळीच भटांना गझलचा मुखडा सुचला तो मला दिला. मी चाल बसवायला लागलो व भट लिहायला लागले. चौथा शेर मला त्यांनी दिला परंतु वाचल्यानंतर त्याचा अर्थ उमगायला वेळ लागला. म्हणून मी भटांना म्हटले ‘‘हे शेर गझल मध्ये ठेवू नका, कारण याचा अर्थ पटकन ध्यानात येत नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेर वाचला की ऐकणा-याला पटकन कळायला हवा. यावर भट म्हणाले ‘‘कवी कोण आहे? मी का तू?’’ तू आपलं काम कर’’ त्यावेळी मी चूप बसलो. या प्रसंगानंतर काही महिन्यांनी पुण्याला कार्यक्रम होता. आम्ही भटांच्या सासुरवाडीत सदाशिवपेठेत मुक्कामी होतो. कार्यक्रम सायंकाळी असल्यामुळे दुपारी घरीच मैफल जमली. त्यावेळचे सर्व नवोदित गझलकार याप्रसंगी उपस्थित होते. ‘‘मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठांपुनी मी दुर होतो’’ ही गझल गायला सुरवात केली. यमनमधील या बंदिशीत दुसरा शेर सादर करताना दोन्ही मध्यमांचा वापर केला. गझल संपल्यावर भट म्हणाले ‘‘तो दुस-या शेरात तू कोणता सुर लावला तो काही जमल्यासारखा वाटला नाही’’ माझ्या मनात औरंगाबाद खदखदत होतेच. मी लगेच म्हणालो ‘‘बावाजी संगीतकार कोण आहे? मी का तुम्ही? भटांच्या लगेच लक्षात आले व म्हणाले ‘‘वा औरंगाबादकर!’’. आणि आम्ही दोघेही हसायला लागलो. सुरेश भटांमुळे मी मराठी गझल गायक झालो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांच्यामुळेच मला अमरावतीत झालेल्या डॉ. नईमभाईंच्या चर्चेत सहभागी होता आले. इस्लामपूर्व गझलेचा शेर नईमभाईंनी सुरेश भटांना काढून दिला या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित राहू शकलो. भटांमुळेच सुरवातीच्या काळात वर्धेसाठी शेतकरी मेळाव्यात श्री शरद पवारांसमोर कार्यक्रम करु शकलो. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना नागपूरच्या अधिवेशन काळात रा. सु. गवई यांचे कॉटेजवर अंतुले, जवाहरलाल दर्डा प्रभृतींसमोर कार्यक्रम सादर करु शकलो. सत्कारही स्वीकारु शकलो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर या प्रसंगी हजर होते. 1982 पासून तिकीट लावून माझे कार्यक्रम सुरू झालेत याचे श्रेयही भटांनाच आहे. ते मला तेव्हाच ‘गझलनवाज़’ म्हणायचे परंतु मेहदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग सारख्या मंडळीसमोर आपण क:पदा्र्थ असल्यामुळे स्वत:ला ‘गझलनवाज़’ म्हणवून घेणे मला पटले नाही. त्याची गरजही वाटली नाही, वाटत नाही.
             आठवणींच्या गराड्यात अनेक आठवणी पिंगा घालीत आहेत. एक महत्वाची आठवण नमुद करुन संपवितो. मिरजेतील नवरात्र संगीत महोत्सवातील कार्यक्रम आटपून महाराष्ट्र एक्सप्रेसने धामणगाव-यवतमाळ असा प्रवास करुन आर्णीला साडेचार वाजता पोहोचलो. तर घरी भटांची तार येऊन पडलेली ‘‘ताबडतोब निघुन अमरावतीला ढवळेंकडे यावे, हृदयनाथ मंगेशकर येत आहेत’’ ही घटना 1981-82 च्या दरम्यानची असावी. त्यावेळी आर्णीहून बाहेरगावी जाण्यासाठी एकही बस नव्हती. पदर पसरून कशीबशी एकाजणाची मोटारसायकल मिळवून वासुदेव भगत या जिवलग मित्राला सोबत घेऊन अमरावतीकडे निघालो. यवतमाळच्या थोडे पुढे जात नाही तो मोटारसायकल बंद पडली. भगत हे कसलेले मेकॅनिक असल्यामुळे कसेबसे सकाळपर्यंत अमरावतीला पोहोचलो. भटांची भेट झाल्यावर रात्री ढवळेंकडे हृदयनाथांसोबत जेवण व माझी मैफल असा कार्यक्रम असल्याचे कळले. सायंकाळी 6 वाजता मंगेशकर आले. सगळ्यांशी गप्पा झाल्यावर भटांनी मला व हृदयनाथांना एका खोलीत नेऊन बसवले. आमची दर्जेदार‘व्यवस्था’करून दिली व ‘चलने दो’ चा इशारा करुन खोलीतून निघून गेले. आम्ही दोघांनी मस्तपैकी आस्वाद घेत संगीत नियोजन, बंदिशी, ध्वनीमुद्रण यावर एक दीड तास चर्चा केली. नंतर सोबत जेवण केले. मैफल जमवली. हृदयनाथ मंगेशकरांसमोर गाणे म्हणजे तोंडाचा खेळ नव्हता. परंतु भटांनी अतिशय समजुतदारपणे आमची अगोदरची ‘‘बैठक’’ जमविल्यामुळे मैफल जमवायला त्रास झाला नाही. मैफिलीनंतरही रात्री दोन वाजेपर्यंत मी आणि मंगेशकर गप्पा मारीत बसलो होतो. हे सगळे भटांमुळेच होऊ शकले.
 सर्व सामान्यापेक्षा वेगळं रसायन कवटीत घेवून जन्मलेले एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश भट होय. त्यांच्यामधे नेहमी एक कवी, तत्त्वज्ञ वावरायचा त्याच वेळी एक क्षणात रागावणारं, क्षणात गळ्यात पडणारं, क्षणात हसणारं, क्षणात आकांडतांडव करणार अवखळ निरागस व हट्टी मूलही त्यांच्यात हुंदडत असायचं... त्यांच्यातली मिश्किली भल्याभल्यांना कोड्यात टाकायची. सुरेश भटांच्या सहवासातील अनेक वर्षात मी त्यांच्या स्वभावाची जवळ-जवळ सर्व रुपे पाहिली. त्यातील काही रुपे आजही स्वच्छपणे समोर दिसतात. त्यांचे नवोदित गझलकारांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतांनाचे आणि त्यांच्या आकाशवाणीवरील 65 च्या कराराकरीता केंद्र निदेशकाशी वाद घालतानाचे भट... नवीन गझल लिहीणा-यांमध्ये एखादा फार जवळीक निर्माण करणारा जर परिस्थितीने गांजला असेल तर त्याला स्वत: व आमच्या सारख्यांना सांगून धान्य पुरवणारे कुटूंबप्रमुख भट... एखाद्याचा मुद्दा पटला नाही तर तोंडावर सांगण्याचा सडेतोडपणा व आवडला तर आवर्जून सांगणारे भट... जगण्यातील बिनधास्तपणा व त्यामुळे घडणा-या प्रसंगाला तोंड देणारे बिनधास्त भट... एखाद्या विषयी कसा का होईना गैरसमज झाला तर कोणी कितीही आणि कसेही समजाऊन सांगितले तरी न ऐकता गैरसमज कायम ठेवणारे एक वेगळे भट... जेवताना किंवा काही खाताना इतरांकडे लक्ष न देता ‘‘पार्वती पते हरहर महादेव’’ करणारे लहान मुलासारखे भट... जेवणातील एखादा पदार्थ आवडला तर बनविणा-या सुगृहिणीचे/बल्लवाचार्याचे मनापासून कौतुक करून त्यांची रेसिपी समजून घेणारे खवय्ये भट... भल्या-भल्यांशी पंगा घेणारे भट... स्वत:च्या मुलाच्या- हर्षवर्धनच्या भविष्याच्या काळजीने व्यथित होणारे भट... सामाजिक कार्यात पोटतिडकीने भाग घेणारे भट... सामाजिक, राजकीय व्यंगावर रोखठोकपणे लिहिणारे भट... जेवणापेक्षाही चहा-तंबाखूवर जास्ती प्रेम करणारे भट...सुरेश भटांची अशी कितीतरी रूपं माझ्या स्मरणात  अजूनही दरवळतात.
           आमची ही मैत्री म्हणजे एक वेगळं विश्व होतं आम्ही भांडायचो, वाद व्हायचे, प्रसंगी अबोला-रुसवा सुद्धा व्हायचा. शेवटी शेवटी मतभेदांमुळे थोडा दुरावा येत गेला पण मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. त्यांच्या कडू-गोड आठवणी आणि स्वरबद्ध केलेल्या त्यांच्या चाळीस गझला व दहा गीते आजही मला साथ देत आहे. वरून फणसासारखा भासणा-या सुरेश भटांचे अंतरंग अच्छाअच्छांना कळले नाही.केवळ त्यांच्या खाण्या-‘पिण्याची’ चवीने चर्चा करणा-यांना ते कधी कळणारही नाही.या फणसातील गोड गरे चाखण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.
 
