गझल

माझी मराठी गझल गायकी

मराठी गझल गायकीला तशी कोणतीही परंपरा नाही.माझ्या अगोदर मराठी गझल,गझलसारखी गाण्याचा फ़ारसा प्रयत्न कोणीच केला नसल्यामुळे मराठी गझल गाणे हे माझ्यासाठी आव्हान होते.मराठीमध्ये गझल जशी उर्दूकडून आली तशीच मराठी गझल गायकीही उर्दू गझल गायकांकडून उचलावी लागली.माझी गायकी किंवा ढंग हा पाकिस्तानचे मेहदी हसन,फ़रिदा खानम,गुलाम अली व आपले जगजीत सिंग ह्यांच्या गायकीवरुन तयार झाला आहे.त्या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी सारख्या आडवळणी गावात वरील गायकांच्या ध्वनिमुद्रिका सुध्दा मिळत नव्हत्या.पाकिस्तान रेडिओवरुन जे काही ऐकायला मिळायचे त्यावरुन मला जेवढे शिकता येईल तेवढे शिकत गेलो.पुढे स्व.सुरेश भटांनी मला मेहदी हसन,फ़रीदा खानम, यांच्या ध्वनिफ़िती दिल्या.हळूहळू गुलाम अली,जगजीत सिंग,बेगम अख्तर यांच्याही गायकीचा अभ्यास करुन मी माझा वेगळा असा बाज निर्माण केला. (पृष्ठ क्रमांक क्लिक केल्यास एक- एक पृष्ठ आपल्याला वाचता येईल)

पृष्ठ क्र.



Wednesday, January 3, 2024

आठवणीतील-शब्द-स्वर (लेखांक २२)

