गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Monday, January 28, 2013


 (महा)राष्ट्रधर्म 

माझे तुझेपण 
अवतरले की 
सारी आपुलकी
दूर जायी...

माथी भडकती 
भावना चळती 
संहाराची नीति 
स्विकारता...

कसोटीच्या क्षणी 
आक्रीत घडते 
थरकापविते 
सामान्याना...

जातीची खिंडारे 
भरता भरे ना 
तरीही राज्यांना 
भोके पाडी...

होते सामाजिक 
विभाजन जेव्हा 
एकोप्याला तेव्हा 
तडा जाते...

दूर आसामात 
हिंसाचार होता 
येथे का ’स्त्रैणता’ 
सुरू होई...?

समाज कंटक 
अफवास्त्र सोडी 
होई तोड-फोडी 
चहुकडे...

गट-तटवार 
जात-धर्म-राज्य 
यालाच सुराज्य 
म्हणावे का...?

कितीदा चुकीची 
होते हाताळणी 
तरिही ’गुळणी’ 
तोंडात का...?

पोळी भाजण्यात 
राजकीय पक्ष 
नेहमीच दक्ष
असतात...

आपापला स्वार्थ 
साधण्यासि वेगे 
पेटविती दंगे 
जागोजागी...

फुटीरतावाद 
राज्या-राज्यातला 
विवादाला साद 
घालितसे...

सर्व जनतेने 
ठेवोनि एकोपा 
भावबंध जपा 
सांगणे हे...!

जय हिंद ! जय महाराष्ट्र

सुधाकर कदम

//सुधाकरी//









Thursday, January 24, 2013


ययाती...

स्पर्शून  एकदा  तू केले मला ययाती
या भग्न मंदिराशी का जोडतेस नाती ?

आता अशा घडीला मी काय बा करावे
तेजाळलेस  देहा  लावून एक ज्योती

विरता धुक्यात दोघे कोणी कुणा दिसेना
तीरावरी नभाच्या राहील फक्त दीप्ती

पांथस्थ मी असा की रस्ता फितूर ज्याला
सारेच भास नुसते चकवा जसा सभोती

माझे  न  राहिले  ते तू मागते कशाला
स्वप्नातल्या असे ह्या बिनपालखी वराती

हा पीळ आतड्याचा कोणासही न कळला
मधुपात्र हे रिकामे हातात फक्त माती


सुधाकर कदम

//सुधाकरी//








Thursday, January 10, 2013

शेतकरी...




सर्जनशीलता
आणि शेतकरी
जवळिक भारी
मोहतुंबी...

कष्ट आणि घाम
भूईत पेरता
हिरवीगार माता
बारोमास...

मानव निसर्ग
एक अनुबंध
नर-नारी बंध
साक्षात्कारी...

वंश सातत्याचा
अर्थ घनदाट
भावना उत्कट
अंगभूत...

निसर्गाचा रस
रूप स्पर्श गंध
नवाच प्रबंध
उत्कटतेचा...

कोणे एके काळी
समाज जीवन
घेई कामातून
आनंदचि...

सार्‍या या कष्टाला
भावविभ्रमाची
आणि शृंगाराची
जोड होती...

राबणार्‍या मनी
चैतन्य झालर
राबण्याचा भार
वाटेचि ना...

सळसळणार्‍या
शृंगारप्रधान
’लावणी’चे वाण
इथलेच...

समाज व्यवस्था
करिते विकास
प्रेमभाव श्वास
जेव्हा वसे...

झालाय खटारा
राबून खाणारा
मारून खाणारा
लोटपोट...


सुधाकर कदम




संगीत आणि साहित्य :