-सुधाकर कदम
सी-१-सी/१३,गिरीधर नगर,
वारजे-माळवाडी,पुणे-५८. 
मोबा.९८२२४००५०९





 

Tuesday, December 22, 2020

गझलयात्रा...अमोल सिरसाट


'चकव्यातुन फिरतो मौनी'

         अवलिया हा शब्द सुफी संतांमुळे भारतात आला. सुफी संतांसारखे पायघोळ झगे घालतेले, सतत अल्लाहचे नाव घेत जगणारे लोक म्हणजे अवलिया असा समज प्रचलित आहे. परंतु मराठीत या शब्दाला स्वच्छंदी, छांदीष्ट किंवा आपल्याच धुंदीत जगणारा असे अनेक अर्थ प्राप्त झाले आहेत. भारतात गझलही सुफी पंथातील अवलिया संतांनीच आणली. मराठीत गझल रुजविणा-या अवलिया सुरेश भटांबरोबर सर्वप्रथम मराठी गझल गायकी रुजविणासाठी धडपडणारा एक चकव्यातून फिरणारा मौनी म्हणजे सुधाकर कदम! शास्त्रीय संगीतातील बहुतेक वाद्यांवर प्रभुत्व असलेल्या सुधाकर कदमांनी सुरुवातीच्या काळात सुरेश भटांबरोबर प्रसंगी पदराला खार लावून मराठी गझलेच्या प्रसार प्रचारासाठी प्रयत्न केला आहे.
 
       फारसी–उर्दू-हिंदी गझल गायकीला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. उर्दू गझल गायकीचे चाहते जगभरात पसरले आहेत. मराठी गझल गायकीला तशी परंपरा नाही. मराठीत गझलगायनाचे जे प्रयत्न झाले. त्यात सुगम संगीत आणि भावगीतासारख्या चाली देऊन गझल सादर केल्या जात. १९७५ मधे सुधाकर कदम यांनी ‘आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही’ ही यवतमाळच्या शंकर बडे यांची गझल १९७५ मधे सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध करून नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या संगीत विभागाच्या उद्घाटन प्रसंगी सादर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भट होते. इथूनच सुरेश भट आणि सुधाकर कदम या द्वयींचे सूर जुळले आणि मराठी गझल गायकीच्या परंपरेचा जन्म झाला. भटांनी सुधाकर कदमांना आपल्या अनेक रचना स्वरबद्ध करण्यासाठी दिल्या. हळुहळु त्यांनी स्वरबद्ध केलेल्या मराठीतील काही गझलांचा तीन तासांचा कार्यक्रम तयार झाला. या कार्यक्रमाला भटांनी ‘अशी गावी मराठी गझल’ असे शीर्षक दिले आणि महाराष्ट्रभरात या कार्यक्रमाचे प्रयोग सुरु झाले. १५ जुलै १९८२ ला पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना साप्ताहिक ‘लोकप्रभा’ मधे छापून आलेला मजकूर अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘सुरेश भटांनी शाबासकी दिलेल्या विदर्भातील सुधाकर कदम यांची गझल ऐकण्यास उत्सुक असलेले पुणेकर कार्यक्रमाअगोदर सभागृहात हजर झाले होते. सुधाकर कदमांनी 'सा' लावला मात्र पुणेकरांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे उत्फूर्तपणे स्वागत केले. आणि मग अशी रंगली मैफल की काही विचारू नका... गझल ही भावगीत किंवा सुगम संगीताच्या चालीवर गायची नसते तर शब्दांच्या मूळ अर्थाला आणखी अर्थ लावून शब्दाचा आनंद सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी गझलगायनाचा हा केलेला महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे.’ गायकीच्या अंगानेसुद्धा मराठी गझल हा वेगळा प्रकार आहे. गझलेची बंदिश (सोप्या भाषेत चाल) प्रत्येक शब्दाला जिवंत करून अर्थाचे वेगवेगळे आयाम प्राप्त्त करून देत असते. गझलगायक प्रत्येक शब्दाला हळुवारपणे गोंजारत गझलकाराच्या मनातील भावनांचा प्रवाह रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोहोचविण्याचे काम करीत असतो. अशाप्रकारे गझल स्वरबद्ध करून मराठीत सर्वप्रथम गझलगायनाचे श्रेय सुधाकर कदम यांचेकडेच जाते.
            यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या छोट्याशा गावी १३ नोव्हेंबर १९४९ रोजी जन्मलेल्या सुधाकर कदम यांचे वडील पांडुरंग कदम हे वारकरी संप्रदायातील विदर्भातील सुप्रसिद्ध गायक आणि हार्मोनियम वादक होते. सुधाकर कदमांना संगीताचे प्राथमिक धडे त्यांच्याकडूनच मिळाले. यवतमाळला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असतानाच ‘शिवरंजन’ ऑर्केस्ट्रामधे संगीत संयोजन, ऍकॉर्डियन वादन व गायन असा व्याप सांभाळता सांभाळता त्यांना चाली बसविण्याचा छंद जडला. सतत दहा वर्षे दहा बारा तास रियाज करून त्यांनी विविध तंतूवाद्ये आणि तालवाद्ये हाताळण्यात प्राविण्य मिळविले. याचा फायदा आकाशवाणी नागपूरची स्वरपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी झाला व ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व मेंडोलिन वादक झाले. आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायक-वादकांना त्याकाळात सन्मानाचे स्थान होते. त्यानंतर सुधाकर कदम हे आर्णी येथेच संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले.
              सुरेश भट कदमांकडे आर्णीला मुक्कामी असायचे. आर्णीला मुक्कामी असताना त्यांनी अनेक गझला लिहिल्या. त्यापैकी एक गझल म्हणजे –

ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची
तापलेल्या अधीर पाण्याची

            ही गझल भटांनी लिहिली आणि लगेच सुधाकर कदमांना चाल लावण्यासाठी दिली. ते लगेच हार्मोनिअम घेऊन बसले आणि अख्खी रात्र जागून एक वैशिष्ट्यपूर्ण चाल दिली. भट त्यांची रात्रभराची तगमग पहात होते. त्यांनी सकाळी मनभरून दाद दिली. सृजनासाठी धडपडणा-या प्रत्येकाला ही तगमग स्वस्थपणे जगूच देत नाही. रात्रीअपरात्री भोवताली निरव शांतता असते मात्र कलावंताच्या मनात मात्र प्रचंड वादळ उठलेले असते. तो सगळे प्रहर जागून काढतो तेव्हांच उत्तम कलाकृती निर्माण होतात. सुधाकर कदमांनी भटांसह अनेक गझलकांरांच्या रचनास्वरबद्ध केल्या आहेत. त्याच्या मराठीसह उत्तमोत्तम हिंदी-उर्दू बंदिशींचा खजिना पुढील पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. सुधाकर कदमांच्या कन्या भैरवी आणि रेणू यासुद्धा त्यांच्या गझलगायकीचा वारसा समर्थपणे चालवित आहेत. त्यांचे चिरंजीव निषाद कदम हे उत्तम तबलावादक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटूंबच गझलमय झाले आहे असे म्हणावे लागेल.
             सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गझल गायक म्हणून त्यांचा गौरव केला आहे. सुरेश भट तर त्यांना ‘ महाराष्ट्राचे मेहदी हसन’ असे संबोधत असत. पुण्यातल्या त्यांच्या मैफिलींचे निवेदन खुद्द सुरेश भटांनी केले होते. मराठी गझल जनमानसात रुजविण्याचे या मंडळींचे कार्य पाहिले की खरोखरच नतमस्तक व्हावेसे वाटते. आणि म्हणूनच पुणे विद्यापिठाने कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते व ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या उपस्थितीत त्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृतिदिनी ‘सुरेश भट स्मृतिपुरस्कार २००९ ‘ व ‘गझलगंधर्व’ हा किताब देऊन सन्मानित केले आहे. पुण्याच्या अक्षर मानव प्रकाशनाने ‘चकव्यातून फिरतो मौनी’ हा गौरवग्रंथ श्रीकृष्ण राऊत यांच्या संपादनात प्रकाशित केला आहे. गायनासाठी स्व.छोटा गंधर्व आणि आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे मार्गदर्शन लाभलेले सुधाकर कदम हे एक उत्तम शिक्षक, संगीतकार, गायक, वादक तर आहेतच पण विनोदी लेखक, आणि कवी सुद्धा आहेत. 

सुधाकर कदम सी-१-सी/१३, गिरीधरनगर, वारजे माळवाडी ', पुणे - ४११०५८ भ्रमणध्वनी- ८८८८८५८८५०
..............................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

यापूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचण्यासाठी अवश्य भेट द्या 👉
http://gazalyatra2020.blogspot.com


 

Saturday, December 19, 2020

पंडित सुधाकर कदम...सीमा गादेवर

.            १९८१ मध्ये कविश्रेष्ठ सुरेश_भट व गझल गायक सुधाकर_कदम हे  मराठी_गझल गायकी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी निघाले होते.त्याची सुरवात विदर्भापासून झाली.तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्याच्या सुरवातीला पांढरकवडा (जि.यवतमाळ) येथे आले असता माझ्याकडे एक सुंदर मैफिल झाली.आणि तेव्हापासून माननीय सुधाकरजी कदम या गझल गायकांची मी 'पंखा' झाले...ती आजतागायत !

      त्यांच्या " तुझ्यासाठीच मी... ' या अल्बमचे प्रकाशन      झालेय या समजुतीत मी अगदी काल पर्यंत होते...पण काल प्रकाशनाबद्दल fb वर वाचले.आणि लगेच हा अलबम विकत घेतला व त्याचे पारायण केले...हे पारायण करताना मला जे सुचले,भावलेे ते आपणा रसिकांसमोर मांडत आहे.            
                                         
 "तुझ्यासाठीच_मी... " या मराठी गझलच्या  अल्बममध्ये 'गझलगंधर्व'  श्री. सुधाकरजी कदम या गायक व "पंडित" ही ऊपाधी  कमीच पडावी अशा या  संगीतकाराने- कवी श्री.दिलीप पांढरपट्टे  व  गायिका  वैशाली माडेसह  एक  न्  एक गझलेला, गाण्याला....  प्रत्येक ओळीचा  व शब्दातला  भाव  जाणून आपल्या  स्वर-साजाने  नवा आलेख  व आशय  दिला आहे.शब्दांना  वेगवगळ्या  सुरावटीतून  गुंफतांना एक  मायाजालच  आपल्याला हळूहळू  आनंदात सामील करीत आपल्या  कानातून थेट हृदयावर साम्राज्य गाजवते  !  
      