.                       ●प्रश्न आणि उत्तर●

     काही प्रश्न आणि उत्तरे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही.मग तो शिक्षक असो,कलाकार असो की सामान्य माणूस असो! कारण प्रश्न एक व उत्तर दुसरे असा प्रकार नेहमीच घडत असल्याने तो एक मनोरंजनाचा भाग ठरतो. कसा?  हे बघा! दोन बहिरे सकाळी सकाळी भेटल्यावर...
'काय ? फिरायला निघाला वाटतं?' पहिला.
'नाही, नाही, फिरायला निघालो!' दुसरा.
'असं असं, मला वाटलं फिरायला निघालात.' पहिला.     
      १९८३ मध्ये  पुण्याच्या 'रस्टन ग्रीव्हज्' कंपनीतर्फे राजवाडे हॉलमध्ये माझा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम झाला होता.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भावगीत गायक स्व. गजाननराव वाटवे हे होते.(माझ्याबद्दल "मला आवडलेला गझलिया" असा उल्लेख त्यांचा रोजनिशीमध्ये असल्याचे,दैनिक सकाळामध्ये आलेल्या त्यांच्यावरील एका लेखामुळे बऱ्याच कालावधीनंतर मला कळले.तो लेख माझ्याकडे आहे.) सूत्र संचालन सध्याचे लोकसत्ताचे संपादक मुकुंद संगोराम यांचे वडील, तत्कालीन प्रसिद्ध संगीत समीक्षक स्व. श्रीरंग संगोराम यांनी केले होते. कार्यक्रमानंतर एक व्यक्ती मला भेटायला आली व 'ओळखलं का?' हा प्रश्न बंदुकीच्या गोळीसारखा नेम धरून माझ्याकडे भिरकावती झाली,  मी पडलो भिडस्त ! (१९८२ मध्ये पुण्यात बरेच कार्यक्रम झालेले असल्याने कुणीतरी रसिक असावा म्हणून उगीच त्याला इतक्या लोकांमध्ये ओळखले नाही असे कसे म्हणायचे?) म्हणून 'वाऽ वाऽ ओळखले ना!' असे म्हणून सुटकायचा प्रयत्न करायला लागलो तर तो जवळ येऊन ह्याSSS ह्याSSS असे चार मजली हसत, 'मला वाटलंच ओळखाल म्हणून, उगीच नाही मी माझ्या भाच्याला सांगितलं!' असे म्हणून लहानग्या भाच्याला पुढे करून नमस्कार करायला सांगितले. मी प्रतिनमस्कार करून त्याला कटविण्याकरिता 'बराय येतो' असे म्हणताच तो जळूप्रमाणे चिटकून म्हणाला, 'मी सध्या पुण्यातच आहे. उद्या घरी या ना!' मी त्याला टाळण्याकरिता होयबाची भूमिका वठवत हो हो म्हणून जायला निघालो, तसा आडवा होऊन म्हणतो कसा, 'कसे याल?' मग मात्र नको तो स्वर लागल्याने गाणाऱ्याची जशी पंचाईत होते, तशी माझी झाली. माझ्या चेहन्यावरचे भाव पाहून त्याला मात्र आसुरी आनद झालेला मला दिसला आणि बरोबर पेचात पकडल्याचा आव आणत स्वतःचे नाव विचारायला लागला. आता मात्र माझे सातही स्वर बेसूर झाल्याचे लक्षात आले व अSSS आSSS SSS SSS SSS अशी बाराखडी सुरू झाली, पण आता का माघार घेतली तर पुढे कठीण जाईल हे लक्षात येऊन हो म्हणालो, 'चेहरा आठवतो हो, पण नाव काही आठवत नाही! खूप लोक ठिकठिकाणी भेटतात प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवू शकत नाही.' वगैरे वगैरे प्रकार करून त्याच्याकडून त्याचे नाव वदवून घेतले व कशीबशी बोळवण करून सुटकेचा श्वास टाकला. खरे म्हणजे त्याने सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीला मी कधीच भेटलो नव्हतो.
    शिक्षक असताना तर प्रश्न एक व उत्तर दुसरे असे नेहमीच घडत गेले. नागरिकशास्त्राच्या एका प्रश्नपत्रिकेत 'नागरी जीवनाचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता का असते?' असा प्रश्न होता. एका विद्यार्थ्याने उत्तर लिहिले, 'पावसाळ्यात खूप पाऊस येऊन नदीला पूर आल्यास घरे वाहून जाऊ नयेत म्हणून नागरी जीवनाचा पाया मजबूत करणे आवश्यक असते.' इतिहासाच्या एका प्रश्नपत्रिकेत 'बौध्दकालीन स्तुपांची माहिती लिहा' असा प्रश्न होता. उत्तर लिहिले गेले, 'बौध्द काळात दोन प्रकारचे तूप प्रसिध्द होते. १) गायीचे तूप २) म्हशीचे तूप.
     सातवीच्या विज्ञानविषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नासोबत 'आकृती काढा' असे लिहिले होते व एका पठ्याने प्रश्न सोडवून सोबत एक तोंड वासलेल्या कुत्रीचे चित्र काढले व त्याखाली 'ही आकुत्री आहे' असे मोठ्या टेचात लिहून ठेवले. ही उत्तरपत्रिका पूर्ण शाळाभर फिरली व दाद घेऊन गेली.
      याच प्रश्नपत्रिकेत दुसरा प्रश्न होता 'सुर्यकुलाचे घटक कोणते ?' उत्तर होते- तीळ, जवस, करडई, शेंगदाणा, वगैरे वगैरे सूर्यफुलाचे घटक आहेत. सूर्यकुलाला सूर्यफूल समजून इतरांना बिगफूल बनविणाऱ्या या विद्यार्थ्याचेही 'कौतुक' झाले.
     प्रश्न एक व उत्तरे दुसरे यातून इतिहासही सुटला नाही. एक प्रश्न होता, 'इतिहासातील दोन बाजींबद्दल थोडक्यात माहिती द्या.' एकाचे उत्तर होते, 'माझ्या घरी दोन ऐतिहासिक बाजी आहेत. एकीवर माहा बा झोपतो व एकीवर माही माय!'
     मायबोलीची चिरफाड तर सदैव सुरूच असते. याला कोण जबाबदार हे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनीच शोधावे. प्रश्न होता 'वर्णाचे प्रकार लिहा.' उत्तर होते, 'वर्णाचे दोन प्रकार आहेत १) साधे वर्ण २) फोडणीचे वर्ण.
     विद्यार्थ्यांचे एक सोडा, मोठी माणसे तरी प्रश्न तसे उत्तर देतात काय ? एकदा आणींच्या बसस्थानकावर चौकशी खिडकीवर जाऊन 'माहूर बस किती वाजता आहे?' असा प्रश्न फेकला तर तेथील चौकशी साहेब, होऽऽ होऽऽ, साहेबच मुद्राभिनय करून सल्ला देतो. 'टाईमटेबल देखो ना, एज्युकेटेड तो दिख रहे हो, कहाँ कहाँसे आ जाते यहाँ पर !' मला सांगा, हे प्रश्नाचे उत्तर झाले काय ?
     जगत असताना हे असेच सदैव घडत असते. प्रश्न विचारतो एक अन् उत्तर मात्र दुसरेच मिळत असते. बालपणी आईवडिलांची उत्तरे, तरुणपणी शिक्षक-प्राध्यापकांची उत्तरे, नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तरे व आयुष्यभर बायकोची उत्तरे... आपण ठोंब्या असल्याचा साक्षात्कार करणारीच असतात. त्याला मात्र इलाज नाही.


 





संगीत आणि साहित्य :