            सगळ्या रचना एकाच संवेदनशील कवीच्या असूनही    लाजवाब आहेत.तरूणाईला तालासूरावर  खिळवून ठेवणारी रचना----
"किती   सावरावे....  कसे   सावरावे"
      ...किती   बहारदार... यातील कोरस,गिटार हलकेच जी  साथ देतात व रूंजी  घालून  गायब होणारी फुलपाखरासारखी अकाँर्डियनची गिरकी यामुळे  ऐकणाऱ्याचा  खरेच झोक   जातो!    
" तुझा भास झाला पुन्हा आडवेळी,  
पहाटे पहाटे जसे ऊन्ह यावे....."    
               या ओळी  तसेच कोरसचे  सूरही वेगळेच रंग     भरणारे आहेत ! क्या बात! याच रचनेतील  
 "ईथे मेघ भरला...तिथे मोर फुलला,
अरे  ईश्वराला असे ओळखावे..."
                ह्या ओळी तर  प्रणयातला  रस  व शॄंगार केवळ एका ओळीच्या  चालीतून व आवाजातून असे जमलेय की ईश्वरी देणगी मिळालेले हे  तिघंही --- गीतकार,संगीतकार व गायक आपणास ईश्वरी सॄजनातील तारतम्य व  तन्मयताही स्वरांच्या व आवाजाच्या  विविध वळणांद्वारे जागो-जागी दाखवतात.                                                                                   यातीलच     
"आसवांना टाळणे आता नको,
दु:ख  हे सांभाळणे आता नको..."       
या गझलेत  शब्द....सूर...लय व  तालाची हलकी रिमझिम घेऊनच अंगावर येते.  
"बोललो  त्याला किती झाली युगे,
हा अबोला टाळणे आता नको..."      
असे मोजके शब्द गायिका वैशाली माडे  यांचे नर्म मधाळ     गळ्यातून ऐकल्यावर आपले काळीज केव्हा काबिज केले गेले हे कळतही  नाही ! 
कसबी संगीतकार  सुधाकरजी यांची नादब्रह्माशी सूर जुळलेली स्वर-रचना...
"घाव  ओला जरासा होता" 
रूपक तालाला 'वेस्टर्न टच' देऊन साईड ऱ्हिदममध्ये चुटक्यांसह इतरही वाद्यांचा वेगळ्या प्रकारे उपयोग करून जी झिंग आणली आहे त्याला तोड नाही....तसेच 
"वेदनेचा दिलासा होता" 
या ओळीतील 'वेदनेचा' या शब्दातील वेदना वैशालीने अश्या प्रकारे दाखविली की अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा यावा...
प्रत्येक गझलेतील  पुढल्या ऊत्तराच्या  ओळींची गंमत लाजवाबच!     
          सुधाकरजींची गझलेला व गीतांना  नव्या नव्या,     अव्वल चाली देउन  अवघी  मैफिल  वेड्यागत आपलीशी      करून  घेण्याची आदत फार फार जुनी  नाही तर  ; केवळ    पंचेचाळीस  वर्षांपूर्वीची आहे! तेच हे विदर्भातील  एके       काळचे अत्यंत नम्र,  लोकप्रिय  गायक 
!...........आजही तसेच अविरत,शांतपणे तेच  तपस्वी दान परत संगीतकाराच्या रूपाने आपल्या ओंजळीत भरभरून घालत आहेत....दाता बनून  देत आहेत............
याच अल्बमधील
"असेच जगलो झुगारले या जगास जेव्हा,   
असाच झाला तुझा नि माझा प्रवास तेव्हा"      
 या गझलेत सुधाकरजींनी तबला,सतार व  सारंगीचे सूर अचूक    स्थळे हेरून असे काही पेरलेत कि आपण नकळत गुलाम अलीच्या गझलां इतकेच  एका मोहक नादमयी अंमला खाली सूर-शब्द-ताल यांचे वारूवर आरूढ  होत पुढे पुढे जातो !... एक  हूरहूर   लागून   रहाते.........                                      
 "कळे ना मला  हे  कसा नेमका तू ,       
कधी ऊन्ह होशी,कधी चंद्रमा  तू..."    
          या गझलेला अशी काही सुरावट दिली... की   प्रेयसीला पडणारे गोड कोडे सूरांमूळे अलगद सुटल्याचा अफलातून प्रत्यय येतो! (ही रचना ऐकताना  मला मदन मोहन या  प्रख्यात संगीतकाराची प्रकर्षाने आठवण आली.)          
अशीच आणिक एक दुसरी हासरी गझल...                      
 "नुसत्याच तुझ्या हसण्याने जगण्याचे दु:खं वितळले,
एकाच तुझ्या स्पर्शाने आभाळ  मनाचे  भरले...."     
        हे विलोभनिय शब्दांचे अवकाश....तार सप्तकात ऊचलून नेणारे गर्भश्रीमंत सूर.........  अगदी सहजतेने मनाचा ठाव  घेउन आपला ताण विसरायला भाग पाडतात.....

" अक्षरे पुसटली आणिक हरवली खुणेचि पाने,
जाणुन ईशारा मी ही मग पुस्तक माझे मिटले   !"
            कवीने अशी नर्म मर्मस्थळे अनेक जागी पेरलीत! वाद्ये   तर स्वर्ग दोन बोटेच उरलाय असे  वाटायला लावतील एवढी बेजोड. तरीही शब्दांना वाजवी न्याय देत देतच आपले ईमान न सोडता..पेरलीय ! असे नेमके स्वरसौंदर्य शब्दांना  बहाल करणारे सुधाकरजी म्हणजे शास्त्रीय संगीताला नवा अध्याय जोडणारे कलावंत ! हा सच्चा गायक/वादक कलाकार रागांचा व तालांचा सुरेख वापर  मराठी गझलेसाठी करुन हिंदुस्तानी शास्त्रीय  संगीत कलेला एक  नवा साज/वसन बहाल करतोय,ही फार मोठी गोष्ट आहे.

             "तुझ्यासाठीच मी माझे तराणे छेडले होते"
ही रचना गझल म्हणून व कंपोझिशन म्हणून उचांकच आहेअसे मला वाटते.यातील तरल भाव,हळवअधिरे समर्पण,विलगतेची खंत,तक्रारीचा हळुवार सूर,सलत जाणारी वंचना आपल्या मनात खोलवर रुजत जाते...
"जगाच्या सर्व शपथा मी जरी त्या मोडल्या होत्या,
तुला जे जे दिले ते ते वचन मी पाळले होते...."
          यातील उरात ठसलेल दुखरा सल सुरावटीद्वारे दाखविण्यात सुधाकरजी यशस्वी ठरलेत ! या गझलच्या प्रत्येक शेरातील भाव परस्परांना जराही धक्का लागू न देता एखाद्या माहीर शल्यविशारदाच्या नजाकतीने स्वारांद्वारे हाताळत भावाभिव्यक्ती केली...या अलबम मधील बहुतेक रचना कल्याण थाटावर आधारित आहेत.पण ऐकताना मात्र हे जाणवत नाही.आणि इथेच संगीतकाराचे सारे कौशल्य प्रकर्षाने दिसून येते.
"मनाच्या खोल डोहाच्या तळाशी ठेवले जपुनी,
निखारे धुंद श्वासांचे तुझ्या जे पेटले होते..."
            यातील सुरावटीमुळे 'मनाच्या'शब्दाचे फुलपाखरू बनते व 'खोल डोह' अक्षरश: डोह बनून अंगावर काटा फुलवणारा 'अँटिक पीस' बनून जातो.
               याच अलबम मधील
"आई असते श्रावण अविरत रिमझिमणारा"
हे फार वेगळ्या सुरांसह पूजेचं ताट घेऊन येणारं,आईची महती सांगणारं सुरेख व सुरेल गीत आहे...यातील शांत सागरासारखे रुपेरी सूर संपूर्ण दिवस गोड करून जातात.
             सुधाकरजींनी स्वरबद्ध केलेला "#काटयांची_मखमल" हा सुरेशजी वाडकर व वैशाली माडेच्या आवाजातील असाच एक आणखी 'जानलेवा' अलबम...
         सुरेशजींच्या मुरलेल्या गळ्यातून संगीतकार म्हणून सुधाकरजींनी जे काही गाऊन घेतलेय ते ही अफाटच!
(सुरेशजींनी अलबमच्या प्रकाशन प्रसंगी हे कबूल केल्याचे मी वाचले.तसेच कवी व संगीतकार आदरणीय यशवंतजी देव यांनी सुद्धा "शब्द स्वरांची मखमल" असे या अलबम संबंधी उद्गार काढले.) यातील प्रत्येक गझल ऐकतांना हे फार प्रकर्षाने जाणवते ......     
मराठीतून इतक्या देखण्या सुरावटीच्या गझला  इतके दिवस का नाही  दिसल्या ? हा प्रश्न पडतो.... वैशाली माडेच्या आवाजातील ही गझल हा प्रश्न अधिक तीव्र करते....
"हसू ऊमटले दु:खं भोगता,गंमत आहे,
गझल मिळाली तुला शोधता,गंम्मत आहे"
             आणि या  गझलेत उत्तर ओघानेच मिळून जाते! ......यातील व्हायोलिनच्या सुरावटीने मन शांत शांत होऊन जाते.या गझलमधील एकूण एक शेर शब्द-सूर - लय- तालाची लयलूट करणारा आहे.गिटार , सतार , व्हायलीन
याची  हळूवार मस्ती खऱ्या अर्थाने 'गंमत' आणून आर्ततेच्या टोकाला नेणारी आहेत......
        ..... या दोन्ही अल्बमसाठी जीवतोडपणे मेहनत घेणारी सारी कलाकार मंडळी व कुटुंबीय यांना वंदन...(विशेषतः दोन्ही अलबममधील सारंगी व बासरी कायम लक्षात राहणारी आहे.)सुधाकरजींचा कायम असाच मूड व लोभ रसिकांवर राहून नवनव्या बंदिशी ऐकायला मिळो हीच सदिच्छा !
 -सीमा     गादे    (गादेवार )    
मुम्बई.
---------------------------------------------------------------------
(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व #अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...)
-----------------------------------------------------------

●पहिले छायाचित्र-सीमा गादेवार, सुरेश भट आणि गाताना अस्मादिक...घरगुती मैफल.
●खाली - दैनिक लोकमत,नागपूरचे कात्रण.(रात्री झालेल्या पांढरकवड्याच्या कृषी भवनातील सुरेश भट व माझ्या संयुक्त कार्यक्रमाचे.)


 

Sunday, December 13, 2020

मराठी गझल गायक सुधाकर कदम...सुरेश गांजरे


 (दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर.विशेष पुरवणी ४/१२/१९८०)

          मराठी गझलांना स्वरबद्ध करून आपल्या सुरेल आवाजात सादर करण्याचा एक स्तुत्य उपक्रम गायक सुधाकर कदम यांनी सुरू केला आहे. विदर्भातील अनेक शहरात त्यांनी आजवर मराठी गझलांचे अनेक कार्यक्रम पेश केले आहेत.महाराष्ट्रातील गझलकारांच्या गझला सादर करणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ असल्याने रसिकांनी आपल्या पसंतीची पावती दिली आहे.

'दुभंगून जाता जाता मी अभंग झालो'

या सुरेश भटांच्या गीताने ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतात.त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा अप्रतिम गझला सादर होऊ लागतात.रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन आपल्या जिवाचे कान करून ऐकत असतात.

'मी गोड या स्वरांनी गातो जरी तराणे
गीतात हाय येती संदर्भ जीवघेणे...'
ही नीलकांत ढोलेची गझल,

'आम्ही असे दिवाणे आम्हास गाव नाही
आम्ही घरोघरी अन आम्हास नाव नाही'
ही शंकर बडेची गझल,

'फुलवू नकोस आता उसने गुलाब गाली'
ही पुण्याच्या रमण रणदिवेची गझल रसिकांची उत्स्फुर्त दाद घेते.
          श्री सुधाकर कदम हे संगीत विशारद असून आर्णी येथील महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतात. तेथेही त्यांनी 'गांधर्व संगीत विद्यालय' स्थापन करून आपली कलोपासना सुरूच ठेवली आहे.स्वतः कदम यांना शब्दांची चांगली 'जाण' असल्याने ते शब्द व स्वर याची उत्कृष्ट सांगड घालतात.प्रत्येक शब्दाला असलेला खास रुतबा सांभाळून  पेश केल्याने त्याची खुमारी काही औरच असते.
           सौ.प्रभा मॅथ्यू व कु.रतन जोशीसुद्धा कदमांनी स्वरबद्ध केलेल्या गझला कार्यक्रमातून पेश करतात.तबलापटू श्री.शेखर सरोदे यांच्या बोटांची जादू अप्रतिमच असते.अत्यंत परिश्रम घेऊन श्री.कदमांनी हा संच ग्रामीण भागातून उभारला.ही कौतुकाची बाब आहे.त्यांच्या शाळेचे व्यवस्थापक श्री.राजकमलजी भारती व मुख्याध्यापक श्री.बुटले गुरुजी यांचे मोलाचे सहकार्य  त्यांना लाभते.
           हा 'गझल'चा कार्यक्रम कधी कधी अक्षरशः रात्र संपेपर्यंत चालतो.विशेषतः स्वतः कदम

'पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली'
सुरेश भट

'सखे, सांजवेळी नको दूर जाऊ'

अशा नाजूक,शृंगारिक रचना आपल्या मुलायम स्वरात खास ढंगाने सादर करून रसिकांची मने जिंकून घेतात.मधून-मधून ते उर्दू गझळसुद्धा आपल्या खास चालीमध्ये उत्कृष्टपणे सादर करतात.

'मार्गावरून माझ्या मी एकटा निघालो'

ही उ.रा.गिरी यांची गझल म्हणजे या कार्यक्रमाची भैरवी!आपल्या आवाजातील तमाम दर्द ओतून सुधाकर कदम ती पेश करतात.क्षणभरासाठी रसिकांची मने हेलावून जातात.रसिकांच्या वृत्ती गलबलून काढण्याचे सामर्थ्य त्यांच्या स्वरात असते.
          सुरेल आवाजाची देण आणि कठोर परिश्रम यामुळे अल्पावधीतच श्री.कदम यांनी गझल गायनाच्या प्रांतात आपला चांगलाच जम बसविला आहे.एक नवा पायंडा ते पाडत आहेत ही कौतुकाची बाब ठरावी.श्री.सुधाकर कदम यांना त्यांच्या अंगीकृत कार्यात उदंड यश लाभो,ग्रामीण कलावंताची ही प्रतिभा आनंददायी ठरो ही अपेक्षा.

(प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत संपादित व अक्षरमानव प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी'मधून...)


 

Friday, December 11, 2020

जाणकार संगीतकार...अनुराधा मराठे


          माझी व सुधाकर कदम यांनी ओळख २००५ मध्ये झाली.ते 'अर्चना' या मराठी भक्तीगीतांच्या अल्बममध्ये काम करीत होते.या अल्बममध्ये गाण्यासाठी त्यांनी मला बोलाविले.हीच आमची पहिली भेट होय.या वेळी ते उत्तम संगीतकार आहेत,उत्तम गझलगायक आहेत याची अजिबात कल्पना नव्हती.ते नागपूरचे आहेत एवढेच मला माहीत होते. नंतर हळू हळू त्यांच्याबद्दल माहिती मिळत गेली.विदर्भासोबतच महाराष्ट्रभर त्यांनी सुरेश भटांसोबत मराठी गझलकारांच्या गझलांना स्वरबद्ध करून गायिल्याचे येथील (पुण्यातील) गझलकारांकडून कळले.तसेच आर्णी या छोट्याशा गावी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत असताना गझल गायकीसोबतच अनेक उपक्रम राबविल्याचेही कळले.
त्यात माझ्या दृष्टीने महत्वाचे कार्य म्हणजे गांधर्व विद्यालयाची स्थापना व परीक्षा केंद्र होय.
          'अर्चना' ह्या अल्बमचे काम सुरू करायचे ठरल्यावर चाली सांगण्यासाठी ते माझ्याकडे आले.दुसऱ्यावर बघताक्षणीच प्रभाव पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.बोलण्याच्या आवाजावरून हा माणूस गात असावा असा अंदाज येणारे अत्यंत मृदू बोलणे.समोरच्या व्यक्तीला सहज आपले करून घेणारे वागणे,यामुळे प्रथमदर्शनीच सुधाकर कदम या व्यक्तीचा अंदाज मला आला.ह्या वेळी त्यांच्या दोन्ही 'गायिका' कन्या त्यांच्या सोबत होत्या.मनात म्हटलं ,'सगळं घरच गाणारं दिसतंय.' असो
          'अर्चना' या अल्बममध्ये माझी पाच गाणी आहेत. अतिशय अप्रतिम व आकर्षक चाली आहेतच.पण त्याचबरोबर श्रवणीय आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या आहेत.मला वाटते गझल गायकीमुळे शब्द,काव्यातील अर्थ याचा अचूक अंदाज सुधारजींना आहे.त्यामुळेच या अल्बममधील आशा पांडे यांच्या गीतांना समर्पक अशा चाली त्यांनी लावल्याचे दिसून येते.सुंदर शब्द व सुंदर स्वररचना यांचा सुंदर मेळ म्हणजे ,अर्चना'! या अल्बममध्ये एकूण दहा भक्तिरचना आहेत. खालील शब्दांवरून त्या किती प्रासादिक आहेत याची आपणास कल्पना येईल.
१.श्रीहरी रे श्रीहरी,नाद केवळ एक घुमतो,श्रीहरी रे श्रीहरी...
२.शक्ती दे तू आज मजला दुःख सारे वेचणारी...
३.ये मंत्रांची घुमवित वीणा छेड मनाचे मंजुळ तार...
४.तुझीच सुमने तुझे निरंजन,चरणी तुझिया तुझे समर्पण...
५.वेद झाले वेदनांचे,शब्द झाले रे ऋचा...
६.श्याम घन घनश्याम माझा सावळा घनश्याम रे...
७.दयासागरा...
८.माझ्यावरी हरीची करुणा अपार आहे...
९.अर्चना...
१०.या देहाचे देऊळ झाले...
           यातील पहिलेच गाणे शुद्ध गांधारावरुन उठणारे भूपाच्या अंगाने जाणारे आहे.भूपामध्ये मधून मधून केलेल्या शुद्ध निषादाच्या वापरामुळे ही बंदिश अतिशय गोड व वेगळी झाली आहे.शौनकचे (अभिषेकी) व माझे 'शक्ती दे तू आज मजला' असे आवाहन करणारे शब्द व त्यानुसार भिन्नषड्ज रागात केलेली रचना,त्यातही मध्यमाला षड्ज करून मूर्च्छना पद्धतीने केलेली पुढील स्वररचना,त्याला लावलेल्या चाचर तालामुळे अतिशय स्फूर्तिदायक झाली आहे.एक आवेश व आवेग या भक्तिगीतामध्ये शब्द-स्वरांद्वारे प्रत्ययास येतो.'अर्चना' हे माझे या अल्बममधील सर्वात आवडते गाणे आहे.
'तूच माझे गीत कोमल,भाव तू उल्हास रे
तूच माझी अर्चना,तू अंतरी विश्वास रे...
सुंदर शब्द व अत्यंत आर्तता असणारी स्वररचना.आणि 'विश्वास रे' वरची अवरोही जागा फारच सुंदर.सुरांचे घरंगळणे. दोरा सुटल्यावर मोती जसे घरंगळतात तसे तसे इथे स्वर घरंगळले आहेत.सुधाकरजी उत्तम संगीतकार असण्याची साक्ष द्यायला हा एकच अल्बम पुरेसा आहे.
           मी त्यांचे पुढील सर्व आयुष्य पूर्ण आयुरारोग्य व सुरांच्या संगतीत जावे अशी प्रार्थना करते.

१३/११/२०१८

प्रा.डॉ.श्रीकृष्ण संपादित व 'अक्षरमानव'प्रकाशित सुधाकर कदम सन्मानग्रंथ 'चकव्यातून फिरतो मौनी' मधून....
--------------------------------------------------------------------


 

बाबा-रेणू कदम चव्हाण

.
      मी लेखिका वगैरे नाही.पण काही आठवणी अजूनही कालपरवा घडल्याप्रमाणे डोळ्यापुढे तरळत आहेत,जसजशा आठवतील,तशा सांगायच्या आहेत.
      लाल-तांबूस डोळ्यांचा कोणी एक व्यक्ती माझ्या घरात रोज रात्री यायचा आणि सकाळ झाली की निघून जायचा.तो कोण असेल बरे,मला हा प्रश्न नेहमी पडे. नंतर हळूहळू लक्षात आले की,ते माझे वडील आहेत.
      पूर्वी बाबा फार तापट,रागीट होते.रात्री कार्यक्रम करून उशिरा घरी येणे आणि सकाळी उठून शाळेत रुजू होणे, शाळेतील संगीत कक्षात दिवसभर रियाज,रात्री कार्यक्रम अशी त्यांची दिनचर्या असे.त्यामुळे लहानपणी बाबा आम्हाला कमीच मिळाले.आम्ही आर्णीला एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत रहायचो.नंतर स्वतःचे घर झाले तेव्हा बाबांचा सहवास अधिक प्रमाणात लाभू लागला.तेव्हा बाबा खरेच काय आहे,हे हळूहळू कळायला लागले.
      बाबा हे एक उत्तम संगीतकार तर आहेतच पण त्याचबरोबर एक चांगले शिक्षकसुद्धा आहेत. एखादे गीत व गझल शिकवताना एखाद्या कळीच्या पाकळ्या उमलून त्याचे फुल कसे बनते तसे बाबांचे शिकवणे. जोपर्यंत गळ्यातून निघत नाही तोपर्यंत अजिबात न चिडता सांगत रहायचे.बाबांचे आणखी एक वैशिष्ठय म्हणजे त्यांच्या बंदिशी आणि चाली या ऐकायला सोप्या पण गायला अतिशय कठीण.एक किस्सा असाच आठवतो.माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे.आम्ही 'तसव्वुर' हा सागर साहेबांच्या उर्दू गझलांचा कार्यक्रम करीत होतो.त्यात 'कहता हूँ मूहब्बत है खुदा सोच समझकर' या भैरवीतील गझलेची रिहर्सल करीत होतो.हार्मोनियमवर भाविक राठोड हा एक उमदा गायक बसला होता. आणि 'कल उम्र का हर लम्हा कहीं सांप न बन जाए' हा शेर चालू होता.तो सारखा सांप च्या जागी अडकायचा. बाबांनी त्याला अस्सल वऱ्हाडीत विचारले,'काहून र बाप्पू का व्हा लागलं? तसा तो म्हणाला ,काही नाही बाबा,साप त सापडला पण शेपूट नाही गवसा लागलं तव्हाचं'.
      बाबांचे व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे करणारे होते.त्यांचे असंख्य मित्र आणि चाहते यांची घरी नेहमी वर्दळ असायची. आर्णीला आमचे घर कधीच रिकामे राहायचे नाही.कोणी ना कोणी सतत घरी असायचे.
     आज त्यांच्या गौरव ग्रंथासाठी लाख लाख शुभेच्छा.आई आणि बाबा,तुम्हा दोघांना उर्वरित आयुष्य निरोगी आणि सुखासमाधानाचे जावो ही मनापासून इच्छा व्यक्त करून थांबते.धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
डॉ. श्रीकृष्ण राऊत संपादित,
'अक्षरमानव' प्रकाशित सन्मानग्रंथ (१३/११/२०१८)
'चकव्यातून फिरतो मौनी' मधून...


 

Sunday, December 6, 2020

मराठी ग़ज़लें भी उर्दू की तरह मधुर होती है...प्रभाकर पुरंदरे.


            साहित्य, कला तथा संगीत किसी जाति, भाषा या देश तक सीमित नही रहते बल्कि उनका प्रभाव मानवी रुचि के अनुरुप व्यापक होता है़ आजकल संगीत के क्षेत्र में ग़ज़ल गाने और सुनने का काफी प्रचलन है । प्रायः ग़ज़ल को लोग उर्दू संस्कृति की देन समझते है । गुलाम अली, मेहदी हसन, जगजीत-चित्रासिंह आदि की हिंदी-उर्दू ग़ज़ले तो वर्षों पहले ही संगीत शौकीनों के दिलों मे घर कर चुकी है । हिंदी-उर्दू के अलावा पंजाबी और गुजराती मे भी ग़ज़लें बरसों से गाई जा रही है । मराठी गायन क्षेत्र मे भी ग़ज़ल तेजी से अपना प्रभाव जमा रही है । मराठी मे ग़ज़ल सबसे पहले माधव पटवर्धन द्वारा लिखी गई थी, परंतु विद्वानों ने उसे ग़ज़ल न मानकर भावगीत की संज्ञा दी । सुप्रसिध्द ग़ज़ल गायक एवं लेखक सुरेश भट ने मराठी ग़ज़लों को लोकप्रिय बनाने में विशेष भूमिका निभाई । उनके बाद अनिल कांबले, श्रीकृष्ण राऊत, उ़. रा़. गिरी, प्रदीप निफाडकर आदि ग़ज़ल लेखकों के नाम आते है । फिलहाल मंगेश पाडगावकर श्रेष्ठ ग़ज़ल रचयिता माने जाते है ।
 पिछले दिनो शहर के जाल सभागृह मे इन श्रेष्ठ रचनाकारों की ग़ज़लें सुनने का अवसर मिला । गायक थे - सुधाकर कदम । सोलह दिसंबर की शाम लगभग चार घंटे तक चले मराठी ग़ज़ल महफिल कार्यक्रम में कदम ने कई ग़ज़लों को अपने मधुर स्वरों में गाकर उपस्थित संगीत रसिकों को आनंदित किया । ‘कुठलेच फूल आता मजला पसंत नाही़’, ‘सूर्य केव्हाच अंधारला यार हो़’, ‘झिंगतो मी कळेना कशाला़’ ‘लोपला चंद्रमा, लाजली पौर्णिमा़,तथा ‘नको स्पर्श चोरू नको अंग चोरू.’ आदि गजलों को श्रोताओ ने खूब पसंद किया ।
 गायक सुधाकर कदम के पिता महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय के संगीत से संबद्ध रहे है । सो पिता से शास्त्रीय संगीत की उन्हें प्रेरणा मिलना स्वाभाविक है । ग़ज़ल गायकी के क्षेत्र मे आने के पूर्व सुधाकरजी भाग्योदय आर्केस्ट्रा नामक संगीत मंडली को चलाते थे । 'भरारी' नामक उनके ग़ज़लों की कैसेट काफी लोकप्रिय हुई है । हाथरस से प्रकाशित होने वाले संगीत मासिक संगीत के वे स्तंभकार है । इस पत्रिका के ‘नग़्म ए-़ग़ज़ल’ कॉलम के अंतर्गत वे ग़ज़लों की स्वरलिपि लिखते है । ग़ुलाम अली एवं मेहदी हसन जैसे वरिष्ठ गजल गायकों से गजलों से संस्कार आत्मसात करने वाले सुधाकर कदम ने बच्चों के लिए भी कई मधुर कविताओ को भी स्वयं संगीतबद्ध किया है । वे अपनी गाई ग़ज़लों को भी स्वयं ही संगीतबध्द करते है । बच्चों के लिए उन्होने झूला सीरिज के अंतर्गत तीन भागों में कविताओं को संगीतबद्ध कर कैसेट का रूप दिया है ।
 सुधाकरजी से बातचीत के दौरान बताया कि, उन्होंने वर्‍हाडी कवि शंकर बडे की ग़ज़ल को गाया था। ग़ज़ल का पहला कार्यक्रम पुणे के गडकरी हाल में हुआ था । यह कार्यक्रम काफी स्मरणीय था, क्योंकि इसकी अध्यक्षता गजल रचयिता सुरेश भट ने ही की थी । कदम बताते है कि इस कार्यक्रम में संगीत प्रेमियों की उपस्थिति से हाल खचाखच भर गया था । लोगों ने इस कार्यक्रम को खूब पसंद किया ।
 मराठी ग़ज़लों मे कई बार उर्दू भाषा के क्लिष्ट शब्दों का भी प्रयोग किया जाता है, इससे श्रोताओ को समझने में कठिनाई तो महसूस होती होगी? इस सवाल के जवाब मे कदम बताते है कि भाषा संबंधी कठिनाइया तो सभी प्रकार की ग़ज़लों में है । लेकिन जहां तक शुध्द मराठी ग़ज़लों का सवाल है कुछ मराठी ग़ज़ल रचनाकारों ने अत्यंत सरल एवं प्रभावी शब्दों का प्रयोग किया है । सुरेश भट, श्रीकृष्ण राऊत तथा ज्ञानेश वाकुडकर आदि इसके श्रेष्ठ उदाहरण है -
 
 ‘लोपला चंद्रमा लाजली पौर्णिमा,
 चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला.’ (श्रीकृष्ण राऊत)
 
 ‘नको स्पर्श चोरु, नको अंग चोरू
 सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू.’(ज्ञानेश वाकुडकर)
 
 तथा
 
 ‘कुठलेच फुल आता मजला पसंत नाही
 कळते मला रे हा माझा वसंत नाही.’ (सुरेश भट)

आदि प्रसिद्ध ग़ज़लों में सरल और प्रभावी मराठी शब्दों का प्रयोग हुआ है ।
 महाराष्ट्र और उसके बाहर लगभग ढाई सौ से ज्यादा ग़ज़ल कार्यक्रम सफलतापूर्वक आयोजित करने वाले सुधाकर कदम का मानना है कि मराठी ग़ज़लों का भविष्य काफी उज्ज्वल है । लोग शहरों में नहीं, बल्कि गांवो में भी इसे पसंद कर रहे है । उन्होने इस बात पर खेद व्यक्त किया कि जितनी ग़ज़ले आजकल मराठी मे लिखी जा रही है उतने गायक तैयार नहीं हो पा रहे है । उन्होने मराठी ग़ज़ल गायन के बारे में बेहिचक बताया कि इसमें उर्दू ग़ज़लों की तरह नजाकत होती है ।
 कदम, मराठी के अलावा हिंदी ग़ज़लें भी गाते है । इंदौर के अपने २५० वे कार्यक्रम में उन्होंने कुछ हिंदी ग़ज़लें गाई थी । उन्होंने यह स्वीकार किया कि मराठी श्रोता उर्दू श्रोताओं की तरह दाद नहीं देते । ऐसा विशेष रुप से महाराष्ट्र से बाहर के कार्यक्रमों के जरिए प्रयत्न कर रहे है । महाराष्ट्र मे पुणे, कोल्हापुर, नांदेड, सांगली, अमरावती, औरंगाबाद, जलगांव आदि जगह उनके कार्यक्रम को संगीतप्रेमियों का खूब समर्थन मिला है । सुधाकर कदम की ग़ज़ल गायकी कई विशिष्टताओं से परिपूर्ण है । उन्होंने ग़ज़लों को शास्त्रीय पध्दति में ढालने का प्रयास किया है । यही कारण है कि उनके द्वारा गाई ग़ज़लें सामायिक नहीं वरन सदाबहार बन गई है । जिस तरह उर्दू ग़ज़लों में गायन के पूर्व गायक कुछ एक शेर पेश करते है । ठीक उसी तरह सुधाकर जी भी मराठी ग़ज़ल शुरु करने के पूर्व रुबाई का सफल प्रयोग करते है । महाराष्ट्र के यवतमाल जिले के पच्चीस-तीस हजार आबादी वाले आर्णी नामक कस्बे में रहने वाले सुधाकर कदम एक अच्छे सरोद वादक भी है ।
 सोनम मार्केटिंग एंड कम्यूनिकेशन द्वारा आयोजित तथा डी़ एड़ एच़ सेचरॉन द्वारा प्रायोजित इस अनोखी गजल निशा के दूसरे आकर्षण थे कलीम खान ।संपूर्ण कार्यक्रम का संचालन अपनी मधुर आवाज और विशिष्ट अंदाज में कर कलीम खान ने उपस्थित मराठी भाषियों का दिल जीत लिया । वे एक अच्छे कवि एवं गजल रचयिता भी है । कलीम खान ने ‘कुंकू’ शीर्षक वाली अपनी अत्यंत संवेदनशील कविता सुनाकर श्रोताओं को हतप्रभ कर दिया । तबले की संगत रमेश उइके (नागपुर) ने की जबकि सारंगी वादन मोइनुद्दीन (इंदौर) ने किया ।

दैनिक चौथा संसार,इंदौर,दि.२७/११/१९८९





 





संगीत आणि साहित्य :